Thursday, December 14, 2017

गुजरातमध्ये भाजपा @ १०५

काँग्रेस ६५ ते ७५

गुजरात निवडणुकीच्या दुसरा आणि अखेरचा टप्पा पार पडला आणि मतदान संपताच ‘एक्झिट पोल’चे आकडे यायला सुरुवात झाली. गुजरातमधून परतल्यानंतर ज्यांनी ज्यांनी फोन केला आणि विचारले, की किती जागा येणार त्या प्रत्येकाला मी जो आकडा सांगितला साधारण त्याच आसपासचे आकडे ‘एक्झिट पोल’मधून समोर येत आहेत. भाजप यंदाच्या निवडणुकीत १०५ ते ११०च्या आसपास राहील आणि काँग्रेस ६५ ते ७५च्या दरम्यान असेल, याचा अंदाज गुजरातमधून निघतानाच आला होता. पण तरीही शेवटच्या टप्प्यातील प्रचाराचे मुद्दे आणि दोन्ही फेऱ्यांमधील मतदानाची टक्केवारी यांच्यासाठी थांबावं, असा विचार करून ब्लॉग लिहायचे थांबलो होतो. तरीही ज्यानं ज्यानं मला विचारलं त्याला मी हीच आकडेवारी सांगत होतो. 


गुजरातेत भाजपाची सत्ता जाणार आणि राहुल गांधी यांच्या दमदार कामगिरीमुळे तसेच करिष्म्यामुळे काँग्रेसची सत्ता येणार, अशी वातावरण निर्मिती माध्यमांनी तयार केली होती. अनेक तज्ज्ञ आणि निवडणूक विश्लेषकांनीही हीच री ओढळी होती. पटेल समाजाची एकजूट, हार्दिक-जिग्नेश तसेच अल्पेश यांची काँग्रेसशी हातमिळवणी, जीएसटी तसेच नोटाबंदीमुळे व्यापारी-व्यावसायिकांमध्ये असलेली नाराजी आणि २२ वर्षांच्या राजवटीमुळे नागरिकांमध्ये असलेली नाराजी असे अनेक मुद्दे भाजपा सरकारच्या विरोधात होता. राहुल गांधी यांचे सॉफ्ट हिंदुत्व, काँग्रेसने पहिल्यापासून गांभीर्याने लढविलेली निवडणूक आणि बेरजेचे राजकारण अशा अनेक गोष्टी देखील भाजपाच्या विरोधात जाण्याची शक्यता होती. 

मात्र, नरेंद्र मोदी निवडणुकीच्या प्रचारात जसजसे सक्रिय होत गेले, तसतसे काँग्रेस बॅकफूटवर गेली. स्वतःहून चुका करीत गेली. सेल्फगोल करीत गेली, असे म्हणावेसे वाटते. राहुल यांचे मंदिरांमध्ये जाणे, सोमनाथच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणे, कपाळावर गंध लावून सभांमधून भाषण ठोकणे, भाषणाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांच्याकडून ‘जय सरदार’ नि ‘जय माताजी’ असा जयघोष होणे, आरक्षण मागणाऱ्या पटेल समाजाने आदर्श मानलेल्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कटआउटला काँग्रेसच्या कार्यालयांबाहेर विशेष मानाचे स्थान देणे अशा अनेक गोष्टी काँग्रेसच्या प्रचारात प्रथमच दिसल्या. 

पण कपिल सिब्बल आणि मणिशंकर अय्यर यांनी घोडचुका केल्या. एकतर सोमनाथ मंदिराच्या ‘एन्ट्री बुक’मध्ये राहुल यांच्या धर्माचा उल्लेख ‘नॉन हिंदू’ असा केल्याचा मुद्दा चर्चेत आला. तो उल्लेख राहुल यांनी स्वतःहून केला, की आणखी कोणी मुद्दामून लिहिले होते, ते सोमनाथासच ठाऊक. पण तो मुद्दा भाजपाने खूप उत्तम पद्धतीने वापरला. त्यानंतर राममंदिराच्या संदर्भातील निर्णय २०१९नंतर देण्यात यावा, अशी अजब मागणी करून कपिल सिब्बल यांनी काँग्रेसच्या पायावर आणखी एक धोंडा पडेल, अशी व्यवस्था केली. मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘नीच’ म्हणून आणि नंतर कोणालाही पटणार नाही हास्यास्पद सारवासारव करून भाजपाला हाती आयते कोलितच दिले. 

मिळालेल्या संधीचे सोन्यात रुपांतर करण्यात पटाईत असलेल्या भाजपाने (अर्थातच, नरेंद्र मोदी यांनी) हे सर्व मुद्दे व्यवस्थितपणे वापरले. अगदी २००७मध्ये ‘मौत का सौदागर’चा मुद्दा वापरला होता तशाच धर्तीवर. नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात पाकिस्तानचा मुद्दा काढला. तो रडीचा डाव आहे, असा आरोप अनेकांनी केला. पण हे काही नवीन नाही. गेल्या म्हणजेच २०१२च्या निवडणुकीतही मोदी यांनी अखेरच्या सभांमध्ये पाकिस्तानचाच मुद्दा काढला होता. त्यावेळी ‘सर क्रीक’ हा मुद्दा चर्चेत होता. त्यावेळी सावली येथे झालेल्या सभेत त्यांनी हा मुद्दा काढला होता. त्यावेळी मी लिहिलेल्या ब्लॉगमधील उल्लेख पुढीलप्रमाणे…
‘सर क्रीकचा मुद्दा काढून काँग्रेस आणि पंतप्रधानांना लक्ष्य करतात. सर क्रीक पाकिस्तानच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा डाव आहे. तसे झाले तर पाकिस्तान थेट गुजरातच्या घरात येईल, असे सांगून लोकांच्या मनात भीतीचे पिल्लू सोडून देतात…’

थोडक्यात म्हणजे पाकिस्तान हा मुद्दा प्रथमच गुजरातच्या निवडणुकीत आलेला नाही. २००७च्या निवडणुकीतही हाफीज सईद आणि नरेंद्र मोदी हरले तर पाकिस्तानात फटाके फुटतील वगैरे मुद्दे होतेच की. यंदा पाकिस्तान गुजरातच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, असा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी प्रचाराच्या भाषणात केला. पण त्यात नाविन्य असे काहीच नाही. मणिशंकर अय्यर यांच्या घरी झालेल्या या बैठकीला पाकिस्तानचे माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री खुर्शीद महमूद कसुरी उपस्थित होते. भारताचे माजी लष्करप्रमुख दीपक कपूर आणि माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री नटवरसिंह देखील उपस्थित होते. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि माजी उपराष्ट्रपती (भारतात अस्वस्थ वाटणारे) डॉ. हमीद अन्सारी देखील मेजवानीस उपस्थित होते. 

अहमद पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री व्हावेत, असे आवाहन पाकिस्तानी सैन्याचे माजी महासंचालक यांनी केल्याचा दावा मोदी यांनी पालनपूर येथील सभेत संबंधित बैठकीचा हवाला देऊन केला. आता हा आरोप होता की तथ्य, याचा काथ्याकूट लोक करीत बसतील. पण गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आली, तर अहमद पटेल गुजरातचे मुख्यमंत्री होतील, ही पुडी मोदी यांनी व्यवस्थित सोडून दिली. गुजरातेत काँग्रेस सत्तेवर आली, तर मुसलमान सोकावतील आणि हिंदूंच्या घरामध्ये घुसून नमाज पढायला मागेपुढे पाहणार नाहीत, असे व्हॉट्सअप मेसेज यापूर्वी फिरतच होते. अहमद पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री होणार हा त्याच प्रचाराचा पुढचा टप्पा. 


मागे एका लेखामध्ये वाचलेली गोष्ट अशी. अहमद पटेल हे गुजरातमध्ये नरेंद्र मोदी यांच्या इतकेच लोकप्रिय होते म्हणे. तरुण असताना त्यांचा संपूर्ण गुजरातमध्ये दबदबा होता. त्यांच्या शब्दाला वजन होते. सरकारमध्ये ते सांगतील तो अंतिम शब्द असायचा. नरेंद्र मोदी जेव्हा भाजपाचे संघटनमंत्री झाले तेव्हा त्यांनी ही गोष्ट हेरली. तोपर्यंत अहमद पटेल यांचा उल्लेख बाबूभाई पटेल असा व्हायचा. म्हणजे सगळ्याच पक्षांतील लोक त्यांना बाबूभाई पटेल म्हणायचे. नरेंद्र मोदींनी त्यांचा उल्लेख अहमद मियाँ पटेल असा करायला सुरूवात केली. विशेषतः जाहीर सभांमधून. तेव्हापासून गुजरातमध्ये लोकप्रिय असलेले अहमद पटेल फक्त भरूच जिल्ह्यापुरते मर्यादित झाले. पुढे तर त्यांना भरूचमधून निवडून येण्याची खात्री न राहिल्याने ते राज्यसभेवरच गेलो. यंदाच्या राज्यसभा निवडणुकीतही त्यांना जिंकण्यासाठी बरीच मेहनत करावी लागली. थोडक्यात सांगायचं, तर हिंदू-मुस्लिम वगैरे मुद्दे गुजरातमध्ये किती महत्त्वाचा आहे, हे यावरून सूज्ञ मंडळींना समजून येईल.

गुजरात निवडणुकीच्या आकडेवारीनुसार जर बोलायचं तर गुजरातमध्ये भाजपाचा विजय निश्चितच होता. त्यावर फक्त शिक्कामोर्तब व्हायचं आणि नेमका आकडा किती हे स्पष्ट व्हायचं बाकी आहे. मुळात हितेशभाई पंड्या यांना आम्ही भेटलो तेव्हा त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९५पासून भाजपाने एकदाही न हरलेल्या जागांची संख्या आहे ५६ ते ६०च्या आसपास. जास्तच पण कमी नाही. म्हणजे भाजपाच्या हक्काच्या अशा ५६ जागा आहेत. भाजपाला त्यापासून पुढे सुरुवात करायची आहे. साध्या बहुमतासाठी फक्त ३६ जागांची आवश्यकता आहे. तर काँग्रेसला ९२ जागांची. ही गोष्ट मानसिकदृष्ट्या भाजपाला दिलासा देणारी होती. 

दुसरी आणि सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातच्या शहरी आणि निमशहरी तसेच ग्रामीण जागा हा मुद्दा देखील भाजपासाठी खूपच दिलासादायक होता. एकूण १८२ जागांपैकी भाजपाने ११६ जागा जिंकल्या होत्या. त्यापैकी गुजरातच्या ग्रामीण भागात एकूण ९८ जागा आहेत. तर शहरी आणि निमशहरी भागांमधील जागांचा आकडा आहे ८४. गेल्या निवडणुकीत भाजपाला ग्रामीण भागात ९८ पैकी ५० जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला ४३ तर अन्य पक्षांना पाच जागा अशी विभागणी होती. शहरी भागात मात्र, ८४ पैकी ६६ जागा भाजपाने पटकाविल्या होत्या. याचाच अर्थ असा, की शहरी आणि निमशहरी भागांत भाजपाने काँग्रेसला चारीमुंड्या चीत केले होते. सुरत, अहमदाबाद, वडोदरा, आणंद, नडियाद, भावनगर, जामनगर, राजकोट आणि प्रमुख शहरांमध्ये तसेच मोठ्या गावांत भाजपाचाच दबदबा होता. त्यातील बहुतांश जागा या प्रचंड मताधिक्याने जिंकलेल्या होत्या. 


यंदा हार्दिक पटेल आणि जीएसटी-नोटाबंदीमुळे जर फटका बसलाच तर तो ग्रामीण भागात बसणार. शहरी भागात भाजपाला फटका बसण्याची शक्यता अत्यंत कमी, अशीच माझी अटकळ होती आणि आहे. कारण शहरी भागाचा झालेला विकास लोकांना दिसतोच आहे. त्यामुळे तिथे भाजपाच्या अवघ्या काहीच जागा कमी होणार किंवा होणारही नाही. मागच्या वेळी जिथे भाजपा प्रचंड मताधिक्याने विजयी झाले, तिथे मताधिक्य जरुर घटेल. पण पराभव होणार नाही. 

पटेलांचे वर्चस्व असलेल्या सौराष्ट्र आणि सुरत वगैरे भागात भाजपाला थोडा फटका बसण्याची शक्यता गृहितच धरण्यात आली होती. भाजपालाही त्याची धास्ती होतीच. पण निवडणूक आयोगाने घेतलेल्या एका निर्णयामुळे भाजपाला थोडा फायदा झाला. आतापर्यंत दक्षिण गुजरात आणि उत्तर गुजरात या ठिकाणच्या निवडणुका एकाच टप्प्यात व्हायच्या. म्हणजेच दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांत मतदान व्हायचे. म्हणजे आधीच्या टप्प्यात दक्षिण गुजरातमध्ये मतदान करून पटेल मंडळी सौराष्ट्रात भाजपाच्या विजयासाठी प्रयत्न करायला रवाना व्हायचे. यंदा दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र या दोन्ही ठिकाणी एकाच दिवशी मतदान असल्यामुळे पटेल समुदायाला दोन्ही ठिकाणी नेहमीसारखे काम करता आले नाही. पटेल समाजाच्या नाराजीची तीव्रता कमी करण्यासाठी निवडणूक आयोगाचा हा निर्णय भाजपाला उपयुक्त ठरला. 

बाकी हार्दिक पटेलच्या सभांना होणाऱ्या गर्दीची तुलना गुजरातमधील राजकीय विश्लेषक आणि पत्रकार महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या सभांना होणाऱ्या गर्दीशीच करतात. सभेला गर्दी. भाषण ऐकायला गर्दी. पण प्रत्यक्ष मतदानात रुपांतर होण्याची शक्यता कमी. त्यामुळे हार्दिक पटेलच्या सभांच्या गर्दीवर आडाखे बांधणारी मंडळी भाजपाच्या दारुण पराभावाची गोष्ट करीत होते. पण तसे होण्याची शक्यता खूपच कमी आहे. 

भारतीय जनता पार्टी गुजरातमध्ये सत्तेवर येणार हे प्रचाराच्या आधीच मी लेख आणि ब्लॉग लिहून स्पष्टपणे सांगितले होते. गुजरातमध्ये फिरताना हेच जाणवत होते. नाराजी असली तरी ती सत्ता उलथवून टाकण्याइतकी नव्हती आणि काँग्रेसबद्दल सहानुभूतीही नव्हती. उलट लोक स्पष्ट सांगत होते, की भाजपवर नाराजी असली, तरीही काँग्रेसला आम्ही मतदान करू, असा अर्थ काढू नका. अगदी सुरत आणि अहमदाबादमधील व्यापारीही हेच सांगत होते. त्यातून नरेंद्र मोदी यांनी राज्यभरात ३०-३५ सभा घेऊन फुल्ल हवा केली. त्यांनी गुजराती अस्मितेचा मुद्दा पुन्हा एकदा केंद्रस्थानी आणला. पंधरा वर्षांत केलेल्या विकासाची उजळणी या निमित्ताने केली. कोणी कितीही विकास झालेला नाही, असे सांगितले तरी झालेले रस्ते आणि शेतात खेळणारे पाणी पाहिल्यानंतर नागरिक विरोधकांवर विश्वास ठेवत नाहीत. 


आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी. ते जैन समाजाचे आहेत. शिवाय त्यांची प्रतिमा स्वच्छ आहे. सरकारची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यात आणि कार्यक्षमपणे कारभार करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. आनंदीबेन पटेल यांच्या कार्यकाळात तळाला गेलेल्या भाजपाची प्रतिमा निर्मिती करण्याचे काम रुपाणी यांनी चांगल्या पद्धतीने केले आहे. त्याचा फायदा भाजपाला नक्की होण्याची चिन्हे आहेत. आनंदीबेन पटेल यांना राजीनामा द्यायला लावला नसता (पायउतार होताना दिलेले कारण ७५ वर्षे पू्र्ण केल्याचे… पण खरे कारण सरकारची प्रतिमा खालावल्याचे) तर भाजपाच्या हातून सत्ता गेली असती हे निश्चित. भविष्यातही नरेंद्र मोदींचा वारसदार निर्माण न झाल्यास भाजपाला गुजरातेत झगडावे यंदासारखेच लागणार हे स्पष्ट आहे. गुजरातचा विजय वाटतो तितका सोपा राहिलेला नाही. मोदी तिथे नाहीत हे खरे. पण त्यांची पुण्याई अजून शाबूत आहे, हेही तितकेच खरे. त्याच पुण्याईवर भाजपा परत येतोय. 

गेल्या पंधरा वर्षांत नरेंद्र मोदी यांनी गुजरातसाठी आणि गुजराती अस्मितेसाठी जे काही केले, त्याचे फळ त्यांना या निवडणुकीमध्ये मिळत आहे. काँग्रेसकडे जर समर्थ पर्याय ठरू शकणारा नेता असता तर भाजपाला ही निवडणूक आणखी जड गेली असती. पण त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरू शकेल, असा नेता नाही. शंकरसिंह वाघेला यांना राहुल यांनी नाराज केल्यामुळे त्यांनी चांगली संधी दवडली, असे म्हणता येऊ शकते. संधी मिळताच त्यांना गळाला लावून मोदी-शहा जोडगोळीने काँग्रेसची मते फोडण्यासाठी त्यांचा योग्य वापर करून घेतला. 

जीएसटी आणि नोटबंदीमुळे असलेली नाराजी, हार्दिक पटेल आणि इतर तरुण नेत्यांनी तापविलेले वातावरण यांचा फटका भाजपाला नक्की बसेल. पण तो दहा ते पंधरा जागांचा असेल. भाजपाला १०५ जागांवर समाधान मानावे लागेल. रेंज म्हणाल, तर ती १०० ते ११०ची असेल. काँग्रेसच्या जागांमध्ये चांगली वाढ होईल. आता काँग्रेसचे संख्याबळ ६० असले, तरीही राज्यसभा निवडणुकीमध्ये ते ४४पर्यंत खाली आले होते. ते जर ७० पर्यंत पोहोचले तर वाढ २५ जागांची असेल. ती तुलनेने खूप मोठी आहे. हे यश राहुल यांच्या आक्रमक प्रचाराचे आणि बदललेल्या शैलीच आहे. काँग्रेसच्या जागांची रेंज ही ६५ ते ७५ इतकी असेल. 

बाकी सोमवार दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईलच. कोणाचे अंदाज बरोबर येतात आणि चुकतात हे समजेलच.

Monday, December 04, 2017

राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…


राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी… भारतीय जनता पार्टीची एक लोकप्रिय घोषणा. जुन्या स्मृतींना उजाळा देणारी आणि वैयक्तिक माझी आवडती असलेली घोषणा. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर भाजपाच्या कार्यकर्त्यांनीच नाही, तर सर्वसामान्य जनतेनेही भरपूर प्रेम केले. अटलजी एकदा तरी पंतप्रधान व्हायला पाहिजे, ही सर्वसामान्य नागरिकाची भावना होती. १९९६मध्ये भाजपाचा पहिला पंतप्रधान दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाला खरा. पण अवघ्या तेरा दिवसांत भाजपाचे सरकार पडले आणि तेव्हापासून ही भावना अधिकच दृढ होत गेली. अटलजींना पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे. 



एच. डी. देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजराल यांची सरकारेही पडली आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जावे लागले. नंतर पुन्हा एकदा जनतेने अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरच विश्वास दर्शविला. दुर्दैवाने जयललिता, मायावती, सैफुद्दीन सोझ आणि गिरीधर गमांग यांच्या कृत्यांमुळे अटलबिहारी यांचे सरकार गडगडले. तेरा महिन्यांतच निवडणुका लागल्या. त्यावेळी म्हणजेच १९९९मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुखावणारी, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणारी एक साधीसोपी आणि सुंदर घोषणा अस्तित्वात आली. द्यायला एकदम सहज आणि ऐकायला खूपच सुंदर. ती घोषणा म्हणजे ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…’ 

तो काळ ‘सोशल मीडिया’चा नव्हता. त्यामुळे कॅम्पेन कोण हँडल करतंय, घोषणा आणि गाणी कोण लिहितंय किंवा जाहिराती कोण तयार करतंय याची फारशी चर्चा होत नसे. मुळात प्रचारातही तेवढी व्यावसायिकता आलेली नव्हती. एकदम आक्रमक पद्धतीने प्रचार व्हायचाही नाही. सोशल मीडिया नव्हता. त्यामुळे प्रचाराचा भडिमार व्हायचा नाही. वृत्तपत्र, टीव्ही, प्रचार सभा नि मिरवणुका या माध्यमातूनच प्रचार व्हायचा. सभा, मेळावे आणि मिरवणुकांमध्ये घोषणा देण्याची जोरदार संधी असायची. घोषणाबाजीच्या त्या काळात एकदम कडक घोषणा कानावर पडायची. आणि ती म्हणजे ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…’ आजही तीच माझी सर्वाधिक आवडती घोषणा आहे. 

अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावाचा उपयोग करून अनेक घोषणा तयार करण्यात आल्या होत्या. आणीबाणीच्या काळात एक घोषणा खूप गाजली आणि ती म्हणजे ‘अंधेरे में एक चिंगारी, अटलबिहारी अटलबिहारी.’ जयप्रकाश नारायण यांच्यावर एक घोषणा तयार करण्यात आली होती, ‘अंधेरे मे एक प्रकाश, जयप्रकाश जयप्रकाश…’ त्याच घोषणेत थोडी फेरफार बदल करून अटलजींवर घोषणा तयार करण्यात आली असावी. भाजपाच्या स्थापनेनंतर त्याच धर्तीवर एक नवी घोषणा तयार करण्यात आली. त्यावेळी भाजपा सत्तेवर येण्याची सुतराम शक्यता नव्हती. पण तरीही कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी ती घोषणा दिली जायची. ‘बीजेपी की क्या तैयारी, अटलबिहारी अटलबिहारी.’


नंतरच्या काळात एक घोषणा लोकप्रिय ठरली आणि ती म्हणजे ‘अगली बारी अटलबिहारी’. ‘अगली बारी’चा संदर्भ देत अटलजी एक विनोद सांगायचे. ‘अगली बारी’ बहुत हो गया. अब अब की बारी कहिए.’ आता ‘अब की बारी’ म्हणा, असं खुद्द अटलबिहारी यांनीच सांगिल्यानंतर नवी घोषणा फॉर्मात आली, ‘अब की बारी अटलबिहारी’. अशा सर्व घोषणांच्या भाऊगर्दीत अटलबिहारींवर तयार केलेली ‘राजतिलक की करो तैयारी’ हीच घोषणा सर्वाधिक लक्षात राहिली. सर्वाधिक भावली. नंतर यावरून अनेक घोषणा करण्यात आल्या. ‘धर्म जिता अधर्म हारी, आ रहे है अटलबिहारी’, ‘राजतिलक की करो तयारी, नरेंद्र मोदी अबकी बारी’, ‘… आ रहे है भगवाधारी’ आणि शब्दांची फेरफार करून आणखी दोन-तीन घोषणा बनविण्यात आल्या होत्या. पण ही जी मूळ घोषणा आहे, ती एकदम जबरदस्त होती.
कवी मनाच्या अटलजींच्या प्रकृतीला एकदम साजेशी अशीच होती. तिच्यात सौंदर्य होतं, सहजता होती. मुद्दामून यमक जुळविण्यासाठी केलेली धावपळ नव्हती. शिवाय पंतप्रधान होण्यासाठी अटलजी येत आहेत. बहुमत तर मिळालेच आहे आणि आता फक्त राज्याभिषेक (शपथविधी) होणे बाकी आहे, हा आत्मविश्वास त्यामधून अशा काही पद्धतीने व्यक्त होत होता, की विचारता सोय नाही. 

गुजरातच्या निवडणुकीचे ब्लॉग लिहिताना मध्येच अटलबिहारी आणि या घोषणेचं काय लावून धरलंय, असं तुम्हाला नक्की वाटत असेल. तर सांगायची गोष्ट अशी, की ही घोषणा लिहिणाऱ्या व्यक्तीची गुजरात दौऱ्यावर असताना भेट झाली. भेट तशी पूर्वीही झालेली. पण त्यावेळी मला ही गोष्ट माहिती नव्हती. यावेळीही भेट पूर्वनियोजित वगैरे नव्हती. अगदी अचानकच आम्ही भेटलो. घोषणा लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव हितेशभाई पंड्या. सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे २००७च्या निवडणुकीपासून मी त्यांना ओळखतोय. अधूनमधून फोनवर बोलणंही होतं. व्हॉट्सअप सुरू असतं. पण ती घोषणा तयार करणारी व्यक्ती हीच आहे, याचा पत्ता मला कधीच लागला नाही. मुळात तसा विषयही कधी निघाला नव्हता आणि असं उगाच कोण कशाला स्वतःहून सांगेल. पण राजकोटमध्ये गेलो तेव्हा भाजपाच्या एका कार्यालयात बसलो असताना भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राजूभाई ध्रुव यांनी ही गोष्ट आम्हाला सांगितली. तेव्हा मला तर जबदरस्त धक्काच बसला. 

 
  (राजूभाई ध्रुव)

राजूभाईंबरोबर मस्त गप्पा सुरू असताना अचानक हितेशभाई कार्यालयात आले. दोघांची नजरानजर झाली आणि त्यांना माझी ओळख करून दिली. त्यांनीही मला ओळखलं. कारण आम्ही २००७नंतर आताच प्रत्यक्ष भेटत होतो. मग आमच्या गप्पांमध्ये ते देखील सहभागी झाले. त्यावेळी राजूभाईंनी उलगडा केला, की तुम्ही हितेशभाईंना ओळखता पण त्यांची आणखी एक वेगळी ओळख तुम्हाला माहिती आहे का? आम्ही म्हटलं, कोणती ओळख. तेव्हा त्यांनी सांगितलं, की ‘राजतिलक की करो तैयारी …’ ही घोषणा हितेशभाईंनी तयार केली आहे. म्हटलं व्वा… आपल्याला आवडणारी घोषणा तयार करणाऱ्या व्यक्तीची अचानक अशा पद्धतीने भेट व्हावी, या पेक्षा आनंदाची गोष्ट कोणती?

हितेशभाई हे वरिष्ठ पत्रकार आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जुने स्वयंसेवक आणि जनसंघापासूनचे कार्यकर्ते. तेव्हापासूनच त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी ओळख आहे. मोदी २००१मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हापासून ते गुजरातच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘कोअर टीम’मध्ये आहेत. नंतर आनंदीबेन पटेल यांच्या सोबत आणि आता विजय रुपाणी यांच्यासोबतही ते आहेत. अशा हितेशभाईंची नवी ओळख राजकोट येथे झाली.

 
  (हितेशभाई पंड्या)

ही घोषणा कशी तयार झाली याचा उलगडा हितेशभाईंनी केला. काळ होता १९९९च्या निवडणुकीपूर्वीचा. त्यावेळी ते ‘फूलछाब’ नावाच्या गुजराती वृत्तपत्रामध्ये कामाला होते. तेव्हाचे राजकोट शहराचे भाजप अध्यक्ष रमेश रुपापारा यांचा हितेशभाईंना कार्यालयात दूरध्वनी आला आणि निवडणूक प्रचारासाठी एखादे स्लोगन सुचवा, अशी त्यांनी विनंती केली. रात्रीचे साडेनऊ-दहा वाजले असतील. हातातील काम आटोपले, की मग विचार करतो आणि सुचले की स्लोगन पाठवितो, असे सांगून हितेशभाईंनी फोन ठेवून दिला. घोषणा प्रदेश स्तराप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावरही वापरता आली पाहिजे, अशी रुपापारा यांची अट होती. थोडक्यात ती हिंदीत हवी होती. रात्री एक-दीड वाजले तरी फोन कर. मी येतो आणि घेऊन जातो, असे सांगून रुपापारा यांनी फोन ठेवून दिला. एकीकडे काम सुरू असतानाच दुसरीकडे विचारही सुरू होता. त्यावेळी त्यांना अचानक साडेअकराच्या सुमारास शब्द सुचले ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी…’ 

तातडीने त्यांनी ती घोषणा कागदावर उतरविलील आणि प्रदेश कार्यालयात फॅक्स करून पाठवून दिली. त्यानंतर काही दिवस त्यावर चर्चाच झाली नाही. जवळपास दहा दिवसांनंतर भारतीय जनता पार्टीच्या प्रचारामध्ये ठळकपणे त्या घोषणेचा वापर करण्यात येऊ लागला आणि ‘राजतिलक की करो तैयारी, आ रहे है अटलबिहारी’ ही घोषणा घराघरात पोहोचली. कार्यकर्त्यांच्या ओठावर रुळली. भारतीय जनता पार्टीच्या देशभरातील प्रचारात त्याचा वापर होऊ लागला.



एका सुंदर घोषणेच्या् निर्मात्याची भेट झाल्याचा आनंद तर मनात होताच. त्याचप्रमाणे आपण ज्याला ओळखतो अशा माणसाची आणखी एक वेगळी ओळख आपल्याला झाली, याचा आनंद खूप अधिक होता. हितेशभाईंची भेट आणि त्यांची नवी ओळख ही आमची राजकोट वारी सफल करून गेली.


Friday, December 01, 2017

चर्चा विकासाची, खरे मुद्दे वेगळेच



गुजरातचा विकास झाला का? प्रचारातील नेमके मुद्दे काय आहेत? चारवेळा तू गुजरातला जाऊन आलास, खरंच बदल झालाय का? की नरेंद्र मोदी आणि भाजपावाले फक्त फेकम फाक करत आहेत, असे अनेक प्रश्न मी गुजरातमध्ये आहे, असं म्हटल्यानंतर विचारायला सुरुवात झाली आणि त्यावर मी लिहावं, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. 

वास्तविक पाहता, गुजरातचा विकास झालाय का, हा प्रश्नच गैरलागू आहे. आज काँग्रेसकडून प्रचारात जीएसटी आणि नोटाबंदी या मुद्द्यांचा वापर करण्यात येतो आहे. वीज, रस्ते, पाणी आणि उद्योगांचा प्रश्न उपस्थित केला जात नाही. त्यावर जोर दिला जात नाही. जाता जाता उल्लेख केला जातो, यातच सर्व काही आलं. एका सभेत राहुल म्हणतात ३०लाख बेरोजगार आणि दुसऱ्यात तो आकडा वाढवून ५० लाखांवर नेतात. आता बेरोजगारीचा मुद्दा जर इतकाच गंभीर असता तर राहुल यांनी देखील तेवढंच गांभीर्य बाळगायला नको का? थोडक्यात म्हणजे त्या मुद्द्यांमध्ये हवाच नाही, हे उघड आहे. 

भारतीय जनता पार्टी सत्तेवर आल्यानंतर गुजरातमध्ये काय झालं, हे पाहण्यासाठी गुजरातमध्येच गेलं पाहिजे. पण थोडक्यात सांगायचं झालं, तर गुजरातमध्ये आजच्या घडीला रस्ते उत्तम आहेत. आज आहेत असं नाही. २००२मध्ये आम्ही बार्डोली जिल्ह्यातील व्यारा या तुषार अमरसिंह चौधरी यांच्या गावात गेलो होतो. आदिवासी भागातील हे गाव. पण तिथपर्यंत डांबराचा पक्के रस्ते झाले होते. मुख्य म्हणजे खड्डे नव्हते. गावागावांमध्ये वीज पोहोचलेली आहे. मुख्य म्हणजे भारनियमन हा शब्द त्यांना माहिती नाही. वीजनिर्मिती देखील मोठ्या प्रमाणावर होते आहे. मोदी आल्यापासून नवे वीजनिर्मिती प्रकल्प उभे राहिले आहेत.


पाण्याचा प्रश्नही बहुतांश प्रमाणात सुटला आहे. मोदी सत्तेवर आले तेव्हा कच्छ आणि सौराष्ट्र पाण्याशिवाय तडफडत होता. मोदींनी नर्मदेचे पाणी कच्छ आणि सौराष्ट्रात नेण्याचा संकल्प सोडला. ‘नर्मदे सर्वदे, गुजरात को गर्व दे’ ही घोषणा फक्त दिली नाही. तर प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले. २००७मध्येच नर्मदेचे पाणी कच्छमध्ये दिसायला लागले होते. गेल्या निवडणुकीत सौराष्ट्राच्या काही भागात नर्मदेचे पाणी पोहोचविण्यात आले होते. यंदा आणखी काही भागात पाणी पोहोचले आहे. सात फूट व्यासाच्या पाइपलाईनमधून पाणी नेण्याचे कार्य सुरू आहे. गुजरातमधील विकास पहायचा असेल, तर राहुल यांनी मारुती कारमध्ये बसावे आणि पाइपलाईनमधूनच सौराष्ट्रात जावे, असा उपरोधिक सल्ला भाजपावाले राहुल यांना प्रचारात देतात.

सौराष्ट्र नर्मदा अवतरण सिंचन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात जवळपास शंभरहून अधिक गावे ओलिताखाली येणार आहेत. पन्नास हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. खरीपाबरोबरच रब्बी पिकेही घेऊ शकणार आहेत. नर्मदा नदीचे वाहून जाणारे पाणी कालवे तसेच पाइपलाईनच्या माध्यमातून सौराष्ट्रातील विविध धरणांमध्ये आणि बंधाऱ्यांमधून फिरविले आहे. सव्वा हजार किलोमीटर लांबीची ही पाइपलाईन असणार आहे. सौराष्ट्रातील एकूण १३८ धरणांपैकी ११५ धरणांमध्ये हे पाणी फिरविण्यात आले आहे. या योजनेचा फायदा सौराष्ट्रातील ७३१ खेडी आणि ३१ छोट्या गावांना होणार आहे. मोदी पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले तेव्हा त्यांनी ही योजना जाहीर केली होती. त्याचे मूर्त स्वरुप आता दिसू लागले आहे.

गुजरातमध्ये जवळपास सात लाखांहून अधिक चेक डॅम्स बांधण्यात आले आहेत. त्यातून पाणी खेळविण्यात आलं आहे. पाणी जिरवण्यात आलं आहे. दोन वर्षे पाऊस चांगला झाल्यामुळे सर्व बंधारे तसेच जलसाठे भरलेले आहेत. नर्मदेचं पाणी कच्छ आणि सौराष्ट्रामध्ये नेऊन मोदींनी त्या भागातील बहुतांश ठिकाणची पाण्याची समस्या सोडविली आहे. प्रमुख शहरांना जोडणारे रस्ते चार पदरी, सहा पदरी होत आहे. राजकोट-अहमदाबाद रस्ता सहा पदरी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. वडोदारा-अहमदाबाद या एक्स्प्रेस वे वरून आवर्जून प्रवास करून पाहण्यासारखा आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या दहेज (भरूच) ते घोघा (भावनगर) या रो-रो अर्थात, एसी बोट सुविधेमुळे बारा तासांचे अंतर अवघ्या दीड तासावर आले आहे. ‘विकास गांडो थयो छे…’ म्हणणाऱ्यांनी धृतराष्ट्रासारखी डोळ्यावर पट्टी बांधली असावी, असेच म्हणावे लागते. त्यामुळे वीज, रस्ते, पाणी आणि पायाभूत सुविधा यांच्यावर काँग्रेसकडे बोलण्यासारखे काहीच नाही. 


काँग्रेस प्रचारात आरक्षणाच्या मुद्द्यावर जोर देऊन आहे. आरक्षण देण्याची भाषा काँग्रेस करते. पण याच काँग्रेसने भाजपाचा हक्काचा मतदार असलेल्या पटेल समाजाविरोधात ‘खाम’ची मोट बांधली. क्षत्रिय, हरिजन (दलित), आदिवासी आणि मुस्लिम यांना एकत्र आणून सत्ता काबीज करण्याचे प्रयत्न केले. पटेल समाज हे विसरला असेल, असे वाटते का? सरदार पटेल यांना काँग्रेसने दिलेली वागणूक, चिमणभाई पटेल यांची काँग्रेसमधून झालेली हकालपट्टी, काँग्रेसच्या कार्यकाळात चिमणभाई वगळता एकही पटेल मुख्यमंत्री न देण्याची काँग्रेसची खेळी, उलट भारतीय जनसंघ आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री झालेले बाबूभाई पटेल आणि चिमणभाई पटेल असे मुद्दे भाजपा प्रचारात हिरिरीने मांडत आहे. 

नरेंद्र मोदी हे धूर्त राजकारणी आहेत. मुरब्बी आहेत. मतदारांना, विशेषतः गुजराती मतदारांना कसे आपलेसे करायचे हे त्यांना नेमके माहिती आहे. काय बोलले, की काय होते, हे ते समजून आहेत. भरपूर विकासकामे केली. योजना आणल्या. त्या यशस्वीपणे राबविल्या. पण फक्त विकासकामांवर त्यांनी कधीच मागितली नाहीत. विकासकामांना त्यांनी भावनिकतेची जोड दिली. उदाहरणच द्यायचे झाले, तर सरदार सरोवराचे देता येऊ शकेल. मी पंतप्रधान झाल्यावर सरदार सरोवरासाठी काय केले एवढे सांगून ते थांबत नाहीत. तर काँग्रेसने कसे सरदार सरोवराच्या कामात अडथळे आणले, याचा पाढा ते वाचतात. काँग्रेसला हे काम करता आले नसते का, मनमोहनसिंग यांचे हात कोणी बांधले होते? असा प्रश्न ते विचारतात. काँग्रेसला गुजरात विकसित झालेले, पुढे गेलेले पहायचेच नाही वगैरे सांगून टाकतात. 

२००७मध्ये जेव्हा काँग्रेसने नरेंद्र मोदींना ‘मौत का सौदागर’ म्हटले तेव्हा त्यांनी हा पाच कोटी गुजराती लोकांचा अपमान असल्याचे सांगून काँग्रेसवर तो मुद्दा बुमरँगसारखा उलटविला होता. त्यानंतर ‘मौत का सौदागर’भोवतीच निवडणूक राहिली आणि फिरलीही. आजही निवडणुकीत हाफिज सईदचा मुद्दा मोदी भाषणांमध्ये वापरतात. हाफीज सईद सुटल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना इतका आनंद का झाला वगैरे वगैरे. वास्तविक तसे होण्याची शक्यता नसावी. पण त्या मुद्द्याच्या आधारे काँग्रेस आणि मुस्लिम यांच्यातील संबंध वगैरे समाजमनावर ठसविण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. हाफिज सईद तर मोदींच्या भाषणातील आवडता मुद्दा आहे. त्या निमित्ताने ते काँग्रेसवर निशाणा हमखास साधतात.


आणखी एक मुद्दा जो निवडणुकीत मह्त्त्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे संचारबंदी आणि दंग्यांचा. गुजराती समाज हा शांतताप्रिय आहे. आपण बरं, आपला व्यवसाय बरा आणि फायदा बरा एवढ्या पुरतेच त्याचे आयुष्य मर्यादित आहे. काँग्रेसच्या काळात मोठ्या प्रमाणावर हिंदू-मुस्लिम दंगे व्हायचे. कर्फ्यू अर्थात, संचारबंदी लागायची. मग ती पंधरा दिवस, महिनाभरही असायची. व्यवसाय बंद व्हायचे, माल पडून रहायचा, ग्राहक फिरकायचे नाहीत, पैसा अडकून रहायचा. फायदा तर दूरच. काँग्रेसच्या काळातील ते दिवस व्यापारी लोक विसरलेले नसावेत. पण मोदी सत्तेवर आल्यानंतर गेल्या पंधरा वर्षांमध्ये ग्रोधा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीनंतर एकही मोठा दंगा झालेला नाही. त्यामुळे व्यावसायिक खूष आहेत. अर्थातच, त्यामध्ये हिंदू आहेत, तसेच मुस्लिमही आहेत. दंगे, गुंडागिरी संपविल्याबद्दल ते मनापासून मोदी यांचे आभार मानतात. मोदी दंगे आणि कर्फ्यूचा मुद्दा आपल्या प्रत्येक भाषणात उपस्थित करतातच करतात.

गेल्या निवडणुकीत डभोईयेथे गेलो होतो. तेव्हा एका मुस्लिम सरबतवाल्याशी गप्पा झाल्या. मुस्लिम असा उल्लेखकरण्याचे कारण म्हणजे त्याने मोदीचे कौतुक केले होते म्हणून. गोध्रा दंगलीत आमच्या समाजाच्या लोकांच्या ज्या पद्धतीने कत्तली झाल्या, त्याबद्दल आम्ही मोदीला कधीच माफ करणार नाही. त्याबद्दलचा राग कधीच मनातून जाणार नाही. पण एक गोष्ट मान्य केली पाहिजे आणि ती म्हणजे त्यानंतर एकही दंगा झालेला नाही. त्यामुळे आमच्या व्यवसायाला कोणतीही बाधा पोहोचलेली नाही. नुकसान झालेले नाही. त्याबद्दल मोदींना नक्की धन्यवाद दिले पाहिजे. 

मोदींनी गुजरातमधील गुंडागर्दी आणि खंडणीखोरी बहुतांश प्रमाणात संपविली. आटोक्यात आणली. ते काय किंवा मुख्यमंत्री विजय रुपाणी सभांमधून त्याचा आवर्जून उल्लेख करतात. सलीम सुरती की तत्सम चार-पाच शहरांमधील गुंडांची गुंडागर्दी कशापद्धतीने संपवून टाकली, याचे दाखले देतात. गुंडांचा उल्लेख करताना आवर्जून त्यांच्या नावांचा उल्लेखही होतो. लोक जे समजायचे ते समजून जातात. दंगे थांबले, तशीच गुंडागर्दीही थांबली. व्यावसायिक वा व्यापारी कोणताही असो, त्याला आपला व्यवसाय पहिला. मग राजकारण. व्यवसायात अडथळे नाहीत, याचे श्रेय ते मोदी आणि भाजपाच्या राजवटीला देतात. सुरत आणि अहमदाबादच्या मार्केटमधील अनेक व्यापारी देखील ही गोष्ट मान्य करतात. 


भाषणामध्ये नसला, तरीही सोशल मीडियावर जोरदार चर्चेत असलेला एक मुद्दा म्हणजे काँग्रेसचे मुस्लिम लांगूलचालन. काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली, तर मुस्लिम पुन्हा डोके वर काढतील आणि आपल्याला डोईजड होतील, हा मुद्दा सर्वाधिक चर्चेत असलेला आहे. काँग्रेसने कायम मुस्लिमांचे लांगुलचालन केले आणि हिंदूंकडे दुर्लक्ष केले, ही भावना गुजरातमधील हिंदू समाजात घट्ट आहे. कदाचित राहुल यांच्या लक्षात हे आता आले. त्यामुळेच ते हिंदू मंदिरांमध्ये जाऊन देवदेवतांचे आशीर्वाद मागत आहेत. कोणीही कोणत्याही ठिकाणी जावे. पण इतकी वर्षे गुजरातमधील जनेतेने काँग्रेस नेत्यांना इफ्तारच्या पार्ट्या आयोजित करताना, जाळीदार टोप्या घालून शीरखुर्मा ओरपताना आणि दर्ग्यांमध्ये जाऊन चादरी चढवितानाच पाहिलेले आहे. इतक्या वर्षांच्या या स्मृती एकाच निवडणुकीत संपण्यासारख्या नाहीत. पण तरीही राहुल यांनी परिस्थिती मान्य केली हे नसे थोडके.

सोशल मीडियावर फिरत असलेला एका मेसेजची मला खूप गंमत वाटली. काँग्रेस सत्तेवर आली, तर मुस्लिमांमधील दुष्प्रवृत्ती आपल्या डोक्यावर बसतील, याची भीती समाजमनाला आहे. अनेक सामान्य लोक ती बोलून दाखवितात. व्यावसायिक दबक्या आवाजात सांगतात. रिक्षावाले खुलेपणाने याबद्दल बोलतात. त्यालाच खतपाणी घालणारा एक मेसेज सोशल मीडियावर फिरतो आहे. ‘उद्या जर काँग्रेस सत्तेवर आली, तर काँग्रेसच्या राजवटीत हे मुस्लिम लोक आपल्या घरामध्ये येऊन नमाज पढायला कमी करणार नाहीत.’ हा फक्त कळलेला मेसेज. हा नि असे कितीतरी अनेक मेसेज फिरत असावेत. यावरून आपल्याला दोन्ही समाजातील ऋणानुंबध आणि असलेली भीती हे समजून येऊ शकते. त्यामुळे गुजरात निवडणुकीचे विश्लेषण करताना, आडाखे बांधताना हिंदू-मुस्लिम संबंध हा मुद्दा अजिबात विसरता कामा नये. गुजरातमध्ये मुस्लिमांचा टक्का दहाच्या आसापासच आहे. त्यामुळे विकास वगैरे सर्व ठीक आहे. पण आजही गुजरातमध्ये नरेंद्र मोदी हे ‘हिंदुत्ववाद्यांचे आयडॉल’ म्हणूनच अधिक लोकप्रिय आहेत. आपलेसे वाटणारे आहेत. त्यामुळे चर्चेत नसला तरीही गुजरातच्या निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा आणि प्रभाव टाकणारा आहे.

वीज-पाणी-रस्ते यांच्याबद्दल काँग्रेसकडे बोलायला काहीही नाही. पण तरीही विकासाची आकडेवारी, वेगवेगळे अहवाल आणि सर्व्हे वगैरे पुढे करून राहुल गांधी याबद्दल भाषणांमध्ये बोलू शकतात. पण गुजरातच्या निवडणुकीवर प्रभाव टाकणाऱ्या हिंदू-मुस्लिम यांच्यातील संबंध, गुंडागर्दी, गुन्हेगारी, संचारबंदी वगैरे मुद्द्यांवर राहुल कोणत्या तोंडाने मोदींचा प्रतिवाद करतील. आणि मतदान जसजसे जवळ येत जाईल, तसतसे याच मुद्द्यांवर निवडणूक स्वार होईल.