Showing posts with label Shivajirao T Bhosale. Show all posts
Showing posts with label Shivajirao T Bhosale. Show all posts

Tuesday, April 12, 2011

मराठी माणसाकडे

तंजावूरमध्ये द्रमुकची धुरा

पांढरा शर्ट, कमरेला पांढरी स्वच्छ लुंगी, कपाळाला कुंकवाचा टिळा आणि वणक्कम सर म्हणून समोरच्याचे स्वागत करण्याची सवय... कोणत्याही तमिळ नागरिकाला लागू पडेल, असे हे वर्णन आहे तंजावूरच्या बी. मोहन या मराठी माणसाचे. बी. मोहन आणि मराठी? अशा विचारात पडू नका. बी मोहन हे त्यांचे तमिळ नाव. खरं नाव मोहन जाधव.

तंजावूरचे द्रमुकचे उमेदवार आणि विद्यमान मंत्री ओबेयदुल्ला यांच्या प्रचाराची धुरा मोहन जाधव हा मराठमोळा गडी अत्यंत यशस्वीपणे सांभाळतो आहे.
जवळपास तीनशे-साडेतीनशे वर्षांपासून जाधव यांचे कुटुंब तंजावूरमध्ये आहे. मोहन जाधव यांची ही तंजावूरमधली साधारण आठवी-दहावी पिढी. सध्या मोहन आणि त्यांचे बंधू आपल्या कुटुंबासह तंजावूरमध्ये रहात आहेत. लहानपणापासून तंजावूरमध्येच राहिल्यामुळे मराठीची ओळख जवळपास नाहीच.

अगदी तोडकं मोडकं मराठी मोहन जाधव बोलू शकतात. त्यांचे बंधू मात्र, अधिक चांगल्या पद्धतीने मराठी बोलतात. अर्थात, आपल्याला लक्श देऊन ऐकल्याशिवाय ते काय बोलत आहेत, ते समजत नाही. शिवाय आपण खूप वेगाने बोललो तरी त्यांना आपले मराठी समजत नाही.
आपण हिंदी किंवा इंग्लिशमधून बोलण्यास सुरुवात केली तर मोहन यांची पत्नी म्हणते, की तुम्ही मराठीत बोला मला थोडं थोडं समजतं. घरात जास्त प्रभाव तमिळचाच. पण ही मंडळी मराठी एकदम विसरलेली नाहीत.

पॅलेस भागात मराठी माणसांची घरे जास्त आहेत. त्याठिकाणी मराठी माणसांची घरे कुठे आहेत, तर कोणतीही व्यक्ती मोहन जाधव यांच्या घराचा पत्ता पहिल्यांदा देतो. मोहन हे मराठी चांगल्या पद्धतीने बोलू शकत नसतीलही. पण तंजावूरमधील त्यांची एक ओळख ते मराठी आहेत, अशीही आहे.
मोहन जाधव हे गेल्या तीस वर्षांपासून द्रमुक पक्शाही एकनिष्ठ आहेत. सुरुवातीपासूनच कलैंग्नार यांचे आकर्षण असल्यामुळे तरुण वयातच द्रमुकच्या युथ विंगमध्ये दाखल झालो, असं मोहन अभिमानानं सांगतात.

सुरुवातीच्या काळात मोहन हे द्रमुकच्या युथ विंगचे तंजावूर शहर सरचिटणीस होते. सध्या द्रमुक पक्शाचे तंजावूर शहर उपसरचिटणीस म्हणून ते काम पाहत आहेत. तंजावूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणूनही ते काम करीत आहेत. सध्या तंजावूरचे द्रमुकचे उमेदवार ओबेयदुल्ला यांच्या प्रचाराची सर्व जबाबदारी मोहन यांच्यावर आहे.
शहरातील विविध वॉर्डांमध्ये जाऊन प्रचार करणे, ओबेयदुल्ला यांच्या बरोबर संपूर्ण मतदारसंघात फिरून नागरिकांना मतदानाचे आवाहन करणे, तंजावूर परिसरातील गावांमध्ये जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन निवडणुकीसाठी योग्य फिल्डिंग लावणे, अशा कामांमध्ये मोहन सध्या व्यग्र आहेत.

वेळात वेळा काढून त्यांनी महाराष्ट्र टाइम्सच्या प्रस्तुत प्रतिनिधीशी संवाद साधला. टू जी घोटाळ्याचा मुद्दा ग्रामीण भागामध्ये अजिबात महत्वाचा नसून कलैंग्नार यांच्या नेतृत्त्वाखालील सरकारने केलेल्या कामांची माहिती आम्ही घरोघरी जाऊन देतो आहोत आणि आम्हाला खूप चांगला रिसपॉन्स मिळत आहे, अशी प्रतिक्रिया मोहन यांनी व्यक्त केली.


जिसमे मिलाओ उसके जैसा...

पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिलाओ उसके जैसा... एखाद्या गोष्टीमध्ये अगदी सहजपणे मिसळलं जाणारं आणि स्वतःचं स्वतंत्र अस्तित्त्व न ठेवता त्याच्याशी खूप चांगल्या पद्धतीनं एकरुप होण्याचा पाण्याचा गुण मराठी माणसानं अगदी चांगल्या पद्धतीनं अवगत केला आहे. जिथं मराठी माणसानं आपला डेरा टाकला तो तिथलाच होऊन गेला. तिथली संस्कृती, भाषा आणि परिसरातील सगळ्या गोष्टी त्यानं इतक्या उत्तम पद्धतीनं आत्मसात केल्या की आतला कोण आणि बाहेरचा कोण, हे ओळखणं मुश्किल व्हावं. पानिपत, बडोदा, इंदूर, जिंजी, ग्वाल्हेर किंवा हैदराबाद... जिथं मराठी माणूस गेला तो तिथलाच होऊन गेला. त्यानं स्वतःचं मराठीपण जपलं पण स्वतंत्र चूल कधीच मांडली नाही. अशा परिस्थितीत तंजावूरचा मराठी माणूस कसा वेगळा असणार. तो देखील तमिळच होऊन गेलाय.


छत्रपती शिवाजी महाराजांचे बंधू व्यंकोजीराजे हे १६७५ मध्ये तंजावूरचे महाराज बनले. तत्पूर्वी शहाजीराजांनीही तंजावूर जिंकले होते. पण नंतर त्यांनी विजयराघवन नायक याला राज्य बहाल केले. पण नंतरच्या काळात व्यंकोजीराजे हे तंजावूरचे महाराज झाले. व्यंकोजीराजांनंतर तंजावूरच्या इतिहासात संस्मरणीय ठरलेले नाव म्हणजे सरफोजी महाराज यांचे. सरफोजी महाराज हे १८३२ ते १८५५ या काळात तंजावूरचे राजे होते. त्यांनी अनेक लोकोपयोगी गोष्टींची अंमलबजावणी केल्यामुळे ते लोकप्रिय ठरले होते. सरफोजी महाराजांची सहावी पिढी सध्या राजे पदावर आहे. बाबाजी भोसले हे सध्या तंजावूरचे राजे आहेत.

व्यंकोजी राजांच्या काळात जी कुटुंब तंजावूरला आली ती तंजावूरचीच होऊन गेली.
तंजावूर शहर आणि परिसरात जवळपास पाच हजार मराठी कुटुंबे आहेत. मराठी मंडळींची एकूण लोकसंख्या पंधरा ते अठरा हजारांच्या आसपास असावी. अर्थात, गेल्या काही वर्षांत तंजावूरची मराठी मंडळी इथला जमीन जुमला विकून सातारा, कोल्हापूर आणि सांगली भागात रहावायास गेली आहे. त्यामुळे मराठी टक्का काही प्रमाणात घटलाही आहे, अशी माहिती तंजावूरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिली.

सध्या पन्नाशी किंवा साठीत असलेली पिढी अगदी तोडकं मोडकं मराठी बोलते. त्यांची पुढची पिढी मराठीचा वापर त्यापेक्शा कमी करते आणि तिसरी पिढीला मराठीची फक्त तोंडओळख आहे. आपण मराठी आहोत, इतकंच कदाचित त्यांना माहिती असेल. म्हणूनच मराठीत बोलायला लागल्यानंतर ही मंडळी थोडी बिचकतात. कदाचित आपलं मराठी ह्यांच्याइतकं स्वच्छ आणि शुद्ध नाही म्हणूनही त्यांना असं वाटत असावं. पण तुम्ही बोला, मला समजेल, अशा विश्वास आपण व्यक्त केला तर ही मंडळी अगदी मोकळेपणानं मराठीत बोलतात. तमिळ भाषेतील अनेक शब्द आणि लहेजा असलेलं मराठी समजून घेणं अवघड जातं. पण आपल्याला त्यांचं मराठी समजतं इतकंच.


इतर मंडळींच्या मानानं तंजावूरचे प्रिन्स शिवाजीराजे टी. भोसले यांचे मराठी उत्तम आहे. कोल्हापूर, सातारा आणि महाराष्ट्राच्या इतर भागात त्यांच्या वारंवार भेटी असतात. म्हणूनही असेल कदाचित. पण ते अत्यंत सहजपणे मराठीतून संवाद साधतात.

मराठी माणसाची संख्या अठरा-वीस हजार असली तरी मराठी माणूस मराठी म्हणून ही मंडळी फारशी एकत्र येत नाहीत. गटातटाच्या राजकारणाचा मराठी माणसाला लागलेला शाप तंजावूरमध्येही कायम आहे. तंजावूरमध्ये राहणा-या बहुतांश मराठी नागरिकांचे महाराष्ट्रात फारसे नातेवाईक नाहीत. ही मंडळी कर्नाटक आणि हैदराबाद इथल्या मराठी लोकांशी किंवा तंजावूरमध्येच सोयरिक करतात. त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी लोकांशी त्यांचा फारसा संबंध येत नाही. ही मंडळी साऊथ इंडियन महाराष्ट्र मंडळ ही संस्था चालवितात. ही संस्था बृहन्महाराष्ट्र मंडळाशी संलग्न आहे.
बाबाजी भोसले सध्या राहतात तो पॅलेस, सरस्वती महाल संग्रहालय आणि सरफोजी महाराज तसेच मराठ्यांचा इतिहास दर्शविणारे संग्रहालय पॅलेस परिसरातच आहे. तिथं फिरून थोड़ी माहिती घेतली आणि मग पुरातत्व खात्याचे अधिकारी एस. सेल्वराज यांच्याशी गप्पा झाल्या. सेल्वराज यांनी मराठी माणसाबद्दल व्यक्त केलेली प्रतिक्रिया खूप मस्त होती. मराठी माणसाचा उल्लेख ते मराठा असाच करतात. मराठे हे कधीच भांडखोर आणि विध्वसंक नव्हते. ते इथे राजे म्हणून आले तेव्हा त्यांनी चौल राजांच्या स्मृतींचे निष्ठेने जतन केले. वास्तविक पाहता, त्यांना ते उद्ध्वस्त करणे सहज शक्य होते. पण त्यांचा तो मूळ स्वभाव नाही. आजही मराठे इतक्या शांततेने आणि मिळून मिसळून रहात आहेत, की त्यांना मराठी का म्हणावे ते तर तमिळच आहेत, असे वाटते. आपल्या समाजाबद्दल एका त्रयस्थ माणसाने अशी प्रतिक्रिया व्यक्त केली तर कोणाला आवडणार नाही.