Friday, November 23, 2012

बाळासाहेब… देशातील महाराष्ट्राची ओळख



 
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटी इथंगेलो होतो. २००७ मध्ये. त्यावेळी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय असलेले पोलॉक महंत नावाचे एक गृहस्थ भेटले होते. वय साधारण चाळीस असेल. ते तिथल्या ट्रान्सपोर्ट कमिटीचे अध्यक्ष होते. मी महाराष्ट्रातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी विचारलेला पहिलाच प्रश्न मला बुचकळ्यात टाकणारा होता. ‘अरे, आपके बालासाहब कैसे है…’ मला प्रश्न पडला, की याला लेकाला बाळासाहेबांची एकदम आठवण येण्याचे कारण काय. तेव्हा त्यानं सांगितलेला किस्सा एकदम अफलातून होता.
महंत हे तिसरी चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेले होते. त्यावेळी दादरजवळ गर्दीमध्ये ते हरविले. लहान असल्यामुळे त्यांना तसे काहीच कळत नव्हते आणि घरचे सोबत नाही, म्हटल्यावर त्यांना रडू कोसळले. तेव्हा ही गोष्टी शिवसैनिकांनी पाहिली. त्यांनी महंत यांना एका शिवसैनिकाच्या घरी नेले. तिथे त्यांची विचारपूस केली. का रडत आहे किंवा कुठून आले वगैरे. नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये महंत हे त्यांच्या आई-वडिलांच्या जवळ होते.
‘ही गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. त्यामुळेच माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबध आहे. त्यामुळेच मी विचारले, बाळासाहेब कसे आहेत?’ असे महंत यांनी सांगितल्यानंतर थोडासा धक्काच बसला.

दुसरा अनुभव आला पुदुच्चेरीमध्ये. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो, तेव्हा पुदुच्चेरीलाही गेलो होतो. तिथे रस्त्यावरून फिरत असताना एल गणपती नावाचे एक अॅडव्होकेट भेटले. साधारण पन्नाशीकडे झुकलेले. बाळासाहेबांचे डायहार्ड फॅन. कट्टर हिंदुत्त्ववादी आणि काँग्रेसला ठणकावून सांगणारे नेते म्हणून गणपती यांना बाळासाहेब आवडायचे. बाळासाहेबांनी आवाज दिला, की पाकिस्तानमध्येही त्याची दखल घेतली जाते इतकी त्यांची दहशत आहे, वगैरे भरभरून बोलत होते. जे पटत नाही, त्याविरोधात आवाज देण्याचा बाळासाहेबांचा गुण गणपती यांना विशेष भावत होता.
पुदुच्चेरीचे तेव्हाचे माजी आणि सध्याचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी कसा त्रास दिला किंवा सोनिया गांधी यांनीही कट्टर कार्यकर्त्याकडे कसे दुर्लक्ष केले, यावर गणपती भरभरून बोलत होते. काँग्रेसमध्ये सगळे असेच लोक आहेत. त्यांना वठणीवर आणणारा एखादा नेता आम्हालाही हवा आहे. कदाचित बाळासाहेबच हे काम करू शकतील. म्हणूनच शिवसेनेची शाखा पुदुच्चेरीमध्ये उघडायला हवी, अशी गणपती यांची मागणी होती.
 
यासह इतर विषयांवरही गप्पा झाल्या आणि मग मी त्यांचा निरोप घेतला. अर्थात, बाळासाहेबांच्या राज्यातून आलेल्या माणसाला भेटलो आणि त्याच्याशी भेटलो याचेच कदाचित त्यांना समाधान होते. आशिष चांदोरकर भेटल्याचे कमी. 


 
महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. अगदी आंडू, पांडू आणि झंडू नेत्यांपासून ते राष्ट्रीत नेते म्हणून मिरविणा-यापर्यंत अनेक नेत्यांची रांगच आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर त्यापैकी एकाही नेत्याची ओळख महाराष्ट्राचा नेता म्हणून नाही. कोणतेही पद किंवा सत्ता न उपभोगलेल्या बाळासाहेबांना हे भाग्य कसे लाभले, हाच विचार माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. बाळासाहेब गेल्यानंतर तोच विचार अधिक प्रकर्षानं जाणवायला लागला. मुंबईत बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेल्यानंतर चाहत्यांचा उसळलेला अतिमहाप्रचंड जनसागर पाहिला आणि तेव्हापासून तोच विचार मनात घोळतोय.

राजकारणात असलेल्या एखाद्या माणसावर इतकं निस्सीम आणि निस्वार्थी प्रेम करणारे इतके चाहते असू शकतात, ही गोष्टच आश्चर्यकारक वाटते. म्हणजे दक्षिणेत एन. टी. रामाराव किंवा एम. जी. रामचंद्रन या कलाकारांना जी लोकप्रियता लाभली, त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोकप्रिय बाळासाहेब आहेत, याचं यथार्थ दर्शन रविवारी घडलं. महासागर लोटला म्हणजे काय, याचा अर्थ माझ्या आणि नंतरच्या मंडळींना त्यादिवशीच ख-या अर्थाने कळला.

विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यातील शेतक-यापासून ते मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या एखाद्या गर्भश्रीमंत धनाढ्यापर्यंत, अमिताभ बच्चन-अनिल अंबानी यांच्यापासून ते एखाद्या तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत आणि गांधी टोपीवाल्या म्हाता-या माणसापासून ते थ्री फोर्थ घातलेल्या तरुण ललनांपर्यंत सर्वांचीच या जनसागरात उपस्थिती होती. त्यापैकी बाळासाहेबांचे थेट उपकार असलेले राजकारणी, त्यांच्या सान्निध्यात आलेले विविध क्षेत्रातील महनीय आणि सामान्य शिवसैनिक सोडले तर बाकीचे लोक कोण होते… बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणारे निस्वार्थी चाहते होते. आपलं जवळचं कोणीतरी गेलं आहे आणि त्याचं अंत्यदर्शन घेतल्याशिवाय चैन पडणार नाही, अशाच भावनेने मुंबईत महासागर लोटला होता.

तुमच्या आमच्या भाषेत बोलणारे बाळासाहेब होते. आपल्या अन्याय-अत्याचाराविरूद्ध असलेली चीड, एखाद्या घटनेबद्दलचा रोष ते आपल्या शब्दांतच व्यक्त करायचे. भडव्यांनोपासून ते यडझव्यापर्यंत बोलीभाषेतील अनेक शिव्या ते अगदी सहजपणे भाषणांमधून देत. पण त्यातून त्यांचा राग व्यक्त होत असे. उगाच भाषणांत रंगत आणायची म्हणून किंवा स्टाईल जपायची म्हणून त्या नसायच्या. उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हा झालेल्या भाषणात त्यांनी तेव्हाचे मुख्य निवडणूक आयुक्त जेम्स मायकेल लिंगडोह यांचा ‘कोण रे तो डोहात लिंग बुडवून बसलेला…’ असा उल्लेख पोट धरून हसायला लावणारा होता. बाळासाहेब असेच बिनधास्त होते, बेधडक होते आणि जसे होते तसेच होते. आतून एक आणि भाषणात एक अशी भानगड नव्हती. लोकांसमोर होते. म्हणूनच ते लोकप्रिय झाले. 


व्यंगचित्रकार म्हणून ते महान होते, उत्तम पत्रकार होते, राजकारणात राहून पदाचा मोह त्यांना झाला नाही, कर्तृत्व, नेतृत्व आणि वर्क्तृत्व यामध्ये अजोड होते आणि बरेच काही होते. पण त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटायचा तो त्यांच्या मोकळेढाकळेपणामुळे. इतका मोठा नेता असूनही आपल्यासारखेच बोलतो, वागतो यामुळे. बोललेला शब्द फिरवित नाही म्हणून. संघ परिवाराने जबाबदारी टाळल्यानंतरही ‘बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ असे अगदी बिनधास्तपणे जाहीर करतो म्हणून. हिंदुत्त्ववादी म्हणून मिरवणा-यांनी पाठ फिरविल्यानंतरही ‘साध्वी प्रज्ञासिंहला सर्व कायदेशीर मदत करण्यासाठी शिवसेना तयार आहे,’ असे सांगणा-या संघटनेचे प्रमुख होते म्हणून. पाकड्यांना खेळू देणार नाही म्हणजे नाही, हा शब्द शेवटपर्यंत पाळला म्हणून. मुंबईत शिवतीर्थावर जो अथांग जनसागर उसळला तो यामुळेच. एखादा राजकारणी आपल्याला सोडून गेला म्हणून लोक आनंद व्यक्त करतात. पण इथे लाखोंच्या डोळ्यात अश्रू होते. हीच बाळासाहेबांची श्रीमंती होती. पुण्याई होती. 

बाळासाहेब गेले, हे मानायला मन तयार नाही. अजूनही असं वाटतं, की कधीतरी लुंगीपुचाट चिदंबरम यांना बाळासाहेब ‘सामना’तून दम भरतील. ‘शिवसेनाप्रमुखांच्या इशा-यामुळे पाकिस्तानची हातभर फाटली’ असं शीर्षक पुन्हा एकदा ‘सामना’मध्ये वाचायला मिळेल. छोट्या-मोठ्या कलाकारापासून ते राजकारण्यांपर्यंत कोणतरी आज मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली, असा फोटो पहायला मिळेल. शिवसेनाप्रमुखांची आज अमक्या अमक्या वाहिनीवर मुलाखत, अशी जाहिरात पहायला मिळेल. साहेबांची संजय राऊत साहेबांनी घेतलेली मॅरेथॉन मुलाखत तीन-चार महिन्यांनी वाचायला मिळेल. ‘सामना’तून साहेबांच्या शुभेच्छा किंवा एखादं निवेदन वाचायला मिळेल. पण… आता यापैकी काहीच घडणार नाही.

Thursday, October 04, 2012

जातीय तेढ नसलेला इतिहास

गृहखात्यानेच लिहावा…


 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे पोलिसांच्या लेखणीतून फेरलेखन होणे आवश्यक आहे. म्हणजे पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे तरी तसाच संदेश लोकांपर्यंत पोहोचतो आहे. शिवाजी महाराजांनी ज्या नरराक्षसाचा कोथळा काढला, त्याचे पोस्टर्स किंवा प्रतिमा लावण्यात येऊ नयेत, पुण्याच्या लाल महालात महाराजांनी ज्या सरदाराची बोटे छाटली, त्याचा उल्लेख गणपतीच्या देखाव्यातून वगळण्यात यावा, शिवरायांची भव्य प्रतिमेला गणेशोत्सव मिवरणुकीत आणण्यात येऊ नये, अन्यथा दंगल भडकेल, असले भन्नाट जावईशोध राजमान्य राजश्री आर. आर. पाटील यांच्या गृहखात्याने लावले आहेत. 

अशा परिस्थितीत, कदाचित भविष्यात जातीय तेढ वाढू नये, म्हणून महाराजांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहिण्याचे काम आर. आर. आबांना पार पाडावे लागेल. भाषणांच्या पुस्तकाप्रमाणेच आबांनी एखादे सुविचारांचे पुस्तक लिहावे, असा सल्ला अजितदादा पवार यांनी दिलाच आहे. त्यालाच जोडून आमची विनंती आहे, की आबांनी शिवरायांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहावा, म्हणजे उगाच महाराष्ट्रात धार्मिक तेढ बिढ निर्माण होणा्र नाही आणि पोलिसांच्या डोक्यालाही ताप राहणार नाही. तेव्हा आबा तुम्ही हे कार्य तातडीने हाती घ्याच…

आबांनी किंवा त्यांच्या पोलिसी खात्याने हा इतिहास लिहावयास घेतला, तर तो काहीसा असा असेल…

प्रसंग पहिला… 


छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कोण करतो, असा सवाल विजापूरच्या एका राजाच्या दरबारात उपस्थित केला गेला. तेव्हा अ नावाच्या एका सरदाराने महाराजांना जेरबंद करण्याचा विडा उचलला. शिवाजी महाराजांना जेरबंद करण्यासाठी ‘अ’ हा सरदार महाराष्ट्रावर चाल करून आला. लाखो सैनिक, घोडदळ, पायदळ, तोफा आणि बऱ्याच महिन्यांची रसद घेऊन मदमस्त ‘अ’ चालून आला. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे मंदिर त्याने फोडले. मंदिराप्रमाणेच मूर्तीचीही विटंबना केली. एकावेळी आख्खा बोकड संपविणाऱ्या या नरराक्षसाने महाराष्ट्रातील अनेक मठमंदिरांवर हल्ला चढविला. 

चिडून शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून येतील आणि भल्यामोठ्या सैन्याच्या जोरावर आपण त्यांचा अगदी सहजपणे पराभव करू, अशा धुंदीत हा ‘अ’ राहिला. मात्र, शिवराय हे पण काही कच्च्या गुरूचे शिष्य नव्हते. त्यांनी ‘अ’ला जावळीच्या खोऱ्यात ओढून आणले. शिवरायांची भेट घेण्यासाठी ‘अ’ प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला. तिथे शामियान्यात ‘अ’ने महाराजांना गळाभेटीसाठी बोलाविले. शिवरायांची मान बगलेत दाबून ‘अ’ने महाराजांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. शिवरायांनी पोलादी अंगरखा म्हणजेच संरक्षक कवच घातले होते. त्यामुळे या हल्ल्यातून महाराज बचावले. ‘अ’चा वार फुका गेला. महाराजांनी वाघनखे काढली आणि ‘अ’च्या पोटात खुपसून थेट त्याचा कोथळाच काढला. महाराजांनी इतक्या त्वेषाने प्रतिहल्ला चढविला, की ‘या xx’ असे म्हणज धिप्पाड ‘अ’ क्षणार्धात जमिनीवर कोसळला.

प्रसंग दुसरा…


औरंगाबादहून नगरमार्गे बारामती, अशी मजल दरमजल करीत ‘शा’ पुण्यात दाखल झाला. डोंगरी किल्ल्यांमध्ये महाराजांची मक्तेदारी मोडून काढणे, आपल्याला जमणार नाही, हे ‘शा’ने ओळखले होते. त्यामुळे त्याने मैदानातच महाराजांशी दोन हात करण्याचे ठरविले आणि पुण्याच्या लाल महालात ‘शा’ने आपला डेरा टाकला. त्याने बंदोबस्त वाढविला. पुण्याच्या आतमध्ये प्रवेश करणे जिकीरीचे बनले होते. ‘शा’च्या सैन्याशी समोरासमोर युद्ध करणे शक्य नाही, हे महाराजांनी ताडले होते. त्यांनी अत्यंत धाडसी योजना आखली. लाल महालाचा कोपरा न कोपरा शिवरायांना माहिती होता. त्यामुळे लाल महालावर हल्ला करून थेट ‘शा’चाच मुडदा पाडायचा, असा महाराजांचा गनिमी कावा होता. त्यानुसार एका संध्याकाळी लग्नाच्या वरातीत खुद्द महाराज आणि त्यांचे काही निवडक सरदार सहभागी झाले. सर्वांनी इतके बेमालूम वेषांतर केले होते, की कोणाला या काव्याचा थांगपत्ताही लागला नाही. 

लाल महालापाशी येताच शिवराय आणि सर्व मावळे एका ठिकाणी जमा झाले. तेथे महाराजांनी सरदारांना आणि मावळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाराजांना लाल महालाची खडा न खडा माहिती होता. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तेथून महाराज ‘शा’च्या शयनकक्षात घुसले. महाराज आणि त्यांचे सरदार लाल महालात घुसले आहेत, हे कळताच ‘शा’ची चांगलीच तंतरली. त्याच्या अंगात कापरं भरलं. तो घामाघूम झाला. आपला जीव कसा वाचवायचा, याचा विचार तो करू लागला. खिडकीतून पळून जायचा प्रयत्न करणाऱ्या ‘शा’वर महाराजांची तलवार चालली. ‘शा’च्या उजव्या हातांची बोटे तुटली आणि तिथून ‘शा’ थेट जनानखान्यात पळाला. महाराज तिथे पोहोचले. जनानखान्यात बुरख्यामध्ये असलेल्या ‘शा’ला महाराजांनी ओळखलेच आणि पुणे सोडून जाण्याच्या अटीवर त्याला जीवदान दिले. ‘शा’ पाय लावून पळत सुटला आणि थेट औरंगजेबाच्या दरबारात पोहोचला. एव्हाना महाराज आणि त्यांचे सरदार सिंहगडच्या दिशेने पसार झाले.

प्रसंग तिसरा…
‘मु’ सम्राट ‘औ’चा सरदार असलेला मिर्झाराजे जयसिंह आणि ‘दि’ हे स्वराज्यावर चालून आले. ‘मु’  सैन्य आणि शिवरायांचे मावळे यांच्यात घनघोर युद्ध झाले. ‘मु’च्या सैन्याने पुरंदरच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. मुरारबाजी देशपांडे यांनी ‘मु’च्या सैन्याला पळता भुई थोडी करून ठेवली होती. मात्र, ‘मु’च्या सैन्याची संख्या आणि ताकद प्रचंड असल्यामुळे पुरंदरची बाहेरची तटबंदी भेदली गेली. तरीही लढवय्या मुरारबाजींनी हार मानली नाही. मुरारबाजी यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून ‘दि’ चकितच झाला आणि त्यांच्याकडे पाहतच बसला. ‘दि’ने मुरारबाजी यांच्यासमोर तहाचा प्रस्ताव ठेवला आणि ‘मु’लांच्या सैन्यात मोठे सरदार पद देऊ केले. मात्र, महाराजांशी आणि पर्यायाने स्वराज्याशी प्रतारणा करणे मुरारबाजींना बाप जन्मात शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठीही वेळ दवडला नाही आणि युद्ध सुरूच ठेवले. 

मात्र, एका भाल्याने मुरारबाजी यांचा वेध घेतलाच. मात्र, शिर धडापासून वेगळे झाल्यानंतरही मुरारबाजी यांची तलवार काही मिनिटे तशीच सपासप फिरत होती, असे इतिहासकार सांगतात. इतका त्वेष आणि जोश त्यांच्यामध्ये होता. पुरंदरच्या या लढाईत मुरारबाजींनी प्राणांची बाजी लावली. महाराजांना पराभव स्वीकारावा लागला. स्वराज्यातील २३ किल्ले ‘मु’ना द्यावे लागले आणि युवराज संभाजीराजे यांच्यासह ‘औ’च्या भेटीसाठी आग्र्याला जाण्याची मिर्झाराजे जयसिंह यांची अट मान्य करावी लागली.

प्रसंग चौथा… 


मान्य केलेल्या अटीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. त्याठिकाणी ‘औ’चा मोठा दरबार भरला होता. वास्तविक पाहता, शिवराय हे मराठ्यांच्या साम्राज्याचे राजे. त्यामुळे त्यांचा मान पहिल्या रांगेत असायला हवा होता. मात्र, पराभूत आणि पळपुट्या सरदारांच्या मागील रांगेत शिवरायांना स्थान देऊन ‘औ’ने महाराजांचा पाणउतारा केलाच. स्वाभिमानी शिवरायांना हा अपमान सहन होणे शक्यच नव्हते. ‘आमचा अपमान करण्यासाठीच ‘औ’ने आम्हाला येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे का,’ असा थेट सवाल करीत महाराज तेथून त्यांच्या कक्षाकडे रवाना झाले. 

‘औ’ने महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला. शिवराय नजरकैदेत अडकले. आता येथून बाहेर कसे पडायचे, याच्याच विवंचनेत महाराज होते. अखेरीस महाराजांना शक्कल सुचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचे नाटक केले. महाराजांची तब्येत सुधारावी, म्हणून साधूसंत, फकीर, मौलवी मंडळींना सुकामेवा, मिठाई तसेच फळफळावळीचे पेटारे पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव पुढे आला. ‘औ’नेही त्याला मान्यता दिली. काही दिवस असेच जाऊ दिल्यानंतर महाराजांनी एका दिवशी स्वतः पेटाऱ्यातून ‘औ’च्या हातावर तुरी देण्याचे निश्चित केले. योजनेनुसार एका पेटाऱ्यात स्वतः शिवराय आणि दुसऱ्या पेटाऱ्यात युवराज संभाजीराजे बसले आणि पाहता पाहता ‘औ’च्या नजरबंदीतून पसार झाले. महाराजांना नजरकैदेत ठेवून तिथेच त्यांचा खात्मा करण्याचे ‘औ’चे मनसुबे महाराजांनी उधळून लावले आणि शिवराय सुखरुप स्वराज्यामध्ये पोहोचले.

(महाराजांवर चालून आलेल्या काही सरदारांची नावे ही खऱ्याखुऱ्या इतिहासातील म्लेंच्छ नावांशी साधर्म्य राखणारी वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि उगाच डोक्यात राग घालून घेऊन धार्मिक तेढ पसरवू नये.)

छत्रपती शिवरायांचा इतिहास लवकरात लवकर म्लेंच्छमुक्त केला पाहिजे. जेणेकरून त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. अर्थात, या खानावळीचा सध्याच्या मंडळींना पुळका का यावा… त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या किंवा वास्तव सांगितले तर चालू स्थितीत कोणाच्या पोटात शूळ का उठावा… मिरवणुकांमध्ये अशा पोस्टर्स आणि छायाचित्रांचे प्रदर्शन जर होत असेल तर काहींच्या छातीत जळजळ होऊन गरळ का बाहेर पडावी… हे कोणालाही न उलगडलेले कोडे आहे. अफझलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्दी जौहर आणि मुघल, आदिलशाही, निजामशाही यांच्यातील तमाम सरदार हे पोटात कळ येणाऱ्यांचे बापजादे होते किंवा जावई होते, अशा थाटात महाराजांच्या जीवावर उठलेल्या खानावळीचे समर्थन करण्याची अहमहिका मंडळींमध्ये सुरू आहे.

वेळीच हे थांबावे, अशी आवश्यकताही कोणाला वाटत नाही. उलट धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नावाखाली शिवरायांच्या कार्यकर्त्यांनाच चेपण्याचे प्रयत्न सुरू असतात. आता शिवरायांवर आक्रमण करणारी मंडळी मुसलमान होती, हा काही महाराजांचा दोष नाही ना. शिवाय ते कोणत्याही जाती-धर्माचे असले तरीही तुम्ही शिवरायांच्या बाजूने आहात, की अफझलखानाच्या बाजूने, हे विचारण्याची हिंमत कोणाच्यातही नाही. कारवाईचा ढोस मात्र, शिवरायांच्या मावळ्यांनाच. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कितपत योग्य आहे. 

काही वर्षांपूर्वी डोंबविली येथील एका मंडळाने अफझलखानाचा कोथळा काढणारे शिवाजी महाराज असा देखावा मिरवणुकीसाठी केला होता. अर्थातच, धार्मिक तेढ निर्माण होईल, या कारणाखाली पोलिसांनी त्याला आक्षेप घेतला. त्याविरोधात हे कार्यकर्ते न्यायालयात गेले. तेथे न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला आहे. ‘छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, हे ऐतिहासिक सत्य मुस्लिमांना स्वीकारावेच लागेल…’

तेव्हा लवकरात लवकर महाराजांचा इतिहास म्लेंच्छमुक्त करून टाकावा, म्हणजे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही आणि दंगलीही भडकणार नाहीत. बघा पटतंय का...

Friday, September 07, 2012

पाच वर्षांनंतर…


पुन्हा एकदा हैदराबाद

बऱ्य़ाच वर्षांनंतर म्हणजे बरोब्बर पाच वर्षांनी हैदराबादला जाणं झालं आणि पुन्हा एकदा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. अगदी सुरुवातीला केसरी सोडून ई टीव्ही जॉईन केलं होतं. तेव्हा इलेक्ट्रॉनिक मिडीयाचा सुळसुळाट झाला नव्हता. मराठीमध्ये तर एकमेव ई टीव्ही वरील बातम्याच सर्वाधिक विश्वासार्ह आणि गावागावापर्यंत पोहोचलेल्या होत्या. त्यामुळे तेव्हा ई टीव्हीची प्रचंड क्रेझ होती. अर्थातच, बातम्यांसाठी. कारण कार्यक्रमांसाठी ही वाहिनी कधीच ओळखली गेली नाही आणि आताही जात नाही. असो. 

तेव्हापासूनचे ऋणानुबंध ई टीव्ही आणि पर्यायाने हैदराबादशी जोडले गेलेले आहेत. जून २००३ पासून. त्यामुळे हैदराबादला जाणं, ही गोष्ट खूपच आनंददायी आणि गतस्मृती जागविणारी असते. मध्यंतरी दोन-तीन दिवस लागून सुटी आल्यामुळे मग ‘चलो हैदराबाद’चा नारा दिला. हुसेनसागर एक्स्प्रेसनं निघालो. सोलापूर सोडल्यानंतर मग गुलबर्गा, वाडी, तांडूर, निझामाबाद वगैरे ओळखीची स्टेशन्स मागं टाकत अखेरीस हैदराबाद आलं. संपूर्ण प्रवासात (कदाचित फक्त) वाडी येथे उत्तम नाश्ता मिळत असल्यानं तिथंच रेमटून नाश्ता केला. इथं मिळणारा नाश्ता म्हणजे इडली, मेदूवडा आणि भरपूर चटणी. क्वचित कधीतरी डाळवडा किंवा घावन. एका केळीच्या पानावर चार इडल्या आणि त्यावर ओतलेली चटणी. अशा अगदी भरपेट नाश्त्यानं हैदराबादपर्यंत साथ दिली. 

हैदराबाद अगदी होतं तस्संच आहे. म्हणजे जो परिसर माझ्या परिचयाचा आहे, तो अगदी आहे तस्सा आहे. हैदराबादची बससेवा अगदी पूर्वीसारखीच विश्वासार्ह आणि स्वस्त आहे. रस्त्यावरील गाड्यांवर मिळणारा इडली-डोसा तितकाच स्वादिष्ट असून वाढत्या महागाईच्या झळा त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत. बाकी ट्रॅफिकची बेशिस्त, ‘ऐसा क्या कर रहेला तू’ असं उर्दूमिश्रीत हिंदी, रस्त्याच्या कडेला असलेल्या गाड्यांवरील पुंगू, मिरची भजी, इडली, मेदूवडा नि पुरी तसेच बटाट्याची पातळ डोसाभाजी, गल्लोगल्ली उगविलेल्या शिक्षण संस्था आणि छोटी-मोठी हॉस्पिटल्स आणि पाचशे मीटरच्या अंतरावर असलेली थिएटर्स. सर्व काही जसेच्या तसेच. फक्त मी रहायचो त्या दिलसुखनगरमध्ये अनेक बदल झाले आहेत. इतकाच काय तो फरक.
 

हैदराबादमध्ये गेल्यानंतर पहिलं काम केलं म्हणजे, दिलसुखनगर भागत अगदी मनसोक्त फिरलो. आम्ही जिथं दीड वर्ष राहिलो, त्या श्रीनगर कॉलनीतल्या घरी जाऊन आलो. नुसतं त्या मार्गावरून फिरत असतानाही जुन्या आठवणी अगदी चित्रपटाप्रमाणे डोळ्यासमोरून तरळत होत्या. आम्ही रहायचो ती गल्ली म्हणजे ई टीव्ही लेनच झाली होती. ई टीव्हीतले जवळपास दहा-बारा लोक आजूबाजूला रहायचे. त्यामुळे गुढीपाडव्याला अगदी गुढ्या-तोरणं उभारण्याचा कार्यक्रम आम्ही केला होता. ते सगळं डोळ्यासमोर दिसत होतं. पण आता ई टीव्ही मराठीचीच अवस्था अगदी वाईट असल्यामुळं आमच्या ई टीव्ही लेनमध्येही कोणीही उरलेलं नाही. योगायोग इतकाच, की आम्ही रहायचो त्या घरी मराठी कुटुंबच सध्या रहात आहे. इतकंच.

दिलसुखनगरमधील सर्वाधिक दुःखदायक घटना म्हणजे आमच्या एका मुस्लिम चाचाचं बंद झालेलं दुकान. ज्या चाचाच्या पुरीभाजी, पान आणि चहावर आम्ही हैदराबादमधील दिवस काढले तो चाचा तिथून गायब झालाय. म्हणजे त्याच्या हॉटेलाच्या जागी आता मस्त एअरसेलची शोरूम थाटण्यात आलेली आहे. ई टीव्हीत असताना नाईट शिफ्ट (रात्री १०.२० ते सकाळी ९) करून आल्यानंतर सक्काळी मस्त गर्रमागर्रम भाजी आणि फुगलेल्या पुऱ्य़ा अशी एक दीड प्लेट जिरविल्यानंतर ते स्वर्गसुखच वाटायचं. पुरीभाजीनंतर इराण्याकडे मिळतो तशा स्वादाचा कडक चहा. हे सगळं पोटात गेल्यानंतर मग रात्रभर जागून सकाळचं बुलेटिन काढल्याचा ताण डोळ्यावर येऊ लागायचा. घरी गेल्यानंतर मस्त ताणून द्यायची, की मग थेट तीन-चार वाजताच उठायचं. 

चाचाची दुसरी गोष्ट म्हणजे दुपारची शिफ्ट (२.२०) असो किंवा रात्रीची (१०.२०). चाचाकडून मिनाक्षी पान घेतल्याशिवाय बसमध्ये चढायचो नाही. मग आज कोणाला तरी मुंडक्यावर टाक, उद्या दुसऱ्य़ाला मुंडक्यावर टाक, कधी स्वतः पैसे दे, असं करीत आमचा पानाचा शौक पूर्ण व्हायचा. पान अगदी स्वस्त होतं. म्हणजे केवळ दोन रुपयाला. त्यामुळं हा शौक अगदी परवडण्यासारखा होता. क्वचित कधीतरी पाहुण्या कलाकारालाही मुंडक्यावर टाकण्यास आम्ही मागेपुढे पहायचो नाही. त्यामुळे नवा चेहरा दिसला, की त्यालाही कळलेलं असायचं, की आजचा बकरा हा आहे. मग चाचा स्वतःहून आम्हाला विचारायचा, ‘आज ये बडा साहब लगते है…’ असं. मग सगदळीकडे हशा… त्यामुळं चाचाचं हॉटेल बंद झाल्याचं पाहिलं आणि मन उदास झालं.

दिलसुखनगरच्या बसस्टॉपसमोरच्या आमच्या मराठी काकूंची गाडी अजूनही सुरू आहे आणि त्यावर तितकीच गर्दी असल्यानं बरं झालं. बिदरच्या असल्यामुळं त्यांना मराठी येतं. त्यांना मराठी येतं, हा आम्हाला आमच्या हैदराबादमधील सुरूवातीच्या काळात खूप दिलासा होता. ऑफिसमधले सहकारी सोडून इतर कोणीतरी आमच्याशी मराठीतून बोलतोय, हा आमच्यासाठी धक्काच असायचा. मग हळूहळू आम्ही कोनार्क थिएटरजवळचा जिलेबीवाला, राजधानी थिएटरच्या गल्लीतील भेळवाला वगैरे असे मराठी लोकं शोधून काढले. पण बिदरच्या या काकू सर्वात पहिल्या. मूग डोसा आणि पेस्सेरातू ही त्यांची खासियत. काकूंकडे दोन दिवस मस्त सकाळचा नाश्ता करून क्षुधाशांती केली आणि मगच पुढे गेलो. 
 

ई टीव्हीमधील अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकी माणसं आता माझ्या ओळखीची आहेत. त्यापैकी माधुरी गुंटी, स्वाती कुलकर्णी आणि धनंजय तथा काका कोष्टी यांची मनाप्रमाणे अगदी मस्त भेट झाली. महत्प्रयासानं माधुरीचा फोन नंबर आणि मग तिथं घर शोधून काढलं. तिच्या हातच्या भाकरी, शेवग्याच्या शेंगेची भाजी आणि सांबार-भात खाऊन हैदराबादला गेल्याचं सार्थक झालं, असंच मनात झालं. हैदराबाद मुक्कामी असताना पोळी-भाजी, चिकन किंवा संपूर्ण जेवण करावसं वाटलं तर आमची हक्काची सुगरण असायची माधुरी उर्फ अम्मा. हैदराबादमध्ये तीच आमची बहिण होती आणि तीच अम्मा. त्यामुळं सात वर्षांनंतर अम्माच्या हातचं जेवण जेवून अगदी तृप्त झालो.
 
स्वाती पण अगदी तशीच हक्काची बहिण. एखाद्या सुटी दिवशी किंवा संध्याकाळी निवांत असलो तर मग आमीरपेटमधील स्वातीच्या घरी जाऊन तुडुंब जेवण हे अगदी ठरलेलंच असायचं. मी हैदराबाद सोडलं, तेव्हा जवळपास एक महिन्यांनंतर सर्व सहकाऱ्य़ांनी मला मुंबईला एक पत्र पाठविलं होतं. त्यामध्ये स्वातीनं लिहिलं होतं, ‘जाड्या तू मुंबईला गेल्यानंतर मी घरामध्ये रेशनच भरलेलं नाही.’ ते अगदी खरं होतं. त्या स्वातीच्या घरी जाऊन थोडंसं रेशन संपवून आलो. सोबतीला आमची नेहमीची लाडकी दिल्लीवाल्याची जिलेबी होतीच. ‘खाण तशी माती आणि आई तशी स्वाती’ ही म्हण तिच्या मुलीच्या बाबतही तंतोतंत खरी आहे. तिची मुलगी तिच्यापेक्षा बडबडी आहे इतकंच. अर्थातच, तिच्या इतकीच किंवा तिच्यापेक्षा हुश्शार.
शेवटच्या दिवशी भेटलो आमच्या काकांना. ई टीव्हीमध्ये असताना सुरुवातीला ज्या दोन-तीन जणांकडून बुलेटिन काढायला शिकलो त्यापैकी एक म्हणजे काका. उर्वरित दोघे म्हणजे आमचे मेघराज पाटील आणि नरेंद बंडवे उर्फ बंडू. हैदराबादमध्ये काकांबरोबर आमची भट्टी अगदी मस्त जमायची. बाहेर जेवायला वगैरे जायचं असो किंवा एखादा चित्रपट पहायचा असो. मी हैदराबाद सोडल्यानंतर काका आमच्या घरीच रहायचे. त्यांच्या वनस्थळीपुरममधील घरी जाऊन फक्कड चहा घेतला आणि आमची स्वारी निघाली सिकंदराबादला. हैदराबादला येऊन बिर्याणी खाल्ली नाही, तर पाप लागलं, असं कुठल्या तरी पुस्तकात लिहून ठेवलंय. पूर्वी आम्ही पिस्ता बिर्याणी किंवा शादाबमध्ये जाऊन आस्वाद घ्यायचो. पण काकांच्या आग्रहास्तव थेट पॅराडाईज गाठलं. नाव सार्थ ठरविणारी बिर्याणी. 

इतकं सॉफ्ट चिकन की विचारू नका. नुसत्या दोन चमच्यांच्या सहाय्यानं सहज तुटेल, अशी तंगडी किंवा पिसेस आणि दम भरलेली बिर्याणी हे पॅराडाईजचं वैशिष्ट्यं. गेल्यावेळी शादाबला गेलो होतो तेव्हा तिथंही बिर्याणीमधील एकदम लुसलुशीत चिकनचा आस्वाद घेतला होता. त्यापेक्षाही वरच्या दर्जाची बिर्याणी पॅराडाईजमध्ये खायला मिळाली. आजूबाजूच्या किंवा अलिकडच्या पलिकडच्या टेबलवर बिर्याणी सर्व्ह करायला लागले, की त्याचा स्वाद नाकात घुसलाच. इतका दम त्या बिर्याणीमध्ये ठासून भरलेला. मग आपल्या टेबलवर बिर्याणी सर्व्ह केल्यानंतर काय हालत होत असेल विचार करा. कधी एकदा तुटून पडतोय, असं होतं. सोबतीला रायता आणि शोरबा. खूप भूक असेल तर दोघांत एक बिर्याणी अगदी सहजपणे पुरते. (श्रावण ठरवून पाळत नसल्यामुळे चिकन बिर्याणी खाताना फारशा याताना झाल्या नाहीत.)

मनसोक्त बिर्याणी हाणल्यानंतर मग ‘खुब्बानी का मिठा’ खायलाचचचचच हवा. हैदराबाद असल्यामुळं असेल कदाचित, पण या पदार्थाचे नाव ‘कु्र्बानी का मिठा’ असे मला वाटायचे. कौमुदी काशीकरने योग्य नाव सांगितले होतेच. पण पॅराडाईजमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाले. मस्त भिजविलेले जर्दाळू मध वगैरे गोष्टींमध्ये घालून तयार झालेला गोड पदार्थ म्हणजे ‘खुब्बानी का मिठा’. (मागे एका हॉटेलमध्ये भिजविलेले खजूर घालून आम्हाला चक्क फसविण्यात आल्याचे आमच्या उशीरा निदर्शनास आले होते.) हवे असल्यास ‘खुब्बानी का मिठा’वर आइस्क्रिम घालूनही सर्व्ह केले जाते. असा हा खास पदार्थ खाल्ल्याशिवाय हैदराबादची सफर संपूर्ण होत नाही, इतकेच ध्यानात ठेवणे इष्ट.

सिकंदराबादहून हैदराबादला येताना टँकबंड म्हणजेच हुसेनसागर तलाव पाहिला. शहराच्या मध्यवर्ती भागात इतका भव्यदिव्य तलाव हेच शहराचे वैशिष्ट्य आहे. तलावाच्या एका बाजूला हैदराबाद तर दुसरीकडे सिकंदराबाद. हुसेनसागरच्या एका बाजूला हैदराबादमधील कर्तृत्ववान मंडळींचे पुतळे उभारून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. मात्र, तेलंगणाच्या आंदोलनात यातील काही पुतळे शहीद पडले असून तेलंगणाव्यतिरिक्तच्या उर्वरित आंध्रातील (रायलसीमा आणि किनारपट्टी) व्यक्तींचे पुतळे अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. काहींची विटंबना करण्यात आली आहे. त्यामुळे विकृत लोकांची मानसिकता संपूर्ण देशभर एकच असल्याचे पुन्हा एकदा दिसून येते.

हैदराबादमध्ये गेल्यानंतर चारमिनार, मक्का मशीद आणि मोतीबाजार इथं चक्कर टाकली नाही, तर शहरातील वातावरणाचा फिलच येत नाही. शिवाय मी गेलो तेव्हा रमझान सुरु असल्यामुळं इथं जाण क्रमप्राप्तच होतं. शादाब हॉटेलपासून चारमिनारपर्यंत जाताना ईदचा मस्त माहोल अनुभवला आणि अखेरीस मक्का मशिदीपर्यंत पोहोचलो. आता जाऊन थोडीशी चक्कर मारल्यानंतर मोतीबाजारात फेरफटका मारला आणि थोडीफार खरेदी करून मग तिथून निघालो. कारण पुन्हा एकदा पुण्याकडे प्रयाण करायचे होते.

तीन दिवस असूनही कराची बेकरी, बिर्ला मंदिर, ज्वार रोटी (दाक्षिणात्य आणि मराठी भोजनाचा मिलाफ असलेले रेस्तराँ), अॅबिड्स, रामोजी फिल्म सिटीतील ई टीव्हीचे ऑफिस, लुम्बिनी गार्डन, गोकुळ चाट, गोवळकोंडा किल्ला आणि अशा अनेक ठिकाणी जाणे शक्यच झाले नाही. तरीही हैदराबादची ट्रीप संस्मरणीय ठरली आणि आठवणी जागविणारी ठरली.

(सौजन्यः आमचे बंधू योगेश चांदोरकर यांनी दिलसुखनगर भागातील गड्डीअन्नरम भागात प्राणिक हिलिंगच्या उपचारांसाठी भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमुळे ट्रीप अधिक दिलासादायक ठरली.)

Friday, August 17, 2012

एक साली मख्खी....



इगा इगा इगा

एक मच्छर साला आदमी को हिजडा बना देता है... नाना पाटेकरचा एक प्रचंड गाजलेला डायलॉग. त्या डायलॉगची आठवण करून देणारा एक अफलातून पिक्चर सध्या तेलुगूमध्ये धुमाकूळ घालतोय... त्याचं नाव इगा. इगा म्हणजे माशी.

नेहमीच्या कथानकापेक्षा हटके स्टोऱ्या घेऊन प्रेक्षकांपर्यंत जाणं ही दाक्षिणात्य चित्रपटांची खासियत. इगा चित्रपटांत त्याचा अगदी मस्त अनुभव येतो. अर्थात, तेलुगू पिक्चरची माहिती ब्लॉगवर देऊन फायदा काय, असा विचार मनात येऊ शकतो. पण लवकरच हा पिक्चर हिंदीमध्ये डब करण्यात येत असून हृतिक रोशन वगैरे मंडळींचा आवाज चित्रपटाला असणार आहे, असे समजते. त्यामुळे सर्वांनाच हा चित्रपट पाहण्याची संधी प्राप्त होणार आहे.

वास्तविक पाहता, तेलुगू समजत नसेल तरी चित्रपट अगदी व्यवस्थित समजतो. चित्रपट हे दृष्य माध्यम असल्यामुळे शब्दांविना अडत नाही. त्यामुळेच ई टीव्हीत काम करीत असताना जवळपास वीस ते पंचवीस तेलुगू चित्रपट पाहिले होते. शिवाय काही काही शब्दांचे अर्थ चित्रपट पाहून पाहून समजायला लागतात. त्यामुळे भाषेचे प्राथमिक ज्ञानही हळूहलू वाढत जाते. तेव्हा सध्याचा तुफान गर्दी खेचणारा इगा पाहण्याची संधी मी हैदराबादला गेलो होतो, तेव्हा सोडली नाही. आमच्या दिलसुखनगर भागातच असलेल्या मेघा थिएटरवर अवघ्या चाळीस रुपयांमध्ये मस्त एसीत बसून चित्रपट पाहिला. स्वस्त तिकिटे आणि मस्त थिएटर हे हैदराबादचे किंवा एकूणच दाक्षिणात्य राज्यांचे वैशिष्ट्य.

नानी आणि त्याच्या घरासमोर राहणाऱ्या बिंदू नावाच्या एका मुलीची ही गोष्ट. नानी हा फटाक्यांची रोषणाई वगैरे करणारा एक होतकरू तरुण आणि ती एका शैक्षणिक एनजीओमध्ये काम करणारी कन्यका म्हणजे बिंदू. सुरुवातीच्या साधारण अर्ध्या तासात दोघांमध्ये प्रेम फुलत जातं. त्या दोघांमध्ये अपेक्षेप्रमाणे एक व्हिलन एन्ट्री मारतो. व्हिलनची भूमिका कन्नड अभिनेता सुदीपनं उत्तम वठवलीय. रग्गड श्रीमंत असलेला सुदीप पैशांच्या जोरावर बिंदूकडून प्रेमाची अपेक्षा करीत असतो. (चित्रपटातील व्हिलनचे प्रेम म्हणजे शरीरसंबंध हे ओघानं आलंच.)



असा हा सुदीप बिंदूवर मरणाऱ्या नानीचा खून करतो. ते सुद्धा बिंदू जेव्हा त्याच्या प्रेमाला होकार देणार असते अगदी तेव्हा. नानी मेल्यानंतर बिंदू आपलीच होणार, अशा थाटात सुदीप वावरत असतो. मात्र, नानी एका माशीच्या रुपाने पुनर्जन्म घेतो आणि बदला घेण्यासाठी सज्ज होतो. जसे एक मच्छर आदमी को हिजडा बना देता है..., एक मुंगी हत्तीला लोळवू शकते तसेच एक माशी व्हिलनला कशी नेस्तनाबूत करते, हे चित्रपटातून अगदी समर्थपणे दाखविण्यात आले आहे. अर्थातच, ऍनिमेशनच्या सहाय्याने.

माशी म्हणून तिला जन्मल्यानंतर येणाऱ्या अडचणी, व्हिलनचा मुकाबला करताना जाणविणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करून लढविलेल्या विविध क्लृप्त्या अशा एक से बढकर एक गोष्टींमुळे चित्रपट रंजक आणि पाहणेबल झाला आहे. आता इगा कोणकोणत्या क्लृप्त्या लढविते आणि कसे कसे व्हिलनला चरफडविते, हे वाचण्यापेक्षा पाहण्याचाच अनुभव अधिक भारी आहे. नानी म्हणजे सुदीपला मेटाकुटीस आणणारी माशी आहे, हे बिंदूला समजते का, एका छोट्याशा माशीला मारून टाकण्यासाठी सुदीप कसे कसे प्रयत्न करतो, त्यांना इगा कशी पुरून उरते, हे प्रत्येकाने अगदी जरुर जरुर पाहण्यासारखे आहे.

भारतातही इतके चांगल्या दर्जाचे ऍनिमेशन असलेले चित्रपट तयार होऊ शकतात, हे रोबोटने दाखवून दिले होते. आता इगानेही त्याच पंक्तीत जाऊन बसण्याची कामगिरी केली आहे. तेव्हा हिंदीमध्ये इगा येईल तेव्हा अगदी जरूर पहा. तो पर्यंत यू ट्यूबवरील गाण्यांवर आणि ट्रेलरवर समाधान माना...