Showing posts with label Babri Masjid. Show all posts
Showing posts with label Babri Masjid. Show all posts

Tuesday, May 06, 2014

रामलला 'हम आएंगे'

मंदिर भव्य बनाऐंगे...

उत्तर प्रदेशात यायचं. लखनऊ, रायबरेली, अमेठी, वाराणसी आणि इतर ठिकाणी जायचं. पण अयोध्येला जायचं नाही, हे माझ्या मनाला कधीच पटणार नव्हतं. त्यामुळं व्हाया सुलतानपूर अयोध्येला निघालो. रात्री अयोध्येला पोहोचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरायचं. रामललाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं असं डोक्यात होतं. सुलतानपूरहून बसमध्ये बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर रामजन्मभूमी आंदोलनाचा सगळा पटच डोळ्यासमोरून जात होता. 



१९९० आणि १९९२ या दोन्ही वर्षी जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा मी अनुक्रमे सहावी आणि आठवीमध्ये होतो. तेव्लहा हान असलो आणि आता बावीस-चोवीस वर्ष उलटली असली तरीही सगळं काही, अगदी कालपरवा घडल्यासारखं डोळ्यासमोर आहे. पहिल्या वेळेस चुलत भाऊ शैलेश आणि नंतर चुलत बहिण अर्चना कारसेवेत सहभागी झाले होते. शिवाय आमच्या परिसरातील अनिल बर्वे, विक्रम सुर्वे, प्रकाश जोशी, धनंजय वाघ, विनायक राहुरकर, धनंजय घाटेसह इतरही अनेक मित्र कारसेवेला गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कहाण्या, किस्से आणि आठवणी ऐकल्या होत्या. 

अयोध्या, श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि तेव्हाचा सगळा काळ डोळ्यासमोरून तरळत होता. पुणे स्टेशनवर अयोध्येकडे जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी आणि खचाखच भरलेल्या रेल्वे दिसत होत्या. आताइतका माध्यमांचा धुमाकूळ नसल्यामुळे कुठून तरी उडत बातम्या येत असत. खरं तर बातम्या नाहीच. अफवाच त्या. मनोहर जोशी शिवसैनिकासह विमानाने कारसेवेला जाणार, कारसेवक पॅराशूटनं अयोध्येतील विवादित जागेजवळ उतरले वगैरे वगैरे बातम्या कूठून कुठून कानावर यायच्या. कुणीकुणी त्या बातम्या ऐकून फटाकेही फोडायचं आणि पेढेही वाटायचं. पण बऱ्याचशा बातम्यांमध्ये तथ्य नसायचे हे नंतर समजायचं. 



चौकाचौकांतील संदेश फलकांवर चिटकविलेल्या सामना आणि नवाकाळच्या बातम्या नि अग्रलेख वाचायला प्रचंड गर्दी होत असे. लोक उत्सुकतेने ते वाचत आणि त्यावर चर्चा व्हायची. नातूबागेच्या मैदानावर प्रमोद महाजन यांनी मोठी सभा घेऊन संघ स्वयंसेवकांच्या तिसऱ्या प्रकाराची व्याख्या केली होती. म्हणजे पहिला नियमित स्वयंसेवक, दुसरा नैमित्तिक कार्यक्रमांना येणारा स्वयंसेवक आणि तिसरा म्हणजे काय राडा करायचा आहे का,  तर येतो, असं विचारणारा स्वयंसेवक. रामजन्मभूमी आंदोलनात तिसऱ्या गटातील स्वयंसेवकांचा पुढाकार आहे, असं सांगून मिळविलेल्या टाळ्या... ते सगळं डोळ्यासमोर तरळत होतं. 

सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएेँगे..., तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से..., रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाऐंगे, मंदिर भव्य बनाऐंगे... जो न हमारे राम का, वो न हमारे काम का... सगळ्या घोेषणा पुन्हा एकदा कानात घुमत होत्या. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबराच्या नावानं तयार झालेली वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशभरात झालेला जल्लोष, रस्त्यारस्त्यावर वाटण्यात आलेली साखर आणि पेढे, रामजन्मभूमी आंदोलनाचा बदल घेण्यासाठी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत पेटविलेली दंगल आणि बाळासाहेब ठाकरे नि शिवसेनेनं त्याला दिलेलं चोख प्रत्युत्तर, नंतर कायमचा धडा शिकेलेले धर्मांध मुसलमान, अयोध्या तो एक झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है... ही वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर घुमलेली घोषणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर विनाकारण घातलेली बंदी आणि नंतर तोंडावर आपटलेलं सरकार, हिंदुत्ववाद्यांचे तेव्हा हिरो बनलेले कल्याणसिंह हे सारं काही सुलतानपूरहून अयोध्येला जाताना मला आठवत होतं. 



फैझाबादहून अयोध्येत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून शुचिर्भूत होऊन दर्शनासाठी निघालो. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. कुठं घरासमोर, दुकानांसमोर सडे घातले जात होते. रामचरितमानस, हनुमान चालिसा आणि राम-हनुमानाच्या भजनांचे स्वर कानावर येत होते. कुठे कचोरी (खस्ता), जिलेबी आणि सामोशाचे घाणे पडत होते. त्याचा गंध दरवळत होता. मंदिर मार्गावर जाताना दुकानदार मंडळी पेढे, प्रसाद, हार, फुलं घेण्यासाठी मागे लागत होती. तसे ते सगळीकडेच लागतात. त्या सर्वांना टाळून हनुमान गढीपर्यंत पोहोचलो.



चाळीस-पन्नास पायऱ्या चढून हनुमान गढीवर पोहोचलो. हनुमानाचे वंशज असलेल्या माकडांची वर्दळ मंदिरात सर्वत्र आहे. तुमच्या हातात प्रसाद असेल तर मग ते तुमच्या हातातून प्रसाद हिसकावतातच. तुम्ही दिला नाही, तर प्रसंगी चावतातही. हनुमान गढी इथं जाऊन 'राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की...' केलं. रामाचं दर्शन घेण्याआधी रामभक्त हनुमानाचं दर्शन घ्यावच लागणार. हनुमानाची दोन रुपं आहेत, एक वीर मारूती. जो पराक्रमी आहे, आक्रमक आहे. दुसरा आहे दास मारूती. महापराक्रमी परमप्रतापी वीर मारूती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाचा दास म्हणून दास मारूतीचं रुप आपल्याला फक्त रामाच्या मंदिरातच दिसतं. इतर ठिकाणी असलेला गदाधारी हनुमान रामांच्या चरणी हात जोडून असतो. 

हनुमान गढीनंतर, जनक भवन, कनक भवन, दशरथ गद्दी वगैरे पाहिलं. दशरथ गद्दी इथं सहा फुटी हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दशरथ गद्दी इथं जाताना गाइडनं एक गल्ली दाखविलं. १९९० मध्ये झालेल्या कारसेवेच्या वेळी दोन कारसेवक इथंच हुतात्मा झाले होते, असं त्यानं एका गल्लीत शिरताना मला सांगितलं आणि अंगावर अक्षरशः काटा आला. कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी या बंधूंचं राममंदिरासाठीचं बलिदन कोण विसरू शकेल. परिंदा भी पर मा नही सकेगा... या मुसलमानांचे मसीहा मुलायमसिंह यादव यांचं म्हणणं खोटं करून दाखविणाऱ्या कोठारी बंधूंनी लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाऐंगे... असं म्हणत राममंदिरासाठी प्राणांची बाजी लावली. ऐहिक सुखासाठी कशाचीच तमा न बाळगणाऱ्यांच्या या जगात कोठारी बंधूंनी एका ध्येयासाठी, विचारासाठी प्राणांचे बलिदान केले. गाइडनं अयोध्येची माहिती देताना बोलता बोलता सांगितलं, की अयोध्येमध्ये एकूण साडेसात हजार छोटी-मोठी मंदिरं आहेत. इतकी मंदिरं आहेत. राम, सीता, हनुमान, शंकर भगवान, माँ दुर्गा आणि अशा अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. माझ्यामते त्या साडेसात हजार मंदिरांमध्ये आणखी दोन मंदिर कम स्मारकं हवीत. एक म्हणजे रामकुमार कोठारी यांचं आणि दुसरं शरदकुमार कोेठारी यांचं.



रामललाचं दर्शन घेण्यापूर्वी रामाचा दास हनुमान याचं दर्शन घेतलं. तसंच रामासाठी प्राणापर्ण करणाऱ्या त्यांच्या दोन सर्वश्रेष्ठ भक्तांचंही दर्शन घडलं. तिथून मग राममंदिराच्या दिशेनं निघालो. संपूर्ण अयोध्येत आणि विशेषतः मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मंदिरासमोर जाईपर्यंत चारवेळा आपली काटोकोर तपासणी केली जाते. घड्याळ, मोबाईल, पेन ड्राईव्ह, सीम कार्ड, चिप वैगेर काहीही बरोबर नेऊ दिलं जात नाही. इतंकच सोडा कंगवा आणि टूथपिक सुद्धा त्यांनी काढून ठेवायला सांगितल्या. 



मंदिर मार्गावर प्रवेश केल्यानंतर सगळा मार्ग बंदिस्त आहे. तीनही बाजूंनी लोखंडी जाळीनं मार्ग बंदिस्त आहे. आपण फक्त चालत रहायचं. त्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे परिसरातील माकडांपासून आपला बचाव होतो. अनेक वळणं वळणं पार करून एका चढावर पोहोचल्यानंतर मंदिर दिसू लागतं. मंदिरावर डौलानं फडकणारा भगवा झेंडा दिसू लागतो. चढ चढल्यानंतर साधारण वीस-पंचवीस पावलं चालल्यानंतर बरोब्बर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहतो. मंदिर आणि आपल्यामध्ये पन्नास पावलांचं अंतर असतं. इथूनच आपल्याला रामललाचं दर्शन घ्यावं लागतं. पण प्रकाशव्यवस्था उत्तम असल्यामुळं दर्शन खूप मस्त होतं. तंबूसारख्या आकारच्या मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. मोठ्या थाटात आणि दिमाखात विराजमान बसले आहेत. त्यांच्यासमोर नतमस्त झाल्यानंतर मग साधारण एक-दीड किलोमीटरची पायपीट करून पुन्हा लॉकर रूमपाशी पोहोचलो. 

मुळात कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची फारशी उत्सुकता मला नसते. मात्र, अयोध्येचं राममंदिर त्याला अपवाद आहे. दलित समाजाच्या पुनरुत्थानात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आंदोलनाचं जे महत्त्व आहे, तेच हिंदू समाज संघटनाच्या इतिहासात राममंदिराच्या आंदोलनाचं महत्त्व आहे. त्यामुळं हे मंदिर इतर सर्व मंदिरापेक्षा वेगळं आहे. शिवाय काशी-मथुरेत मंदिराच्या बाजूला मशीद आहे. मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही. इथं राममंदिर पाडून त्यावर मशीद बांधण्यात आली होती. मशीद कसली वादग्रस्त वास्तूच होती ती. ना तिथं मुस्लिम कधी नमाज पढले ना तिथं कधी धार्मिक प्रथापरंपरा जपल्या गेल्या. त्यामुळं अयोध्येचं आंदोलन हा एक धडा होता. शांतपणे शेजारी रहाल तर कदाचित आपण सुखाने नांदू शकू. पण जर आक्रमण करून आमच्या छाताडावर तुमची संस्कृती नि तुमच्या परंपरा लादण्याचा प्रयत्न केलात, तर बाबरी मशिदीसारखे उद्ध्वस्त व्हाल. रामजन्मभूमी आंदोलनाचा खरं तर हाच धडा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. 



रामललाचं छान दर्शन झाल्यानंतर मग नाश्त्याकडे वळलो. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती. पुरीभाजी, कचौरी (खस्ता) आणि चहा घेतल्यानंतर मग अयोध्येतील लोकांशी थोडं बोललो. त्यांना काय वाटतं, काय नाही, हे जाणून घेतलं. अयोध्येतून 'लल्लूसिंह को इस बार नाही जिताया, तो भगवान राम भी हमें माफ नही करेंगे...' अयोध्येतील एका चहावाल्याची बोलकी प्रतिक्रिया. 'भैय्या मोदीजी का पीएम बनना तो तय है. इसबार नही तो कभी नही...' आणखी एक बोलकी प्रतिक्रिया. चहावाले, पानवाले, पुरीभाजीचे ठेले लावणारे, रस्त्यारस्त्यावरून भगवी वस्त्र घालून हिंडणारे साधू-साध्वी सगळ्यांच्याच तोंडी मोदीनामाचा जप. मंदिर बनेगा क्या... मंदिर बनना चाहिए क्या... या प्रश्नांना थेट उत्तर. 'मंदिर तो बनेगा. मंदिर बनने से कौन रोक सकता है. सब तय्यारी हो चुकी है. पत्थर काम भी पुरा हो  रहा है. अब सिर्फ मंजुरी मिलना बाकी है. एक दिन में मंदिर का काम शुरू हो जाएगा...' 



अयोध्यावासियांची प्रभू रामचंद्रांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढीच मंदिर बनणार आणि मोदीच ते बनविणार यावरही आहे. शौचालय व्हायलाच पाहिजे. पण देवालयही पाहिजे. विकास पाहिजे पण हेदेखील व्हायलाच पाहिजे, पण मूळ मुद्दे आणि विचार यांना तिलांजली देऊन नाही, यावरही आक्षेप असण्याचे कारण नाही. शिवाय आता बाबरी मशीद नामक वादग्रस्त वास्तू त्या ठिकाणी नाही. तिथं पुन्हा बाबरी मशीद बांधण्याची ताकद कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये नाही आणि मुख्य म्हणजे आता तिथं असलेलं रामललाचं मंदिर हटविण्याची हिंमत असलेला 'माई का लाल' जन्माला आलेला नाही आणि भविष्यात कधीही जन्माला यायची शक्यताही नाही.

भरपूर लोकांशी बोलल्यानंतर मग श्री अयोध्येतून निघालो. अयोध्यावासियांच्या शब्दात सांगायचे तर अयोध्याजी मधून निघालो. मनातल्या मनात जोरात घोषणा दिली, 'रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाऐंगे.' यामधील 'हम आएंगे' या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सूज्ञ वाचकांना सांगण्याची काहीच गरज नाही. 

तेव्हा अयोध्येतून लखनऊसाठी निघालो. लखनऊला जाऊन मग पुढं वाराणसीसाठी निघायचं होतं. नरेंद्र मोदींप्रमाणेच 'मुझे भी माँ गंगा बुला रही है...'

बोलो सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय.

Friday, November 23, 2012

बाळासाहेब… देशातील महाराष्ट्राची ओळख



 
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटी इथंगेलो होतो. २००७ मध्ये. त्यावेळी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय असलेले पोलॉक महंत नावाचे एक गृहस्थ भेटले होते. वय साधारण चाळीस असेल. ते तिथल्या ट्रान्सपोर्ट कमिटीचे अध्यक्ष होते. मी महाराष्ट्रातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी विचारलेला पहिलाच प्रश्न मला बुचकळ्यात टाकणारा होता. ‘अरे, आपके बालासाहब कैसे है…’ मला प्रश्न पडला, की याला लेकाला बाळासाहेबांची एकदम आठवण येण्याचे कारण काय. तेव्हा त्यानं सांगितलेला किस्सा एकदम अफलातून होता.
महंत हे तिसरी चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेले होते. त्यावेळी दादरजवळ गर्दीमध्ये ते हरविले. लहान असल्यामुळे त्यांना तसे काहीच कळत नव्हते आणि घरचे सोबत नाही, म्हटल्यावर त्यांना रडू कोसळले. तेव्हा ही गोष्टी शिवसैनिकांनी पाहिली. त्यांनी महंत यांना एका शिवसैनिकाच्या घरी नेले. तिथे त्यांची विचारपूस केली. का रडत आहे किंवा कुठून आले वगैरे. नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये महंत हे त्यांच्या आई-वडिलांच्या जवळ होते.
‘ही गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. त्यामुळेच माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबध आहे. त्यामुळेच मी विचारले, बाळासाहेब कसे आहेत?’ असे महंत यांनी सांगितल्यानंतर थोडासा धक्काच बसला.

दुसरा अनुभव आला पुदुच्चेरीमध्ये. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो, तेव्हा पुदुच्चेरीलाही गेलो होतो. तिथे रस्त्यावरून फिरत असताना एल गणपती नावाचे एक अॅडव्होकेट भेटले. साधारण पन्नाशीकडे झुकलेले. बाळासाहेबांचे डायहार्ड फॅन. कट्टर हिंदुत्त्ववादी आणि काँग्रेसला ठणकावून सांगणारे नेते म्हणून गणपती यांना बाळासाहेब आवडायचे. बाळासाहेबांनी आवाज दिला, की पाकिस्तानमध्येही त्याची दखल घेतली जाते इतकी त्यांची दहशत आहे, वगैरे भरभरून बोलत होते. जे पटत नाही, त्याविरोधात आवाज देण्याचा बाळासाहेबांचा गुण गणपती यांना विशेष भावत होता.
पुदुच्चेरीचे तेव्हाचे माजी आणि सध्याचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी कसा त्रास दिला किंवा सोनिया गांधी यांनीही कट्टर कार्यकर्त्याकडे कसे दुर्लक्ष केले, यावर गणपती भरभरून बोलत होते. काँग्रेसमध्ये सगळे असेच लोक आहेत. त्यांना वठणीवर आणणारा एखादा नेता आम्हालाही हवा आहे. कदाचित बाळासाहेबच हे काम करू शकतील. म्हणूनच शिवसेनेची शाखा पुदुच्चेरीमध्ये उघडायला हवी, अशी गणपती यांची मागणी होती.
 
यासह इतर विषयांवरही गप्पा झाल्या आणि मग मी त्यांचा निरोप घेतला. अर्थात, बाळासाहेबांच्या राज्यातून आलेल्या माणसाला भेटलो आणि त्याच्याशी भेटलो याचेच कदाचित त्यांना समाधान होते. आशिष चांदोरकर भेटल्याचे कमी. 


 
महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. अगदी आंडू, पांडू आणि झंडू नेत्यांपासून ते राष्ट्रीत नेते म्हणून मिरविणा-यापर्यंत अनेक नेत्यांची रांगच आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर त्यापैकी एकाही नेत्याची ओळख महाराष्ट्राचा नेता म्हणून नाही. कोणतेही पद किंवा सत्ता न उपभोगलेल्या बाळासाहेबांना हे भाग्य कसे लाभले, हाच विचार माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. बाळासाहेब गेल्यानंतर तोच विचार अधिक प्रकर्षानं जाणवायला लागला. मुंबईत बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेल्यानंतर चाहत्यांचा उसळलेला अतिमहाप्रचंड जनसागर पाहिला आणि तेव्हापासून तोच विचार मनात घोळतोय.

राजकारणात असलेल्या एखाद्या माणसावर इतकं निस्सीम आणि निस्वार्थी प्रेम करणारे इतके चाहते असू शकतात, ही गोष्टच आश्चर्यकारक वाटते. म्हणजे दक्षिणेत एन. टी. रामाराव किंवा एम. जी. रामचंद्रन या कलाकारांना जी लोकप्रियता लाभली, त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोकप्रिय बाळासाहेब आहेत, याचं यथार्थ दर्शन रविवारी घडलं. महासागर लोटला म्हणजे काय, याचा अर्थ माझ्या आणि नंतरच्या मंडळींना त्यादिवशीच ख-या अर्थाने कळला.

विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यातील शेतक-यापासून ते मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या एखाद्या गर्भश्रीमंत धनाढ्यापर्यंत, अमिताभ बच्चन-अनिल अंबानी यांच्यापासून ते एखाद्या तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत आणि गांधी टोपीवाल्या म्हाता-या माणसापासून ते थ्री फोर्थ घातलेल्या तरुण ललनांपर्यंत सर्वांचीच या जनसागरात उपस्थिती होती. त्यापैकी बाळासाहेबांचे थेट उपकार असलेले राजकारणी, त्यांच्या सान्निध्यात आलेले विविध क्षेत्रातील महनीय आणि सामान्य शिवसैनिक सोडले तर बाकीचे लोक कोण होते… बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणारे निस्वार्थी चाहते होते. आपलं जवळचं कोणीतरी गेलं आहे आणि त्याचं अंत्यदर्शन घेतल्याशिवाय चैन पडणार नाही, अशाच भावनेने मुंबईत महासागर लोटला होता.

तुमच्या आमच्या भाषेत बोलणारे बाळासाहेब होते. आपल्या अन्याय-अत्याचाराविरूद्ध असलेली चीड, एखाद्या घटनेबद्दलचा रोष ते आपल्या शब्दांतच व्यक्त करायचे. भडव्यांनोपासून ते यडझव्यापर्यंत बोलीभाषेतील अनेक शिव्या ते अगदी सहजपणे भाषणांमधून देत. पण त्यातून त्यांचा राग व्यक्त होत असे. उगाच भाषणांत रंगत आणायची म्हणून किंवा स्टाईल जपायची म्हणून त्या नसायच्या. उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हा झालेल्या भाषणात त्यांनी तेव्हाचे मुख्य निवडणूक आयुक्त जेम्स मायकेल लिंगडोह यांचा ‘कोण रे तो डोहात लिंग बुडवून बसलेला…’ असा उल्लेख पोट धरून हसायला लावणारा होता. बाळासाहेब असेच बिनधास्त होते, बेधडक होते आणि जसे होते तसेच होते. आतून एक आणि भाषणात एक अशी भानगड नव्हती. लोकांसमोर होते. म्हणूनच ते लोकप्रिय झाले. 


व्यंगचित्रकार म्हणून ते महान होते, उत्तम पत्रकार होते, राजकारणात राहून पदाचा मोह त्यांना झाला नाही, कर्तृत्व, नेतृत्व आणि वर्क्तृत्व यामध्ये अजोड होते आणि बरेच काही होते. पण त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटायचा तो त्यांच्या मोकळेढाकळेपणामुळे. इतका मोठा नेता असूनही आपल्यासारखेच बोलतो, वागतो यामुळे. बोललेला शब्द फिरवित नाही म्हणून. संघ परिवाराने जबाबदारी टाळल्यानंतरही ‘बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ असे अगदी बिनधास्तपणे जाहीर करतो म्हणून. हिंदुत्त्ववादी म्हणून मिरवणा-यांनी पाठ फिरविल्यानंतरही ‘साध्वी प्रज्ञासिंहला सर्व कायदेशीर मदत करण्यासाठी शिवसेना तयार आहे,’ असे सांगणा-या संघटनेचे प्रमुख होते म्हणून. पाकड्यांना खेळू देणार नाही म्हणजे नाही, हा शब्द शेवटपर्यंत पाळला म्हणून. मुंबईत शिवतीर्थावर जो अथांग जनसागर उसळला तो यामुळेच. एखादा राजकारणी आपल्याला सोडून गेला म्हणून लोक आनंद व्यक्त करतात. पण इथे लाखोंच्या डोळ्यात अश्रू होते. हीच बाळासाहेबांची श्रीमंती होती. पुण्याई होती. 

बाळासाहेब गेले, हे मानायला मन तयार नाही. अजूनही असं वाटतं, की कधीतरी लुंगीपुचाट चिदंबरम यांना बाळासाहेब ‘सामना’तून दम भरतील. ‘शिवसेनाप्रमुखांच्या इशा-यामुळे पाकिस्तानची हातभर फाटली’ असं शीर्षक पुन्हा एकदा ‘सामना’मध्ये वाचायला मिळेल. छोट्या-मोठ्या कलाकारापासून ते राजकारण्यांपर्यंत कोणतरी आज मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली, असा फोटो पहायला मिळेल. शिवसेनाप्रमुखांची आज अमक्या अमक्या वाहिनीवर मुलाखत, अशी जाहिरात पहायला मिळेल. साहेबांची संजय राऊत साहेबांनी घेतलेली मॅरेथॉन मुलाखत तीन-चार महिन्यांनी वाचायला मिळेल. ‘सामना’तून साहेबांच्या शुभेच्छा किंवा एखादं निवेदन वाचायला मिळेल. पण… आता यापैकी काहीच घडणार नाही.