Showing posts with label Mohan Bhagwat. Show all posts
Showing posts with label Mohan Bhagwat. Show all posts

Sunday, November 25, 2018

'शिव'धनुष्य उचलले आणि जोखीमही...

पुढील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा रामाच्या नावाने राजकारण तापायला प्रारंभ झाला आहे. यंदा शिवसेनेने वातावरण तापविण्यात पुढाकार घेतला असून, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक राहिलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंदिर निर्मितीसाठी अध्यादेश आणण्याची सूचना केली आहे. शिवसेनेने हे पाऊल का उचलले असावे आणि त्याचे फायदे-तोटे काय याचा हा मागोवा…  



सहा डिसेंबर १९९२ ते २५ नोव्हेंबर २०१८… माझ्या शिवसैनिकांनी जर बाबरी मशीद पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे… ते हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार… गेल्या २६ वर्षांत राममंदिराची निर्मिती झाली नसली, तरीही पुलाखालून बरेचसे पाणी वाहून गेले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले आहे. अशोक सिंघल यांनीही राममंदिर न पाहताच जगाचा निरोप घेतला आहे. डॉ. प्रवीण तोगडिया यांनीही विश्व हिंदू परिषदेचा निरोप घेतला आहे. आता २०१९मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राममंदिराचा मुद्दा तापविण्यास प्रारंभ झाला आहे. मंदिराचा मुद्दा आता ऐरणीवर आणण्यात येत असला, तरीही मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपासून हा मुद्दा उद्धव यांच्या डोक्यात घोळत असावा. कारण मंदिर वही बनाएंगे, पर तारीख नही बताएंगे… ही घोषणा उद्धव यांनी त्याचवेळी जाहीर सभांमधून दिली होती.  

शिवसेनेने या मुद्द्याला हात घालून एक प्रकारे जोखीम पत्करली आहे, असेच म्हणावे लागेल. कारण या मुद्द्यामुळे फायदा होण्याची शक्यता जितकी आहे, तितकाच शिवसेनेला फटका बसण्याची शक्यता देखील आहे. आगामी लोकसभा निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढता येईल. कामगिरीच्या आधारे मते मागून निवडणूक जिंकता येण्याची शक्यता कमी दिसते आहे. असली तरीही तसे करण्यात धोका आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदूंच्या भावनांना हात घालतील आणि राममंदिरासंदर्भात अध्यादेश आणतील, अशी अटकळ शिवसेनेने बांधली असावी. तसे झाल्यास भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कोणाच्याही मदतीशिवाय पूर्ण बहुमतापर्यंत निश्चितपणे पोहोचेल, असा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कयास असावा. त्यामुळेच निवडणुकीच्या निमित्ताने राममंदिराचा मुद्दा निघालाच तर सर्वाधिक आधी आम्ही या मुद्द्याची आठवण भाजपला आणि पंतप्रधान मोदी यांना करून दिली होती. आमच्यामुळेच राममंदिराचा प्रश्न मार्गी लागण्यास प्रारंभ झाला आहे, असे दाखवून देत राजकीय फायदा उठविण्याचे शिवसेनेचे मनसुबे दिसतात. त्यामुळेच भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील हिंदुत्ववाद्यांचे आयकॉन असलेले नरेंद्र मोदी या संदर्भात फारसे बोलायला तयार नसले तरीही शिवसेनेने वातावरण तापवायला सुरुवात केली आहे. 


राममंदिराचा मुद्दा उचलण्यामागचा आणखी एक हेतू म्हणजे मराठीचा मुद्दा मुंबई, ठाणे आणि कोकण या पलिकडे लोकांना आकर्षित करणारा नाही. शिवेसना वाढली ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर. १९८५च्या महाड अधिवेशनानंतर शिवसेनेने राज्यभर हातपाय पसरायला प्रारंभ केला. हिंदुत्वाच्या आधारेच शिवसेनेने कधीकाळी मराठवाड्यावर अधिराज्य गाजविले. खान हवा की बाण हवा असे आवाहन करून मते पदरात पाडून घेतली. बाबरी मशीद पाडल्यानंतर शिवसेनेने घेतलेली आक्रमक आणि निडर भूमिका अनेकांच्या पसंतीस पडली होती. तेव्हापासून शिवसेना म्हणजे हिंदुत्ववादी ही ओळख अधिक पक्की आणि दृढ झाली होती. शहरी भागातील मध्यमवर्गीय मतदारांना आकृष्ट करण्यासाठी कट्टर हिंदुत्वाचा हाच मुद्दा शिवसेनेला फायद्याचा ठरला. भाजपचा हक्काचा मतदार असलेल्या अनेक शहरी मतदारसंघांमध्ये शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच भगवा फडकाविला. भविष्यात जर राममंदिराचा मुद्दा तापला आणि भाजपबरोबर युती होऊ शकली नाही, तर हिंदुत्ववादी विचारांचे मतदार मतदान करताना शिवसेनेचाही विचार करतील, अशा हेतूनेही उद्धव ठाकरे यांनी अयोध्यावारीचे नियोजन केले असावे, असे शिवसेनेच्या अभ्यासकांचे म्हणणे आहे. भाजप हिंदुत्वाला विसरला असला, तरीही आम्ही विसरलेलो नाही, हे या निमित्ताने दाखवून द्यावे आणि शिवसेनेचा हिंदुत्वाचा खुंटा आणखी बळकट करावा, अशी उद्धव यांची खेळी आहे.

एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ती म्हणजे गेल्या चार वर्षांमध्ये शिवेसना आणि भाजप यांचे नाते विळा-भोपळ्याचे राहिलेले आहे. राज्य सरकारमध्ये राहून शिवसेनेने चार वर्षे विरोधी पक्षाची भूमिका निभावली आहे. शक्य असेल तिथे आणि शक्य त्यावेळी शिवसेनेने भाजप तसेच सरकारच्या धोरणांना तसेच निर्णयांना विरोध करण्याचे काम शिवसेनेने केले. विरोधी पक्षांना बेदखल करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये असलेले ते एकप्रकारचे अंडरस्टँडिंगहोते, असा दावा आजही अनेक जण करतात. त्यात कितपत तथ्य हे त्या दोघांनाच ठाऊक. चार वर्षांतील प्रतिमा पुसून टाकण्यासाठी आणि स्वतःच्या पक्षाचे नव्याने रिब्रँडिंग करण्यासाठी देखील शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा आक्रमकपणे लावून धरला आहे, असे काही जणांचे म्हणणे आहे. 

शिवसैनिकांसाठी एक कार्यक्रम म्हणून देखील रामजन्मभूमीच्या आंदोलनाकडे पाहता येऊ शकते. सरकारमध्ये चार वर्षे राहून काही प्रमाणात सुस्तावलेल्या शिवसैनिकाला या निमित्ताने जागृत करता येईल. वातावरण निर्मितीसाठी आणि अधिकाधिक कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकृष्ट करण्यासाठी एक उपक्रम म्हणूनही हा मुद्दा शिवसेनेला निश्चितच फायद्याचा ठरेल.


राममंदिराचा मुद्दा उचलण्याचा शिवसेनेला फायदा होईल का? झालाच तर किती होईल? कसा होईल? अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. अनेकांना या बाबत प्रश्न पडत आहेत. मंदिराच्या मुद्द्यामुळे शिवसेनेला जसा फायदा होऊ शकतो, तसेच या मुद्द्याला हवा दिल्यामुळे काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते, हे समजून घेतले पाहिजे. शिवसेनेच्या ग्रामीण भागातील अनेक आमदार, खासदार आणि नेत्यांचे असे म्हणणे आहे, की सध्या राज्यात सर्वत्र दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकरी होरपळून निघणार आहे. लोकसभा निवडणुकीपर्यंत दुष्काळाचे चित्र अधिक गंभीर बनेल. त्यामुळे अशा परिस्थिती दुष्काळाच्या मदतकार्यावर लक्ष केंद्रित करतानाच राज्य सरकारच्या विरोधात शिवसेनेने रान पेटविण्याची गरज आहे. राममंदिराच्या भावनिक मुद्द्याच्या मागे न लागता ग्रामीण महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केले, तर निवडणुकीत त्याचा अधिक फायदा होईल. राममंदिराच्या मुद्द्याला अधिक हवा दिली गेली आणि दुष्काळाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले तर कदाचित शिवसेनेला फटका बसू शकतो, असे ग्रामीण भागातील नेत्यांचे म्हणणे आहे.

२०१९च्या निवडणुकीत २००० साली जन्मलेली व्यक्ती मतदान करण्यास पात्र ठरणार आहे. त्या पिढीने रामजन्मभूमीचा लढा किंवा वातावरण अनुभवलेले नाही. ती पिढी अशा घटनांबद्दल ऐकून असेलही. पण इंटरनेटच्या जमान्यात वावरणाऱ्या त्या तरुण-तरुणींना अशा भावनिक मुद्द्यांमध्ये कितपत रस असेल, हा चर्चेचा विषय आहे. कदाचित विकास, प्रकल्प आणि देशाचे बदलते चित्र या गोष्टीच त्यांना अधिक आकृष्ट करू शकतील. त्यामुळेच मोदी यांनी २०१४ची निवडणूक फक्त विकास या शब्दाभोवती फिरविली. त्यामुळे अशा पद्धतीने भावनिक मुद्द्याला हात घालण्यामुळे शिवसेनेला अपेक्षित फायदा होण्याची शक्यता कमीच वाटते आहे. त्यातही शिवसेना हे आंदोलन किती तापविते त्यावरही अनेक गोष्टी अवलंबून आहे. मुंबईत उठून अयोध्येला जायचे आणि वातावरण निर्माण करायचे, हे तितकेसे सोपे नाही. 

शिवसेनेचे बहुसंख्य आमदार हे मुंबई, ठाणे आणि कोकण पट्ट्यातील आहेत. मुंबई आणि कोकणातील मुस्लिम हा शिवसेनेला मतदान करतो, असा इतिहास आहे. यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत बेहरामपाडा आणि जोगेश्वरी या मुस्लिमबहुल भागातून शिवसेनेचे मुस्लिम नगरसेवक निवडून आले आहेत. राममंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पुन्हा परतल्याने हा मुस्लिम मतदार शिवसेनेच्या पाठिखी किती ठामपणे उभा राहील, ही शंका आहे. दुसरीकडे भाजपच्या कारभाराला आणि नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना वैतागलेल्या अनेक मतदारांनी पर्याय म्हणून शिवसेनेच्या पारड्यात मते टाकली होती. मग त्यामध्ये समाजवादीही आले आणि काही प्रमाणात डावेही आले. मुंबई महापालिका निवडणुकीत ते दिसून आले होते. शिवसेनेने राममंदिराचा मुद्दा उचलून धरला तर हे सर्व मतदार पक्षापासून दूर जाण्याची शक्यता अधिक आहे. त्याचा फटका मुंबई, ठाणे आणि कोकणात बसला तर शिवसेनेचे हक्काचे संख्याबळ घटण्याची भीती अधिक आहे. अर्थात, हिंदुत्वाचा मुद्दा अधिक प्रखरपणे लावून धरला तर मुंबईतील उत्तर भारतीय मतदारांची मते पुन्हा एकदा शिवसेनेकडे वळण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, त्याबाबत खात्री मात्र, व्यक्त करता येणार नाही.


१९९२चे राममंदिर आंदोलन भाजप, विश्व हिंदू परिषद आणि संघपरिवारासह सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी उभारले होते. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अचूक टायमिंग दाखवत तापल्या तव्यावर पोळी भाजून घेतली होती. आता शिवसेनेने तवा तापविण्याला प्रारंभ केला आहे. तवा सेनेने तापविला तरीही पोळी भाजपलाच भाजता येणार आहे. कारण सत्तेची सारी सूत्रे भाजपकडे आहेत. पोळी भाजायची की नाही, याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि अमित शहा घेतील.  भाजपने अध्यादेश आणला आणि राममंदिर निर्मितीचा मार्ग मोकळा केला, तर संघ परिवार निर्णयाचे पुरेपूर श्रेय घेईल. 

देशभरातील माध्यमे नि सोशल मीडिया या माध्यमातून श्रेय घेण्यासाठी पद्धतशीर मोहीम आखण्यात येईल. अशा परिस्थितीत शिवसेनेला त्याचे श्रेय घेण्यासाठी आणखी धडपड करावी लागेल किंवा मोहीम उघडावी लागेल. भाजपच्या पद्धतशीर प्रचार यंत्रणेला पुरून उरण्याइतकी ताकद शिवेसनेमध्ये आहे, असे सध्या तरी वाटत नाही. तवा तापविण्याचे काम आम्ही केले, इतकेच शिवसेना म्हणू शकेल. पोळी मात्र, भाजपचीच भाजली जाणार आहे.

अशा परिस्थितीत राममंदिराचा मुद्दा उचलून शिवसेनेने मोठी जोखीम पत्करली आहे. अर्थात, उद्धव यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून मोठी जोखीमच पत्करली होती. तेव्हा उद्धव आणि शिवसेना यांचा सुपडा साफ होईल, अशी अटकळ अनेक जण बांधून होते. मात्र, तेव्हा जोखीम पत्करल्यामुळे शिवसेनेचा फायदाच झाला. आजही संघटना म्हणून त्यांना कदाचित फायदा होईलही. पण राजकीय पक्ष म्हणून त्यांच्या पारड्यात नेमके काय पडणार हे आताच सांगणे कठीण आहे. कदाचित फार काही पडण्याची शक्यता फार कमी आहे, असे आता तरी वाटते. बाकी रामनामाचा महिमा मोठा आहे. रामनाम लिहिल्यानंतर निर्जीव दगडही तरले, असे म्हणतात. कदाचित त्याच नावावर आपणही तरून जाऊ, असे शिवसेना नेत्यांना वाटत असेल तर त्यात चूक काहीच नाही. त्याच आशेवर उद्धव यांनी अयोध्यावारीची मोहीम आखली असेल.  

Monday, January 11, 2016

संघशक्तीचा अपूर्व संगम



महाराष्ट्रातही दिसली संघाची ताकद

आयुष्यात काही प्रसंग, घटना किंवा आंदोलने अशी असतात, की जे अनुभवण्याची संधी क्वचितच मिळते. वैयक्तिक आयुष्यातही आणि संघटनेच्या आयुष्यातही. अशा दुर्मिळ प्रसंगांचे जे साक्षीदार होतात, ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यासाठी तळजाईचे शिबिर किंवा रामजन्मभूमीचे आंदोलन अशी काही उदाहरणे देता येतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अपूर्व अशा शिवशक्ती संगमला अशाच कार्यक्रमांच्या पंक्तीत बसविले पाहिजे. केरळ, मेंगळुरू, कर्नाटकातील इतर शहरे, महाकोशल वगैरे प्रांतांमध्ये झालेल्या संघाच्या भव्य एकत्रीकरणांच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. त्यांच्या ध्वनिचित्रफिती पाहून आनंदी होतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अतिभव्य एकत्रीकरण आपण का घेऊ शकत नाही, याची सल प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात होती. ती सल शिवशक्ती संगमच्या निमित्ताने दूर झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने संघाचे भव्यदिव्य शिबिर गेल्या काही दशकांमध्ये पार पडले नव्हते. प्रत्येक वेळी दाखला दिला जायचा तो १९८३ साली पार पडलेल्या तळजाईच्या शिबिराचा. त्यानंतर संघाचे अशा प्रकारे अतिविराट एकत्रीकरण महाराष्ट्रात झाले नव्हते. माजी सरसंघचालक माननीय राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांना मानवंदना देण्यासाठी २००० किंवा २००१ मध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माटुंग्याहून संचलन करून शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर तिथे सरसंघचालक प्रणाम आणि मा. रज्जूभैय्या यांचे बोलणे, असा कार्यक्रम होता. मात्र, संख्यात्मकदृष्ट्या तो कार्यक्रम तळजाईच्या शिबिराला मागे टाकू शकला नव्हता. मुंबई म्हणजे राज्याच्या एका टोकाला असलेले स्थान हा त्यामधील मुख्य अडसर ठरला असावा. त्यामुळेच यावेळी संघाने नव्या रचनेतील प्रांतशः एकत्रीकरण घेण्याचे ऩिश्चित केले असावे. मध्यंतरी मराठवाडा प्रांताचे एकत्रीकरण औरंगाबाद येथे पार पडले आणि आता पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे शिवशक्ती संगम हे ‘न भूतो’ असे एकत्रीकरण मोठ्या दिमाखात संपन्न झाले.


नाशिक, नगर, पुणे महानगर, पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात (दंड नाही) जांबे, नेरे आणि मारुंजी या तीन गावांच्या सीमांवर आय़ोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती संगममध्ये सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास एक लाख साठ हजार स्वयंसेवकांनी या संगमसाठी नोंदणी केली होती नि त्यापैकी निम्म्याहून अधिक स्वसंयेवक गणवेशात उपस्थित राहिले. पन्नास ते साठ हजारहून अधिक नागरिक हा भव्यदिव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी मारुंजी येथे आवर्जून आले होते. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश होता.

भोजनासह सर्व व्यवस्था अत्यंत चोखपणे आणि ठरलेल्या नियोजनानुसार पार पडत होत्या. कुठे धक्काबुक्की नाही. चेंगराचेंगरी नाही. सारे काही शिस्तीत. हीच शिस्त कार्यक्रम संपल्यानंतरही अनुभवायला मिळत होती. कार्यक्रम संपल्यानंतरही कुठे महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या नाहीत. रस्त्यावरील दुकाने लुटल्याच्या बातम्या छापून आल्या नाहीत. अपघाताच्या घटना घडल्या नाहीत. दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे वृत्त कानावर आले नाही. इतर राजकीय पक्ष (काही सन्मान्य अपवाद वगळता) आणि संघटनांच्या महाएकत्रीकरणानंतर जे जे ऐकायला मिळते, त्यापैकी कशाचाही अनुभव शिवशक्ती संगम संपल्यानंतर आला नाही. हे संघाचे आणखी एक वैशिष्ट्य.


कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला धनुष्यबाण अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. भुवयाही उंचवायला लावत होता. मात्र, संघाचे संघटन हे हिंदूंचे आहे. हिंदुत्वाला मानणाऱ्यांचे आहे. हिंदुत्वाचा विचार करणारे कोणीही आम्हाला परके नाही. हाच संदेश देण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. प्रभू श्रीरामचंद्रांचा हा धनुष्यबाण सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता.

मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले भव्यदिव्य असे व्यासपीठ आणि अत्यंत शिस्तबद्धपणे करण्यात आलेली आखणी, चर्चेचा विषय ठरली होती. संघस्थानाच्या परिसरात शिवकालीन वातावरण निर्माण करण्यात आले होते. विविध किल्ल्यांमधील दिंडी दरवाजांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. तटबंदीचे स्वरुप देण्यात आले होते. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचे पुतळे, हत्ती, आणि घोड्यांच्या प्रतिकृती शिवकालात घेऊन जात होत्या. महाराष्ट्रातील सामाजिक महापुरुषांची शिल्प साकारण्यात आली होती. कार्यक्रमाला येणारा प्रत्येक जण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, अण्णा भाऊ साठे, सयाजीराव गायकवाड, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या पुतळ्यांपाशी आवर्जून थांबत होता. हात जोडत होता. अभिवादन करत होता.

तीन जानेवारीचा अनुभव ज्यांनी घेतला, त्यांना संघाच्या विराट रुपाचे दर्शन घडले. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच स्वयंसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे संघस्थानाच्या दिशेने येताना दिसत होते. अगदी दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत ‘जनांचा प्रवाहो’ मारुंजीमध्ये दाखल होत होता. त्यांच्यात उत्साह होता, आपण एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आलो आहोत, याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जगातील सर्वाधिक मोठ्या संघटनेचा आपण एक बिंदू आहोत, याचा स्वाभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. नोंदणी न झालेल्या पण शिवशक्ती संगमचा भाग होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वयंसेवकांसाठी ऐनवेळी नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली होती. त्या ठिकाणीही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणवेशाची पूर्तता करण्यासाठीही अनेकांची धावपळ सुरू होती.


आपल्या वडिलांचे बोट धरून आलेल्या छोट्या स्वयंसेवकांपासून ते शंभरी पार ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत अनेक जण खास शिवशक्ती संगमसाठी उपस्थित होते. एकाच कुटुंबातील आठ-दहा जण, एकाच घरातील चार पिढ्या अशीही दृष्ये बघायला मिळत होती. काही जणांनी खास शिवशक्ती संगमसाठी गणवेश पूर्ण केला होता. अनेकांनी प्रथमच संघाची अर्धी विजार चढविली होती. संघकामापासून काही वर्षे दूर गेलेले स्वयंसेवकही सारे काही विसरून या एकत्रीकरणासाठी उपस्थित होते. संघकामाचे एक वैशिष्ट्य आहे. एखादी व्यक्ती संघाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर, संघाच्या भूमिका किंवा निर्णयांवर जरूर नाराज होते. काही काळ संघकामापासून दूर जाते. पण बहुतांश स्वयंसेवकांच्या मनात संघाबद्दल कटू भाव नसतात. त्यामुळे ते स्वयंसेवक या ना त्या निमित्ताने पुन्हा एकदा रचनेमध्ये फिट्ट बसतात. असेही काही स्वयंसेवक शिवशक्ती संगमच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामासाठी सज्ज झालेले दिसले.

स्वयंसेवकांच्या आगमनापासून ते संघस्थानावर जाईपर्यंत सर्वच कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नियोजनाप्रमाणे सुरू होते. सिद्धता केंद्रांमध्ये नोंदणी करण्याचे काम असो किंवा भोजनाची रांग असो, सर्वच ठिकाणी संघाची शिस्त ठायीठायी दिसत होती. शिवशक्ती संगमच्या परिसरात लाख-सव्वा लाख स्वयंसेवक आहेत आणि तरीही सर्व कार्यक्रम शांतपणे सुरू आहे, हे त्रयस्थ माणसाला सांगितले असते, तर विश्वासही बसला नसता. इतकी शांतता आणि शिस्त सर्वत्र होती. अर्थात, संघाचा कार्यक्रम आहे, याचा अर्थ तो शिस्तबद्धपणे आणि वक्तशीरच होणार, यात नवीन ते काही नाही. त्याचाच प्रत्यय शिवशक्ती संगमच्या निमित्ताने आला इतकेच.


संघ ब्राह्मणांचा आहे, संघ उच्चवर्णीयांचा आहे, संघ शहरी लोकांचा आहे, संघ उच्चशिक्षितांचा आहे, संघ म्हाताऱ्यांचा आहे, अशी टीका संघावर अनेकदा होते. अशी टीका करणारी मंडळी जर मारुंजीमध्ये उपस्थित असती, तर त्यांची तोंडे कायमची बंद झाली असती. सर्व सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरातील स्वयंसेवक या एकत्रीकरणाला उपस्थित होते. संघाने जात-धर्म कधीच पाळला नाही, त्यामुळे कोणत्या जातीचे किती होते वगैरे चर्चा करण्यात काहीच हशील नाही. राहता राहिला प्रश्न वयाचा, तर शिवशक्ती संगमला जवळपास चाळीस टक्के संख्या ही तरुणांची होती. संघदृष्ट्या तरूण नव्हे तर लौकिक अर्थाने ज्यांना तरुण म्हणता येईल, असे तरूण. त्यामुळे संघावर होणाऱ्या सर्व आरोपांना शिवशक्ती संगमच्या माध्यमातून आपसूक उत्तर मिळाले.

संघावर होणार आणखी एक आरोप म्हणजे संघामधील महिलांचा सहभाग. राष्ट्र सेविका समिती आणि संघ परिवारातील विविध संघटनांशी संबंधित अशा हजारो महिला शिवशक्ती संगमच्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्या होत्या. भगवे दुपट्टे परिधान केलेल्या शेकडो महिलांचे लोंढेच्या लोंढे सोपविलेल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मारुंजी येथे येऊन धडकत होते. सिद्धता केंद्र वगळता सर्वच व्यवस्थांमध्ये महिलांचा सहभाग पहायला मिळत होता. शिवाय बाहेरगावाहून आलेल्या स्वयंसेवकांना परत जाताना शिदोरी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास अकरा लाख पुऱ्या जमा करण्याचा विश्वविक्रम या निमित्ताने नोंदला गेला. त्याची बहुतांश व्यवस्था ही महिलांनीच पार पाडल्यामुळेत त्यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचे सारे प्रश्न वासलात निघाले.

अनेकदा संघाच्या शाखांवर टीका होते. हे काय पाच-दहा स्वयंसेवक एकत्र येतात आणि एक तासानंतर आपापल्या घरी जातात. अशातून काय राष्ट्रकार्य साध्य होणार आहे, अशी टीका अनादि काळापासून सर्रास होताना दिसते. मात्र, शिवशक्तीच्या निमित्ताने संघाच्या स्वयंसेवकांचे जे विराट रुप समाजाला दिसले, त्यातून संघ स्वयंसेवकांमध्ये दुर्दम्य असा आत्मविश्वास निर्माण झालेला पहायला मिळाला. शाखेत जरी आम्ही दहा-पंधरा असलो, तरीही आमची संघटना लाखो-करोडो स्वयंसेवकांची आहे, हे स्वयंसेवकांना समजले. समाजातील कोणत्याही समस्येवर किंवा अडचणींवर संघशक्तीच्या जोरावर आपण लीलया मात करू शकतो, असा ठाम विश्वास स्वयंसेवकांमध्ये पहायला मिळाला. ज्या गावांत आतापर्यंत संघ किंवा संघाचे स्वयंसेवक पोहोचू शकले नव्हते, अशा सर्व ठिकाणांपर्यंत शिवशक्तीच्या निमित्ताने संपर्क झाला. काही नवीन कार्यकर्ते संघकामामध्ये आले. नवीन गावे जोडली गेली. त्यामुळे संघाचा हा कार्यक्रम घेण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो या निमित्ताने साध्य झाल्याचे दिसून आले. 



माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरही शिवशक्तीच्या अपूर्व संगमाचे जोरदार पडघम वाजताना दिसले. अगदी परदेशी माध्यमे आणि वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी जातीने उपस्थित होते. भारतातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांचे (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही) प्रतिनिधीही मारुंजी येथे हजर होते. अनेकांनी तर कार्यक्रमाचे आणि परमपूजनीय सरसंघचालकांचे भाषण लाइव्ह प्रसारित केले. दुसऱ्या दिवशीही सर्वच वृत्तपत्रांमध्ये कार्यक्रमाचे उत्तम वार्तांकन पहायला-वाचायला मिळाले. फेसबुक आणि ट्वीटरवर तर शिवशक्ती संगमचा ट्रेंड झालेला पहायला मिळाला. जो तो या अपूर्व संगमाची आठवण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात किंवा कॅमेऱ्यामध्ये साठवून घेण्यासाठी धडपडत होता. ड्रोनच्या माध्यमातून होणारी फोटोग्राफी आणि शूटिंग, ड्रोनमधून होणारी पुष्पवृष्टी असे काही हटके प्रकारही या निमित्ताने अनुभवायला मिळाले.

शिवशक्ती संगममध्ये आलेला प्रत्येक जण ते वातावरण पाहून भारून गेला होता. असेच दोन अनुभव या निमित्ताने मला अनुभवता आले. पहिला अनुभव संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचा. शिवशक्ती संगमचे भव्य व्यासपीठ आणि इतर व्यवस्था पाहून या प्रचारकांची प्रतिक्रिया काय होती… ‘आज जरी मला देवाने बोलवून घेतले, तरी मी आनंदाने जायला तयार आहे. माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, असे मी मानतो.’

संघाचे खूप जुने आणि निष्ठावंत स्वयंसेवक सु. ह. जोशी शिवशक्ती संगममध्ये भेटले. ‘अभूतपूर्व. डॉक्टरांनी लावलेल्या रोपट्याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. आणि मी या क्षणांचा साक्षीदार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. डॉक्टरांची पुण्याई, त्यांची दूरदृष्टी आणि संघाच्या स्वयंसेवकांची अपार मेहनत यांच्यामुळेच हे क्षण आज आपल्याला अनुभवायला मिळत आहेत.’ जवळपास प्रत्येक स्वयंसेवकांच्या मनातील भावनाच सुहंनी त्यावेळी व्यक्त केली.

शिवशक्तीच्या अपूर्व संगमाला आणखी एक किनार आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे कार्यक्रम अनेकदा झाले असतील आणि इतक्या वर्षांनंतर महाराष्ट्रात असे कार्यक्रम होत आहेत. वास्तविक पाहता, नागपूरनंतर संघाचे काम सर्वप्रथम पुण्यात सुरू झाले नि नंतर पश्चिम महाराष्ट्रात. मात्र, तरीही इतक्या वर्षांमध्ये अतिविराट कार्यक्रम घेणे संघाला जमले नव्हते. त्याची अनेक कारणे असतील. पण मला वाटते, की त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे गांधीहत्येनंतर संघकामाला बसलेला फटका. 


असे म्हणतात, की गांधीहत्येनंतर संघाचे काम पन्नास वर्षे मागे गेले. संघाचे काम करणाऱ्या अनेकांना त्याचा चटका बसला. संघाच्या स्वयंसेवकांची घरे जाळली, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. हे हेतुपुरस्सर करण्यात आले होते. त्या चटक्यामुळे अनेक जण संघापासून आणि संघकामापासून दूर गेले. अनेकांनी संघाशी असलेले संबंध तोडले. त्यामुळेच संघाचे काम अनेक वर्षे मागे गेले. मात्र, अशाही परिस्थितीत संघविचारांवर निष्ठा ठेवून जी मंडळी, जे स्वयंसेवक संघकामात कार्यरत राहिले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी संघविचारांची पालखी खाली ठेवली नाही, अशा सर्वांच्या प्रयत्नांचे यश म्हणजे शिवशक्ती संगम आहे.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण खूप गाजले होते. त्यात मोदी म्हणाले होते, की हे माझे एकट्याचे यश नाही. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे. इतकेच नाही, तर जनसंघ आणि भाजपला गावागावांत पोहोचविण्यासाठी ज्या चार-पाच पिढ्या खपल्या त्या सर्व पिढ्यांमुळे आपण हा दिवस पाहू शकतो आहोत. शिवशक्ती संमगच्या बाबतीतही तेच लागू आहे. शिवशक्ती संगमसाठी गेली दोन वर्षे झटणाऱ्या प्रत्येक स्वयंवसेकाचे आणि अधिकाऱ्यांचे हे यश आहे. त्याचप्रमाणे संघावर गांधीहत्येचा आरोप झाल्यानंतरही विचलित न होता संघकाम सुरूच ठेवणाऱ्या आणि आणीबाणीत महिन्मोमहिने तुरुंगात काढावे लागल्यानंतरही हसतमुखाने पुन्हा संघाच्या दैनंदिन कामात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे हे यश आहे. राकट, कणखर आणि काळ्या पाषाणापासून बनलेल्या महाराष्ट्रात संघाची पाळेमुळे रुजविण्यासाठी धडपडणाऱ्या संघाच्या चार-पाच पिढ्यांमधील अधिकाऱ्यांचे, प्रचारकांचे आणि स्वयंसेवकांचे हे यश आहे.

१९४८ साली गांधी हत्येमुळे संघाला फटका बसला आणि संघाचे काम ५० वर्षे मागे गेले, असे जर मान्य केले. तर २०१५ साली पार पडलेल्या अपूर्व अशा शिवशक्ती संगममुळे संघाचे काम पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आणि हेच शिवशक्ती संगमच्या आय़ोजनाचे यश आहे.


(विवेकच्या मंथन पेजवर प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...)

कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?


(काही छायाचित्रे मिलिंद वेर्लेकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभाjर...)