Showing posts with label VHP. Show all posts
Showing posts with label VHP. Show all posts

Monday, March 24, 2014

भाजप उमेदवारीचे राजकारण

परिवाराने कापला बापटांचा पत्ता

हुश्श्श… झालं अखेरीस पुण्यातून भारतीय जनता पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी जाहीर केली. शिरोळे यांना उमेदवारी दिली, ते एकाप्रकारे बरेच झाले. भाजपच्या उमेदवाराची घोषणा थेट १७ मे रोजीच होते की काय, अशी हेटाळणीपूर्ण चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपने पुण्यातील उमेदवार जाहीर करून सर्वांना आश्चर्याचा सुखद धक्काच दिला, असंच म्हटलं पाहिजे. 



वास्तविक पाहता, भाजपच्या उमेदवारीवरून इतका घोळ होण्याची काही गरजच नव्हती. मात्र, गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यातील शीतयुद्धामुळे भाजपच्या उमेदवारीला मुहूर्त सापडत नव्हता. मुळात पुण्यातून गिरीष बापट की अनिल शिरोळे अशीच खरी लढत असली तरीही उमेदवारीची माळ शिरोळे यांच्याच गळ्यात पडणार, हे आधीच निश्चित झाले होते. फक्त गडकरी-मुंडे यांच्या शीतयुद्धामुळे त्याची घोषणा सातत्याने लांबणीवर पडत होती. अखेरीस त्याला रविवार दिनांक २३ मार्चचा मुहूर्त सापडला. भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर उमेदवाराची घोषणा झाल्याने अखेर गंगेत घोडे न्हाले.
पुण्यातील कसबा मतदारसंघाचे आमदार गिरीष बापट यांचे इलेक्टिव्ह मेरिट इतर सर्व उमेदवारांपेक्षा खूपच उजवे आहे. नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, कसबा मतदारसंघातून सलग चारवेळा आमदार आणि सध्या राज्याच्या लोकलेखा समितीचे अध्यक्ष अशी अनेक महत्त्वाची पदे आणि जबाबदाऱ्या सांभाळणारे बापट हेच तूर्त तरी पुणे शहर भाजपमधील सर्वाधिक अनुभवी नेते आहेत, याला कोणाचाही आक्षेप नाही. शिवाय जातीचा मुद्दाही बापटांसाठीच अनुकूल ठरत होता. पुण्यातील मनसे आणि काँग्रेसचे उमेदवार हे मराठा असल्याने भाजपचा उमेदवार मराठा नको, ब्राह्मण हवा, असे जातीचे कार्डही चालविले जात होते. मात्र, अखेरीस बापट यांचे तिकिट बसलेच नाही. अर्थात, इतक्या सर्व जमेच्या बाजू असूनही ते बसणार नव्हतेच. त्याचे कारण बापट यांच्या गेल्या काही वर्षांमधील कार्यशैलीमध्ये दडले आहे.
बापट यांच्या कार्यशैलीमुळेच त्यांना उमेदवारी मिळूच नये, यासाठी पुण्यातून जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काही पदाधिकारी, अभाविपचे कार्यकर्ते आणि वरिष्ठ पदाधिकारी, विश्व हिंदू परिषदेचे अधिकारी आणि खुद्द भाजपमधीलही बहुतांश कार्यकर्ते नि नेत्यांना बापट नको होते. बापट यांचे ‘इलेक्टिव्ह मेरिट’ असूनही परिवाराला बापट का नको होते, याचा विचार करणे गरजेचे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बापट यांनी भाजपप्रमाणेच संघ परिवारातील अनेक कार्यकर्त्यांना तसेच संघटनांना नाराज केले. त्याचाच फटका उमेदवारी न मिळण्यामध्ये झाला, असे तूर्त तरी म्हणायला हरकत नाही.
असे काय झाले, गेल्या काही वर्षांमध्ये… खूप काही झाले. मुळात गेल्या लोकसभा निवडणुकीत बापट यांच्या नाराजीमुळेच भाजपचा पराभव झाला, असे मत अनेक पत्रकार, कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषकांचे होते आणि आजही आहे. ‘अजिबात जोर लावून काम करण्याची आवश्यकता नाही,’ असे निरोप फिरविण्यात आल्याचे भाजपचे कार्यकर्ते आणि नगरसेवकही खासगीत मान्य करतात. ओंकारेश्वरच्या पुलाखालून पाच वर्षांत बरेच पाणी वाहून गेले असले, तरीही भाजप आणि संघ परिवाराच्या मनात ती गोष्ट अजूनही घर करून आहे.
दुसरे म्हणजे एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संस्कारित स्वयंसेवक असल्याचे म्हणायचे आणि दुसरीकडे राष्ट्रवादीच्या हातात हात घालून वेळोवेळी वेगळी भूमिका घ्यायची, ही गोष्ट परिवारातील नेत्यांना स्पष्टपणे खुपत होती. लोकलेखा समितीचे अध्यक्ष असणाऱ्या बापटांनी सुरेश कलमाडी यांच्या घोटाळ्यावर शिक्कामोर्तब केले. मात्र, सिंचन घोटाळ्याबाबत त्यांनी ‘ब्र’ देखील काढला नाही. अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते त्यात गुंतलेले असल्यामुळेच तसे झाले नाही, हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही.
पुणेकर दोनदा आंघोळ करतात, जास्त पाणी वापरतात, अशी विधाने करणाऱ्या अजित पवार यांच्या सुरात सूर मिसळून बापट यांनी पुणेकरांवर सडकून टीका केली होती. पुणेकरांना दोनदा आंघोळ करून पाणी वाया घालविण्याची सवयच आहे, अशा आशयाचे विधान करून त्यांनी गोंधळ उडवून दिला होता. अजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस यांना खूष ठेवायचे आणि खासदारकीच्या निवडणुकीत त्याचा फायदा उठवायचा, यापेक्षा कोणता तरी उदात्त हेतू त्यामागे असेल, या गोष्टीवर कोण विश्वास ठेवणार? पक्षाच्या भूमिकेविरोधात निर्णय घेण्यास किंवा मतदानही करण्यास सांगणारे निरोप आमदारसाहेबांच्या मार्फत पाठविले जात. ‘वरून आदेश आला आहे,’ एवढेच स्पष्टीकरण त्याच्या समर्थनासाठी दिले जायचे. 

छत्रपती शिवरायांचे गुरू असलेल्या दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविण्याचे षडयंत्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून राबविण्यात येत असताना बापट हे प्रकरणापासून साफ अलिप्त होतं. वास्तविक पाहता, बापट यांचे कार्यालय लालमहालापासून दोन मिनिटांच्या अंतरावर आहे. शिवसेना आणि भाजप युतीने तो मुद्दा अत्यंत प्रतिष्ठेचा केला होता. पुतळा हटविण्यात येऊ नये, म्हणून दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते, नेते आणि खुद्द आमदारही चार-पाच दिवस रात्रभर जागून त्या ठिकाणी पहारा देत असत. आपण त्या गावचेच नाही, असे दाखवित बापट यांनी एकूणच प्रकरणाकडे चक्क पाठ फिरविली. कसब्यातील मराठा किंवा बहुजन मतदार आपल्यापासून दुरावू नये, म्हणूनच कदाचित बापट यांनी प्रकरणापासून चार हात दूर राहणे पसंत केले असावे. त्यामुळे बापट हे निवडणुकीपुरते ‘ब्राह्मण कार्ड’ पुढे करीत असले, तरीही ब्राह्मण समाजाच्या मनातून ते कधीच उतरले होते. तसेही भाजपचा जो निष्ठावंत मतदार आहे, तो जातीकडे पाहून मतदान करतोच असे नाही. तो उमेदवाराचे इतर गुण, निष्ठा आणि कामही पाहतो, असे मला वाटते.
आदमबाग मशिदीच्या प्रकरणातही बापट यांनी अशाच पद्धतीने आश्चर्यकारक नि धक्कादायक भूमिका घेतली होती. धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली हिंदुत्ववादी संघटना नि कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन महापालिकेवर प्रचंड मोर्चा काढला होता. महापालिकेने पर्यायी जागा देऊनही मशिदीचे अतिक्रमण हटविण्यास पालिका प्रशासन धजावत नव्हते. त्याचा निषेध करण्यासाठी आणि दबाव आणण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता. त्या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत बापट यांनी केलेल्या भाषणात भलताच मुद्दा काढला. ‘आदमबाग मशिदीचे प्रकरण हा धार्मिक संघर्षाचा मुद्दा नसून त्यामागे काहींचे आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत. त्यामुळे याकडे धार्मिक वादाचा नव्हेत तर आर्थिक वादाचा मुद्दा म्हणून पाहिले पाहिजे,’ असा बापट यांच्या भाषणाचा रोख होता. कसब्यातील मुस्लिम मतदारांवर डोळा ठेवून घेतलेली बचावात्मक आणि हिंदुत्वविरोधी भूमिका होती. म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है,’ च्या विचाराला साफ हरताळच फासण्याचे काम. विश्व हिंदू परिषद आणि संघ परिवारातील अनेक नेत्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटले होते. डेक्कन कॉर्नरला उभ्या राहिलेल्या टोलेजंग मशिदीच्या आंदोलनाकडेही अशाच पद्धतीने डोळेझाक करण्यात आली होती.
मग विश्व हिंदू परिषदेनेही बापटांकडे डोळेझाकच केली. विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय स्तरावरील एका नेत्याने थेट राजनाथसिंह यांच्याकडेच ‘बापट नको,’ अशी स्पष्ट आणि ठाम भूमिका घेतली. संघाच्याही भाग स्तरावरील अधिकारी आणि स्वयंसेवकांनी तसेच भाजपच्या नगरसेवक आणि शहर स्तरावरील पदाधिकाऱ्यांनी तक्रारींचा पाढा संघाच्या अधिकाऱ्यांसमोर वाचला होता. कसबा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी जर बापटविरोधी भूमिका घेतली, तर त्यांना संपविण्याचे षडयंत्र कसे रचले जाते. त्यांना पराभूत करण्यासाठी कशी ‘फिल्डिंग’ लावली जाते, कार्यकर्त्यांच्या भरसभेत कसे अपमानित केले जाते, हे अनेकांनी अनुभवले होते. त्यामुळे गडकरी यांचे समर्थक असलेलेही अनेक जण बापटांपासून दुरावले.
संघाचे सरकार्यवाह भैय्याजी जोशी आणि संघाकडून भाजपच्या बाबींमध्ये लक्ष घालणारे सुरेशजी सोनी यांच्यापर्यंत बापटांच्या कार्यशैलीचा इत्थंभूत सातबारा पोहोचविला होता. ते नकोच, अशी भूमिका ठामपणे मांडण्यात आली होती. भाजपच्या ज्येष्ठांच्या कानावरही या गोष्टी घातल्या गेल्या. ‘ते‘ नकोत म्हणून भाजपच्या प्रदेश स्तरावरील माजी पदाधिकाऱ्याने मुंडे यांच्याकडे जोरदार ‘फिल्डिंग’ लावली. वास्तविक पाहता, संबंधित अधिकाऱ्याचे आणि मुंडे यांचे संबंध फारसे मधुर नाहीत. तरीही त्यांनी मुंडे यांची खास भेट घेऊन साहेब, यावेळी मागे हटू नका. बापटांना तिकिट नकोच, अशी मागणी केली होती.
थोडक्यात, म्हणजे फक्त इलेक्टिव्ह मेरिट असून फायदा नाही. (शिरोळेंकडेही ते आहेच.) वारंवार धोरणाविरोधात भूमिका घेतली, परिवाराच्या कार्यकर्त्यांना फाट्यावर मारले, त्यांना अडचणीत आणणारी भूमिका घेतली तर संघ परिवार तुम्हाला कधीतरी धडा शिकवितोच, हाच संदेश पुण्यातील उमेदवारीच्या निमित्ताने दिसून आला आहे. भले उशिरा उमेदवारी दिल्यामुळे भाजपची नाचक्की झाली असेल, काही प्रमाणात टिंगल आणि थट्टाही उडविण्यात आली असेल. पण शेवटी पक्षापेक्षा, परिवारापेक्षा आणि विचारापेक्षा कोणी मोठा नाही, हेच यातून दिसून येते.
आमदार गिरीष बापट याकडे कोणत्या नजरेतून पाहतात आणि सर्व गोष्टी कशा पद्धतीने हे सर्व स्वीकारतात, ते पहावे लागेल.
शांत, संयमी, विचारांचे पक्के आणि पक्षाची भूमिका योग्य पद्धतीने निभावणाऱ्या अनिल शिरोळे यांना भावी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा... 

Tuesday, February 25, 2014

हम दो हमारे पाँच…

बुरसटलेला विचार...


प्रत्येक हिंदू दांपत्याने किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे, हे विश्व हिंदू परिषदेचे सर्वाधिक ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे वक्तव्य वाचून हसावे की रडावे हेच समजेनासे झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटना बुरसटलेल्या विचारांच्या आहेत, अशी टीका नेहमीच केली जाते. त्यात बहुतांश प्रमाणात तथ्य नसले तरीही सिंघल यांच्यासारखी मंडळी टीकाकारांना अशी संधी देण्याचे काम करीत असतात.


संघटनेचे नाव विश्व हिंदू परिषद असले तरीही जगातील सर्व हिंदूंच्या हिताचा ठेका संबंधित संघटनेकडे नाही. उलटपक्षी संघ परिवारातील सर्वाधिक उग्र आणि भडक संघटना हीच विश्व हिंदू परिषदेची ओळख आहे. शिवाय १९८९ आणि १९९१च्या काळात असलेली संघटनेची लोकप्रियताही आता राहिलेली नाही. रामजन्मभूमीचे आंदोलन उभारून बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्यापासून पळ काढणारी हीच विश्व हिंदू परिषद आणि हेच ते अशोक सिंघल. त्यामुळे संघ परिवारातील अनेक स्वयंसेवकांचाही या संघटनेवर विशेष लोभ नाही.

हिंदू दांपत्याला पाच मुले हवीत, हे सिंघल यांचे हे वैयक्तिक मत आहे, की विश्व हिंदू परिषदेचे मत आहे, की संघाचीही हीच भूमिका आहे, याबद्दल काही स्पष्ट झालेले नाही. अर्थात, त्याने फारसा फरक पडणार नाही. असे वक्तव्य करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संघटना मूर्खच म्हणायला हवी. मध्यंतरी कोची येथे पार पडलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत दत्तात्रय होस्बाळे यांनी हिंदू दांपत्यांनी कमीत कमी तीन मुलांना जन्म द्यायला हवा, अशी बुरसटलेली भूमिका मांडली होती. तेव्हाही संघ आणि होस्बाळे टीकेचे धनी झाले होते. तेव्हा संघही सिंघल यांच्यापेक्षा खूप काही वेगळी भूमिका मांडणारा नाही.

१९८० च्या दशकांत जेव्हा राजीव गांधी यांनी संगणकीकरणाचा धडाका सुरू केला होता, तेव्हा संघ परिवारातील भारतीय मजदूर संघ नावाच्या एका संघटनेने अशीच बुरसटलेली आणि प्रगती रोखणारी भूमिका घेत संगणकीकरणाला विरोध केला होता. काय झाले आता त्या भूमिकेचे. मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांची पोरं नि पोरी आता मोबाईलवर इंटरनेट पाहण्यात मग्न असतील. त्यावेळी कामगार कपातीची भीती दाखवून मजदूर संघाने त्रागा केला होता. सिंघल यांची ही भूमिका देखील त्याच बुरसटलेल्या विचारांच्या पंक्तीत बसणारी आहे.

साधूसंत आणि भगव्या वेशातील मंडळींच्या गराड्यात अडकलेल्या अशोक सिंघल यांचा भारतातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेशी दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही, हेच त्यांच्या वक्तव्यातून समोर येते. मुळात सध्या नवरा आणि बायको अशा दोघांनी नोकऱ्या केल्यानंतरही घर चालविणे कठीण होऊन बसले आहे. अवकाशात गेलेले महागाईचे रॉकेट खाली येण्याचे नाव घेत नाही. सिंघल यांच्याच विचारांचे नरेंद्र मोदी सत्तेवर आले तरी ते महागाई कमी करू शकतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे महागाई वाढतच जाणार.

महागाईने खिशावर मारलेला डल्ला, घरासाठीचे हप्ते, इतर कुठले कुठले हप्ते, एका किंवा फारतर दोन पोरांच्या शिक्षणावरील खर्च, अगदी सामान्यपणे आयुष्य जगतानाही होणारी त्रेधातिरपीट यांच्यामुळे सर्वसामान्य माणूस कसाबसा दिवस ढकलतो आहे. तो छान आनंदात जगतो आहे, असा कोणाचाही  दावा नाही. सिंघल यांचे समर्थक कदाचित असा दावा करू शकतील. भविष्यात पेट्रोल भडकणार, गॅस सिलिंडरचे दर महागणार, भाज्या आणि तेलाचे दर वधारणार, घरांच्या किंमती आणखी वाढणार नि उत्तम तसेच दर्जेदार शिक्षणही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत जाणार. त्यामुळे मिळेल तितके उत्पन्न कमी, अशीच परिस्थिती असणार आहे.

त्यातून मुलांची किंवा घरातील ज्येष्ठांची आजारपणं, वाढत्या वयाबरोबर वाढत जाणारा शिक्षणावरील खर्च, अॅडमिशनसाठी अव्वाच्या सव्वा घेतली जाणारी डोनेशन्स, आजूबाजूच्या नवनवीन व्यवधानांमुळं मुलांच्या पालकांकडून वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यावर वाढत जाणार खर्च, त्यांच्या भविष्यासाठी करावी लागणारी तरतूद अशा सर्व गोष्टींची सिंघल तुम्हाला काहीच कल्पना दिसत नाहीये. बायको आणि एक-दोन पोरांचा संसार रेटताना माणूस मेटाकुटीला येतोय. तुमचं काय जातंय, ‘पाच पोरं जन्माला घाला,’ असं सांगायला.


तुम्हाला नसली तरीही या सर्व परिस्थितीची जाण हिंदू धर्मातील मध्यमवर्गीय आणि गरीब दांपत्याला आहे. कारण तो सोसतो आहे. त्यामुळेच ‘हम दो हमारे दो’वरून ‘हम दो हमारा एक’ असा नवा नारा घराघरातून दिला जातोय. सरकारने कोणताही जनजागृती न करताच नागरिकांनी स्वतःहूनच हे धोरण स्वीकारले आहे. कारण त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच त्यांच्यासमोर नाही. तेव्हा तुमच्या परिषदेने कितीही चिंतन बैठका घेतल्या, बौद्धिकं घेतली, घरोघरी जनसंपर्क अभियान राबविले तरीही हिंदू समाज तुमच्या अशा मूर्खासारख्या वक्तव्यांना बधणार नाही.

सिंघल, अहो सारा हिंदू समाज सोडा. तुमच्या संघटनेच्या आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांना किंवा स्वयंसेवकांना विचारा. ‘हम दो हमारे पाँच’चा अंगीकार करण्यास ते तयार आहेत का? एकदा तरी तुम्ही हे विचारलं असतं ना, तरी तुम्हाला इतकं काही काही ऐकावं लागलं असतं की ते वक्तव्य करण्याची हिंमतही तुम्ही केली नसती. तेव्हा हिंदू समाजाप्रमाणेच परिषदेच्या कार्यकर्त्यांशी असलेला संपर्कही घटलेला दिसतोय.

भारतातील विविध धर्मियांची टक्केवारी किती ते पाहूयात. २००१ च्या जनगणेनुसार भारतात एकूण एक अब्ज दोन कोटी ८६ लाख दहा हजार ३२८ नागरिक आहेत. त्यापैकी ८२ कोटी ७५ लाख ७८ हजार ८६८ हिंदू आहेत. एकूण लोकसंखेच्या ८०.५ टक्के. मुस्लिम आहेत तेरा कोटी ८१ लाख ८८ हजार २४०. एकूण लोकसंख्येच्या १३.४ टक्के. ख्रिश्चन आहेत दोन कोटी ४० लाख ८० हजार १६. एकूण टक्केवारी अवघे दोन पूर्णांक तीन. बाकी शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ज्यू मंडळींच्या लोकसंख्येशी सिंघल प्रभृतींना काही वावडे वाटण्याची शक्यता नाही. तेव्हा येत्या पन्नास वर्षांमध्ये तरी सिंघल यांना जी भीती वाटतेय, ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. 



तुम्हाला जर मुस्लिमांचे आणि ख्रिश्चनांचे अनुकरणच करायचे असेल ना, तर ते ‘हम दो हमारे पाँच’ अशा चुकीच्या पद्धतीने करू नका. हिंदू नागरिकांचा सेक्स रेशो ९३१ आहे. मुस्लिमांचा तो ९३६ आहे आणि ख्रिश्चनांचा १००९ आहे. मुलगा आणि मुलगी यांचा सेक्स रेशो सुधारण्यात दोन्ही धर्मांचा आदर्श घ्या. हिंदू धर्मातील चाइल्ड सेक्स रेशो फक्त ९२५ आहे. मुस्लिमांमध्ये तो ९५० आणि ख्रिश्चनांमध्ये ९६४ इतका आहे. अनुकरण करायचे ना तर इथे करा. ख्रिश्चनांचा साक्षरता दर ८०.३ टक्के आहे. हिंदू धर्मातील साक्षरता ६५ टक्क्यांवरच अडकलीय. ती ८० टक्क्यांपेक्षा अधिक करा. हिंदू धर्मात महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ५३.२ इतकी आहे. दुर्गा भारतीच्या मदतीने हा दर कसा वाढले, यावर लक्ष केंद्रीत करा. इतके केलेत तरी खूप पुरेसे आहे.


शिवाय ‘हम पाच हमारे पच्चीस’ ही घोषणा भाजपवाल्यांनी प्रसिद्ध केलेली. त्यात तथ्य किती आणि फक्त घोषणेसाठी घोषणा किती, याचा अभ्यास कोणीही केलेला नाही. मात्र, हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो किंवा शीख असो महागाई तसेच जगतानाच्या समस्या सर्वांसाठीच सारख्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना उत्तम आणि उज्ज्व भविष्य मिळावे, अशी इच्छा असलेला कोणताही सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब पालक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे धाडस करणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा असो. त्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुस्लिम माणूसही ‘हम पाँच हमारे पच्चीस’ किंवा ‘हम दो हमारे पाँच’ची भूमिका मान्य करेल, याची ‘सूत’राम शक्यता नाही.

तेव्हा सिंघल हिंदू धर्माच्या संकेतांप्रमाणे निवृत्ती स्वीकारून वानप्रस्थाक्षमाची वाट धरा. तेच तुमच्यासाठी, हिंदू धर्मासाठी आणि संघ परिवारासाठीही योग्य आहे.

ता. क. – हिंदू दांपत्यांनी एक किंवा दोनऐवजी पाच-पाच मुलांना जन्म दिला, तरी संघशाखांची रोडावलेली संख्या वाढेल, अशी आशा बाळगू नका. हिंदू समाजाची संख्या कशी वाढेल, यापेक्षा परिवाराने संघाचा कणा असलेल्या शाखांची आणि शाखांवरची संख्या कशी वाढेल, याचा विचार केल्यास ते सर्वांसाठीच चांगले आहे.