Showing posts with label Devendra Fadanvis. Show all posts
Showing posts with label Devendra Fadanvis. Show all posts

Friday, July 01, 2022

राजकारणातील नीचपणाचा कळस...

 

आधी मी, मग माझे दत्तू, शेवटी पक्ष...

आधी राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी मी... हे झालं सांगायला. अहवालांमधून छापायला, लेखांमधून लिहायला आणि भाषणांमधून मोठेमोठे बच्चन द्यायला... पण वास्तविक पाहता, आधी मी, नंतर माझे दत्तू (म्हणजे समर्थक) आणि शेवटी काही उरलं तर मग पक्ष (म्हणजे आपल्या विरोधातील इतर नेते नि कार्यकर्ते) वगैरे... हीच खरी नीती आहे. त्याला हल्ली भाजपामध्ये चाणक्यनीती म्हटलं जातं. आणि अशा नितीचा अवलंब करणाऱ्या शहाजोगांना चाणक्य. अगदी काही अपवाद सोडले तर आज पार्टी विथ डिफरन्समध्ये हीच परिस्थिती आहे.

केंद्रामध्ये असाल तर पंडित दीनदयाळ उपाध्याय, महाराष्ट्रात असाल तर वसंतराव भागवत आणि पुण्यात असाल, तर रामभाऊ म्हाळगी यांचं नाव घ्यायचं आणि भाषणं ठोकून टाळ्या मिळवायच्या. बाकी मग पक्ष चालविताना आणि वैयक्तिक आयुष्यात तुम्ही काहीही लफडी करा, कितीही खादाडी करा किंवा एकमेकांवर राजकीय कुरघोड्या करून पक्षातील विरोधकांना संपवून टाका, काही फरक पडत नाही. सगळं चालतंय... मुखी ही नावं असली म्हणजे मग सगळं माफ...

महाराष्ट्रातील सत्तांतराचे सूत्रधार असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी घडविलेल्या चमत्कारानंतर त्यांना मुख्यमंत्री न करता उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यायला लावून केंद्रीय नेतृत्वाने, विशेषतः अमित शहा यांनी दाखविलेल्या नीचपणानंतर हीच भावना अधिक प्रबळ होते. आपलं भविष्य महत्त्वाचं. पक्ष खड्ड्यात गेला, एखाद्या नेत्याचे खच्चीकरण झालं तर काय फरक पडत नाही. मी आणखी मोठा व्हायला पाहिजे, हीच वृत्ती यातून प्रकर्षाने दिसून येते.

मुळात अजित पवार यांच्यासोबत सत्तास्थापनेचा प्रयोग फसल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत नियोजनबद्धपणे व्यूहरचना रचून महाराष्ट्रात सत्तांतर घडवून आणले, हे सकृतदर्शनी दिसते. देवेंद्र यांना बाजूला ठेवून अमित शहा आणि जगतप्रकाश नड्डा यांनी सर्व खेळ्या खेळल्या आणि सत्तांतर घडले, यावर विश्वास ठेवायला मी भक्तांइतका भाबडा नाही. (वास्तविक पाहता, जगतप्रकाश नड्डा हा माणूस मोदी आणि शहा यांच्या किल्लीवर चालणारा बोलका बाहुला आहे, ओघानं आलंच. महाराष्ट्रात सत्तांतर घडविणे हा त्यांना झेपणारा घासही नाही.) राज्यातील एकाही नेत्याची तेवढी क्षमता नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना बाजूला ठेवून हे सत्तांतर घडले असू शकते, यावर कोणाचाही विश्वास बसणार नाही. देवेंद्रच या सत्तांतराचे शिल्पकार आणि सर्वेसर्वा आहेत.


मग इतके सारे व्यवस्थितपणे प्लॅन केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांचा इतका अपमान आणि इतका उपमर्द कशासाठी करण्यात आला असावा? त्याचे फक्त आणि फक्त एकच उत्तर दिसते आणि ते म्हणजे माझ्या स्पर्धेत कोणीही असू नये, हेच आहे. कारण २०२५ नंतर नरेंद्रशेठ मोदी हे निवृत्त होणार, असे त्यांनी आधीच जाहीर करून टाकले आहे. मोदींनंतर कोण, हा प्रश्न सध्या सर्वाधिक चर्चिला जातो आहे. त्यात नितीन गडकरी, शिवराजसिंह चौहान, अमित शहा, योगी आदित्यनाथ आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा समावेश आहे. परवा इकॉनॉमिक टाइम्समध्ये हेमंत बिस्वा शर्मा यांचेही नाव आले आहे. पण ते नाव काही देशभर चालेल असे वाटत नाही. अगदी २०२५ ला देवेंद्र पंतप्रधान नाही झाले, तरी त्यांना अमितभाई शहा हे त्यांना प्रतिस्पर्धी म्हणूनच पहात असावे. देवेंद्र यांच्यासारखा सज्जन, सभ्य, सुसंस्कृत, तळपता, चमकदार, प्रभावी, अभ्यासू आणि संघप्रिय नेता आपल्याला वरचढ होऊ नये, याच हेतूने देवेंद्र यांचा उपमर्द करण्याचे नीच कृत्य केले असावे.

मुळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर रात्री पेढे भरवाभरवीचा कार्यक्रम सुरु होता तेव्हा देवेंद्र यांना या षडयंत्राची कल्पनाही नसावी. मात्र, दुसऱ्या दिवशी साऱ्या घडामोडी घडत असताना या कपटी षडयंत्राचा हळूहळू उलगडा त्यांना होत गेला असावा.

पहिली शक्यता अशी की देवेंद्र यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते. मात्र, घासून घासून गुळगुळीच झालेला राजकीय मास्टरस्ट्रोक मारण्यासाठी अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री बनविण्याचे आदेश दिले असावेत. देवेंद्र ब्राह्मण आणि शिंदे मराठा असणे, शिवसेनेचाच मुख्यमंत्री केला, हे श्रेय घेण्याची संधी, अडीच वर्षांतील कारभार सुधारण्याचे मोठे आव्हान, शिवसेनेच्या नि त्यातही बंडखोर आमदारांना सांभाळण्याची जबाबदारी असे चर्चिले गेलेले सर्व मुद्दे ध्यानात ठेवून फडणवीस यांना मुख्यमंत्री न करता शिंदे यांच्याच गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली गेली असावी. ठीक आहे हे मान्य.

पण मग देवेंद्र यांना शिंदे यांच्या हाताखाली काम करायला लावून त्यांचा उपमर्द कशाला करायचा. त्यांना प्रदेशाध्यक्ष करून टाकायचं (नाहीतरी चंद्रकांत पाटील यांची टर्म संपतेच आहे) किंवा सरकारचे कामकाज नीट चालविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवायची. आपल्या ज्युनिअरच्या हाताखाली काम करण्याची सक्ती किंवा बळजबरी त्यांच्यावर कशाला करायची? मुळात देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केलेच नसेल. त्यामुळेच त्यांनी पत्रकार परिषदेत मी बाहेर थांबून सरकारला सहकार्य करेन, असे सांगितले. पण हे सहन न झाल्यामुळे किल्लीवर चालणाऱ्या अध्यक्षांनी थेट व्हिडिओ ट्विट करून देवेंद्र यांना नेतृत्वाने (म्हणजेच अमितभाई शहा यांनी) उपमुख्यमंत्री होण्याचे निर्देश दिले आहेत, असे सांगून देवेंद्र यांची गोची केली.

दुसरे म्हणजे अध्यक्षांनी सांगितल्यानंतरही देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्री होण्याचे मान्य केले नसावे म्हणून आणि म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोनवेळा देवेंद्र यांना फोन केला असावा. काय देवेंद्र जेवलात का? काय जेवलात? आज घातलेल्या जॅकेटमध्ये एकदम छान दिसताय, स्वारी खूष का एकदम वगैरे वगैरे गावगप्पा मारायला मोदी यांनी फडणवीस यांना फोन केला नसावा ना... देवेद्र ऐकण्याच्या मूडमध्ये नाहीत म्हणून आणि म्हणूनच मोदी यांनी एकदा नव्हे तर दोनदा फोन करून उपमुख्यमंत्री होण्यासाठी गळ घातली असावी...

अखेरीस सध्या तरी हा निर्णय मान्य करण्याशिवाय काहीही पर्याय नाही, हे ओळखून देवेंद्र यांनी उपमुख्यमंत्रीपदाची अत्यंत सुतकी चेहऱ्याने आणि खोल गेलेल्या आवाजात शपथ घेतली. देवेंद्र यांनी शिस्त, पक्षनिष्ठा आणि स्वयंसेवक वृत्तीचे दर्शन घडविल्याच्या पोष्टी जे भाजपावाले टाकत आहेत, तो निर्णय त्यांनी स्वखुषीने घेतलेला नाही, हे शपथविधीवरूनच समजते.

शपथविधी प्रकरणावरून गळलेली एक गोष्ट म्हणजे देशात, केंद्र सरकारमध्ये, आणि भाजपामध्ये अमित शहा यांचाच शब्द अंतिम आहे. नरेंद्र मोदी हे आता रिटायर्डमेंट मोडमध्ये गेले असून, अमित शहा यांच्या विरोधात जाऊन देवेंद्र यांचे समर्थन करण्यामध्ये त्यांना फारसा रस राहिलेला नाही. वास्तविक पाहता, देवेंद्र हे मोदींचे ब्लू आईड बॉय होते. मात्र, आता परिस्थिती बदलल्याचे जाणवत असून, देवेंद्र यांची नाचक्की आणि अपमान होण्यापासून वाचविण्याठी मोदींनी फार लक्ष घातले नाही, हे स्पष्ट होते आहे.

मुळात तुम्हाला उपमुख्यमंत्री करायचे होते, तर चंद्रकांतदादा पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार किंवा पंकजा मुंडे यांना करायचे. महाराष्ट्र भाजपात  देवेंद्र यांच्या तोडीचा नि लायकीचा एकही नेता नाही हे मान्य. पण उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करण्याची धमक असलेला एकही नेता नाही, हेच तुम्ही या कृतीतून दाखवून दिले. देवेंद्र यांच्यानंतरचे सर्व दादा, भाई, भाऊ आणि नेते हे आकडे फुगविण्यासाठी जमविलेली फक्त डोकी आहेत, हेच यातून सिद्ध होते.

वास्तविक देवेंद्र यांचा झालेला हा अपमान पाहता महाराष्ट्रातील नगरसेवक, आमदार, खासदार आणि लोकप्रतिनिधींनी देवेंद्र यांच्या बाजूने आवाज उठविला पाहिजे. महाराष्ट्र देवेंद्र यांच्या पाठिशी आहे, हे दाखवून द्यायला हवे. पण हे राजकारण आहे आणि भविष्यात सर्वांनाच आपल्या दुकानदाऱ्या चालू ठेवायच्या आहेत. त्यामुळे अशी रिस्क कोणी घेणार नाही. खरं तर दम असेल तर असे करता येऊ शकते. २०१४ मध्ये सुधीर मुनगंटीवार यांनी नितीन गडकरी यांच्या नावासाठी आग्रह धरत वातावरण तापवायला सुरूवात केली होती. त्यांच्यावर काही कारवाई झाली नाही. उलट पाच वर्षे त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्रिपदाची धुरा सांभाळली...

देवेंद्र यांनी पक्षादेश, नेत्यांचा आदेश शिरोधार्य मानून स्वतःमधील शिस्तबद्ध स्वयंसेवक आणि कार्यकर्त्याचे दर्शन घडविले. त्याचप्रमाणे आपल्या पुढे जाईल, या भीतीने एखाद्याचा उपमर्द, अपमान आणि खच्चीकरण करणाऱ्या नेतृत्वाच्या नीचपणाचे दर्शनही फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदावरील निवडीच्या निमित्ताने झाले.

असो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाहतो आहे. उत्तर प्रदेशात आपल्या मर्जीप्रमाणे वागू शकतील, अशा मनोज सिन्हा यांना मुख्यमंत्री करण्याचा इरादा मोदी-शहा यांचा होता. पण संघाने ऐनवेळी लक्ष घालून तिथे योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री करायला लावले आणि मनमानी चालणार नाही, हा संदेश मोदी-शहा यांच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचविला. भविष्यात अशाच पद्धतीने वाटचाल सुरू राहिली तर पुन्हा एकदा भूमिका घेऊन योग्य तो संदेश द्यायला संबंधित मागेपुढे पाहणार नाहीत, असे वाटते.

Thursday, January 07, 2016

हस्तस्य भूषणं दानं


‘सोशल’ची रक्कम ‘सोशल’साठी

राज्य सरकारतर्फे दिला जाणारा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिला पुरस्कार प्राप्त झाल्यामुळे चहुबाजूंनी माझ्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव करण्यात येत होता. अनेकांनी फोन करून, एसएमएस पाठवून नि सोशल मीडियावर बरंच काही चांगलंचुंगलं लिहून माझं कौतुक केलं. असं बरंच काही सुरू असताना एक डिसेंबर रोजी मुंबईत सह्याद्री अतिथीगृहावर प्रत्यक्ष पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह आणि एक्केचाळीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 


बाबा आणि बहीण यांना व्यासपीठावर येण्याची संधी मिळाली, ही गोष्ट मला पुरस्कारा एवढीच महत्त्वाची वाटते. अन्यथा आमचे बाबा आणि बहीण कधी मुख्यमंत्र्यांना इतक्या जवळून पाहणार. जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी यांना कार्यक्रमाला उपस्थित राहता आले, या गोष्टीच माझ्यासाठी खूप काही होत्या. पुरस्काराच्या रकमेपेक्षा या गोष्टीच मला अधिक आनंद देणाऱ्या ठरल्या. 


आता हा जो ब्लॉग लिहितो आहे, तो मी त्याच दिवसासाठी लिहून ठेवला होता. कदाचित तिथं पुरस्कारार्थींचा प्रतिनिधी म्हणून बोलण्याची संधी मिळाली, असती तर हाच ब्लॉग मी काही बदल करून भाषण स्वरुपात वाचणार होतो. पण आधीच एका पत्रकाराला मनोगत व्यक्त करण्यासाठी सांगितल्यामुळं मला तिथं बोलण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे त्यावेळी लिहिलेले भाषण थोड्या प्रमाणात फेरफार करून ब्लॉग स्वरुपात मांडत आहे.

पुरस्कार मिळाल्यानंतर ४१ हजार रुपयांचे काय करणार, असा प्रश्न अनेकांनी विचारला होता. काहींनी सल्लेही दिले होते. अर्थातच, गमतीगमतीत. वास्तविक पाहता, यंदाच्या वर्षी पुरस्कार मिळणे आणि त्याच्या अनुषंगाने काही रक्कम मिळणे ही गोष्ट किती दिलासादायक आणि महत्त्वाची आहे, हे मला ओळखणारे जाणतातच. मात्र, तरीही पहिल्यापासूनच माझा निर्णय हा मिळालेली रक्कम चांगल्या कामासाठी मदत म्हणून देण्याचाच होता.


पुरस्कारासाठी जेव्हा अर्ज केला होता, तेव्हाच मी ही गोष्ट निश्चित केली होती. यदा कदाचित पुरस्कार मिळालाच तर त्यातील काही रक्कम दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या ‘जलयुक्त शिवार’ या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सन्मानाने सुपूर्त करावयाची. पुरस्कारासाठी जेव्हा अर्ज केला, तेव्हा मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागात भीषण परिस्थिती निर्माण होणार, अशीच चिन्हे होती. मध्यंतरीच्या मराठवाड्याच्या एक-दोन जिल्ह्यात थोडा पाऊस झाला असला, तरीही परिस्थिती बदललेली नाही. अजूनही दुष्काळाची भीती आहेच. त्यामुळे अजूनही तिथे मदतीचा हात हवाच आहे.

काही गोष्टी आपसूक घडत जातात, असे म्हणतात. दररोज सकाळी व्हॉट्सअपवर ढिगाने मेसेज येत असतात. सूर्य, नवा दिवस, प्रेरणा आणि असं बरंच काही. बहुतांश मेसेज तद्दन फालतू याच कॅटॅगरीतील असतात. अनेकदा ते मेसेज न पाहताच डिलीट होतात. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर दोन-तीन दिवसांनीच व्हॉट्सअपवर अशाच स्वरुपाचा एक मेसेज आला. विशेष म्हणजे तो कशाबद्दल आहे, हे माहिती नसूनही माझ्याकडून तो मेसेज नेमका पाहिला गेला. तो मेसेज अमेरिकेतील एक ख्रिश्चन धर्मगुरु आणि लेखक मार्क बॅटरसन यांचा होता. त्या मेसेजमध्ये म्हटले होते, ‘When God Blesses you Financially, Don’t Raise your Standard of Living. Raise ur Standard of Giving.’ काही घटना परिस्थितीला पूरक अशा स्वरुपाच्या आपोआप घडतात, असं मी म्हटलं ते असं. 

दोन दिवस जात नाहीत, तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक शरदभाऊ खाडिलकर चहापानासाठी घरी आले होते. सध्या त्यांच्याकडे जनकल्याण समितीची जबाबदारी आहे. मराठवाड्यातील परिस्थिती कशी आहे, या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा सुरू होती. त्यावेळी त्यांनी काही देणगीदारांचे किस्से ऐकविले आणि चांगले-वाईट अनुभवही सांगितले. बोलण्याच्या ओघात एका संस्कृत सुभाषिताचा उल्लेख त्यांनी केला. 

हस्तस्य भूषणं दानं सत्यं कण्ठस्य भूषणम्
श्रोत्रस्य भूषणं शास्त्रं भूषणैः किं प्रयोजनम्
 
अर्थात, हाताचे भूषण हे दान आहे. सत्य हे कंठाचे आभूषण आहे. शास्त्र किंवा ज्ञान हे कानांचे भूषण आहे… अशी सर्व आभूषणे असताना मग इतर आभूषणांची गरजच काय… 

मिळालेल्या पुरस्काराचा मान ठेवण्यासाठी काही रक्कम ठेवायची आणि बाकी बहुतांश रक्कम मदत म्हणून देऊन टाकायची, हा माझा निर्णय आधीच ठरला होता. मात्र, या दोन घटनांमुळे तो अधिक पक्का झाला. मग काय फक्त निर्णयाची अंमलबजावणीच बाकी होती. 


सामाजिक कर्तव्य म्हणून आपल्याला मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेपैकी काही रक्कम ही दुष्काळग्रस्त नागरिकांसाठी देण्याचे मी ठरविले होते आणि सात जानेवारी २०१६ रोजी ती रक्कम मी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ असलेल्या जलयुक्त शिवार या योजनेसाठी मदत म्हणून देऊन टाकली. आमचे चुलत बंधू शिरीष चांदोरकर आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीषजी बापट हे यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक सुमीतजी वानखेडे यांनी केलेल्या मदतीसाठी मी त्यांचा आभारी आहे. देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री  यांचे फेसबुक पेज, ट्विटर हँडल आणि त्यांचा ई-मेल या सर्वांवर संपर्क साधूनही प्रतिसाद मिळेना. अखेर सुमीतजी वानखेडे धावून आले आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घालून दिली. त्यामुळेच त्यांचे खूप खूप आभार.

‘जलयुक्त शिवार’ या प्रकल्पाप्रमाणेच काही रक्कम मी पुण्यातील सामाजिक संस्था असलेल्या स्वरुपवर्धिनीला दिली आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतील ढोल-ताशा पथक असलेली संस्था ही स्वरुपवर्धिनीची माझ्यासाठीची अगदी पहिली ओळख. अर्थात, ती अपुरी असल्याचे नंतरच्या काळात समजले. आमचे मित्र आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमातील सहअध्यायी संजय तांबट यांच्यामुळे स्वरुपवर्धिनीच्या उपक्रमांची सविस्तर माहिती मिळत गेली आणि तेथील अपडेट्स समजत गेल्या. ज्ञानेश पुरंदरे यांच्याकडूनही नियमितपणे येणारे ई-मेलही वर्धिनीच्या नित्यनूतन उपक्रमांबद्दल माहिती देत असतात. 


स्वरुपवर्धिनी ही संस्था सेवावस्ती किंवा झोपडपट्टीमधील गरीब विद्यार्थ्यांना सुशिक्षित आणि सुसंस्कृत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून झटते आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचण येऊ नये, पैशांमुळे शिक्षण अडू नये, या हेतूने त्यांना मदत करण्याचा निर्णय मी घेतला आणि सिद्धीस नेला. स्वरुपवर्धिनीच्या सहकार्यवाह श्रीमती पुष्पाताई नडे यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्त केला. आमचे मित्र संजय विष्णू तांबट हे छायाचित्र टिपण्यात व्यस्त होते, त्यामुळे ते छायाचित्रात आले नाहीत. 



‘सोशल मीडिया’ या क्षेत्रात केलेल्या पत्रकारितेसाठी मला हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळेच त्या पुरस्काराची रक्कम ‘सोशल’ कामांसाठीच वापरले जाणे, हे अधिक योग्य आहे, असे मला वाटते. त्यामुळेच पुरस्काराची बहुतांश रक्कम या दोन्ही उपक्रमांसाठी दिली आहे.
पुरस्कार मिळाल्यानंतर ज्यांनी ज्यांनी मला आणखी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन दिले, कौतुकाचा वर्षाव केला, त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. 

Tuesday, November 24, 2015

‘सोशल मीडिया’ पुरस्काराबद्दल

आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद

राज्यात सत्ताबदल झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारचं पानिपत झालं आणि भारतीय जनता पार्टी नि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, सरकारी कर्मचारी, उद्योजक आणि इतर सर्वांसाठी नवे सरकार आल्यामुळं काय फरक पडला, बदल झाला माहिती नाही. पण एक महत्त्वपूर्ण बदल फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जाणवला. मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्री ऑनलाईन आले. त्यांची फेसबुक पेज निर्माण झाली. ट्विटर अकाउंट सुरू झाली. छोट्या-मोठ्या गोष्टींची दखल सोशल नेटवर्किंग साइटवरून घेतली जाऊ लागली. कार्यक्रमांची नि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेसबुक, ट्विटर नि व्हॉट्सअपचा उपयोग होऊ लागला. मुख्यमंत्र्यांनीही नुकतीच एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ‘ब्लॉगलेखन’ करण्याची घोषणा केली आहे. 


अशा सगळ्या सोशल पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये ‘सोशल मीडिया’साठी राज्यस्तरावर स्वतंत्र पुरस्कार जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली. म्हणजेच ऑनलाइन स्वरुपाच्या लेखनासाठी हा पुरस्कार होता. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी या माध्यमांप्रमाणेच ऑनलाईन माध्यमांनाही राज्य सरकारने मानाचे स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वप्रथम राज्य सरकारचे यासाठी अभिनंदन केले पाहिजे. जमाना बदलतोय आणि त्याचबरोबर पत्रकारिताही बदलते आहे, याची जाणीव राज्य सरकारला झाली आणि त्यांनी तसे दाखवून दिले, हे महत्त्वाचे.
सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार होता. म्हणजे फेसबुकवरील लेखन, ब्लॉग लेखन किंवा कोणत्याही वृत्तपत्राच्या वेबसाईटवर लिहिल्या जाणाऱ्या ब्लॉगलेखनासाठी. ‘सोशल मीडिया’ या नव्या माध्यमासाठी दिला जाणारा पहिला पुरस्कार मला मिळाला, तो माझ्या http://ashishchandorkar.blogspot.in/ या ब्लॉगसाठी. ‘ऑनलाईन’ अशा उल्लेखामुळे अनेकांचा उगाचच असा गैरसमज झाला, की मी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ऑनलाइन एडिशला शिफ्ट झालो की काय? अनेकांनी तशी विचारणाही केली. पण तसे नाही. मी पेपरमध्येच आहे आणि हा पुरस्कार आहे माझ्या ब्लॉगसाठी. मटा ऑनलाइनवरही माझा एक ब्लॉग आहे. पण हा पुरस्कार त्यासाठी नाही. 

http://ashishchandorkar.blogspot.in/ हा का सुरू केला, याची कहाणी खूपच मजेशीर आणि रंगतदार आहे. बुधवार, आठ नोव्हेंबर २००६ साली मी हा ब्लॉग सुरू केला. त्यावेळी मी ज्या संस्थेत होतो, तिथं कामाच्या असमान तासांमुळे खरं तर हा ब्लॉग सुरू झाला. म्हणजे काही उपसंपादकांना आठ तास ड्युटी आणि काही उपसंपादकांना सहा तास ड्युटी असा भेदाभेद होता. कंत्राटी उपसंपादक आणि परमनंट उपसंपादक असा भेद त्यावेळी होता. त्यामुळे ड्युटीमध्ये दोन तासांचा फरक होता. ‘तुम्ही ऑफिसला आठ तासच काम केले पाहिजे, पण ‘त्या’ दोन तासांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे वेगळे काम करू शकता,’ अशी सवलत तेव्हाच्या संपादकांनी दिली होती. त्यामुळे खरे आभार तेव्हाचे संपादक यमाजी बाळाजी मालकर यांचे मानायला हवेत. त्यांनी मोठ्या मनाने दिलेल्या सवलतीमुळेच  ब्लॉगलेखनाकडे वळण्याची संधी आम्हाला मिळाली. देविदास देशपांडे, विश्वनाथ गरुड, नंदकुमार वाघमारे आणि मी. आम्ही चौघांनीही ब्लॉगलेखन तेव्हाच सुरू केलं.


पण सर्वाधिक महत्त्वाचे आभार मानले पाहिजेत, आमचा दिलदार दोस्त देविदास प्रकाशराव देशपांडे याचे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, भाषेवरील प्रभुत्व, अवगत असलेल्या भाषा आणि अशा अनेक क्षेत्रांचे ज्ञान आणि माहिती त्याच्याकडे भरपूर असते. पण ते ज्ञान तो स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही. तर जवळपासच्या मित्रांना त्याबद्दल माहिती देत असतो. माहिती वाटत असतो, असंच म्हणा ना. त्यानंच मला खऱ्या अर्थानं ब्लॉगच्या विश्वात आणलं. ब्लॉग म्हणजे काय, तो कसा सुरू करायचा, त्यावर कसं लिहायचं, तो सजवायचा कसा, टेम्पेलट वगैरे वगैरे सर्व काही त्यानं सांगितलं. आजही त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि आजही तो काहीही हातचं राखून ठेवत नाही. त्यामुळं खरं तर या पुरस्कारावर माझ्याइतकाच त्याचाही अधिकार आहे. त्यामुळे त्याला खूप खूप धन्यवाद.
ब्लॉगलेखन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ‘नव्याचे नऊ’ दिवस म्हणून सगळ्यांनी त्याकडे पाहिलं. मी इतकी वर्षे ब्लॉग लिहित राहीन, असं मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं. पण अनेकदा पेपरात किंवा काम करीत असलेल्या माध्यमात तुम्हाला जे मांडायचं आहे, ते मांडणं शक्य नसतं. ते तुम्ही ब्लॉगवर मांडू शकता. काही गोष्टी संबंधित कंपनीच्या धोरणाविरुद्ध असतात, विचारांविरुद्ध असतात, समूहाच्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक असतात किंवा ते वाचकांना आवडतीलच अशी खात्री नसते. असं सर्व लिखाण तुम्ही तुमच्या ब्लॉगवर करू शकता. वैयक्तिक आलेले अनुभव, वेगवेगळ्या घटनांवरची तुमची मतं असं काहीही तुम्ही ब्लॉगवर शेअर करू शकता. शिवाय या अमक्या विषयावर लिहायचं नाही, तमक्या विषयावर लिहिता येणार नाही, असला भानगड नाही. शिवाय कोणीही तुमचा ब्लॉग हटवू शकत नाही. यामुळे आज जवळपास नऊ वर्षे मी ब्लॉग लिहितो आहे आणि अजून तरी मला ब्लॉगवर लेखनाचा कंटाळा आलेला नाही. 

जवळपास सव्वा दोनशे ब्लॉग आतापर्यंत लिहिले असून दीड लाखांहून अधिक जणांनी हा ब्लॉग वाचलेला आहे. पण मला वाटतं की ब्लॉग संख्या किंवा वाचक संख्या यापेक्षाही ब्लॉगवर लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणारा आनंद आणि वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सुदैवाने दोन्ही गोष्टींबाबत मला प्रचंड समाधान आहे.


राजकारण, क्रीडा आणि अर्थातच, हिंडणं नि खाणंपिणं या गोष्टी आपल्या सर्वाधिक आवडीच्या. त्या संदर्भातील लिखाण ब्लॉगवर सर्वाधिक आहे. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रात छापून येणारे लेख अधिक सविस्तरपणे ब्लॉगवर येत होते. मात्र, तो ट्रेंड लवकरच बदलला. ‘साम मराठी’त गेल्यानंतर पेपरातलं लेखन थांबलंच. मग ब्लॉग लिहिण्याची फ्रिक्वेन्सी वाढली. त्यातून दोनवेळा निवडणुकीच्यानिमित्तानं महाराष्ट्रभर फिरता आलं. त्यातील अनुभव ब्लॉगवर टाकले. गुवाहाटी आणि केरळमधीलराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भातील अनुभव ब्लॉगवर आहेत. तीनवेळा गुजरातमध्ये जाणं झालं. पहिल्यांदा ‘केसरी’साठी अभयजी कुलकर्णी यांच्यासोबत गेलो होतो. मात्र, नंतर दोनदागेलो, ते फक्त आणि फक्त ब्लॉगवर लिहिण्यासाठी. महाराष्ट्र टाइम्सकडून तमिळनाडूमधीलविधानसभा निवडणूक कव्हर करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणचे अनुभव व्यक्त करणारे ब्लॉगलिहिले. काही स्वतंत्रपणे आणि काही पेपरातील बातम्यांचे एक्स्टेंशन.


गेल्या वर्षी उत्तरप्रदेशात लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो. तिथे आलेले अनुभव ब्लॉगवर मांडले. त्याला तर भन्नाट प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशबद्दल असलेले माझ्या मनातले समज गैरसमज या दौऱ्यामुळे बऱ्याच प्रमाणात दूर झाले. प्रत्यक्षात नेमके काय घडले, याचा ‘फर्स्ट हँड’ अनुभव घेता आला. लखनऊ, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, अयोध्या, सुलतानपूर, वाराणसीआणि आझमगड अशा विविध शहरांमध्ये जाऊन मनसोक्तफिरलो. अयोध्येला जाऊन ‘रामलल्ला’चं दर्शन घेतलं. सगळीकडे सामान्यातल्या सामान्याशी बोललो. तिथली अवस्था प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. नुसतं फिरून उपयोग काय? ते लोकांपर्यंत पोहोचलं तर पाहिजे. म्हणून मग आलेले अनुभव आणि तिथली परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचविली. उत्तर प्रदेशातील ब्लॉगला तर प्रचंड म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिथं जाण्याचं सार्थक झालं, असंच मला वाटलं. 


‘सोशल मीडिया’साठीचा पुरस्कार २०१४ मध्ये केलेल्या लेखनासाठी होता. योगायोगानं मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उत्तर प्रदेशात गेलोच होतो. तिथं आलेल्या भन्नाट अनुभवांचे ब्लॉग्ज मी स्पर्धेसाठी पाठविले होते. त्यापैकी ऐकूलाल या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आदर्श उदाहरण असलेल्या चहाविक्रेत्याचीघेतलेली भेट, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेशकुमारजी यांच्यासमवेत ‘एक दिवस’ आणि उत्तर प्रदेशातील एकूण अनुभव, सामाजिक-राजकीय परिस्थिती, तिथले लोक, त्यांची दुःख मांडणारा‘उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश’ असे तीन ब्लॉग स्पर्धेसाठी पाठविले होते. उर्वरित सर्व ब्लॉगची यादी आणि ते प्रसिद्ध केले तेव्हाची तारीख, ठिकाण वगैरे माहिती सोबत जोडली होती. अशा पद्धतीने तयार केलेल्या माझ्या प्रवेशिकेला (किंवा अर्जाला) सोशल मीडियाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. हा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिलाच पुरस्कार आहे. याचा आनंद अधिकच आहे. तेव्हा सर्व परीक्षकांचेही जाहीर हार्दिक आभार. 


‘आई’ गेली तेव्हा खूप काही लिहावसं वाटत होतं. पण इतक्या सविस्तरपणे कुठंही छापून येणं अवघड होतं. कारण मी कोणी मोठा नाही आणि माझी आईपण खूप प्रसिद्ध नव्हती. पण माझ्यासाठी ती सर्व काही होती. अशा वेळी मला ब्लॉगचा आधार होता. म्हणून आईवर ब्लॉग लिहिला. ‘आई्’ एक व्यक्ती नाही तर संस्था आहे. ती कुणाचीही असो, त्यानं फारसा फरक पडत नाही. आई या व्यक्तिमत्त्वात असलेले गुण हे बहुतांश प्रमाणात समानच असतात. त्यामुळे कोणीही आपल्या आईवर लेख लिहिला असता, तरी तो थोड्याबहुत प्रमाणात सारखाच होण्याची शक्यता अधिक. कदाचित यामुळेच आई गेल्यानंतर लिहिलेला ब्लॉग बऱ्याच लोकांना आवडला. अनेकांनी तसं सांगितलं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग उत्तम आहे,’ असं यमाजी मालकरसाहेब आणि संजय राऊतसाहेब यांनीही आवर्जून सांगितलं होतं. कोणता संपादक इतक्या खुल्या मनानं ज्युनिअर लोकांचं कौतुक करतो. अपवाद असतील. आहेतही. पण खूपच कमी. ‘शौकिन’ या पुण्यातील पानविक्रेत्याच्या दुकानाबाहेर एक जण भेटला. ‘तुम्ही आशिष चांदोरकर का?’ असं त्यानं विचारलं. मी त्याला ओळखत नव्हतो आणि नावही ओळखीचं नव्हतं. पण त्यानं मला ओळखलं होतं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग वाचला. खूप आवडला. डोळ्यातून पाणी आलं…’ कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, अशी ही घटना. असे असंख्य वाचक ब्लॉगला मिळत गेले. काही जण कायमचे वाचक झाले. काही जण आवडीनुसार अधूनमधून भेटणारे वाचक ठरले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे की ऋणातच राहणे पसंत करायचे, हा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. पण अशा वाचकांमुळेच पुन्हा पुन्हा लिहिण्याची उमेद निर्माण झाली. त्यामुळे त्यांना धन्यवाद आहेतच.

सुरुवातीच्या काळात अनेकदा हा काय ब्लॉग तर लिहितो, कोण वाचतो हे ब्लॉग वगैरे सूरही उमटले. ‘तुम्ही मंडळी खूप लिहिता बुवा…’ असा नापसंतीचा सूरही उमटला. खरंतर अशा प्रतिक्रियाच ब्लॉग लेखन अधिक जोमाने करण्यासाठी उर्मी निर्माण करीत होत्या. त्यामुळे अशा एकदम पुणेरी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांचेही आभार. पुढे पुढे तर ब्लॉग लेखनाचं व्यसन लागलं, असंच म्हणा ना. अगदी छोटे अनुभवही लिहिले. रस्त्यावरच्या एका फुगेविक्रेत्याला कॅडबरी दिल्याचा अनुभवअनेकांना आवडला. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला तेव्हा संभाजी ब्रिगेडला आणि बाबासाहेबपुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला विरोध करणाऱ्यांना धू धू धुणारा ब्लॉग लिहिला. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. ब्राह्मण महासंघाला फटकाविणारा लेख लिहिला. राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही खूप काही लिहिलं. शिवसेना-भाजप युती टिकावी, अशी मांडणी करणारा ब्लॉग लिहिला. युती तुटल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर ‘नाही, नाही, नाही म्हणजे हो’ असा ब्लॉग हाणला. पुण्यातले आमचे सर विकास मठकरी यांच्याबद्दल लिहिलं. अमित जोशीला झालेल्या मारहाणीनंतर लिहिलं. चित्रपटांबद्दल, विशेषतः दाक्षिणात्या चित्रपटांबद्दल लिहिलं. 


‘चार्ली हेब्दो’वरझालेल्या हल्ल्यानंतर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये माझी भूमिका जगाच्या विपरित होती. त्यावरलोकांनी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करून मला धुवून काढलंय. पण पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केलेली भूमिका आणि मी लिहिलेला ब्लॉग यामध्ये साम्य होतं. पोप यांची प्रतिक्रिया वाचल्यानंतर लोकांनी मला धुतलं त्याचं विशेष काही वाटलं नाही. ‘भाजीवाल्याचा झाला वडा’ अशा शीर्षकाखाली सहा-सात ब्लॉग लिहिले. कोणाशीही दुरान्वये संबंध नसूनही काही जणांना तो आपल्याबद्दलच लिहिला आहे की काय, असे वाटू लागले. त्यांचा त्या ब्लॉग्जचा प्रचंड राग आला, याचाच अर्थ ते सत्य होतं. सत्य कटू असतं हेच खरं. मात्र, त्यांच्या विनंतीचा मान राखला जावा आणि उगाच कटकटी वाढू नये, यासाठी ते ब्लॉग्ज ड्राफ्ट केले. लोकमान्यटिळक यांच्या नावाने पत्रकारितेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना मिळालाय, त्या मुजफ्फरहुसेन यांना भेटल्यानंतर त्यांच्यावरही ब्लॉग लिहिलाय.  
थोडक्यात काय तर जे जे वाटलं ते ते लिहिलं. जसं वाटलं तसं लिहिलं. खाण्यापिण्यासबाबत आणि फिरण्यासंदर्भात लेखनासाठी वर्डप्रेसवर स्वादिष्ट या नावाने स्वतंत्र ब्लॉग सुरू केलाय. त्यावरही चार-पाच ब्लॉग लिहून झालेत. अजून पुष्कळ लिहायचेत. लवकरच तेही लिहून होतील. 

‘ब्लॉग’ला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार डॉ. अनिल फळे यांच्या संस्थेतर्फे दिला जाणारा चौथा स्तंभ पुरस्कार होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मिळाला होता. नंतरचे दोन उ्त्तेजनार्थ पुरस्कार ‘स्टार माझा’ आणि ‘एबीपी माझा’ चॅनेलतर्फे मिळाले होते. आणि हा चौथा म्हणजे राज्य सरकारचा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी स्वतःहून फेसबुकवर माझ्याबद्दल बरंच काही लिहिलं. बऱ्याच जणांनी व्हॉट्सअप, फेसबुक, एसएमएस आणि फोन करून अभिनंदन केलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे हार्दिक आभार. मनःपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर आणि मटातील माझा सहकारी मित्र धनंजय जाधव यांचेही या निमित्ताने मला आभार मानायचे आहेत. माझा बालपणीपासूनचा मित्र आणि भाजपचा पुणे शहर सरचिटणीस धीरज घाटे यानं प्रदीप कोल्हटकरच्या हस्ते केलेला सत्कार तर जबरदस्तच. खरं तर सत्काराआधीचा सत्कारलहानपणापासून ज्यांच्यासोबत वाढलो आणि शिकलो, त्यांच्याकडून होणारं कौतुक, मिळणाऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. आमचे बंधू शिरीष चांदोरकर यांनी पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदम बढिया बासुंदी करून शुभेच्छा दिल्या. त्याच्यासारखी बासुंदी आलम दुनियेत क्वचितच कुणाला जमत असेल, हा आपला दावाय. इतकं सारं कौतुक होतंय, त्यामुळं खूपच भन्नाट वाटतंय.

जे मला चांगलं ओळखतात, त्यांनी माझ्या मनातली सल बरोबर ओळखली. ‘आज आई हवी होती…’ ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये खूप वर्षांपूर्वी आईवर एक अग्रलेख लिहिला होता. त्यात एक वाक्य खूप छान होतं. ‘एखादी वाईट गोष्ट करताना आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो, की आईला काय वाटेल आणि एखादी चांगली गोष्ट घडली, तर असं वाटतं, की कधी एकदा आईला सांगतोय.’ खूपच मस्त वाक्यय हे. आज आई नाही, पण ती असती तर तिला खूपच आनंद झाला असता. अर्थात, बाबांना आनंद आहेच. त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार मिळाला होता. मलाही मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पुरस्कार मिळणार असल्यानं त्यांना अधिक बरं वाटतंय.

माझ्यावर, माझ्या लेखनावर, ब्लॉगवर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांचे पुन्हा एकदा शतशः धन्यवाद…