Showing posts with label APJ Abdul Kalam. Show all posts
Showing posts with label APJ Abdul Kalam. Show all posts

Thursday, June 21, 2007

राष्ट्रपतीपदी कलाम हवे का...?


कौन बनेगा राष्ट्रपती? या प्रश्‍नाने सध्या सर्वाधिक धुमाकूळ घातला आहे. सुरुवातीला संयुक्त पुरोगामी आघडीच्या उमेदवार आणि कॉंग्रेसच्या निष्ठावंत नेत्या प्रतिभा पाटील आणि राष्ट्रीय लोकशाहीच्या आघाडीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढविणारे बुजुर्ग नेते भैरोसिंह शेखावत यांच्यातच लढत होईल, असे वाटत होते. मात्र, विविध राज्यातील पराभूत नेत्यांनी उभारलेल्या तिसऱ्या आघाडीने या लढतीमध्ये गंमत निर्माण केली आहे. चुरस निर्माण झाली असे म्हणणे सध्या तरी धाडसाचे ठरेल. पण किमान या आघाडीमुळे नवी समीकरणे समोर येऊ लागली आहेत.

तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांच्या चेन्नईमध्ये झालेल्या बैठकीत विद्यमान राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे, अब्दुल कलाम यांनाच पुन्हा राष्ट्रपतीपदासाठी उभे राहण्याची गळ घालण्याचे निश्‍चित करण्यात आले. कॉंग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांपासून समान अंतर राखण्याचा इरादा व्यक्त करीत शेखावत आणि पाटील यांच्याऐवजी नवे कलाम यांचे नाव तिसऱ्या आघाडीने समोर आणले. या आघाडीतील समाजवादी पक्ष वगळता इतर सर्व पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील वाजपेयी सरकारमध्ये मंत्रीपदे उपभोगली आहेत. शिवाय समाजवादी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष यांची उत्तर प्रदेशातील मैत्री हे तर "ओपन सिक्रेट'च आहे. त्यामुळेच तिसरी आघाडी जरी भाजपपासून अंतर राखण्याची भाषा करीत असेल, तरी ते कितपत शक्‍य आहे, यात शंकाच आहे.

कलाम यांचे नाव पुढे आल्यानंतर खुद्द शेखावत यांनीच ""अब्दुल कलाम हे जर उमेदवार असल्यास माझी बिनशर्त माघार आहे,'' असे सांगून आणखी एक बॉंबगोळा टाकला. त्यामुळे कलाम यांच्या नावाला बळकटी मिळण्यास मदत झाली. शिवाय भाजपनेच एक वर्षापूर्वी कलाम यांची इच्छा असेल तर त्यांनाच पुन्हा पाठिंबा देण्याची इच्छा व्यक्त केली होती. या पार्श्‍वभूमीवर सारी हयात जनसंघ आणि भाजपमध्ये घालविलेल्या शेखावत यांच्याकडून या व्यतिरिक्त कोणत्याही दुसऱ्या भूमिकेची अपेक्षाच करता येत नाही. त्यामुळे पाटील, शेखावत की कलाम असा प्रश्‍न उभा राहिला आहे.

राष्ट्रपतीपदाची निवडणूक थेट होणार असती तर कलाम हे निर्विवादपणे निवडून आले असते, यात शंकाच नाही. त्यांच्याइतकी लोकप्रियता इतर दोन्ही नेत्यांना नाही. मात्र, ही निवडणूक आमदार व खासदारांकडून होणार आहे. त्यामुळेच प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.या सर्व पार्श्‍वभूमीवर कलाम यांना पुन्हा संधी देणे योग्य आहे किंवा नाही, या संदर्भात चर्चा करणे इष्ट ठरेल. भारताच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचे जनक आणि कर्ते करविते डॉक्‍टर ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी भारतासाठी दिलेल्या योगदानाची मांडणी करण्यासाठी शब्दच अपुरे पडतील. त्यांची योग्यता, अभ्यास आणि वैज्ञानिक म्हणून कार्य लक्षात घेतले तर अधिक सांगण्याची गरजच नाही. गेल्या वेळी याच गोष्टी लक्षात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने त्यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार बनविले होते.

अर्थात, राष्ट्रपती हा राजकीय पार्श्‍वभूमी असलेलाच असावा, अशी भूमिका डाव्यांनी घेतली. त्यामुळे कलाम आणि आझाद हिंद सेनेतील सेनानी कॅप्टन लक्ष्मी सेहगल या दोन महान व्यक्तींमध्ये विनाकारण लढत झाली. त्यात कलाम विजयी झाले. डावे वगळता इतर कोणी कलाम यांच्या नावाला आक्षेप घेतला नव्हता. आता परिस्थिती बदलली आहे. डावे तर कलाम यांच्या बाजूने नाहीच पण कॉंग्रेसही प्रतिभा पाटील यांच्या नावावर ठाम आहे. कॉंग्रेसचे सहकारी पक्षही कलाम यांच्या नावाला पाठिंबा देण्यास उत्सुक नाहीत. शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील शिवसेनाही कलाम यांच्यावर नाराज आहे. त्यामुळेच उत्सुकता ताणली गेली आहे.

कलाम हे कोणताही राजशिष्टाचार न बाळगता थेट सामान्य नागरिकांमध्ये मिसळतात, लहान मुलांच्या प्रश्‍नांना तितक्‍याच आत्मीयतेने उत्तरे देतात, राष्ट्रपती झाल्यानंतरही स्वतःमधील माणूस जागरुक ठेवतात, त्यामुळेच कलाम यांच्याबद्दल सर्वसामान्य नागरिकांना आपुलकी आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू हे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झाले तेव्हा सर्व शिष्टाचार बाजूला ठेवून कलाम स्वतःहून नायडू यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. अशा छोट्या छोट्या घटनांमधून कलाम यांनी त्यांचे वेगळेपण सिद्ध केले होते.

मात्र, मोहम्मद अफझल प्रकरणापासून कलाम हे अनेक जणांच्या मनातून उतरले आहेत. संसदेवर हल्ला करणाऱ्या मोहम्मद अफझलला सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतरही राष्ट्रपती म्हणून कलाम त्याच्यावर सही करत नाहीत, तेव्हा कलाम यांच्या भूमिकेची चीड येते. तुमचे वैयक्तिक मत काहीही असले तरी राष्ट्राच्या प्रतिष्ठेचा प्रश्‍नी तुम्ही तटस्थपणे भूमिका पार पाडणे अपेक्षित असते. कारणे काहीही असोत, कलाम यांनी अफझलच्या फाशीवर सही न केल्यानेच ते वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. कलाम यांनी वेळीच अफझलच्या फाशीवर शिक्कामोर्तब केले असते आणि अफझल फासावर लटकला असता तर आज ही परिस्थिती उद्‌भवलीच नसती.

राष्ट्रपती पदावर बिगर राजकीय व्यक्ती नको, या भूमिकेचे डावे पक्ष, कॉंग्रेस आणि कॉंग्रेस आघाडीतील पक्ष आहेत. राष्ट्रपती आपल्या विचाराचा असावा. त्यामुळे आपल्याला हवा तेव्हा आणि हवा तसा त्याचा उपयोग करुन घेता येतो, हे राजकीय पक्षांच्या डोक्‍यात पक्के बसल्याने त्यांना बिगरराजकीय व्यक्ती या पदावर नको. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीला गोध्रा दंगलींची पार्श्‍वभूमी होती. भारतात मुस्लिमांना धोका नाही. ते सुरक्षित असून त्यांना सन्मान आहे, हा आणखी एक संदेश कलाम यांच्या निवडीतून देण्याचा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा हेतू होता. तो गेल्या वेळी साध्य झाला.

आता भाजप आणि आघाडी अल्पमतात असून कॉंग्रेस आघाडीचे बहुमत आहे. शिवाय कॉंग्रेसला डाव्यांची हॉंजी-हॉंजी करण्यावाचून गत्यंतरच नाही. त्यामुळेच परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. गेल्या वेळी कलाम यांचा विजय निश्‍चित होता. यंदा तशी परिस्थिती नाही. त्यामुळे कलाम यांनी निवडणूक लढवून पराभूत व्हायची "रिस्क' घ्यायची का? हा पहिला प्रश्‍न आहे. दुसरा प्रश्‍न असा की, अफझलच्या फाशीच्या अर्जावर कलाम यांनी स्वाक्षरी का केली नाही. हा मुद्दाही पुन्हा निवडणूक लढविताना महत्त्वाचा आहे?


अशा घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रपतीपदी पुन्हा कलाम यांचीच निवड व्हावी, असे आपल्याला वाटते का? कृपया आपले मत येथे नोंदवा...


What is your opinion about Dr. APJ Abdul Kalam's candidature for Presidential post? Should he come into the fray or stay away from it? Issue of Mohammad Afzal's capital punishment is how much important as per your opinion? Please give your opinion on President's Election here...