Showing posts with label RSS. Show all posts
Showing posts with label RSS. Show all posts

Sunday, August 26, 2018

सोशल मीडियावरील उरबडवे


केरळमधील मदतकार्याच्या निमित्ताने...

केरळ म्हणजे देवाची स्वतःची भूमी… गॉड्स ओन कंट्री… केरळमध्ये जो महाप्रलय आलाय त्याबद्दल व्यक्त करावे तितके दुःख थोडे आहे. एर्णाकुलम, त्रिश्शूर, पटनमतिठा आणि अल्लपुळा हे सर्वाधिक फटका बसलेले जिल्हे आहेत. हा प्रलय नेमका कशामुळे आलाय हे कालांतराने स्पष्ट होईलच. मानवी चुका आणि धरणांमधील पाण्याचे फसलेले नियोजन ही प्राथमिक कारणे वाटत आहेत. मात्र, तज्ज्ञ आणि अभ्यासक त्याबद्दल योग्य ते मतप्रदर्शन करतील. फेसबुकावरील आणि सोशल मीडियावरील अभ्यासकांनी त्याबद्दल न बोललेलेच बरे. पर्यावरण तज्ज्ञ माधवराव गाडगीळ यांनी त्याबद्दल अत्यंत योग्य असे विश्लेषण केलेले आहे. मात्र, केरळमधील महाप्रलयापेक्षाही अधिक महाभयंकर आणि शिसारी आणणारा महाप्रलय हा सोशल मीडियावर आलेला आहे. अत्यंत हीन दर्जाच्या फेसबुक पोस्ट्स आणि दळभद्री वृत्ती दर्शविणारे मेसेजेचा हा महाप्रलय माझ्यासारख्या अनेक संवदेनशील मंडळींसाठी चिंतेचा विषय ठरलेला आहे. 


काय तर म्हणजे केरळमध्ये मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मियांचे प्रमाण अधिक आहे म्हणून तिथे महाप्रलय आला आहे? मुस्लिम आणि ख्रिश्चन हे मोठ्या प्रमाणावर धर्मांतर घडवून आणतात म्हणून त्यांना मिळालेली ही शिक्षा आहे. केरळमध्ये धर्मांतरे घडवून आणली जातात आणि राष्ट्रीय स्वसंयेवक संघाच्या स्वयंसेवकांवर हल्ले होता, त्यांच्या हत्या घडवून आणल्या जातात म्हणून केरळला मदत पाठवूच नका. ती धर्मांतरासाठी नि स्वयंसेवकांच्या हत्या घडविण्यासाठी वापरली जाईल. चर्च आणि मशि‍दींकडे हात पसरून मदत मागा की… कशाला भारतीय सैन्य आणि संघाची मदत स्वीकारता? केरळमध्ये मोठ्या प्रमाणावर बीफ खाणारा समाज आहे. त्यांच्या गैरकृत्यांची शिक्षा पुरामुळे मिळाली आहे. उघडउघडपणे गोमातेची हत्या करणाऱ्यांना चांगला धडा मिळाला आहे. अर्थतज्ज्ञ असणाऱ्या एका व्यक्तीने काय ट्वीट केले, तर शबरीमलामध्ये महिलांना प्रवेश देण्याचा आणि सध्याच्या घटनांचा संबंध तपासून पाहिला पाहिजे. नंतर सारवासारव केली. पण अशा पद्धतीचे संबंध लावायचे प्रयत्नही झाले. संयुक्त अरब अमिरातीने सातशे कोटींची मदत जाहीर केल्याच्या मुद्द्यावरूनही बराच गहजब माजला. हे पैसे धर्मांतरासाठीच वापरले जातील वगैरे… ती मदत जाहीर झालेलीच नव्हती हे पुढे स्पष्ट झालेच. 
 
   केरळ प्रांताचे सहसंघचालक के. के. बलराम

अत्यंत निर्लज्जपणे अशा प्रतिक्रिया व्यक्त करणारे कोण आहेत तर स्वतःला उच्चशिक्षित आणि सुसंस्कृत समजणारे. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवणारे आहेत. संघाचे स्वयंसेवक म्हणवणारेच असे मेसेजेस फॉरवर्ड करण्यात अग्रेसर आहेत. संकटात सापडणाऱ्याला मदतीचा हात पुढे केला पाहिजे, ही आपली संस्कृती. पण सोशल मीडियावर विनाकारण उरबडवेगिरी करणाऱ्या अनेकांना त्या संस्कृतीचा विसर पडत चाललेला आहे, असे खेदाने म्हणावे लागते आहे. आमच्या एका मित्राने फेसबुकावर एक पोस्ट टाकली. बकरी ईदच्या दिवशी मशिदीचीमध्ये पाणी साचले म्हणून त्या गावातील मुस्लिम नागरिकांची व्यवस्था मंदिरातील एका खोलीत करण्यात आली. तसेच त्यांना नमाज पढण्यासाठी मंदिराचा की मंदिरातील खोलीचा उपयोग करू दिला. कठीण परिस्थितीतही जातीय सलोखा कसा टिकविला जात आहे, हे दर्शविणारी ती पोस्ट होती. त्यावर लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर आपलीच आपल्याला लाज वाटावी. (विरुद्ध बाजूची बातमी देखील वाचायला मिळते. पण अनेक जण त्याकडे दुर्लक्ष करतात.) हिंदू धर्मभोळे आहेत, संघ स्वयंसेवकांच्या इतक्या हत्या केल्या तरीही.. किंवा सापाची जात कितीही दूध पाजले तरी… वगैरे वगैरे. देवा काय हे… अहो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कै. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी संघ मुख्यालयात आणि शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी मातोश्रीवर नमाज पढण्यासाठी मुस्लिम व्यक्तींना परवानगी दिल्याचे दाखले सापडतात. गुगल जरा सर्च करून पाहा. देवरस आणि ठाकरे यांच्या हिंदुत्वापेक्षा अधिक कट्टर हिंदुत्ववादी कोणी असेल असे वाटत नाही. कोणत्या गोष्टीचा तर्क कुठे लावायचा याला काहीतरी मर्यादा असावी. पण सर्व देशाची आणि हिंदूंच्या रक्षणाची जबाबदारी आपल्यावरच आहे, अशा थाटात सोशल मीडियावरील उरबडवे वावरताना दिसत आहेत.


सोशल मीडियावरून उठलेले विद्वेषी मेसेज वाचल्यानंतर केरळमध्ये कोणाशी तरी बोलले पाहिजे, असे वाटले. आणि मग केरळ प्रांताचे सहसंघचालक के. के. बलराम यांच्याशी बोललो. मागे केरळला गेलो होतो तेव्हा कण्णूरला त्यांची आवर्जून भेट घेतली होती. जवळपास तास-दीडतास चर्चाही झाली होती. फॅमिली कोर्टात त्यांची कुठली तरी केस चालू होती. पण त्यातही वेळात वेळ काढून त्यांनी मला वेळ दिला होता. या सर्व पार्श्वभूमीवर बलरामजी यांच्याशी पुन्हा एकदा बोलले पाहिजे, असे राहून राहून वाटत होते. पण वाटून वाटून ते राहतच होते. अखेर रविवारी त्याला मुहूर्त मिळाला. माझ्या मनातील अनेक प्रश्न त्यांच्याशी मोकळेपणाने शेअर केले. 

बलराम म्हणाले, की केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सेवाभारतीच्या नावाने मदतकार्यात सहभागी झाला आहे. संघाचे स्वयंसेवक सेवाभारतीच्या बॅनरखाली मदतकार्य करीत आहेत. संघासह सर्व सामाजिक संघटनांचे आणि राजकीय पक्षांचे कार्यकर्ते फक्त आणि फक्त मदतकार्यात गुंतलेले आहेत. सोशल मीडियावर मेसेज फॉरवर्ड करण्यात आणि परस्परांना शिव्या घालत बसायला त्यांना अजिबात वेळ नाही. अगदी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्तेही मदतकार्यात सहभागी आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिम समुदायांच्या संघटनाही झोकून मदतकार्य करत आहेत. प्रत्येकाचे क्षेत्र वेगवेगळे आहे. बालेकिल्ले वेगवेगळे आहेत. पण सर्व जण काम करीत आहेत. सर्वांची भूमिका ही परस्परांना पूरक अशीच आहे.

सोशल मीडियावर देशभरात काहीही मेसेज फिरविण्यात येत असले तरीही केरळमधील नागरिक सूज्ञ आहेत. त्यांच्यामध्ये अशा कोणत्याही अंधश्रद्धा नाहीत, की अमुक केल्यामुळे पूर आला किंवा तमुक केल्यामुळे पूर आला. संघ स्वयंसेवकांच्या हत्या केल्यामुळे हा प्रलय आला आहे किंवा केरळमध्ये बीफ खातात म्हणून ही शिक्षा झाली, अशी कोणतीही भावना नागरिकांच्या मनात नाही. संघ स्वयंसेवकांच्या मनातही नाही. आम्ही सर्व स्वयंसेवक फक्त आणि फक्त केरळ पुन्हा एका उभे करण्यासाठी झटतो आहोत. खरं तर सर्वच जण त्यासाठी झटत आहेत. माकपचे कार्यकर्ते आणि संघाचे स्वयंसेवक यांच्यामध्ये मदतकार्यावरून मारामाऱ्या होत आहेत का, परस्परांना ठोकले जाते आहे का, असा प्रश्न त्यांना विचारला. अशा घटना फार घडलेल्या नाहीत. एकदोन ठिकाणी तसं झालंही असेल, पण ते सर्वच ठिकाणी होतंय, असं म्हणणं चुकीचं ठरेल. त्यालाही काही वेगळी परिमाणं आहेत का, हे तपासून पाहिलं पाहिजे.


न राहून संघाबद्दलचा शेवटचा प्रश्न त्यांना विचारलाच. वास्तविक पाहता, मला जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ माहिती आहे किंवा संघाच्या स्वयंसेवकांची जी ओळख आहे, त्यावरून माझ्या मनात तरी काहीही शंका नाहीत. १९९७मध्ये कझाकस्तान आणि सौदी अरेबिया यांच्याविमानांची हवेत टक्कर होऊन झालेल्या अपघातात जवळपास ३५० प्रवाशांचा मृत्यू झालाहोता. बहुतांश प्रवासी हे मुस्लिम होते. अपघातानंतर चरखी दादरी येथे विमानं कोसळली होती. त्यावेळी छिनविछिन्न झालेल्या मृतदेहांचे अवयव एकत्र करणे, मृतांच्या नातेवाईकांना मृतदेहांची ओळख पटवून देण्याचे काम करणे आणि लागेल ती प्रत्येक मदत संघाचे स्वयंसेवक त्या वेळी करीत होते. विमानातील प्रवासी कोणत्या जातीचे आहेत किंवा धर्माचे आहेत, याचा फारसा विचार न करता मदतकार्य त्यावेळी करण्यात आले होते. ही आठवण मनात होतीच. पण तरीही सातत्याने सोशल मीडियावर वाचनात येत होतं, म्हणून तो प्रश्न मनात होता आणि त्यामुळेच तो विचारला. 

एखाद्या मुस्लिमबहुल किंवा ख्रिश्चनबहुल गावांमध्ये संघाचे स्वयंसेवक किंवा सेवाभारतीचे कार्यकर्ते मदत करत आहेत ना? त्यांचे उत्तर होते, अर्थातच. तुम्हाला तर माहिती असेलच की मदतकार्य करताना अशा पद्धतीने कधीच भेदभाव केला जात नाही. संघाच्या स्वयंसेवकांकडून कधीही असे कृत्य होणार नाही. जात, धर्म, पंथ, भाषा आणि सर्व भेदाभेद विसरून मदतकार्य सुरू आहे. सुदैवाने केरळमध्ये अशा पद्धतीने मेसेजेसचा सुळसुळाट नाहीये. आणि असे मेसेज माझ्या अपरोक्ष फिरत असले, तरीही त्यांना फारसं कोणी गांभीर्यानं घेत नाही, हे मी निश्चित सांगू शकतो.

माझे बहुतांश पत्रकार मित्र हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी संबंधित आहेत. कार्यकर्ते आहेत किंवा समविचारी आहेत. फक्त एक-दोन काँग्रेस विचारांचे आहेत. त्यांच्याकडूनही तेथील मदतकार्यांचे फोटो, माहिती आणि वर्णन समजत होतेच. त्यामुळे सर्वच जण तिथं मदतकार्यात आहेत, हे समजत होतंच. पण तरीही संघाच्या अधिकृत व्यक्तीकडून माहिती मिळावी, म्हणून त्यांच्याशी बोललो. केरळमध्ये प्रत्यक्ष मदतकार्यात कार्यरत असलेल्या व्यक्तीकडून तिथली परिस्थिती ऐकल्यानंतर माझ्या मनात नसलेल्या पण सोशल मीडियावरील उरबडव्यांच्या प्रश्नांची उत्तर मिळाली होती. केरळमध्ये पूर ओसरेल. पाण्याचा निचरा होईल. मदतकार्याच्या जोरावर केरळ पुन्हा एकदा उभे राहील. पण आपल्याकडे सोशल मीडियावर मानवताविरोधी उरबडव्यांच्या नीच वृत्तीचा निचरा कधी होईल… संकटाच्या समयी देखील परस्परांची उणीदुणी काढून एकमेकांना हिणवण्याच्या मनोवृत्तीचा पूर कधी ओसरेल… आम्हीच हे करतोय ते काय करतायेत असे प्रश्न विचारून कायम दुसऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याच्या मानसिकतेला कधी ओहोटी लागेल…   

 

कदाचित कधीच नाही. कारण सोशल मीडियावर आपल्याला करायचं काहीच नाहीये. फक्त लाइक, कॉमेंट (ती देखील फारसा विचार न करता) आणि फॉरवर्ड, शेअर करायचं आहे. ते देखील एकप्रकारचं मदतकार्य आहे, देशकार्य आहे, असं समजणारे लोक आहेत. ती मंडळी असेपर्यंत अशा मेसेजेसचा सुळसुळाट सुरूच राहील. पण सुदैव असं, की प्रत्यक्षात काम करणारे हातही आहेत. ते सर्वच विचारांच्या संघटनांचे आहेत. फक्त एकाच नाहीत. ते एकमेकांचे विरोधक असतीलही. वैरीही असतील. पण सध्या एकमेकांना पूरक भूमिका घेऊन मदतकार्य करीत आहेत. ही गोष्ट माझ्यासाठी खूप दिलासादायक आहे. कदाचित माझ्यासारख्याच अनेकांसाठीही… 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी आलेल्या स्वामी अग्निवेश यांना यांना मारहाण करणारे कार्यकर्ते (कार्यकर्ते भाजपाचे होते, की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही), हिंदुत्वाच्या नावाखाली तथाकथित पुरोगामी विचारवंतांच्या हत्येच्या आरोपांखाली अटक झालेले ढोंगी हिंदुत्ववादी आणि केरळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर अत्यंत खालच्या दर्जाचे मेसेजेस फिरविणारे बेगडी हिंदुत्ववादी तसंच संघ स्वयंसेवक म्हणून मिरविणारे हे एकाच माळेचे मणी आहेत, असं खेदानं म्हणावसं वाटतं. हिंदुत्व आणि संघ देखील असं कधीच सांगत नाही. किमान मला जो संघ माहिती आहे, मला हिंदुत्वाची ओळख आहे ती अशी नाही. 

Monday, January 11, 2016

संघशक्तीचा अपूर्व संगम



महाराष्ट्रातही दिसली संघाची ताकद

आयुष्यात काही प्रसंग, घटना किंवा आंदोलने अशी असतात, की जे अनुभवण्याची संधी क्वचितच मिळते. वैयक्तिक आयुष्यातही आणि संघटनेच्या आयुष्यातही. अशा दुर्मिळ प्रसंगांचे जे साक्षीदार होतात, ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यासाठी तळजाईचे शिबिर किंवा रामजन्मभूमीचे आंदोलन अशी काही उदाहरणे देता येतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अपूर्व अशा शिवशक्ती संगमला अशाच कार्यक्रमांच्या पंक्तीत बसविले पाहिजे. केरळ, मेंगळुरू, कर्नाटकातील इतर शहरे, महाकोशल वगैरे प्रांतांमध्ये झालेल्या संघाच्या भव्य एकत्रीकरणांच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. त्यांच्या ध्वनिचित्रफिती पाहून आनंदी होतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अतिभव्य एकत्रीकरण आपण का घेऊ शकत नाही, याची सल प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात होती. ती सल शिवशक्ती संगमच्या निमित्ताने दूर झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने संघाचे भव्यदिव्य शिबिर गेल्या काही दशकांमध्ये पार पडले नव्हते. प्रत्येक वेळी दाखला दिला जायचा तो १९८३ साली पार पडलेल्या तळजाईच्या शिबिराचा. त्यानंतर संघाचे अशा प्रकारे अतिविराट एकत्रीकरण महाराष्ट्रात झाले नव्हते. माजी सरसंघचालक माननीय राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांना मानवंदना देण्यासाठी २००० किंवा २००१ मध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माटुंग्याहून संचलन करून शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर तिथे सरसंघचालक प्रणाम आणि मा. रज्जूभैय्या यांचे बोलणे, असा कार्यक्रम होता. मात्र, संख्यात्मकदृष्ट्या तो कार्यक्रम तळजाईच्या शिबिराला मागे टाकू शकला नव्हता. मुंबई म्हणजे राज्याच्या एका टोकाला असलेले स्थान हा त्यामधील मुख्य अडसर ठरला असावा. त्यामुळेच यावेळी संघाने नव्या रचनेतील प्रांतशः एकत्रीकरण घेण्याचे ऩिश्चित केले असावे. मध्यंतरी मराठवाडा प्रांताचे एकत्रीकरण औरंगाबाद येथे पार पडले आणि आता पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे शिवशक्ती संगम हे ‘न भूतो’ असे एकत्रीकरण मोठ्या दिमाखात संपन्न झाले.


नाशिक, नगर, पुणे महानगर, पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात (दंड नाही) जांबे, नेरे आणि मारुंजी या तीन गावांच्या सीमांवर आय़ोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती संगममध्ये सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास एक लाख साठ हजार स्वयंसेवकांनी या संगमसाठी नोंदणी केली होती नि त्यापैकी निम्म्याहून अधिक स्वसंयेवक गणवेशात उपस्थित राहिले. पन्नास ते साठ हजारहून अधिक नागरिक हा भव्यदिव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी मारुंजी येथे आवर्जून आले होते. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश होता.

भोजनासह सर्व व्यवस्था अत्यंत चोखपणे आणि ठरलेल्या नियोजनानुसार पार पडत होत्या. कुठे धक्काबुक्की नाही. चेंगराचेंगरी नाही. सारे काही शिस्तीत. हीच शिस्त कार्यक्रम संपल्यानंतरही अनुभवायला मिळत होती. कार्यक्रम संपल्यानंतरही कुठे महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या नाहीत. रस्त्यावरील दुकाने लुटल्याच्या बातम्या छापून आल्या नाहीत. अपघाताच्या घटना घडल्या नाहीत. दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे वृत्त कानावर आले नाही. इतर राजकीय पक्ष (काही सन्मान्य अपवाद वगळता) आणि संघटनांच्या महाएकत्रीकरणानंतर जे जे ऐकायला मिळते, त्यापैकी कशाचाही अनुभव शिवशक्ती संगम संपल्यानंतर आला नाही. हे संघाचे आणखी एक वैशिष्ट्य.


कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला धनुष्यबाण अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. भुवयाही उंचवायला लावत होता. मात्र, संघाचे संघटन हे हिंदूंचे आहे. हिंदुत्वाला मानणाऱ्यांचे आहे. हिंदुत्वाचा विचार करणारे कोणीही आम्हाला परके नाही. हाच संदेश देण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. प्रभू श्रीरामचंद्रांचा हा धनुष्यबाण सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता.

मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले भव्यदिव्य असे व्यासपीठ आणि अत्यंत शिस्तबद्धपणे करण्यात आलेली आखणी, चर्चेचा विषय ठरली होती. संघस्थानाच्या परिसरात शिवकालीन वातावरण निर्माण करण्यात आले होते. विविध किल्ल्यांमधील दिंडी दरवाजांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. तटबंदीचे स्वरुप देण्यात आले होते. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचे पुतळे, हत्ती, आणि घोड्यांच्या प्रतिकृती शिवकालात घेऊन जात होत्या. महाराष्ट्रातील सामाजिक महापुरुषांची शिल्प साकारण्यात आली होती. कार्यक्रमाला येणारा प्रत्येक जण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, अण्णा भाऊ साठे, सयाजीराव गायकवाड, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या पुतळ्यांपाशी आवर्जून थांबत होता. हात जोडत होता. अभिवादन करत होता.

तीन जानेवारीचा अनुभव ज्यांनी घेतला, त्यांना संघाच्या विराट रुपाचे दर्शन घडले. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच स्वयंसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे संघस्थानाच्या दिशेने येताना दिसत होते. अगदी दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत ‘जनांचा प्रवाहो’ मारुंजीमध्ये दाखल होत होता. त्यांच्यात उत्साह होता, आपण एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आलो आहोत, याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जगातील सर्वाधिक मोठ्या संघटनेचा आपण एक बिंदू आहोत, याचा स्वाभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. नोंदणी न झालेल्या पण शिवशक्ती संगमचा भाग होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वयंसेवकांसाठी ऐनवेळी नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली होती. त्या ठिकाणीही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणवेशाची पूर्तता करण्यासाठीही अनेकांची धावपळ सुरू होती.


आपल्या वडिलांचे बोट धरून आलेल्या छोट्या स्वयंसेवकांपासून ते शंभरी पार ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत अनेक जण खास शिवशक्ती संगमसाठी उपस्थित होते. एकाच कुटुंबातील आठ-दहा जण, एकाच घरातील चार पिढ्या अशीही दृष्ये बघायला मिळत होती. काही जणांनी खास शिवशक्ती संगमसाठी गणवेश पूर्ण केला होता. अनेकांनी प्रथमच संघाची अर्धी विजार चढविली होती. संघकामापासून काही वर्षे दूर गेलेले स्वयंसेवकही सारे काही विसरून या एकत्रीकरणासाठी उपस्थित होते. संघकामाचे एक वैशिष्ट्य आहे. एखादी व्यक्ती संघाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर, संघाच्या भूमिका किंवा निर्णयांवर जरूर नाराज होते. काही काळ संघकामापासून दूर जाते. पण बहुतांश स्वयंसेवकांच्या मनात संघाबद्दल कटू भाव नसतात. त्यामुळे ते स्वयंसेवक या ना त्या निमित्ताने पुन्हा एकदा रचनेमध्ये फिट्ट बसतात. असेही काही स्वयंसेवक शिवशक्ती संगमच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामासाठी सज्ज झालेले दिसले.

स्वयंसेवकांच्या आगमनापासून ते संघस्थानावर जाईपर्यंत सर्वच कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नियोजनाप्रमाणे सुरू होते. सिद्धता केंद्रांमध्ये नोंदणी करण्याचे काम असो किंवा भोजनाची रांग असो, सर्वच ठिकाणी संघाची शिस्त ठायीठायी दिसत होती. शिवशक्ती संगमच्या परिसरात लाख-सव्वा लाख स्वयंसेवक आहेत आणि तरीही सर्व कार्यक्रम शांतपणे सुरू आहे, हे त्रयस्थ माणसाला सांगितले असते, तर विश्वासही बसला नसता. इतकी शांतता आणि शिस्त सर्वत्र होती. अर्थात, संघाचा कार्यक्रम आहे, याचा अर्थ तो शिस्तबद्धपणे आणि वक्तशीरच होणार, यात नवीन ते काही नाही. त्याचाच प्रत्यय शिवशक्ती संगमच्या निमित्ताने आला इतकेच.


संघ ब्राह्मणांचा आहे, संघ उच्चवर्णीयांचा आहे, संघ शहरी लोकांचा आहे, संघ उच्चशिक्षितांचा आहे, संघ म्हाताऱ्यांचा आहे, अशी टीका संघावर अनेकदा होते. अशी टीका करणारी मंडळी जर मारुंजीमध्ये उपस्थित असती, तर त्यांची तोंडे कायमची बंद झाली असती. सर्व सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरातील स्वयंसेवक या एकत्रीकरणाला उपस्थित होते. संघाने जात-धर्म कधीच पाळला नाही, त्यामुळे कोणत्या जातीचे किती होते वगैरे चर्चा करण्यात काहीच हशील नाही. राहता राहिला प्रश्न वयाचा, तर शिवशक्ती संगमला जवळपास चाळीस टक्के संख्या ही तरुणांची होती. संघदृष्ट्या तरूण नव्हे तर लौकिक अर्थाने ज्यांना तरुण म्हणता येईल, असे तरूण. त्यामुळे संघावर होणाऱ्या सर्व आरोपांना शिवशक्ती संगमच्या माध्यमातून आपसूक उत्तर मिळाले.

संघावर होणार आणखी एक आरोप म्हणजे संघामधील महिलांचा सहभाग. राष्ट्र सेविका समिती आणि संघ परिवारातील विविध संघटनांशी संबंधित अशा हजारो महिला शिवशक्ती संगमच्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्या होत्या. भगवे दुपट्टे परिधान केलेल्या शेकडो महिलांचे लोंढेच्या लोंढे सोपविलेल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मारुंजी येथे येऊन धडकत होते. सिद्धता केंद्र वगळता सर्वच व्यवस्थांमध्ये महिलांचा सहभाग पहायला मिळत होता. शिवाय बाहेरगावाहून आलेल्या स्वयंसेवकांना परत जाताना शिदोरी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास अकरा लाख पुऱ्या जमा करण्याचा विश्वविक्रम या निमित्ताने नोंदला गेला. त्याची बहुतांश व्यवस्था ही महिलांनीच पार पाडल्यामुळेत त्यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचे सारे प्रश्न वासलात निघाले.

अनेकदा संघाच्या शाखांवर टीका होते. हे काय पाच-दहा स्वयंसेवक एकत्र येतात आणि एक तासानंतर आपापल्या घरी जातात. अशातून काय राष्ट्रकार्य साध्य होणार आहे, अशी टीका अनादि काळापासून सर्रास होताना दिसते. मात्र, शिवशक्तीच्या निमित्ताने संघाच्या स्वयंसेवकांचे जे विराट रुप समाजाला दिसले, त्यातून संघ स्वयंसेवकांमध्ये दुर्दम्य असा आत्मविश्वास निर्माण झालेला पहायला मिळाला. शाखेत जरी आम्ही दहा-पंधरा असलो, तरीही आमची संघटना लाखो-करोडो स्वयंसेवकांची आहे, हे स्वयंसेवकांना समजले. समाजातील कोणत्याही समस्येवर किंवा अडचणींवर संघशक्तीच्या जोरावर आपण लीलया मात करू शकतो, असा ठाम विश्वास स्वयंसेवकांमध्ये पहायला मिळाला. ज्या गावांत आतापर्यंत संघ किंवा संघाचे स्वयंसेवक पोहोचू शकले नव्हते, अशा सर्व ठिकाणांपर्यंत शिवशक्तीच्या निमित्ताने संपर्क झाला. काही नवीन कार्यकर्ते संघकामामध्ये आले. नवीन गावे जोडली गेली. त्यामुळे संघाचा हा कार्यक्रम घेण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो या निमित्ताने साध्य झाल्याचे दिसून आले. 



माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरही शिवशक्तीच्या अपूर्व संगमाचे जोरदार पडघम वाजताना दिसले. अगदी परदेशी माध्यमे आणि वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी जातीने उपस्थित होते. भारतातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांचे (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही) प्रतिनिधीही मारुंजी येथे हजर होते. अनेकांनी तर कार्यक्रमाचे आणि परमपूजनीय सरसंघचालकांचे भाषण लाइव्ह प्रसारित केले. दुसऱ्या दिवशीही सर्वच वृत्तपत्रांमध्ये कार्यक्रमाचे उत्तम वार्तांकन पहायला-वाचायला मिळाले. फेसबुक आणि ट्वीटरवर तर शिवशक्ती संगमचा ट्रेंड झालेला पहायला मिळाला. जो तो या अपूर्व संगमाची आठवण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात किंवा कॅमेऱ्यामध्ये साठवून घेण्यासाठी धडपडत होता. ड्रोनच्या माध्यमातून होणारी फोटोग्राफी आणि शूटिंग, ड्रोनमधून होणारी पुष्पवृष्टी असे काही हटके प्रकारही या निमित्ताने अनुभवायला मिळाले.

शिवशक्ती संगममध्ये आलेला प्रत्येक जण ते वातावरण पाहून भारून गेला होता. असेच दोन अनुभव या निमित्ताने मला अनुभवता आले. पहिला अनुभव संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचा. शिवशक्ती संगमचे भव्य व्यासपीठ आणि इतर व्यवस्था पाहून या प्रचारकांची प्रतिक्रिया काय होती… ‘आज जरी मला देवाने बोलवून घेतले, तरी मी आनंदाने जायला तयार आहे. माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, असे मी मानतो.’

संघाचे खूप जुने आणि निष्ठावंत स्वयंसेवक सु. ह. जोशी शिवशक्ती संगममध्ये भेटले. ‘अभूतपूर्व. डॉक्टरांनी लावलेल्या रोपट्याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. आणि मी या क्षणांचा साक्षीदार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. डॉक्टरांची पुण्याई, त्यांची दूरदृष्टी आणि संघाच्या स्वयंसेवकांची अपार मेहनत यांच्यामुळेच हे क्षण आज आपल्याला अनुभवायला मिळत आहेत.’ जवळपास प्रत्येक स्वयंसेवकांच्या मनातील भावनाच सुहंनी त्यावेळी व्यक्त केली.

शिवशक्तीच्या अपूर्व संगमाला आणखी एक किनार आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे कार्यक्रम अनेकदा झाले असतील आणि इतक्या वर्षांनंतर महाराष्ट्रात असे कार्यक्रम होत आहेत. वास्तविक पाहता, नागपूरनंतर संघाचे काम सर्वप्रथम पुण्यात सुरू झाले नि नंतर पश्चिम महाराष्ट्रात. मात्र, तरीही इतक्या वर्षांमध्ये अतिविराट कार्यक्रम घेणे संघाला जमले नव्हते. त्याची अनेक कारणे असतील. पण मला वाटते, की त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे गांधीहत्येनंतर संघकामाला बसलेला फटका. 


असे म्हणतात, की गांधीहत्येनंतर संघाचे काम पन्नास वर्षे मागे गेले. संघाचे काम करणाऱ्या अनेकांना त्याचा चटका बसला. संघाच्या स्वयंसेवकांची घरे जाळली, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. हे हेतुपुरस्सर करण्यात आले होते. त्या चटक्यामुळे अनेक जण संघापासून आणि संघकामापासून दूर गेले. अनेकांनी संघाशी असलेले संबंध तोडले. त्यामुळेच संघाचे काम अनेक वर्षे मागे गेले. मात्र, अशाही परिस्थितीत संघविचारांवर निष्ठा ठेवून जी मंडळी, जे स्वयंसेवक संघकामात कार्यरत राहिले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी संघविचारांची पालखी खाली ठेवली नाही, अशा सर्वांच्या प्रयत्नांचे यश म्हणजे शिवशक्ती संगम आहे.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण खूप गाजले होते. त्यात मोदी म्हणाले होते, की हे माझे एकट्याचे यश नाही. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे. इतकेच नाही, तर जनसंघ आणि भाजपला गावागावांत पोहोचविण्यासाठी ज्या चार-पाच पिढ्या खपल्या त्या सर्व पिढ्यांमुळे आपण हा दिवस पाहू शकतो आहोत. शिवशक्ती संमगच्या बाबतीतही तेच लागू आहे. शिवशक्ती संगमसाठी गेली दोन वर्षे झटणाऱ्या प्रत्येक स्वयंवसेकाचे आणि अधिकाऱ्यांचे हे यश आहे. त्याचप्रमाणे संघावर गांधीहत्येचा आरोप झाल्यानंतरही विचलित न होता संघकाम सुरूच ठेवणाऱ्या आणि आणीबाणीत महिन्मोमहिने तुरुंगात काढावे लागल्यानंतरही हसतमुखाने पुन्हा संघाच्या दैनंदिन कामात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे हे यश आहे. राकट, कणखर आणि काळ्या पाषाणापासून बनलेल्या महाराष्ट्रात संघाची पाळेमुळे रुजविण्यासाठी धडपडणाऱ्या संघाच्या चार-पाच पिढ्यांमधील अधिकाऱ्यांचे, प्रचारकांचे आणि स्वयंसेवकांचे हे यश आहे.

१९४८ साली गांधी हत्येमुळे संघाला फटका बसला आणि संघाचे काम ५० वर्षे मागे गेले, असे जर मान्य केले. तर २०१५ साली पार पडलेल्या अपूर्व अशा शिवशक्ती संगममुळे संघाचे काम पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आणि हेच शिवशक्ती संगमच्या आय़ोजनाचे यश आहे.


(विवेकच्या मंथन पेजवर प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...)

कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?


(काही छायाचित्रे मिलिंद वेर्लेकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभाjर...)