Friday, December 21, 2012

कशी साधली मोदींनी हॅट्‍ट्रिक?

विकास कामांना राजकीय धूर्तपणाची साथ

गुजरात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; तसेच भारतीय जनता पक्ष यांची प्रयोगशाळा आहे, या राष्ट्रीय स्तरावर व्यक्त होणाऱ्या मतावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा, स्वबळावर पाचव्यांदा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून भाजपने मक्तेदारी सिद्ध केली आहे. सलग २२ वर्षे सत्तेत असल्यामुळे आलेली ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’, दोन्ही टप्प्यातील विक्रमी मतदान आणि खुद्द संघ परिवारातील अनेक संघटनांनी उघड उघड पुकारलेले बंड... अशा गोष्टी विरोधात असूनही मोदी यांनी जवळपास गेल्या वेळेइतक्याच जागा अधिक जिंकून सर्व विरोधकांना पुन्हा एकदा गप्प केले आहे. 

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचे विजयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहेच. त्याच बरोबर येणाऱ्या संकटांना ओळखून वेळीच त्याविरोधात मोदी यांनी आखलेल्या रणनीतीनेही भाजपच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी निभावली आहे. काय होती ती रणनीती हे पाहू या... 


१) केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीच्या स्थापनेमुळे सौराष्ट्रात भाजपची धूळधाण होईल. कारण पटेल समाज हा केशुभाईंच्या पाठिशी आहे वगैरे...

- मुळात सर्व पटेल समाज हा केशुभाईंच्या पाठीशी आहे, हा एक गैरसमज होता. मात्र, मोदी यांनी कोणतीही ‘रिस्क’ घेतली नाही. त्यांनी तब्बल ५५ पटेल उमेदवारांना तिकिटे दिली. त्यापैकी ४० जण निवडून आले; तसेच त्यांनी ९८ आमदारांना पुन्हा तिकिटे दिली. सर्वच्या सर्व मंत्र्यांना पुन्हा रिंगणात उतरविले. कारण या मंडळींना तिकिटे नाकारली असती, तर ते थेट केशुभाईंच्या गोटात दाखल झाले असते, अशी भीती होती.
लेवा पटेल समाजाची १४ टक्के मते एकवटली. तशीच त्यांच्या विरोधातील कडवा पटेल, राजपूत, क्षत्रिय आणि इतर मागासवर्गीयांची मतेही एकवटली. ही मते भाजपकडे वळविण्यात मोदी यशस्वी झाले. त्यामुळे केशुभाईंनी वेगळी चूल मांडूनही भाजपला सौराष्ट्रात विशेष धक्का जाणवला नाही. तर दक्षिण गुजरातमध्ये भाजपची कामगिरी वधारली. केशुभाई आमच्यासोबत नसले तरी पटेल समाजात मानाचे स्थान असलेल्या नरहरी अमीन यांचा भाजपला पाठिंबा आहे, हे समाजमनावर ठसविण्यात मोदी यशस्वी झाले. 

२) सलग चारवेळा सत्तेत असल्यामुळे भाजप आणि उमेदवारांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’ होती. 

- नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दिलीप संघानी, प्रफुल्ल पटेल आणि जयनारायण व्यास तसेच प्रदेशाध्यक्ष आर. सी. फलदू यांना पराभवाचा धक्का बसल्याने ही ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’ प्रकर्षाने दिसून आली. मात्र, मोदी यांनी काही मंत्र्यांचे मतदारसंघ बदलले. काहींना दुसऱ्याच विभागातून लढविले. म्हणजे आनंदीबेन पटेल यांना पाटणऐवजी अहमदाबादमधील घाटलोडियातून उतरविले आणि निवडून आणले. अत्यंत निकटवर्तीय असलेल्या सौरभ पटेल यांना सौराष्ट्रातील बोटादऐवजी बडोद्यातील अकोटामधून रिंगणात उतरविले. तेथून ते जिंकले. अनेक प्रस्थापित मंत्री आणि उमेदवारांना मतदारसंघ बदलण्यास भाग पाडले. जाहीर सभांमध्ये नरेंद्र मोदी यांचा आग्रह भाजपला आणि कमळाला मत द्या, असाच आग्रह असायचा. बहुतांश ठिकाणी ते उमेदवाराचे नाव घेणेही टाळत. जेणेकरून उमेदवाराकडे पाहून मत न देता माझ्याकडे पाहून मत द्या, असे सांगून त्यांना ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’ची धार कमी करायची होती. 


३) संघ परिवारातील अनेक संघटना, वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते मोदी यांच्याविरोधात कार्यरत होते. गुजरात परिवर्तन पक्षाच्या स्थापनेमागेही यापैकीच काही जणांचा हात असल्याची चर्चा होती. 

- नरेंद्र मोदी यांचा स्वतःचा करिष्मा असला आणि त्यांच्या तोडीचा सर्वमान्य नेता आज तरी गुजरातमध्ये नसला तरी केशुभाई यांना कमी लेखण्यास मोदी तयार नव्हते. त्यामुळेच त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरला संघ मुख्यालयात जाऊन भेट घेतली. संघाचे काही वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवक आणि प्रचारकही केशुभाईंसाठी काम करीत होते. त्यांना संघाकडून योग्य तो संदेश जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यानंतर संबंधितांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.
विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध कमी व्हावा, यासाठी ते परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले. ‘मोदी यांना विहिंपचा विरोध नाही. तसा दावा कोणी करीत असेल तर त्यात तथ्य नाही. ते एका व्यक्तीचे मत असू शकेल,’ असे जाहीरपणे मत सिंघल यांनी तेथे मांडले. त्यामुळे परिवारातील विरोधाचे हत्यार त्यांनी मोठ्या चतुराईने बोथट केले. 

४) शहरांमध्ये भाजप होताच. तुलनेने ग्रामीण भागात परिस्थिती दोलायमान होती. त्या ठिकाणहून पाठबळ मिळणे आवश्यक होते. 

- निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मोदी यांनी संपूर्ण गुजरातमध्ये ‘गरीब कल्याण मेलो’ घेतले. गावातील महिला, अपंग, अल्पसंख्याक, झोपडपट्टीवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांकडून त्यांनी अर्ज भरून घेतले. त्यामध्ये उद्योगासाठी, व्यवसायासाठी सरकारकडून काय अपेक्षित आहे, याची माहिती होती. विविध योजनांच्या नावाने त्यांनी लोकांना अपेक्षित असलेल्या वस्तूंचे वाटप केले. पैशामुळे शिक्षण थांबले असलेल्या गरीब विद्यार्थांना मदत केली. सरदार पटेल, इंदिरा आवास, आंबेडकर आणि दीनदयाळ आवास योजनेअंतर्गत घरे आणि प्लॉट्सचे वाटपही झाले. प्रत्येक मतदारसंघात जवळपास दहा हजार आणि एका जिल्ह्यात ४० ते ५० हजार लोकांना या योजनेचा फायदा झाला. काही हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले. या योजनेत फायदा झालेले भाजपचे मतदार नव्हते किंवा सहानुभूतीदारही नव्हते. मात्र, कार्यक्रमानंतर त्यापैकी काही जणांशी नव्याने नाते जोडण्यात भाजपला यश आले. या योजनेचा मोदींच्या विजयात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. 

(सौजन्यः महाराष्ट्र टाइम्स, पुणे)

Friday, December 14, 2012

गावात सीएनजी रिक्षा नि क्राँकीटचे रस्ते

अमन शांतीचा मुस्लिमांनाही विश्वास

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन एव्हाना चार दिवस होऊन गेले होते. सुरतमध्ये लिंबायत हा शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही भाग असलेला मतदारसंघ सोडला तर ग्रामीण भागामध्ये फारसं जाणं झालं नव्हतं. त्यामुळं आम्ही व़डोदरापासून साधारण तीस किलोमीटरवरील डभोईला जायचं ठरविलं. म्हणजे ग्रामीण भागात काय माहोल आहे ते कळेल आणि मोदींच्या विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे का, हे ही समजेल.

सो सकाळी सकाळी डभोईच्या दिशेनं निघालो. डभोई हा गुजरातचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचे चिरंजीव सिद्धार्थभाई पटेल यांचा मतदारसंघ. चिमणभाई यांच्या पत्नी उर्मिलाबेन यांचे हे मूळ गाव. त्यामुळे सिद्धार्थभाई येथून निवडणूक लढवितात. २००२ चा म्हणजे गोध्रा दंगलीनंतरच्या निवडणुकीचा अपवादवगळता प्रत्येक वेळी डभोईने सिद्धार्थभाईंना साथ दिली आहे. यंदाच्या वेळेस भाजपने बाळकृष्णभाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पंचवीस वर्षांपासून ते भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


गंमत म्हणजे वडोदरा ग्रामीणमधील भाजपला अनुकूल अशा ७० मतदारयाद्या डभोईमध्ये जोडण्यात आल्या आहेत. म्हणजे जवळपास सात हजार मतदान नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. शिवाय दिलीप पटेल या काँग्रेस नेत्याने बंडाचा झेंडा फडकाविल्यामुळेही सिद्धार्थ पटेल यांची डोकेदुखी वाढली आहे. दरवेळी स्वतःच्या  मतदारसंघाची जबाबदारी कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांच्या जीवावर टाकून सिद्धार्थ पटेल हे वाघोडिया, पादरा, सावली आणि छोटा उदयपूर अशा वडोदरा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये फिरायचे आणि प्रचार करायचे. मात्र, यंदा भाजपने त्यांच्याच मतदारसंघामध्ये टाईट करून टाकले आहे. तेव्हा सिद्धार्थभाई यांना बाहेर पडण्याची संधीच पक्षाने दिलेली नाही.

डभोई हे साधारण एक लाख किंवा सव्वा लाख लोकसंख्या असलेले गाव. अगदी जुने गाव. शहराच्या चार दिशांना चार मोडकळीस आलेले किल्ले आहेत. डभोईच्या राजाने ते किल्ले बांधले होते, असे म्हणतात. डभोईची नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. गावात काँक्रीटचे रस्ते आहेत. पाणी आणि विजेचा प्रॉब्लेम नाही. गावामध्ये फक्त सीएनजी रिक्षा आहे. फक्त सीएनजी रिक्षा असून उपयोग नाही. रिक्षात सीएनजी भरण्यासाठी पंपही गावाजवळच एक किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाच-सहा तास लाईनमध्ये थांबण्याची वेळ रिक्षा चालकांवर येत नाही.

२००२ च्या दंगलीत हे गावही दंगलीत होरपळले होते. तेव्हाच सिद्धार्थ पटेलही पराभवामध्ये होरपळून निघाले होते. मात्र, आता अमन आणि शांती आहे, असं मुस्लिम नागरिकही मान्य करतात. गावामध्ये साधारण तीस हजारच्या आसपास मुस्लिमांची संख्या आहे. बाजारपेठेतून फिरताना अनेक ठिकाणी मुस्लिमांची दुकानं ठळकपणे दिसून येतात. गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीचा पेहराव पाहून आणि त्यांच्या दुकानात लावलेल्या तसबिरींवरून. पण ब-याच दुकानांमध्ये मोदी यांच्या विकास कामांची प्रसिद्धी करणारे कॅलेंडरही लावलेले दिसते. आता यामागे उत्स्फूर्तता किती आणि सक्ती किती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही.

गावामध्येही मोदी यांच्याच नावाचा जप चाललेला दिसतो. काँग्रेसकडे नेता नाही आणि मोदी यांनी कामे केली आहेत, असे लोकांचे म्हणणे असते. वीज, पाणी आणि रस्ते यापुरताच गावकरी विकासाकडे पाहत असल्याचे जाणवते. बाकी किती उद्योग आले किंवा रोजगार किती मिळाला, यात त्यांना विशेष रस नसतो. डभोईमध्ये तसा कोणताही मोठा उद्योग नाही किंवा रोजगाराच्या संधी नाहीत. पण त्याबद्दल लोक नाराजी व्यक्त करताना दिसत नाहीत.  

डभोईत भरपूर फेरफटका मारल्यानंतर मग तिथून पन्नासएक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावली येथे नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी गेलो. गुजरातेत येऊन कव्हर केलेली ही त्यांची तिसरी सभा. पहिली सभा २००२ मध्ये मणिनगर येथे. दुसरी २००७ मध्ये बापूनगर येथे आणि तिसरी सावली येथे. पूर्वीच्या दोन्ही सभा शहरातील होत्या. पण ही गावाकडची पहिलीच. त्यामुळे मलाही खूप उत्सुकता होती.
सभेसाठी मोदी येण्यापूर्वीचे वातावरण आणि नंतरचे वातावरण यात जमीन अस्मानाचे अंतर असते. पूर्वी मैदानही भरलेले नसते. पण मोदी यांचे हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालू लागल्यानंतर लोकांची संख्या आणि उत्सुकता दोन्ही वाढली. मोदी व्यासपीठावर येताच हारतु-यांचा कार्यक्रम होतो. मग कोणतेही सोपस्कार पार न पाडता मोदी थेट माईकचा ताबा घेतात आणि उपस्थित जनतेचाही. 


उपस्थितांशी संवाद साधत ते सभेवर पूर्णपणे कब्जा मिळवितात. सोनिया मॅडम, राहुलबाबा अशी ठेवणीतील विशेषणे वापरून लोकांच्या टाळ्या मिळवितात. राज्यात तुम्हाला विकासकामे दिसतात की नाही किंवा आपल्या गुजरातचा ताबा तुम्हाला अनोळखी नि अज्ञात लोकांच्या हातात द्यायचा आहे का... असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे लोकांकडूनच काढून घेतात. गुजरातचा चौकीदार असून तुमच्या सुरक्षिततेसाठी मी गांधीनगर येथे बसतो आहे, असे वाक्य फेकतात. सध्या निवडणुकीत भावनिक मुद्दा नसल्यामुळे मग सर क्रीकचा मुद्दा काढून काँग्रेस आणि पंतप्रधानांना लक्ष्य करतात. सर क्रीक पाकिस्तानच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा डाव आहे. तसे झाले तर पाकिस्तान थेट गुजरातच्या घरात येईल, असे सांगून लोकांच्या मनात भीतीचे पिल्लू सोडून देतात.

सभेच्या शेवटी कमळाच्या चित्रावर शिक्का मारायला सांगतात. कमळाला मत म्हणजे फक्त उमेदवाराला मत नाही, तर गुजरातच्या विकासाला मत वगैरे सांगतात. मात्र, भाजपच्या उमेदवाराचे नाव घेत नाहीत. फक्त भाजपला आणि कमळाला मत देण्याचे आवाहन करतात. नरेंद्र मोदींच्या स्वभावातील मै अगदी थोड्या स्वरूपात का होईना पण इथंही दिसून येतो.

Wednesday, December 12, 2012

तीन मुस्लिमांची कहाणी


खुबसुरत सूरतमधील भन्नाट अनुभव

गुजरातमध्ये मुस्लिम नागरिकांची म्हणजेच मुस्लिम मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. अगदी गुजरातच्या दिशेने जाणा-या गाड्यांमध्ये बसल्यापासून हा अनुभव येऊ लागतो. बुरखा घातलेल्या महिला किंवा पांढरी जाळीची टोपी घातलेले पुरुष किंवा टिपिकल बोहरी मंडळींची संख्या वाढलेली सहजपणे लक्षात येते. अगदी द्वारकेपर्यंत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मग सुरतही त्याला कसा अपवाद असणार. सुरतमध्ये दोन दिवस फिरलो. त्यावेळचे हे काही अनुभव...



पहिला अनुभव एका चहावाल्याचा. सुरत टेक्सटाईल मार्केटमध्येच एका ठिकाणी चहा खूप चांगला मिळतो, असं समजलं. म्हणून मग तिथं चहा प्यायला गेलो. चहावाला मुस्लिम होता. ते आधी मा्हिती असतं तरी गेलोच असतो. चाळीशी-पंचेचाळिशी पार केलेला. डोक्यावर नेहमीची टोपी, पांढ-या रंगाची दाढी आणि नेहमीचा पेहराव. चहा एकदम फक्कड बनविला होता. खरोखरच मस्त.   

काय यंदा काय माहोल आहे, असं अगदी नेहमीचं वाक्य फेकल्यानंतर तो सुरू झाला. साहब, इस बार रंग बदलेगा... हे एकच मोजकं वाक्य बोलून स्वतःच्या चातुर्याचं दर्शन त्यानं घडविलं. मग आम्हीही सुरु झालो. म्हटलं भाई, क्यो बदलेगा रंग... तेव्हा त्याचं उत्तर खूप भारी होतं. म्हटला, अब बहुत हो गया. (वाजपेयी यांच्यापेक्षा छोटा पॉझ) महंगाई कितनी बढ गई है... अब बस हो गया. (मला वाटलं, की मोदींची राजवट खूप झाली असं त्याला म्हणायचं आहे. त्यासाठीच तो बस हो गया असं म्हणत असावा. खरंतर त्याला तेच म्हणायचं होतं. पण त्यानं ते चतुराईनं टाळलं.) त्याच्या मनात मोदींबद्दल कदाचित राग असावा, पण त्यानं तो व्यक्त करणं कौशल्यानं टाळलं. अगदी हसतहसत.

नंतर एक कडवट मोदी विरोधक पाहिला तो भाजपच्या एका रॅलीत. भाजपच्या लिंबायत मतदारसंघातील मराठी उमेदवार संगीता पाटील यांच्या रॅलीत आम्हीही सहभागी झालो होतो. माहोल अनुभवण्यासाठी. हा मतदारसंघ सुरत स्टेशनपासून चार-पाच किलोमीचटवर. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांची संख्या जाणवण्याइतपत आहे. यामध्ये फिरत असताना मुस्लिम नागरिकांची वस्ती असलेल्या मोहल्ल्यातून भाजपची रॅली जात होती. रॅली पुढे पुढे सरकत होती आणि वस्ती अधिकाधिक दाट होत होती.

एका ठिकाणी एका गल्लीतून एक एम ८० वाला समोर येऊन थांबला. बेकरी वगैरेचा व्यवसाय असावा. एम ८० वर दोन पिशव्या लटकविल्या होत्या. त्यावरून मी अंदाज बांधला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भगवे टी-शर्ट घातले होते आणि उपरणी परिधान केली होती. आम्हीच फक्त भगव्या रंगाशिवाय होतो. आम्ही त्यांच्यापैकीच एक आहोत, असं समजून आमच्याकडे पाहून अत्यंत त्वेषानं तो म्हणाला, मोदीने कुछ बॉटल बिटल भेजा है क्या... एकच वाक्य बोलला पण काय बोलला. एकच बोला लेकिन क्या बोला... मोदींबद्दलचा राग, द्वेष, चीड, संताप, खुन्नस त्याच्या शब्दात आणि प्रश्न विचारण्याच्या शैलीत अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो. पण त्याचे डोळे अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

नंतर रॅली फक्त मुस्लिमांच्या वस्तीतून फिरत होती. तेव्हा भाजपच्या घोषणांना त्या वस्तीतील छोटी छोटी शेंबडी पोरं जोरदार प्रत्युत्तर देत होती. कमल जिताओ... या घोषणेला पंजा जिताओ... किंवा वच्चा रे वच्चा कमल वच्चा (आलं रे आलं कमळ आलं) या घोषणेला वच्चा रे वच्चा पंजा वच्चा अशी प्रत्युत्तर मिळत होती. पंजाचे झेंडे फडकाविणं किंवा पंजाच्या नावानं घोषणा देणं, हे काम होतं शेंबडी पोरं करत होती. शाळेत किंवा मदरशात जसं शिक्षण मिळतं तसंच मोदी किंवा भाजपविरोधाचं अथवा काँग्रेस प्रेमाचं शिक्षण या मुलांना घरात किंवा परिसरात मिळत असावं.   

तिसरी व्यक्ती भेटली नरेंद्र मोदी समर्थक. भाजपचे नवसारीचे खासदार सी. आर. पाटील (हे देखील मराठीच आहेत.) यांच्या संपर्क कार्यालयात दक्षिण गुजरातसाठी मिडीया सेल स्थापन केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते माधव भंडारी हे त्याचे प्रमुख आहेत. मराठीमध्ये अत्यंत प्रभावीपणे बोलणारे भंडारी हे गुजरातीतूनही तितकाच अस्खलित आणि सहज संवाद साधू शकतात, हे तिथं कळलं.

तर त्याच कार्यालयात दक्षिण गुजरात विद्यापीठात मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम करणारी सेरा शेख ही विद्यार्थिनी भेटली. ती या मिडीया सेलमध्ये भंडारी यांची असिस्टंट म्हणून काम करीत होती. मकरंद जोशी नावाचा मराठी युवकही तिथं असिस्टंट म्हणून कार्यरत होता. ही सेरा शेख दिसायला एकदम मॉडर्न. टकाटक. जीन्सची पॅन्ट आणि हिरव्या रंगाचा लूज टॉप. मनातील स्टिरिओटाईप प्रतिमांमुळंहिचं नाव शेख असेल असं मनातही आलं नसतं.

तिचं नाव सेरा शेख असल्याचं समजल्यानंतर माझी उत्सुकता चाळविली. मग नंतर थोड्या वेळानं तिला विचारलं, तुला किंवा तुझ्या घरातील व्यक्तींना मोदींबद्दल काय वाटतं किंवा मुस्लिम समाजाचे ते विरोधक आहेत, असं वाटत का... त्यावर तिचं उत्तर मार्मिक होतं. मोदी यांना विकासाचे ध्येय आहे. मुस्लिमविरोधक म्हणून त्यांचे चित्र रंगविले जात असले तरी मला किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये कोणालाच तसे वाटत नाही. जी मंडळी कमी शिकलेली आहेत किंवा जे विचार न करता बोलतात त्यांना कदाचित ते मुस्लिमविरोधक वाटत असतील. पण आम्हाला त्यांचे काहीच वावडे नाही. तिला आणि तिच्या घरच्यांना मोदींचा राग नाही, हे आम्हालाही माहिती होतंच. अन्यथा ती भाजपच्या कार्यालयात मिडीया असिस्टंट म्हणून रुजू झालीच नसती.

सुरतमध्ये आलेले हे तीनही अनुभव खूपच बोलके होते आणि लक्षात राहण्यासारखे. नरेंद्र मोदींनी कितीही सदभावना यात्रा आणि दौरे केले तरी हा द्वेष आणि संताप कमी होईल का, याबद्दल अजिबात साशंकता नाही. ती कमी होणारच नाही.

Tuesday, December 11, 2012

भाई, ये केशुभाई किधर है...

सुरतमध्ये 'परिवर्तन'ची हवा नाही
२००२, २००७, २०१२... सलग तिस-यांदा गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये सोमवारी सकाळीच दाखल झालो. वातावरण खूप तापलं असेल किंवा प्रचार शिगेला पोहोचला असेल, अशाच समजुतीनं सुरतमध्ये पोहोचलो. पण वातावरण काहीच तापलेलं नव्हतं. कुठेही पदयात्रा दिसत नव्हत्या, घरोघरी संपर्क साधण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसत नव्हती. पक्षांच्या झेंड्यांची संख्या चांगलीच रोडावली होती, प्रमुख पक्षांची कार्यालयांमध्येही चहलपहल नव्हती. प्रचाराचा शेवटून दुसरा दिवस असला तरीही त्याचं प्रतिबिंब शहरात कुठेही उमटलेलं दिसत नव्हतं.





मला सर्वाधिक उत्सुकता होती, ती केशुभाई पटेल यांच्या पक्षाला किती जनसमर्थन आहे, हे जाणून घेण्याची. यंदाच्या निवडणुकीत तर गुजरात परिवर्तन पार्टीसारखा काँग्रेसला मोठ्या आशा असलेला पक्षही उतरला आहे. सुरत आणि दक्षिण गुजरातमध्येही अनेक भागात पटेल समाजाचे वर्चस्व आहे. सुरतमध्ये तर पटेल समाज मोठ्या संख्येने आहे. हिरे व्यापारी आणि टेक्सटाईल मार्केटमध्ये काम करणारे अनेक कामगार हे सौराष्ट्र भागातील आहेत. त्यामुळेच केशुभाई यांना इथे चांगला पाठिंबा मिळत असेल, अशी समजूत होती. केशुभाई यांचे दिवंगत सहकारी आणि सुरतचे माजी खासदार कांशीराम राणा हे सुरतचेच. त्यामुळे नाही म्हणायला सुरतमध्ये केशुभाईंच्या पक्षाचा विशेष जोर असेल, अशी माझी धारण होती. मात्र, परिस्थिती निराळीच निघाली. प्रचाराचे फक्त दोनच दिवस बाकी असताना, गुजरात परिवर्तन पार्टीचे ना कुठे बोर्ड दिसत होते ना कुठं प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसत होत्या. नना कुठल्या मोठ्या नेत्याची जाहीर सभा किंवा प्रचार फेरी लावण्यात आली होती.

जीपीपीचे (गुजरात परिवर्तन पार्टी... गुपप हा शॉर्ट फॉर्म वाचायला कसा तरी वाटतो) दक्षिण सुरत प्रभारी, सुरतचे माजी महापौर आणि महानगरपालिका फायनान्स बोर्डाचे माजी अध्यक्ष फकीरभाई चौहान यांच्याकडे गेलो. हे केशुभाईंचे कट्टर समर्थक आणि संघ-जनसंघाचे जुने कार्यकर्ते. साधारण ६५ किंवा ७० वर्षांची वामनमूर्ती. घरात गेल्यानंतर भिंतीवर जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे दोन मोठे फोटो लावलेले दिसले. समोरच सोफ्यावर फकीरभाई आरामात बसलेले. सुरत जिल्ह्यातील कोणत्या तरी गावाहून आलेल्या पक्ष कार्यकर्त्याशी संवाद साधत होते. निवडणुकीच्या धामधुमीत फक्त एकच कार्यकर्ता पाहून धक्काच बसला. किमान पाच-पंचवीस कार्यकर्ते तरी त्यांच्या आजूबाजूला असतील आणि रणनिती ठरविली जात असेल, असे चित्र माझ्या डोळ्यासमोर होते. पण तसे काहीच दिसले नाही.



आम्ही गेलो आणि त्या कार्यकर्त्याची जागा आम्ही घेतली. फकीरभाई संवाद साधताना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. अर्थातच, सौम्य प्रकृतीचे असल्याने सौम्य शब्दांतच. नरेंद्र मोदींच्या राज्यात कार्यकर्ते, भाजपचे नेते आणि भाजपचे चाहते यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळते. मी म्हणतो, तीच पूर्वदिशा, माझे म्हणणे ऐका किंवा माझ्याबरोबर येऊ नका, अशी त्यांची वृत्ती आहे. एकतर तुम्ही माझे चाहते व्हा नाहीतर मी तुमचा शत्रू होतो, अशीच मोदींची कार्यशैली आहे आणि तीच पक्षाला घातक आहे. त्यामुळेच केशुभाई आणि आम्ही त्यांच्यापासून दूर झालो, असे सांगून फकीरभाईंनी भडास काढली. सौम्य शब्दांत.

केशुभाईंच्या वयाचा मुद्दा भाजपकडून उपस्थित कसा करण्यात आला नाही. कारण मोदी एकदम तरुण तुर्क आणि केशुभाई वयस्कर. हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला नाही का, असे आम्ही विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, की सुरुवातीला हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला होता. केशुभाईंचे वय देवाचे नामस्मरण करण्याचे आहे, निवडणुकीत उतरण्याचे नाही, असा त्या प्रचाराचा सूर होता. मात्र, नंतर केशुभाईंची लोकप्रियता खूप असल्याने त्या प्रचाराला कोणीच धूप न घातल्याने भाजपला तो मुद्दा थांबवावा लागला, असे फकीरभाई यांनी सांगितले. मात्र, कदाचित हाच मुद्दा केशुभाई यांच्याविरोधात जाईल, हे सांगायला नकोच.

नरेश पटेल हे पटेल समाजाचे फार मोठे नेते. राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या जाहीर  द्र मोदी आणि त्यांचे संबंध फार मधुर नाहीत, अशी परिस्थिती. मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धूने गुजरातेत येऊन टोलेबाजी केली. क्रिकेट कॉमेंट्री आणि जाहीर सभेतील भाषण एकाच शैलीत करता येत नाही, हे त्याला कोण सांगणार. बोलता बोलता, तो केशुभाई हे देशद्रोही आहेत, म्हणाला. त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. त्यावेळी केशुभाई हे देशद्रोही नाहीत, अशी जाहीर  प्रतिक्रिया नरेश पटेल यांनी दिली होती. पटेल समाजाचे १०० टक्के मतदान व्हायला पाहिजे, म्हणून  ते प्रयत्नशील आहेत. फक्त कोणासाठी मतदान करायचे, हे जाहीरपणे सांगायला ते तयार नाहीत.

अशा सर्व परिस्थितीत सुरत किंवा दक्षिण गुजरातमध्ये गुजरात परिवर्तन पार्टीचा म्हणावा, तितका जोर जाणवला नाही. कदाचित तो सौराष्ट्रापुरताच मर्यादित असू शकतो. त्यामुळेच केशुभाईंच्या पक्षाने सुरत किंवा दक्षिण गुजरातमधील ३६ जागांसाठी विशेष रणनिती अवलंबिली नसावी. त्याचमुळे दक्षिण गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातच सामना असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा दावा जीपीपीचे नेते करीत असले तरीही त्या दाव्यावर माझा तरी विश्वास बसला नाही. कारण प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळेच सांगत होती.