Wednesday, July 25, 2007

चला खाऊया "अंडा राईस'...



















खाणारे काय श्रावणातही खातात. पण आम्ही मात्र श्रावण पाळतो, असं म्हणत लोकं आषाढात मांसाहाराचा फडशा पाडतात. अंडी, कोंबडी, बकरी, मेंढी, "पोर्क' आणि बरंच काही! आम्ही तर आसाममध्ये असताना बदकही हाणलं होतं. त्याची गोडी काही औरच. पण तूर्तास आषाढाचं स्वागत करताना अंड्यापासून सुरवात करावी, असं ठरवून नेहमीच्या अड्ड्यांकडे धाव घेतली.

अंडा ऑम्लेट, भुर्जी आणि "हाफ फ्राय' या पदार्थांप्रमाणंच गेल्या काही वर्षांपासून "अंडा राईस' हा पदार्थही अधिक लोकप्रिय झाला आहे. म्हणजे मला अधिक आवडू लागला आहे. तरी त्याला आता सहा-सात वर्ष झाली असतील. कुमठेकर रस्त्यावर शिक्षण संशोधन परिषदेबाहेर अशोक नावाचा माणूस अंडा भुर्जीची गाडी लावायचा. त्या गाडीवर भुर्जीप्रमाणेच राईसही चांगला मिळतो, असं समजल्यानंतर थेट धडकलोच.
प्रचंड गर्दी हे अशोकच्या गाडीची ओळख. कांदा मस्त बारीक चिरुन तेलात टाकायचा. अर्थातच, भुर्जीला लागते त्यापेक्षा थोडं जास्त तेल कढईत टाकायचं. कांदा मस्त "फ्राय' झाला की त्यात गरजेनुसार तिखट-मीठ टाकायचं व गिऱ्हाईकाच्या ऑर्डरप्रमाणं एक किंवा दोन अंडी फोडायची. मग अंडी, कांदा आणि मसाला हे मिश्रण तेलात मस्त खमंग होईपर्यंत "फ्राय' करुन घ्यायचं. खमंग भाजल्यानंतर त्यात आधीच शिजवून ठेवलेला भात टाकायचा आणि पुन्हा एकदा हे मिश्रण चांगलं परतून घ्यायचं. त्यावर पुन्हा थोडंसं मीठ टाकायचं. झालं चांगलं परतून झाल्यानंतर भात डिशमध्ये काढून "सर्व्ह' करण्यासाठी तयार. भातावर वरुन बारीक कोथिंबीर पेरायची. सोबतीला कांदा आणि लिंबू. आपण आडवा हात (चमचा!) मारण्यास तयार. अंडा आणि कांदा जितका "फ्राय' केलेला तितकी चव उत्कृष्ट हे समजून चालायचं.

अशोकचा राईस हे अजब मिश्रण आहे. एकदा का अशोककडील अंडा राईसची चटक लागली की त्यापासून दूर जाणं अवघड. सारं काही अचूक. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की अशोकच्या गाडीवर काही खाल्लं आणि दुसऱ्या दिवशी घसा खवखवला आहे किंवा त्रास झालाय, असं कधीच आठवत नाही. अंडा भुर्जीच्या इतर गाड्यांवर खाल्लं की दुसऱ्या दिवशी घसा धरलाच म्हणून समजा. कारण अशोक रिफाईंड तेलात पदार्थ करतो. हे ऐकून तुम्हाला आश्‍चर्य वाटेल. पण ते सत्य आहे.

अजून एका ठिकाणी तुम्हाला चांगला अंडा राईस मिळेल. सणस क्रीडांगणाच्या बाहेरील रस्त्यावर (कल्पना-विश्‍व हॉटेलच्या समोरील) तुम्हाला तीन-चार गाड्या आढळतील. त्यापैकी जास्त गर्दी असलेली लोखंडी गाडी म्हणजे गणेशची गाडी. अंड्याच्या पदार्थांप्रमाणेच बांगड्याचा "फिश राईस' देखील तुम्हाला या गाडीवर मिळेल. राईस करण्याची अशोकची पद्धत आणि गणेशची पद्धत यामध्ये प्रचंड फरक आहे. त्यामुळेच चवीत फरक आलाच.

गणेश प्रथम तेलात मीठ-मसाला-तिखट टाकून कांदा परतून घेतो. मग त्यात अंडी टाकण्याऐवजी प्रथम भात टाकतो. भात परतून घेतल्यानंतर त्यावर अंडी फोडतो. त्यामुळं अंडी वेगळी आणि भात वेगळा अशा पद्धतीनं "अंडा राईस' तयार होत नाही. तर भाताच्या अनेक शिंताभोवती अंड्यांचा अंश लागतो आणि मग तो खमंग परतला जातो. त्यामुळे त्याची चव काही औरच होते. हा भात खमंग परतल्यानंतर त्याला आणखी चव येण्यासाठी त्यावर चटण्यांची हलकी फवारणी करण्यात येते. मग हा भात काढून त्यावर कोथिंबीर आणि कोबी यांची सजावट केली जाते. अर्थातच, तुम्हाला कोबी आवडत असेल तर! मग त्यावर लिंबू पिळलं आणि सोबतीला कांदा घेतला की, आस्वाद घेण्यासाठी अंडा राईस तयार.


तिसऱ्या प्रकारचा अंडा राईस मी नुकताच "एमएमसीसी'समोर (मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज) एक मुस्लिम चाचा गाडी लावतो. त्याकडं अंड्याच्या पदार्थांची बरीच विविधता आहे. अंडा सॅंडविचपासून अंडा करीपर्यंत सारे काही त्याच्याकडं मिळतं. अंडा पराठा या तुलनेने वेगळ्या पदार्थाची चवही तुम्हा इथं चाखू शकता. या चाचाकडं एका पातेल्यात करी तयार असते. अंडा राईस करताना तो प्रथम सर्वांप्रमाणे कांदा, तिखट-मीठ आणि तेल परतून घेतो. त्यानंतर त्यात अंड फोडतो. पण हे मिश्रण तो खूप परतत नाही. थोडंस परतल्यानंतर तो त्यात करी टाकतो. ही "अंडाकरी' थोडीशी गरम झाल्यानंतर चाचा त्यामध्ये शिजविलेला भात घालतो आणि मग तो खमंग होईपर्यंत परततो. पहिल्या दोन "अंडा राईस'पेक्षा ही चव काही औरच आहे.

अशोककडे "सिंगल अंडा' राईसची किंमत आहे 15 रुपये आणि "डबल अंडा' राईसची 25 रुपये. तर गणेशकडे एका प्लेटमध्ये दोन अंडी घातलेला राईस मिळतो आणि त्याची किंमत आहे फक्त 20 रुपये. चाचाचा राईसचा दर आणखीनच वेगळा आहे. "हाफ' राईससाठी 16 रुपये आणि नीट आठवत नाही पण "फुल' राईससाठी 30 की 32 रुपये.


एक मात्र खरं की तिघांचेही राईसचे दर वेगळे आणि चवही निराळी. मात्र, तिघांची चवही तोडीस तोड आहे. मला तर अजूनही कळत नाही, कोणाचा "अंडा राईस' अधिक चांगला आहे. तुम्ही मला यामध्ये मदत कराल का? शक्‍य झालं तर तुम्हीही याठिकाणी जाऊन एकदा चव घेऊन पहा आणि ठरवा कोण अधिक चांगला आहे ते! अन्‌ मला पण सांगा तुम्हाला कोणाचा "राईस' अधिक चांगला वाटला. तुमच्याही आवडीचा एखादा "अंडा राईस'वाला असेल तर मला सांगा. तिकडंही भेट देता येईल. 

(सूचनाः एमएमसीसी समोरील अतिक्रमणे हटविण्याच्या नादात रेश्मा म्हणजेच चाचाची गाडी हटविण्यात आली होती. तीच गाडी आता आबासाहेब गरवारे कॉलेजसमोर सुरू आहे. आता गाडीचा विस्तार झाला असून छोटेखानी फूड जॉइंटचे स्वरुप त्याला आला आहे.)

Saturday, July 14, 2007

स्पर्धा न जिंकताही "ऑस्कर'!

रोम ः अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणाऱ्या ऑस्कर पिस्टोरियस याने "गोल्डन गाला' स्पर्धेतही चमकदार कामगिरी नोंदवून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या. मुख्य नव्हे तर पात्रता शर्यतीत दुसऱ्या क्रमांकावर राहूनही तोच चर्चेच्या केंद्रस्थानी होता, हे विशेष!

पुरुषांच्या 400 मीटरच्या पात्रता शर्यतीत त्याला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. चारशे मीटरच्या शर्यतीत स्टेफानो याने त्याला पराभूत केले; पण फक्त 0.18 सेकंदांनी. ऑस्करने ही शर्यत 46.90 सेकंदांमध्ये पूण केली. वास्तविक पाहता दुसऱ्या एखाद्या खेळाडूने ही कामगिरी नोंदविली असती तर त्याची दखलही कोणी घेतली नसती; पण ऑस्करच्या कामगिरीची दखल घेण्याचे एकमेव कारण म्हणजे दोन्ही पाय नसूनही त्याने नोंदविलेली लक्षवेधक कामगिरी.

गुडघ्याखाली धातूच्या पट्ट्या लावून जिद्द व चिकाटीच्या जोरावर धडधाकट धावपटूंना मागे टाकण्याच्या ऑस्करच्या कामगिरीला त्रिवार सलाम!! अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेत 200 मीटर धावण्याच्या शर्यतीत तो अजिंक्‍य ठरला आहे. मात्र, त्याला धडधाकट खेळाडूंच्या स्पर्धेत भाग घेण्याची त्याची मनापासून इच्छा होती. गेल्या महिन्यात आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्‍स महासंघाने अपंग खेळाडूंच्या "कार्बन फायबर ब्लेड्‌स' वापरण्यावरील बंदी उठविली व "कार्बन फायबर ब्लेड्‌स' वापरून अपंग खेळाडू इतर खेळाडूंशी स्पर्धा करू शकतात, असे जाहीर केले. त्यामुळे रोम येथे पार पडलेल्या "गोल्डन गाला' स्पर्धेत ऑस्कर पिस्टोरियस सहभागी होऊ शकला.

आता त्याची इच्छा आहे ऑलिंपिकविजेता जेरेमी वॉर्नियर याने त्याला पराभूत करण्याची. रविवारी शेफिल्ड येथे ब्रिटिश ग्रांप्रि स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, तेथे ऑस्कर व जेरेमी परस्परांचे प्रतिस्पर्धी आहेत. याशिवाय त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे पुढील वर्षी बीजिंग येथे होणाऱ्या ऑलिंपिक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे.

मात्र, यासंदर्भात ऍथलेटिक्‍स महासंघाने प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. ऑस्करला धावताना "कार्बन फायबर ब्लेड्‌स'मुळे काही फायदा तर होत नाही, याची तपासणी महासंघ शेफिल्ड येथील शर्यतीदरम्यान करणार आहे.


ऑस्कर द ग्रेट!

दक्षिण आफ्रिकेत जन्मलेला ऑस्कर अपंगांच्या ऑलिंपिक स्पर्धेमुळे चर्चेत आला. "द फास्टेट थिंग ऑन नो लेग्ज' असा त्याचा गौरव केला जातो. जन्मतःच दोन्ही पायांना नडगीचे हाडच नसल्यामुळे पाचव्या महिन्यातच ऑस्करचे दोन्ही पाय कापावे लागले होते. शालेय स्तरावर असताना तो रग्बी आणि वॉटर पोलोच्या स्पर्धांमध्येही सहभागी होत असे.

दरम्यानच्या काळात दुखापतीमुळे त्याच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच काळात तो ऍथलेटिक्‍सच्या प्रेमात पडला व त्यानंतर त्याच्या गुडघ्याखाली "कार्बन फायबर ब्लेड्‌स' बसविण्यात आले आहेत. सध्या तो "युनिव्हर्सिटी ऑफ प्रिटोरिया' व्यवसाय व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करीत आहे.
-----------
कमाल ऑस्करच्या जिद्दीची
- अपंगांच्या शंभर, दोनशे आणि चारशे मीटरच्या शर्यतींचा जागतिक विक्रम.
- गेल्या तीन पॅरालिंपिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकांची लयलूट.
- 100 मी. - 10.91 सेकंदांत, 200 मी. -21.98 सेकंदांत, तर 400 मी. - 46.56 सेकंदांमध्ये पूर्ण करण्याचा विक्रम.
------------
फायबर ब्लेड्‌सचा वाद
- फायबर ब्लेड्‌स गरजेपेक्षा लांब त्यामुळे फायदा मिळत असल्याचा आक्षेप.
- ब्लेड्‌समुळे शर्यत सुरू करताना प्रचंड ताकद लागते, असे ऑस्करचे मत.
- ऑस्करच्या या मताचे मियालामीमधील प्राध्यापकांकडून समर्थन.
- ब्लेड्‌समुळे घसरून पडण्याची किंवा ब्लेड्‌स निखळण्याची शक्‍यता अधिक.

Thursday, July 12, 2007

Lal Krishna Advani: Pleasant Personality

Six feet tall, Fair in colour, old but not tired, good command over English and ready to face any situation... This is the image of Lal Krishna Advani once again emerged in pune. I had got opportunity to meet Advani twice before. But there is no change in his personality.

Thanks to Pune Union of Working Journalist, Who gave opportunity to meet and interact with opposition leader in Lok Sabha Mr. L. K. Advani. Of course Presidential election issue was the crux of his speech and that issue was highlighted the question answer session.

In his speech he touched all the issues including presidential candidates, why NDA is opposing Pratibha Patil, why Bhairosingh is contesting election as independent candidate, what was the quality of election campaign between Neelam Sanjeev Reddy and V. V. Giri. Many statements of Advani were already published in media so there is no point to give all that discussion here. I just want to give some of my observations here.

The person who comes on time is not a politician is the common definition of leader. Many leaders including Bhartiya Janata Party are `Late Latifs`. But Mr. Advani seems to be exception to that. Program of Meet the Press was at 4 pm. But Mr. Advani was present at Patrakar Sangh at 3.45 pm and he came to the dais at 3.55 before the time to start.

In the beginning of `Meet the Press` program, secretary of PUWJ Mr. D. R. Kulkarni gave instruction to all journalists to switch off their mobile phones or to keep them on silent mode. Interesting thing to observe is that taking cognizance of this instruction Advani immediately brought his mobile out of his jacket. Switched it on silent mode and again put in pocket. In many other programs you can see that those who are on dais are reluctant to instructions including all the politicians. But this is the uniqueness of leaders like Advani.

Advani is in active politics from 1952 and he also told that thing in his speech. One journalist asked him about Shekhawat that Mr. Vice President is using his office for campaign. That senior journalist told Advani that Shekhawat is using telephone in his office to call MP’s and MLA’s for the campaign. Within the fraction of second Advani replied that could you please tell me the single person to whom Mr. Shekhawat has called from his office. Advani informed the house that Mr. Shekhawat has installed separate phone line in his office only for the election campaign purpose. He is using that line for his campaign.

He also registered his view on the issue that Shekhawat contesting Presidential Election without giving resignation as Vice President. Advani told that there is provision in constitution for this thing. You can contest Presidential election without giving resignation of VP.

Monday, July 09, 2007

लक्षात राहणारे चंद्रशेखर...

प्रभावी वक्ता आणि साधा नेता

अर्थसंकल्पावरील चर्चा असो, विश्‍वासदर्शक किंवा अविश्‍वासाचा ठराव असो अथवा भारतीय स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने आयोजित विशेष अधिवेशनातील मंथन असो... दूरदर्शनवर थेट प्रक्षेपणाची सुविधा उपलब्ध झाल्यामुळे देशातील अनेक नेत्यांची भाषणे घरबसल्या ऐकायची संधी प्रत्येकाला प्राप्त झाली. त्यात लहानपणापासून राजकारणात रस असल्यामुळे ही भाषणे ऐकणे हा माझा आवडता उद्योग झाला होता. पण याचा निश्‍चितच खूप फायदा झाला.

इंद्रजित गुप्त आणि सोमनाथ चॅटर्जी यांचे ओघवत्या इंग्रजीतील काहीसे बोजड पण प्रचंड माहितीपूर्ण भाषणे ऐकता आली. अटलबिहारी वाजपेयी यांचे सुमधूर हिंदीमधील आवेशपूर्ण भाषण टीव्हीवरुन ऐकण्या-पाहण्याची संधी मिळाली. जॉर्ज फर्नांडिस पुराव्याच्या आधारे कसे आसूड ओढतात आणि लालू प्रसाद त्यांच्या बिहारी ढंगामध्ये विरोधकांची कशी दांडी गुल करतात, याचे प्रत्यक्ष दर्शन दूरदर्शनवर घडले. या साऱ्या गदारोळात दूरदर्शनमुळे आणखी एक फायदा झाला आणि तो म्हणजे चंद्रशेखर यांच्यासारख्या महान नेत्याची उंची अनुभवता आली.

सुरवातीला अनेक कंटाळवाणी भाषणे झाल्यानंतर अखेरच्या टप्प्यात मोठ्या नेत्यांची भाषणे हा संसदेचा पायंडा ठरलेला. त्यामुळे अखेरची काही भाषणे हटकून ऐकायची हे ठरलेले. बहुतेक वेळा राजेश पायलट किंवा रघुवंश प्रसाद यांची भाषणे झाल्यानंतर चंद्रशेखर भाषणाला उभे रहायचे. एकदा का चंद्रशेखर भाषणाला उभे राहिले की, सभागृहात निरव शांतता पसरायची. प्रत्येक जण चंद्रशेखर काय म्हणतात ते ऐकण्यासाठी उत्सुक असायचा.

अशा परिस्थितीत एकेका मुद्‌द्‌याला हळूहळू हात घालत चंद्रशेखर यांची गाडी पुढे सरकायची. चंद्रशेखर यांचे वैशिष्ट्य असे की, ते कधीही हातात कागद घेऊन बोलले नाहीत. कधीही कागदावर मुद्दे काढून ठरवून मुद्देसूद भाषण केले नाही. पण चंद्रशेखर यांची वक्तृत्वावरील पकड इतकी जबरदस्त होती की कोणतीही परिस्थिती असली तरी त्यांचे भाषण मुद्देसूद व्हायचेच. चंद्रशेखर मुद्‌द्‌याला सोडून भरकटले आहेत, असे कधी झाले नाही. किमान माझ्या "ऐकिवात' नाही. त्यांचे भाषण केवळ सर्वसामन्यांना ऐकण्यासाठी उपयुक्त होते असे नव्हे. तर खासदारांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे विचार चंद्रशेखर भाषणातून मांडत. पण, फक्त माल आणि मलिदा यांच्याशीच इमान ठेवणाऱ्या खासदारांनी त्यांची भाषणे कधीच गांभीर्याने घेतली नाहीत, हा भाग अलहिदा. पण पुन्हा पुढच्या वेळी भाषणाला उभे राहिल्यानंतर चंद्रशेखर तितक्‍याच पोटतिडकीने बोलायचे.

चंद्रशेखर यांचे भाषण कितीही गंभीर विषयावर असले तरी त्यांची गाडी अटलबिहारी वाजपेयी यांच्या दिशेने हमखास वळणारच. मग वाजपेयी विरोधी बाकांवर असो किंवा सत्ताधारी बाकांवर. वाजपेयीदेखील चंद्रशेखर यांच्या भाषणांना आवर्जून उपस्थिती असायचे. ""वाजपेयीजी तुम्ही माझे गुरु आहात. आपणासारख्या नेत्यांच्या मार्गावर व मार्गदर्शनाखाली आम्ही वाटचाल करीत आहोत,'' हे चंद्रशेखर यांचे वाक्‍य तर भाषणात ठरलेले असे. मग आपल्या शिष्याला उद्देश्‍यून वाजपेयी म्हणत,""मी तुमचा गुरु आहे तर गुरु एका पक्षात आणि शिष्य दुसऱ्या पक्षात हे कसे चालायचे. तुम्ही माझ्या पक्षात या. म्हणजे तुम्ही माझे शिष्य शोभून दिसाल.'' त्यावर चंद्रशेखर प्रत्युत्तर देत की, अटलजी तुम्हाला तर माहिती आहे. तुमच्या पक्षाचे आणि माझे जमणे शक्‍य नाही. पण तरीही तुम्ही माझे गुरु होता, आहात आणि रहाल. त्याला तुम्ही बाधा पोचवू शकत नाही. चंद्रशेखर यांच्या वक्तव्यावर मग सभागृहात हास्याची कारंजी उडायची.

चंद्रशेखर यांची आणखी एक आठवण म्हणजे परंदवाडी येथे एका कार्यक्रमानिमित्त ते आले असता आलेला प्रत्यक्ष भेटीचा योग. समाजवादी कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षणासाठी परंदवाडी (ता. मावळ) येथे एका शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या शिबिराच्या उद्‌घाटनासाठी चंद्रशेखर येणार होते आणि त्या कार्यक्रमाच्या वार्तांकनासाठी मला जाण्याची संधी मिळाली होती. माजी पंतप्रधान असलेला हा माणून खादीचा पांढरा सदरा, खादीचे धोतर आणि पायात साधी चप्पल अशा पोशाखात आला होता. बरं खादीचे कपडे असले तरी स्टार्च व कडक इस्त्री हे बहुधा चंद्रशेखर यांना मान्य नसावे. कदाचित त्यामुळेच त्यांचे कपडे काहीसे चुरगळलेले होते.

चंद्रशेखर तेथे आल्यानंतर इतका साधा माणूस अपघाताने का होईना पण देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान होऊ शकतो, याचे प्रथमतः आश्‍चर्यच वाटले. इतकी वर्षे दूरदर्शनवर चंद्रशेखर यांचे भाषण ऐकलेले. पण त्यादिवशी त्यांचे भाषण प्रत्यक्ष ऐकण्याचे योग आला आणि तेव्हाही त्यांचे भाषण तितकेच प्रभावी ठरले. कार्यकर्त्यांनी शिकल्यानंतर किमान काही वर्षे आपल्या देशासाठी सामाजिक काम करावे, हा त्यांच्या भाषणाचा सूर होता.

चंद्रशेखर यांच्याशी संबंधित आणखी एक आठवण वृत्तपत्रातून वाचण्यात आली होती. त्यावेळी हवाला घोटाळ जोरात होता आणि अनेक राजकीय नेत्यांची नावे हवालातील एका डायरीत आढळली होती. त्या डायरीमध्ये एल. के. अशी दोन अक्षरे लिहिलेली होती. त्यामुळे एल. के. म्हणजेच लालकृष्ण (एल. के.) अडवानी यांनी हवालात पैसे घेतले असे आरोप त्यांच्यावर झाले. फक्त इतकेच कारण झाले आणि लालकृष्ण अडवानी यांनी विरोधी पक्ष नेतेपदाचा आणि खासदारकीचा राजीनामा दिला.

त्यावेळी चंद्रशेखर यांनी अडवानी यांच्याबद्दल म्हटले होते की, ""संसदेतील असे अनेक खासदार तुम्हाला मिळतील की ज्यांनी संसदेच्या कॅंटिनचे बिल थकविलेले आहे. पण अडवानी असे खासदार आहेत की ज्यांनी एकदाही कॅंटिनचे बिल थकविलेले नाही. जो माणूस कॅंटिनचे बिल भरण्यात इतकी तत्परता दाखवितो. दुसऱ्याकडून पैसे खाईल याच्यावर माझा तरी विश्‍वास नाही.''

पुढे अडवानी हवाला खटल्यातून निर्दोष मुक्त झाले देखील. पण माझ्यावरील ओरापांचे मळभ दूर होण्यापूर्वी चंद्रशेखर यांच्यासारख्या स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याने दिलेल्या प्रशस्तिपत्रामुळे मला खूप धीर आला, अशी प्रतिक्रिया खुद्द अडवानी यांनी त्यावेळी व्यक्त केली होती. प्रभावी वक्ते, साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हा विचार प्रत्यक्षात आणणारे आणि कधीही एखादे मत व्यक्त करण्यास न डगमगणारे चंद्रशेखर आता आपल्यात नाहीत. जेव्हा केव्हा संसदेचे अधिवेशन सुरु होईल तेव्हा त्यात चंद्रशेखर दिसणार नाहीत, ही खंत कायम मनामध्ये राहते.

Friday, July 06, 2007

भाषा व संस्कृती वेगळी असूनही पुणं भावलं!

बास्केटबॉलपटू वॉल्श यांच्या डायरीतील नोंद

आशिष चांदोरकर
पुणे, ता. 28 ः "शहर पुणे... मुंबईपासून फक्त तीन तासांच्या अंतरावर... इथं बऱ्याच महिला तुम्हाला साडी नेसलेल्या दिसतील. वाहनचालक मोटारगाड्यांना सहजपणे "ओव्हरटेक' करून "रॉंग साइड'नं जाताना तुम्ही पाहू शकाल. पण माझ्या कायम लक्षात राहील ते नागरिकांचं बास्केटबॉल प्रेम व पाहुण्यांचं आदरातिथ्य! महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत झालेला माझा सत्कार व विरोधी पक्षनेत्यांच्या शेजारील खुर्चीवर बसण्याची मिळालेली संधी, हा मी सर्वोच्च सन्मान समजतो. इथली संस्कृती वेगळी आहे. भाषाही निराळी आहे. तरीही मला शहर भावलं. पुणेकरांनो, माझ्यावर भरभरून प्रेम केल्याबद्दल विशेष धन्यवाद!'

ही आहे जॉन डेव्हिड वॉल्श यांची डायरी. महाराष्ट्रातील बास्केटबॉल खेळाडू व प्रशिक्षकांना पुण्यात मोफत प्रशिक्षण देणारे जे. डी. वॉल्श कदाचित विस्मरणात गेले असतील. पण वॉल्श यांनी पुण्यातील अनुभव त्यांच्या वेबसाइटवर लिहिला असून, त्याची एक "ई-मेल' प्रस्तुत प्रतिनिधीलाही पाठविली आहे. त्यातीलच हा काही भाग...
बास्केटबॉलविषयी भारतामध्ये इतकं प्रेम आणि उत्सुकता असेल, याची मी कधी कल्पनाच केली नव्हती. फर्ग्युसन महाविद्यालयात गेलो तेव्हा तिथं कोर्टची रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्ती सुरू होती. उन्हाचा त्रास आणि पावसाची शक्‍यता लक्षात घेता मी सकाळी सात वाजताच सराव सुरू करण्यास सांगितलं. पहिल्या दिवशी कोर्टवर नारळ फोडण्यात आला. हे काय सुरू आहे, असा विचार माझ्या मनात आला. पण प्रशिक्षण शिबिरात विघ्न येऊ नये, म्हणून नारळ फोडण्यात आल्याचं मला सांगण्यात आलं.
मग सुरू झाले प्रशिक्षणाचे धडे. पहिल्या दिवशी 80 खेळाडू आणि प्रशिक्षक होते. पण म्हणता म्हणता संख्या वाढली आणि अखेरच्या दिवशी हा आकडा 150 पर्यंत पोचला. पुण्यात बास्केटबॉल "स्पिरीट' जिवंत असल्याचं मला जाणवत होतं. काही काही जण तर वीस-वीस तास अंतर कापून माझ्या शिबिरासाठी आले होते. तेही "एसी' नसलेल्या गाड्यांमधून! तेव्हाच माझ्यापाशी देण्यासारखे जेवढे काही आहे ते देण्याचा मी निश्‍चय पहिल्याच दिवशी केला. सोळा वर्षांचा सिद्धार्थ कोलकता येथून दोन दिवस प्रवास करून आल्याचं ऐकलं आणि माझ्या प्रशिक्षण शिबिराचं सार्थक झाल्याची भावना निर्माण झाली.

खेळाडू व प्रशिक्षकांचा खेळाविषयीचा उत्साह व माहिती जाणून घ्यायची जिज्ञासा पाहून मला हुरूप आला. "बॉल शूटिंग' आणि "ड्रिबलिंग'चे धडे दिले. सुरवातीला कोर्टवरचे प्रशिक्षण व वर्गातील धडे खेळाडूंपर्यंत पोचण्यात अपयश येत होते. पण माझा संदेश सर्वांपर्यंत पोचविण्यात अपूर्व सोनटक्के, ओंकार कदम, अमित आंबेडकर, अजिंक्‍य मेहता व गणेश बगाडे या डेक्कन क्‍लबच्या खेळाडूंची मला मदत झाली.

पुण्यातील बहुतांश वृत्तपत्रांमध्ये माझ्याविषयी छापून आलं होतं. भारतीय पत्रकाराची बास्केटबॉलविषयीची उत्कंठा किती आहे, हे मला पहिल्या पत्रकार परिषदेतचं जाणवलं. मला विचारलेला पहिलाच प्रश्‍न होता, "अमेरिकेशी सामना करण्यासाठी भारतीय बास्केटबॉलपटूंना आणखी किती वेळ लागेल?' भारतात बास्केटबॉलची सात-आठच "इनडोअर कोर्ट' आहेत आणि खेळाडूंची सरासरी उंची पाच फूट पाच इंच. तरीही बास्केटबॉलमध्ये अमेरिकेशी स्पर्धा करण्याची इच्छा ऐकून मी चक्रावलोच.

पुण्यामध्ये मला "व्हीआयपी' वागणूक दिल्याने मी खूपच भारावून गेलो. महापौर राजलक्ष्मी भोसले, उपमहापौर चंद्रकांत मोकाटे, विरोधी पक्षनेते प्रा. विकास मठकरी, बास्केटबॉल संघटनेचे विवेक मेहता आणि महापालिकेतील नगरसेवक यांनी माझा सत्कार केला. यापूर्वी मी असे कधीच अनुभवले नव्हते. शेवटी विरोधी पक्षनेत्याशेजारी बसण्याची विनंती मला केली गेली. मी तर उडालोच! असो. मला इतकं प्रेम दिल्याबद्दल पुणेकरांनो धन्यवाद.