Monday, September 09, 2013

बाप्पा आम्हाला माफ कर...

विघ्यहर्त्याच्या रक्षणास काळी बाहुली?



दुष्प्रवृत्तींचा नायनाट करणाऱ्या आणि असुरांचे मर्दन करणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे सोमवारी थाटामाटात आगमन झाले. आपल्यावर आलेल्या सर्व संकटांचे निर्दालन करण्यासाठी आपण अखेर बाप्पाकडेच धाव घेतो. त्यामुळेच गणरायाच्या आरतीमध्येही ‘संकटी पावावे निर्वाणी रक्षावे...’ असा उल्लेख आढळतो. थोडक्यात म्हणजे तमाम भक्तांची काळजी एकट्याने वाहणारा सर्वशक्तिमान श्री गणराय स्वतःचे संरक्षण करण्यास समर्थ आहे, असे मानण्यास कोणाचाही आक्षेप नसावा.

तरीही अनेक गणेश मंडळाचे कार्यकर्ते बाप्पाच्या मूर्तीला नजर लागू नये म्हणून त्याच्या हातामध्ये कसले कसले धागे बांधतात. काळे गंडेदोरे बांधतात. पुण्यातील मानाचा चौथा गणपती असलेल्या तुळशीबाग गणपतीच्या हाताला बांधलेली काळी बाहुली हा अशाच भंपक प्रथेतील एक प्रकार म्हटला पाहिजे. मुळात गणराय इतरांचे रक्षण करतो, अशी जर आपल्या सर्वांची श्रद्धा असेल तर त्याचे रक्षण करण्यासाठी किंवा त्याला नजर लागू नये म्हणून (मुळात नजर लागते का, हा प्रश्न आहेच) असल्या बाहुल्या-बिहुल्या बांधण्याची आवश्यकता काय? आणि जर स्वतःचे रक्षण करण्यास ‘श्री’ समर्थ नाहीत, असा आपला समज असल्यास मग बोलणेच खुंटले. त्यामुळे असले गंडेदोरे बांधून किंवा काळ्या बाहुल्या लटकावून काहीही होत नाही, हे कार्यकर्त्यांना आणि मंडळांना कधी समजणार. पुण्यातील मानाचे मंडळही या अंधश्रद्धेतून सुटले नाही, हे पाहून खंत वाटली. म्हणून हा ब्लॉगप्रपंच...

अंधश्रद्धा मानणाऱ्या अशा अनेक मंडळांप्रमाणेच पुण्यात अंधश्रद्धा पसरविणारेही असेच एक मंडळ आहे. ‘नवसाला पावणारा, नवसाला पावणारा’ अशी जाहिरातबाजी करून हे मंडळ आपल्या तुंबड्या भरते. मुळात अशी जाहिरातबाजी करण्याचे कारण नाही. उद्या मला पंतप्रधान कर रे महाराजा, असा नवस मी किंवा तुमच्यापैकी कोणीही बोललं तर तो आयुष्यात पूर्ण होणार आहे का? उगाच काहीतरी जाहिरातबाजी करतात. त्यामुळे नवसाला पावणारा गणपती हा जितका भोंदूपणा आहे, तितकाच भोंदूपणा म्हणजे गणपतीच्या हातात काळी बाहुली बांधणे हा आहे. आपण जितक्या लवकर आपण हे सत्य स्वीकारू तितके आपल्याच फायद्याचे आहे.


अन्यथा काही दिवसांनी उत्सवादरम्यान गणपती मंडपाच्या शेजारी काहीसे असे बोर्ड लावलेले दिसतील. ‘आमच्या मंडळामध्ये दररोज रात्री आठ ते नऊ या वेळेत दृष्ट काढली जाईल’, ‘येथे दृष्ट काढून मिळेल’, ‘आमच्याकडे नजर सुरक्षा कवच म्हणून वापरता येईल अशी मंतरलेली लिंबू-मिरची मिळेल’, ‘आमच्या काळ्या बाहुल्या घ्या आणि बिनधास्त रहा’ वगैरे वगैरे. अशी जाहिरातबाजी दिसू नये, अशी आपला इच्छा आहे. त्यामुळेच गणरायाच्या हातात काळे गंडे, दोरे आणि असल्या बाहुल्या न बांधण्यापासून आपण याची सुरुवात करायला हरकत नाही. पहा पटतंय का ते...