Friday, January 02, 2009

साक्रीच्या मार्गावरची खाद्ययात्रा १


ताहराबादचा खान्देशी पाहुणचार..
सचिनच्या लग्नामध्ये शेव-जिलेबीचा पाहुणचार स्वीकारुन आम्ही पुन्हा बेलापूरच्या दिशेने निघालो. खान्देशमध्ये येऊनही वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, भाकरी आणि खिचडी असा खास खान्देशी पाहुणचार न घेतल्याचं सल आमच्या मनात होतं. त्यामुळं जाता जाता एखाद्या हॉटेल किंवा ढाब्यावर या पदार्थांचा आस्वाद घेता येतोय का, याचा शोध घेत निघालो.

साक्रीतनं बाहेर पडताना एक-दोन ठिकाणी चौकशी केली. पण त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं जेवावसंच वाटलं नाही. त्यामुळं पुढे निघालो. वाटेत ताहराबाद इथं साई गार्डन नावाचा ढाबा आहे. तिथं चांगल्या पद्धतीनं खान्देशी जेवण मिळेल, असं एकानं सांगतिलं. चला तिथं ट्राय मारु, असा विचार करुन आम्ही साई गार्डनमध्ये पोचलो.

बरं हा ढाबा आंध्र प्रदेशातल्या एका साईभक्त अण्णाचा होता आणि काम करायला (आचारी, वेटर, वाढपी वगैरे वगैरे) उत्तर प्रदेशी तसंच बिहारी. तिथं आम्ही खान्देशी पदार्थांची चव चाखण्यासाठी थांबलो. एकापेक्षा एक खवय्ये आणि खादाड असल्यामुळं चांगली दणकून ऑर्डर दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे शेवभाजी, बैंगन मसाला, बैंगन भरता, ज्वारीची भाकरी, मिरचीचा खर्डा आणि सरतेशेवटी दाल खिचडी. स्टार्टर म्हणून मागावले नाचणीचे (नालगीचे) पापड. नाचणीच्या पापडाचा आकार नेहमीच्या पापडापेक्षा जरा जास्तच मोठा होता. पण कांदा-टोमॅटो किंवा चाट मसाला न टाकताही नाचणीचा पापड मसाला पापडपेक्षा अधिक चविष्ट लागत होता.

साधारण दहा-पंधरा मिनिटं वाट पहायला लावल्यानंतर जेवण आलं. बैंगन मसालामध्ये झणझणीतपणा आणि चव यांचा सुवर्णमध्य साधण्यात आला होता. त्यामुळं भाजी काहीशी तिखट वाटत असली तरी मसाल्याची चव बिघडली नव्हती. शिवाय तर्री देखील जास्त नव्हती. काटेदार देठांसह वांग्याची भाजी करण्यात आल्यामुळं वांग्याची भाजी अगदी `टिपिकल` वाटत होती.

पण अशा ढाब्यांमध्ये भाज्या एकाच पद्धतीनं तयार केल्या जातात, असं ऐकलं होतं. एकच करी असते आणि त्यामध्ये हवी ती भाजी टाकली जाते. त्यामुळं बैंगन मसाला चांगला होता. त्याचं मला काही विशेष वाटलं नाही. पण वांग्याचं भरीत खाल्लं आणि चवीचं महत्व पटलं. वांग्याच्या भरतामध्ये कांदा आणि दाण्याच्या कुटाचा इतका अफलातून वापर करण्यात आला होता की विचारता सोय नाही. जेवता जेवता वांग्याचं भरीत आणि बैंगन भरता याच्या एक-दोन एक्स्ट्रा डिशेस मागवल्या. जोडीला मिरचीचा खर्डा होताच. अगदी झणझणीत. व्वा. व्वा...

दुर्गेश सोनार यांचा जोर शेवभाजीवर होता. पूर्वी एकदा खाल्लेली शेवभाजी त्यांच्या अजूनही स्मरणात होती. तेव्हा ते शेवभाजीवर तुटून पडले. शेवभाजीही अप्रतिम होती. काहीशी घट्ट आणि बैंगन मसालाचीच करी वापरल्यामुळं दोन्ही चवींमध्ये फारसा फरत वाटत नव्हता. पण तरीही शेवेची स्वतःची चव होतीच. मला वाटतं की शेवभाजीची डिशही आम्ही एक्स्ट्रॉ मागवली.

इतके सगळे चविष्ट पदार्थ असताना एक-दोन भाक-यांवर आम्ही थोडेच थांबणार होतो. दोनच्या चार भाकरी कधी झाल्या कळलंच नाही. सगळ्यांनी तीनपेक्षा जास्त भाक-या तोडल्या. इतकं सगळं ओढल्यानंतर खिचडी मागवायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झालाच नाही. एक प्लेट खिचडी मागावली. दुर्गेश आणि अमोल हे अगदी थोडा हातभार लावणार होते. माझ्यावर आणि संदीपवर खिचडी संपवण्याची जबाबदारी होती. पण सर्वांनी समान वाटा उचलला. त्यामुळं खिचडी पण उत्तम असल्याचं स्पष्ट झालं.

सहा जण अगदी रेटून जेवल्यानंतरही आमचं बिल अगदीच माफक होतं. तीनशे की सव्वातीनशे फक्त. इतकं चविष्ट आणि भरपूर जेवण फक्त काही रुपयांमध्ये ही चैन पुण्या-मुंबईला करता येत नाही. साक्री किंवा एखाद्या आडगावातच ही सोय आहे. नाशिक-सटाणा मार्गे कधी धुळे-साक्रीला जाण्याचा योग आला तर ताहराबादच्या साई गार्डनमध्ये जरुर स्टॉप घ्या आणि आडवा हात माराच...

साक्रीच्या मार्गावरची खाद्ययात्रा


मिसळपाव @ सटाणा डॉट कॉम...

आमचा जुना दोस्त सचिन बाबुलाल फुलपगारे याचं लग्न नुकतंच धुळ्यातल्या साक्री इथं पार पडलं. हैदराबादपासनं (ई टीव्ही) आम्ही एकत्र (रुममेट) असल्यामुळं त्याच्या लग्नाला मी जाणारच होतो. आमचे प्रमुख अशोक सुरवसे, मी, दुर्गेश सोनार, अमोल परांजपे आणि ई टीव्हीतला जुना सहकारी संदीप साखरे असे आम्ही सर्व साक्रीसाठी निघालो. सर्वच जण खवय्ये असल्यामुळे ट्रीपला एक वेगळीच मजा आली. झकास. यापूर्वी अनेक ठिकाणी मित्रांबरोबर गेलो होतो. पण साक्री म्हणजे साक्री...

बेलापूरहून निघालो ते बदलापूरला वैभव नावाच्या एका ढाब्यावर थांबलो होतो. तिथं खान-पान उरकल्यानंतर आम्ही नाशिकच्या दिशेनं रवाना झालो. मुंबई-नाशिक महामार्गावर दोन ठिकाणी चहासाठी थांबल्यानंतर मग थेट नाशिक गाठलं. जुन्या सीबीएस बाहेरच्या चहाच्या गाडीवर मस्त दोन कप चहा मारल्यानंतर मग साक्रीच्या दिशेनं रवाना झालो.

साधारण साडेसातच्या सुमारास सटाणा (बागलाण) इथं पोचलो. तिथं चहा घ्यावा आणि मग पुढे जावं असा विचार होता. तिथं पोचल्यानंतर `झंकार` नावाच्या एका छोट्या हॉटेलसमोर गाडी थांबली. तिथं सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरु होती. मिसळ, पोहे आणि बटाटे वडे असा मेन्यू तयार होत होता. मग काय, फक्त चहावर थांबणं शक्यच नव्हतं. जे काही पहिल्यांदा तयार होईल, त्यावर ताव मारुन मगच गाडी बाहेर काढायची असं ठरलं.

मिसळीसाठी आवश्यक मसाला आणि तर्री तयार करताना पाहिल्यानंतर भूक आणखी चाळवली जात होती. आदल्यादिवशी ब-यापैकी रेटलं होतं. तरीपण सक्काळी सक्काळी कडकडून भूक लागली होती दहा-पंधरा मिनिटं कळ काढल्यानंतर पोहे आणि मिसळ तयार झाली.

सुरवातीला प्रत्येकानं एक-एक मिसळ आणि पाव घेण्याचं ठरवलं पोहे, शेव, पातळ पोह्याचा चिवडा आणि या सर्वांवर मटकीच्या उसळीचा रस्सा व्वा.. व्वा... पुण्यातल्या तमाम मिसळवाल्यांच्या तोडीस तोड मिसळीचा आस्वाद घेताना स्वर्गीय सुखाचा आनंद होत होता. मिसळ इतकी झणझणीत होती की, घाम निघत होता. पण तरीही दोनदा रस्सा घेण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. पुणेकरांना लाजवतील इतक्या पाट्या `झंकार`मध्ये होत्या. त्यातली एक पाटी अशी होती की, रस्सा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पण कदाचित आम्ही बाहेरगावाहून आल्यामुळं आम्हाला पुन्हा पुन्हा रस्सा देताना त्यानं का-कू केलं नाही. फक्त रस्साच नाही तर कांदा, शेव आणि लिंबूही त्यानं दोन-तीनदा फिरवलं.

मिसळ इतकी झक्कास होती की, सुरवातील फक्त पोहे खाण्याची तयारी दर्शवणा-यांनाही मिसळ खाण्याचा मोह आवरत नव्हता. मिसळीचा पहिला राऊंड होईपर्यंत पोहे तयार झाले होते. मग काय, सर्वांनी पोह्यांकडे मोर्चा वळवला. पोहे पण लय भारी होते. पोहे करताना झणझणीत ठेच्याप्रमाणेच त्यामध्ये लिंबू आणि साखरेची चव जाणवण्यासारखी होती. त्यामुळे त्याला अगदी (माझ्या) घरच्या पोह्यांसारखी चव आली होती. पोहे आणि मटकीचा रस्सा हे अफलातून कॉम्बिनेशन वेड लावणारं होतं. पोह्यांचा पहिला राऊंड झाल्यानंतर मी आणि संदीपनं दोघात एक प्लेट पोहे मागवले. (किती खाल्लं त्याचा विचार केला की, अगदी कसं कसं होतं.)

आणखी सांगायची (किंवा न सांगण्यासारखी म्हणाल तर अधिक उत्तम.) गोष्ट अशी की, त्याठिकाणी आमच्या पोह्याच्या दोन प्लेट संपल्यानंतर `झंकार`चा आचारी वडे काढयला घेत होता. बटाटे स्मॅश करुन त्यामध्ये घालण्यासाठी मिरच्या आणि इतर मसाला तयार करत होता. पोहे संपल्यानंतर आम्हाला खरं तर तिथला वडा टेस्ट करायचा होता. त्यामुळे चहा पिऊन होईपयर्यंत जर वडे काढले तर एक-एक वडा टेस्ट करु, असं ठरलं. पण दुर्दैवानं आम्ही तिथून निघेपर्यंत वडे निघाले नव्हते. सो बॅड ना...

इतकं सगळं रेटल्यानंतर चहा हवाच. `झंकार`समोरच योगेश्वर टी` नावाची एक छोटीशी चहाची टपरी होती. साध्या चहापेक्षा स्पेशल चहा मागवला. काहीसा कडक आणि कमी गोड ही माझ्या स्पेशल चहाची व्याख्या. माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगला चहा मला तिथं मिळाला. दुधात पाणी मिसळलं नसल्यानं म्हणजेच फक्त दूध वापरुन चहा केल्यामुळं त्याची चव आणखीनच चांगली लागत होती चहा चांगला असल्यामुळं आणखी एका स्पेशल मागवला.

मिसळ-पाव, दीड-दोन प्लेट पोहे आणि मग फक्कड चहा घेतल्यानंतर आम्ही साक्रीच्या दिशेनं निघालो... सचिनच्या लग्नामध्ये अस्सल खान्देशी मेन्यू असेल असा विचार मनात ठेवून. संस्कृतमध्ये एक म्हणच आहे की, `मिष्टान्न इतरे जनः` अर्थात, लग्नामध्ये जेवण काय आहे, गोड काय आहे, यामध्येच बहुतेकांना रस असतो. त्यानुसार आम्हालाही तिथल्या जेवणाबद्दल उत्सुकता होतीच.

तुम्ही जर कधी सटाण्याला गेलात तर एस. टी. स्टॅण्डच्या अलिकडे असलेल्या (किंवा पेट्रोल पंपासमोर असलेल्या) झंकार आणि योगेश्वर या स्टॉल्सला नक्की भेट द्या.