Showing posts with label Chennai. Show all posts
Showing posts with label Chennai. Show all posts

Sunday, January 04, 2015

पैशांची भाषा...

कोणत्याही भाषेपेक्षा प्रभावी भाषा...


दक्षिण भारतातील लोकांमध्ये भाषेविषयीचा स्वाभिमान अगदी ठासून भरलाय. म्हणजे प्रत्येक राज्याला आपल्या भाषेबद्दल जाज्वल्य अभिमान आहे. अतिजाज्वल्य अभिमान आहे. प्रत्येक नागरिक आपल्याच मातृभाषेमधून अधिकाधिक बोलण्याचा प्रयत्न करीत असतो. इंग्रजी आणि हिंदीला अजिबात धूप घालत नाही. एकवेळ इंग्रजी चालेल, पण हिंदी अजिबात नको, अशीच त्यांची मनोभूमिका असते. जेव्हा केव्हा  आपण दक्षिण भारतात जातो, तेव्हा तेव्हा अनेकदा आपल्याला याचा अनुभव कधी ना कधी आलेला असतो.

दक्षिण भारतातील भाषाभिमानाचा असाच काहीसा अनुभव मलाही आहे. थोडासा वाईट पण बराचसा चांगला. म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या कव्हरेजसाठी तमिळनाडूमध्ये गेलो होतो. तेव्हा तंजावूरला जाणं झालं होतं. तिथं एका इडली हाऊसमध्ये बसलो असताना समोर एक व्यक्ती येऊन बसली. पांढरी लुंगी, पिवळसर शर्ट आणि कपाळावर भस्म ओढलेली. अस्सल तमिळ. मला थोडी माहिती हवी होती, की एका ठिकाणचा पत्ता वगैरे हवा होता. त्याला मी आधी हिंदीत विचारलं. तो काहीच बोलला नाही. नंतर मग इंग्रजीतून विचारलं. त्यावेळीही तो काही बोलला नाही नि चक्क त्याचं केळीचं पान घेऊन दुसऱ्या टेबलवर जाऊन बसला. ही एकमेव अपवादात्मक घटना सोडली, तर दक्षिण भारतात कोणताही वाईट अनुभव मला नाही. लोक त्यांच्या परीनं हिंदीतून, इंग्रजीतून अथवा हातवारे करून खाणाखुणा करून आपल्याला मदत करण्याचा प्रयत्न करतात, असाच माझा अनुभव आहे. मध्यंतरी पुदुच्चेरीला (पाँडिचेरी) गेलो होतो. त्यावेळीही नेहमीपेक्षा थोडा वेगळा अनुभव आला. 

पहिला अनुभव एका रिक्षावाल्याचा. त्याचं नाव इब्राहिम. नुसतं इब्राहिम आडनाव वगैरे काही नाही. पहिला दिवशी भेटला, तो पुढचे दोन दिवस आमच्याबरोबरच राहिला. सातवी की आठवीच शिकलेला. आधी ट्रक ड्रायव्हर होता. त्यामुळं पश्चिम आशियातील एक-दोन देश आणि केरळ, मुंबई, हैदराबादसह बऱ्याच शहरांमध्ये फिरलेला. अर्थात, हिंदीचा पत्ता नव्हताच. पण इंग्रजी मात्र, तोडकं मोडकं येत होतं. त्यानं स्वतःहूनच आमच्याशी तोडक्या मोडक्या इंग्रजीतून संवाद साधला. कुठं जाणार? काय पाहणार? कसे जाणार? पुढचे दोन-तीन दिवस तुम्हाला रिक्षा लागेल का? इ.इ. आमचा सौदा पक्का झाला आणि मग काय पुढचे दोन दिवस तोच आमचा ड्रायव्हर कम गाइड बनला.


नाश्त्याला, जेवणाला कुठं काय चांगलं मिळतं? फिश कुठे चांगले मिळतात? आणखी काही पहायचं राहिलं आहे का? वगैरे गोष्टींचं मार्गदर्शन तो त्याच्या तोडक्या मोडक्या इंग्रजीतून करीत होता. वेट सर, नो प्रॉब्लेम, ‘यू गो आय स्टे’ यासह अनेक छोट्या छोट्या इंग्रजी शब्दांची जुळवणी त्यानं करून ठेवली होती. ऑटोचं भाडं किती झालं, ते पॅसेंजरला इंग्रजीमधून सांगण्याची कलाही त्यानं आत्मसात केली होती. म्हणजे सेव्हन्टी, एटी किंवा वन हर्ड्रेंड वगैरे आकडे त्याला तोंडपाठ होते. इंग्रजीतून संवाद साधल्यानंतरच त्याला कदाचित अधिक ग्राहक किंवा पॅसेंजर मिळत असावेत. 

दुसरा अनुभव चेन्नईतल्या तिरुवनमियूर एसटी स्टॅंडजवळच्या टी स्टॉलवरचा. इथली चहा करण्याची पद्धत मोठी गमतीशीर. कुठं पाणी तापविण्याच्या बंबामधून चहा दिला जातो. तर काही ठिकाणी चहा पावडर टाकलेली कापडी गाळणी एका भांड्यातल्या उकळत्या पाण्यात बुडवून ठेवलेली असते. त्यातला चहा आणि गरम दूध एकत्र करून चहा दिला जातो. दोन्ही चहाची चव एकदम मस्त. स्ट्राँग आणि तलफ भागविणारा. तर असा मस्त फक्कड चहा घेतल्यानंतर आम्हाला त्यानं पैसे सांगितले. आठ रुपयांना चहा मिळतो, हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे सोळा रुपये झाले असणार, हे उघड होतं. तरीही आम्ही किती झाले, हे त्याला विचारत होतो. म्हणजे इंग्रजीतून किंवा हिंदीतून सांगतो का, पाहण्यासाठी. गल्ल्यावर बसलेल्या माणसाला हिंदी आणि इंग्रजीचा गंधही नव्हता. त्यामुळं तो तमिळमधूनच आकडा सांगत होता. मात्र, त्याच्या दुकानात वेटरचं काम करणाऱ्या एका तमिळच मुलानं ‘सोला रुपये बोल रहा है वो…’ असं दाक्षिणात्य टोनमध्ये सांगून आम्हाला मोकळं केलं.

तिसरा अनुभव यापेक्षाही भन्नाट. नटराजाचं मंदिर असलेल्या चिदंबरममध्ये गेलो होतो. खूप मोठ्या परिसरात अतिशय भव्य मंदिर. इतर देवदेवतांची छोटी-मोठी मंदिर. बारीक नक्षीकाम केलेले खांब आणि प्राचीन स्थापत्य शैलीचं दर्शन घडविणारं नटराज मंदिर. दुपारी एक ते चार मंदिर बंद असतं. तशी दक्षिणेतली बरीचशी मंदिरं दुपारी बंदच असतात. किमान तमिळनाडू आणि केरळमधली तरी. (लोक उगाच चितळेंना नावं ठेवतात.) तर नटराजाचं दर्शन घेण्यासाठी चिदंबरमला गेलो, तेव्हा एसटी स्टँडवर चहा घेतला. अर्थातच तिथेही चहाचे सोळा रुपयेच झाले. चहावाल्याला फक्त तमिळच येत होतं. ना इंग्रजी आणि हिंदीचा गंधही नाही. आम्हाला त्याच्याकडून आकडा माहिती करून घ्यायचा होता. पण त्याला सांगता येत नव्हता. अखेर त्यानं त्याच्या हातावर बोटानंच इंग्रजी सोळा आकडा काढून दाखविला आणि आम्ही त्याला पैसे देऊन निघालो.  

पुदुच्चेरी सरकारनं राज्यात २५ ते ३० ठिकाणी मिल्क पार्लर्स उघडली आहेत. (आणि मुख्य म्हणजे सुरू आहेत आणि प्रतिसादही उत्तम आहे.) फ्लेवर्ड मिल्क, गरम दूध, कॉफी, दही, ताक, लस्सी, मलई पेढा, आइस्क्रिम आणि बरेचसे दुग्धजन्य पदार्थ या ठिकाणी असतात. तिथं काम करणारा कृष्णमूर्तीही चांगल्या पद्धतीनं इंग्रजीतून संवाद साधणारा. मध्येच एखाद दुसरा हिंदी शब्दही हिंदीतून बोलणारा. दूध कुठनं येतं, सरकार दोन महिन्यांनी एका महिन्याचा पगार देतं, कोणत्या प्रॉडक्टला किती रिस्पॉन्स आहे, वगैरे अगदी उत्तम रितीनं सांगत होता. 

चेन्नई किंवा पुदुच्चेरीतील बसमध्येही तिकिटाचे किती रुपये द्यायचे हे कंडक्टर मंडळी गरज पडल्यास इंग्रजीमध्ये जरूर सांगायचे. पुढची बस कुठं मिळेल, स्टॉप कधी येईल किंवा स्टॉप आल्यानंतर उतरा वगैरे या गोष्टी ते इंग्रजीतून किंवा खुणेनं सांगायचे. चहा आणि मिरची नि केळ्याची भज्जी विकणारे ठेलेवाले, दुकानदार, इडली-वडे मिळणारे फूड जॉइंट्स आणि अनेक व्यावसायिक तुमच्याशी तुम्हाला समजेल अशा पद्धतीनं इंग्रजी आणि क्वचित प्रसंगी हिंदीतून संवाद साधू शकतात. गंमत सांगतो. मागे निवडणुकीच्या निमित्ताने गेलो असताना, एका रिक्षावाल्यानं ए. राजा आणि करुणानिधी हे कसे भ्रष्टाचारी आहेत, हे सांगताना हिंदीतून कचकचीत शिवी हासडून त्यांचा उद्धार केला होता. 

हे सोडा. ही झाली अगदी साध्या साध्या लोकांची आणि हातावर पोट असलेल्या लोकांची उदाहरणं. ‘नल्ली’ किंवा ‘पोथीज’ या हायफाय वस्त्रदालनांमध्ये गेल्यानंतर तिथले सेल्समन आणि सेल्सवूमन तमिळनाडूबाहेरील ग्राहकांशी हिंदीतूनही संवाद साधतात. म्हणजे तुम्ही जर एखादा प्रश्न हिंदीतून विचारला, तर ते त्यांच्या तोडक्या मोडक्या हिंदीतून का होईना पण तुमच्या प्रश्नाला योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. 

मागं केरळमध्ये गेलो होतो, तेव्हाही डी बुक करताना रहीम नावाचा बहुभाषिक ड्रायव्हर आम्हाला मिळाला होता. तिथल्या प्रत्येक टूरिस्ट कंपनीमध्ये किमान तीन ते चार ड्रायव्हर्स हे इंग्रजीप्रमाणेच थोडंबहुत हिंदी बोलू शकणारे असतात. म्हणजे जर तुम्हाला इंग्रजीची अडचण असेल आणि त्याला फक्त मल्याळमच येत असेल, तर गडबड होऊ शकते. हा गोंधळ टाळण्यासाठी अनेक टूरिस्ट एजन्सीज जुजबी हिंदी येणारे ड्रायव्हर्सही आवर्जून नेमतात आणि तुम्हाला हवा असल्यास तसा पर्यायही उपलब्ध असतो. 

सर्व अनुभवांचा निष्कर्ष आपण काय काढू शकतो? दक्षिणेत विशेषतः केरळ किंवा तमिळनाडूमध्ये त्यांच्या मातृभाषेबद्दलचं प्रेम कमी होऊ लागलंय का? किंवा इंग्रजी-हिंदीमध्ये बोलण्याचं प्रमाण वाढलं आहे का? तर अजिबात नाही. असं अजिबात नाही. त्या लोकांचं मातृभाषेवरचं प्रेम तितकंच असून अभिमानही तितकाच जाज्वल्य आहे. निष्कर्ष इतकाच, की कोणत्याही भाषेपेक्षा पैशाची भाषा अधिक प्रभावी असते. पैसा मिळणार असेल, तर लोक चार नव्या् गोष्टी किंवा एखादी भाषा जुजबी प्रमाणात का होईना, पण जरूर आत्मसात करतात. चेन्नई आणि पुदुच्चेरीत फिरल्यानंतर अधिक व्यापक प्रमाणात आम्हाला त्याची अनुभूती आली. 

(पूर्वप्रसिद्धी, महाराष्ट्र टाइम्स ‘संवाद’ पुरवणी ४ जानेवारी २०१५.)

Thursday, April 21, 2011

तमिळनाडूचे चार प्रतिनिधी

दीपक, अशोक आणि च्यो रामास्वामी...

आपण प्रवासाला गेलो किंवा नव्या शहरात गेलो, की तिथे आपल्याला चांगले-वाईट अनुभव येतात. अनुभव चांगले-वाईट असतात कारण परिस्थिती किंवा आपल्याला भेटलेली माणसं चांगली किंवा वाईट असतात. तमिळनाडूमध्ये गेलो होतो तेव्हा मलाही असेच काही चांगले-वाईट (वाईट फक्त एखाद दुसराच) अनुभव आले. त्यावर गेल्या बऱ्याच दिवसांपासून लिहीन म्हणत होतो. पण अखेर आज मुहूर्त मिळाला.

मदुराईचा दीपक


तमिळनाडू दौऱ्यात मला भेटलेला मस्त मित्र म्हणजे एन. बी. दीपक. हा स्वतः एका जाहिरात कंपनीमध्ये काम करतो. तंजावूर ते मदुराई एसटीमध्ये तो मला प्रथम भेटला. नंतर तो माझा मदुराईतील गाईडच बनला. एसटी स्टँडपासून ते मदुराई शहरात कोणत्या बसने जायचं, हे त्यानं मला सांगितलं. त्यालाही त्याच बसनं जायचं होतं, म्हणून तोही माझ्या बरोबरच निघाला. इतकंच नाही तर त्यानं माझं तिकिटही काढून टाकलं. (हा त्याला चांगलं म्हणण्याचा निकष नक्कीच नाही.) रात्री बारा वाजता मदुराईत चांगलं हॉटेल शोधण्यात त्यानं मला मदत केली. रात्री साडेबारा वाजता खायला कुठं मिळेल, काय मिळेल, यासाठी तो माझ्याबरोबर हिंडला. एका हॉटेलमध्ये घुसून त्यानं आमच्या दोघांच्या जेवणाची व्यवस्था केली.

दुसऱ्या दिवशी सकाळी माझ्याबरोबर मदुराई मंदिरात आला. एम. के. अळगिरी यांच्या भेटीसाठी डीएमकेचे ऑफिस आणि त्यांच्या घरापर्यंत माझ्याबरोबर फिरला. संध्याकाळीही मदुराई मंदिरातील देवांची यात्रा निघते, तिथं मला घेऊन गेला. रात्री मला एस. टी. स्टँडवर सोडायला आला आणि कन्याकुमारीला पोहोचला का? असा फोनही दुसऱ्या दिवशी केला. ओळख फक्त एस.टी. मधली. तो तमिळ, मी मराठी. आमच्या दोघांचा दुरान्वयेही संबंध नाही. पण तरीही त्यानं माझ्यासाठी खूपखूप केलं. आपण महाराष्ट्रातच बसून म्हणतो, की ते तमिळ लोकांना मदत करत नाहीत. हिडीसफिडीस करतात. पण असेही काही तमिळ आहेत, की जे कायमचे तुमचे मित्र होतात. जसा दीपक माझा कायमचा मित्र झाला.

मदुराईबद्दल बोलताना दीपक म्हणला होता. मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल. म्हणजे मदुराईचे लोक हे प्रेमळ लोक असतात. मला त्याचं बोलणं अगदी पटलं. कारण दीपक हाच माझ्यासाठी मदुराई पीपल होता. खरंच मदुराई पीपल आर पासक्कारे पीपल.

रेल्वे अधिकारी व्ही. अशोक

पु. ल. देशपांडे यांच्या चौकोनी कुटुंबात शोभून दिसेल असा रेल्वे अधिकारी चेन्नई-पुणे प्रवासादरम्यान माझा सहप्रवासी होता. एकदम पापभीरू म्हणजे तो कुर्डुवाडीपर्यंतच होता. पण तो माझ्या कायम लक्शात राहील असाच होता. व्ही. अशोक असं त्याचं नाव. अकदम टापटीप, वक्तशीर आणि नीटनेटका. पंढरपूर आणि तुळजापूरला देवदर्शनासाठी निघाला होता. एकटाच. पण दोन भल्या मोठ्या बॅगा, एक हँडबॅग आणि एक पाऊच बरोबर घेऊन आला होता. दोन्ही बॅगा साखळीबंद करून त्याची चावी एका छोट्या पाकिटात ठेवली. ते पाकिट पाऊचमध्ये ठेवलं आणि ते पाऊच कुठेतरी लपवून ठेवलं. बरं, डबा सेकंड एसीचा आणि हा एकटाच. इतकं मौल्यवान काय घेऊन जात असणार हा ते पांडुरंगालाच माहिती.

बरं, त्याच्याकडे कोरे कागद होते. पट्टी होती. रेल्वेचे दक्शिण, मध्य आणि पूर्व विभागाचे सविस्तर वेळापत्रक होते. त्यामुळे कुर्डुवाडी कधी येणार, पुणे कधी येणार, गुंटकल आणि वाडी कधी येणार, कशानंतर काय याची त्याला सविस्तर माहिती होती. रेल्वेचा माहितीकोष म्हणूनच तो वावरत होता आणि प्रत्येक सहप्रवाश्याला मदत करत होता. सक्काळी उठल्या उठल्या चहा घेतला आणि अर्ध्या तासानं दही खायला घेतलं. सकाळी साडेआठ वाजता दही खाल्लं, तेव्हा मला चक्करच यायची बाकी होती. बरं, दही खाल्लं ते खाल्लं आणि म्हटला नो क्वालिटी. रेल्वेच्या पॅण्ट्री कारचे खासगीकरण झाल्यानंतर कशी मजा गेली, यावर मला दर तासाभरानं सांगत होता. म्हटलं, कुठून यानं दही खाल्लं आणि हे सर्व ऐकण्याची वेळ माझ्यावर आली.

वाडीला एका चहावाल्यानं जेवण आणून देऊ का विचारल्यानंतर त्यानं दर विचारले. तेव्हा चहावाला म्हणाला, बाजरीका एक रोटी बीस रुपया. त्यावर हा पठ्ठा म्हणाला, बाबा क्या एक किलो का रोटी लाओगे क्या? नंतर दही मिलेगा क्या, असं त्यानं विचारलं. तेव्हा म्हणाला मिलेगा. आधा किलो लाऊ क्या? त्यावर तो म्हणाला, मेरे को अकेले को चाहिए. पुरे डिब्बे को खिलाओगे क्या? त्यानंतर पुढचा अर्धा तास मी एकटाच वेड्यासारखा हसत होतो. माझ्या हसण्याची मलाचा लाज वाटत होती. पण काय करणार. असा हा व्ही. अशोक कुर्डुवाडी येण्यापूर्वीच दारात जाऊन उभा होता आणि पाहता पाहता नजरेआड झाला.

च्यो रामास्वामी

तुघलक या साप्ताहिकाचे संपादक आणि जयललिता यांचे कट्टर समर्थक च्यो रामास्वामी यांना भेटण्याचा योग आला. तमिळमधील लेखक, कवी, कथाकार, पटकथाकार, पत्रकार आणि बरेच काही. सध्या तुघलकचे संपादक. टाइम्सचे गेस्ट हाऊस असलेल्या अल्वर पेठ भागाच्या जवळच ग्रीनवेस रेल्वे स्टेशनजवळ त्यांचं ऑफिस. दुपारी तीननंतर फोन करा, असं म्हणून त्यांनी मला भेटण्यास होकार दिला. तीन वाजता फोन केला तर फोन बंद. म्हटलं वामकुक्शी सुरु असणार. मग साडेचारला फोन केला. फोन उचलला आणि पाचची अपॉईण्टमेंट दिली.

ऑफिसात गेलो. सुरुवातीला समोरच महात्मा गांधीजींचा फोटो. स्वतः रामास्वामी दे दुसऱ्या मजल्यावर बसतात. मग त्यांच्या पीएनं फोन करुन बोलणं करून घेतलं आणि मला वर जाण्यास सांगितलं. वर गेलो तर मंगल पांडेंचा फोटो. खाली गांधी वर पांडे. एक अहिंसक दुसरा १८५७ च्या स्वातंत्र्यसमराची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरलेला. केबिनमध्ये गेलो. म्हणाले, टेक युअर सीट आणि माझ्यावरच प्रश्नांचा भडिमार सुरु केला. कुठून आला, कुठे कुठे गेला, काय काय पाहिलं, तुमचा अंदाज काय, काय होईल इइ. जयललिता येणार पण घासून येणार हा माझा अंदाज चुकीचा आहे, असं सांगून त्या निर्विवाद बहुमत मिळविणार हे त्यांनी निक्शून सांगितलं. वर, करुणानिधी सरकारच्या चार वाईट गोष्टीही सांगितल्या.

सिंहासन वाटावं, अशा खुर्चीवर मस्त मांडी घालून बसलेली वामनमूर्ती. डोक्याला केस नाही. भुवयाही नाहीत. त्यामुळे भुवया काजळानं किंवा काळ्या रंगानं कोरलेल्या. कमरेला लुंगी. वरती सिल्कचा सदरा आणि संपूर्ण केबिनमध्ये विविध स्वामींचे आणि शंकराचार्यांचे फोटो. काही फोटो च्यो रामास्वामी यांच्याबरोबर तर काही आशीर्वाद देताना. मला तर एखाद्या शंकराचार्यांच्या पीठात वगैरे तर आलो नाही ना, असंच वाटत होतं. बोलायला मस्त रोखठोक आणि फोटोसाठी पोझ द्यायला एक नंबर. अवघ्या पंधरा मिनिटांमध्ये आमची भेट आटोपली आणि चेन्नई दौरा सार्थक झाल्याचं वाटलं. लहानपणापासून तमिळनाडूतील एक्सपर्ट म्हणून ज्यांना एनडीटीव्ही आणि स्टार न्यूजवर पाहत आलो त्यांना प्रत्यक्श भेटलो.

गेस्ट हाऊसचा वॉचमन

टाइम्सच्या गेस्ट हाऊसचा वॉचमन हा माझा लोकल गाईड होता. वॉचमनचं नाव विचारलं होतं. पण आता लक्शात नाही. गेस्ट हाऊसपासून कुठे कोणती बस जाते. बसस्टॉप कुठे आहे. तिथून पुढे जाण्यासाठी कोणती बस उपयुक्त ठरेल, तिकिट किती असेल. किती मिनिटांनी बस येईल, याचा तो विकिपिडीयाच होता. त्याच्यामुळेच मला चेन्नईच्या बससेवेची जवळून ओळख झाली. कोणत्या पेपरमध्ये काय आलंय, कोणता पेपर कोणाचा आहे, चॅनलवर नेमक्या काय बातम्या सांगितल्या, हे त्याला अगदी इत्थंभूत माहिती असायचं. असा हा वॉचमन माझा चेन्नईतील गाईडच होता.

तंजावूरचा खडूस म्हातारा

तंजावूरला होतो तेव्हा आर्यभुवन नावाच्या एका हॉटेलमध्ये संध्याकाळी नाश्ता करण्यासाठी गेलो होतो. तिथं माझ्यासमोरच एक म्हातारा येऊन बसला. बरं, इतर अनेक टेबलं मोकळी होती तरी समोर येऊन बसला. बरं, विषय काढायचा म्हणून त्याला विचारलं तमिळनाडूत यंदा काय होणार? तेव्हा मला म्हटला, ओन्ली तमिळ. नो इंग्लिश. दिसायला तर एकदम टापटीप आणि सोज्वळ होता. पुण्यातील काही खवट म्हातारे असतात तसा तो होता. त्याला इंग्लिश येत असणार पण भडवा बोलला नाही. इडलीबरोबर झालेला अपमान गिळून आणि मनातल्या मनात त्याच्या आई-बहिणीचा उद्धार करून बाहेर पडलो.

आणखी बरेच जण भेटले पण लक्शात राहणारे हे इतकेच.

Monday, April 04, 2011

हटविलेला पुतळा कण्णगी यांचा

चेन्नईतही पुतळ्याचे राजकारण

पुतळ्यावरून झालेले रणकंदन आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या काळोखात अचानकपणे हलविला गेलेला पुतळा... पुण्यात घडलेल्या या घटनेसारखीच घटना चेन्नईमध्येही घडली होती, जवळपास दहा वर्षांपूर्वी. रातोरात हटविल्या
गेलेल्या पुतळ्यामुळे संपूर्ण तमिळनाडूत त्याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि साहित्यिक, कलावंत सामान्य नागरिकांनही त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. हटविण्यात आलेला पुतळा होता महिलांच्या न्यायासाठी झगडणा-या आणि तमिळ महिलांचा आदर्श असलेल्या कण्णगी यांचा.

आठव्या शतकातील एका तमिळ महाकाव्यामध्ये कण्णगी या नायिका असून त्यांनी न्यायाच्या रक्शणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला, असे त्या महाकाव्याचा आशय आहे. त्यामुळे गेल्या अनेक शतकांपासून कण्णगी या तमिळ अस्मितेच्या मानबिंदू बनलेल्या आहेत. कण्णगी हे पात्र काल्पनिक असले तरी
तमिळनाडूच्या काही भागात त्यांची आजही पूजा केली जाते. १९६८ साली झालेल्या वर्ल्ड तमिळ क़ॉन्फरन्समध्ये ठराव केल्यानंतर कण्णगी यांचा पुतळा मरीना बीच येथे बसविण्यात आला होता. पण २००१ मध्ये अण्णा द्रमुकचे
सरकार सत्तेवर असताना तो पुतळा एकाएकी रात्री अचानक हलविण्यात आला. त्यावेळी अण्णा द्रमुकचे . पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री होते. जयललिता यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी
पनीरसेल्वम आले होते.



पुतळा हटविण्याची तीन वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे जयललिता यांच्यावर ओढविलेले संकट हे कण्णगी यांच्या पुतळ्यामुळे आलेले आहे. तो पुतळा त्याठिकाणी असल्यामुळेच जयललिता यांचा कठीण काळ सुरु झाला आहे, असे कोणीतरी जयललिता यांच्या मनात भरविल्यामुळेच तो पुतळा हटविण्यात आला, अशी एक थिअरी आहे. दुसरे म्हणजे कण्णगी यांच्या पुतळ्याची पाठ समुद्राकडे आहे, त्यामुळे पावसाने तमिळनाडूकडे पाठ फिरविली आहे, अशा कंड्या कोणीतरी पिकविल्या आणि त्यामुळे पुतळा हटविण्यात आला, असे काही जण सांगतात. अर्थात, सरकारने दिलेले कारण म्हणजे वाहतुकीला होत असलेला अडथळा. एका वाहनाने कण्णगी यांच्या पुतळ्याला धडक दिली होती, त्यामुळे तो दुरुस्तीसाठी हटविण्यात आला, अशी माहिती मुथ्थू रामचंद्रन यांनी दिली.

पुतळा हटविण्यात आल्यानंतर राज्यभरात सर्वत्र हलकल्लोळ माजला होता. लोकांनी निषेध मोर्चे काढले. विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण जयललिता या कोणालाही बधल्या नाहीत. पुतळ्याला हानी पोहोचू नये, म्हणून तो वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. पुतळा सुस्थितीत आहे, इतकेच जयललिता आणि पनीरसेल्वम माध्यमांना सांगत होते.

पुतळा हटविण्याचा विषय २००६ साली झालेल्या निवडणुकीचा मुद्दा झाला होता. पुन्हा सत्तेवर आलो तर पूर्वीच्याच ठिकाणी पुतळा पुन्हा सन्मानाने बसवू, असे आश्वासन करुणानिधी यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले देखील. आज
कण्णगी यांचा पुतळा मरीना बीचवर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या पुतळा हटविण्याचा आणि पुन्हा बसविल्याचा उल्लेख करण्यास करुणानिधी अजिबात विसरलेले नाहीत.

बसमधून प्रवास करताना एका सहप्रवाशाला विचारले, की यंदा जयललिता सत्तेवर आल्यातर पुन्हा पुतळा हटवतील का? त्यावर त्याने उत्तर दिले, सरकार कोणाचे येणार याचा अंदाज अजून राजकीय पक्शांनाही आलेला नाही. त्यामुळे आपण येणार की नाही, याच चिंतेत ते आहेत. त्यामुळे त्यांना पुतळ्या बितळ्याची चिंता
सध्या नाही. तो नंतरचा प्रश्न आहे.

एसएसएम क़ॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्शण घेणा-या महेशकुमारला पुतळ्याबद्दल विचारले तर तो म्हणाला, नो आयडिया सरजी. आता बोला.

एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक...
मरीना बीचवरच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि तमिळनाडूतील सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार एम जी रामचंद्रन यांची समाधी आहे. २४ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे दुःख सहन झाल्यामुळे तमिळनाडूत त्यावेळी ३० जणांनी आत्महत्या करून आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या बरोबरच जीवन संपविले होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मरीना बीच येथे एमजीआर यांची समाधी बांधण्यात आली आहे. द्रविडीयन चळवळीचे प्रमुख नेते अण्णादुराई आणि एमजीआर यांची समाधी शेजारीशेजारीच आहेत.

एमजीआर यांना महागडी घड्याळे जमविण्याचा आणि घालण्याचा मोठा शौक होता. त्यामुळे एमजीआर यांच्या काही अस्थि आणि त्यांच्या आवडीचे घड्याळ समाधीखाली ठेवण्यात आलेले आहे संपूर्ण काळ्या कुळकुळीत कडप्प्याने ही समाधी साकारलेली आहे. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी अशी आवई उठविली की, समाधीच्या पृष्ठभागाला कान लावले, की अजूनही एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येते. (पुण्यातही शनिवारवाड्यावर अजूनही काका, मला वाचवा, असे आवाज येत असल्याची अफवा गमतीनं का होईना कानावर येतेच) समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेले लोक दर्शन घेण्यापूर्वीच समाधीला कान लावून खरंच टीकटीक
ऐकू येते का? ते पाहतात.



वास्तविक पाहता २४ वर्षांनंतर घड्याळाची टीकटीक कशी ऐकू येईल? पण आजही अनेक जण नित्यनियमाने कान लावून आवाज येतो का? ते ऐकतात. अगदी जीन्सची पँट आणि टी-शर्ट घातलेले तरुण-तरुणी यांनाही मोह आवरता येत नाही. मग काय, मी देखील उत्सुकतेपोटी समाधीला कान लावून काही ऐकू येतंय का, ते पाहिलं.
पण अपेक्शेप्रमाणे काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्यानंतर एका क़ॉलेजमधल्या तरुणानं कान लावला. त्यालाही काही ऐकू आलं नाहीच. त्याला विचारलं, काही ऐकून आलं का? हे सगळे मूर्ख आहेत, हे वाक्य उच्चारण्यापूर्वी त्यानं जो
एक शब्द (खरं तर अपशब्द) उच्चारला तो ऐकून पुण्यातच असल्याचा भास झाला आणि धन्य झालो.

आजचे वाक्यः बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या एका मुलाला विचारलं,
मला तमिळ शिकायचंय, हे तमिळमध्ये कसं बोलणार?
तो म्हणाला, नानकू तमिळ कोत्तुकोनम्...