Showing posts with label Solapur. Show all posts
Showing posts with label Solapur. Show all posts

Wednesday, May 26, 2010

... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले

एकादशीला झाली पंढरपूर वारी...

देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, विश्वनाथ गरुड, देविदास देशपांडे आणि प्रशांत अनासपुरे) सकाळमध्ये काम करत असताना आमची सोनेरी टोळी होती. सकाळमध्ये टोमणे खाल्ल्याशिवाय काम करताच येत नाही. मी, विश्वनाथ, देविदास आणि आमचा आणखी एक मित्र नंदकुमार वाघमारे. ही आमची सोनेरी टोळी. सवॆ जण आमच्यावर जळायचे. असो. चांगला लेख आहे. वेगळा विषय नको. तर नंदकुमार या आमच्या मित्राचं सोलापुरात लग्न होतं. आम्ही सोमवारी लग्नासाठी सोलापूर गाठलं. म्हणजे पहा २४ मे हा तो दिवस होता. हाच दिवस आमच्यासाठी आश्चयॆकारक ठरला.



सकाळी सातच्या सुमारास सोलापूरसाठी निघालो. मजल दरमजल करत (म्हणजे विविध ठिकाणी खाद्यपदाथॆ आणि पेयपानाचा फडशा पाडत) आम्ही दोनच्या सुमारास लग्न समारंभी म्हणजे विजापूर रोडला पोचलो. हाय हॅलो, शुभेच्छा, ओळखी-पाळखी, काय कसं पार पडलं, हनिमूनला कुठे जाणार अशी विचारपूस हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर जेवण उरकलं. मिष्टान्न इतरे जनः असं म्हणतात. ते आमच्या बाबतीत नेहमीच खरं असतं. जेवण झालं. थोडावेळ थांबलो. मग विजापूर रोडवरुन निघालो.

मग सिद्धेश्वराचं दशॆन घेतलं. सोलापुरात येऊन तिथं गेलो नाही, असं बरोबर वाटत नाही. मग आमचे मित्र आणि ई टीव्हीचे पत्रकार बाबा फुंदे यांच्याबरोबर सिद्धेश्वर मंदिरात गेलो. तिथं एक कथा लिहिली होती. विठ्ठलाचे दशॆन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मनात देव असेल तर तो कुठेही दशॆन देतो, असं सिद्धेश्वर यांनी कोणाला तरी सांगितल्याची ती कथा होती. म्हटलं बरंच आहे. पंढरपूरला गेलो नाही तरी हरकत नाही. सिद्धेश्वराचं दशॆन हेच विठ्ठलाचं दशॆन, असं मानून आम्ही मनोभावे नमस्कार करुन निघालो.

साधारण संध्याकाळचे सहा वाजले असतील. पुण्याकडे निघालो. सहाला निघालो म्हणजे बारा-एक वाजेपयॆंत पोचू, असा अंदाज होता. वाटेत मोहोळला गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि पुढे निघालो. (इथपासून माझा डोळा लागला होता. आपल्याला काय कुठेही झोप लागते. मग मस्त गार वारं सुटलं असताना गाडीत झोप नाही लागली तरच नवल. असो) साधारणतः एक तासभर गेला असेल. रस्ता अनोळखी वाटत होता. वाटेत लागलेला टोलनाकाही येताना लागला होता असं वाटतं नव्हतं. ट्रॅफिकही थोडा कमीच वाटत होता. रस्ता वळणावळणाचा होता. सरळसोट नव्हता. आपण रस्ता चुकलो तर नाही ना, यावर बोलणं सुरु होतं. (त्या तिघांचं) हाच विषय सुरु असताना (इतर तिघे कारण मी झोपलोच होतो) गाडी एका नदीवरच्या फरशी पुलापाशी येऊन पोचली.

च्या मारी... येताना हा पूल आणि ही नदी लागलीच नव्हती. पूल ओलांडला आणि पुढे जाऊन पाहतो तर काय समोर वाळवंट. आई शप्पथ. गाडी पंढरपुरात येऊन पोचली होती. विश्वनाथ आणि प्रशांत ओरडलेच. आपण पंढरपुरात येऊन पोचलो आहोत. त्या आरडा ओरड्याने मला जाग आली. झालं पंढरपुरात आलो म्हणजे प्रवासातील साधारणतः एक तास वाया गेला, असा निष्कषॆ काढत पोटोबाची सोय शोधू लागलो. आधी पोटोबा मग विठोबा हे त्यादिवशी खरेखुरे अनुभवले. दोन-चार भज्यांच्या गाड्यांपैकी एक त्यातल्या त्यात चांगली गाडी पाहिली आणि मस्त गरमागरम भजी मागविली. गरमागरम भजी आल्यानंतर मी फक्त चहाच पिणार, असं म्हणणा-यांचे हातही भजीकडे वळले. दुसरी प्लेट मागविली. मग कोणीतरी शेवचिवडा आणि तळलेल्या मिरच्या मागविल्या. शेवटी दोन कडक स्पेशल घेऊन उठलो. तृप्त मनाने केलेली भक्ती अधिक चांगली असते, असं म्हणतात. (खरं तर असं कोणी काही म्हणत नाही. आपणच आपलं कोणाच्या तरी नावावर बिल फाडायचं...)

पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दशॆन न घेता गेलो असतो तर... मनाला पटतच नाही. मग विठ्ठलाचे दशॆन घेऊन जाण्याचंच ठरलं. विठ्ठलानेच आपल्याला बोलावून घेतलं. अन्यथा रस्ता चुकण्याचं आणि मुद्दाम या वाटेने येण्याचं काहीच कारण नव्हतं. तसंच चौघांनाही पुणे-सोलापूर रस्ता काही नवीन नव्हता. प्रत्येकानं किमान पंधरा ते वीस वेळा तरी सोलापूरची वारी केली असेल. मग हे सारं घडलं कसं. पंढरपूरला जायचं ठरलं नसतानाही आणि चौघांनाही सगळे रस्ते व्यवस्थित माहिती असतानाही हे झालंच कसं.
नरेंद्र दाभोळकरांसारखी मंडळी याला निव्वळ योगायोग म्हणतील. पण त्यावर आमचा विश्वास नाही. रस्ताच चुकायचा होता तर तो चुकून आम्ही पंढरपुरातच का आलो. अक्कलकोट किंवा हैदराबादच्या दिशेने का नाही गेलो? किंवा एखाद्या म्हस्के वस्ती, दांगटवाडी किंवा परबाची वाडी इथं का नाही पोचलो... याचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. दाभोळकर सुद्धा नाही. शिवाय दीड सालाच्या नियोजनातही हा विषय नव्हता. शेवटी आम्हालाही पटलं नियोजन न करताही काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि फसलेल्या बेतांचाही असा चांगला शेवट असू शकतो.

थोडक्यात म्हणजे तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, काहीही करा, त्याच्या इच्छेपुढे कोणाचेच काहीही चालत नाही....

बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल,
श्री द्यानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...

Monday, January 11, 2010

वेड लावणा-या कलाकृती...



'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना...!

कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करुन कलाकार होता येत नाही. कला ही उपजतच असावी लागते. ही आणि अशी अनेक वाक्य आपण प्रत्येकवेळी ऐकलेली असतात. पण जर अशा गोष्टींचा प्रत्यय आला तर आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. असंच काहीसं माझं झालंय.

देव कोणाच्या हातात काय कला निर्माण करेल काही सांगता येत नाही, हे पाहण्याची संधी मला नुकतीच मुंबईत मिळाली. शशिकांत धोत्रे या अगदी उदयोन्मुख कलावंतानं साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन पाहिलं आणि मला ही गोष्ट मनोमन पटली. सोलापूरातल्या मोहोळ तालुक्यामधल्या एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या शशिकांत धोत्रे नामक चित्रकाराची ही गोष्ट. ही गोष्ट एखाद्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात हुबेहूब शोभेल अशीच वाटते.



वडार समाजात जन्माला आलेल्या शशिकांतचे वडील दगड फोडण्याचं काम करतात. आई गृहिणी आहे. रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडण्याचं काम करणारे अनेक जण आपण आतापर्यंत पाहिले असतील. मोठे-मोठे दगड फोडून त्याचे बारीक दगड करण्याचं काम किती कष्टाचं असू शकतं याची आपण कल्पनाच केलेली बरी. तर असं वडार काम करणा-या घरात शशिकांतचा जन्म झाला. पण वडिल करतात ते दगड फोडण्याचं पारंपरिक काम करण्याची वेळ शशिकांतवर आली नाही. कारण देवानं त्याच्या हातामध्ये दगड फोडण्यासाठी लागणा-या सामर्थ्यापेक्षा चित्र साकारण्याचं कसब निर्माण केलं होतं.

शाळेत असताना चित्र काढण्यावरुन त्यानं अनेकदा शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता. प्रसंगी मारही खाल्ला होता. शाळेतल्या अनेक भिंती शशिकांतनं चितारलेल्या कलाकृतींनी भरुन गेल्या होत्या. मग कधी त्या त्यानं स्वतःहून काढलेल्या होत्या. तर कधी शाळेतल्या काही कलासक्त शिक्षकांनी त्याच्याकडून करवून घेतल्या होत्या. पुढे दहावी-बारावीचा टप्पा पार करुन शशिकांत मुंबईच्या सुप्रसिद्ध जेजे महाविद्यालयात शिकण्यासाठी दाखल झाला. पण तिथं महिना-दोन महिने काढल्यानंतर शशिकांतनं तिथनं पळ काढला आणि स्वतःच कलेची आराधना करु लागला.



शशिकांतच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं ही चित्र फक्त पेन्सिलच्या सहाय्यानं काढली आहेत. भारतात अशा पद्धतीनं चित्र काढणारे चित्रकार खूप थोडे आहे. जगामध्ये मायकेल एंजेलो हा चित्रकार अशा पद्धतीनं चित्र काढायचा. शशिकांतनं काळ्या पेपरवर काढलेली ही चित्र पाहिली की डोळे दिपून जातात. एकेक चित्र काढायला साधारण सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. मुंबईतल्या तुलिका आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात शशिकांतची दहा-बारा चित्र लावलेली आहेत. त्यापैकी एकही चित्र ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. तर प्रदर्शनातलं सर्वाधिक महागडं चित्र दीड लाख रुपयांना आहे. मुख्य म्हणजे प्रदर्शनातील सर्वच्या सर्व चित्र विकली गेलेली आहेत.

व्यक्तीचित्र रेखाटताना शशिकांतनं अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करुन ते चित्र चितारलं आहे. गफ्फार नावाच्या त्याच्या लहानपणीच्या मित्राचं काढलेलं चित्र तर प्रचंड अफलातून आहे. त्याची बसण्याची लकब, पायावर जखमेची खूण, गोट्यांचे रंग, गोट्या खेळताना चेह-यावर असणारे भाव अशा सर्व गोष्टी त्यानं हुबेहूब हेरल्या आहेत. तन्वी साळकर या मैत्रिणीची दोन पोट्रेट काढताना त्यानं थोडंसं वेगळेपण जपलं आहे. एक चित्र लग्नापूर्वीचं तर दुसरं लग्नानंतरचं आहे. ही दोन्ही चित्र पाहिली की शशिकांतच्या कलेला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. घराच्या खिडकीतून नव-याची वाट पाहणारी नवविवाहिती तर अफलातून आहे. (म्हणजे चित्र अफलातून आहे.) आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारे हे 'रिमेम्बरन्स' नक्की पहायला हवं.

एखाद्या खेड्यातनं आणि प्रचंड गरीबीतून वर आलेला शशिकांत आता चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याला अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय. येत्या काही महिन्यात तो लंडनलाही जाणार आहे. शशिकांतच्या भविष्यातील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा...

शशिकांत धोत्रेबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा...

http://www.tulikaartsgallery.com/index.php?page=2&isArtist=315