Wednesday, May 09, 2012

हृदयस्पर्शी काकस्पर्श




सुंदर कथा, हृदयस्पर्शी संवाद, उत्तम अभिनय, कथेला साजेशी आणि तेव्हाच्या परिस्थितीला अनुरूप वातावरण निर्मिती, कोकणातील पारंपरिक वाटेल इतके चपखल संगीत आणि निसरड्या वाटेवरील गंभीर विषय असूनही कुठेही न ओलांडलेली सीमारेषा... अशा सर्वच जमेच्या बाजू असल्यामुळे महेश वामन मांजरेकर यांचा ‘काकस्पर्श’ हा चित्रपट प्रत्येकानं आवर्जून पहावा, असाच आहे. अगदी सुरूवातीपासूनच शेवटपर्यंत चित्रपट मनाचा ठाव घेतो.

कोकणातील एका ब्राह्मण कुटुंबातील साधारण 1930 ते 1950 च्या सुमारास घडणारी ही कथा आहे. अत्यंत बोल्ड विषय उत्तम पद्धतीने हाताळल्यामुळे कथेचे गांभीर्य अधिकच वाढल्यासारखे वाटते. आपल्या धाकट्या भावाच्या निधनानंतर तिच्या पत्नीवर जडलेल्या अव्यक्त प्रेमाची ही कथा आहे. पण त्याला कुठेही वासनेचा किंवा शारिरीक संबंध किंवा स्पर्शाचा लवलेशही नाही.

हरी (सचिन खेडेकर) नावाची एक व्यक्ती आणि तिच्या कुटुंबाभोवती चित्रपटाची कथा फिरते. हरीच्या लहान भावाचे म्हणजेच महादेवाचे (अभिजीत केळकर) लग्न उमा म्हणजेच केतकी माटेगांवकरशी निश्चित होते. उमाला पहायला गेल्यानंतर सारा कार्यक्रम आटोपतो. त्यात महादेव गप्पच असतो. हरीच उमाला दोन-चार प्रश्न विचारतो. त्यामुळे रूबाबदार हरी हाच आपला भावी नवरा आहे, असाच उमाचा गैरसमज होतो. चित्रपटातील पुढील कथानकाची हीच नांदी ठरते.

लग्नानंतर काही महिन्यांतच महादेवचे निधन होते. उमा वयात आलेली नसल्यामुळे म्हणजेच फणस पिकलेला नसल्यामुळे महादेव आणि उमा यांचे लग्नानंतर मीलन न होताच तो मुंबईला जातो. त्यानंतर एकदिवस उमाचे नहाणं येते. त्यामुळं तिचा फलशोधनाचा कार्यक्रम निश्चित होतो. त्या कार्यक्रमानंतर दोघांमधील अंतर संपुष्टात येणार, अशी पद्धत. पण फलशोधन कार्यक्रमाच्या दिवशीच महादेवाची प्रकृती प्रचंड खालावते आणि त्या रात्रीच म्हणजे पहिल्या रात्रीच तो जातो. त्यामुळे फलशोधनाचा अर्थ म्हणजे नक्की काय, त्या रात्री काय होते, याबाबत काहीच कल्पना उमाला येत नाही. कुठेही उथळपणा किंवा सवंगपणा न दाखविता सर्व प्रसंगांचे दाखविलेले आहेत.

त्यानंतर मग उमाचे केशवपन (सोवळी करणे) इइ सर्व प्रथा परंपरा मागे लागतात. पण प्रत्येकवेळी हरी उमाला त्यापासून वाचवितो. हरीची पत्नी तारा आजारी पडली असताना घराची जबाबदारी उमाच हाताळत असते. हरीच्या दोन्ही मुलांचे संगोपन आणि घराची जबाबदारी ती लिलया हाताळते. हरी आणि उमा हे परस्परांना खूप आवडतात, हे ताराला समजलेले असते. त्यांच्यातील संबंध कोणत्या स्तरापर्यंत पोहोचलेले आहेत, याची शहानिशा करण्यासाठी अवघडलेली तारा बिछान्यावरून बाहेर येते आणि चक्कर येऊन पडते. त्यातून ती बरी होतच नाही आणि मृत्युला कवटाळते. तेव्हा ती हरी आणि उमा यांनी लग्न करावे, असा प्रस्ताव हरीसमोर ठेवते. मात्र, हरी तसे काहीच नसल्याचे सांगून त्याला स्पष्ट शब्दात नकार देतो. त्यानंतर त्या दोघांमधील अव्यक्त, अस्पर्शित आणि विलक्षण अशी प्रेम कहाणी पुढे सरकते. ती कशी ते वाचण्यापेक्षा पडद्यावर थेट पाहण्यातच खरी गंमत आहे.

देवाच्या उत्सवाला खऱ्या रेड्याऐवजी पिठापासून तयार केलेल्या रेड्याचा बळी देण्याचा विचार हरी समर्थपणे मांडतो. तो सुधारक विचारांचा असतो. पण तोच हरी आपला लहान भाऊ आणि पत्नी गंभीर झाल्यानंतर देव पाण्यात ठेवून त्यावर अभिषेक करायला सुरूवात करतो. माणूस कितीही सुधारक असला तरी अनेकदा त्याला देवाचाच आधार असतो, ही परिस्थिती चित्रपटातून अत्यंत उत्तमप्रकारे उलगडली आहे.

फलशोधनाचा कार्यक्रम काय असतो, मला त्याची गंमत कधी कळलीच नाही गं, ऐन तारूण्यामध्ये किती वर्ष दिवसातून दोन दोन – तीन तीन वेळा गार पाण्याने आंघोळ करायची. मीच काय केलंय, माझा काय दोष हा उमाच्या (प्रिया बापट) तोंडचा संवाद तेव्हाच्या बालविधवांच्या किंवा तारूण्यात वैधव्य आलेल्या तरुणींची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी पुरेसा बोलका आणि प्रभावी आहे. अक्षरशः तो संवाद आणि प्रसंग पाहून अंगावर काटा आल्यावाचून रहात नाही.



चित्रपटातील अनेक संवाद खूपच बोल्ड स्वरुपाचे आहेत. पण तरीही मर्यादा न ओलांडल्यामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा गल्लाभरू आणि छछोर चित्रपटांच्या यादीतच त्याचे नाव समाविष्ट झाले असते. पण सर्व सीमा सांभाळण्यात मांजरेकर आणि त्यांची टीम यशस्वी झाली आहे. खऱ्या अर्थाने बोल्ड आणि वेगळ्या विषयावरील उत्तम चित्रपट निर्माण केल्याबद्दल महेश वामन मांजरेकर आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन.

ता. क. – चित्रपटातील जन्म बाईचा गं बाईचा खूप घाईचा हे गीत फारच छान लिहिलेले आहे. आणि चित्रिकरणही छान झाले आहे.

दुसरे म्हणजे महादेवाचे आजारपण, ताराचे तारापण आणि अखेरीस उमाचे आजारपण या साधारण पंधरा वीस वर्षांच्या किंवा त्यापेक्षाही अधिक कालावधीत अनेक कलाकार लहानाचे मोठे होतात. मोठ्येच वृद्ध होतात. पण गावातील वैद्यबुवा मात्र, आहे तसेच दाखविलेले आहेत. वैद्यबुवा इतकी वर्षे स्वतःची प्रकृती कशी काय बुवा तशीच ठेवतात, हे आम्हाला न उलगडलेले कोडे आहे. कदाचित वैद्य असल्यामुळेच त्यांनी स्वतःचे आरोग्य जपले असावे. पण न थकलेले वैद्यबुवा आम्हाला खटकले. बाकी सर्व उत्तम.

जन्म बाईचा बाईचा, खूप घाईचा... गाण्याची लिंक
http://www.youtube.com/watch?v=818YYByaDtA&noredirect=1

Sunday, May 06, 2012

धन्य धन्य हो प्रदक्षिणा पल्लिनाथाची...



भर उन्हाळ्यात कोकणात जायच्या नुसत्या विचारानं घामाघूम व्हायला होतं. घामाच्या धारा वहायला लागतात. पण तरीही उन्हाळ्यामध्ये कोकणात आमची वारी ठरलेलीच असते. मला जरी जायला नाही मिळालं, तरी आमच्या घरची मंडळी हमखास कोकण गाठतातच. निमित्त असते, हनुमान जयंतीला होणाऱ्या आमच्या गावच्या उत्सवाचे. म्हणजेच पालीच्या लक्ष्मीपल्लीनाथाच्या उत्सवाचे.

लक्ष्मी पल्लीनाथ हे रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाली या गावचे ग्रामदैवत. मुंबई-गोवा महामार्गावर कोल्हापूरकडे जाणारा फाटा जिथे फुटते, तिथेच पाली हे गाव आहे. पुण्यापासून साधारण दोनशे किलोमीटर अंतरावर. रत्नागिरीपासून 22 किलोमीटरवर. दरवर्षी चैत्र शुद्ध एकादशी ते चैत्र पौर्णिमा (हनुमान जयंती) या कालावधीत श्री लक्ष्मी पल्लीनाथाचा उत्सव मोठ्या उत्साहात पण अगदी साधेपणाने साजरा होतो. भपका कमी असल्यामुळेच तो तो अधिक भावतो.

काही कऱ्हाडे ब्राह्मण मंडळींचे श्री लक्ष्मी पल्लीनाथ हे कुलदैवत आहे. त्यामुळे कऱ्हाडे मंडळींपैकीच एखाद्या कुटुंबाने किंवा दोन-चार कुटुंबे एकत्र येऊन उत्सव साजरा करण्याची जबाबदारी घेतात. म्हणजे उत्सवादरम्यान घ्यावयाचे कार्यक्रम, भोजन आणि इतर व्यवस्था, मनुष्यबळ आणि आर्थिक गणितं, या सर्व गोष्टींची जबाबदारी संबंधित मंडळींना पार पाडावी लागते. मंदिर व्यवस्थापनानं भक्तांच्या सोयीसाठी राहण्याची व्यवस्था केलेली आहे. सात-आठ खोल्या बांधलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या भक्तांची तिथं व्यवस्था होते. तिथं नाहीच झाली तर मग मंदिराच्या आजूबाजूलाच राहणाऱ्या गुरव मंडळींच्या घरी राहता येते. तीही व्यवस्था नाही झाली तर मग नेहमी येणारी मंडळी ओळखी पाळखीतूनच पाली गावातली घरं गाठतात. जसं आम्ही यंदाच्या वर्षी विलास चांदोरकर या आमच्या नात्यानं खूप खूप खूप खूप लांबच्या पण चांगल्या ओळखीच्या घरी राहिलो होतो.

उत्सवातील सकाळचा जरा जास्तच धार्मिक स्वरूपाचा असतो. अभिषेक, रुद्र, पूजा, आरती आणि मग महाप्रसाद असा कार्यक्रम असतो. त्यामुळे सकाळच्या आरतीला आणि भंडाऱ्याला येणाऱ्या मंडळींची संख्या अधिक. जेवणाला फार मोठा मेन्यू नसतो. साधा भात आणि आमटी, तोंडी लावायला मिक्स भाजी किंवा उसळ आणि ताक. मसाले भात असेल तर कढी आणि जिरा राईस असेल तर टोमॅटोचं सूप. मिक्स भाजी आणि उसळ कायम. सकाळ आणि संध्याकाळी बहुतेक वेळी यापैकीच काहीतरी मेन्यू असतो. शेवटच्या दिवशी मात्र, साग्रसंगीत पान असतं. पुऱ्या-कुर्मा भाजी, उसळ, भात, आमटी, ताक आणि शिरा, जिलेबी किंवा गुलाबजाम यापैकी एखादा गोडपदार्थ. अर्थात, एकदम साधं असलं तरी त्या जेवणाचा स्वाद काही औरच असतो. महाप्रसाद घेतल्यानंतर येणारी तृप्तता अवर्णनीयच म्हटली पाहिजे.


असो. पण या उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते, ते संध्याकाळी होणारी आरती आणि रात्रीचा प्रदक्षिणा तसेच भोवत्यांचा कार्यक्रम. गणपती, शंकर, देवी, हनुमान, दत्त, पांडुरंग यांच्यासह आणखी तीन-चार देवांच्या आरत्या तुम्हाला येत असतील ती त्याचा फारसा उपयोग होत नाही. म्हणजे संध्याकाळी जेव्हा आरत्या सुरू होतात, त्यावेळी भलत्याच देवांच्या आणि भलत्याच वेगळ्या आरत्या म्हटल्या जातात. म्हटल्या म्हणण्यापेक्षा गायल्या जातात, असं म्हणणं जास्त योग्य. गणपती, देवी, शंकर, सूर्यनारायण, महालक्ष्मी, पल्लीनाथ, लक्ष्मी रमणा, त्रिभुवन सुंदर दशावतार, श्रीकृष्ण आणि अशा अनेक. तबला, पेटी आणि टाळ यांच्या संयोगातून निर्माण झालेला विलक्षण आवाज आणि सोबतीला पाच-पन्नास जणांच्या स्पष्ट पण उच्च रवातील आरती. मन अगदी प्रसन्न होऊन जातं. कानाची भूक कधी भागते कळतंही नाही.


बरं, कोकणाचं वैशिष्ट्य म्हणजे तबला, पेटी आणि टाळ वाजविण्यात जवळपास प्रत्येक जण अगदी माहीर. आपण पानावर जितक्या सहजतेनं बसतो, तितक्या सहजतेनं ही मंडळी पेटी किंवा तबला वाजवायला बसतात. बरं, नुसतं पेटी वाजवली असं नाही. काळी एक, काळी दोन वगैरेची चर्चाही तिथं रंगते. मग कुठला सूर कुठे कसा कमी पडला किंवा जास्त झाला, याच्या खाणाखुणाही होत असतात. टाळ कुटणे हा वाक्प्रचार कसा पडला असेल, याचे उत्तर आपल्याला या आरतीच्या वेळी मिळतं. ही मंडळी इतक्या खुबीनं आणि इतकं मन लावून टाळ वाजवितात, की धन्य व्हायला होतं. टाळ नावाचं छोटेखानी वाद्य हे ताल, लय आणि आवाज यासाठी इतकं आकर्षक असू शकतं, हे फक्त कोकणातल्या त्या आरत्यांच्या वेळीच कळतं.

आरत्या झाल्या, की मग रात्रीचं जेवण, त्यानंतर एखाद्या बुवांचं भजन किंवा कीर्तन आणि मग प्रदक्षिणा अन् भोवत्या. प्रदक्षिण म्हणजे छबिना. देवाचा मुखवटा सजविलेल्या पालखीत ठेवण्यात येतो आणि मग मंदिराच्या प्रवेशव्दाराच्या समोरून प्रदक्षिणा सुरू होते.

‘’धाव रे गणराया, पाव रे गणराया, मंगलमूर्ती तू मोरया, मूर्ती तू मोरया’’ या पारंपरिक गीतानं प्रदक्षिणेची सुरूवात होते. सोबतीला टाळ आणि टिमकी असतातच. भजन, भक्तिगीत, देवादिकांवरील गाणी वगैरे यावेळी म्हटली जातात. एक जण पहिल्यांदा सांगतो आणि मग बाकीचे लोक त्यामागून म्हणतात, अशी पद्धत. ही प्रदक्षिणा चार भागांमध्ये होते. मंदिरासमोरून ते डाव्या हाताच्या मध्यापर्यंत. तिथून मंदिराच्या मागेपर्यंत. मागपासून ते उजव्या भागाच्या मध्यापर्यंत आणि मग तिथून मंदिराच्या समोरपर्यंत. एका प्रदक्षिणेत चार भजनं किंवा देवाची गाणी होतात. जेव्हा पालखी चारवेळा थांबते तेव्हा आपण नेहमी म्हणतो त्या देवांच्या आरत्या म्हटल्या जातात. प्रत्येकवेळी थांबल्यावर एक कडवं म्हटलं जातं. म्हणजे देवळाच्या डावीकडे थांबल्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता, देवाच्या पाठिमागे थांबल्यानंतर रत्नखचितफरा तुज गौरीकुमरा आणि उजवीकडे थांबल्यानंतर लंबोदर पितांबर फणिवर वंदना... प्रत्येक आरतीच्या वेळी अशीच पद्धत.




एक प्रदक्षिण पूर्ण झाल्यानंतर मग भोवत्या होतात. एका रात्रीत पाच प्रदक्षिणा आणि पाच भोवत्या होतात. भोवत्या म्हणजे देवळासमोरच्या मोकळ्या जागेत भक्तगण गोल रिंगण करून तालबद्ध फेर धरतात. एखादं भजन किंवा एखादं गाणं किंवा एखाद्या मंत्रावर भोवत्यांसाठी ताल धरला जातो. म्हणजे ओम गं गणपतये नमो नमः श्री सिद्धीविनायक नमो नमः, या मंत्रावर सुद्धा भोवत्या पार पडतात. यावेळी वेगवेगळ्या पदन्यासांद्वारे नृत्याचा फेर धरला जातो. लोकांच्या उत्साहानुसार वीस-पंचवीस मिनिटं प्रत्येक भोवतीचा खेळ चालतो. नृत्याचा वेगही मग कमी जास्त केला जातो. सुरुवातीला हळूहळू नंतर वेगाने आणि नंतर पुन्हा हळूहळू अशा क्रमाने भोवत्यांचा फेर धरला जातो. पंधरा वीस मिनिटं मजबूत घाम निघाल्यानंतर मंडळी पुन्हा ताज्या दमानं नव्या प्रदक्षिणेसाठी तयार. हा प्रदक्षिणा आणि भोवत्यांचा हा खेळ पहाटे अडीच-तीनपर्यंत चालतो. ‘’धन्य हो प्रदक्षिणा पल्लीनाथाची...’’ हे प्रदक्षिणेत म्हटलं जाणारं शेवटचं भजन. त्यानंतर मग पल्लिनाथाची आरती आणि त्यानंतर मंडळी घरी जातात.

शेवटच्या दिवशी प्रदक्षिणा आणि भोवत्यानंतर मग लळिताचं किर्तन चालतं. ते पहाटे पाच साडेपाचपर्यंत चालतं. अगदी लहानथोरांपासून मंडळी या सर्व उपक्रमांमध्ये मोठ्या उत्साहानं सहभागी होतात. सर्व कार्यक्रमांमध्ये रवी भाट्ये यांची उपस्थिती उत्साहवर्धक असते. प्रचंड पाठांतर, तबला, पेटीची इतकी जाण, भजनाला लागणारा आवाज या सर्व गोष्टी त्यांच्याकडे आहेत. त्यामुळंच उत्सवाचं नियोजन कोणाकडेही असलं तरी सर्व उत्सवाचे कर्ते धर्ते तेच असतात. आरत्या, प्रदक्षिणा किंवा भोवत्या यापैकी कोणतीही गोष्ट त्यांच्याविना अगदी अपूर्ण वाटते.


उत्सवाचं हेच आकर्षण प्रत्येकाला दरवर्षी तिथं खेचून आणतं. अगदी अवघड असेल तरी एखाद्या दिवशी उत्सवाला हजेरी लावून जाण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. कोकणातल्या प्रत्येक गावातच असे उत्सव साजरे होत असतील, त्यामुळं त्या मंडळींना या उत्सवाचं फारसं अप्रूप नसणार. पण जन्मापासून आतापर्यंत घाटावरच किंवा मुंबईत राहिलेल्या माझ्यासारख्या अनेक जणांना हा उत्सव म्हणजे पर्वणीच वाटतो.