Showing posts with label pune. Show all posts
Showing posts with label pune. Show all posts

Wednesday, May 31, 2017

हरविलेल्या मोबाईलची लघुकथा…



प्रामाणिकपणाला तंत्रज्ञान आणि तत्परता यांची जोड मिळाली, तर काय घडू शकतं, याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच आला. केरळमधील एका माणसाचा मोबाईल मुंबईमध्ये हरविला आणि तो उत्तर प्रदेश किंवा बिहारहून आलेल्या व्यक्तीला सापडला. त्याने पुण्यात फोन करून संबंधित केरळी माणसाला संपर्क करण्याची विनंती केली. भाषेच्या अडचणीवर मात करून पुण्यातून केरळमध्ये संपर्क साधला गेला आणि संबंधित व्यक्तीच्या घरापर्यंत पोहोचण्यात आले. अखेर तीन-चार तासांच्या सव्यापसव्यानंतर हरविलेला मोबाईल मुंबईमध्येच संबंधित व्यक्तीला पुन्हा मिळाला... त्याची ही कहाणी…

काही वर्षांपूर्वी पुण्यात गणपती विसर्जन मिरवणुकीदरम्यान हत्ती गणपती मंडळाने केरळमधील ‘पंचवाद्य’ वाजविणाऱ्या कलाकारांचा समावेश केला होता. त्यावेळी त्या ‘पंचवाद्य’ पथकाचा प्रमुख राजीव याच्याशी अगदी त्रोटक बोलणे झाले होते. तेव्हा त्याचा मोबाईल सेव्ह करून ठेवला होता आणि त्याने माझा. भविष्यात आमचा कधी संपर्क होईल, असे वाटलेही नव्हते. तीन वेळा केरळमध्ये गेलो, असलो तरीही कोट्टायमला निवांत जाणे झाले नव्हते. त्यामुळे त्याची भेट होऊ शकली नव्हती. राजीव कोट्टायममध्ये रहायला आहे.


मंगळवारी अचानक दूरध्वनी वाजला आणि ‘राजीव कोट्टायम’ असे नाव झळकले. मलाही आश्चर्य वाटले, या बाबाजीला माझी आता आठवण का झाली, अशा विचारानं फोन उचलला. समोरचा माणूस हिंदीतून बोलत होता. त्यानं हिंदीतून विचारला, हा फोन कोणाचाय? म्हटलं, राजीव म्हणून माझ्या ओळखीचे आहेत कोट्टायचमचे. त्यांचा आहे. 

समोरची व्यक्ती बोईसर येथून बोलत होती. रिक्षाचालक होता. प्रवेशसिंग उर्फ टायगर. त्याला राजीवचा मोबाईल मिळाला होता. तो बंद होता. त्यामुळे टायगरने स्वतःच्या मोबाईलमध्ये राजीवचे सीमकार्ड टाकून मला फोन केला. राजीवच्या कार्डावर यानं वीस-तीस रुपयांचं रिचार्जही मारलं होतं. ‘तुमच्याकडे या माणसाचा दुसरा नंबर असेल, तर त्यांना फोन करून सांगा. मोबाईल माझ्याकडे आहे. मला तो नको आहे. त्यांचा मोबाईल घेऊन मी काय करू. चांगला महागातला वाटतो. एलजी कंपनीचा आहे. १२-१५ हजारचा नक्की असेल. त्यांना माझ्या नंबरवर किंवा स्वतःच्याच नंबरवर फोन करायला सांगा, मी बोलतो त्यांच्याशी…’ असं सांगून टायगरनं बॉल (खरं तर मोबाईल) माझ्या कोर्टात टाकला. 

‘क्राइम पेट्रोल’ आणि ‘सावधान इंडिया’ पाहत असल्याने, आधी जरा धाकधूकच वाटत होती. राजीवचा फोन या रिक्षावाल्याकडे बोईसरला कसा आला, राजीवला काय झाले आणि असे अनेक प्रश्न मनात निर्माण झाले. आता मी काय करणार होतो. पण त्याच्या मोबाईलमध्ये आशिष नावाने माझा नंबर सेव्ह असेल. त्यामुळे तो पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर असावा, म्हणून मला रिक्षाचालकाने फोन केला. आधी एक-दोन जणांना फोन करून झाले होते. मात्र, ते सर्व मल्याळममध्ये बोलत होते. त्यामुळे टायगरला काही करता आले नसावे. त्याच्याशी हिंदीत बोलणारा मी पहिलाच असल्याने जबाबदारी माझ्यावर येऊन पडली. 

  ज्याचा चेहरा दिसतोय, तो राजीव...

काय करायचे, हा प्रश्न माझ्यासमोर होता. कारण माझ्याकडे राजीवचा दुसरा क्रमांकही नव्हता. कोट्टायममध्ये माझा कोणताही रिपोर्टर मित्र किंवा ओळखीची व्यक्ती राहत नाही. मग राजीवच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचायचं कसं, असा प्रश्न माझ्यासमोर उभा ठाकला. फेसबुकवर कोट्टायम राजीव वगैरे सर्च मारून काहीच हाती लागेना. शेवटी राजीवचा नंबर गुगलवर टाकला आणि शोधलं. पहिल्या पानावर तळाशी एक ब्लॉग सापडला. राजीव ज्या सोसायटीमध्ये राहतो, त्या कॉलनीच्या सदस्यांची सर्व माहिती त्यावर दिली होती. कोट्टायमममधील ‘वड्डकेनाडा रेसिडन्ट्स वेल्फेअर असोसिएशऩ’ असं त्याच्या सोसायटीचं नाव. त्या सोसायटीमधील सर्व जणांची नावे असलेला ब्लॉग सापडला आणि थोडंसं हुश्श वाटलं. त्या सोसायटीमध्ये त्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या दोन-चार जणांना फोन लावला. पण त्यांना हिंदी आणि इंग्रजी काही समजेना. ब्लॉगवरील माहितीनुसार काही जण ज्येष्ठ नागरिक होते, काही जण रोजंदारीवर काम करणारी मंडळी होती. एक वकील मिळाला. त्यांना फोन लावला, तर ते खूप बिझी होते. म्हणून त्यांनी बोलणं टाळलं. 


अखेरीस त्या सोसायटीत राहणाऱ्या बिजू नायर या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला. ते चिंगवनम पोलिस ठाण्यात कार्यरत होते. आता गोची अशी, की त्यांना हिंदी आणि इंग्रजी समजेना आणि मला मल्याळम येईना. त्यांच्या सहकाऱ्याशी बोललो. पण त्यालाही हिंदी नीट समजत नव्हते. मी त्यांना का फोन केला आहे, हे त्यांना समजत नव्हते आणि मला त्यांना सांगता येत नव्हते. त्यांना वाटलं, की मी चुकून त्यांना फोन लावलाय. त्यामुळं दोन-तीनदा राँग नंबर वगैरेही म्हणून झालं. अखेरीस एक कल्पना सुचली. 


आमच्या ऑफिसमध्ये KTजयरामन नावाचे एक गृहस्थ अॅडमिनमध्ये वरिष्ठ अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मी त्यांच्याकडे गेलो. सर्व परिस्थिती त्यांना समजावून सांगितली आणि संबंधित पोलिस अधिकाऱ्याशी चर्चा करण्याची विनंती केली. पुन्हा त्या पोलिस अधिकाऱ्याला फोन लावला आणि संवाद साधण्यासाठी जयरामन यांच्याकडे फोन दिला. दरम्यान, बिजू नायर यांनी तो फोन त्यांचे सहकारी अनीश यांच्याकडे दिला. पुढची पाच-दहा मिनिटे तो पोलिस अधिकारी आणि जयरामन यांच्यामध्ये मल्याळममधून संवाद साधला जात होता. नेमका गोंधळ काय झाला आहे, हे एव्हाना त्या पोलिस अधिकाऱ्याच्या लक्षात आले होते. सर्व पार्श्वभूमी आणि आम्हाला काय हवे आहे, हे समजल्यानंतर दोघांमधील संवाद यशस्वीपणे पूर्ण झाला. 
 

त्या पोलिस अधिकाऱ्याने तत्परतेने कुठल्या तरी कर्मचाऱ्याला त्या सोसायटीमध्ये राजीव यांच्या घरी धाडले असावे आणि माहिती दिली असावी. कारण दहाच मिनिटांनी मला राजीव यांच्या पत्नी इंदू यांचा दूरध्वनी आला. मुख्य म्हणजे त्यांना हिंदी व्यवस्थित नाही, पण समजण्याइतपत येत होते. त्यांचे पती म्हणजे राजीव हे मुंबईत ‘पंचवाद्य’ वाजविण्यासाठी दोन दिवसांसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा दूरध्वनी हरवला होता. तसे त्यांनी पत्नीला सांगितलेही होते. मोबाईल ज्या रिक्षाचालकाकडे आहे, त्याचा नंबर मी राजीव यांच्या पत्नीला दिला. त्या रिक्षाचालकाच्या नंबरवर किंवा राजीव यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून रिक्षाचालकाशी बोलून घ्यायला सांगितले. हिंदीतून बोला, हे सांगण्याची गरज भासली नाही. 

इंदू आणि टायगर यांचे बोलणे झाले असावे, कारण रात्रीच्या सुमारास मला इंदू यांचा फोन आला आणि मोबाईल माझ्या मिस्टरांनी कलेक्ट केला, असे त्यांनी सांगितले. तेव्हा ‘साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण’ झाल्याचा आनंद मिळाला.

Thursday, May 12, 2016

अशा बहिष्काराचे ‘आन्सर’ काय?


धर्मांध मुस्लिमांच्या चुकीचा फटका ‘अन्सार’ला

मी शुभम नाही, अन्सार शेख आहे, हे मी आता सर्वांना सांगू शकतो…’ केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (यूपीएससी) उत्तीर्ण झालेल्या अन्सारचं हे वक्तव्य खूपच अस्वस्थ करणारं आहे. पुण्यामध्ये राहण्यासाठी जागा मिळावी किंवा मेसमध्ये जेवण मिळावं, यासाठी त्याला स्वतःची ओळख लपावावी लागली. त्याला शुभम हे हिंदूधर्मीय मुलाचं खोटं नाव घ्यावं लागलं आणि त्यानंतरच त्याला रहायला जागा मिळाली. ही घटना खूपच अस्वस्थ करणारी आहे...

पुणेकर कधीपासून असे वागायला लागले, पुण्याच्या संस्कृतीला हे शोभणारे नाही, पुणेकर इतके कोत्या मनाचे असतील असं वाटलं नव्हतं वगैरे वगैरे… माध्यमे आणि सोशल माध्यमांवरून अशा प्रकारच्या टीका टिपण्ण्या सुरू झाल्या. अनेकांच्या मनातही असे प्रश्न निर्माण झाले असतील. कदाचित पुणेकरांच्या या असहिष्णुपणाबद्दल पुरस्कार वापसीची मोहीमही सुरू होईल. देशभरात त्याचा निषेध केला जाईल. आमच्या शहरात असे घडले नसते, तमक्या शहरात असे घडणार नाही, पुरोगामी महाराष्ट्र वगैरे तुणतुणंही वाजवलं जाईल. इ.इ.

मात्र, प्रत्येक नाण्याला दुसरी बाजूही असते आणि त्याबद्दल माध्यमे कधीच बोलणार नाहीत. लेखही छापणार नाहीत आणि त्याबद्दल चर्चाही करणार नाहीत. अन्सार शेख याला मुस्लिम म्हणून घर नाकारणं चुकीचंच आहे. त्याचं समर्थन करताच येणार नाही. मात्र, असा निर्णय घेण्यापर्यंत लोक का आले, याचा विचार आपण कधी करणार आहोत की नाही? हे समाजातील वास्तव आहे, समाजमन आहे, ते आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही? 


मुळात हल्ली लोकांना दुसऱ्याची काही पडलेली नाहीये. आपण बरं आणि आपलं कुटुंब बरं अशी लोकांची मनस्थिती आहे. हे चांगलं की वाईट हा भाग वेगळा. पण परिस्थिती अशीच आहे. त्यात जवळचे मित्र आणि नातेवाईक सोडले तर इतरांबद्दल फारसं कोणाला सोयरसुतक नाही. घरची नि ऑफिसची टेन्शन्स, ताणले गेलेले संबंध, अस्थिरतेचं वातावरण, उद्याची चिंता, परफॉर्मन्ससाठी चाललेली धडपड आणि आयुष्यातील वाढलेला तणाव यांच्यामुळे लोकं शक्य तेवढं सोपं नि सरळ आयुष्य जगण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कोणालाही त्यांच्या आयुष्यात प्रॉब्लेम्स, अडचणी किंवा ताणतणाव नको आहेत. घर भाड्यानं देताना करार करा, पोलिसांना माहिती द्या, भाडेकरूने काही भानगडी केल्या, तर पोलिस चौकशीला सामोरे जायचे वगैरे कटकटी सामान्य लोकांना नको आहेत. मुलाचं नाव अन्सार शेख. त्यातून तो जालना म्हणजे मराठवाड्यातून आलेला. त्यामुळं साहजिकच कोणीही नसत्या लफड्यात पडायला तयार होणार नाही, हे उघड आहे. आणि आता कितीही कोणीही म्हटलं, की आम्ही दिलं असतं वगैरे वगैरे, तरी अशा लोकांची संख्या आजच्या घडीला खूपच कमी आहे. (‘पुरोगामित्व असावे, पण शेजारच्या घरात’ अशी वृत्ती असलेले अनेक ढोंगी आज समाजात आहेत.)

घर भाड्याने देणे किंवा विकत देणे, ही तसं पहायला गेलं तर कोणाला द्यायचं किंवा कोणाला द्यायचं नाही, ही वैयक्तिक बाब आहे. त्यासाठी कोणताही कायदा नाही. कदाचित भविष्यात करताही येणार नाही. असा कायदा नसल्यामुळेच मांसाहारींना घर विकणार नाही किंवा फक्त जैन आणि मारवाडी यांनाच भाड्याने मिळेल, अशा सोसायट्या आढळतात. आपली मानसिकताच अशी आहे, की शक्यतो आपण जात आणि धर्म पाहून घरं भाड्यानं देतो किंवा विकत देतो. ओळखीतून आलेली व्यक्ती किंवा कुटुंब असेल, तर त्याला प्रथम प्राधान्य. घर ही वैयक्तिक प्रॉपर्टी असते आणि त्यामध्ये कोणी रहावे किंवा कशा प्रकारच्या व्यक्तीने रहावे, हे ठरविणे सर्वस्वी त्या मालकाचा अधिकार आहे. आणि व्यक्तीपरत्वे त्याच्या अपेक्षा आणि अटी बदलत जातात. (केरळ आणि काश्मीरमध्ये कदाचित वेगळी परिस्थिती अनुभवायला मिळेलही.)


आता बाहेरच्या राज्यातून किंवा जिल्ह्यातून पुण्यात शिकण्यासाठी आलेल्या एखाद्या दलित, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, जैन किंवा मागासवर्गीय अथवा मांसाहारी व्यक्तीला घर नाकारले, असते तर त्याबद्दल फारशी चर्चा झाली नसती. आता होतेय तेवढी तर झालीच नसती. मात्र, अन्सार शेखला घर नाकारले, तो ‘यूपीएससी’मध्ये उत्तीर्ण झाला आणि त्याने उघडपणे ही गोष्ट सांगतली, त्यामुळेच ही चर्चा सुरू झाली आहे. मूळ मुद्दा असा, की मुस्लिम असल्यानेच त्याला घर नाकारले. अशा घटना पूर्वीही घडल्या असतील आणि यापुढेही घडतील. पण ही पुढे आली इतकेच. (अन्सार ‘यूपीएससी’ झाला नसता, तर त्याला तेवढी व्हॅल्यूही दिली नसती माध्यमांनी. किंवा ‘यूपीएससी’ करीत असताना त्याने हा मुद्दा काढला असता, तर किती प्रसिद्धी मिळाली असती, हा भाग अलहिदा.) लोक एक वेळ घर रिकामं ठेवतील, पण मुस्लिम व्यक्ती किंवा कुटुंबाला भाड्याने देणार नाहीत, इतका टोकाचा विचार करणारे लोक आहेत. आणि बहुसंख्येने आहेत. मात्र, ही परिस्थिती का निर्माण झाली, याचा विचार आपण करणार आहोत की नाही?

समाजातील बहुतांश लोकांमध्ये मुस्लिम समाजाबद्दल पुरेसा खुलेपणा नाही, ही गोष्ट मान्य केलीच पाहिजे. त्यासाठी सर्वसामान्य मुस्लिम समाज जबाबदार नसला, तरीही सध्या जगभरात ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे इस्लामची प्रतिमा चांगलीच काळवंडली आहे. धर्माच्या नावाने ‘जिहाद’ पुकारणारे त्याला जबाबदार आहेत. सीरिया आणि इराकमध्ये धर्मयुद्ध पुकारून सामान्य नागरिकांची कत्तल करणाऱ्यांनी त्याला हातभार लावला आहे. अमेरिकेने इराक आणि अफगाणिस्तानवर हल्ला केला म्हणून, मुंबईत मोर्चे काढून ‘इस्लाम खतरे में…’ची बांग देणारे अशी प्रतिमा बनविण्याला हातभार लावत आहेत. आसाममध्ये बांग्लादेशी घुसखोर आणि स्थानिक नागरिक यांच्यातील संघर्षाला धर्मयुद्धाचे लेबल लावून आझाद मैदानावर नंगानाच घालणारे तसेच हुतात्मा स्मारकाची तोडफोड करणारे धर्मांध मुस्लिमांची प्रतिमा बिघडविण्यासाठी जबाबदार आहेत. 


देशद्रोही याकूब मेमनला फासावर लटकविल्याबद्दल मातम पाळणारे मुस्लिमांना इतर समाजापासून दूर घेऊन जात आहेत. अफझल गुरूच्या फाशीबद्दल शोक पाळणारे आणि त्याचं श्राद्ध घालणारे मुस्लिम आणि मुस्लिमेतरांमधील दरी वाढवित आहेत. मराठवाड्यात ‘आयटीआय’चं शिक्षण घेऊन भटकळ बंधूंच्या नादी लागून भारतात रक्तामांसाचा चिखल करण्यासाठी धडपडणारे ‘आदील, अफझल आणि अकबर’ ही मुस्लिम धर्माची बदनामी करत आहेत. रशिया, फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आणि जवळपास आख्ख्या युरोपमध्ये दहशतीचा नंगानाच घालणारे दहशतवाद्यांची पिलावळ जागतिक पातळीवर मुस्लिमांची नाचक्की करीत आहे. जगभरात लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्यानंतर मुस्लिमांबद्दल लोकांच्या मनात किती राग आहे, हे नक्की समजू शकेल.

पुण्यात घर भाड्याने न मिळण्याला तुझे अन्सार शेख हे नाव कारणीभूत आहेच. पण खरं कारण ते नाहीये. तर मुस्लिम समाजातील काही दळभद्र्यांनी धर्माची जी वाईट प्रतिमा बनविली आहे, ती खऱ्या अर्थानं कारणीभूत आहे. सर्व मुस्लिम दहशतवादी नाहीत, हे अगदी खरं आहे. त्यामुळे प्रत्येक मुस्लिम व्यक्तीकडे ‘त्या’ नजरेनं पाहणं चुकीचंच आहे. असं असलं तरीही बहुतांश दहशतवादी मुस्लिम आहेत, या गोष्टीकडेही दुर्लक्ष करता येत नाही. मुस्लिम धर्म दहशतवाद शिकवत नाही, हे मान्य. मात्र, तरीही रोज देशभरातील तरुण ‘आयएस’कडे आकृष्ट होत असल्याच्या बातम्या झळकतात. हे प्रमाण अगदी अत्यल्प असलं, तरीही संशयाच्या चष्म्यातून पाहण्यासाठी ते पुरेसं असतं. आता अशा चष्म्यातून पाहिलं नाही पाहिजे, वगैरे बोलबच्चन देणारे वास्तवाच्या आसपासही नाहीत. त्यांनी समाजात अधिक वावरण्याची गरज आहे.


आणि हे फक्त मुस्लिमांबद्दल आहे, असं नाही. पूर्वीही अशा घटना घडलेल्या आहेत. गांधीजींची हत्या झाल्यानंतर महाराष्ट्रात ब्राह्मणांची घरं जाळण्यात आली, दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर देशभरात शिखांचे शिरकाण झाले. मुंबईत तर तेव्हा एका पक्षाने आक्षेपार्ह पोस्टर्स लावली होती. माजी संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी त्याचा उल्लेख संसदेमध्ये भाषणादरम्यान केला होता. ‘शीख ड्रायव्हर असलेल्या टॅक्सीचा फोटो त्या पोस्टर वर होता. आणि प्रश्न विचारला होता, की या ड्रायव्हरवर तुम्ही विश्वास ठेवून टॅक्सीत बसाल का?’ दुर्दैवाने तेव्हा माध्यमे इतकी सक्षम नव्हती, म्हणून त्याची फार चर्चा झाली नाही. थोडक्यात काय, तर ‘सुक्याबरोबर ओलेही जळते’ ही म्हण सर्वज्ञात आहे. वेळोवेळी कोणाला तरी त्याचा फटका बसत आलाय. सध्या मुस्लिम समाजाला बसतो आहे, इतकंच.

पण आशा सोडण्याचे कारण नाही. कारण अन्सार शेख सारखे तरुण हेच या या जटील प्रश्नाचे ‘आन्सर’ आहेत. ‘यूपीएससी’ उत्तीर्ण होऊन काही तरी करण्याची जिद्द तो बाळगून आहेत. चांगलं आहे मुस्लिम समाजातील तरुणांनी अन्सारसारख्यांचा आदर्श घेण्याची गरज आहे. अब्दुल हमीद, एपीजे अब्दुल कलाम वगैरे नावे आहेतच. पण अन्सारसारख्या व्यक्ती तुमच्या आमच्या आजूबाजूला घडत आहेत. हा बदल खूप चांगला आहे. ‘यूपीएससी’च्या मुलाखतीदरम्यान अन्सारने एका प्रश्नाला दिलेलं उत्तर फेसबुकवर वाचण्यात आलं. ते खरं की खोटं माहिती नाही. पण उत्तर मस्त आहे. ‘तू शिया आहेस की सु्न्नी मुस्लिम आहेस?’ या मुलाखतकर्त्यांच्या प्रश्नावर अन्सार म्हणाला, ‘मी भारतीय मुस्लिम आहे.’ 

उत्तर छान आहे. आणि आशादायक आहे. असा विचार करणाऱ्या मुस्लिमांची संख्या वाढली तरच दहशतवाद, जिहाद आणि इतर मार्गांकडे वळणाऱ्या तरुणांच्या संख्येवर मर्यादा येईल किंवा ते समाजात एकटे पडतील. आणि तसे झाले तरच भविष्यातील अन्सार शेखना पुण्यात काय कोणत्याच शहरात खऱ्या नावावर घर मिळण्यात अडचणी येणार नाहीत. तोपर्यंत वाईट असले, तरीही आहे ते वास्तव स्वीकारले पाहिजे. तूर्त इतकेच.

Thursday, July 09, 2015

सर भेटले, जुने दिवस आठवले

नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी...


नोव्हेंबर १९९५… भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्याच दोन-तीन दिवसांमध्ये एका संध्याकाळी एस. पी. कॉलेजवर भाजपच्या नेत्यांची एकत्रित जाहीर सभा होती. अटलबिहारी वाजपेयी नि लालकृष्ण अडवाणी यांना एकत्र ऐकण्याची संधी तशी दुर्मिळच. तीही पुण्यात. तेव्हा आवर्जून त्या सभेला उपस्थित होतो. शिवाय सुषमा स्वराज, प्रमोद महाजन आणि भाजपची अनेक ज्येष्ठ नेते मंडळी पुण्यात आली होती. त्यांची भाषणं काही लक्षात नाहीत. पण वाजपेयी नेहमीप्रमाणेच सुंदर बोलले होते. तेव्हा फारसे थकलेही नव्हते. त्यांना भेट दिलेली तलवार उपसून बाहेर काढणारे वाजपेयी, असं फारच कॉन्ट्रास्ट चित्र त्यावेळी पहायला मिळालं होतं. (मी जर चुकत नसेन तर मित्रवर्य रवी पत्की यांनी त्याची फ्रेम घरी करून लावली होती.) 

‘दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो. तसंच काँग्रेस सरकारचं आहे. हा दिवा आज ना उद्या विझणारच आहे,’ असं मार्मिक भाष्य अटलजींनी त्यावेळी केलं होतं. त्यानुसार काँग्रेसचा दिवा विझला नि भाजपची ‘पणती’ १३ दिवसांसाठी प्रज्वलित झाली. अर्थात, तेरा दिवसांतच ती पण विझली. मात्र, त्या तेरा दिवसांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेला आनंद काकणभर अधिकच संस्मरणीय होता. कारण सर्वांचे लाडके अटलजी पंतप्रधान झाले होते. असो… तो विषय वेगळा. तर अटलजींचे भाषण संपले आणि मंडळी ‘एसपी’तून बाहेर पडू लागली. त्यावेळी पहिल्यांदा विकास मधुकर मठकरी या व्यक्तीचे दर्शन झाले. अर्थात, तेव्हा ते फक्त दिसले. ओळख मात्र, झाली नाही. 


आमचे मित्रवर्य आणि तेव्हाचे वॉर्डातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ जमविणारे सन्माननीय रवी व्यंकटेश पत्की यांनी दाखविले… ‘तो बघ विकास मठकरी. आपल्या वॉर्डाचा भाजपचा अध्यक्ष आहे. ‘अभाविप’चा पूर्णवेळ होता. आसाम आणि ईशान्य भारत, कुठल्या कुठल्या यात्रा वगैरेमध्ये सहभागी झाला होता. इइ…’ माहिती सन्माननीय रवी पत्की यांनी पुरविली. मठकरी या माणसाचं नाव माझ्या कानावर पहिल्यांदा पडलं. जीनची पँट, खादीचा शर्ट आणि पायात स्पोर्ट्स शूज. अजूनही मला तो पेहराव आठवतोय. पुढंही अनेकदा त्यांचा हाच पेहराव असायचा. तेव्हा सरांची राजदूत होती आय थिंक. कोणत्याही इतर मोटरसायकलपेक्षा जरा अधिकच फटफट आवाज करीत राजदूत निघायची. पुढे आणखी काही वर्षे तीच राजदूत ते वापरत होते. नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी… ही त्यांची ओळख करून द्यायची ष्टाइल. हे शब्द अजूनही कानात आहेत.

नंतर मग परिसरातील संघशाखा भरणाऱ्या मैदानावर (संघाच्या भाषेत संघस्थानावर) स्थानिक नगरसेविकेनं गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या नगरसेविकेला हैराण करून सोडण्याचे काम विकास मठकरी आणि दुसरे परममित्र धीरज घाटे या दोघांनी केलं होतं. ‘अटक्यात लोटकं, लोटक्यात दही… मैदानं लाटत चालली बाई’ किंवा ‘मुलांच्या जीवाशी खेळू नका, खेळाचं मैदान गिळू नका’ अशा घोषणा असो, घराघरांत पत्रक वाटणं असो, रस्त्यावर उभं राहून स्वाक्षरी मोहीम राबविणं असो किंवा इतर पर्याय असो. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून संबंधित नगरसेविकेला कानपिचक्या मिळतील, अशीही व्यवस्था करण्यात आली होती. अखेरीस ते मैदान वाचलं आणि ‘संघाच्या नादाला लागू नका,’ असा इशारा संबंधित नगरसेविकेला वरिष्ठांनी दिल्याचंही समजलं.


मला वाटतं विकास मठकरी आणि धीरज घाटे या दोघांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून यशस्वी केलेलं ते पहिलं आंदोलन असावं. त्यानंतर मग विकास मठकरी यांची सातत्यानं भेट होऊ लागली. चहा पिता पिता गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या घरी या ना त्या निमित्तानं जाणं-येणं होऊ लागलं. तेव्हा ते अंकुश काकडे यांच्या शेजारच्या इमारतीत रहायचे. आमच्या वॉर्डाचे भाजपचे अध्यक्ष हीच त्यांची ओळख होती. नगरसेवकपदासाठी उभे राहणार, एवढीच चर्चा होती. पण नगरसेवक नव्हते. विकास मठकरी या नावानं त्यांना आम्ही कधीच बोलावलं नाही. आमच्यासाठी ते कायमच मास्तर किंवा सर राहिले. सरांबद्दलची आणखी एक आठवण म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा मटण खाल्लं होतं. नवी पेठेतल्याच कुठल्याशा गच्चीवर कार्यक्रम झाला होता. नीटसं आठवत नाही, पण कदाचित सरांच्याच गच्चीवर झाला होता.

सरांनी पहिली निवडणूक लढविली १९९७ साली. गोपाळ तिवारी यांच्याविरोधात. जोरदार प्रचार करून त्यांनी गोपाळदादांना घाम फोडला होता. इतके प्रयत्न करूनही मठकरी मास्तर पडणार, असाच होरा होता. मात्र, सर ठाम होते. ‘आशिष, मी जिंकणार. एक मतानं का होईना पण मी जिंकणार,’ हा सरांचा ठाम विश्वास होता. ‘उमेदवार झक्कास, मठकरी विकास’ असं सांगत कार्यकर्ते आख्ख्या वॉर्डभर हिंडत होते. पण गोपाळ तिवारी यांनी मतदारसंघ उत्तम बांधला होता. अखेरीस झालंही तसंच तेरा की चौदा मतांनी सर जिंकले आणि नगरसेवक झाले. नंतर सलग तीनवेळा निवडणूक जिंकले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अगदी सहजपणे काहीच हातात पडलं नाही. 



सरांची दुसरी टर्म त्याच भागातून होती. पण तेव्हा वॉर्डाचा प्रभाग झाला होता. त्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य त्यांचंच होतं. तेव्हा मी ‘केसरी’त बातमीदारी करीत होतो. काही महिने महापालिका बीटही होतं. तेव्हा त्यांची महापालिकेत भेट व्हायची. मात्र, नंतर मी ई टीव्हीत गेलो आणि संपर्क तुटला. तिसरी टर्म वेगळ्या मतदारसंघातून होती.

२००७ मध्ये बीएमसीसीच्या वॉर्डातून निवडणूक लढविण्याची संधी त्यांना मिळाली. तेव्हाही दोन दिग्गजांचे तिकिट कापून त्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती. तेव्हा निवडणूक काळात कर्वे रोडच्या गिरीजात सरांची एकदा भेट झाली होती. तेव्हाही प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत होता. ‘आशिष, मी जिंकणार रे.’ कुठे काय यंत्रणा लावलीय, कसे प्रयत्न चालू आहेत आणि कसे प्रयत्न चाललेत सगळं सविस्तर सांगून टाकलं. सर तिथूनही जिंकले आणि नगरसेवकपदाची हॅट्ट्रिक झाली. 

सर त्याच सुमारास ते बीएमसीसी कॉलेजच्या परिसरात रहायला गेले आणि आमच्या गाठीभेटी कमी झाल्या. क्वचित कधीतरी त्यांचा फोन यायचा. बातमी किंवा लेख वाचला, असं सांगायला येणारे फोनच अधिक. मी कधीतरीच त्यांना फोन करायचो. धीरजच्या कुठल्याशा कार्यक्रमात, कुठल्याशा सभा किंवा जाहीर कार्यक्रमात त्यांची भेट व्हायची. काय चाललंय, सध्या कुठे वगैरे विचारपूस व्हायची इतकंच. पुढे २००९ मध्ये त्यांचे लोकसभेसाठी प्रयत्न सुरू होते. नंतर विधानसभेला शिवाजीनगरमधून लढले. त्यावेळी मी साम मराठीत होतो. तेव्हा फोनवरून गप्पा व्हायच्या.


हे आता आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच विकास मठकरी उर्फ मास्तर उर्फ सरांची कोथरूडमधल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एका दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले, की आशिष, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… मी चाट पडलो. कारण त्या दिवशी वाढदिवस नव्हताच. सरांना धन्यवाद दिले आणि सांगितलं, की अहो आज माझा वाढदिवस नाहीये. त्यांच्याकडे चुकून त्या दिवशी माझा वाढदिवस अशी नोंद झाली होती. बाकी गप्पाटप्पा झाल्या. मला म्हटले, ‘अरे, आशिष किती दिवस झाले आपण भेटलो नाही. आता माझा उपयोग नाही, म्हणून भेटणं किंवा फोन करणं बंद करायचं का?’ 

बापरे, त्यांचं हे वाक्य मला खूप लागलं. अर्थात, जेव्हा ते चांगले होते. राजकारणात सक्रिय होते, तेव्हाही त्यांचं माझं भेटणं अगदी नैमित्तिक होतं. कामासाठी वगैरे तर नाहीच नाही. पण तरीही मला ते वाक्य ऐकून मनाला खूप वाईट वाटलं. सगळे लोक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करणारेच असतात. आज मठकरींकडे काही नाही, म्हणून आपण त्यांना फोन करत नाही किंवा भेटत नाही, असं वाटायला नको म्हणून त्यांना म्हटलं, ‘सर, अहो असं काही नाही. तुम्ही सांगा कधी भेटायचं. मी त्यादिवशी येतो भेटायला. वाटलं तर रवीला पण घेऊन येतो.’ ‘आज संध्याकाळी ये पाचनंतर मी मोकळा आहे.’ सरांनी फर्मान काढले. तुम्ही म्हणाल तेव्हा येतो, म्हटल्यामुळं मला पर्यायच नव्हता. त्यामुळं संध्याकाळी सव्वा पाच वाजता सरांच्या कोथरूडमधल्या निवासस्थानी पोहोचलो.


दीडएक वर्षांपूर्वी सरांना अर्धांगवायूचा त्रास झाला आणि खाटकन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उज्ज्वल राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला होता. अॅडमिट झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या वाचनात यायच्या. त्यांनी हॉस्पिटलमध्ये भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक घेतल्याचंही कळलं होतं. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते आहे, असं कानावर यायचं. नंतर दोन-तीनदा फोनवर बोलणंही झालं. विशेषतः निवडणुकीच्या काळात. तेव्हा ते रामदेव बाबांच्या आश्रमात उपचार घेत होते. मास्तर, वैशालीत येऊन गेले, भाजपच्या कार्यालयात त्यांनी उपस्थिती लावली, असंही अधनंमधनं कळायचं. धीरज मध्यंतरी सरांना टिळक टँकवर जाऊन भेटला होता. तिथले फोटोही त्यानं फेसबुकावर टाकले होते. एक-दोनदा सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची भेटही झाली. पण निवांत गप्पा झाल्या नव्हत्या. त्या मारण्यासाठीच कोथरूडमधलं घर गाठलं. 

सर एकदम मस्त मूडमध्ये होते. पुतण्याकडून ‘शिवांबू’चे फायदे आणि शरीरावर होणारे शास्त्रीय परिणाम समजावून घेत होते. सध्या ‘शिवांबू’ची ट्रीटमेंट सुरू केलीय. ‘शिबांवू’ प्राशन, शिवांबूपासून मसाज वगैरे गोष्टी अगदी उत्साहानं सांगत होतं. शिवांबू प्राशन करण्याच्या कालावधीत काय खायचं आणि काय नाही खायचं, याचे स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहेत, असं सांगत होते. शिवांबू घ्यायला लागल्यापासून खूप फरक जाणवतोय, असंही म्हणत होते. इतर पथ्य नि उपचार पद्धतींबद्दल सांगत होते. दिवसभर काय करतो, किती चालतो, याची माहिती देत होते. पूर्वी रोज दहा-बारा किलोमीटर सहज चालणं व्हायचं. सायकलिंग व्हायचं. पक्षाच्या बैठकीला एखाद्या मतदारसंघात गेलो तर तिथून चालतच घरी यायचो. अगदी वडगांव शेरीतूनही घरी चालत आलोय, असं हसत हसत सांगत होते. मी इतका फिट होतो… पण त्यादिवशी ढोलाचं टिपरू लागलं आणि मग पुढचं सगळं रामायण घडलं, हे सांगताना त्यांचा चेहरा पाहवत नव्हता.


पण इतकं सगळं असूनही पुन्हा एकदा नव्यानं मैदानात उतरण्याची जिद्द त्यांच्या बोलण्यात होती. नजरेत होती. सरांच्या या गोष्टीचं मला कायम अप्रूप वाटतं. त्यांच्यामध्ये असलेली लढण्याची प्रचंड जिद्द, दुर्दम्य आत्मविश्वास आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं राजकारणात उतरण्यासाठी चाललेली धडपड. एखादा असता तर खचलाच असता. गपचूप शिकविण्याचे काम करून सर्वसामान्य प्राध्यापकाचे जीवन जगण्यात धन्यता मानली असती. पण सहजपणे हार मानतील किंवा परिस्थितीला शरण जातील, ते सर कसले. या अतिअत्यंत प्रतिकूल परिस्थितीही त्यांना ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची आहे. पुन्हा एकदा राजकारणात जायचं आहे. काही जणांना हे अवास्तव किंवा निरर्थक वाटू शकतं. पण मला मात्र, त्यांची लढाऊ वृत्ती यातून दिसते.

मास्तरांची लढाऊ वृत्ती अनेक निवडणुकांमधून दिसलीय. गोपाळ तिवारींविरोधात दिसलीय. अनिल शिरोळे यांच्याशी असलेल्या सुप्त संघर्षाच्या प्रसंगी दिसलीय. गोपीनाथ मुंडे यांनी कोत्या मनाने त्यांच्यावर टाकलेल्या बहिष्काराच्या प्रसंगी दिसलीय. खडकवासला भाजपकडे खेचून आणताना दिसलीय. गणेश बिडकर यांना स्थायी समिती अध्यक्ष करताना दिसलीय. पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरतानाही दिसलीय. सरांचा तो संघर्ष आजही सुरूय. आधी तो पक्षांतर्गत विरोधकांशी होता. विरोधी पक्षातल्या लोकांशी होता. आज तो परिस्थितीशी नि नियतीशी सुरू आहे.



पुण्या-मुंबईत झालेल्या उपाचारांनंतर त्यांनी उत्तराखंडमध्ये रामदेव बाबांचा आश्रम गाठला. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रामदेव बाबांकडे शब्द टाकला. ‘हा माझा माणूस आहे. हा खणखणीत व्हायलाच पाहिजे. तुम्ही स्वतः लक्ष घाला.’ रामेदवबाबांचे उपचार आणि प्रचंड पथ्य यामुळे माझ्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली, असं सर स्वतः सांगतात. अनेक पद्धतीचे उपचार, अनेक प्रकारचे व्यायाम, मालिश आणि इतर पूरक औषधांमुळे सध्या मी ७० टक्के बरा झालो आहे. लवकरच उर्वरित तीस टक्के बरा होईन, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा ऐकायला मिळत होतं. 

कोणाचीही मदत न घेता सर स्वतः स्वतःचे चालत होते. स्वतःची काम स्वतः करत होते. मध्यंतरी पदवीधर मतदारसंघातील चंद्रकांतदादा पाटलांच्या विजयानिमित्त श्रमपरिहाराचे आयोजन करण्यात आले होते. तिथं सरांची भेट झाली होती. कुठल्याशा मिळालेल्या पत्रकाची त्यांनी स्वतः घडी घातली. एक हात आणि दात यांचा वापर करून घडी घातली नि पत्रक खिशात ठेवलं. खाली पडलेलं पत्रक स्वतः उचललं, कोणाच्याही आधाराविना स्वतः उठून उभे राहिले. उभं राहण्यासाठी दिलेला मदतीचा हात त्यांनी अत्यंत विनम्रपणे नाकारला. अशी स्वाभिमानी आणि स्वावलंबी वृत्ती तेव्हाही जाणवत होती. त्या तुलनेत परवा भेट झाली तेव्हा सरांची प्रकृती खूपच उत्तम वाटली. तब्येत खूप सुधारली आहे, हा त्यांचा दावा योग्य वाटत होता. 

पक्षाचं काय चाललंय, आठ आमदार आणि एक खासदार काय म्हणतायेत, कोण कशा पद्धतीनं काम करतंय, लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये पक्षाबद्दल, सरकारबद्दल काय भावना आहे, केंद्र आणि राज्य सरकारबद्दल काय वाटतं? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार करत होते. त्यांच्या नसानसांमध्ये फक्त भाजपच ठासून भरलाय, असं पदोपदी जाणवतं होतं. ‘आशिष, माझी संधी हुकली रे…’ हीच त्यांची भावना होती. मागे दोन ते तीनवेळा त्यांनी फोनवर तसं बोलूनही दाखवलं होतं. परवा मात्र, ते थेट तसं बोलले नाहीत. पण भावना व्यक्त होत होती.


पुण्यातील भाजपचा आक्रमक, अभ्यासू आणि धडाकेबाज नगरसेवक आज अशा अवस्थेत आहे, हे पाहून खूपच वाईट वाटतं. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, अभाविपच्या कामाचा अनुभव (सध्या भाजपमध्ये हा अनुभव सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो, अशी माझी ठाम भावना आहे.), मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्त्व, तुलनेनं तरूण नि धडाकेबाज असे अनेक नेतृत्व गुण त्यांच्याकडे होते-आहेत. पुण्याचे भावी खासदार किंवा भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. नरेंद्र मोदींच्या लाटेत गावगन्ना मंडळी आमदार-खासदार झाली. विकास मठकरी तर दोन हजार टक्के निवडून आले असते. पण आता ते त्यांच्या नशिबात नव्हते. आपल्याला याबद्दल इतकं वाईट वाटतं, तर स्वतः मठकरींना त्याबद्दल किती वाईट वाटत असेल. 

सरांना म्हटलं, सर तुम्ही बाकी काही विचार करू नका. आधी ठणठणीत व्हा. मस्त पहिल्यासारखे बरे व्हा. नशिबात जे लिहिलं असेल ते कधीच तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. मिळणार असेल ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या. पण त्याचा विचार तुम्ही आता करू नका. नंतर ते नक्की मिळेल, यावर विश्वास ठेवा. त्यांनाही ते पटलं. पण आता मिळालं नाही, याचं दुःख त्यांना होतं. 

शिवाजीनगर मतदारसंघात पुन्हा एकदा फिरायचंय. जनसंपर्क अभियान राबवायचंय, असं म्हणत होते. अधूनमधून कार्यकर्त्यांचे एक-दोन फोनही येऊन गेले. आमच्या गप्पा सुरू असतानाच नारायण पेठेतील सरांचा (म्हणजेच पक्षाचाही जुनाच) कार्यकर्ता बिपीनही (आडनाव आठवत नाही आत्ता!) आला होता. कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष की चिटणीस होते, ते देखील सरांना भेटायला आले. ही मंडळी सरांना कायम भेटायला येत असावी. म्हणजे तसं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. 


आधीही म्हटल्याप्रमाणे हल्लीचा जमाना हा ‘उगवत्या सूर्याला’ नमस्कार करणाऱ्यांचा आहे. राजकारणात तर दररोज नवे सूर्य उगवतात नि मावळतात. पण मला वाटतं, सर तुम्ही आता याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या नशिबात आहे, ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या हमखास मिळणार. सुदैवाने तुम्ही ज्या पक्षात आहात, तो पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देणारा आहे. तेव्हा तुम्हाला न्याय नक्की मिळेल. आणि जेव्हा मिळेल तेव्हा आतापर्यंतचा बॅकलॉग भरून निघेल इतकं मिळेल. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला…

तेव्हा लवकर बरे व्हा. तंदुरुस्त रहा…

तुमचे आरोग्य उत्तम राहो, हीच प्रार्थना.