Showing posts with label Marathi. Show all posts
Showing posts with label Marathi. Show all posts

Tuesday, April 05, 2011

तमिळ शिका तरच पैसे मिळतील

चेन्नईहून पाँडिचेरीसाठी निघालो आणि तमिळनाडूमध्ये तमिळ भाषेचे महत्त्व का टिकून आहे, याचा साक्शात्कार मला प्रवासादरम्यान झाला. तमिळनाडूमध्ये कोठेही काम करा, तमिळ आल्याशिवाय तुम्हाला नोकरी मिळत नाही किंवा जादा पैसेही मिळत नाही. तेव्हा जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमिळ शिकण्यावाचून तुम्हाला गत्यंतरच नाही, ही गोष्ट उत्तर प्रदेशहून आलेल्या एका भैय्या मुलाकडून मला समजली. तेव्हा मला धक्का वगैरे काही बसला नाही. पण जे काही ऐकले होते ते प्रत्यक्श अनुभवल्याचा साक्शात्कार झाला.
सोनू असं त्या मुलाचं नाव. वय साधारण पंचवीस सव्वीस असेल. सोनू हा मूळचा उत्तरप्रदेशचा. रामपूर किंवा तत्सम कुठल्या तरी खेड्यातला. दोन वर्षांपूर्वी तो मुंबईमध्ये फर्निचर बनविण्याच्या धंद्यात कारागिर म्हणून लागला होता. तिथं त्याला सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या कालावधीचे दोनशे रुपये मिळायचे. पण चेन्नईमध्ये तितक्याच कामाचे त्याला साडेतीनशे रुपये रोज मिळतात. त्यामुळे त्यानं मुंबई सोडून चेन्नईत येण्याचा निर्णय घेतला. मुंबईमध्ये भैय्या लोकांची खूप गर्दी असल्यामुळे तिथं जास्त पैसे मिळत नाही. पण चेन्नईमध्ये कारागिर लोकांची कमतरता असल्याने इथं आम्हाला जास्त भाव मिळतो, असं सोनू सांगतो.
चेन्नईतही कारागिरांचे दोन प्रकार आहेत. ज्यांना तमिळ येते, अशा कारागिरांनाच तमिळ ठेकेदार कामावर ठेवतात. तमिळ ठेकेदारांकडे काम केले तर आम्हाला दिवसाला साडेतीनशे रुपये मिळतात. जर गैरतमिळ (म्हणजे हिंदीभाषक) ठेकेदाराकडे काम केले तर मुंबईप्रमाणेच दोनशे रुपये रोजाने काम मिळते. त्यामुळे आम्हाला जास्त पैसे मिळवायचे असतील तर तमिळ भाषा शिकावीच लागते. तमिळनाडूत येऊन जर मुंबईचाच भाव मिळणार असेल तर इथे येण्याचा काय उपयोग, असा सवाल सोनू उपस्थित करतो.
तमिळनाडूमध्ये आल्यावर तमिळ शिकला. मग मुंबईमध्ये असताना मराठी शिकला होता का? हा माझा प्रश्न ऐकून तो चक्रावूनच गेला. मी मूर्ख म्हणून असा प्रश्न विचारतो आहे, की काय असाच त्याचा चेहरा झाला होता. सोनू म्हणाला, साहेब, मुंबईमध्ये मराठी लोकच हिंदीमध्ये बोलतात. त्यामुळे आम्हाला तिथे भाषेचा प्रॉब्लेम कधीच आला नाही. आम्ही आमच्याच प्रांतामध्ये आहोत, असे आम्हाला वाटायचे. त्यामुळे महाराष्ट्रात असताना किंवा मुंबईमध्ये असताना मराठी शिकण्याचा प्रश्नच आला नाही. तिथे मराठी न शिकताही आम्हाला नोकरी आणि पैसे मिळत होते. मात्र, इथे तसे नाही. त्यामुळे तमिळ आम्हाला शिकावीच लागली.
काही महिन्यांपूर्वी तमिळनाडूमध्ये राजस्थानी लोकांचे एक संमेलन झाले होते. त्यावेळी त्यांनी राजस्थानी भाषेतील गाणी आणि संगीत जोरजोरात लावले होते. त्यावेळी काही जणांनी त्यांच्याबद्दल तक्रार केली आणि हा मुद्दा करुणानिधी यांच्यापर्यंत गेला. त्यावेळी करुणानिधी यांनी त्यांना सज्जड भाषेत इशारा दिला होता, तुम्हाला गाणी ऐकायची ऐका, काम करायचे आहे करा. तुम्हाला कोणी अडविणार नाही. पण जेव्हा भाषेचा मुद्दा येईल, तेव्हा तुम्हाला तमिळ आलीच पाहिजे. बोलायचे मात्र, तमिळमध्येच. ब-याच दिवसांपूर्वी वाचलेला हा किस्सा नुसता डोक्यात होता. सोनूच्या निमित्ताने त्याचा थेट अनुभव आला.
तमिळनाडू डायरी
जयललिता आणि विजयकांत यांच्यासह इतर विरोधकांनी ए. राजा यांच्यावरील आरोपांचा मुद्दा लावून धरला नसला तरी सर्वसामान्य रिक्शावाल्यांपर्यंत हा मुद्दा नीट पोहोचलेला आहे, याचा प्रत्यय चेन्नईमध्ये आला. चेन्नईहून पुद्दुचेरी येथे येण्यासाठी बस स्टँडला जायला निघालो. तेव्हा मी रिक्शामध्ये बसलो त्याचा ड्रायव्हर रघू नावाचा माणूस होता. तो मूळचा कर्नाटकचा. तो मोठा झाला आंध्र प्रदेशात आणि रिक्शा चालवितो चेन्नईमध्ये, म्हणजे तमिळनाडूत.
कुंचूम कुंचूम हिंदी, कुंचूम कुंचूम इंग्लिश, असं तो म्हणला. म्हणजे मला थोडं थोडं हिंदी आणि इंग्लिश समजतं असं. त्याला मी विचारलं, काय यंदा कोणाला संधी आहे? त्यावर त्यानं क्शणाचाही विलंब न करता सांगितलं, की यंदा अम्माच. मी म्हटलं, का? तेव्हा तो म्हणाला, की त्या राजानं संपूर्ण देशाला लुटलं. पावणे दोन करोडचा गफला केला. सगळ्या तमिळनाडूचं नाव खराब केलं, असं म्हणत रिक्शावाल्यानं एक पंचाक्शरी शिवी हासडली. पुन्हा तमिळमध्ये दोन-चार अपशब्द वापरून नवी पंचाक्शरी हिंदी शिवी हासडून यंदा अम्माच, असं ठासून सांगितलं. त्यामुळं विरोधकांनी हा मुद्दा लावून धरला नसला तरी काही चलाख लोकांना त्याची पुरेपूर माहिती आहे, असंच म्हणावं लागेल.
आजचा तमिळ शब्द वेईप्पाळः शब्दाचा अर्थ उमेदवार