Thursday, February 02, 2012

आदर्श यांचा घ्या...

सच्चे मुसलमान मुझफ्फर हुसेन

२६ जानेवारीच्या दुपारी दोन-अडीच वाजता एक फोन आला. वास्तविक पाहता, सुटीच्या दिवशी दुपारी झोपण्याच्या वेळी म्हणजे दोन-अडीचला फोन आला, की टाळकंच सटकतं. इन्श्य़ुरन्स हवाय का, पॉलिसी घेणार का, क्रेडिट कार्ड हवंय का किंवा काय मित्रा, बऱ्याच दिवसांनी फोन नाही केलास, काय करतोयस वगैरे वगैरे मंडळींच्या फोनमुळं डोकंच उठतं. जे खूप जवळचे आहेत, त्यांचे फोन आले तर बिघडत नाही. पण या मंडळींना दुपारच्या वेळी फोन करू नये, हा सेन्स असतो.

थोडक्यात काय तर दुपारी फोन आले तर डोकं फिरतं. पण २६ जानेवारीला दुपारी अडीच वाजता फोन आल्यानंतर डोकं फिरण्याऐवजी खूष व्हायला झालं. त्याचं कारणही तसंच होतं. ज्येष्ठ पत्रकार आणि पाकिस्तान तसेच मुस्लिम जगताचे अभ्यासक श्री. मुझफ्फर हुसेन यांच्या भेटीचं निमंत्रण आलं होतं. ते सुद्धा ध्यानीमनी नसताना... इतकी चांगली संधी स्वतःहून चालून आल्यावर आनंद होणार नाही तर काय... सामनाचे स्तंभलेखक म्हणून त्यांची मला ओळख होती. त्यांचे लेख खरंच अभ्यासूपणे लिहिलेलेल आणि वेगळ्या विषयांवरचे असतात. ‘मुस्लिम मनाचा शोध’ हे त्यांचे पुस्तकही मी खरेदी करून वाचलेले आहे. इतकीच माझी त्यांच्याशी ओळख. त्यामुळे अशा अभ्यासू लेखकाला भेटण्यासाठी मी खूपच आतूर होतो.


मुझफ्फर हुसेन हे गरवारे कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी आले होते. तो कार्यक्रम संध्याकाळी साडेसहा वाजता वगैरे होता. त्यामुळे दुपारच्या वेळी पुण्यातील काही पत्रकारांसमवेत गप्पांचा फड रंगवावा, अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली आणि माझ्यासह आणखी चार-पाच जणांना फोन करून विचारण्यात आलं, येऊ शकाल का. २६ जानेवारी असल्यानं बरेच जण पुण्यात नव्हते, काही जण गाढ झोपले होते. त्यामुळे मी आणि मटातीलच सहकारी मंगेश कुलकर्णी, असे आम्ही दोघे मुझफ्फर हुसेन उतरले होते तिथं त्यांना भेटायला गेलो आणि चालत्या बोलत्या विकिपिडियाची भेट घडल्याचा अनुभव आला.

काश्मीर, पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम संबंध, देशातील राजकीय परिस्थिती, चीनचे वाढत चाललेले दडपण, भारतातील राजकीय अराजकता, कणाहीन नेतृत्त्वाचा सर्वच पक्षांमध्ये असलेला अभाव, नरेंद्र मोदी आणि मुस्लिम समाज यांच्याबद्दल अनेक किस्से, बापजन्मात न ऐकलेली माहिती आणि भविष्यात काय होऊ शकते, यावर व्यक्त केलेली मार्मिक प्रतिक्रिया हे सर्व ऐकण्यात दीड-दोन तास कसे निघून गेले ते कळलंही नाही.

पाकिस्तानमधील सर्वसामान्य नागरिक (कट्टरपंथी नव्हे) हा तिथल्या राजकीय आणि लष्करी हुकुमशाहीला वैतागला असून लवकरच म्हणजे येत्या दहा ते पंधरा वर्षांमध्ये पाकिस्तानची फाळणी निश्चितपणे होणारच आहे, असा दावा हुसेन यांनी केला. वास्तविक पाहता, सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान यांना पाकिस्तानमध्ये जाण्याची अजिबात इच्छा नव्हती. तसे दुःख त्यांनी भारतीय नेत्यांकडे व्यक्त केले देखील होते. पण भारताचे राष्ट्रपिता काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आजही बलुचिस्तान आणि फ्रंटियरमधील लोकांना पाकिस्तानात राहण्यात काडीचाही रस नाही. म्हणूनच ते लवकरात लवकर पाकिस्तानमधून फुटून बाहेर पडतील. मग त्यांच्यावर नियंत्रण कोणाचे यासाठी इराण, अफगाणिस्तान आणि रशिया यांच्यात संघर्ष निर्माण होईल. त्याचवेळी पाकिस्तानमधील सिंध आणि पंजाब प्रांतांनी स्वतंत्रपणे अस्तित्त्व ठेवण्याऐवजी भारतात सामील होण्याची इच्छा व्यक्त केली आणि ती फलद्रूप झाली तर आश्चर्याचा धक्का बसायला नको, असेही हुसेन यांनी स्पष्ट केले.

भारताचे पहिले गृहमंत्री आणि ज्यांच्या खमकेपणामुळेच भारताचा आजचा नकाशा तयार झाला आहे, ते लोहपुरूष (लोहपुरूष एकच दुसरे लोहपुरुष कोणीही नाहीत.) वल्लभभाई पटेल यांनी संसदेत केलेल्या एका भाषणाचा संदर्भ हुसेन यांनी दिला. त्यावेळी पाकिस्तानला ५५ कोटी रुपये देण्याचा वाद पेटला होता. त्या पार्श्वभूमीवर बोलताना पटेल म्हणाले, की बाप आपल्या मुलाला एखादा व्यवसाय काढून देण्यासाठी भांडवल म्हणून काही पैसे देतो. जर मुलाचा व्यवसाय चालला नाही, तर तो पुन्हा घरी परततो आणि आपल्या बापाच्या व्यवसायात सहभागी होऊन जातो. आज माझ्या मनात काहीशी तशीच भावना आहे. वेगळा व्यवसाय करण्याचा हट्ट आहे म्हणून आम्ही भांडवल देतो आहोत. व्यवसाय नीट चालला तर बघा. नाहीतर बापाचे दरवाजे तुम्हाला सदैव उघडेच आहेत... वल्लभभाई यांच्याबद्दल ही माहिती आतापर्यंत कधीच पुढे आली नव्हती. दहा-पंधरा वर्षांनंतर जर हुसेन म्हणतात, तसे घडले तर वल्लभभाईंच्या दूरदृष्टीची कमालच म्हणावी लागेल.

पाकिस्तानप्रमाणेच चीनबद्दलही एक किस्सा त्यांनी सांगितला. अर्थात, या गोष्टीचा उल्लेख त्यांनी त्यांच्या पूर्वीच प्रसिद्ध झालेल्या एका लेखात केला होता, हा भाग अलहिदा. (आम्ही तो वाचलेला नव्हता, हे ओघाने आलेच.) राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविलेल्यांपैकी २५ ते २८ क्रीडापटू हे हरियाणाचे होते आणि त्यापैकी बहुतांश खेळाडू हे शाकाहारी होते. हरियाणातील दुग्धपुरवठ्यापैकी सर्वाधिक दूध हे मुर्रा नामक एक अव्व्ल जातीच्या म्हशीपासून मिळते. यामध्ये फॅट आणि इतर घटक हे अगदी वरच्या दर्जाचे असतात. या मुर्रा म्हशी दिवसाला १८ ते ३५ लिटर्सपर्यंत दूध देतात. त्यामुळे हरियाणाचे खेळाडू (अगदी पहिलवान आणि मुष्टीयोद्धे सुद्धा) फक्त दुधावर आणि पौष्टिक आहारावर मजबूत तब्येत कमावू शकतात. ही गोष्ट चीनने हेरली नसती तरच नवल. मुर्रा म्हशीचे वैशिष्ट आणि उपयुक्तता लक्षात आल्यानंतर चीनने जवळपास पाच हजार मुर्रा म्हशींची अवैध मार्गांनी तस्करी केली. आणि मुर्रा म्हशींचे ब्रीड करून आणखी दर्जेदार स्वरूपाचे दुधाचे उत्पादन कसे करता येईल यावर चीनमध्ये जोरदार संशोधन सुरू आहे. भविष्यात पाच हजारांच्या पन्नास हजार म्हशी करून त्यापासून मिळणाऱ्या दुधाचा स्वस्त दरात पुरवठा भारताला करण्याचे डावपेच चीनकडून आखले जात आहेत. हे ऐकून तर वेडंच लागायची वेळ आली होती. चीन काय करू शकेल, बरंच काही ऐकलं होतं. पण ते असंही असू शकेल, हा विचारही कधी मनात आला नव्हता. त्यामुळंच आणखी एक धक्का बसला.
मुझफ्फर हुसेन हे फक्त नावाचे मुसलमान म्हणायचे. त्यांचे विचार आणि लेखन हे इतकं स्वतंत्र आणि व्यापक आहे, की भारतातील सर्व मुसलमानांनी त्यांचा आदर्श ठेवला तर दंगली घडणारच नाहीत आणि राजकीय पक्षांना लांगुलचालन करण्याची संधी मिळणारच नाही. आपण हिंदू लोक असं करत नाही, आपण हिंदू लोक तसं करत नाही... असं म्हणूनच त्यांच्या अनेक वाक्यांची सुरूवात होत होती. गेल्या पंधरा वर्षांपासून हुसेन हे स्वतः शाकाहारी बनले आहेत आणि ‘इस्लाम आणि शाकाहार’ या विषयावर पुस्तक लिहित आहेत किंवा लिहिले आहे. ते जितक्या अभिमानानं कुराण पठण करतात तितक्याच अभिमानानं वंदे मातरम म्हणतात. ते जितके सच्चे मुसलमान आहेत तितकेच सच्चे सावरकरभक्त आहेत. सावरकरांचा हिंदुत्त्ववाद भारताच्या राष्ट्रीयत्वाशी जोडला गेलेला आहे, हे त्यांनी अगदी मनापासून मान्य केलेले आहे. त्यामुळेच ते स्वतःला आपण हिंदू लोक, असं म्हणतात.

तुम्हाला मुस्लिम कट्टरवाद्यांकडून किंवा जहाल मतवाद्यांकडून धमक्या येत नाहीत का, तुमच्या बहिष्कार टाकला जात नाही का, धर्मातून निलंबित वगैरे करण्याची भीती वाटत नाही का... अशा बऱ्याच प्रश्नांना त्यांचं उत्तर एकच होतं. ‘मी जे लिहितो ते नेहमी अभ्यास आणि पुराव्यांच्या आधारेच लिहितो. लोकांशी चर्चा केल्याशिवाय किंवा पुस्तकांमधील उतारे दिल्याशिवाय लिहित नाही. त्यामुळेच माझे मुस्लिम मित्र आणि विरोधकही लेखनाचा आदर करतात. जरी त्यांच्याविरूद्ध असलं तरीही.’ शिवाय धर्मातून निलंबित होण्याची किंवा बहिष्कार टाकला जाण्याची भीती मला कधीच वाटत नाही. त्यामुळे माझा अभ्यास आणि लेखन अव्याहतपणे सुरू आहे.

हुसेन यांचं वाचन आणि भ्रमंती प्रचंड आहे, सर्वज्ञातच आहे. त्यांच्याशी बोलताना त्याचा अगदी मिनिटामिनिटाला प्रत्यय येतो. आपने ये किताब तो पढी होंगी... आपने ये तो पढाही होगा... असं म्हणत त्यांनी दीड तासांत तब्बल वीस ते पंचवीस पुस्तकांचे दाखले दिले. कुठलं पुस्तक भारतातलं होतं, कुठलं स्पेनचं, कुठलं इराणचं आणि काही पाकिस्तानमधली. आता आमचं वाचन कुठं आलंय इतकं. शाळा पिक्चर आल्यानंतर मिलिंद बोकील यांचं शाळा पुस्तक वाचायला घेणारे आम्ही इतकी पुस्तकं कशाला वाचतोय. पण आपली झाकली मूठ म्हणून मी फक्त माना डोलावत होतो.

मोहम्मद अली जीना यांच्यापासून ते नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आणि शेख अब्दुल्ला यांच्यापासून ते राहुल गांधी यांच्यापर्यंत अनेक व्यक्ती, प्रसंग आणि घटनांबद्दल त्यांच्याशी गप्पा झाल्या. काही ऑन तर काही ऑफ द रेकॉर्ड. त्यामुळे एका मोठ्या आणि अभ्यासू माणसाला भेटल्याचा आनंद घरी परतताना मनात होता.

Tuesday, January 10, 2012

नृसिंहवाडीची शान


सचिन सोमण भोजनालय

खूप दिवसांपासून नृसिंहवाडीला जजायचं जायचं असं चाललं होतं. अखेर तो योग जुळून आला. खूप वर्षांपूर्वी गेलो होतो. पण अगदी लहान असताना. त्यामुळं अगदी पुसट पुसट आठवत होतं. पण नेमकं काहीच लक्षात नव्हतं. सकाळी साडेसात आठला निघालो आणि दुपारी एकच्या आसपास नृसिंहवाडीत पोहोचलो. पुण्यापासून साधारण अडीचशे किलोमीटरवर असलेलं तीर्थक्षेत्र म्हणजे नृसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी किंवा नरसोबावाडी किंवा नुसती वाडी.

पुण्याहून कोल्हापूरकडे जाताना पेठ नाक्यावर डावीकडे (म्हणजेच इस्लामपूर, आष्टा आणि सांगलीच्या दिशेने) आत वळायचं. मुंबई-बेंगळुरू महामार्गापासून आत सुमारे पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावर नृसिंहवाडी आहे. मुंबई-बेंगळुरू महामार्ग जितका चांगला. तितका सांगलीकडे जाणारा रस्ता खराब. स्वतःची गाडी असेल तर साधारणपणे पाच तासांमध्ये पुण्याहून नृसिंहवाडीला पोहचता येतं. आम्ही दुपारी एक-दीडच्या सुमारास नृसिंहवाडीला पोहोचलो.

नृसिंहवाडी येथे कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचा संगम होतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा महापूर येतो तेव्हा तेव्हा नृसिंहवाडीचं मंदिर प्रथम पाण्याखाली जातं. त्यामुळं दर पावसाळ्यात नृसिंहवाडी हे गाव चर्चेत येतं ते महापुरामुळं. पण नृसिंह सरस्वतींचे गाव ही नृसिंहवाडीची खरी ओळख. कृष्णेच्या पाण्यात हात पाय धुतल्यानंतर मग नृसिंह सरस्वतींचं दर्शन घेतलं. देऊळमध्ये जसं दाखवलंय तसा बाजारूपणा इथं नाही, हे अगदी ठळकपणे जाणवतं.

दर्शनानंतर जेवण कुठं करायचं, यासाठी शोधाशोध सुरु झाली. वास्तविक पाहता, देवाच्या (किंवा संतांच्या ) घरी जेवणं अधिक इष्ट असं समजलं जातं. त्यामुळं एखाद्या तीर्थक्षेत्री गेल्यानंतर बाहेरच्या हॉटेलमध्ये न जेवता तिथं मिळणारा भंडारा किंवा प्रसाद हेच जेवण समजून घेण्यात खरी मज्जा असते. पण आमचं दर्शन होईपर्यंत प्रसादाची वेळ संपली होती. मग आम्हाला शोधाशोध करण्यावाचून पर्यायच नव्हता.

अखेरीस दोन-तीन ठिकाणी चौकशी करून मग नृसिंहवाडीतीलच सोमण भोजनालय गाठले. भोजनालय किंवा खाणावळ म्हणणे त्यावर अन्याय केल्यासारखेच होईल. अगदी घरगुती आणि आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी एकदम माफक किंमतीत घरच्यासारखे जेवण देणारे घर, असेच त्याचे वर्णन करावे लागेल. त्यामुळे भविष्यात जर कोणी नृसिंहवाडीला गेलात आणि प्रसाद उपलब्ध नसेल तर मग कोणताही विचार न करता थेट सोमण भोजनालय गाठायला हरकत नाही. सचिन सोमण यांचे भोजनालय कुठे ते विचारा. कारण नृसिंहवाडीत आणखी एक सोमण भोजनालय आहे. पण ते तितके स्वादिष्ट नाही, असे स्थानिक सांगतात।

वीस ते पंचवीस लोक एकावेळी जेवायला बसतील अशी व्यवस्था. लग्नातील पंक्तीप्रमाणे तिथं पंगत बसते. मुळ्याचा चटका, लाल मिरचीचा खर्डा (किंवा ठेचा), फ्लॉवर-टोमॅटो-बटाटा रस्सा भाजी, वाल आणि वांगी यांची रस्सा भाजी, तर्रीबाज आमटी, साधा पांढरा भात, वरण, तुपाची धार, मसाले भात, घरच्यासारख्या घडीच्या मऊसूद पोळ्या आणि नरसोबाच्या वाडीची मस्त बासुंदी. (अर्थात, माझे काका आणि आता भाऊ करतात त्या बासुंदीला तोड नाही. वीस लीटर दूध आटवून घोटून आठ लीटर बासुंदी तयार करतात. म्हणजे ती किती घट्ट आणि किती गोड होईल, याचा विचारच केलेला बरा.) जेवणाच्या सुरूवातीलाच आंबटगोड ताक वाढलं जातं. आणि संपूर्ण जेवणात अधून मधून ते वाढलं जात असल्यानं पाण्याऐवजी ताकावरच भर जास्त राहतो.

एकदम गरमागरम आणि इतक्या आग्रहानं वाढलं जाणारं जेवण म्हणजे फुल टू धम्माल. कोल्हापुरी मसाल्यांचा स्वादाला पाहुणचाराची जोड म्हणजे अजोड. वांग आणि वाल हे कॉम्बिनेशन तर आयुष्यात पहिल्यांदाच खाण्यात आलेलं. पण चव सगळं तारून नेते. दोन्ही भाज्यांचे मसाले अगदी एकाच पद्धतीचे. तरीही दोन्हीही भाज्यांवर ताव मारला जातोच. इथलं जेवण इतकं अप्रतिम आहे, की वाडीला येताना थोडंसं पोट रिकाम ठेवूनच या, म्हणजे जेवणाचा आस्वाद अधिक चांगल्या पद्धतीनं घेता येईल. अगदी चटणी-कोशिंबिरीपासून ते भाजी-आमटीपर्यंत प्रत्येक पदार्थ वारंवार वाढला जातो. अगदी पोळ्यांचा आग्रहही होतो. नाही म्हणता म्हणता, सोमण यांचा आग्रह असतोच. मग अगदी घरच्यासारखा आग्रह करून अर्धी पोळी किंवा थोडा भात, मसाले भात, आमटी वाढली जातेच. बरं, गरमागरम जेवण असल्यानं दोन-चार घास अगदी आवर्जून जास्त जातात. कोणत्याही खाणावळीत वा भोजनालयात इतक्या आग्रहानं वाढलं गेलेलं मी पाहिलेलं नाही. त्यामुळंच अशा आग्रहाचं आम्हाला कौतुकं. त्यातून आडनाव सोमण. त्यामुळं दुप्पट कौतुक. (हे आपलं विनोदानं बरं का...)

नृसिंहवाडीची बासुंदी खूप प्रसिद्ध आहे. बाहेरगावाहून आलेले लोक अगदी आवर्जून इथली बासुंदी खातात. काही लोक घरी पार्सलही नेतात. अर्थात, बासुंदी चांगली होती, यात वादच नाही. पण वर सांगितल्याप्रमाणे यापूर्वी अनेक वेळा घरची चांगली बासुंदी खाल्ल्याने तिथल्या बासुंदीचे मला विशेष कौतुक वाटले नाही.
तेव्हा पुन्हा जेव्हा केव्हा नृसिंहवाडीस जाल तेव्हा सचिन सोमण यांच्या आग्रहाचा आणि स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद अगदी आवर्जून घ्या. आम्ही दुपारी दोन अडीचच्या सुमारास गेलो होतो. तेव्हापर्यंत आणि त्यानंतरही भुकेली मंडळी त्यांच्याकडे जेवण्यासाठी येत होते. त्यामुळे दुपारी चार वाजेपर्यंत ते सुरू असतं, असं समजायला अजिबात हरकत नाही.

(नृसिंहवाडीला प्रसाद म्हणून पेढे मिळतातच. पण त्या जोडीला मिळणारी कवठाची बर्फी खूपच छान असते. तिचा रंग पाहूनच प्रेमात पडायला होतं. चवीमुळं प्रेमात पडणं नंतरची गोष्ट.)

Saturday, December 24, 2011

एकच अटलजी...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...




भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज वाढदिवस. २५ डिसेंबर. राजकारणी असूनही ते सर्वांपेक्षा वेगळे आहेत. कवी, रसिक आहेत. त्यामुळेच राजकारणी असूनही ते गेंड्याच्या कातडीचे नेते नाही. विरोधी पक्षातील लोकही त्यांच्याबद्दल अपशब्द बोलण्याची हिंमत करीत नाही. अटलजी आप अच्छे हैं लेकिन आपकी पार्टी गलत है... एक अटलजी बाकी सब शटलजी, फक्त इतकीच माफक टीका विरोधक करायचे. त्यामुळेच अटलजी हे अटलजी आहेत. त्यांची सर कोणत्याही नेत्याला येणार नाही. म्हणूनच आज ते सक्रिय राजकारणात नसले आणि चर्चेत नसले तरी वाजपेयी यांचे कोट्यवधी चाहते आहेत. त्यांच्यावर प्रेम करणारे लाखो लोक आहेत. लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात. मावळत्या सूर्याला कोणीही नमन करीत नाही. पण वाजपेयींचा करिष्मा इतका आहे, की आजही त्यांचा प्रभाव चाहत्यांवर टिकून आहे. मीही त्यापैकीच एक.

काल के कपाल पर लिखता मिटाता हूँ
गीत नया गाता हूँ, गीत नया गाता हूँ...

या कवितेप्रमाणेच अटलबिहारी वाजपेयी यांचे आयुष्य होते. अटलजींचा जन्म एका सर्वसामान्य शिक्षकाच्या घरी झाला. २५ डिसेंबर १९२४. अटलजींचे वडील कृष्णबिहारी हे शिक्षक होते. आपल्या पोरानं तेव्हा प्रतिष्ठेची असलेली सरकारी नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. मुलाला एक वर्षे जास्त नोकरी करता यावी, यासाठी त्यांच्या वडिलांनी अटलजींची जन्मतारीख १९२४ ऐवजी १९२५ अशी लिहिली. पण काळाच्या पोटात काय दडले आहे, ते कोणालाच ठाऊक नसते. मग ते कृष्णबिहारी यांना तरी कसे ठाऊक असणार. आपला पोरगा सरकारी नोकरी करणार नाही तर चक्क सरकार चालविणार आहे, हे कोणाला ठाऊक असणार. पण अटलजींनी स्वतःच्या नेतृत्व, कर्तृत्व आणि वक्तृत्त्वाच्या जोरावर जे काही साध्य केले, ते सर्वांनाच अचंबित करणारे आहे.

अटलजी म्हणजे वक्तृत्तवाचा अमोघ झरा आणि निर्मळ मनाचा मनुष्य. विषय कोणताही असो त्यावर अभ्यासपूर्ण आणि लोकांची मने जिंकेल, असे भाषण हे अटलजींचे वैशिष्ट्य. मग विषय गीतरामायणाचा असो, भारत-चीन संबंध असो, पंडित जवाहरलाल नेहरू असो किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक श्री गुरुजी असो... अटलजींच्या मुखातून अक्षरशः सरस्वती बोलते आहे, असाच प्रत्यय यायचा. त्यामुळेच अटलजींचे जिथे कुठे भाषण असेल तिथे जाऊन ते ऐकायचे किंवा टीव्हीवर असेल तेव्हा कान तृप्त होईपर्यंत ऐकायचे, हे अगदी लहानपणापासून सुरु होतं. भाषणाला अगदी थोडा जरी उशीर झाला तरी ‘मैं देर से आया हूँ लेकिन बहोत दूर से आया हूँ’ हा अटलजींचा डायलॉग अगदी ठरलेला. तो त्यांनी प्रत्येकवेळी जरी म्हटला तरी त्यांच्या हिंदीमध्ये जी मिठास होती, ती कानावर पडली की टाळ्याच वाजायच्या. वक्तृत्त्वाच्या जोरावरच अटलजींनी हजारो सभा जिंकल्या.

माझ्यासारखे कोट्यवधी नागरिक त्यांच्या भाषणाचे चाहते आहेतच. पण भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू हे देखील वाजपेयींच्या भाषणांचे चाहते होते. वाजपेयी त्यावेळी अगदी युवा खासदार होते. त्यामुळे त्यांना भाषणाची संधी शेवटी शेवटी मिळे. पण परराष्ट्र धोरण आणि इतर कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यांवर अटलजींचे भाषण ऐकण्यासाठी पंडितजी आवर्जून उपस्थित रहायचे. इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी हे माझे आवडते वक्ते आहेत, असे खुद्द नेहरू यांनी म्हटल्याचे उल्लेख सापडतात. अशी वाजपेयींच्या वाणीची मोहिनी होती.


सुषमा स्वराज यांच्या पुढाकारातून जेव्हा लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज थेट दूरदर्शनवर पाहण्याची सुविधा उपलब्ध करून दिली तेव्हापासून तर वाजपेयींच्या भाषणाची पर्वणी अधूनमधून मिळतच गेली. १९९६ साली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखाली पहिल्यांदा केंद्रात सरकार आले. पण ते अवघे १३ दिवसच टिकले होते. त्यावेळी अटलजींनी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यापूर्वी लोकसभेत केलेले भाषण अजूनही कानात आहे.

‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करण्याचा प्रश्नच येत नाही. १९७७ मध्येही जनता पक्षाचे सरकार असताना हाच मुद्दा उपस्थित झाला होता. तेव्हाही आमची भूमिका तीच होती आणि आजही तीच आहे. संघाशी आमचे असलेले संबंध जगजाहीर आहेत आणि ते नाकारण्याचा संबंधच नाही. आमच्याकडे बहुमत नाही आणि बहुमतासाठी घोडेबाजार करण्याचा किंवा आपल्या विचारांशी प्रतारणा करण्याची आमची तयारी नाही. त्यामुळेच मी राष्ट्रपतींकडे राजीनामा देण्यासाठी निघालो आहे... ’ असे अगदी ठामपणे सांगणारे वाजपेयी आजही अगदी जशेच्या तसे डोळ्यासमोर आहेत. त्यानंतर त्यांना दोनदा भारताचे पंतप्रधान होण्याची संधी भारतीयांनी दिली. कदाचित १९५२ पासून एकाच विचारांशी निष्ठा बाळगल्याबद्दल तमाम भारतीयांनी त्यांना दिलेले हे बक्षिसच होते.

सी. के. जाफर शरीफ हे नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात रेल्वेमंत्री होते. त्यावेळी कोणत्या तरी विषयावरून संघाचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी जाफर शरीफ त्यांच्या भाषणात म्हणाले होते, की लहानपणी मी संघात जायचो. पण आता माझा संघाशी काहीही संबंध नाही. तेव्हा माझ्यावरही संघाचे संस्कार झालेले आहेत, असे तुम्ही म्हणाल का? त्यावर वाजपेयी यांनी क्षणाचाही विलंब न करत उत्तर दिले होते, वन्स अ स्वयंसेवक इज ऑलवेज अ स्वयंसेवक... त्यामुळे तुम्ही आजही संघाचे स्वयंसेवक आहात, असेच संघ मानत असेल. वाजपेयींच्या या उत्तरानंतर जाफर शरीफ यांची अवस्था काय झाली असेल, त्याचा अंदाज आला असेलच.

कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या गीता मुखर्जी यांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजलनी वाहणारी भाषणे लोकसभेत सुरु होती. त्यावेळी वाजपेयी यांनी कम्युनिस्ट नेत्याचे भरभरून केलेले कौतुक अविस्मरणीय असेच आहे. वाजपेयी म्हणाले होते, की गीता मुखर्जी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर कम्युनिस्ट पक्षाचाच कोणतरी उमेदवार निवडून येईल. तो त्यांची जागा घेईल. पण एक चांगल्या संसदपटू आणि अभ्यासू वक्त्या म्हणून आमच्या हृदयामध्ये त्यांची जी जागा आहे, ती कोण घेणार. असे एक ना दोन असंख्य प्रसंग आणि त्यांच्या वक्तृत्वाचे शेकडो किस्से इथे सांगता येतील. अशी त्यांची शैली होती.

अटलजी त्यांच्या भाषणांमधून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर कडाडून टीका करीत असत. प्रसंगी त्यांच्यावरही जोरदार आसूड ओढत. पण बांग्लादेशच्या युद्धात पाकिस्तानला नामोहरम केल्यानंतर अटलजींनी इंदिरा गांधींचा उल्लेख दुर्गा असा केला होता. आपल्या विरोधकांचेही प्रसंगी कौतुक करण्याचा दिलदारपणा त्यांच्यात होता. त्यामुळेच विरोधी पक्षांमध्येही त्यांचे मित्र होते. चंद्रशेखर तर त्यांना माझे राजकीय गुरु असेच म्हणायचे. अशी अटलजींची महती होती, आहे आणि राहणार.



अटलजी कविमनाचे असले तरी देशाचे नेतृत्व करताना त्यांचे हे कविमन आड आले नाही. पोखरणमध्ये ११ आणि १३ मे रोजी केलेले अणुस्फोट असोत किंवा कारगिलमध्ये पाकिस्तानला चारलेली धूळ असो, अटलजींचा कणखरपणाच वेळोवेळी दिसून आला. त्यांनी कधीच कोणाचीही भीडभाड बाळगली नाही. मग ते नरेंद्र मोदी का असेना. हिंदू तन मन हिंदू जीवन रग रग हिंदू मेरा परिचय... ही संघ परिवारातील कट्टर हिंदुत्ववाद्यांची आवडती कविता करणारे अटलजी हळव्या मनाचे असले तरी ते प्रसंगी कठोरही होत. भिवंडीत उसळलेल्या दंगलीनंतर त्यांनी संसदेत भाषण करताना ‘अब हिंदू मार नही खाएगा,’ असे ठणकावून सांगितले होते. पण वाजपेयी हे आंधळे किंवा झापडबंद हिंदुत्वावादी नाहीत. मुळात ते अडवाणी किंवा उमा भारती यांच्यासारखे कडवे तर नाहीतच. एकदम खुल्या दिलाचे आणि विचारांचे आहेत. त्यामुळेच गोध्रा दंगलीनंतर ‘राजधर्माचे पालन करा’ असे मोदींना निक्षून सांगण्याची हिंमत त्यांनी दाखविली. ती कदाचित आजही भाजपच्या कोणत्याही नेत्याकडे किंवा संघाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याकडे नाही.

दुसरीकडे प्रमोद महाजन यांनाही त्यांनी एका फटक्यात जमिनीवर आणले होते. त्यावेळी महाजन हे अटलजींचे डावे-उजवे दोन्ही हात होते. त्यामुळेच त्यांच्याकडे विज्ञान-तंत्रज्ञान आणि दूरसंचार अशी अगदी महत्त्वाची खाती होती. प्रमोद महाजन म्हणजे पीएम. भाजपचे पुढील प्राईम मिनिस्टर असे त्यांचे वर्णन केले जायचे. त्यावेळी महाजनांनी एका जाहीर सभेत सोनिया गांधी यांची तुलना बिल क्लिंटन यांचे संबंध असलेल्या मोनिका ल्युवेन्स्की हिच्याशी केली होती. त्यावेळी वाजपेयी यांना ही हीन दर्जाची टीका अजिबात रुचली नव्हती. योग्य ती वेळ साधून वाजपेयी यांनी महाजनांची दोन्ही खाती काढून घेतली होती, तसेच त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून काम करण्याची सूचना केली होती. मध्य प्रदेश आणि राजस्थानच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली होती. आपल्या जवळचा वगैरे असा विचार करून त्यांनी दोषी व्यक्तीला पाठिशी घातले नाही.


तीनवेळा भारताचे पंतप्रधान होणारे वाजपेयी हे एकमेव गैरकाँग्रेसी नेते. पंडित नेहरू आणि इंदिरा गांधी या काँग्रेसच्या नेत्यांना ही संधी मिळाली होती. पण गैरकाँग्रेसी नेत्यांच्या स्वप्नातही येणार नाही, अशी कामगिरी वाजपेयी यांनी करून दाखविली. अर्थात, वैचारिकदृष्ट्या भाजपशी किंवा संघ परिवाराशी आयुष्यात कधी जमले नाही, अशा चंद्राबाबू नायडू, जॉर्ज फर्नांडिस, जयललिता, ममता बॅनर्जी, मायावती आणि फारूख अब्दुल्ला यांच्यासारख्यांची मोट वाजपेयी यांनी बांधली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्त्वाखालील सरकार केंद्रात आणले. वाजपेयी राजकारणातून निवृत्त झाले आणि भाजपच्या नेतृत्त्वाची काय वाताहत झाली आहे आणि कोणकोणत्या राजकीय पक्षांनी त्यांची साथ सोडली आहे, हे सर्वज्ञातच आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यात वाजपेयी यांचे किती महत्त्वाचे योगदान होते, हेच यावरून स्पष्ट होते.



पुण्यातही १९९८ च्या लोकसभा निवडणुकीत पुणे विकास आघाडीच्या सुरेश कलमाडी यांना भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेने पाठिंबा दिला होता। त्यावेळी त्यांच्या विरोधात अविनाश धर्माधिकारी यांनी निवडणूक लढविली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन कार्यवाह आणि धर्माधिकारी यांचे सासरे अनंतराव गोगटे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लेटरहेडवर एक पत्र प्रसिद्ध करण्याचा मुद्दा त्यावेळी खूप चर्चेत आला होता.



संघाच्या स्वयंसेवकांवर कोणत्याही विशिष्ट उमेदवाराचे काम करण्याचे बंधन नसते, असा त्या पत्राचा आशय होता। म्हणजे संघाच्या लोकांनी धर्माधिकारी यांचे काम करावे, हा त्यातील छुपा अर्थ. पण फक्त अटलजींच्या एका शब्दावर भाजपच्या निष्ठांवत मतदारांनी धर्माधिकारी नव्हे तर कलमाडींना मत टाकले होते आणि धर्माधिकारी यांना अवघ्या ३५ हजार मतांवर समाधान मानावे लागले होते.



असे वाजपेयी २५ डिसेंबर २०११ मध्ये ८८ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. प्रकृती अस्वाथ्यामुळे आज अटलजी जरी समोरच्या व्यक्तीला ओळखण्याच्या किंवा त्याच्याशी बोलण्याच्या परिस्थितीत नसले ते आहेत, हाच त्यांच्या चाहत्यांना दिलासा आहे. वाजपेयींवर ईश्वराची कृपादृष्टी कायम रहावी, अशीच त्याच्याकडे प्रार्थना.

Tuesday, November 29, 2011

श्री गुरुदेव दत्त संतप्त...


दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचं दूध... या गाण्यामुळे आधीच चर्चेत आलेला देऊळ नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला। एका चांगल्या आणि जळजळीत विषयाला तोंड फोडल्याबद्दल कुलकर्णी बंधूंचे सर्वप्रथम अभिनंदन.

मध्यंतरी शिर्डीला गेलो होतो. शिर्डीचा जो बाजार झालाय तो पाहून भाव, भक्ती किंवा श्रद्धा या गोष्टी शे-पाचशे रुपयांना अगदी सहज मिळू शकतात, हे जाणवलं. शिर्डीचे साईबाबा काय, तिरुपतीचा बालाजी काय, प्रभादेवीचा सिद्धीविनायक काय, आणि कुठले कुठले देव काय. सगळेच भक्तीचे भुकेले. पण त्या मंदिरांच्या ट्रस्टचे काम पाहणारी मंडळी मात्र, वेगळ्याच भावाचे भुकेले असतात. त्यामुळेच काही हजार रुपये मोजले, की तातडीचे दर्शन. थोडे कमी पैसे दिले, की आणखी जास्त वेळ. अशा गुणोत्तराने दर्शनाची वेळ वाढत जाते. अगदी सर्वसामान्य म्हणून जो भक्त असतो, तो तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभा आणि पैसेवाली मंडळी दोन मिनिटांच दर्शन घेऊन मोकळे. चहापासून ते राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी दामदुपटीने विकून भक्तगणांना चक्क लुटणारी मंडळी आणि भक्तीचा मांडलेला बाजार. डोकं उठतं. त्यावर कोणी ना कोणी तरी आसूड ओढणे गरजेचेच होते. ते काम कुलकर्णी द्वयांनी केले. त्याबद्दल मनापासून अभिनंदन.

चित्रपटाचे संवाद एक नंबर आहेत. त्याबद्दल गिरीश कुलकर्णी यांना शंभरपैकी दोनशे मार्क दिले पाहिजेत. चित्रपटातील संवादामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा प्रेक्षकांवर किती अत्याचार झाले असते त्याचा विचारच करता येत नाही. काही ठिकाणी पातळी सोडल्याचे जाणवते. उदा. ठासली जाणे, गोट्या कपाळात जाणे इइ. पण इतके चालणारच.

पण चित्रपटाबद्दल सर्वाधिक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे निवडण्यात आलेला देव। देवाची निवड चुकलीच म्हणायची. कारण गुरुदेव दत्त हा देव अजूनही बाजारापासून दूर आहे. नरसोबाची वाडी, गाणगापूर, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, नवनाथ किंवा शेगांवचे गजानन महाराज या सर्वांचा बाजार मांडलेला नाही. खरीखुरी भक्ती तिथं अजूनही टिकून आहे. शिर्डीला जा आणि एकदा शेगांवला जा. दोन्हीमधला फरक वर्णन न करता येण्याजोगा आहे. शिवाय दत्त या देवाची ख्याती वेगळी असल्यानं त्याच्या वाटेला शक्य तो कोणी जात नाही. गुरुचरित्र वाचायलाही काही नियमावली असते. ती पूर्ण केली नाही तर गुरुचरित्राचे फायदे मिळत नाहीत. असा हा कडक देव. त्यामुळं दत्ताचा बाजार मांडण्याचे धाडस अजूनही कोणी केलेले नाही. खरा बाजार झालाय तो फकीर म्हणून आयुष्य काढलेल्या साईबाबांचा. महागड्या बालाजीचा आणि सिद्धीविनायकाचा.

वरीलपैकी कोणत्या तरी एकाही देवाविरुद्ध चित्रपट काढला असता तर तो थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये चढण्यापूर्वीच त्याचा बाजार उठला असता. म्हणूनच, की काय कुलकर्णी द्वयांनी दत्त या साध्या भोळ्या आणि शांत देवाचा बाजार मांडून चूकच केली. किंवा त्यांच्यात खराखुरा बाजार झालेल्या देवांची कथा खरं तर व्यथा मांडण्याची हिंमत नसावी, इतकाच निष्कर्ष आपण काढू शकतो. शेवटी संस्कृतमध्ये म्हटलेच आहे,
वाघाचा सिंहाचा बळी दिला जात नाही। बोकडाचाच बळी दिला जातो. कारण तो शांत असतो, प्रतिकार करू शकत नाही. तसाच दत्ताचा बळी या चित्रपटात देण्यात आला आहे.

दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे, चित्रपटात झालेली कलाकारांची बजबजपुरी। दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यापासून ते विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम आणि स्वतः गिरीश कुलकर्णी यांच्यापर्यंत बऱ्याच नटनच्यांचा गोतावळा चित्रपटांत जमविण्यात आला आहे. पण त्यामुळेच कोणत्याच नटाची छाप त्यामध्ये पडत नाही. दिलीप प्रभावळकर सुद्धा तीन-चार प्रसंगांमधूनच दिसतात. त्यांचे अगदी थोडेच संवाद प्रभावी आहेत. प्रभावळकर आणि नाना यांचा म्हणावा तसा उपयोग चित्रपटात झालेलाच दिसत नाही. कदाचित गिरीश कुलकर्णी यांची भूमिका त्यांच्या भूमिकेपुढे दुबळी वाटू नये, म्हणूनच दोघांनाही तोंडी लावण्यासाठी घेतले, की काय असे वाटते. तसे जर असेल तर तो त्यांचा अपमानच म्हटला पाहिजे.



हे दोन झाले प्रमुख आक्षेप। बाकी दिग्दर्शनाचे म्हणाल, तर अनेक पुरावे देता येतील. मुख्य म्हणजे गावांतल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर लागलेले जयोस्तुते हे गाणे. भारतातील तमाम शाळांमध्ये तिरंगा फडकल्यानंतर राष्ट्रगीत म्हणजे जन गण मनच लागते. वंदेमातरम लाही अजून तो मान मिळालेला नाही. त्यामुळे जयोस्तुते लावणे चूकच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे लाडके राष्ट्रपुरुष आहेत. जयोस्तुते हे उत्तम गीतही आहे. पण राष्ट्रगीताची जागा ते घेऊ शकत नाही. त्यामुळे इतकी गंभीर चूक होऊनही एकाही चित्रपट परीक्षकाने त्यावर बोट ठेवलेले नाही, याचे आश्चर्यच वाटते. आता गाणे घाईगडबडीत चुकून लागले आहे, असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल तर तो संदेश अजिबात पोहोचत नाही.

नंतर खटकणारी गोष्ट म्हणजे सकाळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश मिळत नाही। सुरक्षारक्षक त्याला हाकलवून लावतात. मग रात्रीच्या वेळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश कसा मिळतो आणि तो मंदिरातील दत्ताची मूर्ती चोरून पळून कसा जातो, या चमत्काराची कथा प्रेक्षकांना अजिबात कळत नाही. गिरीश कुलकर्णी हे दत्ताची मूर्ती कसा चोरतो, हे जर अधिक स्पष्टपणे दाखविले असते, तर मायबाप प्रेक्षकांवर उपकार झाले असते, असे ऍज अ प्रेक्षक म्हणून वाटते हं.

नंतर गिरीष कुलकर्णी जेव्हा दत्ताची मूर्ती पाण्यात बुडवितो तेव्हा ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, तेव्हा एक तर ती मूर्ती दगडाची असते, संमगरवरी असते, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते किंवा शाडूची असते. चित्रपटात दाखविलेली दत्ताची मूर्ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. म्हणजे ती फायबरची असावी असे दिसते. दत्ताचे देवस्थान जर जागृत असेल तर तिथे फायबरची मूर्ती असूच शकत नाही. शिवाय मूर्तीचे विसर्जन करताना पाणी खळखळत असते पण नंतर ते अचानक शांत होते, असे दृष्यातून दिसते. खूप मोठ्या चुका आहेत, असे नाही. पण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर जाणवते. तेव्हा कुलकर्णी मंडळींनी पुढील वेळी या बारीकसारीक गोष्टींचा जरूर विचार करावा.

ज्या गावामध्ये पोस्टमनही येत नाही, त्या गावात दिलीप प्रभावळकरच्या घरी इंटरनेट पोहोचलेले असते, दत्ताची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पत्रकार किशोर कदम महासंग्राममधून आयबीएन लोकमतमध्ये पोहोचतो, हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. शिवाय काही दृष्यांमध्ये फिल्टर वापरून रात्र करण्याची चोरी जाणकार मंडळींच्या लगेच लक्षात येते.

चित्रपटात काही गोष्टी उगाच घुसडल्यासारख्या वाटतात। पहिली म्हणजे वेलकम राया ही लावणी कम आयटम साँग. आता त्यात निवडलेली आयटम इतकी बकवास आहे, की झक मारली आणि लावणी पाहिली, असे वाटते. गायिकेचा आवाज आणि लावणीचे शब्द सोडले तर लावणीत मादकता अजिबात नाही. प्लॅस्टिकचा बॉल आणि प्लॅस्टिकची बॅट काय, नाईट क्रिकेट काय, उचलून मारा, हळूवार मारा, अलगद मारा... ही म्हणजे अकलेची दिवाळखोरी वाटते. प्रेक्षक खिळवूनच ठेवायचे असेल तर एखादे सेक्स साँग किंवा कॅब्रे डान्सच टाकायचा ना. साईड साईडने कशाला खेळता. थेटच भिडा.

तीच गोष्ट नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सागरगोट्यांच्या दृष्याची. अजिबात आवश्यकता नसलेले आणि सोनाली कुलकर्णीला गुरुदेव गच्च दाखविणारे ते उठवळ दृष्य असेच प्रेक्षकांना चळवायला चित्रपटात घेतले आहे, की काय अशी शंका येते.

जाता जाता आणखी एक। नसिरुद्दीन शाह यांचा विनाकारण घुसडलेला प्रसंग। मुळात त्या प्रसंगाची आवश्यकता काय, की मोठा कलावंत मराठीत आणण्याचा अट्टहास, याचे उत्तर मिळत नाही. करडीच्या पायाला झालेली दुखापत तसेच नसिरुद्दीनच्या पायाला झालेली दुखापत, यातून दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे, हे समजत नाही. करडीच नसिरुद्दीन शहाच्या रुपाने तिथे आलेली असते, असे तर सुचवायचे नाही ना. तसे जर असेल तर हा अंधश्रद्धा पसरविण्याचाच प्रकार आहे. म्हणजे एका वाईट बाजूवर कोरडे ओढायचे आणि आपणच दुसरी वाईट बाजू उचलून धरायची, असे झाले. दिग्दर्शकाला त्या प्रसंगातून काय दाखवायचे हे समजत नाही. पण मी म्हणतो, तसे दाखवायचे असेल तर एक हजार वेळा निषेध.

तेव्हा अशा काही सुधारणा झाल्या असत्या तर देवळात अधिक प्रसन्न वाटले असते. बाकी देवा तुला शोधू कुठे आणि दत्त दत्त दत्ताची गाय ही गाणी एकदम झक्कास. एका चांगल्या विषयाला भिडल्याबद्दल अभिनंदन.

Tuesday, November 15, 2011

चार हजार कोटींची भीक मागणारा

उधळ्या उद्योगपती



भारतातील क्रमांक दोनची एअरलाईन्स सेवा असलेल्या किंगफिशरचे विमान जमिनीवर आदळले आहे. चार हजार कोटी रुपयांचा संचित तोटा किंगफिशर एअरलाईन्सला झाला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कंपनीची गेल्या काही दिवसांपासून उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. किंगफिशरचा शेअरही धपकन उतरला आहे. कर्जाची परतफेड करता येत नाही, म्हणून ज्या बँकांनी त्यांचे शेअर्स ताब्यात घेतले, त्या बँकाची चांगल्या धास्तावल्या आहेत. कारण शेअरचे भाव गडगडल्यामुळे त्यांची किंमत खूप कमी झाली आहे. प्राप्त परिस्थितीत कंपनीला आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने आम्हाला बेल आऊट पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी केली आहे।

मुळात, असे पॅकेज देण्यात यावे किंवा कसे, याबाबत भारताचे मुखदुर्बळ पंतप्रधान आणि स्वतः अर्थतज्ज्ञ असूनही सामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारे डॉ. मनमोहनसिंग काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. टूजी तसेच राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणारे पंतप्रधान याबाबत तोंड उघडतात की नेहमीप्रमाणे मौनीबाबा होतात, यावर अब्जावधी रुपयांचा सट्टा लागला आहे, असे नुकतेच ऐकिवात आले आहे.

असो. आजचा विषय तो नाही. मुख्य प्रश्न आहे, मद्यमहर्षि विजय मल्ल्या यांना अशी आर्थिक मदत करावी, की नाही. मुळात मल्ल्या यांची एकूण लाईफस्टाईल पाहता त्यांची कंपनी तोट्यात येणार हे सांगायला मनमोहनसिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. अगदी फुटकळ माणूसही ते छातीठोकपणे सांगू शकला असता. मुळात आपली औकात नाही, तर शंभर गाढवं अंगावर घ्यायची कशाला. झेपतंय तेवढंच करावं. पण मल्ल्या यांना हे कोण सांगणार।

पूर्वी फक्त बिअर व दारुपुरताच किंगफिशर हा ब्रँड मर्यादित होता. पण नंतर हवाई उद्योगात प्रवेश करतानाच मल्ल्या यांनी स्वतःचा बडेजाव मिरवित फॉर्म्युला वनची भारतीय टीम विकत घेतली. आयपीएलमध्ये बेंगळुरुची टीम खरेदी केली. त्यापूर्वीर्ही काही वर्षे त्यांनी परदेशातून टिपू सुलतानची तलवार अब्जावधी रुपये मोजून ताब्यात घेतली. त्यानंतर ते राजकारणात शिरले आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तिकिटावर राज्यसभेतही पोहोचले।

टिपू सुलतानची तलवार हे एकवेळ समजू शकतो. मुळात तो लोकांच्या भावनेचा विषय होता आणि त्यासाठी मल्ल्या यांनी साडेतीन ते चार अब्ज रुपये मोजले होते. तेही स्वतःच्या खिशांतून. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भारतात आणण्यात येणार असेल तर त्यासाठी मराठी माणूस कितीही पैसे मोजू शकतो. त्यामुळे टिपू सुलतानची तलवार भारतात आणण्यासाठी खर्च केलेले पैसे हा विषय वेगळा आहे. त्याचा इतर दोन गोष्टींची संबंध जोडण्याची आवश्यकता नाही।

राहता राहिला मुद्दा फोर्स वनची टीमचा आणि बेंगळुरुच्या संघाचा. मल्ल्या यांनी साडेपाचशे कोटी रुपयांच्या आसपास रक्कम मोजून बेंगळुरुची टीम खरेदी केली. तर मल्ल्या यांनी मायकेल मोल यांच्याशी भागीदारीमध्ये साधारण साडेसहाशे कोटी रुपये खर्च करुन फोर्स वन ही एफ वन रेसमधील भारतीय टीम खरेदी केली. दरवर्षी त्यावर होणारा खर्च किंवा इतर गोष्टींच्या तपशीलामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. अगदी स्पष्टच बोलायचे झाले, तर भारतामध्ये फॉर्म्युला वन रेस लोकप्रिय असली तरी फारशी रुजलेली नाही. नरेन कार्तिकेयन आणि करुण चंडोक ही दोन नावे सोडली तर भारतात त्या रेसमध्ये सहभागी होऊ शकेल असा एकही एफ वन ड्रायव्हर नाही. फोर्स वनचे दोन्ही ड्रायव्हर्स परदेशी आहेत. त्यामुळे मल्ल्या यांनी फोर्स वन टीम खरेदी करुन भारताची शान वाढविली असे काही क्षण जरी वाटत असले तरी त्यांनी हरणाऱ्या घोड्यावर पैसे लावले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली असून ज्यात तोटात तोटा दिसतो आहे, तिथे पैसा लावला आहे।

प्रत्येक वेळी मल्ल्या यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक मोठी झाली असली तरी मल्ल्या यांची झोळी रिकामी होत गेली आहे. मल्ल्या यांनी हाच पैसा पद्धतशीरपणे किंगफिशरमध्ये लावला असता तर त्यांच्यावर ही वेळ ओढविलीच नसती, हे सांगायला मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांची आवश्यकता नाही. दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत, इकडचा पैसा तिकडे कसा फिरविणार वगैरे आक्षेप असू शकतात, पण टूजीचे हजार कोटी इकडे तिकडे फिरविणाऱ्या मंडळींना हे पैसे फिरविण्याइतके अर्थज्ञान नक्कीच असू शकेल. तेव्हा मल्ल्या यांनी आधीपासूनच जर योग्य व्यवसाय केला असला तर हवाई वाहतुकीच्या धंद्यासाठी केंद्र सरकारपुढे भिकाऱ्यासारखे हात पसरण्याची वेळ आली नसती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुरेश कलमाडी यांना मर्सिडिजमधील भिकारी म्हणाले होते. त्या धर्तीवर मल्ल्या यांना विमानवाला भिकारी म्हटले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा तुम्हाला धंदा चालविता येत नसेल तर धंदा बंद करुन टाका. विमानसेवा कंपनीला टाळा लावा आणि दारुचा महापूर वाढवून कसा पैसा ओढता येईल, याच्या नव्यानव्या कल्पना शोधून काढा. पण धंदा तुमचा आणि पैसा सरकारचा (पर्यायाने लोकांचा) हा आतबट्ट्याचा व्यवहार सांगितला कोणी. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनी बेल आऊट पॅकेज देण्यास विरोध केला आहे.

आता चार हजार कोटी रुपयांचे बेल आऊट पॅकेज मिळाले तर मल्ल्या यांची चांदीच आहे. दोन-पाच वर्षांत ते पैसेही फुकून पुन्हा एकदा भिकाऱ्यासारखे सरकारपुढे हात पसरायला मोकळे. काही वर्षांपूर्वी सहारा एअरवेज ही कंपनी तोट्यात आली होती. ती नरेश गोयल यांच्या जेट कंपनीने विकत घेतली. त्याच धर्तीवर मल्ल्या यांनी त्यांची किंगफिशर कंपनी फुकून टाकावी आणि मोकळे व्हावे, म्हणजे सरकारपुढे वारंवार हात पसरण्याची वेळच ओढविणार नाही. तेव्हा मुळातच सरकारने किंगफिशरला बेल आऊट पॅकेज वगैरे देण्याच्या फंदात पडूच नये. आणि जरी अशाप्रकारे पॅकेज देण्याचा निर्णय घ्यायचा विचार सरकारने केला तरी त्याबदल्यात संपूर्ण किंगफिशर कंपनी ताब्यात घ्यावी.

मात्र, जर कंपनी आणि कामगार वाचविण्यासाठी बेलआऊट पॅकेज वगैरे जाहीर केले, तर सरकारपुढे महासंकटच उभे राहिल. भारतीयांची मानसिकता लक्षात घेता, भविष्यात आणखी काही कंपन्या स्वतःला दिवाळखोर जाहीर करुन पैसे लाटण्यासाठी नक्की पुढे येतील, यात वाद नाही. शिवाय, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पैशांची मदत करायला वर्षानुवर्षे लावणारे सरकार मद्यमहर्षी विजय मल्ल्या यांच्या कंपनीला तातडीने मदत देऊ लागले तर सरकारच्या दळभद्रीपणाचा कळसच होईल, असे म्हणावे लागेल.

समिती बसवा, चर्चा करा, आढावा घ्या, तज्ज्ञांना आढावा घेण्यास सांगा, असे न करु नका. तेव्हा मनमोहना, आता तरी तोंड उघडा आणि मल्ल्यांना स्पष्ट शब्दात नाही म्हणा. नाही तर तुम्ही तुमच्या अगम्य इंग्रजीत तोंडातल्या तोंडात नाही म्हणाल आणि मल्ल्या मात्र, सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत राहतील. तेव्हा खणखणीत नकार द्या आणि विषयाचा तुकडा पाडा.

Sunday, October 02, 2011

जळू बाई जळू, कोपऱ्यात पळू...


जळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...
सुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...
.
बँकेत, शाळेत, ऑफिसात, देवळी एकच रंग दिसावा
मटाच्या रंगामध्ये अवघा परिसर न्हाऊन निघावा
.
नवरंगच्या प्रतिसादामुळे पोटात लागले दुखू
एकच रंग पाहून लोकांचे डोळे लागले फिरु
.
मग सकाळी सकाळी कोणा आयडिया सुचे छान
म्हणे, जा बाबा जा दुसरे फोटो काढून तरी आण
.
'भगवान से भी नही लगता' अशा ठिकाणी लागला कॉल
वेगवेगळ्या रंगाच्या साड्यांनी भरुन गेला होता सारा हॉल
.
मग काय साहेब झाले भलतेच खूष
'सप्तरंगी' साड्यांचे फोटो काढले खूप खूप
.
नवरंगातल्या पैठणीपुढे 'सप्तरंगी' दिसे जनता साडी
कोत्या वृत्तीच्या मनांची दूरच होत नाही अढी
.
खुन्नस देण्यासाठीची आयडिया कशी आली अंगाशी
पुणेकरांच्या लक्षात आली असली फालतू मखलाशी
.
दास म्हणजे लोका, करु नका दुसऱ्यांची नक्कल
कल्पनांचा असेल दुष्काळ तर बदाम खा बक्कळ
.
मटाच्या नवरंगांना पुणेकरांनी आपलेसे केले
जळूबाई जळू फक्त हात चोळत बसले
.
जळू बाई जळू, फोटोंचा प्रतिसाद पाहून जळू...
सुचली नाही आयडिया म्हणून दूर दूर पळू...

Saturday, October 01, 2011

‘डबल सिक्स’ची सिक्सर

आता फक्त आयफोन...

अरे, आता तरी मोबाईल बदल. राजा केळकर संग्रहालयात ठेवण्याच्या लायकीचा अँटिक पीस झालाय तुझा डबल सिक्स डबल झिरो... हा कुठला बाबा आदमच्या काळातला मोबाईल वापरतोयस... गेल्या दोन-तीन वर्षांपासून अशा किंवा समानार्थी स्वरुपाचे संवाद अनेकदा झडतात. कशाला तो जुना पिस जपून ठेवलाय. जग कुठं चाललंय आणि तू अजूनही जुनाट मोबाईल वापरतोय. इइ.





आता हे संवाद आठवण्याचं कारण म्हणजे माझ्या ६६०० ला यंदाच्या ऑगस्टमध्ये तब्बल सहा वर्षे पूर्ण झाली. डबल सिक्स डबल झिरोनं सिक्सर मारल्यामुळं हा ब्लॉगप्रपंच. आयुष्यामध्ये ३३१५, ई टीव्हीनं दिलेला सॅमसंगचा मोबाईल आणि नोकियाचा ३११५ हे मोबाईल येऊन गेले. पण टिकला आणि मनात बसला तो ६६००च. त्यामुळं सहा वर्षे उलटली तरी माझ्या त्याच्यावर जडलेला जीव कमी व्हायला तयार नाही. कारण अनेक आठवणी आणि किस्से त्याच्याशी जोडलेले आहेत. त्यामुळं कंजूस आणि चिंगूस अशी विशेषणं मला आणि लक्सचा साबण, वीट आणि ठोकळा अशी विशेषणं मोबाईलला चिकटल्यानंतरही मी ६६००ची साथ सोडलेली नाही. अर्थात, मोबाईल सहा वर्षानंतरही एकदम टकाटक आहे. आता थोडंसं नाजूकपणे हाताळावं लागतं. पण बाकी सगळं उत्तम.


ई टीव्ही (मुंबई) सोडून पुण्यात सकाळ जॉईन केलं आणि तेव्हा नवा मोबाईल आणि नवं कार्ड घ्यावं लागलं. त्यावेळी नोकियाचा डबल सिक्स डबल झिरो हा लेटेस्ट मोबाईल बाजारात आला होता. त्यात फोटो काढणं, व्हिडिओ शूट करणं, ब्लू टूथ, इन्फ्रारेड, जीपीआरएस वगैरे अद्ययावत ऍप्लिकेशन्स असल्यामुळं घ्यायचा तर हाच हे निश्चित केलं होतं. म्हणजे आता ब्लॅकबेरीची वगैरे जी क्रेझ आहे तेव्हा ती डबल सिक्स डबल झिरोची होती. त्यामुळं घ्यायचा तर तोच हे ठरलं होतं. मार्केटमध्ये लाँच झाला तेव्हा त्याची किंमत सोळा-अठरा हजार रुपयांच्या आसपास होती. मग काही महिन्यांनी ती अकरा-बारा हजारांवर आली. ६६०० डोक्यातच बसला होता. अखेरीस मोठ्या हिंमतीनं ६६०० ची खरेदी झाली.





मी महाराष्ट्र बोलतोय... च्या दौऱ्यावर असतानाचा फोटो


साडेअकरा हजार रुपयांच्या आसपास किंमत पडली. बरं, तेव्हा ६६०० वर उड्या पडत असल्यामुळं वशिला लावून टेलिफोन शॉपीमधून मोबाईल घ्यावा लागला होता. परममित्र योगेश ब्रह्मे आणि मी दोघांनी एका महिन्याच्या अंतरानं मोबाईल घेतला. साडेअकरा हजारांचा मोबाईल ही त्यावेळी उधळपट्टी होती. (खरं तर साडेअकरा हजार ही किंमत आजही उधळपट्टी या कॅटेगरीमध्ये मोडणारीच आहे.) त्यामुळं तीर्थरुपांनी आमची अक्कलही काढली. इतका मोबाईल घ्यायची काय गरज आहे, त्याला काय सोनं लागलं आहे वगैरे वगैरे. पण हा संवाद झडेपर्यंत मोबाईल खरेदी झाली होती. त्यामुळं तीर्थरुपांचं बोलणं ऐकून घेण्यापलिकडं हातात काही नव्हतं. असो.

गेल्या सहा वर्षांमध्ये फक्त दोनच वेळा मोबाईल दुरुस्तीसाठी द्यावा लागला. व्हायरस शिरल्यामुळं चार वर्षांपूर्वी आणि दुसऱ्यांदा म्हणजे अगदी चार महिन्यांपूर्वी. बाकी मोबाईल एकदम जबरदस्त. पूर्वी ६६०० एकदम रफ अँड टफ होता. आता वयोपरत्वे (मोबाईलच्या) त्याला अधिक नाजूकपणे हाताळावं लागतं. एसएमएस टाईप करताना किंवा बटण दाबताना अगदी हलक्या हातानं करावं लागतं. इतकी वर्षे साथ दिलेल्या मोबाईलवर लिहायला हवं, असं मनात आलं म्हणून ब्लॉग लिहायला घेतला. फक्त ६६००च नाही तर नोकियाच्या इतर मोबाईलचा माझा अनुभव असाच आहे. ६६०० चं वैशिष्ट्य असं, की सहा वर्षे तो राहिला. बाकीचे मोबाईल दोन-तीन वर्षांनंतर दुसऱ्याला वापरायला दिले. अजूनही ते व्यवस्थित सुरु आहेतच. (फक्त सध्या माझ्याकडं नाहीत.) त्यामुळंच मी एकदम नोकिया लॉयल आहे.

आता ब्लॅकबेरी आणि ऍपलचे दिवस आहेत. मोबाईलवरच ई-मेल, फेसबुक, ट्विटर वगैरे पाहता येऊ शकतं. त्यामुळं गल्लीतल्या मायक्रोमॅक्सपासून ते अमेरिकेतल्या आयफोनपर्यंत सर्वांनीच या सुविधा द्यायला सुरुवात केली आहे. या सुविधाच मोबाईलचा यूएसपी ठरला आहे. अनेकदा मनात येतं, की आपणही ६६०० ऐवजी दुसरा एखादा चांगला आणि अपडेटेड व्हर्जनचा मोबाईल घ्यावा. पण अजून मन होत नाही. मध्यंतरी एका गॅलरीत आयफोन पाहिला आणि आता तो माझ्या डोक्यात गेला आहे. घ्यायचा तर आयफोनच घ्यायचा. पण त्याची किंमत डोळे फिरविणारी आहे. अशा परिस्थितीत आयफोन नाही तर कोणताच मोबाईल नाही, या निर्णयाप्रत मी आलो आहे. नोकियानं आयफोनची कॉपी करुन जर एखादा कमी किंमतीचा फोन काढला तर तो घेण्याचा पर्यायही पुढे येऊ शकतो. पण मार्केट डाऊन झालेली नोकिया कंपनी असं काही करेल, असं वाटत नाही. तेव्हा आयफोन परवडेपर्यंत मायफोन एकदम उत्तम.