Showing posts with label Tamilnadu. Show all posts
Showing posts with label Tamilnadu. Show all posts

Sunday, August 12, 2018

ओजस्वी वाणी आणि ओघवती लेखणी


 

कलेचा मर्मज्ञ... कलैग्नार

मुथ्थुवेल करुणानिधी… धार्मिक कार्यक्रमांमध्ये तसेच सणसमारंभाच्या निमित्ताने वाद्य वाजविण्यासाठी जाणाऱ्या समाजात जन्माला आलेला गरीब मुलगा. वाणी आणि लेखणीच्या जोरावर तब्बल सहा दशके तमिळनाडूच्या राजकारणावर स्वतःची अमीट छाप निर्माण केली. ही गोष्ट मला करुणानिधी यांची सर्वाधिक भावते. चित्रपटांच्या कथा आणि पटकथा लिहिताना, संवाद लेखन करताना साहित्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या कलाकाराने मनसोक्त मुशाफिरी केली. आपला विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी साहित्यातील विविध प्रकारांचा खुबीने उपयोग केला. साहित्याच्या क्षेत्रात यशस्वी झालेला हा कलावंत राजकारणातही भलताच यशस्वी ठरला. तेरा वेळा विधानसभा निवडणूक जिंकणारे करुणानिधी पाचवेळा तमिळनाडूचे मुख्यमंत्री बनले. साहित्य, चित्रपट आणि राजकारण अशा तीनही क्षेत्रांमध्ये स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण स्थान निर्माण करणाऱ्या कलैग्नार तथा करुणानिधी यांच्या कारकिर्दीतील वेगळे पैलू, आठवणी आणि किस्से…
….



गॉगल आणि शाल ही ओळख…
करुणानिधी म्हटले सर्वसामान्य लोकांना पिवळी शाल आणि काळा गॉगल या दोन गोष्टीच प्रामुख्याने डोळ्यासमोर येतात. करुणानिधी यांनी देखील आपली ही ओळख अगदी शेवट शेवटपर्यंत जपली. अगदी प्रारंभीच्या काळात करुणानिधी यांना १९५३मध्ये एका अपघाताला सामोरे जावे लागले. त्या अपघातात कलैग्नार यांच्या डाव्या डोळाला जबर मार लागला. जखमी झालेल्या डोळ्यावर परिणाम झाला. अनेक उपचार झाले. शस्त्रक्रिया पार पडल्या. मात्र, त्याचा फायदा झाला नाही. पुढे त्याच डोळ्याला १९६७मध्ये पुन्हा मार लागला. अधूनमधून त्यांचा डोळा दुखायचा आणि त्रास देखील व्हायचा. चार वर्षांनी म्हणजे १९७१मध्ये अमेरिकेत त्यावर शस्त्रक्रिया झाली नि त्यानंतर ते काळा चष्मा वापरायला लागले. अगदी २००० सालापर्यंत ते काळा चष्मा वापरायचे. नंतर २००० नंतर त्यांनी पारदर्शक काचांचा काळा चष्मा वापरायला सुरुवात केली. 

करुणानिधी यांची शाल ही काळ्या चष्म्यापेक्षाही अधिक चर्चेत राहिली. पिवळ्या शालीबद्दल अनेक तर्कवितर्क लढविले जातात. करुणानिधी पूर्वी पांढरी किंवा हिरवी किंवा वेगळ्या रंगाची शाल खांद्यावर घ्यायचे. काही वर्षांपूर्वी घशाच्या आजारामुळे त्यांच्या गालांना सूज आली. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना खांद्यावर उबदार शाल ठेवण्याचा सल्ला दिला. जेणेकरून सूज येणार नाही. तेव्हापासून करुणानिधी पिवळी शाल खांद्यावर घेऊ लागले, असे उल्लेख सापडतात. 

अर्थात, पिवळी शाल घेण्याचा सल्ला ज्योतिषाने दिला होता, असाही दावा काही जण करतात. पिवळी शाल घेतल्यानंतर तुमच्या राजकीय कारकि‍र्दीला कधीच आहोटी लागणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावरून अनेकांनी करुणानिधींवर टीका केली. तुम्ही पिवळीच शाल का घेता? पिवळी शाल न घेता तुम्ही का बाहेर पडत नाही? भाषणांमध्ये निरीश्वरवाद मांडणारे आणि नास्तिक असल्याचा दावा करणारे तुम्ही ज्योतिष कधीपासून पाळायला लागले, अशी उघडउघड टीका गोपालस्वामी उर्फ वैको यांनी त्यांच्यावर केली होती.



मंदिरावर करुणा… 

करुणानिधी यांचे घर चेन्नईतील गोपालपुरम भागात आहे. काही वर्षांपूर्वी एका स्नेह्यांकडे जाणे झाले. ते देखील गोपालपुरम भागातील करुणानिधी यांच्या सोसायटीमध्येच रहायला होते. व्यवस्थापन तसेच आर्थिक क्षेत्राशी ते संबंधित आहेत. अनेक कंपन्यांमध्ये संचालक आणि सल्लागार म्हणून ते काम करतात. त्यांनी सहज गप्पांमध्ये विषय निघाला तेव्हा सांगितले होते, की करुणानिधी भाषणांमध्ये नास्तिक असल्याचे दाखले जरूर देतात. मात्र, आमच्या गोपालपुरममध्ये श्रीकृष्णाचे एक मंदिर आहे. तिथे श्रीकृष्णाप्रमाणेच शिवा, कामाक्षी, गणपती, हनुमान यांच्याही मूर्ती आहेत. या मंदिरातील पूजा, प्रसाद आणि इतर सर्व खर्च करुणानिधी कुटुंबीयांमार्फतच केला जातो. 

इतकेच काय तर करुणानिधी यांच्या घरातून बाहेर रस्त्यावर आल्यानंतर डाव्या हाताला हे मंदिर आहे. करुणानिधी यांनी त्यांच्या ड्रायव्हरला सूचना देऊन ठेवलेल्या होत्या, की कोठेही जायचे असले, तरीही घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराकडे पाठ होईल अशा पद्धतीने गाडी बाहेर काढायची नाही. घरातून बाहेर पडल्यानंतर मंदिराकडे तोंड असेल, अशाच पद्धतीने गाडी बाहेर निघाली पाहिजे. करुणानिधी यांनी अखेरपर्यंत नियमाचे पालन केले, असेही आमच्या स्नेह्यांनी आवर्जून सांगितले. आता मंदिराकडे तोंड झाल्यानंतर किमान मनातल्या मनात तरी देवाला नमस्कार करायचे का, हे मात्र न उलगडलेले कोडेच आहे.


एमजीआर यांच्याशी दोस्तीचा प्रस्ताव

सुरुवातीच्या काळात एम. करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन यांच्या खास दोस्ती होती. करुणानिधी यांनीच एमजीआर यांना राजकारणात आणले. कलैग्नार यांचे संवाद, कथा नि पटकथांमुळे एमजीआर प्रसिद्धी आणि लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. मात्र, अण्णादुरै यांच्या निधनानंतर दोन्ही नेत्यांचे फारसे जमले नाही. करुणानिधी यांच्यावर एमजीआर यांनी आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका ठेवला. तेव्हा द्रमुकमधून एमजीआर यांची हकालपट्टी झाली. पुढे एमजीआर यांनी अण्णा द्रमुकची स्थापना केली आणि पाच वर्षांमध्ये तमिळनाडूची सत्ता हस्तगत केली. त्यांची लोकप्रियता इतकी होती, की ते जिवंत असेपर्यंत करुणानिधी पुन्हा सत्तेवर येऊ शकले नाहीत. सलग दहा वर्षे ते मुख्यमंत्री राहिले.

ज्येष्ठ समाजवादी नेते बिजू पटनाईक यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट घडवून आणण्याचे प्रयत्न केले. करुणानिधी आणि बिजू पटनाईक यांचे संबंध खूप घनिष्ट होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेल्या आणीबाणीला करुणानिधी यांनी जोरदार विरोध केला होता. आणीबाणीच्या विरोधातील अनेक नेत्यांनी त्या काळात तमिळनाडूत आश्रय घेतल्याचे अनेक उल्लेख सापडतात. करुणानिधी हेच त्यामागे होते, हे उघड आहे. कदाचित तेव्हापासून बिजूबाबू आणि कलैग्नार यांच्यात ऋणानुबंध निर्माण झाले असावेत. 



पुढे याच दोस्तीतून बिजूबाबूंनी १९७९ साली करुणानिधी आणि एम. जी. रामचंद्रन यांच्यामध्ये समेट घडवून आणण्यासाठी पुढाकार घेतला होता. हे दोन्ही नेते एकत्र यावेत, यासाठी बिजूबाबूंनी १९७९मध्ये प्रयत्न केले. १२ सप्टेंबर १९७९ रोजी कलैग्नार आणि बिजूबाबू यांच्यात मद्रास येथे बैठक झाली. हा प्रस्ताव कोणाचा आहे, असा सवाल करुणानिधी यांनी बिजूबाबूंना विचारला. तेव्हा त्यांनी एमजीआर यांची असे उत्तर दिले. असाच प्रश्न एमजीआर यांनी बिजूबाबूंना विचारला त्यावेळी त्यांनी करुणानिधी असे उत्तर दिले. हा गेमप्लॅन खूप वर्षांनंतर करुणानिधी यांच्या लक्षात आला, हा भाग वेगळा. 

तेव्हा करुणानिधी आणि बिजूबाबू यांच्यात सविस्तर चर्चा झाली. एमजीआर हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, तर पक्षाध्यक्ष म्हणून करुणानिधी हेच असतील. पक्षाचे नाव द्रमुक असेच असेल. तर पक्षाचा अधिकृत झेंडा म्हणून अण्णा द्रमुकचा झेंडा कायम राहील, असा हा प्रस्ताव होता. एमजीआर आणि करुणानिधी या दोघांनाही हा प्रस्ताव तत्वतः मान्य झाला होता. करुणानिधी यांनी बिजूबाबूंना आनंदाने मिठी मारल्याचा उल्लेखही आढळतो. नंतर चेपॉक येथील विश्रामगृहातील एका बंद खोलीत दोन्ही नेत्यांमध्ये एक बैठक पार पडली. द्रमुकचे अन्बळगन नि अण्णा द्रमुकचे नेदुन्चेळीयन यांची स्वतंत्र बैठक झाली. दोन्ही पक्षांनी तातडीने कार्यकारी समितीची बैठक बोलविण्याचे मान्य केले. 

अण्णा द्रमुकचा विलिनीकरणाचा प्रस्ताव असेल तर तो स्वीकारण्यात चूक काय?’ असा सवाल करुणानिधी यांनी चेन्नई येथील बैठकीनंतर पत्रकारांना केला. तर वेल्लोर येथे अण्णा द्रमुकच्या बैठकीमध्ये एमजीआर यांनी या विलिनीकरणाबाबत अवाक्षरही काढले नाही. उलट त्यांच्या नेत्यांनी द्रमुकवर टीकेची झोड उठविली. नंतर द्रमुक नेत्यांनीही अण्णा द्रमुक आणि एमजीआर यांच्यावर टीका करण्यास प्रारंभ केला. बिजूबाबू यांनी दोन्ही नेत्यांचे मन वळवून विलिनीकरणाचा केलेला हा प्रयत्न अगदी थोडक्यात फसला. अण्णा द्रमुकच्या काही मंत्र्यांनी एमजीआर यांना हा प्रस्ताव फेटाळून लावा, असा सल्ला दिला होता. त्यामुळेच ते बैठकीत काहीच बोलले नाही, असे आरोप नंतर द्रमुककडून झाले. अर्थात, तेव्हा पुलाखालून पाणी वाहून गेले होते. 

भविष्यात दोन्ही नेते आणि पक्ष एकत्र येऊ शकतात, हा धोका लक्षात घेऊन इंदिरा गांधी यांनी त्यांचा खास दूत सी. एम. स्टीफन यांना तमिलनाडूत पाठविला. द्रमुक नेते मुरासोली मारन यांच्याशी त्याने चर्चा केली आणि काँग्रेससोबत येण्याबाबत विनंती केली. द्रमुकने इंदिरा गांधी यांना समर्थन देऊन काँग्रेससोबत युती करण्याचे निश्चित केले. लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-द्रमुक युतीला ३९पैकी ३७ जागा मिळाल्या. त्यापैकी द्रमुकने १६ जागा जिंकल्या. अण्णा द्रमुकला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर दोन्ही द्रमुक आणि अण्णा द्रमुकमध्ये विलिनीकरणाबाबत कधी चर्चा देखील झाली नाही.
… 



जयललिता यांच्याशीही वैर कायम…

एमजीआर यांच्या निधनानंतर जयललिता यांनी तमिळनाडू विधानसभेत प्रवेश केला. १९८९मध्ये तमिळनाडूच्या विधानसभेत रणकंदन झाले. तमिळनाडूचे तत्कालीन मुख्यमंत्री करुणानिधी यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला म्हणून द्रमुक आमदार चिडले होते. त्यावेळी जयललिता यांना धक्काबुक्की झाली. एका आमदाराने जयललिता यांच्या साडीला हात घातला आणि साडी फेडण्याचा प्रयत्न केला. करुणानिधी यांनी देखील त्यावेळी त्या आमदारावर काहीच कारवाई केली नाही. किंवा त्याचा निषेधही केला नाही. यामुळे संतापलेल्या जयललिता यांनी योग्यवेळी बदला घेण्याची शपथ घेतली. त्यानंतर करुणानिधी सभागृहात असताना त्यांनी कधीच विधानसभेत पाऊल ठेवले नाही. मला त्यांचा चेहराही बघायचा नाही, असे त्या म्हणायच्या. 

जयललिता २००१मध्ये सत्तेवर आल्या. तेव्हा करुणानिधी यांना मध्यरात्री एका अट्टल गुन्हेगारासारखे फरपटत नेऊन अटक करण्याची कारवाई जयललिता सरकारने केली होती. एका वयोवृद्ध नेत्याविरुद्ध अशा पद्धतीने कारवाई केल्याचा सर्व स्तरातून निषेध झाला होता. मात्र, १९८९मध्ये आपल्या साडीला हात घालण्यात आल्याच्या कृत्याचा जयललिता यांनी संधी मिळताच अशा पद्धतीन बदला घेतला, अशी प्रतिक्रिया तमिळनाडूतील राजकीय विश्लेषक आणि अभ्यासक व्यक्त करतात.

जयललिता आणि करुणानिधी यांच्यातील वैर इतके टोकाचे होते, की मरिना बीचवर दफनविधी करण्यासाठी देखील जयललितांच्या राजकीय वारसदारांनी करुणानिधींना परवानगी नाकारली. अखेर परवानगीसाठी कोर्टामध्ये जाऊन झगडावे लागले. करुणानिधी आणि जयललिता हे हाडाचे वैरी आता या जगात नाही. या निमित्ताने द्रमुक आणि अण्णा द्रमुकमधील राजकीय वैमनस्याला मूठमाती मिळावी, अशी अपेक्षा करायला हरकत नाही…

(पूर्व प्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स १२ ऑगस्ट २०१८)

Sunday, February 21, 2016

मुंडू, वेष्टीच्या गोष्टी


लुंगी नव्हे धोती...

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूत गेलो होतो. मदुराईत गेल्यानंतर सुप्रसिद्ध मिनाक्षी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तंजावूर ते मदुराई बस प्रवासात दोस्त झालेला एन. बी. दीपक हा देखील माझ्याबरोबर होता. मंदिरात जात असताना एक बोर्ड वाचला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो बोर्ड होता, ‘LUNGIES NOT ALLOWED’. तमिळनाडूतील मंदिरांमध्ये लुंगी नेसणाऱ्या मंडळींना परवानगी नाही, तर मग कोणाला? लोक नेमकं नेसून तरी काय जातात मग मंदिरात? आपल्या प्रवेश मिळणार काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मी दीपकवर केली. माझा नेमका काय गोंधळ झालाय हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं सविस्तर खुलासा केला.



दाक्षिणात्य मंडळींबद्दल आपले जे काही समज-गैरसमज असतात, त्यापैकीच तो एक होता, असं नंतर माझ्या लक्षात आलं. दक्षिणेकडील चारही राज्यांमध्ये पुरुष मंडळी कमरेला जे वस्त्र गुंडाळतात, ते म्हणजे लुंगी, असं आपल्याला वाटतं. मात्र, तसं अजिबात नाही. लुंगी म्हणजे चित्रविचित्र रंगांमध्ये असलेले, ठिपक्या ठिपक्यांपासून ते प्राण्या-पक्ष्यांपर्यंत कशाचेही डिझाइन छापलेले, चेक्समध्ये उपलब्ध असलेले वस्त्र म्हणजे लुंगी. दोन्हीत काही ठिकाणी आढळणारा आणखी एक फरक म्हणजे लुंगी गोलाकार असते. त्याला मोकळी बाजू नसते. तर धोतीच्या दोन्ही बाजू मोकळ्या असतात. तशा पद्धतीची लुंगी नेसून मंदिरात जायला मनाई आहे, असं दीपकनं मला समजावून सांगितलं.

लुंगी नव्हे धोती
मग माझा पुढचा प्रश्न होता, की पांढरी लुंगी असते त्याला काय म्हणतात? तमिळनाडूत त्याला धोती किंवा ‘वेष्टी’ म्हणतात, असं त्यानं सांगितलं. धोती मी समजू शकत होतो. पण वेष्टी म्हणजे काय? या प्रश्नावर त्यानं दिलेलं उत्तर भारी होतं. ‘मला माहिती नाही. बहुधा ‘वेस्ट’ला (कमरेला) गुंडाळतात, म्हणून ‘वेष्टी’ असेल,’ असं एकदम भारी उत्तर त्यानं मला दिलं. अर्थातच, ते चुकीचं होतं. तमिळमध्ये ‘वेट्टी’ म्हणजे कापलेले कापड. त्याचा अपभ्रंश होत होत ‘वेष्टी’ हा शब्द आला, असे काही जण सांगतात. तर काहींच्या मते संस्कृत शब्द ‘वेष्टन’ (कव्हर) या शब्दावरून आला असावा. हे झालं तमिळनाडूचं. केरळमध्ये त्याला मुंडू म्हणतात. काही जण केरला धोती म्हणूनही त्याचा उल्लेख करतात. आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये पंचा म्हणतात. तर कर्नाटकात लुंगीच म्हणतात. कन्नड भाषेतही लुंगीसाठी वेगळा शब्द नाही.


लुंगी म्हणजे घरात नेसायची किंवा बाजारहाटाला जाताना नेसायचे वस्त्र. धोतीच्या तुलनेत लुंगीला प्रतिष्ठा कमी. देवाच्या दरबारी तर लुंगी हद्दपारच. पांढरी शुभ्र, क्रीम कलरची किंवा क्वचित प्रसंगी भगव्या रंगाची (कावी मुंडू) स्वच्छ धुतलेली धोतीच मंदिरामध्ये जाताना हवी. त्यातही काही अपवाद आहेतच. केरळमधील मंदिरांमध्ये अय्यप्पा भक्तांना फक्त काळे मुंडूच नेसावे लागते. इतर रंगांचे मुंडू चालत नाही. पण त्याच काळ्या धोतीला तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील अनेक मंदिरांमध्ये स्थान नाही. तिथं शुभ्र पांढऱ्या किंवा फिकट क्रीम रंगाची धोतीच हवी. कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये जर गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर जरीच्या काठांचे रेशमी धोतीच आवश्यक असते. काही मंदिरांत फक्त धोतीच नाही, तर खांद्यावर उपरणे घेऊनच प्रवेश करावा लागतो.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मजूर किंवा कष्टकरी वर्ग हे रंगीबेरंगी प्रकारातील लुंगी परिधान करतात. अनेकदा त्याचे रंग भडकच असतात. त्याचे कारणही अगदी योग्य आहे. कष्टाची कामे करताना लुंगीचा रंग जितका मळखाऊ असेल किंवा भडक असेल, तितके ते उत्तम असते. त्यामुळेच कष्टकरी मंडळी भडक रंगाची लुंगी परिधान करून कष्टाची कामे करताना दिसतात. आंध्र प्रदेशात रायलसीमा किंवा किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचे पंचे (धोती) परिधान करणारी मंडळी ही प्रामुख्याने देशमुख किंवा पाटील समाजाची किंवा गावातील प्रतिष्ठीत मंडळी असतात.

नेसण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य 
अनेक जण प्युअर कॉटनची धोती नेसणे पसंत करतात. मुख्य म्हणजे कॉटनची धोती असेल तर बहुतेक मंडळी पट्टा बांधत नाहीत. मात्र, धोती टेरिकॉटची असेल तर मात्र, आवर्जून पट्टा बांधावा लागतो. मुंडू बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. निऱ्या करून ते अशा विशिष्ट पद्धतीने खोचतात, की काहीही झालं तरी ते सुटत नाही. ते कमरेवर एकदम फिट्ट बसते. तमिळनाडूमध्येही काहीशा अशाच पद्धतीने वेष्टी नेसतात.


मुंडू किंवा वेष्टी नेसण्याची प्रत्येक ठिकाणाची पद्धती वेगवेगळी आहे. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मंडळी मुंडू नेसताना त्याची मोकळी बाजू (ज्याला मल्याळममध्ये कडा म्हणतात) उजवीकडे येईल अशा पद्धतीने नेसतात. केरळमधील मलबार प्रांतातील मुस्लिम मंडळी बरोबर उलट्या पद्धतीने म्हणजे मोकळी बाजू डावीकडे येईल, अशा पद्धतीने मुंडू परिधान करतात. तमिळनाडूतील अय्यंगार ब्राह्मण मंडळी अशाच पद्धतीने उजवीकडून डावीकडे (मोकळी बाजू डावीकडे) वेष्टी परिधान करतात. तर तमिळनाडूत उर्वरित बहुतांश मंडळींच्या धोतीची कडा उजवीकडेच येते. आंध्र प्रदेशात किंवा कर्नाटकात मात्र, विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी विशिष्ट पद्धतीनेच पंचे वा लुंगी परिधान केली पाहिजे, असे संकेत नाहीत. ही मंडळी सर्वसाधारणपणे मोकळी बाजू उजवीकडे येईल, अशाच पद्धतीने वस्त्र नेसतात.

मुंडू नेसण्याच्या या पद्धतीची मला ओळख झाली ती केरळमध्ये. एका लग्नाच्या निमित्ताने मी केरळमध्ये गेलो होतो. लग्नाच्या वेळी खास केरळी पद्धतीने पेहराव करावा, या हेतूने मी ‘कासाव मुंडू’ही सोबत नेले होते. ते मी माझ्या पद्धतीने नेसून तयार झालो होतो. त्यावेळी नव्यानेच मित्र झालेला अश्रफ थैवलप्पू हा मदतीला धावून आला. मी नेसलोले मुंडू हे एकदम चुकीचे आहे, असे सांगून त्याने मला योग्य पद्धतीने मुंडू नेसण्यास शिकविले. त्यावेळी त्याचा पहिला प्रश्न मला होता, की तू हिंदू ना? ‘मी म्हटलं हो. पण त्याचा इथे काय संबंध?’. त्यावेळी त्यानं मला हिंदू आणि मुस्लिम मंडळींच्या मुंडू नेसण्यातील पद्धतीमधील फरक समजावून सांगितला.

सिंगल की डबल… 
धोतीमध्ये सिंगल आणि डबल अशा दोन प्रकार उपलब्ध आहेत. साधारणपणे सिंगल म्हणजे दोन ते अडीच मीटर तर डबल म्हणजे चार मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंद अशा पद्धतीने मोजणी होते. सिंगल धोतीचे धागे अधिक घट्ट पद्धतीने विणलेले असतात. शिवाय ते धागे अधिक जड असतात. अशा पद्धतीने ही रचना करण्याचे कारण म्हणजे सिंगल असली तरीही ती धोती पारदर्शक असत नाही. हे शक्य होते धाग्यांच्या दाटपणामुळे. तुलनेने दुहेरी धोतीचे धागे हे पातळ आणि सुटसुटीतपणे विणलेले असतात. दोन्ही धोतींच्या धाग्यांमध्ये इतका फरक असतो, की सिंगल धोती ही डबलच्या तुलनेच अधिक जड असते. बहुतांश मंडळीही कॉटनचीच धोती परिधान करतात कारण त्यामध्ये लोकांना अधिक कम्फर्टेबल वाटते.

काठांच्या दुनियेत…
दक्षिणेतील चारही राज्यांच्या तुलनेत केरळमधील मुंडूचे काठ हे खूप कमी रुंद असतात आणि त्या काठांचा रंगही अगदी फिकट असतो. त्यात भडकपणा अजिबात नसतो. सण, समारंभ किंवा देवळातील विशिष्ट पूजेच्या प्रसंगी सोनेरी रंगाच्या काठाचे मुंडू नेसण्याची पद्धती आहे. केरळमध्ये त्याला ‘कासाव मुंडू’ म्हणतात. हे मुंडू पांढऱ्या रंगाचे किंवा क्रिम कलरचेच असते. केरळच्या तुलनेत तमिळनाडूमध्ये काठ थोडेसे अधिक रुंद असतात. तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश (आता तेलंगणही) येथील धोतीचे काठ खूपच रुंद असल्याचे आढळते. तसेच केरळच्या तुलनेत उर्वरित राज्यांमधील काठांचे रंग हे खूपच भडक असतात, असे निरीक्षण तज्ज्ञ मंडळी नोंदवितात. लाल, केशरी, निळे, तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाच्या काठांमध्ये जरीची नक्षी अशा पद्धतीच्या धोती सर्रास नेसल्या जातात. 


तमिळनाडूमध्ये ‘पॉलिटिकल पार्टी धोती’ असा वेगळाच प्रकार आढळतो. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या धोतीचे काढ हे राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंगांप्रमाणे असतात. म्हणजे द्रमुकचे नेते किंवा कार्यकर्ते काळ्या आणि लाल अशा दोन रंगांचे काठ असलेली धोती परिधान करतात. तर अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांसाठी तयार केलेल्या धोतीमध्ये काळ्या आणि लाल रंगाप्रमाणेच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याचाही समावेश असतो. अशाच पद्धतीने इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंग धोतीच्या काठांवर उतरलेले असतात.

फॅशनच्या दुनियेत…
बदलत्या काळानुसार धोतीमध्ये आवश्यक अशा अॅडिशन्स होऊ लागल्या आहेत. म्हणजे वस्त्र परिधान केल्यानंतर बरोबर उजव्या किंवा डाव्या हाताला एक खिसा येईल अशा पद्धतीने मुंडूची रचना केलेली असते. अर्थात, इतकी वर्षे लोकांना खिसा नसतानाही पैसे आणि इतर आवश्यक गोष्टी कशा ठेवायच्या याची सवय झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खिसा असलेले मुंडू विशेष लोकप्रिय ठरत नसल्याचीही स्पष्ट झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धोती अचानक सुटू नये, यासाठी लोक खबरदारी घेतातच. प्रसंगी बेल्टही बांधतात. यावर उपाय म्हणून आता खास ‘वेलक्रो धोती’ बाजारात उपलब्ध आहेत.


काय आहेत एटिकेट्स…
धोती परिधान केल्यानंतर ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी, वयाने ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादी महिला समोर असेल तर धोती गुडघ्यापर्यंत वर घेऊ नये, असा संकेत आहे. आणि अर्थातच, तो पाळला जातो. मग ते गुडघ्यापर्यंत वर कधी घ्यायचं? तर भराभर चालायचं असेल, पाऊस पडत असेल आणि रस्त्यात पाणी साचलं असेल, तर ते वर घेतलं जातं. शिवाय एखाद्याला दम द्यायचा असेल किंवा तावातावानं भांडायचं असेल, तर आपोआपच गुडघ्यापर्यंत वर घेतलं जातं. शिवाय मंदिरामध्ये दर्शनाला जाताना किंवा सण-समारंभ असेल, लग्नासारखा प्रसंग असेल, तर ते गुडघ्यापर्यंत वर घेणे टाळणेच इष्ट.

धोतीचे महत्त्व…
मध्यंतरी चेन्नईमध्ये एका खासगी क्लबने धोती परिधान केलेल्या मंडळींना क्लबमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा फतवा काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने तमिळनाडू सरकारने अशा पद्धतीने बंदी घालण्यास मनाई करणारा कायदाच करून टाकला. वेष्टी ही तमिळनाडूच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. त्यावर घाला घालाल, तर तुमचे सर्व सवलती बंद करू आणि विशेषाधिकार काढून टाकू, अशी तंबीही कायद्याद्वारे देण्यात आली होती. तमिळनाडूत तर काही दूरचित्रवाहिन्यांवर चर्चेसाठी येणारे पाहुणे आणि बातम्या देणारे पुरुष न्यूज अँकर्स यांना ‘वेष्टी’ हा ड्रेसकोड आवश्यक आहे. ‘पट्टली मक्कल कच्ची’च्या ‘पुथिया तमिळगम’ या वाहिनीचे पुरुष अँकर्स हे आधी सुटाबुटात बातम्या देत असत. ‘पीएमके’चे पक्षाध्यक्ष डॉ. एस. रामदॉस यांनी पाश्चिमात्य ड्रेसकोड बदलून त्यांना वेष्टी नेसूनच बातम्या देणे बंधनकारक केले.


(प्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी २१ फेब्रुवारी २०१६)