Wednesday, August 21, 2019

आईच्या मायेनं काम करणाऱ्या राजकारणी...




विजयाताई रहाटकर यांचा आज वाढदिवस… औरंगाबादच्या माजी महापौर. भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष अशी दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या भाजपाच्या महिला नेत्या. विजयाताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… भविष्यात त्यांना अधिकाधिक जबाबदाऱ्या मिळत राहो आणि त्या यशस्वीपणे पार पाडण्याची ताकद ईश्वर त्यांना देवो, याच अगदी मनःपूर्वक शुभेच्छा… 

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने महिलांसाठी राबवविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी विजयाताई महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून देशभर दौरे करीत असतात. आज केरळमध्ये तर उद्या पंजाबमध्ये. परवा गुजरातमधील एखाद्या शहरात तर चौथ्या दिवशी ईशान्य भारतात… राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये महिलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित करत असतात… कधी कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरोधात आवाज उठविण्यासंदर्भातील कार्यशाळा तर कधी बचत गटांच्या महिलांचे मेळावे अर्थात, प्रज्वलांचे प्रशिक्षण… कधी महिलांविषयीच्या कायद्यांच्या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन, कधी सरोगसी संदर्भातील कार्यशाळा, तर कधी महिला मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडत असताना राज्यात आणि देशात अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कानाकोपऱ्यांत फिरून सरकारच्या योजना नि निर्णयांची माहिती पोहोचविण्याचे काम विजयाताई आणि त्यांची टीम प्रभावीपणे करीत आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या बाजूने आणि नरेंद्र मोदींसाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात मतदान केलं. त्यामध्ये खूप मोठा वाटा भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचा आणि अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांचा निश्चित आहे. 


पण ही झाली विजयाताईंची राजकीय ओळख… मॅन ऑन मिशन महाराष्ट्र पुस्तकाच्या निमित्ताने विजयाताईंचे एक वेगळे रुप पहायला मिळाले. जे राजकारण्यापलिकडचे होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजकीय कारकिर्द तसेच राज्य सरकारच्या यशोगाथा पुस्तकबद्ध करण्याचा विचार जेव्हा पुढे आला तेव्हापासून माझा आणि विजयाताईंचा परिचय वाढला… राजकारणापलिकडे असलेलं हे व्यक्तिमत्व खूप छान पद्धतीने अनुभवयाला मिळालं.


मॅन ऑन मिशन महाराष्ट्रच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग असला, तरीही त्यांनी हे पुस्तक लिहिताना त्यांनी संपूर्ण लेखन स्वातंत्र्य मला दिले होते, हे मी या निमित्ताने आवर्जून सांगेन. एखादी गोष्ट पुस्तकात घ्यायलाच हवी किंवा हा विषय पुस्तकात तुम्ही घेतला आहे, ती वगळाच असे त्या एकदाही म्हटल्या नाहीत. वास्तविक पाहता, राजकारणी व्यक्ती ही बहुतांश वेळा मनमानी पद्धतीनेच वागत असते. आपण म्हणू ती पूर्व दिशा अशी तिची वृत्ती असते. मात्र, विजयाताईंनी पुस्तक लिहिताना अशा पद्धतीने सक्ती किंवा जबरदस्ती कधीच केली नाही. त्यांनी लेखक म्हणून मला पूर्ण स्वातंत्र्य दिले आणि ते शेवटपर्यंत जपले. मी लिहिलेल्या पुस्तकात एका शब्दानेही त्यांनी फेरफार केली नाही. किंवा कोणामार्फत करायलाही लावली नाही. मला वाटतं हे विजयाताईंचं मोठेपण आहे. एक राजकारणी म्हणूनही आणि व्यक्ती म्हणूनही.

पुस्तकाच्या निमित्ताने महाराष्ट्रात विविध शहरांमध्ये फिरत असताना त्या अत्यंत आस्थेने आणि काळजीने विचारपूस करायच्या. एखाद्या शहरात पोहोचल्यानंतर किंवा राज्यात फिरत असताना तुम्हाला कुठे काही त्रास नाही ना, फिरताना अडचणी येत नाहीत ना, अशी विचारपूस त्या कायम करायच्या. शक्यतो रात्रीचा प्रवास करू नका, वेळेवर जेवत जा, स्वतःची काळजी घ्या, अशी आईच्या मायेने काळजीही घ्यायच्या. हल्लीच्या व्यावसायिक जगामध्ये अशा पद्धतीने मायेने दुसऱ्याची काळजी घेणारी राजकारणी व्यक्ती अगदी विरळच म्हटली पाहिजे. 


पुस्तकाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये पोहोचलो तेव्हा त्या देशभरात कुठेतरी दौऱ्यावर होत्या. साधारण संध्याकाळच्या सुमारास मी औरंगाबादला पोहोचलो. तेव्हा त्यांचा मला फोन आला. पोहोचलात का औरंगाबादला... मी म्हटलं हो अगदी पोहोचलो आणि आता जेवायलाच चाललो आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, की आज मी नेमकी औरंगाबादच्या बाहेर आहे. मी जर तिथे असते तर तुम्हाला घरीच जेवायला बोलाविले असते... काही अडचण आली, तर नक्की सांगा. औरंगाबादमध्ये तुम्ही आमचे पाहुणे आहात वगैरे... स्वतः मागे इतके व्याप असतानाही मी औरंगाबादला पोहोचल्यानंतर त्यांनी आठवणीनं माझी विचारपूस केली, ही देखील गोष्ट माझ्यासाठी धक्कादायक होती.

मुंबईत किंवा अगदी आताही औरंगाबादमध्ये गेल्यानंतर जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी जाणे झाले, तेव्हा त्यांनी अगदी आस्थेने पाहुणचार केला. आपण राजकारणी आहोत किंवा देश पातळीवरील कोणीतरी मोठी व्यक्ती आहोत, नेता आहोत ही सर्व कवचकुंडले बाजूला ठेवून त्या वावरतात. चहापाण्यापासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींची आस्थेवाईकपणे चौकशी करतात. नाश्त्याची वेळ असेल, तर नाश्ता किंवा जेवणाची वेळ असेल तर जेवण करूनच पाठवितात. जेव्हा जेव्हा त्या भेटतात, तेव्हा प्रत्येक वेळी काळजी घेणाऱ्या आईच्या मनाचं दर्शन त्यांच्या ठायी घडतं. मला वाटतं एक राजकारणी म्हणून त्या नक्कीच मोठ्या आहेत. पण मायेनं काळजी घेणारं त्यांचं आईचं रुप मला अधिक भावतं. 


मुंबईमध्ये मॅन ऑन मिशन महाराष्ट्रच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी देखील त्यांच्या दिलदारपणाचं दर्शन मला झालं आणि त्यामुळं आयुष्यभरासाठी पुरेल, असा अनुभव मिळाला. पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात मला बोलण्याची, माझं मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली ती केवळ त्यांच्यामुळेच. आशिष हा महाराष्ट्रात सर्वत्र फिरून आला आहे आणि त्यानंतर त्यानं पुस्तक लिहिलं आहे. त्यामुळं त्याला त्याचं मत मांडायची संधी मिळाली पाहिजे, यावर त्या अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत ठाम राहिल्या. त्यांच्यामुळेच मला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि इतर कॅबिनेट मंत्र्यांसमोर पाच-आठ मिनिटं बोलण्याची संधी मिळाली, हे आवर्जून नमूद केलं पाहिजे. 

अगदी परवा ‘Academics 4 Devedndra’ च्या थिंकर्स मीटसाठी औरंगाबादला गेलो तेव्हाही नेहमीसारखाच अनुभव आला. कार्यक्रम संपून नंतर गप्पाटप्पा आणि जेवण वगैरे व्हायला साधारण अकरा वाजले होते. सकाळी लवकर उठून आम्ही ड्राइव्ह करीत औरंगाबादला पोहोचलो होतो. त्यानंतर कार्यक्रमाची गडबड. त्यामुळं फारशी विश्रांती झाली नव्हती. ही सर्व पार्श्वभूमी त्यांना माहिती होती. त्यामुळं आज आता रात्री तुम्ही पुण्यासाठी निघू नका. इथेच औरंगाबादला रहा आणि सकाळी लवकर उठून निघा म्हणजे लवकर पोहोचाल. नात्यामध्ये किंवा दोस्तीत अशा पद्धतीनं काळजी करणारी माणसं नक्की असतात. पण एखादा राजकारणी जर इतकी काळजी करीत असेल, तर तो नक्कीच इतरांपेक्षा वेगळा आहे, असं मला वाटतं. 


मोठ्या पदांवर पोहोचूनही अत्यंत जमिनीवर असलेल्या नेत्या म्हणजे विजयाताई असं मला वाटतं. मी आतापर्यंत जितक्या वेळा त्यांना भेटलो आहे, तितक्या वेळा मला हेच जाणवलं आहे. कायम स्वतः पुढे पुढे न करणाऱ्या आणि ज्याचं श्रेय त्याला देणाऱ्या अशा वेगळ्या प्रकारच्या राजकारणी आहेत. त्या आपल्या बरोबर असलेल्या प्रत्येकाची काळजी करणाऱ्या आहेत. त्यामुळेच राज्यातील प्रत्येक महिलेला राज्य महिला आयोग हा आपल्या माहेरासारखा वाटला पाहिजे, असं त्या कायम म्हणतात. राजकारणात असूनही आईची ममता शाबूत ठेवणाऱ्या व्यक्तीलाच हे सुचू शकतं नि तीच व्यक्ती अशा पद्धतीनं विचार करू शकते.

विजयाताई, आपण अत्यंत अविश्रांतपणे पक्षासाठी आणि महिला आयोगासाठी झटत आहात. त्यामुळेच राज्य महिला आयोग आणि भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या प्रमुखपदी आपली सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. झपाटून काम करण्याचेच हे फळ आहे. भविष्यातही तुम्हाला मोठ्या जबाबदारी पार पाडण्याची संधी मिळो आणि त्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडण्याची ताकद आपल्याला मिळो, हीच ईश्वर चरणी प्रार्थना...