Showing posts with label Raibareli. Show all posts
Showing posts with label Raibareli. Show all posts

Saturday, June 28, 2014

उत्तर प्रदेश… उत्तम प्रदेश

दिलदार लोकांचा शानदार प्रदेश

लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशला जाण्याचे निश्चित केले होते. संस्थेनं पाठविलं तर संस्थेकडून अन्यथा स्वतःहून जायचं. मुळात उत्तर प्रदेश आणि बिहारचे निकाल यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी खूपच निर्णायक होते, हे एक कारण नि दुसरे म्हणजे उत्तर प्रदेश नेमका कसा आहे, हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. त्यानुसार उत्तर प्रदेशच्या दिशेनं निघालो.


‘उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगार इथं महाराष्ट्रात येऊन सगळी वाट लावत आहेत’, ‘एक बिहारी सौ बिमारी’, ‘इथे येऊन राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न केलात, तर याद राखा,’ ‘छटपूजा नव्हे हटपूजा,’ अशा अनेकांची अनेक वक्तव्य डोक्यात होती. शिवाय तिथल्या गुंडाराजच्या बातम्या पेपरात आणि टीव्हीवर सातत्यानं झळकत असतातच. त्यामुळं अशा गोष्टींमधून उत्तर प्रदेशची अत्यंत वाईट प्रतिमा मनात तयार झाली होती. त्या पार्श्वभूमीवर तो प्रदेश कसा आहे, हे जाणून घेण्याची खूप इच्छा होती.


अखेर पुणे-लखनऊ एक्स्प्रेसनं निघालो. कानपूरचे अॅडव्होकेट राजशेखर माझे सहप्रवासी होते. त्यांनी बोलता बोलता सहज एक सल्ला दिला, की लखनऊच्या स्टेशनवर उतरल्यानंतर मोबाइल वगैरे जरा सांभाळून ठेवा. एखाद्याला तुमचा स्मार्टफोन आवडला तर तुम्ही तुमचा मोबाइल गमावून बसाल वगैरे वगैरे. बापरे, परिस्थिती इतकी गंभीर असेल, तर बारा-पंधरा दिवस आपली वाटच लागेल, असा विचार करून स्टेशनवर पाऊल ठेवलं.

पुण्याहून लखनऊला आलेला अभिषेक नावाचा एक मुलगा माझ्या मदतीला धावून आला. विप्रो की कुठल्याशा आयटी कंपनीत तो एका आठवड्यापूर्वीच जॉइन झाला होता. शिफ्टिंगसाठी तो लखनऊला आला होता. मला जायचं होतं, त्याच परिसरात त्यालाही जायचं होतं. मग त्याच्या बरोबरच नव्यानं वसविण्यात आलेल्या गोमतीनगर परिसरात पोहोचलो. पोहोचायला संध्याकाळ झाली होती. त्यामुळं आराम करून दुसऱ्या दिवशीपासून फिरणं सुरू करायचं असं ठरविलं होतं. लखनऊ शहर, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, मोहनलालगंज, सुलतानपूर, फैझाबाद, अयोध्या, आझमगढ आणि वाराणसी असं बरंच फिरलो. अगदी सहजपणे भेटणार असतील तर राजकारण्यांची भेट घेतली. गावातील लोकांना अधिक भेटलो, त्याच्यांशी बोललो. त्याच गाठीभेटी अधिक उपयुक्त ठरतात, असा माझा अनुभव आहे.

रायबरेलीला जाताना हिंदीचे निवृत्त शिक्षक जयद्रथ चौधरी भेटले. ते देखील रायबरेलीला जात होते. ‘रायबरेली आणि परिसराला निसर्गाचे वरदान आहे. इथं खूप पाऊस पडतो. त्यामुळं इथं प्रामुख्यानं भाताची शेती होते. पिकं चांगली येत असल्यानं शेतकरी सधन आहे. रायबरेली आणि परिसरात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहे. बहुतांश मुली किमान दहावीपर्यंत शिकतात. मुली अभ्यासात हुशार आहेत…’ अशा विविध विषयांवर ते माहिती देत होते.

नरेंद्र मोदींची लाट आणि गांधी परिवार अशा राजकीय विषयांवरही ते दिलखुलासपणे बोलत होते. मोदींची लाट इथंही जाणवते आहे. मात्र, सोनिया गांधी यांनाच मी मत देणार. आम्ही नेहमी त्यांनाच देतो. त्यांचे आणि इथल्या नागरिकांचे भावनिक नाते आहे वगैरे वगैरे. गप्पा मारता मारता कधी रायबरेलीला पोहोचलो ते कळलंच नाही. एसटीतून उतरल्यानंतर ते म्हणाले, ‘चलिए…’. मी म्हटलं, ‘कहा?’ तेव्हा म्हणाले, ‘हमारे घर. भोजन का समय हो गया है. खाना खिलाए बगैर में आपको जाने नही दूँगा. आप हमारे गांव में पहली बार आए है. आप हमारे मेहमान है.’ मला धक्काच बसला. मग त्यांना समजावून सांगितलं, की मला फिरायचं आहे. लोकांशी बोलायचं आहे. प्रियांका गांधी यांच्या रॅलीमध्ये जायचं आहे. जेवण्यात खूप वेळ जाईल. 


मग संध्याकाळी तरी जेवायला जरूर या, अशी गळ ते घालू लागले. मला त्यांचा आग्रह मोडवत नव्हता. पण मला खरंच जमणार नव्हतं. मग ते म्हणाले, ‘ठीक है. चलिए लस्सी ही पी लेते है.’ शेवटी मस्त मलईदार लस्सी पिऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मला सांगा, एसटीत भेटलेल्या एखाद्या माणसाला आपण तरी कधी इतका आग्रह करतो का? किमान मी तर आतापर्यंत कधी केलेला नाही. महाराष्ट्रातून एक जण आपल्या प्रदेशात काहीतरी कामासाठी आलाय. आपण त्याची खातिरदारी केली पाहिजे, ही जयद्रथ चौधरी यांची भावनाच माझ्यासाठी पुरेशी होती.

उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात फिरताना जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे इथले लोक खूप गरीब असले, तरीही मनानं खूप श्रीमंत आहेत. म्हणजे राजकारण्यांनी ग्रामीण भागातील लोकांना मुद्दामून गरीब, अशिक्षित नि अविकसित ठेवलं आहे. ही मंडळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकडेच येतील. मग आपण दरवेळी उपकार केल्याच्या थाटात एखादा तुकडा टाकून त्यांना खूष करू, अशी अत्यंत नीच भावना इथल्या सत्ताधारी राजकारण्यांची आहे… हे मत माझं नाही. हे मत आहे अमेठीत भेटलेल्या राजन पासीचं. माजी आमदार रामलखन पासी यांचा हा पुतण्या. ड्रायव्हर म्हणून काम करतो. 


काही गावात गुंडामार्फत धमक्या द्यायच्या. ‘आम्हाला मतं दिली नाहीत, तर तुमचे हातपाय तोडू.’ कुठं रस्ता, वीज किंवा शाळा सुरू करू, अशी लालूच दाखवायची. कुठं आणखी काही आश्वासनं देऊन वेळ मारून न्यायची, असं करून ही मंडळी वर्षानुवर्ष सत्तेवर आहेत. विकास नावालाही नाही. ही झाली काँग्रेसवाल्यांची रणनिती. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते-कार्यकर्ते सत्तेवर आल्यानंतर गुंडागर्दी करण्यात आणि रुबाब गाजविण्यात मग्न असतात. तर मायावती यांना आंबेडकर पार्क, शाहू पार्क, कांशीराम पार्क आणि स्वतःचे पुतळे यांच्यावर काही शेकडो कोटी रुपये खर्च करण्यातून लोकांकडे पहायला वेळच मिळत नाही.

लोकांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, चांगले रस्ते, २४ तास वीज आणि मुबलक पाणी हवंय. मात्र, त्यांच्या या मागण्या बधीर राजकारणी मनावर घ्यायलाही तयार नाहीत. भाजपची ही परिस्थिती काही वेगळी नाही. भाजपचे आधीचे नेते एकमेकांच्या तंगड्या ओढण्यातच मग्न होते. त्यांनाही लोकांकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपला तिथं संजीवनी मिळाली. मोदी यांनी गुजरातमध्ये खूप काही विकासकामे केली आहेत. तिथं २४ तास वीज असते. चांगला रोजगार आहे. गुंडागर्दी नाही. उत्तर प्रदेशातील आहोत, म्हणून हिडीसफिडीस नाही. अशा अनेक कथा नि अनुभव गुजरातेत काम करणाऱ्या कामगारांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावात ऐकविल्या होत्या. त्यामुळेच मोदी या माणसाला एकदा संधी देऊन तर बघू. गुजरातचा विकास केला म्हणतात. पाहू या, उत्तर प्रदेशचा कसा विकास करतो. या आणि केवळ या एकाच आशेवर उत्तर प्रदेशातील पिचलेल्या आणि गांजलेल्या मतदारांनी मोदींच्या पारड्यात भरभरून मते टाकली. ‘नरेंद्र मोदी से बहुत उम्मीद है…’ हे वाक्य जवळपास प्रत्येक ठिकाणी कानावर पडत होतं. आता बोला.

रिक्षावाल्यावरून आठवलं. उत्तर प्रदेशात सायकल रिक्षा सगळीकडेच आहेत. तिथं रिक्षा म्हणजे सायकर रिक्षाच. आपण जिला रिक्षा म्हणतो, तिला तिथं ऑटो म्हणतात. साधारण एका चौकासाठी पाच ते दहा रुपये इतके पैसे ही मंडळी घेतात. रिक्षा चालविणारे बरेच जण शेतमजूर आहेत. शेतीची कामं नसतील, तेव्हा घर चालविण्यासाठी ही मंडळी रिक्षा चालवितात. लखनऊमध्ये दोन-तीन जणांशी सहज बोलल्यानंतर ही माहिती कळली.


माणुसकी पिळवटून टाकणाऱ्या अशा रिक्षामध्ये बसणं मला फारसं इष्ट वाटत नाही. त्यामुळं लखनऊ आणि इतर गावांमध्ये मी सायकल रिक्षांमध्ये बसणं टाळलं. मात्र, वाराणसीमध्ये असताना मला जिथं जायचं होतं तिथपर्यंत या सायकल रिक्षाच जातात. त्यामुळं नाईलाजानं मला त्यात बसणं भागच होतं. सायकल सुरू झाली आणि आमचंही बोलणंही. अजूनही तो संवाद माझ्या कानात घुमतोय. तो संवाद आठवला, की आजही अंगावर शहारे येतात.

तो रिक्षावाला आधी वाराणसीत साड्यांवर नक्षीकाम आणि कलाकुसर करणारा कलाकार होता. मात्र, कम्प्युटरवर वेगवेगळी डिझाइन्स तयार करण्यात येऊ लागल्यानंतर अशा कलाकारांचं महत्त्व कमी झालं. खूप फिरून, इकडे तिकडे हात मारून पाहिले. मात्र, शेवटी कुठंच काही मिळेना. शेवटी एके दिवशी सगळे कुटुंबीय उपाशी राहिले. शेवटी ठरविलं, जगण्यासाठी सायकल रिक्षा चालविण्यावाचून पर्याय नाही. तेव्हापासून रिक्षा चालवितोय… भोलू सांगत होता.

‘किती मुलं आहेत तुम्हाला. शिकतात ना ते सगळे,’ मी.

‘सहा मुलं आहेत. तीन मुलं आणि तीन मुली. एकीचं या जानेवारी महिन्यात लग्न झालं. बाकीचे सगळे शिकत आहेत. मला माझ्या परीनं जेवढं शिकविता येईल तेवढं शिकवतोय त्यांना साहेब,’ इ भोलू.

सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ४५ डिग्री सेल्सियसमध्ये मरमर करून सायकल चालविल्यानंतर त्याला कसेबसे साडेचारशे रुपये मिळणार. त्यापैकी चाळीस रुपये भाड्याचे. म्हणजे अवघ्या चारशे रुपयांत हा माणूस आठ जणांच्या संसाराचा गाडा कसा ओढत असेल, या विचारानंच मला गलबलून गेलं. 


जानेवारीत त्याच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यासाठी त्यानं तब्बल पाच-सहा लाख रुपये खर्च केला होता. साग्रसंगीत लग्न लावून द्यायचं. बारा ते पंधरा तोळे सोने. जावयाला डिस्कव्हर गाडी. शिवाय घरात रंगीत टीव्ही, फ्रीज, फर्निचर इ. इ. हे सगळं ऐकून मला वेड लागायची वेळ आली होती.

‘अरे, बाबा इतका खर्च कशाला करायचा. साधं लग्न लावून द्यायचं ना…’ माझं वाक्य संपतं ना संपत तोच भोलू म्हणाला, ‘साहेब, माझ्या मुलीला रिकाम्या हातानं पाठविलं असतं तर सासरकडच्यांनी तिला एक दिवस पण ठेवून घेतलं नसतं. परत पाठवून दिलं असतं. साधं लग्न लावून द्यायचं म्हणायला बरंय. पण समोरच्यांना ते नाही चालत. वाईट आहे, पण उत्तर प्रदेशात हीच प्रथा आहे. मी एकटा काही करू शकत नाही. चार लोकं करतात, तेच मला करावं लागतं.’ देवा… आता तो दिवसाला चारशे रुपये कमविणारा भोलू सहा लाखांचं कर्ज फेडणार कसं आणि उर्वरित दोन मुलींचं लग्न लावणार कसं, ही कल्पनाच मला अस्वस्थ करून टाकत होती.

‘साहेब, ऊन-पाऊस कशाचीच पर्वा न करता सायकल चालवावी लागते. अंगात ताप असेल तरी एखादी गोळी-औषध घेऊन सायकल चालवावीच लागते. नाहीतर रात्री घरी चूल पेटत नाही. जेवायचं काय हा प्रश्न पडतो…’

‘बहोत ही मेहनत का काम है ये. सायकल चलाना आसान काम नही है साहब. ये सायकल खून चुसती है खून.’ भोलूचं हे वाक्य इतकं खतरनाक होतं, की आजही त्याचा तो आवाज आणि ते वाक्य मधूनच कानात घुमतं.

‘भगवान सबका भला कर, लेकिन शुरूवात मुझसे कर,’ असं गमतीगमतीत आपण म्हणतो. मात्र, नरेंद्र मोदी सरकारमुळे जर खरेच ‘अच्छे दिन येणार असतील, तर त्याची सुरूवात भोलू नि उत्तर प्रदेशातील अशा लाखो गरीब, बेरोजगार, अशिक्षित लोकांपासून व्हावी,’ असे माझे साकडे आहे. रेल्वेच्या भाड्यात १४ टक्के वाढ केली म्हणून गळा काढणाऱ्यांकडे नंतरही लक्ष देता येईल. मात्र, जो खरोखरच वर्षानुवर्षे पिचलेला आहे, त्याला प्राधान्य द्यायला हवे. किमान इतका दिलदारपणा तरी आपण नक्कीच दाखवू शकतो.


लखनऊत समाजवादी पार्टीच्या कार्यालयात राजेंद्र चौधरी भेटले. समाजवादी पार्टीचे प्रमुख प्रवक्ते. जितके समाजवादी विचारांचे कट्टर तितकेच मुलायमसिंह यांचे भक्त. म्हणजे त्यांचा फोटा काढतानाही त्यात मुलायमसिंह यांचे पोस्टर यावं, अशी त्यांची इच्छा होती. ‘नेताजी के पोस्टर के साथ हमारी तस्वीर आएगी तो बेहतर रहेगा.’ खादीचा कुर्ता पायजमा. खुरटी दाढी आणि प्रसन्न, हसतमुख मुद्रा. आणीबाणीच्या काळात आमदार असलेल्या चौधरी यांना भेटायला एक कार्यकर्ता आला होता. त्याच्या तोंडात मावा की तंबाखू काही तरी होतं. हसतहसत चौधरी त्याला म्हणाले, ‘तुम्ही कसे कार्यकर्ते आहात. इतक्या वर्षात मी साधी सुपारीही खाल्लेली नाही. पानसुपारी तर सोडाच, मी पेप्सी नि कोकाकोलाही प्यायलेला नाही…’ 

समाजवादी विचारांच्या शिकवणीनंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. उत्तर प्रदेशात रोजगार निर्मिती का केली जात नाही. इथल्या लोकांना कामासाठी बाहेर पडण्याची वेळ का येते, हा माझा प्रश्न त्यांना कदाचित अपेक्षितच असावा. ‘हे बघा, चांदोरकर. इथली बरीचशी जमीन सुपीक आहे. तिथं शेती होते. त्यामुळं सुपीक जमिनीवर शेती बंद करून कारखाने लावणं योग्य नाही, असं आमचं मत आहे. शिवाय आमची लोकसंख्याच इतकी आहे, की तुम्ही कितीही कारखाने आणि उद्योगधंदे सुरू केलेत, तरी लोक पोटापाण्यासाठी बाहेर जाणारच. आमचे लोक कष्ट करणारे आहेत. मेहनती आहेत. शांतपणे राहणारे आहेत. मग तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही उत्तर प्रदेशकडे मजूर किंवा कामगार पुरविणारा प्रदेश म्हणून पाहिले, तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही.’ त्यांच्या उत्तरानं माझं पूर्ण नाही, तरी काहीसं समाधान झालं होतं.


मग त्यांनी चांदोरकर या नावाचा नेमका अर्थ काय. तेंडुलकर, मंगेशकर, गावस्कर अशा नावांची कहाणी काय याची विचारणा केली. राहण्याची काय व्यवस्था आहे की करायची आहे, वगैरे विचारपूस केली. उत्तर प्रदेशचे कामगार कुठेही गेले तरी जास्त दमबाजी करणार नाहीत. बिहारचे मजूर मात्र, दादागिरी नि गुंडागर्दी यात थोडे अग्रेसर असतात. तुलनेनं आमच्या कामगारांमध्ये ती वृत्ती कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वाक्याचा प्रत्यय मला वाराणसीत आला. तिथं सायकल रिक्षा चालविणारे आणि अनेक मजूर-कामगार हे बंगाल नि बिहारमधील होते. मात्र, बिहारी लोकांनी तिथंही दमबाजी करण्यास प्रारंभ केला. मग स्थानिकांनी त्यांना पिटाळून लावलं, हे समजताच मला चौधरींची आवर्जून आठवण झाली.

उत्तर प्रदेशात आलेला आणखी एक अनुभव म्हणजे मी महाराष्ट्रातून आलो आहे, हे माहिती असूनही एकानं देखील शिवसेना किंवा मनसेबद्दल तक्रार केली नाही. त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले नाहीत. किंवा टीका केली नाही. त्यांच्या मनात या संघटनांबद्दल राग असता तर बोलताना या ना त्या पद्धतीने व्यक्त झालाच असता. मात्र, पंधरा दिवसांच्या काळात तो कधीच मला जाणवला नाही. ना मी महाराष्ट्रातील आहे, म्हणून मला वाईट वागणूक मिळाली.

लखनऊला जात असताना चौधरी कुटुंबीय माझे सहप्रवासी होते. ते देखील कानपूरचेच. ते पुण्यात पर्सिस्टंटमध्ये कामाला होते. त्यांची पत्नी सहजपणे बोलता बोलता म्हणाली, ‘आमच्या इमारतीमध्ये कानपूरचेच एक जण आहेत. त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं, की तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात, असं अजिबात सांगू नका. दिल्लीचे आहात, असं काहीतरी सांगून टाका. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या लोकांबद्दल खूप घृणा आहे. त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं.’ सॉफ्टवेअर कंपनीत काही लाख रुपयांचे पॅकेज घेणाऱ्या कुटुंबाला त्यांची मूळ ओळख लपवावी, असं वाटत असेल तर त्यांच्या मनात महाराष्ट्राचे काय चित्र निर्माण झाले असेल याचा विचारच न केलेला बरा.

वास्तविक पाहता, अशी परिस्थिती नाही. सर्वांना अगदी सहजपणे सामावून घेणारा आणि कोणत्याही प्रांतात अगदी सहजपणे मिळून मिसळून राहणारा समाज ही मराठी माणसाची ओळख आहे. मात्र, तरीही काही दळभद्री ‘राज’कारण्यांमुळे महाराष्ट्राचे वेगळे आणि चुकीचे चित्र उत्तरेत निर्माण झाले आहे. गुजरातमध्ये दौऱ्याची नौटंकी करणाऱ्यांनी एकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन परिस्थिती पाहिली पाहिजे. तिथली गरिबी जवळून पहावी. त्यांच्याशी बोलावं. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. म्हणजे कितीही संख्येनं ते आले तरी त्यांच्यावर हात उचलण्याची इच्छा होणार नाही. 




उत्तर प्रदेशात इंग्रजी भाषेच्या शिक्षणाची फार चांगली परिस्थिती नाही. मुलायमसिंह सरकार तर इंग्रजीच्या विरोधातच आहे. अनेक तरूणांची संगणकाशी तोंडओळखही नाही. त्यामुळं अनेक ठिकाणी विविध परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील, असे फलक लावलेले दिसतात. एक तर इंग्रजीची बोंब आणि दुसरे म्हणजे कम्प्युटर शिक्षणाचा अभाव. व्यावसायिक शिक्षणासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक. त्या नाहीत, म्हटल्यावर फक्त पारंपरिक पदव्यांचाच पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतो. फक्त एमए, एमकॉम आणि एमएस्सी झाल्यानंतर नोकऱ्या अगदीच मर्यादित. शाळेत किंवा कॉलेजात शिक्षक. नाहीतर सरकारी नोकरीत शिपायापासून ते क्लार्कपर्यंत काहीही. एक तर शेती नाहीतर सरकारी नोकरी. म्हणूनच ही मंडळी रेल्वे, पोस्ट, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या परीक्षा अधिक संख्येनं देतात. कारण पर्याय अगदीच मर्यादित. त्यामुळं महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात कुठंही सरकारी नोकरीची परीक्षा असेल तर ही मंडळी आवर्जून उपस्थिती लावतात. त्याचे कारण हे आहे. सुरुवातीपासून सर्वांना इंग्रजी आणि कम्प्युटर शिक्षण सक्तीचे केले तर तिथली परिस्थितीही नक्कीच बदलेल, असं मला वाटतं. त्या मंडळींना बदडून काढून समस्या अजिबात सुटणार नाही.

उत्तर प्रदेश जवळून पाहण्याची माझी इच्छा पूर्ण झाली होती. वैयक्तिक माझा अनुभव खूप चांगला होता. उत्तर प्रदेशात गरिबी असली तरीही इथली माणसं मनानं खूप श्रीमंत आहेत, हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो. ती माणसं दिलदार आहेत. आदरातिथ्य करण्यात खूप पुढं आहेत. मोकळीढाकळी आहेत. मला तर उत्तर प्रदेश एकदम उत्तम प्रदेश वाटला. फक्त एकच इच्छा आहे, की मनानं श्रीमंत असलेली ही माणसं पैशानं, मानानं, शिक्षणानं, विकासानं आणि सोयी-सुविधांनी श्रीमंत व्हावीत. नरेंद्र मोदी ही परिस्थिती निर्माण करतील, अशी आशा आहे. पाहूया काय होतं ते…

Tuesday, April 29, 2014

क्यो पडते हो चक्कर मे...

प्रियांकाजी है टक्कर में

भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथसिंह यांच्या प्रचार फेरीत सहभागी झाल्यानंतर दुस-या दिवशी रायबरेलीला जाण्याचं प्लॅनिंग होतं. सातव्या टप्प्याचा प्रचार सोमवारी संपणार होता. तिथं बुधवारी म्हणजेत ३० एप्रिल रोजी मतदान आहे. त्यामुळं रायबरेलीला जाण्याचं निश्चित केलं. रायबरेलीतून सोनिया गांधी येणार ही काळ्या दगडावरची रेघ. पण तरीही तिथं जाऊन नेमकं रायबरेली कसं आहे. भारतावर ज्या महिलेनं दहा वर्षे निर्विवाद सत्ता गाजविली, हुकुमत केली, त्या सोनियांचा मतदारसंघ नेमका कसा आहे, हे पाहण्याची आणि परिस्थिती जाणून घेण्याची उत्सुकता होती. केवळ आणि केवळ त्यामुळंच तिथं जायचं होतं. बाकी निकाल तर ठरलेलाच आहे. 



लखनऊतल्या आलमबाग बस डेपोतून रायबरेलील जाणा-या बसेस सुटतात. लखनऊपासून सुमारे नव्वद किलोमीटरवर असलेलं गाव. लखनऊमध्ये सध्या ३९ ते ४० अंश सेल्सियस तापमान आहे. पण उन्हाचा तीव्रता इतकी आहे की विचारता सोेय नाही. अकोला, वाशिम, नांदेड, जळगांव किंवा हैदराबादची आठवण यावी, इतकं कडक ऊन आहे. दुपारी साधारण पावणेबाराच्या सुमारास लखनऊ सोडलं. दुपारी दोन वाजता रायबरेलीत प्रियांका गांधी यांचा रोड शो होता. त्यामुळं अगदी वेळेवर तिथं पोहोचेन अशा बेतानं निघालो. लखनऊ-अलाहाबाद हायवेवर आत उजवीकडे वळल्यानंतर रायबरेली गाव लागतं. दोन पदरी महामार्ग आत्ता कुठं चौपदरी करण्याचं काम सुरू झालंय. वाटेत एक-दोन ठिकाणी नदीवर मोठे पूल बांधणं आणि गावात ट्रॅफिक जाम होऊ नये, म्हणून फ्लाय ओव्हर उभारण्याचं कामही सुरू आहे. 



रायबरेली आणि परिसरातील गावात प्रचंड पाऊस होतो. त्यामुळं इथं धानाची म्हणजेच तांदळाची शेती मोठ्या प्रमाणावर होते. काही गावांमध्ये गहू देखील घेतला जातो. इथले जवळपास ८० टक्के लोक हे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांवर अवलंबून आहेत, असं बसमध्ये भेटलेले सहप्रवासी आणि माजी शिक्षक जयद्रथ चौधरी यांनी सांगितलं. सोनिया यांच्या कृपेमुळ इथं रेल्वे कोचची फॅक्टरी, सिमेंटची फॅक्टरी, सिमेंटचे पत्रे बनविणारी फॅक्टरी वगैरे आली, असंही त्यांनी आवर्जून सांगितलं. मात्र, शेती हाच इथला मुख्य व्यवसाय. सोनियाजींनी खूप निधी केंद्रातून आणला. मात्र, राज्य सरकारने पैसाच सोडला नाही. आमच्याकडे दुर्लक्श केलं, त्यामुळं रायबरेली अजूनही विकसित झालेलं नाही, असं चाचा चौधरी यांचं म्हणणं होतं. मोदीजी की लहर होगी, लेकिन यहा तो सोनियाजी को ही जीतना है, असं चाचा चौधरी यांच्यासह एसटीमध्ये भेटलेले आणखी दोन-तीन सहप्रवासी देखील म्हणत होते.



बछरावा, हरचंदपूर आणि गंगागंज वगैरे गावं मागं टाकून आम्ही रायबरेलीमध्ये प्रवेश केला. गावाचा लुक खेड्यासारखा. महाराष्ट्रातील एखाद-दुसरा तालुका सोडला तर इतर कोणत्याही विकसित तालुक्याच्या तुलनेत अत्यंत मागास, अस्वच्छ आणि विस्कळित असं गाव. म्हणजे गेल्या साठ वर्षांमध्ये गांधी घराण्यानं इथं राज्य केलं, असं सांगूनही कोणाचा विश्वास बसणार नाही, इतकी वाईट अवस्था रायबरेलीमध्ये दिसते. उघडी गटारं, मुंबईत खाडीच्या आसपास असताना नाकात घुसणारी नको असलेली दुर्गंधी इथं त्या उघड्या गटारांजवळ आपल्याला हैराण करणारी. प्रचंड तापलेले वातावरण, सगळीकडे प्रचंड तापमान आणि मधूनच येणारी ती दुर्गंधी अस्वस्थ करून टाकणारी. अरुंद रस्ते, एकावेळी दोन गाड्या कशाबशा जाऊ शकतील इतक्यात रुंदीचे हे रस्ते कम बोळ. 

एकमेकांना खेटून उभारलेली घरं. त्याला ना आकार ना उकार.फक्त चार भिंती रचून वर छप्पर आणि समोर दरवाजा काढला की झालं घर, अशा पद्धतीचं बांधकाम. एसटी स्टँड तर अत्यंत घाणेरडा, छोटा आणि बेशिस्त स्वरुपाचा. चौकाचौकात फेरीवाले, हातगाड्यांवर सरबत, खाण्यापिण्याचे पदार्थ आणि इतर वस्तू विकणारे हातगाडीवाले. थोडक्यात म्हणणे सोनियांचा मतदारसंघ म्हणून मिरविणा-या रायबरेली जिल्ह्यातील मुख्य गावाची ही परिस्थिती तर इतर खेडोपाड्यांत आणि गावांमध्ये काय परिस्थिती असेल विचारायला नको. 



नेत्रचिकित्सालया शेजारच्या कार्यालयातून प्रियांका वड्रा यांची रॅली निघणार असते. प्रियांकांच्या स्वागतासाठी काँग्रेस कार्यकर्ते आणि नेते मोठ्या संख्येनं जमलेले असतात. काँग्रेसचे रायबरेली जिल्हाध्यक्ष सईदुल हसन हे प्रियांकांचं स्वागत चौकाचौकात आणि व्यवस्थितपणे होईल, याचं नियोजन पाहत असतात. फुलं, हार, काँग्रेसच्या टोप्या, उपरणाी वगैरे सर्वांपर्यंत पोहोचली की नाही, याचा अंदाज घेऊन ते देखील प्रियांकांच्या स्वागतासाठी सज्ज होतात. 

एवढ्यात जोरजोरात घोषणाबाजी सुरू होते आणि बरोब्बर अडीचच्या सुमारास प्रियांका वड्रा त्यांच्या टोयोटातून येतात. येतात ते थेट कार्यालयाच्या समोरच्या मैदानात त्यांची टोयोटा थांबते. आतमध्ये जाऊन प्रमुख कार्यकर्त्यांशी दोन-तीन मिनिटांत संवाद साधून पुन्हा बाहेर येतात. कारमध्ये बसून प्रियांका यांनी रोड शो करावा, असा सिक्युरिटीचा आग्रह असतो. तशी विनंती देखील त्यांना केली जाते. प्रियांका गाडीत बसतात देखील. मात्र, मिनिटाभराच्या आतच गाडीतून बाहेर उतरतात आणि वेगानं चालतच तिथून मार्गस्थ होतात. 



चार साडेचार किलोमीटरचा हा टप्पा चालतच पार करण्याचा निश्चय प्रियांका यांनी मनोमन केलेला असतो. त्या थेट रस्त्यावर उतरून स्वागतासाठी थांबलेल्या नागरिकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये शिरतात. हा रोड शो आता ना सिक्युरिटीच्या आवाक्यात राहिलेला असतो ना काँग्रेस कार्यकर्त्यांचा. सिक्युरिटी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचं कडं मोडून नागरिक आणि इतर लोक थेट आत घुसून प्रियांका यांच्याशी हस्तांदोलन करतात. त्यांना हार घालतात. त्याच्यावर फुलांची आख्खी टोकरी पालथी करतात. प्रियांका गांधी देखील चालताना थेट दुकानांमध्ये जाऊन उभ्या असलेल्या पुरुष मंडळींना  नमस्कार कर, महिलांची गळाभेट घे, उभ्या असलेल्या लहान मुलाला कडेवर उचलून घे, कार्यकर्त्यांशी एक-दोन शब्द बोल... असं करून फुल्ल हवा निर्माण करतात. लोकांचा जत्थाच्या जत्था प्रियांका यांच्या सोबत पुढे चाललेला असतो. गांधी घराण्याची क्रेझ म्हणजे काय हे रायबरेलीतल्या रोड शो मध्ये अगदी व्यवस्थित पहायला मिळालं. 



तीस तारीख दुसरा खाना, पंजेपर ठोक देना... किंवा क्यो पडते हो चक्कर में, प्रियांकाजी है टक्कर में... अशा घोषणा देत कार्यकर्ते फुल्ल टू वातावरण निर्मिती करीत असतात. रायबरेली की जनता का हाथ, सोनियाजी के साथ अशा घोषणाही अधून मधून कानावर पडत असतात. प्रियांकाजी आयी है, नयी रोशनी लायी है वगैरेही ऐकू येत असतं. 

 

मुस्लिम मोहल्ला आल्यानंतर तर रोड शो तील जल्लोष, उत्साह आणि आनंद टिपेला पोहोचतो. प्रियांका यांचं सर्वाधिक जोरदार स्वागत सफा मंजिल की तत्सम कुठल्याशा बिल्डिंगपाशी होतं. मुस्लिम महिला त्यांना हात दाखवून हसत हसत अभिवादन करतात. प्रियांका देखील त्यांच्याकडे वर पाहतच पुढं जात राहतात. अत्यंत वेगानं चालणा-या प्रियांका थोड्या दमल्या तर कारच्या फूटरेस्टवर उभ्या राहून लोकांना हात हलवून अभिवादन करीत असतात. पण त्यांची ही छोटेखानी विश्रांती अवघी पाच मिनिटंच टिकते. नंतर त्या पुन्हा रस्त्यावर उतरून वेगानं मार्गस्थ होतात. काश्मिरी सौंदर्याचं जन्मजात वरदान लाभलेल्या प्रियांका यांचा चेहरा कडक उन्हामध्ये फिरताना सफरचंदासारखा लालबुंद होतो. मात्र, त्यांच्या उत्साहावर त्याचा अजिबात परिणाम होत नाही. त्या चालतच असतात.



संपूर्ण रायबरेली गावामध्ये फिरून झाल्यानंतर त्यांचं काँग्रेसचं रायबरेली मुख्यालय असलेल्या टिळक भवन इथं आगमन होतं. तिथंही त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली असते. अभय त्रिवेदी, रमाकांत पाण्डेय वगैरे कार्यकर्त्यांनी मोठाच्या मोठा गुलाबाचा हार प्रियांका यांच्यासठी आणलेला असतो. रोड शो संपवून प्रियांका यांचं काँग्रेस भवनात जोरदार स्वागत होतं. त्यांना हार वगैरे घातल्यानंतर प्रियांका फक्त पाच मिनिटांसाठी कार्यालयात जातात. ज्येष्ठ आणि प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर मग त्या राज्य सरकारच्या गेस्ट हाउसवर निघून जातात. 



प्रियांका वड्रा आणि गांधी घराण्याची जादू काय असते हे रायबरेलीमध्ये अनुभवायला मिळालं. अर्थात, रायबरेलीमध्ये हे चित्र असणार हे माहिती होतंच. मात्र, तरीही प्रियांका या नावाची जादू काय आहे, त्याची चुणूक जाणविली. राहुल यांच्या तुलनेत कितीतरी पटीनं अधिक लोकप्रिय आणि गर्दी खेचणारा चेहरा म्हणून प्रियांका यांच्याकडे काँग्रेसनं गांभीर्यानं पहायला हरकत नाही. अर्थात, यंदाची निवडणूक राहुल यांच्या नेतृत्वाखाली लढल्यानंतर प्रियांका यांचा हुकुमाचा एक्का काँग्रेसकडे अजूनही शाबूत आहे, याची जाणीव भाजपाच्या नेत्यांनी ठेवायला हरकत नाही. सोनिय गांधी परदेशाी आहेत, गांधी घराण्याने घराणेशाही लादली वगैरे कितीही आरोप झाले, तरी भारतात गांधी घराण्याची जादू आहे आणि ती यापुढेही शाबूत का राहू शकते, याचा अंदाज बांधण्यासाठी कोणा राजकीय विश्लेषकाची गरज नाही. 

प्रियांका यांचे पती रॉबर्ट यांच्यावर भाजपने जोरदार हल्ला सुरू केल्यानंतर प्रियांका यांनीही अत्यंत संयतपणे मात्र, रोखठोकपणे नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. भारतात राज्य करायचं असेल तर ५६ इंचाची छाती असून उपयोग नाही, तर मन मोठं पाहिजे किंवा कसे घाबरलेल्या उंदरासारखे इकडे तिकडे पळत आहेत भाजपवाले... वगैरे वगैरे वक्तव्यांनी इथं माहोल निर्माण केला आहे. प्रियांका गांधी यांना काँग्रेसनं थोडं आधी आणि रायबरेली-अमेठी सोडून इतर मतदारसंघांमध्ये प्रचारासाठी उतरविलं असतं तर भाजपच्या मिशन ५० प्लसला नक्कीच लगाम घातला गेला असता. पण कदाचित रिस्क नको आणि पुढील निवडणुकीपर्यंत पत्ते बंदच ठेवलेले बरे, अशा विचारात काँग्रेस नेते असावेत. म्हणूनच त्यांनी प्रियांकांवर दोनच मतदारसंघाची जबाबदारी दिली. 



उत्तर प्रदेशात मोदींची हवा आहेच. जागा किती मिळतीत, हे आता ठोकपणे मी सांगू शकणार नाही. मात्र, रोज फिरताना ऑटोवाले, पाणीपुरीवाले, सरबतवाले, बसमधील सहप्रवासी अशा कोणालाही विचारलं तरी यंदा मोदीच आहे, असं उत्तर येतं. त्यामुळं कोणी काहीही म्हणो इथं फिरताना मोदीचा बोलबालाच ऐकायला मिळतो आहे. मात्र, भविष्यात प्रियांका गांधी यांच्या रुपानं भाजपसमोर तुलनेनं कठीण आव्हान उभं ठाकणार आहे, याची कल्पना रायबरेलीमध्ये आली. १९८९ ते २००४ या काळात गांधी घराणे सत्तेपासून दुूर होते. काँग्रेस संपली. गांधी घराणे इतिहासजमा झाले वगैरे गप्पा मारल्या जात होत्या. मात्र, त्याच काँग्रेसने आणि गांधी घराण्याने पुढची दहा वर्षे सत्ता उपभोगली. काँग्रेसने बाउन्स बॅक केले. त्यामुळे काँग्रेसला संपविणे वाटते तितके सोपे नाही. किमान प्रियांका गांधी हे चलनी नाणं उपयुक्त नाही, असे सिद्ध होईपर्यंत तर अजिबातच नाही. 

भारतीय जनता पार्टीचे अजय अगरवाल रायबरेलीतून उभे आहेत. सुप्रीम कोर्टातील वकील आहेत. मात्र, सोनिया यांना टक्कर देणारा उमेदवार म्हणून प्रतिमा निर्माण करण्यात ते अपयशी ठरले आहेत. रायबरेली गावात तर भाजपचे झेंडे देखील कुठं दिसत नाहीत. संपूर्ण गावात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच झेंडे दिसले. रायबरेलीमध्ये भाजपचं ऑफिस कुठं आहे, हे दुकानदार, फेरीवाले, हातगाडीवाले, ऑटोवाले आणि बाजारात आलेले नागरिक यापेैकी कोणालाही माहिती नाही. सुपर मार्केट नावाच्या भागात एका इमारतीमध्ये भाजपचे कार्यालय आहे, याचा शोध साधारण तासभर शोध घेतल्यानंतर लागतो. गमतीची गोष्ट म्हणजे निवडणूक ऐन मोसमात आलेली असताना आणि मतदानाला फक्त दोन दिवस बाकी असताना भाजपच्या कार्यालयाला चक्के कुलूप लावलेले दिसते. असाच अनुभव गुजरातच्या निवडणुकीत सुरत आणि वडोदरा येथील काँग्रेस कार्यालयांमध्ये आला होता. एक बंद होतं तर दुसरीकडं शुकशुकाट. 






भाजपच्या उमेदवारानं दुसरीकडे कुठेतरी कार्यालय थाटल्याचं समजतं. मात्र, तरीही रायबरेली जिल्हा कार्यालय बंद असल्याचं समर्थन कोणीच करू शकणार नाही, अशी परिस्थिती. हिरालाल बैन्सवाल नावाचे एक साठीकडे झुकलेले भाजपाचे कार्यकर्ते भेटतात. ते दोन वर्षांपूर्वी भाजपामध्ये आले होते. त्यांनाही नव्या कार्यालयाची माहिती नसते. ते त्यांच्या परीने शोधाशोध करून मुख्यालय उघडता येईल का, याचा प्रयत्न करतात. मात्र, मुख्यालय बंदच असते. अजय अगरवाल यांच्याशी फोनवरून बोलणं होतं. ते दुस-या गावांमध्ये प्रचार संपवून रायबरेलीच्या दिशेनं यायला निघालेले असतात. मात्र, मला लखनऊ गाठायचं असल्यानं मी फोनवरच त्यांचा निरोप घेतो आणि शुभेच्छा देऊन निघतो...