Tuesday, November 29, 2011

श्री गुरुदेव दत्त संतप्त...


दत्त दत्त दत्ताची गाय, गायीचं दूध... या गाण्यामुळे आधीच चर्चेत आलेला देऊळ नावाचा चित्रपट काही दिवसांपूर्वी पाहिला। एका चांगल्या आणि जळजळीत विषयाला तोंड फोडल्याबद्दल कुलकर्णी बंधूंचे सर्वप्रथम अभिनंदन.

मध्यंतरी शिर्डीला गेलो होतो. शिर्डीचा जो बाजार झालाय तो पाहून भाव, भक्ती किंवा श्रद्धा या गोष्टी शे-पाचशे रुपयांना अगदी सहज मिळू शकतात, हे जाणवलं. शिर्डीचे साईबाबा काय, तिरुपतीचा बालाजी काय, प्रभादेवीचा सिद्धीविनायक काय, आणि कुठले कुठले देव काय. सगळेच भक्तीचे भुकेले. पण त्या मंदिरांच्या ट्रस्टचे काम पाहणारी मंडळी मात्र, वेगळ्याच भावाचे भुकेले असतात. त्यामुळेच काही हजार रुपये मोजले, की तातडीचे दर्शन. थोडे कमी पैसे दिले, की आणखी जास्त वेळ. अशा गुणोत्तराने दर्शनाची वेळ वाढत जाते. अगदी सर्वसामान्य म्हणून जो भक्त असतो, तो तासन्तास दर्शनाच्या रांगेत उभा आणि पैसेवाली मंडळी दोन मिनिटांच दर्शन घेऊन मोकळे. चहापासून ते राहण्यापर्यंत सर्वच गोष्टी दामदुपटीने विकून भक्तगणांना चक्क लुटणारी मंडळी आणि भक्तीचा मांडलेला बाजार. डोकं उठतं. त्यावर कोणी ना कोणी तरी आसूड ओढणे गरजेचेच होते. ते काम कुलकर्णी द्वयांनी केले. त्याबद्दल मनापासून अभिनंदन.

चित्रपटाचे संवाद एक नंबर आहेत. त्याबद्दल गिरीश कुलकर्णी यांना शंभरपैकी दोनशे मार्क दिले पाहिजेत. चित्रपटातील संवादामुळेच तो पाहणेबल झाला आहे. अन्यथा प्रेक्षकांवर किती अत्याचार झाले असते त्याचा विचारच करता येत नाही. काही ठिकाणी पातळी सोडल्याचे जाणवते. उदा. ठासली जाणे, गोट्या कपाळात जाणे इइ. पण इतके चालणारच.

पण चित्रपटाबद्दल सर्वाधिक महत्त्वाचा आक्षेप म्हणजे निवडण्यात आलेला देव। देवाची निवड चुकलीच म्हणायची. कारण गुरुदेव दत्त हा देव अजूनही बाजारापासून दूर आहे. नरसोबाची वाडी, गाणगापूर, गोंदवलेकर महाराज, स्वामी समर्थ, नवनाथ किंवा शेगांवचे गजानन महाराज या सर्वांचा बाजार मांडलेला नाही. खरीखुरी भक्ती तिथं अजूनही टिकून आहे. शिर्डीला जा आणि एकदा शेगांवला जा. दोन्हीमधला फरक वर्णन न करता येण्याजोगा आहे. शिवाय दत्त या देवाची ख्याती वेगळी असल्यानं त्याच्या वाटेला शक्य तो कोणी जात नाही. गुरुचरित्र वाचायलाही काही नियमावली असते. ती पूर्ण केली नाही तर गुरुचरित्राचे फायदे मिळत नाहीत. असा हा कडक देव. त्यामुळं दत्ताचा बाजार मांडण्याचे धाडस अजूनही कोणी केलेले नाही. खरा बाजार झालाय तो फकीर म्हणून आयुष्य काढलेल्या साईबाबांचा. महागड्या बालाजीचा आणि सिद्धीविनायकाचा.

वरीलपैकी कोणत्या तरी एकाही देवाविरुद्ध चित्रपट काढला असता तर तो थिएटर आणि मल्टिप्लेक्समध्ये चढण्यापूर्वीच त्याचा बाजार उठला असता. म्हणूनच, की काय कुलकर्णी द्वयांनी दत्त या साध्या भोळ्या आणि शांत देवाचा बाजार मांडून चूकच केली. किंवा त्यांच्यात खराखुरा बाजार झालेल्या देवांची कथा खरं तर व्यथा मांडण्याची हिंमत नसावी, इतकाच निष्कर्ष आपण काढू शकतो. शेवटी संस्कृतमध्ये म्हटलेच आहे,
वाघाचा सिंहाचा बळी दिला जात नाही। बोकडाचाच बळी दिला जातो. कारण तो शांत असतो, प्रतिकार करू शकत नाही. तसाच दत्ताचा बळी या चित्रपटात देण्यात आला आहे.

दुसरी खटकणारी गोष्ट म्हणजे, चित्रपटात झालेली कलाकारांची बजबजपुरी। दिलीप प्रभावळकर, नाना पाटेकर, सोनाली कुलकर्णी यांच्यापासून ते विभावरी देशपांडे, उषा नाडकर्णी, मोहन आगाशे, किशोर कदम आणि स्वतः गिरीश कुलकर्णी यांच्यापर्यंत बऱ्याच नटनच्यांचा गोतावळा चित्रपटांत जमविण्यात आला आहे. पण त्यामुळेच कोणत्याच नटाची छाप त्यामध्ये पडत नाही. दिलीप प्रभावळकर सुद्धा तीन-चार प्रसंगांमधूनच दिसतात. त्यांचे अगदी थोडेच संवाद प्रभावी आहेत. प्रभावळकर आणि नाना यांचा म्हणावा तसा उपयोग चित्रपटात झालेलाच दिसत नाही. कदाचित गिरीश कुलकर्णी यांची भूमिका त्यांच्या भूमिकेपुढे दुबळी वाटू नये, म्हणूनच दोघांनाही तोंडी लावण्यासाठी घेतले, की काय असे वाटते. तसे जर असेल तर तो त्यांचा अपमानच म्हटला पाहिजे.



हे दोन झाले प्रमुख आक्षेप। बाकी दिग्दर्शनाचे म्हणाल, तर अनेक पुरावे देता येतील. मुख्य म्हणजे गावांतल्या झेंडावंदनाच्या कार्यक्रमानंतर लागलेले जयोस्तुते हे गाणे. भारतातील तमाम शाळांमध्ये तिरंगा फडकल्यानंतर राष्ट्रगीत म्हणजे जन गण मनच लागते. वंदेमातरम लाही अजून तो मान मिळालेला नाही. त्यामुळे जयोस्तुते लावणे चूकच आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे माझे लाडके राष्ट्रपुरुष आहेत. जयोस्तुते हे उत्तम गीतही आहे. पण राष्ट्रगीताची जागा ते घेऊ शकत नाही. त्यामुळे इतकी गंभीर चूक होऊनही एकाही चित्रपट परीक्षकाने त्यावर बोट ठेवलेले नाही, याचे आश्चर्यच वाटते. आता गाणे घाईगडबडीत चुकून लागले आहे, असे दिग्दर्शकाला दाखवायचे असेल तर तो संदेश अजिबात पोहोचत नाही.

नंतर खटकणारी गोष्ट म्हणजे सकाळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश मिळत नाही। सुरक्षारक्षक त्याला हाकलवून लावतात. मग रात्रीच्या वेळी गिरीश कुलकर्णीला मंदिरात प्रवेश कसा मिळतो आणि तो मंदिरातील दत्ताची मूर्ती चोरून पळून कसा जातो, या चमत्काराची कथा प्रेक्षकांना अजिबात कळत नाही. गिरीश कुलकर्णी हे दत्ताची मूर्ती कसा चोरतो, हे जर अधिक स्पष्टपणे दाखविले असते, तर मायबाप प्रेक्षकांवर उपकार झाले असते, असे ऍज अ प्रेक्षक म्हणून वाटते हं.

नंतर गिरीष कुलकर्णी जेव्हा दत्ताची मूर्ती पाण्यात बुडवितो तेव्हा ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. मंदिरात मूर्तीची प्रतिष्ठापना करतात, तेव्हा एक तर ती मूर्ती दगडाची असते, संमगरवरी असते, प्लॅस्टर ऑफ पॅरिसची असते किंवा शाडूची असते. चित्रपटात दाखविलेली दत्ताची मूर्ती पाण्यावर तरंगताना दाखविली आहे. म्हणजे ती फायबरची असावी असे दिसते. दत्ताचे देवस्थान जर जागृत असेल तर तिथे फायबरची मूर्ती असूच शकत नाही. शिवाय मूर्तीचे विसर्जन करताना पाणी खळखळत असते पण नंतर ते अचानक शांत होते, असे दृष्यातून दिसते. खूप मोठ्या चुका आहेत, असे नाही. पण उघड्या डोळ्यांनी पाहिले तर जाणवते. तेव्हा कुलकर्णी मंडळींनी पुढील वेळी या बारीकसारीक गोष्टींचा जरूर विचार करावा.

ज्या गावामध्ये पोस्टमनही येत नाही, त्या गावात दिलीप प्रभावळकरच्या घरी इंटरनेट पोहोचलेले असते, दत्ताची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पत्रकार किशोर कदम महासंग्राममधून आयबीएन लोकमतमध्ये पोहोचतो, हा विरोधाभास न पटण्यासारखा आहे. शिवाय काही दृष्यांमध्ये फिल्टर वापरून रात्र करण्याची चोरी जाणकार मंडळींच्या लगेच लक्षात येते.

चित्रपटात काही गोष्टी उगाच घुसडल्यासारख्या वाटतात। पहिली म्हणजे वेलकम राया ही लावणी कम आयटम साँग. आता त्यात निवडलेली आयटम इतकी बकवास आहे, की झक मारली आणि लावणी पाहिली, असे वाटते. गायिकेचा आवाज आणि लावणीचे शब्द सोडले तर लावणीत मादकता अजिबात नाही. प्लॅस्टिकचा बॉल आणि प्लॅस्टिकची बॅट काय, नाईट क्रिकेट काय, उचलून मारा, हळूवार मारा, अलगद मारा... ही म्हणजे अकलेची दिवाळखोरी वाटते. प्रेक्षक खिळवूनच ठेवायचे असेल तर एखादे सेक्स साँग किंवा कॅब्रे डान्सच टाकायचा ना. साईड साईडने कशाला खेळता. थेटच भिडा.

तीच गोष्ट नाना पाटेकर आणि सोनाली कुलकर्णी यांच्या सागरगोट्यांच्या दृष्याची. अजिबात आवश्यकता नसलेले आणि सोनाली कुलकर्णीला गुरुदेव गच्च दाखविणारे ते उठवळ दृष्य असेच प्रेक्षकांना चळवायला चित्रपटात घेतले आहे, की काय अशी शंका येते.

जाता जाता आणखी एक। नसिरुद्दीन शाह यांचा विनाकारण घुसडलेला प्रसंग। मुळात त्या प्रसंगाची आवश्यकता काय, की मोठा कलावंत मराठीत आणण्याचा अट्टहास, याचे उत्तर मिळत नाही. करडीच्या पायाला झालेली दुखापत तसेच नसिरुद्दीनच्या पायाला झालेली दुखापत, यातून दिग्दर्शकाला काय दाखवायचे आहे, हे समजत नाही. करडीच नसिरुद्दीन शहाच्या रुपाने तिथे आलेली असते, असे तर सुचवायचे नाही ना. तसे जर असेल तर हा अंधश्रद्धा पसरविण्याचाच प्रकार आहे. म्हणजे एका वाईट बाजूवर कोरडे ओढायचे आणि आपणच दुसरी वाईट बाजू उचलून धरायची, असे झाले. दिग्दर्शकाला त्या प्रसंगातून काय दाखवायचे हे समजत नाही. पण मी म्हणतो, तसे दाखवायचे असेल तर एक हजार वेळा निषेध.

तेव्हा अशा काही सुधारणा झाल्या असत्या तर देवळात अधिक प्रसन्न वाटले असते. बाकी देवा तुला शोधू कुठे आणि दत्त दत्त दत्ताची गाय ही गाणी एकदम झक्कास. एका चांगल्या विषयाला भिडल्याबद्दल अभिनंदन.

Tuesday, November 15, 2011

चार हजार कोटींची भीक मागणारा

उधळ्या उद्योगपती

भारतातील क्रमांक दोनची एअरलाईन्स सेवा असलेल्या किंगफिशरचे विमान जमिनीवर आदळले आहे. चार हजार कोटी रुपयांचा संचित तोटा किंगफिशर एअरलाईन्सला झाला असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे कंपनीची गेल्या काही दिवसांपासून उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. किंगफिशरचा शेअरही धपकन उतरला आहे. कर्जाची परतफेड करता येत नाही, म्हणून ज्या बँकांनी त्यांचे शेअर्स ताब्यात घेतले, त्या बँकाची चांगल्या धास्तावल्या आहेत. कारण शेअरचे भाव गडगडल्यामुळे त्यांची किंमत खूप कमी झाली आहे. प्राप्त परिस्थितीत कंपनीला आणि कर्मचाऱ्यांना वाचविण्यासाठी सरकारने आम्हाला बेल आऊट पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी मद्यसम्राट विजय मल्ल्या यांनी केली आहे।

मुळात, असे पॅकेज देण्यात यावे किंवा कसे, याबाबत भारताचे मुखदुर्बळ पंतप्रधान आणि स्वतः अर्थतज्ज्ञ असूनही सामान्यांना महागाईच्या खाईत लोटणारे डॉ. मनमोहनसिंग काय निर्णय घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. टूजी तसेच राष्ट्रकुल घोटाळ्याप्रकरणी हाताची घडी तोंडावर बोट ठेवणारे पंतप्रधान याबाबत तोंड उघडतात की नेहमीप्रमाणे मौनीबाबा होतात, यावर अब्जावधी रुपयांचा सट्टा लागला आहे, असे नुकतेच ऐकिवात आले आहे.

असो. आजचा विषय तो नाही. मुख्य प्रश्न आहे, मद्यमहर्षि विजय मल्ल्या यांना अशी आर्थिक मदत करावी, की नाही. मुळात मल्ल्या यांची एकूण लाईफस्टाईल पाहता त्यांची कंपनी तोट्यात येणार हे सांगायला मनमोहनसिंग यांच्यासारख्या अर्थतज्ज्ञाची आवश्यकता नाही. अगदी फुटकळ माणूसही ते छातीठोकपणे सांगू शकला असता. मुळात आपली औकात नाही, तर शंभर गाढवं अंगावर घ्यायची कशाला. झेपतंय तेवढंच करावं. पण मल्ल्या यांना हे कोण सांगणार।

पूर्वी फक्त बिअर व दारुपुरताच किंगफिशर हा ब्रँड मर्यादित होता. पण नंतर हवाई उद्योगात प्रवेश करतानाच मल्ल्या यांनी स्वतःचा बडेजाव मिरवित फॉर्म्युला वनची भारतीय टीम विकत घेतली. आयपीएलमध्ये बेंगळुरुची टीम खरेदी केली. त्यापूर्वीर्ही काही वर्षे त्यांनी परदेशातून टिपू सुलतानची तलवार अब्जावधी रुपये मोजून ताब्यात घेतली. त्यानंतर ते राजकारणात शिरले आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या तिकिटावर राज्यसभेतही पोहोचले।

टिपू सुलतानची तलवार हे एकवेळ समजू शकतो. मुळात तो लोकांच्या भावनेचा विषय होता आणि त्यासाठी मल्ल्या यांनी साडेतीन ते चार अब्ज रुपये मोजले होते. तेही स्वतःच्या खिशांतून. उद्या छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार भारतात आणण्यात येणार असेल तर त्यासाठी मराठी माणूस कितीही पैसे मोजू शकतो. त्यामुळे टिपू सुलतानची तलवार भारतात आणण्यासाठी खर्च केलेले पैसे हा विषय वेगळा आहे. त्याचा इतर दोन गोष्टींची संबंध जोडण्याची आवश्यकता नाही।

राहता राहिला मुद्दा फोर्स वनची टीमचा आणि बेंगळुरुच्या संघाचा. मल्ल्या यांनी साडेपाचशे कोटी रुपयांच्या आसपास रक्कम मोजून बेंगळुरुची टीम खरेदी केली. तर मल्ल्या यांनी मायकेल मोल यांच्याशी भागीदारीमध्ये साधारण साडेसहाशे कोटी रुपये खर्च करुन फोर्स वन ही एफ वन रेसमधील भारतीय टीम खरेदी केली. दरवर्षी त्यावर होणारा खर्च किंवा इतर गोष्टींच्या तपशीलामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. अगदी स्पष्टच बोलायचे झाले, तर भारतामध्ये फॉर्म्युला वन रेस लोकप्रिय असली तरी फारशी रुजलेली नाही. नरेन कार्तिकेयन आणि करुण चंडोक ही दोन नावे सोडली तर भारतात त्या रेसमध्ये सहभागी होऊ शकेल असा एकही एफ वन ड्रायव्हर नाही. फोर्स वनचे दोन्ही ड्रायव्हर्स परदेशी आहेत. त्यामुळे मल्ल्या यांनी फोर्स वन टीम खरेदी करुन भारताची शान वाढविली असे काही क्षण जरी वाटत असले तरी त्यांनी हरणाऱ्या घोड्यावर पैसे लावले आहेत. त्यामुळे त्यांनी स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारुन घेतली असून ज्यात तोटात तोटा दिसतो आहे, तिथे पैसा लावला आहे।

प्रत्येक वेळी मल्ल्या यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर अधिकाधिक मोठी झाली असली तरी मल्ल्या यांची झोळी रिकामी होत गेली आहे. मल्ल्या यांनी हाच पैसा पद्धतशीरपणे किंगफिशरमध्ये लावला असता तर त्यांच्यावर ही वेळ ओढविलीच नसती, हे सांगायला मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांची आवश्यकता नाही. दोन्ही कंपन्या वेगळ्या आहेत, इकडचा पैसा तिकडे कसा फिरविणार वगैरे आक्षेप असू शकतात, पण टूजीचे हजार कोटी इकडे तिकडे फिरविणाऱ्या मंडळींना हे पैसे फिरविण्याइतके अर्थज्ञान नक्कीच असू शकेल. तेव्हा मल्ल्या यांनी आधीपासूनच जर योग्य व्यवसाय केला असला तर हवाई वाहतुकीच्या धंद्यासाठी केंद्र सरकारपुढे भिकाऱ्यासारखे हात पसरण्याची वेळ आली नसती.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुरेश कलमाडी यांना मर्सिडिजमधील भिकारी म्हणाले होते. त्या धर्तीवर मल्ल्या यांना विमानवाला भिकारी म्हटले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, समजा तुम्हाला धंदा चालविता येत नसेल तर धंदा बंद करुन टाका. विमानसेवा कंपनीला टाळा लावा आणि दारुचा महापूर वाढवून कसा पैसा ओढता येईल, याच्या नव्यानव्या कल्पना शोधून काढा. पण धंदा तुमचा आणि पैसा सरकारचा (पर्यायाने लोकांचा) हा आतबट्ट्याचा व्यवहार सांगितला कोणी. त्यामुळेच भारतीय जनता पक्ष आणि डाव्या पक्षांनी बेल आऊट पॅकेज देण्यास विरोध केला आहे.

आता चार हजार कोटी रुपयांचे बेल आऊट पॅकेज मिळाले तर मल्ल्या यांची चांदीच आहे. दोन-पाच वर्षांत ते पैसेही फुकून पुन्हा एकदा भिकाऱ्यासारखे सरकारपुढे हात पसरायला मोकळे. काही वर्षांपूर्वी सहारा एअरवेज ही कंपनी तोट्यात आली होती. ती नरेश गोयल यांच्या जेट कंपनीने विकत घेतली. त्याच धर्तीवर मल्ल्या यांनी त्यांची किंगफिशर कंपनी फुकून टाकावी आणि मोकळे व्हावे, म्हणजे सरकारपुढे वारंवार हात पसरण्याची वेळच ओढविणार नाही. तेव्हा मुळातच सरकारने किंगफिशरला बेल आऊट पॅकेज वगैरे देण्याच्या फंदात पडूच नये. आणि जरी अशाप्रकारे पॅकेज देण्याचा निर्णय घ्यायचा विचार सरकारने केला तरी त्याबदल्यात संपूर्ण किंगफिशर कंपनी ताब्यात घ्यावी.

मात्र, जर कंपनी आणि कामगार वाचविण्यासाठी बेलआऊट पॅकेज वगैरे जाहीर केले, तर सरकारपुढे महासंकटच उभे राहिल. भारतीयांची मानसिकता लक्षात घेता, भविष्यात आणखी काही कंपन्या स्वतःला दिवाळखोर जाहीर करुन पैसे लाटण्यासाठी नक्की पुढे येतील, यात वाद नाही. शिवाय, आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी किंवा शहीद जवानांच्या कुटुंबीयांसाठी पैशांची मदत करायला वर्षानुवर्षे लावणारे सरकार मद्यमहर्षी विजय मल्ल्या यांच्या कंपनीला तातडीने मदत देऊ लागले तर सरकारच्या दळभद्रीपणाचा कळसच होईल, असे म्हणावे लागेल.

समिती बसवा, चर्चा करा, आढावा घ्या, तज्ज्ञांना आढावा घेण्यास सांगा, असे न करु नका. तेव्हा मनमोहना, आता तरी तोंड उघडा आणि मल्ल्यांना स्पष्ट शब्दात नाही म्हणा. नाही तर तुम्ही तुमच्या अगम्य इंग्रजीत तोंडातल्या तोंडात नाही म्हणाल आणि मल्ल्या मात्र, सरकारच्या मदतीच्या अपेक्षेत राहतील. तेव्हा खणखणीत नकार द्या आणि विषयाचा तुकडा पाडा.