Showing posts with label Kerala. Show all posts
Showing posts with label Kerala. Show all posts

Wednesday, May 31, 2017

हरविलेल्या मोबाईलची लघुकथा…



प्रामाणिकपणाला तंत्रज्ञान आणि तत्परता यांची जोड मिळाली, तर काय घडू शकतं, याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच आला. केरळमधील एका माणसाचा मोबाईल मुंबईमध्ये हरविला आणि तो उत्तर प्रदेश किंवा बिहारहून आलेल्या व्यक्तीला सापडला. त्याने पुण्यात फोन करून संबंधित केरळी माणसाला संपर्क करण्याची विनंती केली. भाषेच्या अडचणीवर मात करून पुण्यातून केरळमध्ये संपर्क साधला गेला आणि संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचण्यात आले. अखेर तीन-चार तासांच्या सव्यापसव्यानंतर हरविलेला मोबाईल मुंबईमध्येच संबंधित व्यक्तीला पुन्हा मिळाला... त्याची ही कहाणी…

काही वर्षांपूर्वी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान हत्ती गणपती मंडळाने केरळमधील ‘पंचवाद्य’ वाजविणाऱ्या कलाकारांचा समावेश केला होता. त्यावेळी त्या ‘पंचवाद्य’ पथकाचा प्रमुख राजीव याच्याशी अगदी त्रोटक बोलणे झाले होते. तेव्हा त्याचा मोबाईल सेव्ह करून ठेवला होता आणि त्याने माझा. भविष्यात आमचा कधी संपर्क होईल, असे वाटलेही नव्हते. तीन वेळा केरळमध्ये गेलो, असलो तरीही कोट्टायमला निवांत जाणे झाले नव्हते. त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नव्हती. राजीव कोट्टायममध्ये रहायला आहे.


मंगळवारी अचानक दूरध्वनी वाजला आणि ‘राजीव कोट्टायम’ असे नाव झळकले. मलाही आश्चर्य वाटले, या बाबाजीला माझी आता आठवण का झाली, अशा विचारानं फोन उचलला. समोरचा माणूस हिंदीतून बोलत होता. त्यानं हिंदीतून विचारला, हा फोन कोणाचाय? म्हटलं, राजीव म्हणून माझ्या ओळखीचे आहेत कोट्टायचमचे. त्यांचा आहे. 

समोरची व्यक्ती बोईसर येथून बोलत होती. रिक्षाचालक होता. प्रवेशसिंग उर्फ टायगर. त्याला राजीवचा मोबाईल मिळाला होता. तो बंद होता. त्यामुळे टायगरने स्वतःच्या मोबाईलमध्ये राजीवचे सीमकार्ड टाकून मला फोन केला. राजीवच्या कार्डावर यानं वीस-तीस रुपयांचं रिचार्जही मारलं होतं. ‘तुमच्याकडे या माणसाचा दुसरा नंबर असेल, तर त्यांना फोन करून सांगा. मोबाईल माझ्याकडे आहे. मला तो नको आहे. त्यांचा मोबाईल घेऊन मी काय करू. चांगला महागातला वाटतो. एलजी कंपनीचा आहे. १२-१५ हजारचा नक्की असेल. त्यांना माझ्या नंबरवर किंवा स्वतःच्याच नंबरवर फोन करायला सांगा, मी बोलतो त्यांच्याशी…’ असं सांगून टायगरनं बॉल (खरं तर मोबाईल) माझ्या कोर्टात टाकला. 

‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ पाहत असल्याने, आधी जरा धाकधूकच वाटत होती. राजीवचा फोन या रिक्षावाल्याकडे बोईसरला कसा आला, राजीवला काय झाले आणि असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. आता मी काय करणार होतो. पण त्याच्या मोबाईलमध्ये आशिष नावाने माझा नंबर सेव्ह असेल. त्यामुळे तो पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असावा, म्हणून मला रिक्षाचालकाने फोन केला. आधी एक-दोन जणांना फोन करून झाले होते. मात्र, ते सर्व मल्याळममध्ये बोलत होते. त्यामुळे टायगरला काही करता आले नसावे. त्याच्याशी हिंदीत बोलणारा मी पहिलाच असल्याने जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. 

  ज्याचा चेहरा दिसतोय, तो राजीव...

काय करायचे, हा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण माझ्याकडे राजीवचा दुसरा क्रमांकही नव्हता. कोट्टायममध्ये माझा कोणताही रिपोर्टर मित्र किंवा ओळखीची व्यक्ती राहत नाही. मग राजीवच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचायचं कसं, असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. फेसबुकवर कोट्टायम राजीव वगैरे सर्च मारून काहीच हाती लागेना. शेवटी राजीवचा नंबर गुगलवर टाकला आणि शोधलं. पहिल्या पानावर तळाशी एक ब्लॉग सापडला. राजीव ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या कॉलनीच्या सदस्यांची सर्व माहिती त्यावर दिली होती. कोट्टायमममधील ‘वड्डकेनाडा रेसिडन्ट्स वेल्फेअर असोसिएशऩ’ असं त्याच्या सोसायटीचं नाव. त्या सोसायटीमधील सर्व जणांची नावे असलेला ब्लॉग सापडला आणि थोडंसं हुश्श वाटलं. त्या सोसायटीमध्ये त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या दोन-चार जणांना फोन लावला. पण त्यांना हिंदी आणि इंग्रजी काही समजेना. ब्लॉगवरील माहितीनुसार काही जण ज्येष्ठ नागरिक होते, काही जण रोजंदारीवर काम करणारी मंडळी होती. एक वकील मिळाला. त्यांना फोन लावला, तर ते खूप बिझी होते. म्हणून त्यांनी बोलणं टाळलं. 


अखेरीस त्या सोसायटीत राहणाऱ्या बिजू नायर या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला. ते चिंगवनम पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आता गोची अशी, की त्यांना हिंदी आणि इंग्रजी समजेना आणि मला मल्याळम येईना. त्यांच्या सहकाऱ्याशी बोललो. पण त्यालाही हिंदी नीट समजत नव्हते. मी त्यांना का फोन केला आहे, हे त्यांना समजत नव्हते आणि मला त्यांना सांगता येत नव्हते. त्यांना वाटलं, की मी चुकून त्यांना फोन लावलाय. त्यामुळं दोन-तीनदा राँग नंबर वगैरेही म्हणून झालं. अखेरीस एक कल्पना सुचली. 


आमच्या ऑफिसमध्ये KTजयरामन नावाचे एक गृहस्थ अॅडमिनमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मी त्यांच्याकडे गेलो. सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्याशी चर्चा करण्याची विनंती केली. पुन्हा त्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला आणि संवाद साधण्यासाठी जयरामन यांच्याकडे फोन दिला. दरम्यान, बिजू नायर यांनी तो फोन त्यांचे सहकारी अनीश यांच्याकडे दिला. पुढची पाच-दहा मिनिटे तो पोलिस अधिकारी आणि जयरामन यांच्यामध्ये मल्याळममधून संवाद साधला जात होता. नेमका गोंधळ काय झाला आहे, हे एव्हाना त्या पोलिस अधिकाऱ्याच्या लक्षात आले होते. सर्व पार्श्वभूमी आणि आम्हाला काय हवे आहे, हे समजल्यानंतर दोघांमधील संवाद यशस्वीपणे पूर्ण झाला. 
 

त्या पोलिस अधिकाऱ्याने तत्परतेने कुठल्या तरी कर्मचाऱ्याला त्या सोसायटीमध्ये राजीव यांच्या घरी धाडले असावे आणि माहिती दिली असावी. कारण दहाच मिनिटांनी मला राजीव यांच्या पत्नी इंदू यांचा दूरध्वनी आला. मुख्य म्हणजे त्यांना हिंदी व्यवस्थित नाही, पण समजण्याइतपत येत होते. त्यांचे पती म्हणजे राजीव हे मुंबईत ‘पंचवाद्य’ वाजविण्यासाठी दोन दिवसांसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा दूरध्वनी हरवला होता. तसे त्यांनी पत्नीला सांगितलेही होते. मोबाईल ज्या रिक्षाचालकाकडे आहे, त्याचा नंबर मी राजीव यांच्या पत्नीला दिला. त्या रिक्षाचालकाच्या नंबरवर किंवा राजीव यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून रिक्षाचालकाशी बोलून घ्यायला सांगितले. हिंदीतून बोला, हे सांगण्याची गरज भासली नाही. 

इंदू आणि टायगर यांचे बोलणे झाले असावे, कारण रात्रीच्या सुमारास मला इंदू यांचा फोन आला आणि मोबाईल माझ्या मिस्टरांनी कलेक्ट केला, असे त्यांनी सांगितले. तेव्हा ‘साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ झाल्याचा आनंद मिळाला.

Sunday, February 21, 2016

मुंडू, वेष्टीच्या गोष्टी


लुंगी नव्हे धोती...

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूत गेलो होतो. मदुराईत गेल्यानंतर सुप्रसिद्ध मिनाक्षी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तंजावूर ते मदुराई बस प्रवासात दोस्त झालेला एन. बी. दीपक हा देखील माझ्याबरोबर होता. मंदिरात जात असताना एक बोर्ड वाचला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो बोर्ड होता, ‘LUNGIES NOT ALLOWED’. तमिळनाडूतील मंदिरांमध्ये लुंगी नेसणाऱ्या मंडळींना परवानगी नाही, तर मग कोणाला? लोक नेमकं नेसून तरी काय जातात मग मंदिरात? आपल्या प्रवेश मिळणार काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मी दीपकवर केली. माझा नेमका काय गोंधळ झालाय हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं सविस्तर खुलासा केला.



दाक्षिणात्य मंडळींबद्दल आपले जे काही समज-गैरसमज असतात, त्यापैकीच तो एक होता, असं नंतर माझ्या लक्षात आलं. दक्षिणेकडील चारही राज्यांमध्ये पुरुष मंडळी कमरेला जे वस्त्र गुंडाळतात, ते म्हणजे लुंगी, असं आपल्याला वाटतं. मात्र, तसं अजिबात नाही. लुंगी म्हणजे चित्रविचित्र रंगांमध्ये असलेले, ठिपक्या ठिपक्यांपासून ते प्राण्या-पक्ष्यांपर्यंत कशाचेही डिझाइन छापलेले, चेक्समध्ये उपलब्ध असलेले वस्त्र म्हणजे लुंगी. दोन्हीत काही ठिकाणी आढळणारा आणखी एक फरक म्हणजे लुंगी गोलाकार असते. त्याला मोकळी बाजू नसते. तर धोतीच्या दोन्ही बाजू मोकळ्या असतात. तशा पद्धतीची लुंगी नेसून मंदिरात जायला मनाई आहे, असं दीपकनं मला समजावून सांगितलं.

लुंगी नव्हे धोती
मग माझा पुढचा प्रश्न होता, की पांढरी लुंगी असते त्याला काय म्हणतात? तमिळनाडूत त्याला धोती किंवा ‘वेष्टी’ म्हणतात, असं त्यानं सांगितलं. धोती मी समजू शकत होतो. पण वेष्टी म्हणजे काय? या प्रश्नावर त्यानं दिलेलं उत्तर भारी होतं. ‘मला माहिती नाही. बहुधा ‘वेस्ट’ला (कमरेला) गुंडाळतात, म्हणून ‘वेष्टी’ असेल,’ असं एकदम भारी उत्तर त्यानं मला दिलं. अर्थातच, ते चुकीचं होतं. तमिळमध्ये ‘वेट्टी’ म्हणजे कापलेले कापड. त्याचा अपभ्रंश होत होत ‘वेष्टी’ हा शब्द आला, असे काही जण सांगतात. तर काहींच्या मते संस्कृत शब्द ‘वेष्टन’ (कव्हर) या शब्दावरून आला असावा. हे झालं तमिळनाडूचं. केरळमध्ये त्याला मुंडू म्हणतात. काही जण केरला धोती म्हणूनही त्याचा उल्लेख करतात. आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये पंचा म्हणतात. तर कर्नाटकात लुंगीच म्हणतात. कन्नड भाषेतही लुंगीसाठी वेगळा शब्द नाही.


लुंगी म्हणजे घरात नेसायची किंवा बाजारहाटाला जाताना नेसायचे वस्त्र. धोतीच्या तुलनेत लुंगीला प्रतिष्ठा कमी. देवाच्या दरबारी तर लुंगी हद्दपारच. पांढरी शुभ्र, क्रीम कलरची किंवा क्वचित प्रसंगी भगव्या रंगाची (कावी मुंडू) स्वच्छ धुतलेली धोतीच मंदिरामध्ये जाताना हवी. त्यातही काही अपवाद आहेतच. केरळमधील मंदिरांमध्ये अय्यप्पा भक्तांना फक्त काळे मुंडूच नेसावे लागते. इतर रंगांचे मुंडू चालत नाही. पण त्याच काळ्या धोतीला तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील अनेक मंदिरांमध्ये स्थान नाही. तिथं शुभ्र पांढऱ्या किंवा फिकट क्रीम रंगाची धोतीच हवी. कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये जर गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर जरीच्या काठांचे रेशमी धोतीच आवश्यक असते. काही मंदिरांत फक्त धोतीच नाही, तर खांद्यावर उपरणे घेऊनच प्रवेश करावा लागतो.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मजूर किंवा कष्टकरी वर्ग हे रंगीबेरंगी प्रकारातील लुंगी परिधान करतात. अनेकदा त्याचे रंग भडकच असतात. त्याचे कारणही अगदी योग्य आहे. कष्टाची कामे करताना लुंगीचा रंग जितका मळखाऊ असेल किंवा भडक असेल, तितके ते उत्तम असते. त्यामुळेच कष्टकरी मंडळी भडक रंगाची लुंगी परिधान करून कष्टाची कामे करताना दिसतात. आंध्र प्रदेशात रायलसीमा किंवा किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचे पंचे (धोती) परिधान करणारी मंडळी ही प्रामुख्याने देशमुख किंवा पाटील समाजाची किंवा गावातील प्रतिष्ठीत मंडळी असतात.

नेसण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य 
अनेक जण प्युअर कॉटनची धोती नेसणे पसंत करतात. मुख्य म्हणजे कॉटनची धोती असेल तर बहुतेक मंडळी पट्टा बांधत नाहीत. मात्र, धोती टेरिकॉटची असेल तर मात्र, आवर्जून पट्टा बांधावा लागतो. मुंडू बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. निऱ्या करून ते अशा विशिष्ट पद्धतीने खोचतात, की काहीही झालं तरी ते सुटत नाही. ते कमरेवर एकदम फिट्ट बसते. तमिळनाडूमध्येही काहीशा अशाच पद्धतीने वेष्टी नेसतात.


मुंडू किंवा वेष्टी नेसण्याची प्रत्येक ठिकाणाची पद्धती वेगवेगळी आहे. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मंडळी मुंडू नेसताना त्याची मोकळी बाजू (ज्याला मल्याळममध्ये कडा म्हणतात) उजवीकडे येईल अशा पद्धतीने नेसतात. केरळमधील मलबार प्रांतातील मुस्लिम मंडळी बरोबर उलट्या पद्धतीने म्हणजे मोकळी बाजू डावीकडे येईल, अशा पद्धतीने मुंडू परिधान करतात. तमिळनाडूतील अय्यंगार ब्राह्मण मंडळी अशाच पद्धतीने उजवीकडून डावीकडे (मोकळी बाजू डावीकडे) वेष्टी परिधान करतात. तर तमिळनाडूत उर्वरित बहुतांश मंडळींच्या धोतीची कडा उजवीकडेच येते. आंध्र प्रदेशात किंवा कर्नाटकात मात्र, विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी विशिष्ट पद्धतीनेच पंचे वा लुंगी परिधान केली पाहिजे, असे संकेत नाहीत. ही मंडळी सर्वसाधारणपणे मोकळी बाजू उजवीकडे येईल, अशाच पद्धतीने वस्त्र नेसतात.

मुंडू नेसण्याच्या या पद्धतीची मला ओळख झाली ती केरळमध्ये. एका लग्नाच्या निमित्ताने मी केरळमध्ये गेलो होतो. लग्नाच्या वेळी खास केरळी पद्धतीने पेहराव करावा, या हेतूने मी ‘कासाव मुंडू’ही सोबत नेले होते. ते मी माझ्या पद्धतीने नेसून तयार झालो होतो. त्यावेळी नव्यानेच मित्र झालेला अश्रफ थैवलप्पू हा मदतीला धावून आला. मी नेसलोले मुंडू हे एकदम चुकीचे आहे, असे सांगून त्याने मला योग्य पद्धतीने मुंडू नेसण्यास शिकविले. त्यावेळी त्याचा पहिला प्रश्न मला होता, की तू हिंदू ना? ‘मी म्हटलं हो. पण त्याचा इथे काय संबंध?’. त्यावेळी त्यानं मला हिंदू आणि मुस्लिम मंडळींच्या मुंडू नेसण्यातील पद्धतीमधील फरक समजावून सांगितला.

सिंगल की डबल… 
धोतीमध्ये सिंगल आणि डबल अशा दोन प्रकार उपलब्ध आहेत. साधारणपणे सिंगल म्हणजे दोन ते अडीच मीटर तर डबल म्हणजे चार मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंद अशा पद्धतीने मोजणी होते. सिंगल धोतीचे धागे अधिक घट्ट पद्धतीने विणलेले असतात. शिवाय ते धागे अधिक जड असतात. अशा पद्धतीने ही रचना करण्याचे कारण म्हणजे सिंगल असली तरीही ती धोती पारदर्शक असत नाही. हे शक्य होते धाग्यांच्या दाटपणामुळे. तुलनेने दुहेरी धोतीचे धागे हे पातळ आणि सुटसुटीतपणे विणलेले असतात. दोन्ही धोतींच्या धाग्यांमध्ये इतका फरक असतो, की सिंगल धोती ही डबलच्या तुलनेच अधिक जड असते. बहुतांश मंडळीही कॉटनचीच धोती परिधान करतात कारण त्यामध्ये लोकांना अधिक कम्फर्टेबल वाटते.

काठांच्या दुनियेत…
दक्षिणेतील चारही राज्यांच्या तुलनेत केरळमधील मुंडूचे काठ हे खूप कमी रुंद असतात आणि त्या काठांचा रंगही अगदी फिकट असतो. त्यात भडकपणा अजिबात नसतो. सण, समारंभ किंवा देवळातील विशिष्ट पूजेच्या प्रसंगी सोनेरी रंगाच्या काठाचे मुंडू नेसण्याची पद्धती आहे. केरळमध्ये त्याला ‘कासाव मुंडू’ म्हणतात. हे मुंडू पांढऱ्या रंगाचे किंवा क्रिम कलरचेच असते. केरळच्या तुलनेत तमिळनाडूमध्ये काठ थोडेसे अधिक रुंद असतात. तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश (आता तेलंगणही) येथील धोतीचे काठ खूपच रुंद असल्याचे आढळते. तसेच केरळच्या तुलनेत उर्वरित राज्यांमधील काठांचे रंग हे खूपच भडक असतात, असे निरीक्षण तज्ज्ञ मंडळी नोंदवितात. लाल, केशरी, निळे, तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाच्या काठांमध्ये जरीची नक्षी अशा पद्धतीच्या धोती सर्रास नेसल्या जातात. 


तमिळनाडूमध्ये ‘पॉलिटिकल पार्टी धोती’ असा वेगळाच प्रकार आढळतो. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या धोतीचे काढ हे राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंगांप्रमाणे असतात. म्हणजे द्रमुकचे नेते किंवा कार्यकर्ते काळ्या आणि लाल अशा दोन रंगांचे काठ असलेली धोती परिधान करतात. तर अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांसाठी तयार केलेल्या धोतीमध्ये काळ्या आणि लाल रंगाप्रमाणेच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याचाही समावेश असतो. अशाच पद्धतीने इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंग धोतीच्या काठांवर उतरलेले असतात.

फॅशनच्या दुनियेत…
बदलत्या काळानुसार धोतीमध्ये आवश्यक अशा अॅडिशन्स होऊ लागल्या आहेत. म्हणजे वस्त्र परिधान केल्यानंतर बरोबर उजव्या किंवा डाव्या हाताला एक खिसा येईल अशा पद्धतीने मुंडूची रचना केलेली असते. अर्थात, इतकी वर्षे लोकांना खिसा नसतानाही पैसे आणि इतर आवश्यक गोष्टी कशा ठेवायच्या याची सवय झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खिसा असलेले मुंडू विशेष लोकप्रिय ठरत नसल्याचीही स्पष्ट झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धोती अचानक सुटू नये, यासाठी लोक खबरदारी घेतातच. प्रसंगी बेल्टही बांधतात. यावर उपाय म्हणून आता खास ‘वेलक्रो धोती’ बाजारात उपलब्ध आहेत.


काय आहेत एटिकेट्स…
धोती परिधान केल्यानंतर ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी, वयाने ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादी महिला समोर असेल तर धोती गुडघ्यापर्यंत वर घेऊ नये, असा संकेत आहे. आणि अर्थातच, तो पाळला जातो. मग ते गुडघ्यापर्यंत वर कधी घ्यायचं? तर भराभर चालायचं असेल, पाऊस पडत असेल आणि रस्त्यात पाणी साचलं असेल, तर ते वर घेतलं जातं. शिवाय एखाद्याला दम द्यायचा असेल किंवा तावातावानं भांडायचं असेल, तर आपोआपच गुडघ्यापर्यंत वर घेतलं जातं. शिवाय मंदिरामध्ये दर्शनाला जाताना किंवा सण-समारंभ असेल, लग्नासारखा प्रसंग असेल, तर ते गुडघ्यापर्यंत वर घेणे टाळणेच इष्ट.

धोतीचे महत्त्व…
मध्यंतरी चेन्नईमध्ये एका खासगी क्लबने धोती परिधान केलेल्या मंडळींना क्लबमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा फतवा काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने तमिळनाडू सरकारने अशा पद्धतीने बंदी घालण्यास मनाई करणारा कायदाच करून टाकला. वेष्टी ही तमिळनाडूच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. त्यावर घाला घालाल, तर तुमचे सर्व सवलती बंद करू आणि विशेषाधिकार काढून टाकू, अशी तंबीही कायद्याद्वारे देण्यात आली होती. तमिळनाडूत तर काही दूरचित्रवाहिन्यांवर चर्चेसाठी येणारे पाहुणे आणि बातम्या देणारे पुरुष न्यूज अँकर्स यांना ‘वेष्टी’ हा ड्रेसकोड आवश्यक आहे. ‘पट्टली मक्कल कच्ची’च्या ‘पुथिया तमिळगम’ या वाहिनीचे पुरुष अँकर्स हे आधी सुटाबुटात बातम्या देत असत. ‘पीएमके’चे पक्षाध्यक्ष डॉ. एस. रामदॉस यांनी पाश्चिमात्य ड्रेसकोड बदलून त्यांना वेष्टी नेसूनच बातम्या देणे बंधनकारक केले.


(प्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी २१ फेब्रुवारी २०१६)