Showing posts with label Journalist.. Show all posts
Showing posts with label Journalist.. Show all posts

Saturday, August 25, 2007

"कागदी वाघ' उतरले मैदानावर

इतके दिवस आम्ही "कागदी वाघ' होतो. नुसतेच शब्दांचे चेंडू! पण न कर्त्याच्या वारी मात्र, कॉम्प्युटर आणि कागदावरुन थेट मैदानावर पोचलो. तेव्हा आलेला अनुभव केवळ अवर्णनीय. मुख्य म्हणजे कार्यालयात बसून आणि दूरचित्रवाणीवर सामने पाहून याची खेच, त्याला सल्ले दे, त्याची अक्कल काढ, उगाचच कोणालाही उपदेशाचे डोस पाज, असं करीत पत्रकारिता करणारे पुण्यातले बहुतांश क्रीडा पत्रकार खडकीच्या रेंजहिल्स मैदानावर जमले होते. कारण होतं "आयटी'तले अधिकारी आणि क्रीडा पत्रकार (नुसतेच खेळ आवडणारे नव्हे तर मैदानावर उतरण्याची आवड असणारेही) यांच्याल्या फुटबॉल सामन्याचं. महाराष्ट्र क्रीडा मंडळाने रोहन बिल्डर्सच्या सहाय्याने आयोजित केलेल्या "इंटर आयटी' फुटबॉल स्पर्धेमध्ये पत्रकार आणि "आयटी'तले अधिकारी यांच्यात फुटबॉलचा सामना होता. 45 अधिक 45 असा एकूण 90 मिनिटांचा सामना नव्हता. तर फक्त 15 अधिक 15 असा फक्त अर्धा तास आम्ही मैदानावर होतो. पण अक्षरशः घाम निघाला. "अमुक संघाने सोप्या संधी दवडल्या...' किंवा "तमुक गोलरक्षक चेंडू अडवू शकला नाही...' याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही मैदानावर घेतला.

आमच्या संघात आशिष पेंडसे (जागो) आणि सिद्धार्थ केळकर हे दोघेच क्‍लब स्तरावर फुटबॉल खेळलेले. पण तरीही त्यांचा गेल्या अनेक महिन्यांपासून (कदाचित वर्षांपासून) सराव नव्हता. उर्वरित सर्व खेळाडू हौशे, नवशे आणि गवशे होते. पास मिळाल्यानंतर चेंडू अडविणे, किक मारणे, व्यवस्थित पास देणे हे या बेसिक गोष्टींमध्येच वांदा होता. अगदी माझ्यापासून सगळ्यांचा. माझी एकूणच प्रकृती पाहून सर्वांनीच मला "गोलपोस्ट' सांभाळण्यास भाग पाडले. पण मी देखील मनापासून गोलरक्षक बनण्यास उत्सुक होतो. कारण आपल्या आवडत्या खेळाडूंपैकी एक म्हणजे जर्मनीचा ऑलिव्हर कान. त्याचे काम किती अवघड आणि जिकिरीचे आहे, त्याचा अनुभव मला घ्यायचा होता.

पहिल्याच मिनिटाला माशी शिंकली. विजय जगताप हा "डी'मध्ये असताना त्याच्या हाताला चेंडू लागला आणि प्रतिस्पर्धी संघाला "पेनल्टी किक' बहाल करण्यात आली. गोल झाला हे योगायोगाने आलेच. 1984 ते 92 या कालावधीत भारताकडून खेळणाऱ्या संतोष कश्‍यप यांनी हा पहिला गोल केला. सद्यस्थितीत कौशिक हे महिंद्राचे "लेव्हल टू' प्रशिक्षक आहेत. कौशिक यांनीच पुढे आम्हाला वारंवार सताविले. खेळताना सराव किती महत्त्वाचा हे आम्हाला पटत होते. खेळात सुसूत्रता नव्हती, बचाव फळी भेदली जात होती, आक्रमकांना यश येत नव्हते ही बातम्यांमध्ये लिहिलेली वाक्‍ये आमच्या समोर घडत होती. (दुर्दैवाने फक्त आमच्या बाबतीच)

आम्हाला त्याचे काही दुःख नव्हते. कारण आम्ही फक्त खेळण्यासाठी मैदानात उतरलो होते. विजयासाठी प्रयत्न केले नाहीत, असे नाही. पण विजय मिळणे अवघड आहे, हे आम्हाला माहिती होतेच. त्यामुळे कमीत कमी गोलने पराभव हे उद्दिष्ट डोळ्यासमोर होते. आणखी एक म्हणजे आपल्या अंगात जी रग असते ती जिरविण्याचा खेळणे हा खूप चांगला पर्याय आहे. बऱ्याच वर्षांनंतर ती रग आज जिरली. पूर्वार्धात केळकर, सलील कुलकर्णी आणि पेंडसे यांनी काही सुरेख चाली रचल्या. दोन ते तीन वेळा चेंडू अगदी "गोलपोस्ट'जवळ नेण्यात आमच्या खेळाडूंना यश आले. पण "गोल' साध्य होत नव्हता. पूर्वार्धात आणखी दोन गोल झाले. (अर्थातच, आमच्यावर) त्यापैकी एक कौशिक यांनीच केला. तो मैदानी गोल होता. तर तिसरा गोल माझ्याच चुकीमुळे झाला. "डी'मधून चेंडू टाकताना किंवा "किक' मारताना थोडी गडबड होत होती आणि चेंडू प्रतिस्पर्धी खेळाडूंकडेच जात होता किंवा चुकीच्या दिशेला जात होता. त्यातच एकदा मी मारलेला चेंडू फार लांब न जाता जवळच उभ्या असलेल्या प्रतिस्पर्धी खेळाडूकडे गेला. कपाळाला हात लावण्यापलिकडे काहीच पर्याय नव्हता.

उत्तरार्ध आमच्यासाठी थोडा चांगला ठरला. बहुतांश वेळ "आयटी'च्या हाफमध्येच चेंडू होता. चार ते पाच वेळा गोल करण्याचे प्रयत्न आमच्याकडून झाले. त्यापैकी एक-दोनदा तर अगदी थोडक्‍यात गोल होता होता वाचले. त्यामुळे थोडा हुरुप आला. उत्तरार्धातील पहिला आणि सामन्यातील चौथा गोल थोडा गंमतशीर पद्धतीने झाला. प्रतिस्पर्धी खेळाडू चेंडू घेऊन आमच्या "डी'मध्ये आला. त्याला अडविण्यासाठी मी पुढे सरसावलो. तेवढ्यात त्याने मला चकवून चेंडू गोलपोस्टसमोर ढकलला. सुदैवाने तेव्हा तेथे त्यांचा कोणीच खेळाडू नव्हता. त्यामुळे आमच्या एका खेळाडूला चेंडू अडव, असे सांगितले. तेव्हा कदाचित आपण क्रिकेट नव्हे तर फुटबॉल खेळत आहोत, याचा त्याला विसर पडला आणि त्याने "डी'मध्ये चक्क हाताने चेंडू अडविला. आपण हे काय केलं, हे दोन क्षण त्यालाही कळलं नाही. पण दोन सेकंदांनंतर सारेच हास्यकल्लोळात बुडाले. इथेच आमच्यावर चौथा आणि शेवटचा गोल झाला.

गोलरक्षण करताना गडबडीत दोन-तीन सूर मारले. एकदा चेंडू अडविला आणि दुसऱ्यांदा प्रतिस्पर्धी संघातील एका खेळाडूला आडवा केला. "आयबीएम' कंपनीत काम करणारा तो खेळाडू पुन्हा आमच्या "गोलपोस्ट'कडे फिरकला नाही. 4-0 याच निकालावर सामना संपला. सामना हरलो पण हरल्याचे दुःख नव्हते. खेळल्याचे समाधान होते.

आमचा संघ ः आशिष पेंडसे (कर्णधार), सिद्धार्थ केळकर, मिकी आग्नेर, मायकेल जोसेफ, सलील कुलकर्णी, आनंद चयनी, हेमंत जाधव, विजय जगताप, आशिष फडणीस, निखिलेश पाठक, मुकुंद पोतदार (पोतोस्की), श्रीराम ओक, चंदन हायगुंडे आणि आशिष चांदोरकर (गोलरक्षक). "नॉन प्लेईंग कॅप्टन' ः राजेंद्र कानिटकर, व्यवस्थापक ः अमित डोंगरे, "नॉन प्लेईंग मॅनेजर' ः भास्कर जोशी, समर्थक ः मनिष कांबळे.