Showing posts with label Shiv Wada. Show all posts
Showing posts with label Shiv Wada. Show all posts

Wednesday, October 27, 2010

खा खा खादाडी भाग २

दादर-परळमदली काही राहिलेली ठिकाणं आणि पूर्वी साम मराठीमध्ये काम करत असताना बेलापूरमध्ये काही ठिकाणी चाखलेली वेगवेगळ्या पदार्थांची तोंडओळख इथं करुन देत आहे. प्रत्येक ठिकाणची प्रत्येक गोष्ट चांगली चविष्ट असतेच असं नाही आणि प्रत्येक पदार्थ आपण खातोच असंही नाही. पण जेजे उत्तम चविष्ट सुंदर तेते देण्याचा हा प्रयत्न...



मराठमोळी मिसळ...

मराठमोळ्या वरळीमध्ये अस्सल मराठमोळी मिसळ खाण्याचा योग साम मराठीचा जुना सहकारी पराग खरात याच्यामुळे आला. बोलता बोलता विषय निघाला तेव्हा तो म्हणाला तुम्ही वैशालीची मिसळ खाल्ली की नाही. एक नंबर मिसळ आणि झणझणीत रस्सा. मग निवांत वेळ काढून वैशालीत पोचलो. नुसती मिसळच नाही तर दही मिसळ, वडा, भजी या मराठी पदार्थांप्रमाणेच विविध गुजराती आयटम्स (खाण्याचे), फरसाण आणि सरते शेवटी फक्कड चहा असं सर्व काही मिळणारं हे मस्त रेस्तराँ म्हणजे वैशाली.

मिसळ खाण्यासाठीच आलो होतो, त्यामुळे आम्ही मिसळच घेतली. फक्त फरसाण आणि त्यावर वाटाण्याची उसळ ही मुंबईतली मिसळची व्याख्या असल्यामुळे इथं फारसं वेगळं दृष्य नव्हतं. तरीही फरसाणच्या जाड-बारीक शेव, नायलॉनच्या पोह्यांचा चिवडा असं वैविध्य होतं. पण रस्सा मात्र, इतरांच्या तुलनेत जरा हटके होता. थोडासा मालवणी स्टाईलचा किंवा नाशिकच्या काळ्या तिखटाच्या मिसळीच्या जवळ जाईल असा. जाळ निघेल असा झणझणीत नसला तरी घाम आला. त्यामुळं येणं फुकट गेलं, असं वाटलं नाही. शिवाय जांबोरी मैदानावरुन जाताना मंचेकर वडापाव आणि त्याच्या डायगोनली ऑपोझिट असलेल्या (साई की तत्सम काहीतरी) वडापावच्या आठवणी ताज्या झाल्या.



म्हैसूर मसाला...

दादरला परळ एसटी डेपोकडून पोर्तुगीज चौकाकडे जायला लागलं की दुस-या चौकात संध्याकाळी डोशाची एक गाडी लागते. सैतान चौकीच्या इथला चौक हे मला माहिती असलेलं नाव. इथं डोसा-उत्तप्पाचे काही प्रकार मिळतात. त्यापैकी म्हैसूर मसाला डोसा अप्रतिम. साध्या डोशावर बटाट्याची भाजी, कापलेला कांदा-टोमॅटो, किसलेले बिट, थोडी खोब-याची चटणी असा स्मॅश केलेला रगडा. एकदम स्वादिष्ट म्हैसूर डोसा तयार. सोबत सांबार आणि चटणी. त्यातही सांबार नसले तरी चालू शकेल, असा पद्धतीचे. पण ती उणिव चटणी भरुन काढते. त्यामुळे दिलखुश्श. इतर ठिकाणी साधा किंवा मसाला डोसा बारा रुपयांना असला तरी इथं मात्र, म्हैसूर मसाला डोसा अवघ्या बारा रुपयांना मिळतो.

शिवाय फुकटचा टाईमपास म्हणजे शिवसेना की मनसे की नारायण राणे यावर चौकातल्या तज्ज्ञांची चर्चा कानावर पडतेच. सातनंतर गेलात तर नक्कीच.



टीटीचा शिववडा...
दादर टीटीच्या (पूर्व) जवळ अशोक नावाचं हॉटेल आहे. तिथून पुढे स्वामीनारायण मंदिराकडे जायला लागलं की, कॉर्नरलाच शिववड्याची एक गाडी दिसेल. थोडी आतल्या बाजूला आहे. आतापर्यंत मी जे काही पाच-सहा ठिकाणचे शिववडा पाव आवर्जून खाल्ले त्यापैकी द बेस्ट शिववडा इथलाच. बाकीच्या ठिकाणांबद्दल न लिहिलेलंच बरं. पण इथला वडा मस्त गरमागरम असतो. पावही मऊ आणि चटणीही झणझणीत. त्यामुळे वडापावची दुसरा घेतल्याशिवाय स्वस्थ बसविणारच नाही.



बेलापूर गावातली मिसळ...

बेलापूर गावात मी जिथं राहतो (किंवा रहायचो) तिथं तळ्याशेजारी (राम मंदिराजवळ) मिळणारी मिसळ नवी मुंबई आणि मुंबईतील मला सर्वाधिक आवडलेली मिसळ आहे. एकदम छोटं झोपडीवजा टपरी. तीन बाकडी. त्यावर जेमतेम सात-आठ लोकं बसतील इतकीच जागा. पण चवीला बाप. रस्सा आणि तर्री पाहूनच पोट भरतं. फक्त फरसाण असलं तरी रस्सा बाकीची जबाबदारी पार पाडतो. कधीकधी गरमागरम रस्सा-वडाही भाव खाऊन जातो. दुपारी शाकाहारी मांसाहारी जेवणही तिथं मिळतं. पण मी काही जेवलेलो नाही. पण मिसळ मात्र, एक नंबर.



स्टेशनजवळची पाणीपुरी...

साम मराठीमध्ये असताना या पाणीपुरीवाल्याची दोस्ती झाली होती. स्टेशनकडून आल्यानंतर बाहेर पडताना उजवीकडे हा पाणीपुरीवाला असतो. संध्याकाळी साधारण सहानंतर. पाणीपुरीचं पाणी म्हणाल तर पित रहावं असं वाटतं. (दुस-या दिवशीचा विचार करुन जास्त पिणं होत नाही, हा भाग अलहिदा) गरमागरम रगडा आणि फक्त तिखट पाणी असं कॉम्बिनेशन खूप मस्त. खजूराचं गोड पाणी नाही घेतलं तरी चालेलसं. साममध्ये असताना आठवड्यातून सहावेळा तरी जाणं व्हायचं. त्या परिसरता किमान पाच ते सहा ठिकाणी पाणीपुरी मिळते. महागड्या हॉटेलांमधूनही मिळते. पण इथली चव त्याला नाही.



स्टेशनवरचा सामोसा...

बेलापूर स्टेशनवर जर तुम्ही बेलापूरहून सुटणारी गाडी पकडली तर ए गरम सामोसे... असं ओरडत एक मनुष्य चढतो. क्वचित कधीतरी हा योग जुळून आला तर त्याच्या कडचे सामोसे नक्की खा. दहा रुपयांत दोन सामोसे मिळतात. चवीला एकदम उत्तम असतात. शिवाय एकदम गरम. चटणी नसली तरी ते कोरडे वाटत नाहीत, हे विशेष. पाहता पाहता सामोसे कधी संपतात ते कळतही नाही.

बसस्टँडचा वडा...
बेलापूर बस डेपोच्या आवारातच एक छोटं दुकान आहे. तिथं स्नॅक्स आणि ज्यूस वगैरे मिळतात. तिथं सक्काळी सक्काळी गरमागरम बटाटे वडा मिळतो. पुण्यात जसा रौनक जवळ वडे, सामोसे, पॅटिससाठी गर्दी असते. तशीच गर्दी सक्काळी सक्काळी इथं वडा खाण्यासाठी असते. मुख्य म्हणजे फक्त वडा (पाव नाही) खाणा-यांचं प्रमाण अधिक. चटणी आणि वडा हे समीकरण इतकं फिट्ट आहे की बस्स. पण वड्यानंतर चहा मात्र, पिऊ नका. नाहीतर सगळी गंमत निघून जाईल.



सरतेशेवटी पान...
बेलापूरला पाम बीच रोडला अश्विथ नावाचं एक मध्यमवर्गीयांना परवडेल, असं चांगलं हॉटेल आहे. त्याच्या बाहेर एक पानाची टपरी आहे. लकलकीत पितळी भांड्यांच्या साक्षीनं तो पानं लावत असतो. त्याच्याकडे मसाला पानापासून ते १२०-३०० पर्यंत कोणतेही पान खा दिलखूष झालंच म्हणून समजा. तुम्ही त्याच्याकडे वारंवार येताय म्हटल्यावर साधा फुलचंद, रिमझिमवाला फुलचंद, डबल किवाम, हरीपत्ती सल्ली सुपारी, कात-चुना-किवाम लवंग जला के... असं काहीही भन्नाट कॉम्बिनेशन असलं तरी ते त्याच्या लक्षात असायचं. आपण गेल्यानंतर आपण काहीही न सांगता आपल्याला हवं असलेलं पान आपल्यासमोर ठेवेल तो खरा पानवाला, या पुलंच्या व्याख्येत हा पानवाला १०० टक्के बसणारा. कधी जर गेलात तर नक्की रसास्वाद घ्या.

Tuesday, February 24, 2009

"शिववडा'च्या निमित्तानं...


चला वडापावच्या गाड्यांवर...

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बटाटा वडा खाल्लाय. पण मुंबईतल्या एक-दोन ठिकाणचा (सोकॉल्ड कॉर्पोरेट वडापाव) अपवाद वगळला तर दुसरीकडे कुठेही बटाटा वड्याची चव खराब लागली नाही. त्यामुळं "शिववडा' तरी काय वेगळा असणार,'' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. हे वाचल्यानंतर मी खरोखरच विचार करु लागलो. रस्त्यावर ठिकठिकाणी लागणाऱ्या वडापावच्या गाड्यांवर अनेकवेळा वडा खाल्लाय. पण कुठेच मला वडा आवडला नाही, असं झालं नाही. आवडण्याचं प्रमाण कमी-अधिक असेल पण गाडीवरचा वडा आवडतोच. (मुळात वडापाव ही डिश माझी "वन ऑफ फेव्हरेट' आहे, हे सांगायला नकोच) त्यामुळं राज ठाकरेंच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे, हे मला पटलं आणि शिवसेना "शिववडा'च्या रुपानं नेमकं नवं काय देणार आहे, हा विचार उगाच मनात डोकावून गेला.
मुंबईतला वडापाव उर्वरित महाराष्ट्रात गेला आणि बटाटा वडा ही महाराष्ट्राची ओळख बनली. शिववडा मुंबईपुरताच मर्यादित असला तरी मला उगाचच पुण्यातल्या चवदार वड्यांचे स्पॉट्‌स डोळ्यासमोर उभे ठाकले. पुण्यात खरा वडा मिळतो तो हातगाड्यांवर. जोशी वडेवाले किंवा रोहित वडेवाले यांनी वडापावला गाडीवरुन दुकानात नेलं. पण गाडीवर मिळणारा वडापाव अजूनही लोकांच्या चवीस उतरतो. पूर्वी "प्रभा'च्या वड्याची चर्चा सगळीकडे होती. अजूनही जुन्या पिढीतले लोक "प्रभा'चं गुणगान गात असतात. पण हा झाला इतिहास. "प्रभा'च्या तोंडात मारतील असे "हॉटस्पॉट्‌स' आज पुण्यात आहेत. उलट प्रत्येकानं वड्याची स्वतःची वेगळी चव तयार केलीय. तसंच चव टिकवलीही आहे. त्यामुळं "प्रभा'ची प्रभावळ आता हळूहळू ओसरु लागलीय, यात शंका नाही.
टिळक स्मारक किंवा बालगंधर्वमध्ये कार्यक्रमाच्या मध्यंतराला मिळणारा बटाटा वडा हे देखील त्यात आहेतच. शनिपार चौकात भोज्या देवडी यांची गाडी, सहकारनगरमधला कृष्णा वडापाव, कॅम्पात लोकसत्ता कार्यालयाजवळ मिळणारा वडा, पत्र्या मारुतीच्या पाराजवळ लागणारी मामांची गाडी, दांडेकर पुलाजवळचे खराडे वडेवाले, नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळची गाडी, पुणे विद्यार्थी गृहाजवळचा वडापाव, शास्त्री रस्त्यावरच्या अजंठामधला वडा, वसंत चित्रपटगृहाजवळचा अन्नपूर्णाचा वडा, झेड ब्रिजच्या जंगली महाराज रस्त्याच्या बाजूची गाडी, रतन चित्रपटगृहाजवळची मधली गाडी, तुळशीबागेत सकाळी रौनकच्या दाराशी मिळणारा खर्डा-वडा किंवा अगदी खडकवासल्याच्या बॅकवॉटरजवळ असणाऱ्या वडापावच्या गाड्या... ही यादी अशीच वाढत जाईल. वडा किंवा भज्यांचा घाणा निघत असेल आणि आपण या परिसरातनं जात असू तर आपण वड्यांच्या गाडीकडे खेचलो जातोच. अगदी इच्छा नसतानाही. हीच तर त्यांच्या चवीची खासियत आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर नव्यानंच उघडण्यात आलेल्या "गोली वडापाव'चा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी वडापाव खाल्ल्याचा पश्‍चात्ताप कधीच झालेला नाही.
वडा गरमागरम असेल तर मग विचारुच नका. खोबरं-कोथिंबिरीची हिरवी तिखट चटणी, चिंचगुळाची किंवा खजुराची गोड-आंबट चटणी, कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि तळून खारावलेल्या मिरच्या या गोष्टी वड्याची चव वृद्धिंगत करतात. पण मूळच्या वड्याची चव खतरा असेल तर या पूरक गोष्टींची गरजच पडत नाही. प्रत्येक ठिकाणच्या वड्याची चव निराळी आणि पूरक पदार्थांचा मामलाही निराळा. त्यामुळं प्रत्येक वेळी नाविन्याचा अनुभव येतो. "प्रभा'च्या वड्यामध्ये लिंबाचा रस जाणीवपूर्वक वापरल्यासारखा वाटतो. दांडेकर पुलावरचा खराडेंचा वडा काहीच्या काही झणझणीत असतो की विचारता सोय नाही. पत्र्या मारुतीजवळ मामांच्या गाडीवर तिखट चटणी घेतल्याशिवाय वड्याची चव लागतच नाही. लोकसत्ताच्या जवळ मिळणाऱ्या वड्याचा आकार पाहूनच थक्क व्हायला होतं. तिथल्या मिरच्यांना मिठाप्रमाणेच हळदही लागलेली असते. म्हणजे भन्नाटच!
कृष्णा, खराडे आणि पत्र्या मारुती...
पूर्वी कृष्णाचा वडापाव एकदम मस्त होता. पण आता तिथल्या वड्याचा आकार कमी आणि पावाचा आकार भलता मोठा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गोंधळून जायला होतं. पण कृष्णाच्या वड्याची चव अजूनही तशीच आहे. शिवाय इथं घाणा काढल्या काढल्या वडे संपतात. त्यामुळं प्रत्येक वेळी गरमागरम वडा. त्यामुळं इथं फक्त वडा घेणं हेच सोईस्कर आहे. पत्र्या मारुतीजवळ मिळणारा वडा चवीला परिपूर्ण नसतोच. वड्याच्या आतल्या सारणामध्ये मीठ आणि तिखंट थोडंसं कमीच असतं. त्यामुळं पावाला झणझणीत चटणी लावल्यानंतर ही कसर भरुन निघते. म्हणूनच इथं वड्यासोबत चटणी घेतली तरच मजा आहे. नही तो बात जमेगी नही... खराडेंच्या वड्याचा पहिला घास घेतल्यानंतर पाणी मागितलं नाही तरच नवल. पण एक वडा खाल्ल्यानंतर दुसरा वडा खाण्यासाठी जीभ खवळली नाही असं कधीच होत नाही.
रामनाथचाही वडाच...
आणखीन एक राहिलं. पुण्यातल्या मिसळचा विषय निघाल्यानंतर टिळक रस्त्यावरच्या रामनाथचं नाव निघाल्यावाचून रहात नाही. पण रामनाथच्या मिसळइतकाच तिथला बटाटा वडा प्रसिद्ध आहे. कदाचित तिथल्या मिसळपेक्षा वडाच अधिच चवदार आहे. कारण रामनाथची मिसळ म्हणजे फक्त जाळ. अक्षरशः घाम निघतो आणि दुसऱ्या दिवशी त्रास होतोच होतो. पण बटाटा वड्याचं तसं नाही. इतर वड्यांपेक्षा आकाराला दुप्पट आणि चवीला काहीपट चांगला असणारा रामनाथचा वडा म्हणजे सुख. रामनाथ वड्यांसाठी प्रसिद्ध न होता मिसळसाठी कसा प्रसिद्ध झाला, हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
कर्जतच्या स्टेशनवर मिळणारा दिवाडकरचा वडा आता पुण्यातही मिळू लागलाय. तांबडी जोगेश्‍वरीच्या मंदिरासमोरच्या बोळात "दिवाडकर्स' हे नवं दुकान सुरु झालंय. पण तिथं खरोखरच कर्जतचा वडा मिळतो का हे मी तरी अजून "टेस्ट' केलेलं नाही. लवकरच तिथं जावं लागणार आहे, हे नक्की. तुमच्या मनातही वडापावच्या हॉटस्पॉट्‌सनी घर केलं असेल तर प्रतिक्रियांमध्ये त्याबद्दल लिहा. म्हणजे माझ्याप्रमाणेच इतरानांही त्याचा आस्वाद घेता येईल. सो लेट्‌स एन्जॉय. बटाटा वडा.