Showing posts with label Pune BJP. Show all posts
Showing posts with label Pune BJP. Show all posts

Thursday, July 09, 2015

सर भेटले, जुने दिवस आठवले

नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी...


नोव्हेंबर १९९५… भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्याच दोन-तीन दिवसांमध्ये एका संध्याकाळी एस. पी. कॉलेजवर भाजपच्या नेत्यांची एकत्रित जाहीर सभा होती. अटलबिहारी वाजपेयी नि लालकृष्ण अडवाणी यांना एकत्र ऐकण्याची संधी तशी दुर्मिळच. तीही पुण्यात. तेव्हा आवर्जून त्या सभेला उपस्थित होतो. शिवाय सुषमा स्वराज, प्रमोद महाजन आणि भाजपची अनेक ज्येष्ठ नेते मंडळी पुण्यात आली होती. त्यांची भाषणं काही लक्षात नाहीत. पण वाजपेयी नेहमीप्रमाणेच सुंदर बोलले होते. तेव्हा फारसे थकलेही नव्हते. त्यांना भेट दिलेली तलवार उपसून बाहेर काढणारे वाजपेयी, असं फारच कॉन्ट्रास्ट चित्र त्यावेळी पहायला मिळालं होतं. (मी जर चुकत नसेन तर मित्रवर्य रवी पत्की यांनी त्याची फ्रेम घरी करून लावली होती.) 

‘दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो. तसंच काँग्रेस सरकारचं आहे. हा दिवा आज ना उद्या विझणारच आहे,’ असं मार्मिक भाष्य अटलजींनी त्यावेळी केलं होतं. त्यानुसार काँग्रेसचा दिवा विझला नि भाजपची ‘पणती’ १३ दिवसांसाठी प्रज्वलित झाली. अर्थात, तेरा दिवसांतच ती पण विझली. मात्र, त्या तेरा दिवसांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेला आनंद काकणभर अधिकच संस्मरणीय होता. कारण सर्वांचे लाडके अटलजी पंतप्रधान झाले होते. असो… तो विषय वेगळा. तर अटलजींचे भाषण संपले आणि मंडळी ‘एसपी’तून बाहेर पडू लागली. त्यावेळी पहिल्यांदा विकास मधुकर मठकरी या व्यक्तीचे दर्शन झाले. अर्थात, तेव्हा ते फक्त दिसले. ओळख मात्र, झाली नाही. 


आमचे मित्रवर्य आणि तेव्हाचे वॉर्डातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ जमविणारे सन्माननीय रवी व्यंकटेश पत्की यांनी दाखविले… ‘तो बघ विकास मठकरी. आपल्या वॉर्डाचा भाजपचा अध्यक्ष आहे. ‘अभाविप’चा पूर्णवेळ होता. आसाम आणि ईशान्य भारत, कुठल्या कुठल्या यात्रा वगैरेमध्ये सहभागी झाला होता. इइ…’ माहिती सन्माननीय रवी पत्की यांनी पुरविली. मठकरी या माणसाचं नाव माझ्या कानावर पहिल्यांदा पडलं. जीनची पँट, खादीचा शर्ट आणि पायात स्पोर्ट्स शूज. अजूनही मला तो पेहराव आठवतोय. पुढंही अनेकदा त्यांचा हाच पेहराव असायचा. तेव्हा सरांची राजदूत होती आय थिंक. कोणत्याही इतर मोटरसायकलपेक्षा जरा अधिकच फटफट आवाज करीत राजदूत निघायची. पुढे आणखी काही वर्षे तीच राजदूत ते वापरत होते. नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी… ही त्यांची ओळख करून द्यायची ष्टाइल. हे शब्द अजूनही कानात आहेत.

नंतर मग परिसरातील संघशाखा भरणाऱ्या मैदानावर (संघाच्या भाषेत संघस्थानावर) स्थानिक नगरसेविकेनं गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या नगरसेविकेला हैराण करून सोडण्याचे काम विकास मठकरी आणि दुसरे परममित्र धीरज घाटे या दोघांनी केलं होतं. ‘अटक्यात लोटकं, लोटक्यात दही… मैदानं लाटत चालली बाई’ किंवा ‘मुलांच्या जीवाशी खेळू नका, खेळाचं मैदान गिळू नका’ अशा घोषणा असो, घराघरांत पत्रक वाटणं असो, रस्त्यावर उभं राहून स्वाक्षरी मोहीम राबविणं असो किंवा इतर पर्याय असो. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून संबंधित नगरसेविकेला कानपिचक्या मिळतील, अशीही व्यवस्था करण्यात आली होती. अखेरीस ते मैदान वाचलं आणि ‘संघाच्या नादाला लागू नका,’ असा इशारा संबंधित नगरसेविकेला वरिष्ठांनी दिल्याचंही समजलं.


मला वाटतं विकास मठकरी आणि धीरज घाटे या दोघांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून यशस्वी केलेलं ते पहिलं आंदोलन असावं. त्यानंतर मग विकास मठकरी यांची सातत्यानं भेट होऊ लागली. चहा पिता पिता गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या घरी या ना त्या निमित्तानं जाणं-येणं होऊ लागलं. तेव्हा ते अंकुश काकडे यांच्या शेजारच्या इमारतीत रहायचे. आमच्या वॉर्डाचे भाजपचे अध्यक्ष हीच त्यांची ओळख होती. नगरसेवकपदासाठी उभे राहणार, एवढीच चर्चा होती. पण नगरसेवक नव्हते. विकास मठकरी या नावानं त्यांना आम्ही कधीच बोलावलं नाही. आमच्यासाठी ते कायमच मास्तर किंवा सर राहिले. सरांबद्दलची आणखी एक आठवण म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा मटण खाल्लं होतं. नवी पेठेतल्याच कुठल्याशा गच्चीवर कार्यक्रम झाला होता. नीटसं आठवत नाही, पण कदाचित सरांच्याच गच्चीवर झाला होता.

सरांनी पहिली निवडणूक लढविली १९९७ साली. गोपाळ तिवारी यांच्याविरोधात. जोरदार प्रचार करून त्यांनी गोपाळदादांना घाम फोडला होता. इतके प्रयत्न करूनही मठकरी मास्तर पडणार, असाच होरा होता. मात्र, सर ठाम होते. ‘आशिष, मी जिंकणार. एक मतानं का होईना पण मी जिंकणार,’ हा सरांचा ठाम विश्वास होता. ‘उमेदवार झक्कास, मठकरी विकास’ असं सांगत कार्यकर्ते आख्ख्या वॉर्डभर हिंडत होते. पण गोपाळ तिवारी यांनी मतदारसंघ उत्तम बांधला होता. अखेरीस झालंही तसंच तेरा की चौदा मतांनी सर जिंकले आणि नगरसेवक झाले. नंतर सलग तीनवेळा निवडणूक जिंकले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अगदी सहजपणे काहीच हातात पडलं नाही. 



सरांची दुसरी टर्म त्याच भागातून होती. पण तेव्हा वॉर्डाचा प्रभाग झाला होता. त्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य त्यांचंच होतं. तेव्हा मी ‘केसरी’त बातमीदारी करीत होतो. काही महिने महापालिका बीटही होतं. तेव्हा त्यांची महापालिकेत भेट व्हायची. मात्र, नंतर मी ई टीव्हीत गेलो आणि संपर्क तुटला. तिसरी टर्म वेगळ्या मतदारसंघातून होती.

२००७ मध्ये बीएमसीसीच्या वॉर्डातून निवडणूक लढविण्याची संधी त्यांना मिळाली. तेव्हाही दोन दिग्गजांचे तिकिट कापून त्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती. तेव्हा निवडणूक काळात कर्वे रोडच्या गिरीजात सरांची एकदा भेट झाली होती. तेव्हाही प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत होता. ‘आशिष, मी जिंकणार रे.’ कुठे काय यंत्रणा लावलीय, कसे प्रयत्न चालू आहेत आणि कसे प्रयत्न चाललेत सगळं सविस्तर सांगून टाकलं. सर तिथूनही जिंकले आणि नगरसेवकपदाची हॅट्ट्रिक झाली. 

सर त्याच सुमारास ते बीएमसीसी कॉलेजच्या परिसरात रहायला गेले आणि आमच्या गाठीभेटी कमी झाल्या. क्वचित कधीतरी त्यांचा फोन यायचा. बातमी किंवा लेख वाचला, असं सांगायला येणारे फोनच अधिक. मी कधीतरीच त्यांना फोन करायचो. धीरजच्या कुठल्याशा कार्यक्रमात, कुठल्याशा सभा किंवा जाहीर कार्यक्रमात त्यांची भेट व्हायची. काय चाललंय, सध्या कुठे वगैरे विचारपूस व्हायची इतकंच. पुढे २००९ मध्ये त्यांचे लोकसभेसाठी प्रयत्न सुरू होते. नंतर विधानसभेला शिवाजीनगरमधून लढले. त्यावेळी मी साम मराठीत होतो. तेव्हा फोनवरून गप्पा व्हायच्या.


हे आता आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच विकास मठकरी उर्फ मास्तर उर्फ सरांची कोथरूडमधल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एका दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले, की आशिष, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… मी चाट पडलो. कारण त्या दिवशी वाढदिवस नव्हताच. सरांना धन्यवाद दिले आणि सांगितलं, की अहो आज माझा वाढदिवस नाहीये. त्यांच्याकडे चुकून त्या दिवशी माझा वाढदिवस अशी नोंद झाली होती. बाकी गप्पाटप्पा झाल्या. मला म्हटले, ‘अरे, आशिष किती दिवस झाले आपण भेटलो नाही. आता माझा उपयोग नाही, म्हणून भेटणं किंवा फोन करणं बंद करायचं का?’ 

बापरे, त्यांचं हे वाक्य मला खूप लागलं. अर्थात, जेव्हा ते चांगले होते. राजकारणात सक्रिय होते, तेव्हाही त्यांचं माझं भेटणं अगदी नैमित्तिक होतं. कामासाठी वगैरे तर नाहीच नाही. पण तरीही मला ते वाक्य ऐकून मनाला खूप वाईट वाटलं. सगळे लोक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करणारेच असतात. आज मठकरींकडे काही नाही, म्हणून आपण त्यांना फोन करत नाही किंवा भेटत नाही, असं वाटायला नको म्हणून त्यांना म्हटलं, ‘सर, अहो असं काही नाही. तुम्ही सांगा कधी भेटायचं. मी त्यादिवशी येतो भेटायला. वाटलं तर रवीला पण घेऊन येतो.’ ‘आज संध्याकाळी ये पाचनंतर मी मोकळा आहे.’ सरांनी फर्मान काढले. तुम्ही म्हणाल तेव्हा येतो, म्हटल्यामुळं मला पर्यायच नव्हता. त्यामुळं संध्याकाळी सव्वा पाच वाजता सरांच्या कोथरूडमधल्या निवासस्थानी पोहोचलो.


दीडएक वर्षांपूर्वी सरांना अर्धांगवायूचा त्रास झाला आणि खाटकन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उज्ज्वल राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला होता. अॅडमिट झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या वाचनात यायच्या. त्यांनी हॉस्पिटलमध्ये भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक घेतल्याचंही कळलं होतं. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते आहे, असं कानावर यायचं. नंतर दोन-तीनदा फोनवर बोलणंही झालं. विशेषतः निवडणुकीच्या काळात. तेव्हा ते रामदेव बाबांच्या आश्रमात उपचार घेत होते. मास्तर, वैशालीत येऊन गेले, भाजपच्या कार्यालयात त्यांनी उपस्थिती लावली, असंही अधनंमधनं कळायचं. धीरज मध्यंतरी सरांना टिळक टँकवर जाऊन भेटला होता. तिथले फोटोही त्यानं फेसबुकावर टाकले होते. एक-दोनदा सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची भेटही झाली. पण निवांत गप्पा झाल्या नव्हत्या. त्या मारण्यासाठीच कोथरूडमधलं घर गाठलं. 

सर एकदम मस्त मूडमध्ये होते. पुतण्याकडून ‘शिवांबू’चे फायदे आणि शरीरावर होणारे शास्त्रीय परिणाम समजावून घेत होते. सध्या ‘शिवांबू’ची ट्रीटमेंट सुरू केलीय. ‘शिबांवू’ प्राशन, शिवांबूपासून मसाज वगैरे गोष्टी अगदी उत्साहानं सांगत होतं. शिवांबू प्राशन करण्याच्या कालावधीत काय खायचं आणि काय नाही खायचं, याचे स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहेत, असं सांगत होते. शिवांबू घ्यायला लागल्यापासून खूप फरक जाणवतोय, असंही म्हणत होते. इतर पथ्य नि उपचार पद्धतींबद्दल सांगत होते. दिवसभर काय करतो, किती चालतो, याची माहिती देत होते. पूर्वी रोज दहा-बारा किलोमीटर सहज चालणं व्हायचं. सायकलिंग व्हायचं. पक्षाच्या बैठकीला एखाद्या मतदारसंघात गेलो तर तिथून चालतच घरी यायचो. अगदी वडगांव शेरीतूनही घरी चालत आलोय, असं हसत हसत सांगत होते. मी इतका फिट होतो… पण त्यादिवशी ढोलाचं टिपरू लागलं आणि मग पुढचं सगळं रामायण घडलं, हे सांगताना त्यांचा चेहरा पाहवत नव्हता.


पण इतकं सगळं असूनही पुन्हा एकदा नव्यानं मैदानात उतरण्याची जिद्द त्यांच्या बोलण्यात होती. नजरेत होती. सरांच्या या गोष्टीचं मला कायम अप्रूप वाटतं. त्यांच्यामध्ये असलेली लढण्याची प्रचंड जिद्द, दुर्दम्य आत्मविश्वास आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं राजकारणात उतरण्यासाठी चाललेली धडपड. एखादा असता तर खचलाच असता. गपचूप शिकविण्याचे काम करून सर्वसामान्य प्राध्यापकाचे जीवन जगण्यात धन्यता मानली असती. पण सहजपणे हार मानतील किंवा परिस्थितीला शरण जातील, ते सर कसले. या अतिअत्यंत प्रतिकूल परिस्थितीही त्यांना ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची आहे. पुन्हा एकदा राजकारणात जायचं आहे. काही जणांना हे अवास्तव किंवा निरर्थक वाटू शकतं. पण मला मात्र, त्यांची लढाऊ वृत्ती यातून दिसते.

मास्तरांची लढाऊ वृत्ती अनेक निवडणुकांमधून दिसलीय. गोपाळ तिवारींविरोधात दिसलीय. अनिल शिरोळे यांच्याशी असलेल्या सुप्त संघर्षाच्या प्रसंगी दिसलीय. गोपीनाथ मुंडे यांनी कोत्या मनाने त्यांच्यावर टाकलेल्या बहिष्काराच्या प्रसंगी दिसलीय. खडकवासला भाजपकडे खेचून आणताना दिसलीय. गणेश बिडकर यांना स्थायी समिती अध्यक्ष करताना दिसलीय. पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरतानाही दिसलीय. सरांचा तो संघर्ष आजही सुरूय. आधी तो पक्षांतर्गत विरोधकांशी होता. विरोधी पक्षातल्या लोकांशी होता. आज तो परिस्थितीशी नि नियतीशी सुरू आहे.



पुण्या-मुंबईत झालेल्या उपाचारांनंतर त्यांनी उत्तराखंडमध्ये रामदेव बाबांचा आश्रम गाठला. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रामदेव बाबांकडे शब्द टाकला. ‘हा माझा माणूस आहे. हा खणखणीत व्हायलाच पाहिजे. तुम्ही स्वतः लक्ष घाला.’ रामेदवबाबांचे उपचार आणि प्रचंड पथ्य यामुळे माझ्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली, असं सर स्वतः सांगतात. अनेक पद्धतीचे उपचार, अनेक प्रकारचे व्यायाम, मालिश आणि इतर पूरक औषधांमुळे सध्या मी ७० टक्के बरा झालो आहे. लवकरच उर्वरित तीस टक्के बरा होईन, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा ऐकायला मिळत होतं. 

कोणाचीही मदत न घेता सर स्वतः स्वतःचे चालत होते. स्वतःची काम स्वतः करत होते. मध्यंतरी पदवीधर मतदारसंघातील चंद्रकांतदादा पाटलांच्या विजयानिमित्त श्रमपरिहाराचे आयोजन करण्यात आले होते. तिथं सरांची भेट झाली होती. कुठल्याशा मिळालेल्या पत्रकाची त्यांनी स्वतः घडी घातली. एक हात आणि दात यांचा वापर करून घडी घातली नि पत्रक खिशात ठेवलं. खाली पडलेलं पत्रक स्वतः उचललं, कोणाच्याही आधाराविना स्वतः उठून उभे राहिले. उभं राहण्यासाठी दिलेला मदतीचा हात त्यांनी अत्यंत विनम्रपणे नाकारला. अशी स्वाभिमानी आणि स्वावलंबी वृत्ती तेव्हाही जाणवत होती. त्या तुलनेत परवा भेट झाली तेव्हा सरांची प्रकृती खूपच उत्तम वाटली. तब्येत खूप सुधारली आहे, हा त्यांचा दावा योग्य वाटत होता. 

पक्षाचं काय चाललंय, आठ आमदार आणि एक खासदार काय म्हणतायेत, कोण कशा पद्धतीनं काम करतंय, लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये पक्षाबद्दल, सरकारबद्दल काय भावना आहे, केंद्र आणि राज्य सरकारबद्दल काय वाटतं? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार करत होते. त्यांच्या नसानसांमध्ये फक्त भाजपच ठासून भरलाय, असं पदोपदी जाणवतं होतं. ‘आशिष, माझी संधी हुकली रे…’ हीच त्यांची भावना होती. मागे दोन ते तीनवेळा त्यांनी फोनवर तसं बोलूनही दाखवलं होतं. परवा मात्र, ते थेट तसं बोलले नाहीत. पण भावना व्यक्त होत होती.


पुण्यातील भाजपचा आक्रमक, अभ्यासू आणि धडाकेबाज नगरसेवक आज अशा अवस्थेत आहे, हे पाहून खूपच वाईट वाटतं. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, अभाविपच्या कामाचा अनुभव (सध्या भाजपमध्ये हा अनुभव सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो, अशी माझी ठाम भावना आहे.), मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्त्व, तुलनेनं तरूण नि धडाकेबाज असे अनेक नेतृत्व गुण त्यांच्याकडे होते-आहेत. पुण्याचे भावी खासदार किंवा भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. नरेंद्र मोदींच्या लाटेत गावगन्ना मंडळी आमदार-खासदार झाली. विकास मठकरी तर दोन हजार टक्के निवडून आले असते. पण आता ते त्यांच्या नशिबात नव्हते. आपल्याला याबद्दल इतकं वाईट वाटतं, तर स्वतः मठकरींना त्याबद्दल किती वाईट वाटत असेल. 

सरांना म्हटलं, सर तुम्ही बाकी काही विचार करू नका. आधी ठणठणीत व्हा. मस्त पहिल्यासारखे बरे व्हा. नशिबात जे लिहिलं असेल ते कधीच तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. मिळणार असेल ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या. पण त्याचा विचार तुम्ही आता करू नका. नंतर ते नक्की मिळेल, यावर विश्वास ठेवा. त्यांनाही ते पटलं. पण आता मिळालं नाही, याचं दुःख त्यांना होतं. 

शिवाजीनगर मतदारसंघात पुन्हा एकदा फिरायचंय. जनसंपर्क अभियान राबवायचंय, असं म्हणत होते. अधूनमधून कार्यकर्त्यांचे एक-दोन फोनही येऊन गेले. आमच्या गप्पा सुरू असतानाच नारायण पेठेतील सरांचा (म्हणजेच पक्षाचाही जुनाच) कार्यकर्ता बिपीनही (आडनाव आठवत नाही आत्ता!) आला होता. कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष की चिटणीस होते, ते देखील सरांना भेटायला आले. ही मंडळी सरांना कायम भेटायला येत असावी. म्हणजे तसं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. 


आधीही म्हटल्याप्रमाणे हल्लीचा जमाना हा ‘उगवत्या सूर्याला’ नमस्कार करणाऱ्यांचा आहे. राजकारणात तर दररोज नवे सूर्य उगवतात नि मावळतात. पण मला वाटतं, सर तुम्ही आता याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या नशिबात आहे, ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या हमखास मिळणार. सुदैवाने तुम्ही ज्या पक्षात आहात, तो पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देणारा आहे. तेव्हा तुम्हाला न्याय नक्की मिळेल. आणि जेव्हा मिळेल तेव्हा आतापर्यंतचा बॅकलॉग भरून निघेल इतकं मिळेल. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला…

तेव्हा लवकर बरे व्हा. तंदुरुस्त रहा…

तुमचे आरोग्य उत्तम राहो, हीच प्रार्थना.

Monday, August 04, 2014

कसब्यात उमेदवार ‘भाजपा’चा की ‘बाजपा’चा?

भाजपा, संघविचार नि हिंदुत्त्वापेक्षा कोण मोठा आहे

लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘संघ परिवारानेच कापला गिरीषबापट यांचा पत्ता’ हा ब्लॉग लिहिल्यानंतर त्यावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या. अर्थात, बहुतांश प्रतिक्रिया बापटांच्या विरोधातच होत्या. लोकांच्या मनातील खदखदीला वाचा फोडल्याबद्दल अनेकांनी फेसबुकवर नि ब्लॉगवर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तसेच काहींनी प्रत्यक्ष फोन करूनही संवाद साधला. बापट यांच्यामुळे दुखावल्या गेलेल्या अनेकांनी त्यांच्याबद्दलची माहिती अधिक सविस्तरपणे सांगितली. त्याबद्दल मुद्दाम येथे उल्लेख करणे उचित नाही. कारण ते सर्व मुद्दे वैयक्तिक स्वरुपाचे होते. मुस्लिमांचे लांगुलचालन करतानाच परिवारातील कार्यकर्त्यांची हेटाळणी कशा पद्धतीने झाली, याबद्दलही अनेकांचे फोन आले. सर्वांचा रोष गिरीष बापट या व्यक्तीबद्दलचा नव्हता, तर गेल्या दहा-पंधरा वर्षातील कार्यशैलीबद्दलचा आणि वर्तणुकीबद्दल होता, असे मला जाणवले.



गिरीष बापट हे पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत आणि सर्वाधिक अनुभवी नेते आहेत. त्यामुळे लोकसभेत तिकिट का मिळाले नाही, याचा सारासार विचार करून ते पुढील गोष्टी कशा पद्धतीने स्वीकारतात ते पहावे लागेल, असे मत मी मांडले होते. मात्र, बापट यांनी कार्यशैलीमध्ये कोणताच फरक घडवून आणला नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागेल. अर्थात, वीस वर्षांत जे घडले नाही, ते चार महिन्यांत कसे घडणार, हेही ओघाने आलेच.

आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. वास्तविक पाहता, बापट यांना चार टर्म आमदारकी, एसटी महामंडळ, कृष्णा खोरे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्षपद अशी अनेक मानाची पदे मिळाली आहेत. महापालिकेतही विविध पदांवर त्यांनी काम केले आहे. स्थायी समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःहून निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर करणे आवश्यक होते. तशी घोषणा त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी (तिकिट मिळेल, असे गृहित धरून) केली होती. मात्र, लोकसभेला तिकिट न मिळाल्यामुळे बापटसाहेब पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत.

‘बापटसाहेब ब्राह्मण आहेत, त्यामुळे पुण्यातून ब्राह्मण उमेदवार म्हणजे बापटच पाहिजे,’ अशी चर्चा लोकसभा निवडणुकीपूर्वी पुण्यामध्ये विशेषतः कसबा मतदारसंघात फेरफटका मारल्यानंतर किंवा काही लोकांशी चर्चा केल्यानंतर ऐकू येत होती. आता बापटसाहेब ज्येष्ठ आहेत. मंत्रिपदाची संधी चालून आली असताना त्यांचे तिकिट कापणे योग्य नाही किंवा लोकसभेला कापले, आता विधानसभेला पण कापून अन्याय करणार का, अशी चर्चा ऐकू येते आहे. बापट समर्थक नेते नि कार्यकर्ते तर ‘कितीही करा आदळआपट, कसब्यातून फक्त गिरीष बापट’ ही घोषणा ऐकविण्यात मग्न आहेत. पक्षापेक्षा नेत्याला मोठे समजणाऱ्या नेत्यांबद्दल नि कार्यकर्त्यांबद्दल न बोललेलेच बरे.

गिरीष बापट यांच्याबद्दल वैयक्तिक राग असण्याचे काहीच कारण नाही. उलट एकाच पेठेत राहणाऱ्या बापट आणि चांदोरकर या घरांचे खूप जुने संबंध आहेत. मात्र, विचारांना हरताळ फासणाऱ्या नेत्याला वारंवार संधी का दिली जाते, याबद्दल मला तीव्र आक्षेप आहे. त्यामुळेच पुन्हा एकदा नव्याने ब्लॉग लिहिण्याची वेळ आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार, हिंदुत्त्व आणि खुद्द भारतीय जनता पार्टीशी प्रतारणा करणाऱ्या ज्येष्ठ आमदाराला तिकिट द्यावे का किंवा का द्यावे, यावर चर्चा होणे गरजेचे आहे. पक्षश्रेष्ठी अशा चर्चांना भीक घालत नाहीत, हे मलाही माहिती आहे. मात्र, तरीही माझे म्हणणे मांडण्याचा मला अधिकार असल्यामुळे मी हा ब्लॉग लिहित आहे. आपल्याला जर माझे म्हणणे पटत असेल तर तो शेअर करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा. म्हणजे किमान बापट यांच्याबद्दल फक्त माझ्या मनातच खदखद नाही, हे नेत्यांना समजेल.



भाजपाच्या पक्षशिस्तीला हरताळ…
लोकसभा निवडणुकीतील बापट यांच्या भूमिकेबद्दल प्रचंड नाराजी आहे. केवळ दाखविण्यासाठी बापट हे शिरोळे यांच्यासोबत फिरत होते, की काय अशी शंका येण्याइतकी परिस्थिती आहे.  बापट समर्थकांनी केलेली कृत्ये तर पक्षशिस्तीमध्ये बसतात का, हा प्रश्न आहे. शिरोळे यांचे नाव लोकसभेचा उमेदवार म्हणून जाहीर झाल्यानंतर शास्त्री रोडवरील आमदारसाहेबांचा एक समर्थक ‘निषेध, निषेध, निषेध’ हे शब्द सूचना फलकावर लिहितो हे पक्षशिस्तीत बसते का?

लोकसभेसाठी कसबा मतदारसंघाच्या नियोजनाची बैठक ‘गिरीष बापट यांना उमेदवारी न दिल्याबद्दल दुःख, खेद आणि निषेध’ व्यक्त होऊन सुरू होते, ही भाजपची पक्षशिस्त आहे का? कसब्यातील भाजपचे काही नगरसेवक, पदाधिकारी आणि काही कार्यकर्ते शिरोळेंच्या प्रचारापासून अलिप्त राहतात, मुद्दाम उलटसुलट निरोप देतात, पदयात्रा किंवा प्रचारफेरी रद्द झाल्याचे खोटेच मेसेज पाठवितात हे पक्षाला अपेक्षित आहे का? मतदारांपर्यंत भाजपच्या स्लिपा पोहोचणार नाहीत, याची खबरदारी कसब्यातील काही पक्ष कार्यकर्तेच बाळगतात ही पक्षनिष्ठा आहे का?

बापटांचे ज्येष्ठत्व, त्यांचा अनुभव, विधीमंडळातील कामगिरी असे मोठे-मोठे शब्द फेकून बापट यांच्या उमेदवारीचे समर्थन करणारे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते कसब्यातील भाजप नेत्यांच्या या कृत्यांचा जाब विचारणार आहेत की नाहीत?


रा. स्व. संघाच्या विचारांशी घटस्फोट…
‘मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक आहे,’ हे बापट आवर्जून सांगतात. दसऱ्याच्या संचलनात काय उभेही राहतात. मात्र, संघ स्वयंसेवक असूनही ते ‘संभाजी ब्रिगेड’ला पोषक अशी भूमिका का घेतात? छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरू दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याच्या विरोधात ठामपणे भूमिका का घेत नाहीत? आदमबाग मशिदीच्या अतिक्रमणाविरोधातील हिंदुत्त्वावाद्यांच्या आंदोलनात मुस्लिम लांगुलचालनाची भूमिका का घेतात? कोंढव्यातील यांत्रिक कत्तलखानाविरोधी आंदोलनापासून स्वतःला बाजूला का ठेवतात? डेक्कनवर उभ्या राहिलेल्या टोलेजंग मशिदीच्या विरोधात संघर्ष सुरू असताना त्यापासून चार हात दूर थांबण्याचे धोरण का स्वीकारतात? कसबा मतदारसंघातील विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात जाऊन मुस्लिम मंडळींशी हितसंबंध का जोपासतात? कसबा मतदारसंघातील प्रत्येक मशिदीत स्वतःहून बोअरवेल मारून देण्यासाठी स्वतःहून पुढाकार का घेतात? तुमच्याकडून याबद्दलही सविस्तर उत्तर हवे आहे बापटसाहेब.

प्रदीप रावत आणि दोनवेळा अनिल शिरोळे यांच्या निवडणुकीत गिरीष बापट आणि त्यांचे समर्थक प्रचारापासून हटकून दूर थांबले, असा आरोप पक्षवर्तुळात जोरात आहे. त्याबद्दलही बापट यांनी कधीच उत्तर दिलेले नाही. शिरोळे यांना कसब्यातूनही घसघशीत लीड मिळाले आहे. मात्र, त्या लीडशी बापट आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा काहीही संबंध नाही. नागरिकांनी स्वतःहून बाहेर पडून मोदी यांच्यासाठी केलेल्या मतदानामुळे हे लीड मिळाले, हे मी मुद्दामून वेगळे सांगण्याची गरज नाही.


राष्ट्रवादीच अधिक जवळची…
गिरीष बापट हे आमदार भाजपचे. मात्र, भाजपवरील निष्ठेऐवजी त्यांनी ‘राष्ट्रवादी’ विचार आपलासा केल्याचे वारंवार जाणवते. लोकलेखा समितीचे अध्यक्ष असूनही बापट यांनी अजितदादांच्या घोटाळ्यांना हात घातला नाही. सिंचन घोटाळ्याकडे त्यांनी ढुंकूनही पाहिले नाही. ते काम केले भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी. टोलच्या गडबड घोटाळ्याबाबत जनतेमध्ये आक्रोश असतानाही लोकलेखा समिती अध्यक्षांनी त्याला वाचा फोडली नाही. अजित पवार यांनी पुणेकरांच्या दोनवेळच्या आंघोळीवर टीका केली. तर गिरीषरावांनी पण अगदी त्याची री ओढली. कारण लोकसभेला ‘राष्ट्रवादी’ आपल्या बाजूने उभी ठाकेल, अशी त्यांची आशा असावी.

महापालिका निवडणुकीत विष्णू हरिहर यांच्या प्रभागात प्रचारासाठी येणार नाही, असे बापट यांनी थेट सांगितल्याचा दावा भाजपचेच काही वरिष्ठ नेते करतात. त्या प्रभागातील नारायण चव्हाण यांच्याशी बापट यांचे घनिष्ठ संबंध. कदाचित लोकसभा निवडणुकीत त्यांनी बापटसाहेबांना मदत करण्याचे आश्वासन दिले असावे. शिवाय तिथं मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय. त्यामुळेच बापट यांनी अशी भूमिका स्वीकारली असावी. भारत आणि पाकिस्तानी मल्लांमध्ये कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याच्या विषयात पक्षविरोधी भूमिका घेऊन राष्ट्रवादीला मदत करण्यासाठी नगरसेवकांवर दबाव आणल्याचा आरोपही त्यांच्यावर आहे. भाजपच्या दोन नगरसेवकांनी त्यावेळी बापट यांचे आदेश ऐकले नाही आणि पक्षाची भूमिकाच शिरोधार्य मानली. विष्णू हरिहर यांनी कोणाचे ऐकले माहिती नाही. मात्र, त्यांचा प्रकरणात बळी गेला, हे काहींच्या स्मरणात असेलच. कोंढवा येथील कत्तलखान्याच्या विषयात बापटांची नेमकी भूमिका काय होती? त्यांनी पक्षाच्या भूमिकेचे ठामपणे समर्थन केले होते, की विरोधात भूमिका घेतली होती? हे त्यांनीच सांगावे. बापटांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिले किंवा त्यांची नेमकी काय भूमिका होती, ते मांडले तर हे आरोप पुन्हा होणार नाहीत. अन्यथा हे मुद्दे वारंवार निघतच राहतील.

आणखी एक मुद्दा बापट यांनी स्वतःला कसबा मतदारसंघापुरतेच मर्यादित ठेवले, हा आरोप त्यांच्यावर का करू नये. भाजपा सर्व शहरामध्ये विस्तारेल, सगळीकडे पक्ष मजबूत होईल, यासाठी बापट यांनी इतक्या वर्षांत काय केले, याचा जवाब पक्ष मागणार आहे की नाही? नागपुरात भाजपची सत्ता आणली, असे नितीनभाऊ गडकरी आनंदाने सांगतात. पुण्यातील या ज्येष्ठ नेत्याने भाजपला हे दिवस का दाखविले नाहीत, याबाबत ते चिडीचूप का बसतात? कसब्यातील भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते आता बापट यांच्यापासून चार हात दूरच असतात, त्याचा फटका पक्षालाही बसतो. याबाबत कोणी आमदारसाहेबांना जबाबदार धरणार आहे की नाही?

घटत्या मताधिक्याचे कारण काय?
गिरीष बापट हे भले चारवेळा कसब्यातून विजयी झाले असतीलही. मात्र, प्रत्येक वेळी त्यांचे विजयाचे मताधिक्य घटले आहे. याचा पक्ष कधी गांभीर्याने विचार करणार आहे की नाही? १९९५ मध्ये गिरीष बापट यांनी सतीश देसाई यांचा वीस हजार ७६० मतांनी पराभव केला. (गिरीष बापट ५३,०४३ आणि सतीश देसाई ३२,२८३) पुढच्या म्हणजेच १९९९च्या निवडणुकीत बापट वीस हजार १६८ मतांनी विजयी झाले. (गिरीष बापट ३९,४१९ आणि अण्णा थोरात १९,२५१) २००४ च्या विधानसभेला बापटांचे मताधिक्य नऊ हजार ६१८ मतांवर आले. (गिरीष बापट ३८ हजार १६० आणि अण्णा थोरात २८ हजार ५४२) गेल्या निवडणुकीत तर रवींद्र धंगेकर यांनी बापटांना अक्षरशः घाम फोडला. गेल्यावेळी बापट अवघ्या आठ हजार १६२ मतांनी विजयी झाले. (गिरीष बापट ५४ हजार ९८२ आणि रवींद्र धंगेकर ४६ हजार ८२०)

कसबा मतदारसंघाला भवानी पेठेचा काही भाग जोडला गेला. मात्र, तशाच पद्धतीने नवीपेठ, दत्तवाडी, राजेंद्रनगर, दांडेकरपूल, विजयानगर कॉलनी तसेच भाजपला अनुकूल असा भाग जोडण्यात आला. मात्र, तरीही बापट यांचे मताधिक्य गेल्या निवडणुकीत का घटले? जुन्या कसब्यातून बापट यांना अपेक्षित लीड न मिळाल्यामुळेच बापटांवर ही नामुष्की ओढविली, असा दावा कोणी का करू नये. भाजपचा हक्काचा मतदारसंघ नि बालेकिल्ला असलेल्या कसब्यात बापट यांचे मताधिक्य प्रत्येक निवडणुकीत कमी होत गेले, याबद्दल पक्ष बापट यांच्यासारख्या ज्येष्ठ नि अनुभवी नेत्यांकडे उत्तर मागणार आहे की नाही?

अहो, विधानसभेला जो ट्रेंड होता तोच ट्रेंड महापालिका निवडणुकीतही कायम राहिला आणि भाजपच्या बालेकिल्ल्यात मनसेने मुसंडी मारून भाजपच्या कमळाच्या चिंधड्या चिंधड्या उडविल्या. सदाशिव पेठेमध्ये घुसून मनसेने भाजपची मुंडी मुरगाळली. बापटांचा तथाकथित बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेतील प्रभागात भाजपचे दोन्ही उमेदवार दणकून आपटले. हे कशाचे द्योतक आहे. याचं उत्तर भाजपाचे वरिष्ठ नेते आमदारसाहेबांकडे मागणार आहेत की नाही?
एकीकडे ‘शत प्रतिशत’ मतदान घडवून आणण्यासाठी खुद्द सरसंघचालक आदेश देतात. त्यानुसार संघाचे सर्व स्वयंसेवक घरोघरी फिरून जनजागृती करतात. प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही मोहीम राबवितात. मोदींना निवडून आणण्यासाठी मनापासून मेहनत घेतात. मात्र, भाजपचे काही कार्यकर्ते शांत राहतात, प्रचारापासून दूर राहतात, हे उघड गुपित असूनही त्याच्यावर वरिष्ठांशी मेहेरनजर का असते? हे न उलगडणारे कोडेच आहे. संघ परिवारात सरसंघचालकांचा आदेश झुगारून संघ नि पक्षाविरोधात भूमिका घेण्याइतका कोणीही मोठा नाही, असे मला वाटते. 

मला तर अनेकदा वाटते, की कसबा पेठ मतदारसंघात दोन ‘बीजेपी’ कार्यरत आहेत. एक म्हणजे भाजपा अर्थात, भारतीय जनता पार्टी. दुसरी म्हणजे ‘बाजपा’ अर्थात, बापट जनता पार्टी. भाजपाच्या नेत्यांना आणि नागरिकांना यंदा ‘भाजपा’ की ‘बाजपा’ यापैकी एकाची निवड करण्याची योग्य संधी आहे, असे मला वाटते.

अहो, कसबा हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. कुणा एका व्यक्तीचा नाही. त्यामुळे उद्या दुसऱ्या कोणालाही उमेदवारी दिली, तरी तो निवडून येणार हे हमखास धरून चाला. अशी परिस्थिती असतानाही भाजपाचे नेते बापट यांना इतके धरून का असतात. संघ, भाजपा नि हिंदुत्त्व यांना अव्हेरणाऱ्या नेत्याला ‘नाही’ म्हणण्याचे धाडस भाजपाचे वरिष्ठ नेते दाखविणार आहेत की नाही, याबद्दल उत्सुकता आहे.

गेल्या निवडणुकीपूर्वी गिरीष बापट यांचे माहितीपत्र घरी आले होते. त्यासोबत आंतरदेशीय पत्रही आले होते. त्यावर हेच सर्व मुद्दे उपस्थित करून मी त्यांना पाठवून दिले होते. मुद्दाम पत्रकार असा उल्लेख न करता फक्त नाव लिहून पाठविले होते. मतदानाच्या आदल्या दिवशी बापट वहिनींनचा फोन आला होता. त्यांनाही मी तेच मुद्दे सांगितले. त्यांनी ऐकून घेतले आणि निवडून येण्यासाठी असं ‘कॉम्प्रमाइज’ करावं लागतं, असं सांगितलं होतं. त्यावेळी बापट यांना मत टाकलं होतं. मात्र, गेल्या पाच वर्षांमध्ये बापट यांच्या कार्यशैलीत काहीही फरक पडलेला नाही.

विचार, ध्येयधोरणं आणि निष्ठा यांच्याशी कोणतीही तडजोड न करताही निवडून येता येतं आणि २८३ खासदारांसह स्वबळावर सरकारही स्थापन करता येतं, हे नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. तेव्हा यंदाच्या विधानसभेला यावेळी विचार, निष्ठा नि धोरणांशी तडजोड करणाऱ्या व्यक्तीला पुन्हा उमेदवारी देण्याची चूक भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्रातील नेते करणार आहेत का? नेत्यांनी धाडस दाखवावे, नाहीतर विचारांशी प्रतारणा करणाऱ्या प्रत्येकाला धडा शिकविण्यासाठी जनता सूज्ञ आहे. हे लक्षात ठेवा.

तुम्हीच सांगा... तुम्हाला काय वाटतं. माझं म्हणणं पटतंय का? असेल तर ब्लॉग शेअर करा. पटत नसल्यास सोडून द्या…