Tuesday, November 24, 2015

‘सोशल मीडिया’ पुरस्काराबद्दल

आपणा सर्वांचे शतशः धन्यवाद

राज्यात सत्ताबदल झाला. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारचं पानिपत झालं आणि भारतीय जनता पार्टी नि शिवसेना युतीचं सरकार सत्तेवर आलं. सर्वसामान्य नागरिक, व्यापारी, सरकारी कर्मचारी, उद्योजक आणि इतर सर्वांसाठी नवे सरकार आल्यामुळं काय फरक पडला, बदल झाला माहिती नाही. पण एक महत्त्वपूर्ण बदल फडणवीस सरकार सत्तेवर आल्यानंतर जाणवला. मुख्यमंत्र्यापासून अनेक मंत्री ऑनलाईन आले. त्यांची फेसबुक पेज निर्माण झाली. ट्विटर अकाउंट सुरू झाली. छोट्या-मोठ्या गोष्टींची दखल सोशल नेटवर्किंग साइटवरून घेतली जाऊ लागली. कार्यक्रमांची नि उपक्रमांची माहिती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी फेसबुक, ट्विटर नि व्हॉट्सअपचा उपयोग होऊ लागला. मुख्यमंत्र्यांनीही नुकतीच एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ‘ब्लॉगलेखन’ करण्याची घोषणा केली आहे. 


अशा सगळ्या सोशल पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांमध्ये ‘सोशल मीडिया’साठी राज्यस्तरावर स्वतंत्र पुरस्कार जाहीर केला जाणार असल्याची घोषणा केली. म्हणजेच ऑनलाइन स्वरुपाच्या लेखनासाठी हा पुरस्कार होता. वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी या माध्यमांप्रमाणेच ऑनलाईन माध्यमांनाही राज्य सरकारने मानाचे स्थान देण्याचा निर्णय घेतला होता. सर्वप्रथम राज्य सरकारचे यासाठी अभिनंदन केले पाहिजे. जमाना बदलतोय आणि त्याचबरोबर पत्रकारिताही बदलते आहे, याची जाणीव राज्य सरकारला झाली आणि त्यांनी तसे दाखवून दिले, हे महत्त्वाचे.
सोशल मीडियावर लेखन करणाऱ्या पत्रकारांसाठी हा पुरस्कार होता. म्हणजे फेसबुकवरील लेखन, ब्लॉग लेखन किंवा कोणत्याही वृत्तपत्राच्या वेबसाईटवर लिहिल्या जाणाऱ्या ब्लॉगलेखनासाठी. ‘सोशल मीडिया’ या नव्या माध्यमासाठी दिला जाणारा पहिला पुरस्कार मला मिळाला, तो माझ्या http://ashishchandorkar.blogspot.in/ या ब्लॉगसाठी. ‘ऑनलाईन’ अशा उल्लेखामुळे अनेकांचा उगाचच असा गैरसमज झाला, की मी ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या ऑनलाइन एडिशला शिफ्ट झालो की काय? अनेकांनी तशी विचारणाही केली. पण तसे नाही. मी पेपरमध्येच आहे आणि हा पुरस्कार आहे माझ्या ब्लॉगसाठी. मटा ऑनलाइनवरही माझा एक ब्लॉग आहे. पण हा पुरस्कार त्यासाठी नाही. 

http://ashishchandorkar.blogspot.in/ हा का सुरू केला, याची कहाणी खूपच मजेशीर आणि रंगतदार आहे. बुधवार, आठ नोव्हेंबर २००६ साली मी हा ब्लॉग सुरू केला. त्यावेळी मी ज्या संस्थेत होतो, तिथं कामाच्या असमान तासांमुळे खरं तर हा ब्लॉग सुरू झाला. म्हणजे काही उपसंपादकांना आठ तास ड्युटी आणि काही उपसंपादकांना सहा तास ड्युटी असा भेदाभेद होता. कंत्राटी उपसंपादक आणि परमनंट उपसंपादक असा भेद त्यावेळी होता. त्यामुळे ड्युटीमध्ये दोन तासांचा फरक होता. ‘तुम्ही ऑफिसला आठ तासच काम केले पाहिजे, पण ‘त्या’ दोन तासांमध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे वेगळे काम करू शकता,’ अशी सवलत तेव्हाच्या संपादकांनी दिली होती. त्यामुळे खरे आभार तेव्हाचे संपादक यमाजी बाळाजी मालकर यांचे मानायला हवेत. त्यांनी मोठ्या मनाने दिलेल्या सवलतीमुळेच  ब्लॉगलेखनाकडे वळण्याची संधी आम्हाला मिळाली. देविदास देशपांडे, विश्वनाथ गरुड, नंदकुमार वाघमारे आणि मी. आम्ही चौघांनीही ब्लॉगलेखन तेव्हाच सुरू केलं.


पण सर्वाधिक महत्त्वाचे आभार मानले पाहिजेत, आमचा दिलदार दोस्त देविदास प्रकाशराव देशपांडे याचे. तंत्रज्ञान, सोशल मीडिया, भाषेवरील प्रभुत्व, अवगत असलेल्या भाषा आणि अशा अनेक क्षेत्रांचे ज्ञान आणि माहिती त्याच्याकडे भरपूर असते. पण ते ज्ञान तो स्वतःपुरते मर्यादित ठेवत नाही. तर जवळपासच्या मित्रांना त्याबद्दल माहिती देत असतो. माहिती वाटत असतो, असंच म्हणा ना. त्यानंच मला खऱ्या अर्थानं ब्लॉगच्या विश्वात आणलं. ब्लॉग म्हणजे काय, तो कसा सुरू करायचा, त्यावर कसं लिहायचं, तो सजवायचा कसा, टेम्पेलट वगैरे वगैरे सर्व काही त्यानं सांगितलं. आजही त्याच्याकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आहे आणि आजही तो काहीही हातचं राखून ठेवत नाही. त्यामुळं खरं तर या पुरस्कारावर माझ्याइतकाच त्याचाही अधिकार आहे. त्यामुळे त्याला खूप खूप धन्यवाद.
ब्लॉगलेखन सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ‘नव्याचे नऊ’ दिवस म्हणून सगळ्यांनी त्याकडे पाहिलं. मी इतकी वर्षे ब्लॉग लिहित राहीन, असं मला सुरुवातीला अजिबात वाटलं नव्हतं. पण अनेकदा पेपरात किंवा काम करीत असलेल्या माध्यमात तुम्हाला जे मांडायचं आहे, ते मांडणं शक्य नसतं. ते तुम्ही ब्लॉगवर मांडू शकता. काही गोष्टी संबंधित कंपनीच्या धोरणाविरुद्ध असतात, विचारांविरुद्ध असतात, समूहाच्या दृष्टीने अगदीच क्षुल्लक असतात किंवा ते वाचकांना आवडतीलच अशी खात्री नसते. असं सर्व लिखाण तुम्ही तुमच्या ब्लॉगवर करू शकता. वैयक्तिक आलेले अनुभव, वेगवेगळ्या घटनांवरची तुमची मतं असं काहीही तुम्ही ब्लॉगवर शेअर करू शकता. शिवाय या अमक्या विषयावर लिहायचं नाही, तमक्या विषयावर लिहिता येणार नाही, असला भानगड नाही. शिवाय कोणीही तुमचा ब्लॉग हटवू शकत नाही. यामुळे आज जवळपास नऊ वर्षे मी ब्लॉग लिहितो आहे आणि अजून तरी मला ब्लॉगवर लेखनाचा कंटाळा आलेला नाही. 

जवळपास सव्वा दोनशे ब्लॉग आतापर्यंत लिहिले असून दीड लाखांहून अधिक जणांनी हा ब्लॉग वाचलेला आहे. पण मला वाटतं की ब्लॉग संख्या किंवा वाचक संख्या यापेक्षाही ब्लॉगवर लिहिल्यानंतर तुम्हाला मिळणारा आनंद आणि वाचकांकडून मिळणारा प्रतिसाद या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. सुदैवाने दोन्ही गोष्टींबाबत मला प्रचंड समाधान आहे.


राजकारण, क्रीडा आणि अर्थातच, हिंडणं नि खाणंपिणं या गोष्टी आपल्या सर्वाधिक आवडीच्या. त्या संदर्भातील लिखाण ब्लॉगवर सर्वाधिक आहे. सुरुवातीच्या काळात वृत्तपत्रात छापून येणारे लेख अधिक सविस्तरपणे ब्लॉगवर येत होते. मात्र, तो ट्रेंड लवकरच बदलला. ‘साम मराठी’त गेल्यानंतर पेपरातलं लेखन थांबलंच. मग ब्लॉग लिहिण्याची फ्रिक्वेन्सी वाढली. त्यातून दोनवेळा निवडणुकीच्यानिमित्तानं महाराष्ट्रभर फिरता आलं. त्यातील अनुभव ब्लॉगवर टाकले. गुवाहाटी आणि केरळमधीलराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसंदर्भातील अनुभव ब्लॉगवर आहेत. तीनवेळा गुजरातमध्ये जाणं झालं. पहिल्यांदा ‘केसरी’साठी अभयजी कुलकर्णी यांच्यासोबत गेलो होतो. मात्र, नंतर दोनदागेलो, ते फक्त आणि फक्त ब्लॉगवर लिहिण्यासाठी. महाराष्ट्र टाइम्सकडून तमिळनाडूमधीलविधानसभा निवडणूक कव्हर करण्याची संधी मिळाली. त्या ठिकाणचे अनुभव व्यक्त करणारे ब्लॉगलिहिले. काही स्वतंत्रपणे आणि काही पेपरातील बातम्यांचे एक्स्टेंशन.


गेल्या वर्षी उत्तरप्रदेशात लोकसभेची निवडणूक कव्हर करण्यासाठी गेलो होतो. तिथे आलेले अनुभव ब्लॉगवर मांडले. त्याला तर भन्नाट प्रतिसाद मिळाला. उत्तर प्रदेशबद्दल असलेले माझ्या मनातले समज गैरसमज या दौऱ्यामुळे बऱ्याच प्रमाणात दूर झाले. प्रत्यक्षात नेमके काय घडले, याचा ‘फर्स्ट हँड’ अनुभव घेता आला. लखनऊ, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, अयोध्या, सुलतानपूर, वाराणसीआणि आझमगड अशा विविध शहरांमध्ये जाऊन मनसोक्तफिरलो. अयोध्येला जाऊन ‘रामलल्ला’चं दर्शन घेतलं. सगळीकडे सामान्यातल्या सामान्याशी बोललो. तिथली अवस्था प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिली. नुसतं फिरून उपयोग काय? ते लोकांपर्यंत पोहोचलं तर पाहिजे. म्हणून मग आलेले अनुभव आणि तिथली परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचविली. उत्तर प्रदेशातील ब्लॉगला तर प्रचंड म्हणजे प्रचंड प्रतिसाद मिळाला. तिथं जाण्याचं सार्थक झालं, असंच मला वाटलं. 


‘सोशल मीडिया’साठीचा पुरस्कार २०१४ मध्ये केलेल्या लेखनासाठी होता. योगायोगानं मी गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं उत्तर प्रदेशात गेलोच होतो. तिथं आलेल्या भन्नाट अनुभवांचे ब्लॉग्ज मी स्पर्धेसाठी पाठविले होते. त्यापैकी ऐकूलाल या हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी आदर्श उदाहरण असलेल्या चहाविक्रेत्याचीघेतलेली भेट, मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे इंद्रेशकुमारजी यांच्यासमवेत ‘एक दिवस’ आणि उत्तर प्रदेशातील एकूण अनुभव, सामाजिक-राजकीय परिस्थिती, तिथले लोक, त्यांची दुःख मांडणारा‘उत्तर प्रदेश, उत्तम प्रदेश’ असे तीन ब्लॉग स्पर्धेसाठी पाठविले होते. उर्वरित सर्व ब्लॉगची यादी आणि ते प्रसिद्ध केले तेव्हाची तारीख, ठिकाण वगैरे माहिती सोबत जोडली होती. अशा पद्धतीने तयार केलेल्या माझ्या प्रवेशिकेला (किंवा अर्जाला) सोशल मीडियाचा राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर झाला. हा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिलाच पुरस्कार आहे. याचा आनंद अधिकच आहे. तेव्हा सर्व परीक्षकांचेही जाहीर हार्दिक आभार. 


‘आई’ गेली तेव्हा खूप काही लिहावसं वाटत होतं. पण इतक्या सविस्तरपणे कुठंही छापून येणं अवघड होतं. कारण मी कोणी मोठा नाही आणि माझी आईपण खूप प्रसिद्ध नव्हती. पण माझ्यासाठी ती सर्व काही होती. अशा वेळी मला ब्लॉगचा आधार होता. म्हणून आईवर ब्लॉग लिहिला. ‘आई्’ एक व्यक्ती नाही तर संस्था आहे. ती कुणाचीही असो, त्यानं फारसा फरक पडत नाही. आई या व्यक्तिमत्त्वात असलेले गुण हे बहुतांश प्रमाणात समानच असतात. त्यामुळे कोणीही आपल्या आईवर लेख लिहिला असता, तरी तो थोड्याबहुत प्रमाणात सारखाच होण्याची शक्यता अधिक. कदाचित यामुळेच आई गेल्यानंतर लिहिलेला ब्लॉग बऱ्याच लोकांना आवडला. अनेकांनी तसं सांगितलं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग उत्तम आहे,’ असं यमाजी मालकरसाहेब आणि संजय राऊतसाहेब यांनीही आवर्जून सांगितलं होतं. कोणता संपादक इतक्या खुल्या मनानं ज्युनिअर लोकांचं कौतुक करतो. अपवाद असतील. आहेतही. पण खूपच कमी. ‘शौकिन’ या पुण्यातील पानविक्रेत्याच्या दुकानाबाहेर एक जण भेटला. ‘तुम्ही आशिष चांदोरकर का?’ असं त्यानं विचारलं. मी त्याला ओळखत नव्हतो आणि नावही ओळखीचं नव्हतं. पण त्यानं मला ओळखलं होतं. ‘तुमचा आईवरचा ब्लॉग वाचला. खूप आवडला. डोळ्यातून पाणी आलं…’ कोणालाही आश्चर्याचा धक्का बसेल, अशी ही घटना. असे असंख्य वाचक ब्लॉगला मिळत गेले. काही जण कायमचे वाचक झाले. काही जण आवडीनुसार अधूनमधून भेटणारे वाचक ठरले. त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानायचे की ऋणातच राहणे पसंत करायचे, हा गोंधळ अजूनही मिटलेला नाही. पण अशा वाचकांमुळेच पुन्हा पुन्हा लिहिण्याची उमेद निर्माण झाली. त्यामुळे त्यांना धन्यवाद आहेतच.

सुरुवातीच्या काळात अनेकदा हा काय ब्लॉग तर लिहितो, कोण वाचतो हे ब्लॉग वगैरे सूरही उमटले. ‘तुम्ही मंडळी खूप लिहिता बुवा…’ असा नापसंतीचा सूरही उमटला. खरंतर अशा प्रतिक्रियाच ब्लॉग लेखन अधिक जोमाने करण्यासाठी उर्मी निर्माण करीत होत्या. त्यामुळे अशा एकदम पुणेरी प्रतिक्रिया व्यक्त करणाऱ्यांचेही आभार. पुढे पुढे तर ब्लॉग लेखनाचं व्यसन लागलं, असंच म्हणा ना. अगदी छोटे अनुभवही लिहिले. रस्त्यावरच्या एका फुगेविक्रेत्याला कॅडबरी दिल्याचा अनुभवअनेकांना आवडला. दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला तेव्हा संभाजी ब्रिगेडला आणि बाबासाहेबपुरंदरे यांच्या ‘महाराष्ट्र भूषण’ला विरोध करणाऱ्यांना धू धू धुणारा ब्लॉग लिहिला. 

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधी भूमिका घेणाऱ्या नेत्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. ब्राह्मण महासंघाला फटकाविणारा लेख लिहिला. राज ठाकरे यांच्यावर टीका करणारे ब्लॉग लिहिले. उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलही खूप काही लिहिलं. शिवसेना-भाजप युती टिकावी, अशी मांडणी करणारा ब्लॉग लिहिला. युती तुटल्यानंतर भाजपचं सरकार आल्यानंतर ‘नाही, नाही, नाही म्हणजे हो’ असा ब्लॉग हाणला. पुण्यातले आमचे सर विकास मठकरी यांच्याबद्दल लिहिलं. अमित जोशीला झालेल्या मारहाणीनंतर लिहिलं. चित्रपटांबद्दल, विशेषतः दाक्षिणात्या चित्रपटांबद्दल लिहिलं. 


‘चार्ली हेब्दो’वरझालेल्या हल्ल्यानंतर लिहिलेल्या ब्लॉगमध्ये माझी भूमिका जगाच्या विपरित होती. त्यावरलोकांनी विरोधी प्रतिक्रिया व्यक्त करून मला धुवून काढलंय. पण पोप फ्रान्सिस यांनी व्यक्त केलेली भूमिका आणि मी लिहिलेला ब्लॉग यामध्ये साम्य होतं. पोप यांची प्रतिक्रिया वाचल्यानंतर लोकांनी मला धुतलं त्याचं विशेष काही वाटलं नाही. ‘भाजीवाल्याचा झाला वडा’ अशा शीर्षकाखाली सहा-सात ब्लॉग लिहिले. कोणाशीही दुरान्वये संबंध नसूनही काही जणांना तो आपल्याबद्दलच लिहिला आहे की काय, असे वाटू लागले. त्यांचा त्या ब्लॉग्जचा प्रचंड राग आला, याचाच अर्थ ते सत्य होतं. सत्य कटू असतं हेच खरं. मात्र, त्यांच्या विनंतीचा मान राखला जावा आणि उगाच कटकटी वाढू नये, यासाठी ते ब्लॉग्ज ड्राफ्ट केले. लोकमान्यटिळक यांच्या नावाने पत्रकारितेसाठीचा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना मिळालाय, त्या मुजफ्फरहुसेन यांना भेटल्यानंतर त्यांच्यावरही ब्लॉग लिहिलाय.  
थोडक्यात काय तर जे जे वाटलं ते ते लिहिलं. जसं वाटलं तसं लिहिलं. खाण्यापिण्यासबाबत आणि फिरण्यासंदर्भात लेखनासाठी वर्डप्रेसवर स्वादिष्ट या नावाने स्वतंत्र ब्लॉग सुरू केलाय. त्यावरही चार-पाच ब्लॉग लिहून झालेत. अजून पुष्कळ लिहायचेत. लवकरच तेही लिहून होतील. 

‘ब्लॉग’ला मिळालेला हा चौथा पुरस्कार आहे. पहिला पुरस्कार डॉ. अनिल फळे यांच्या संस्थेतर्फे दिला जाणारा चौथा स्तंभ पुरस्कार होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मिळाला होता. नंतरचे दोन उ्त्तेजनार्थ पुरस्कार ‘स्टार माझा’ आणि ‘एबीपी माझा’ चॅनेलतर्फे मिळाले होते. आणि हा चौथा म्हणजे राज्य सरकारचा ‘सोशल मीडिया’साठीचा पहिला राज्यस्तरीय पुरस्कार.


पुरस्कार जाहीर झाल्यानंतर अनेकांनी स्वतःहून फेसबुकवर माझ्याबद्दल बरंच काही लिहिलं. बऱ्याच जणांनी व्हॉट्सअप, फेसबुक, एसएमएस आणि फोन करून अभिनंदन केलं. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्या सर्वांचे हार्दिक आभार. मनःपूर्वक धन्यवाद. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे संपादक पराग करंदीकर आणि मटातील माझा सहकारी मित्र धनंजय जाधव यांचेही या निमित्ताने मला आभार मानायचे आहेत. माझा बालपणीपासूनचा मित्र आणि भाजपचा पुणे शहर सरचिटणीस धीरज घाटे यानं प्रदीप कोल्हटकरच्या हस्ते केलेला सत्कार तर जबरदस्तच. खरं तर सत्काराआधीचा सत्कारलहानपणापासून ज्यांच्यासोबत वाढलो आणि शिकलो, त्यांच्याकडून होणारं कौतुक, मिळणाऱ्या शुभेच्छा माझ्यासाठी खूपच महत्त्वाच्या आहेत. आमचे बंधू शिरीष चांदोरकर यांनी पुरस्कार मिळाल्याचे जाहीर झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी एकदम बढिया बासुंदी करून शुभेच्छा दिल्या. त्याच्यासारखी बासुंदी आलम दुनियेत क्वचितच कुणाला जमत असेल, हा आपला दावाय. इतकं सारं कौतुक होतंय, त्यामुळं खूपच भन्नाट वाटतंय.

जे मला चांगलं ओळखतात, त्यांनी माझ्या मनातली सल बरोबर ओळखली. ‘आज आई हवी होती…’ ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये खूप वर्षांपूर्वी आईवर एक अग्रलेख लिहिला होता. त्यात एक वाक्य खूप छान होतं. ‘एखादी वाईट गोष्ट करताना आपल्या मनात पहिल्यांदा विचार येतो, की आईला काय वाटेल आणि एखादी चांगली गोष्ट घडली, तर असं वाटतं, की कधी एकदा आईला सांगतोय.’ खूपच मस्त वाक्यय हे. आज आई नाही, पण ती असती तर तिला खूपच आनंद झाला असता. अर्थात, बाबांना आनंद आहेच. त्यांनाही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार मिळाला होता. मलाही मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते पुरस्कार मिळणार असल्यानं त्यांना अधिक बरं वाटतंय.

माझ्यावर, माझ्या लेखनावर, ब्लॉगवर प्रेम करणाऱ्या आपणा सर्वांचे पुन्हा एकदा शतशः धन्यवाद…

Tuesday, September 15, 2015

सुखद, समृद्ध आठवणी...



हैदराबादची ‘दम बिर्याणी’...

हैदराबाद आणि ई टीव्ही मराठी हे दोन्ही शब्द माझ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. कधीकाळी हैदराबाद म्हणजे ई टीव्ही आणि ई टीव्ही म्हणजे हैदराबाद हेच समीकरण दृढ होतं. ई टीव्हीमध्ये हैदराबादला काम करण्याचा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतलाय, त्यांचीही अवस्था कदाचित अशीच असेल. पक्का पुणेकर असूनही हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिथं आपलं कसं होईल, असा प्रश्नच मनात होताच. पण तरीही जायचं निश्चित केलं आणि गेलोच. जवळपास दीड वर्षांच्या कालावधीत हैदराबादनं खूप काही शिकवलं.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... 
............................................


गेल्या काही महिन्यांपासून नवा ब्लॉग सुरु केला आहे, ‘वर्डप्रेस’वर. फक्त खाणे आणि भटकणे यावर लिहिण्यासाठी… मध्यंतरी हैदराबादला चक्कर झाली आणि ‘दम बिर्याणी’सह अनेक आठवणींना उजाळा मिळाला… हैदराबादच्या ‘दम बिर्याणी’वरील लेख आवर्जून वाचा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा…



धन्यवाद.

Wednesday, August 19, 2015

हे तर महाराष्ट्र दूषण...

बी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वादविवाद आणि घुसळण यांच्यामुळे एक बरं झालं नेमकं कोण कोणत्या बाजूला आहे, हे स्पष्ट झालं. एकीकडे उठता बसता शाहू, फुले आणि आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पुरोगामी महाराष्ट्र नि पुढारलेला महाराष्ट्र अशी जपमाळ ओढायची आणि दुसरीकडे जातीपातीवरून खुसपटं काढत बसायची. विशेषतः ब्राह्मणांबद्दल त्वेषानं आकस व्यक्त करायचा… अशी दुटप्पी भूमिका घेऊन भोंदूगिरी करणारे कोण आहेत, हे स्पष्ट झाले. पुरोगामीत्वाचे बुरखे टराटरा फाटले. जातीपाती निर्मूलनाची भूमिका घेऊन पुढे जाण्याच्या बाता करणाऱ्यांचे वस्त्रहरण झाले. नागव्यांची जत्रा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली.


देश कुठे चालला आहे. जग कुठे चाललं आहे आणि ‘जाणता राजा’ म्हणून टेंभा मिरविणारी मंडळी लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून स्वतःची पोळी भाजून घेण्यात मश्गूल आहेत. मराठ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या या नेत्यानं ब्राह्मणांना टार्गेट करण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’, ‘जिजाऊ ब्रिगेड’ आणि ‘मराठा सेवा संघ’ अशी जातीयवादी संघटनांची पिलावळ जन्मास घातली. खतपाणी घातलं. तरुणांची माथी भडकाविली. विषवल्ली फोफावत राहील, याची अगदी पुरेपूर काळजी घेतली. पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीची विषवल्ली पसरविणारी ही विखारी पिलावळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच काळात फोफावली. आणि त्याला खतपाणी घातलं ‘जाणत्या राजा’नंच!

महाराष्ट्रात मनसोक्त सत्ता उपभोगणाऱ्या या जाणत्या राजानं आणि त्यांच्या पक्षानं स्वतःच्या जातीसाठी, म्हणजे मराठ्यांसाठी इतक्या वर्षांत काय केलं कोणास ठाऊक? वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून ही मंडळी अजूनही मागासच आहेत. आरक्षणासाठी छात्या पिटताहेत. मोर्चे काढताहेत. निषेध करताहेत. आंदोलनं करताहेत. अहो, महाराष्ट्रात ४०-४५ टक्के असलेला तुमचा समाज. पाटीलकी, देशमुखी आणि इतर गोष्टींमधून सत्ता राबविण्याची परंपरा, सत्तेत बहुतांश मंत्री, आमदार तुमच्याच जातीचे. तरीही तुमचा समाज पिछाडलेला. का बुवा? आरक्षणाची भीक मागण्यासाठी हात पसरण्याची वेळ तुमच्यावर का आली? याचा विचार आधी करा. मग बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्या बदनामीची मोहीम उघडा. 



आणि तुम्ही ज्यांच्या नावाने खडे फोडताय, त्यांना संपविण्यासाठी आंदोलनं उभारताय, तीन टक्क्यांचं अस्तित्व संपविण्यासाठी जीवाचं रान करताय, तो ब्राह्मण समाज अनेक वर्षांपासून लढतोय, झटतोय आणि स्वतःचे महत्त्व दाखवून देतोय. बुद्धीच्या, ज्ञानाच्या, कष्टाच्या, मेहनतीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आजही प्रचंड विरोधाच्या जमान्यातही तग धरून आहे. याचा कधी तरी विचार कराल की नाही? महाराजांच्या नावानं राजकारण करणं आणि जातीयवात पसरविण्याचे धंदे बंद करा. ब्राह्मणच नाही, तर सर्वच जातीमधील कष्टाळू आणि परिश्रम घेण्याची तयारी असलेल्या प्रत्येकाचेच भवितव्य उज्ज्वल आहे. फक्त आरक्षणाने काहीही साध्य होत नाही, हे कधीतरी समजून घ्या. कष्ट करणं हे भांडारकर फोडण्याइतकं सोप्प नाही, हे कधीतरी तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा. 

तर मुद्दा मराठा सेवा संघ आणि बी ग्रेडी संघटनांचा. मुळात शिवकालातील ब्राह्मण लोकांनाच टार्गेट करण्यासाठी या लोकांनी अभियान राबविलं. समर्थ रामदास हे ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. दादोजी कोंडदेव ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. अफझलखानाचा वकील कोणतरी कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण. करा ब्राह्मणांना टार्गेट. ही मंडळी बाजीप्रभू देशपांडे यांनाही टार्गेट करायला निघाली होती. देशपांडे म्हणजे ब्राह्मणच अशी यांची धारणा. पण या येड्याखुळ्यांना कुठे माहितीये की सीकेपींमध्येही देशपांडे हे आडनाव असतं. बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण नव्हे तर सीकेपी होते. ही गोष्ट पुढे आल्यानंतर मग बी ग्रेडींचा कार्यक्रम मावळला. दुर्दैवाने बाबासाहेबांचं आडनाव पुरंदरे. म्हणजे ब्राह्मण. मग तेही या बी ग्रेडींच्या ‘टार्गेट लिस्ट’वर आले. 



स्वराज्याची चर्चा करताना कसला जातीपातीचा मुद्दा उपस्थित करता. जातींवर चर्चा करता. स्वराज्य आणि शिवाजी महाराज ही काय एकट्या मराठ्यांची जहागिरी आहे का? तुमच्याकडे शिवाजी महाराज या नावाचा मालकी हक्क कुणी दिलाय का? महाराज सर्वांचे आहेत. सर्व जातीधर्मांचे आहेत. फक्त महाराष्ट्राचे नाहीत, तर अवघ्या हिंदूराष्ट्राचे आहेत. ते होते म्हणून आज आपण आहोत, याची जरा तरी जाणीव ठेवा. स्वराज्य उभारण्यात अठरापगड जातींचा वाटा आहे, हे कसं विसरून चालेल आणि ही गोष्ट मान्य करावीच लागेल. अठरापगड जातींप्रमाणेच ब्राह्मणांनीही स्वराज्य उभारणीत योगदान दिलेलेच आहे. सिंहाचा वाटा नसेलही, पण खारीचा आहेच आहे. इतिहास संशोधक त्याबद्दल अधिक बोलू शकतील. तो माझा प्रांत नाही.

शिवाजी महाराजांकडे जसं जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही तसंच शिवरायांच्या कोणत्याही सरदाराकडे वा शिवकालीन व्यक्तिमत्वाकडे जातीच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही. अहो, शाळेत असताना दादोजी कोंडदेव यांचं आडनाव कुलकर्णी होतं हे कोणाला तरी माहिती होतं का? ते ब्राह्मण होते, हे देखील माहिती नव्हतं. त्यामुळं त्याचा अभिमान बाळगण्याची आवश्यकताच नव्हती. कोंडदेव हे महार, माळी, कोळी, चांभार किंवा आणखी कोणत्या तरी जातीतील असते, तरीही आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच असता. आकसाने त्यांचा पुतळा हटविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. बी ग्रेडींच्या जातीपातीच्या राजाकारणामुळं दादोजींचं आडनाव कुलकर्णी होतं हे कळलं. फक्त ब्राह्मण म्हणून द्वेष करायचा. गुरू म्हणून तर नाकारायचंच पण तो माणूसच अस्तित्वात नव्हता, असेही दावे करायचे. कशामुळे तर फक्त ते ब्राह्मण होते म्हणून. ही कुठली दळभद्री वृत्ती. 

बाबासाहेबांच्या लिखाणावर आक्षेप घेणार कोण? बिनबुडाचे दावे करणार कोण श्रीमंत कोकाटे? इतिहास संशोधनात यांचे योगदान काय? महाराज गेले त्या किती ठिकाणी हा माणूस गेला? किती फिरला? किती कागदपत्रे यांनी तपासली आणि अभ्यासली. किती भाषांमधली कागदपत्रे पाहिली? फ्रेंच, इंग्रजी, फारसी, पर्शियन, मोडी आणि इतर किती भाषा इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी आत्मसात केल्यात. त्यांची साथ कोण देणार पुरुषोत्तम खेडेकर. अहो, या खेडेकरचा आणि इतिहासाचा काय संबंध? ब्राह्मण बायका त्यांचे लैंगिक समाधान मराठ्यांकडून करून घ्यायच्या आणि उत्तान कपडे घालून काय काय करायच्या असलं बीभत्स नि अश्लील लिखाण करणारा हा खेडेकर कोर्टात शेपूट घालतो. बिनशर्त माफी मागतो आणि पुस्तक मागे घेतो. असली कोकाटे नि खेडेकर ही मंडळी बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखनावर आक्षेप घेणार? बरं अत्यंत वाईट शब्दात लिहिणाऱ्या खेडेकरला शिक्षा काय तर काहीच नाही. फक्त माफीनामा आणि पुस्तक परत घेण्यावर भागलं. 
(खेडेकरच्या लेखणीची लायकी कळावी, म्हणून त्याच्या पुस्तकातील ब्लॉगमध्ये काही पानांचे जेपीजी मुद्दाम टाकले आहेत.)



अहो, बाबासाहेबांच्या पासंगाला तरी ही मंडळी पुरणार आहेत का? बाबासाहेबांनी जेवढं लेखन केलंय आणि जेवढी व्याख्यानं दिलीयेत तेवढं या मंडळींनी ऐकलं आणि वाचलं तरी आहे का? ‘जाणता राजा’ सारखं महानाट्य बाबासाहेबांनी उभं केलं, जगभर पोहोचविलं, त्यासाठी किती कष्ट त्यांनी उपसलेत हे पाहण्याचं भाग्य मला मिळालंय. त्यांच्या नाटकात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. तुम्ही काय केलंय शिवराय जगभर पोहोचविण्यासाठी? अहो, ज्या माणासावर समोरच्या व्यक्तीच्या वयाचा मान ठेवण्याचे संस्कारही नाहीत, ती व्यक्ती काय लायकीची आहे, हे सांगायला कोणाचीही आवश्यकता नाही. आणि जितेंद्र आव्हाड सारखा बोलका पोपट असल्या दळभद्री लेखकांची तुलना बाबासाहेबांच्या लेखनाशी करतो. आव्हाडांनी खेडेकरच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लेखनाबद्दल आधी बोलावे आणि मग इतिहासाचे ज्ञान पाजळावे. एक लक्षात ठेवा. बाबासाहेब ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत, तर तुम्ही ‘महाराष्ट्र दूषण’ आहात.

पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या नीच पातळीवर जाऊन जातीय राजकारण करणारी ही मंडळी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. अहो, महाराजांनी काय फक्त मराठ्यांच्या जोरावर स्वराज्य उभारलं नाही. मदारी मेहतर, जिवा महाला, शिवा काशीद, नेताजी पालकर, हिरोजी फर्जंद, दौलतखान आणि अशी असंख्य सरदार मंडळी मराठा होती का हो? प्रत्येक गोष्टीत जातपात पाहण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत. घरातूनही नाही आणि ज्या संघटनेत वाढलो तिथंही नाही. पण किमान आडनावावरून तरी वाटत नाहीत. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, रांझेगावचा बाबाजी पाटील, जावळीचे चंद्रराव मोरे ही मंडळी मराठा होती का? हे देखील बी ग्रेडींनी तपासावं एकदा. म्हणजे महाराजांसाठी लढणारे कोण होते नि त्यांच्या विरोधात कोण होते, हे जगासमोर येऊ दे. होऊ दे चर्चा. जातपात काढण्याची गरज नाही. पण तुम्हाला खुमखुमीच असेल जात काढायचीच असेल तर सर्वांचीच जात काढा.

अगदी जाणतेपणी जातीपातीचे राजकारण करणारी ही नीच आणि दळभद्री वृत्ती तातडीने नष्ट करण्याची आवश्यकता आहे. अशी प्रवृत्ती पसरविणाऱ्या आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी संघटनांची पिलावळ प्रसृत करणारे नेते स्वकर्मानेच नष्ट होतील. पण हा विखारी विचार नष्ट करण्याचे आव्हान मोठे आहे. आपल्याला जिथे जमेल, जसे जमेल तशा पद्धतीने हा विचार खोडून काढण्यासाठी, हा विखार नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ही विषवल्ली ठेचून काढण्यात सर्वाधिक जबाबदारी सरकारची आहे. इतकी वर्षे जाणत्या राजांचेच राज्य होते. आता मात्र, अशा विखारी विचारांच्या लोकांचा देवेंद्र फडणवीस सरकारने चोख बंदोबस्त करावा, ही आमची आग्रहाची विनंती आहे.



जाता जाता एकच गोष्ट सांगतो. परवा एका छोटेखानी कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अगदी थोडक्यात पण मार्मिकपणे बाबासाहेब बोलले. ते म्हणाले, ‘परिस्थिती सर्वांना माहिती आहे. जे आहे ते सगळं तुमच्यासमोर आहे. जास्त बोलत नाही. एकच सांगतो, दुसऱ्याची रेघ छोटी करण्यासाठी स्वतःची रेघ मोठी करावी लागते. स्वतःची रेघ मोठी करा, म्हणजे दुसऱ्याची रेघ आपोआप छोटी होईल.’ 

वयाची ७० वर्षे इतिहासाची अखंड तपश्चर्या करून आखलेली रेघ छोटी करण्यासाठी दुसरी मोठी रेघ ओढण्याचे सामर्थ्य ना तुमच्यात आहे ना तुमच्या पुढील पिढ्यांमध्ये आहे. कारण फक्त आरक्षण मागून स्वतःची रेघ मोठी होत नाही. जाळपोळ, फोडाफोडी नि आकांडतांडव करून आपली रेघ मोठी होत नाही. टीव्हीवरच्या चर्चांमध्ये शिरा ताणून आणि आवाज चढवून आपली रेघ मोठी होत नाही. त्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. हजारो-लाखो ग्रंथ आणि दस्तऐवज हाताखालून घालावे लागतात. देशोदेशीच्या भाषा अवगत करून घ्याव्या लागतात. प्रसंगी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संसार करावा लागतो. बाबासाहेबांनी ही कठोर तपश्चर्या यशस्वीपणे पूर्ण केली म्हणून ते आज इथं आहेत. त्या तपश्चर्येतील त लिहायचीही तुमची लायकी नाही, हे ध्यानात असू द्या…

संबंधित ब्लॉग...
ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा

Thursday, July 09, 2015

सर भेटले, जुने दिवस आठवले

नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी...


नोव्हेंबर १९९५… भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्याच दोन-तीन दिवसांमध्ये एका संध्याकाळी एस. पी. कॉलेजवर भाजपच्या नेत्यांची एकत्रित जाहीर सभा होती. अटलबिहारी वाजपेयी नि लालकृष्ण अडवाणी यांना एकत्र ऐकण्याची संधी तशी दुर्मिळच. तीही पुण्यात. तेव्हा आवर्जून त्या सभेला उपस्थित होतो. शिवाय सुषमा स्वराज, प्रमोद महाजन आणि भाजपची अनेक ज्येष्ठ नेते मंडळी पुण्यात आली होती. त्यांची भाषणं काही लक्षात नाहीत. पण वाजपेयी नेहमीप्रमाणेच सुंदर बोलले होते. तेव्हा फारसे थकलेही नव्हते. त्यांना भेट दिलेली तलवार उपसून बाहेर काढणारे वाजपेयी, असं फारच कॉन्ट्रास्ट चित्र त्यावेळी पहायला मिळालं होतं. (मी जर चुकत नसेन तर मित्रवर्य रवी पत्की यांनी त्याची फ्रेम घरी करून लावली होती.) 

‘दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो. तसंच काँग्रेस सरकारचं आहे. हा दिवा आज ना उद्या विझणारच आहे,’ असं मार्मिक भाष्य अटलजींनी त्यावेळी केलं होतं. त्यानुसार काँग्रेसचा दिवा विझला नि भाजपची ‘पणती’ १३ दिवसांसाठी प्रज्वलित झाली. अर्थात, तेरा दिवसांतच ती पण विझली. मात्र, त्या तेरा दिवसांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेला आनंद काकणभर अधिकच संस्मरणीय होता. कारण सर्वांचे लाडके अटलजी पंतप्रधान झाले होते. असो… तो विषय वेगळा. तर अटलजींचे भाषण संपले आणि मंडळी ‘एसपी’तून बाहेर पडू लागली. त्यावेळी पहिल्यांदा विकास मधुकर मठकरी या व्यक्तीचे दर्शन झाले. अर्थात, तेव्हा ते फक्त दिसले. ओळख मात्र, झाली नाही. 


आमचे मित्रवर्य आणि तेव्हाचे वॉर्डातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ जमविणारे सन्माननीय रवी व्यंकटेश पत्की यांनी दाखविले… ‘तो बघ विकास मठकरी. आपल्या वॉर्डाचा भाजपचा अध्यक्ष आहे. ‘अभाविप’चा पूर्णवेळ होता. आसाम आणि ईशान्य भारत, कुठल्या कुठल्या यात्रा वगैरेमध्ये सहभागी झाला होता. इइ…’ माहिती सन्माननीय रवी पत्की यांनी पुरविली. मठकरी या माणसाचं नाव माझ्या कानावर पहिल्यांदा पडलं. जीनची पँट, खादीचा शर्ट आणि पायात स्पोर्ट्स शूज. अजूनही मला तो पेहराव आठवतोय. पुढंही अनेकदा त्यांचा हाच पेहराव असायचा. तेव्हा सरांची राजदूत होती आय थिंक. कोणत्याही इतर मोटरसायकलपेक्षा जरा अधिकच फटफट आवाज करीत राजदूत निघायची. पुढे आणखी काही वर्षे तीच राजदूत ते वापरत होते. नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी… ही त्यांची ओळख करून द्यायची ष्टाइल. हे शब्द अजूनही कानात आहेत.

नंतर मग परिसरातील संघशाखा भरणाऱ्या मैदानावर (संघाच्या भाषेत संघस्थानावर) स्थानिक नगरसेविकेनं गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या नगरसेविकेला हैराण करून सोडण्याचे काम विकास मठकरी आणि दुसरे परममित्र धीरज घाटे या दोघांनी केलं होतं. ‘अटक्यात लोटकं, लोटक्यात दही… मैदानं लाटत चालली बाई’ किंवा ‘मुलांच्या जीवाशी खेळू नका, खेळाचं मैदान गिळू नका’ अशा घोषणा असो, घराघरांत पत्रक वाटणं असो, रस्त्यावर उभं राहून स्वाक्षरी मोहीम राबविणं असो किंवा इतर पर्याय असो. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून संबंधित नगरसेविकेला कानपिचक्या मिळतील, अशीही व्यवस्था करण्यात आली होती. अखेरीस ते मैदान वाचलं आणि ‘संघाच्या नादाला लागू नका,’ असा इशारा संबंधित नगरसेविकेला वरिष्ठांनी दिल्याचंही समजलं.


मला वाटतं विकास मठकरी आणि धीरज घाटे या दोघांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून यशस्वी केलेलं ते पहिलं आंदोलन असावं. त्यानंतर मग विकास मठकरी यांची सातत्यानं भेट होऊ लागली. चहा पिता पिता गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या घरी या ना त्या निमित्तानं जाणं-येणं होऊ लागलं. तेव्हा ते अंकुश काकडे यांच्या शेजारच्या इमारतीत रहायचे. आमच्या वॉर्डाचे भाजपचे अध्यक्ष हीच त्यांची ओळख होती. नगरसेवकपदासाठी उभे राहणार, एवढीच चर्चा होती. पण नगरसेवक नव्हते. विकास मठकरी या नावानं त्यांना आम्ही कधीच बोलावलं नाही. आमच्यासाठी ते कायमच मास्तर किंवा सर राहिले. सरांबद्दलची आणखी एक आठवण म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा मटण खाल्लं होतं. नवी पेठेतल्याच कुठल्याशा गच्चीवर कार्यक्रम झाला होता. नीटसं आठवत नाही, पण कदाचित सरांच्याच गच्चीवर झाला होता.

सरांनी पहिली निवडणूक लढविली १९९७ साली. गोपाळ तिवारी यांच्याविरोधात. जोरदार प्रचार करून त्यांनी गोपाळदादांना घाम फोडला होता. इतके प्रयत्न करूनही मठकरी मास्तर पडणार, असाच होरा होता. मात्र, सर ठाम होते. ‘आशिष, मी जिंकणार. एक मतानं का होईना पण मी जिंकणार,’ हा सरांचा ठाम विश्वास होता. ‘उमेदवार झक्कास, मठकरी विकास’ असं सांगत कार्यकर्ते आख्ख्या वॉर्डभर हिंडत होते. पण गोपाळ तिवारी यांनी मतदारसंघ उत्तम बांधला होता. अखेरीस झालंही तसंच तेरा की चौदा मतांनी सर जिंकले आणि नगरसेवक झाले. नंतर सलग तीनवेळा निवडणूक जिंकले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अगदी सहजपणे काहीच हातात पडलं नाही. 



सरांची दुसरी टर्म त्याच भागातून होती. पण तेव्हा वॉर्डाचा प्रभाग झाला होता. त्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य त्यांचंच होतं. तेव्हा मी ‘केसरी’त बातमीदारी करीत होतो. काही महिने महापालिका बीटही होतं. तेव्हा त्यांची महापालिकेत भेट व्हायची. मात्र, नंतर मी ई टीव्हीत गेलो आणि संपर्क तुटला. तिसरी टर्म वेगळ्या मतदारसंघातून होती.

२००७ मध्ये बीएमसीसीच्या वॉर्डातून निवडणूक लढविण्याची संधी त्यांना मिळाली. तेव्हाही दोन दिग्गजांचे तिकिट कापून त्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती. तेव्हा निवडणूक काळात कर्वे रोडच्या गिरीजात सरांची एकदा भेट झाली होती. तेव्हाही प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत होता. ‘आशिष, मी जिंकणार रे.’ कुठे काय यंत्रणा लावलीय, कसे प्रयत्न चालू आहेत आणि कसे प्रयत्न चाललेत सगळं सविस्तर सांगून टाकलं. सर तिथूनही जिंकले आणि नगरसेवकपदाची हॅट्ट्रिक झाली. 

सर त्याच सुमारास ते बीएमसीसी कॉलेजच्या परिसरात रहायला गेले आणि आमच्या गाठीभेटी कमी झाल्या. क्वचित कधीतरी त्यांचा फोन यायचा. बातमी किंवा लेख वाचला, असं सांगायला येणारे फोनच अधिक. मी कधीतरीच त्यांना फोन करायचो. धीरजच्या कुठल्याशा कार्यक्रमात, कुठल्याशा सभा किंवा जाहीर कार्यक्रमात त्यांची भेट व्हायची. काय चाललंय, सध्या कुठे वगैरे विचारपूस व्हायची इतकंच. पुढे २००९ मध्ये त्यांचे लोकसभेसाठी प्रयत्न सुरू होते. नंतर विधानसभेला शिवाजीनगरमधून लढले. त्यावेळी मी साम मराठीत होतो. तेव्हा फोनवरून गप्पा व्हायच्या.


हे आता आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच विकास मठकरी उर्फ मास्तर उर्फ सरांची कोथरूडमधल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एका दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले, की आशिष, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… मी चाट पडलो. कारण त्या दिवशी वाढदिवस नव्हताच. सरांना धन्यवाद दिले आणि सांगितलं, की अहो आज माझा वाढदिवस नाहीये. त्यांच्याकडे चुकून त्या दिवशी माझा वाढदिवस अशी नोंद झाली होती. बाकी गप्पाटप्पा झाल्या. मला म्हटले, ‘अरे, आशिष किती दिवस झाले आपण भेटलो नाही. आता माझा उपयोग नाही, म्हणून भेटणं किंवा फोन करणं बंद करायचं का?’ 

बापरे, त्यांचं हे वाक्य मला खूप लागलं. अर्थात, जेव्हा ते चांगले होते. राजकारणात सक्रिय होते, तेव्हाही त्यांचं माझं भेटणं अगदी नैमित्तिक होतं. कामासाठी वगैरे तर नाहीच नाही. पण तरीही मला ते वाक्य ऐकून मनाला खूप वाईट वाटलं. सगळे लोक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करणारेच असतात. आज मठकरींकडे काही नाही, म्हणून आपण त्यांना फोन करत नाही किंवा भेटत नाही, असं वाटायला नको म्हणून त्यांना म्हटलं, ‘सर, अहो असं काही नाही. तुम्ही सांगा कधी भेटायचं. मी त्यादिवशी येतो भेटायला. वाटलं तर रवीला पण घेऊन येतो.’ ‘आज संध्याकाळी ये पाचनंतर मी मोकळा आहे.’ सरांनी फर्मान काढले. तुम्ही म्हणाल तेव्हा येतो, म्हटल्यामुळं मला पर्यायच नव्हता. त्यामुळं संध्याकाळी सव्वा पाच वाजता सरांच्या कोथरूडमधल्या निवासस्थानी पोहोचलो.


दीडएक वर्षांपूर्वी सरांना अर्धांगवायूचा त्रास झाला आणि खाटकन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उज्ज्वल राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला होता. अॅडमिट झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या वाचनात यायच्या. त्यांनी हॉस्पिटलमध्ये भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक घेतल्याचंही कळलं होतं. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते आहे, असं कानावर यायचं. नंतर दोन-तीनदा फोनवर बोलणंही झालं. विशेषतः निवडणुकीच्या काळात. तेव्हा ते रामदेव बाबांच्या आश्रमात उपचार घेत होते. मास्तर, वैशालीत येऊन गेले, भाजपच्या कार्यालयात त्यांनी उपस्थिती लावली, असंही अधनंमधनं कळायचं. धीरज मध्यंतरी सरांना टिळक टँकवर जाऊन भेटला होता. तिथले फोटोही त्यानं फेसबुकावर टाकले होते. एक-दोनदा सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची भेटही झाली. पण निवांत गप्पा झाल्या नव्हत्या. त्या मारण्यासाठीच कोथरूडमधलं घर गाठलं. 

सर एकदम मस्त मूडमध्ये होते. पुतण्याकडून ‘शिवांबू’चे फायदे आणि शरीरावर होणारे शास्त्रीय परिणाम समजावून घेत होते. सध्या ‘शिवांबू’ची ट्रीटमेंट सुरू केलीय. ‘शिबांवू’ प्राशन, शिवांबूपासून मसाज वगैरे गोष्टी अगदी उत्साहानं सांगत होतं. शिवांबू प्राशन करण्याच्या कालावधीत काय खायचं आणि काय नाही खायचं, याचे स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहेत, असं सांगत होते. शिवांबू घ्यायला लागल्यापासून खूप फरक जाणवतोय, असंही म्हणत होते. इतर पथ्य नि उपचार पद्धतींबद्दल सांगत होते. दिवसभर काय करतो, किती चालतो, याची माहिती देत होते. पूर्वी रोज दहा-बारा किलोमीटर सहज चालणं व्हायचं. सायकलिंग व्हायचं. पक्षाच्या बैठकीला एखाद्या मतदारसंघात गेलो तर तिथून चालतच घरी यायचो. अगदी वडगांव शेरीतूनही घरी चालत आलोय, असं हसत हसत सांगत होते. मी इतका फिट होतो… पण त्यादिवशी ढोलाचं टिपरू लागलं आणि मग पुढचं सगळं रामायण घडलं, हे सांगताना त्यांचा चेहरा पाहवत नव्हता.


पण इतकं सगळं असूनही पुन्हा एकदा नव्यानं मैदानात उतरण्याची जिद्द त्यांच्या बोलण्यात होती. नजरेत होती. सरांच्या या गोष्टीचं मला कायम अप्रूप वाटतं. त्यांच्यामध्ये असलेली लढण्याची प्रचंड जिद्द, दुर्दम्य आत्मविश्वास आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं राजकारणात उतरण्यासाठी चाललेली धडपड. एखादा असता तर खचलाच असता. गपचूप शिकविण्याचे काम करून सर्वसामान्य प्राध्यापकाचे जीवन जगण्यात धन्यता मानली असती. पण सहजपणे हार मानतील किंवा परिस्थितीला शरण जातील, ते सर कसले. या अतिअत्यंत प्रतिकूल परिस्थितीही त्यांना ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची आहे. पुन्हा एकदा राजकारणात जायचं आहे. काही जणांना हे अवास्तव किंवा निरर्थक वाटू शकतं. पण मला मात्र, त्यांची लढाऊ वृत्ती यातून दिसते.

मास्तरांची लढाऊ वृत्ती अनेक निवडणुकांमधून दिसलीय. गोपाळ तिवारींविरोधात दिसलीय. अनिल शिरोळे यांच्याशी असलेल्या सुप्त संघर्षाच्या प्रसंगी दिसलीय. गोपीनाथ मुंडे यांनी कोत्या मनाने त्यांच्यावर टाकलेल्या बहिष्काराच्या प्रसंगी दिसलीय. खडकवासला भाजपकडे खेचून आणताना दिसलीय. गणेश बिडकर यांना स्थायी समिती अध्यक्ष करताना दिसलीय. पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरतानाही दिसलीय. सरांचा तो संघर्ष आजही सुरूय. आधी तो पक्षांतर्गत विरोधकांशी होता. विरोधी पक्षातल्या लोकांशी होता. आज तो परिस्थितीशी नि नियतीशी सुरू आहे.



पुण्या-मुंबईत झालेल्या उपाचारांनंतर त्यांनी उत्तराखंडमध्ये रामदेव बाबांचा आश्रम गाठला. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रामदेव बाबांकडे शब्द टाकला. ‘हा माझा माणूस आहे. हा खणखणीत व्हायलाच पाहिजे. तुम्ही स्वतः लक्ष घाला.’ रामेदवबाबांचे उपचार आणि प्रचंड पथ्य यामुळे माझ्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली, असं सर स्वतः सांगतात. अनेक पद्धतीचे उपचार, अनेक प्रकारचे व्यायाम, मालिश आणि इतर पूरक औषधांमुळे सध्या मी ७० टक्के बरा झालो आहे. लवकरच उर्वरित तीस टक्के बरा होईन, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा ऐकायला मिळत होतं. 

कोणाचीही मदत न घेता सर स्वतः स्वतःचे चालत होते. स्वतःची काम स्वतः करत होते. मध्यंतरी पदवीधर मतदारसंघातील चंद्रकांतदादा पाटलांच्या विजयानिमित्त श्रमपरिहाराचे आयोजन करण्यात आले होते. तिथं सरांची भेट झाली होती. कुठल्याशा मिळालेल्या पत्रकाची त्यांनी स्वतः घडी घातली. एक हात आणि दात यांचा वापर करून घडी घातली नि पत्रक खिशात ठेवलं. खाली पडलेलं पत्रक स्वतः उचललं, कोणाच्याही आधाराविना स्वतः उठून उभे राहिले. उभं राहण्यासाठी दिलेला मदतीचा हात त्यांनी अत्यंत विनम्रपणे नाकारला. अशी स्वाभिमानी आणि स्वावलंबी वृत्ती तेव्हाही जाणवत होती. त्या तुलनेत परवा भेट झाली तेव्हा सरांची प्रकृती खूपच उत्तम वाटली. तब्येत खूप सुधारली आहे, हा त्यांचा दावा योग्य वाटत होता. 

पक्षाचं काय चाललंय, आठ आमदार आणि एक खासदार काय म्हणतायेत, कोण कशा पद्धतीनं काम करतंय, लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये पक्षाबद्दल, सरकारबद्दल काय भावना आहे, केंद्र आणि राज्य सरकारबद्दल काय वाटतं? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार करत होते. त्यांच्या नसानसांमध्ये फक्त भाजपच ठासून भरलाय, असं पदोपदी जाणवतं होतं. ‘आशिष, माझी संधी हुकली रे…’ हीच त्यांची भावना होती. मागे दोन ते तीनवेळा त्यांनी फोनवर तसं बोलूनही दाखवलं होतं. परवा मात्र, ते थेट तसं बोलले नाहीत. पण भावना व्यक्त होत होती.


पुण्यातील भाजपचा आक्रमक, अभ्यासू आणि धडाकेबाज नगरसेवक आज अशा अवस्थेत आहे, हे पाहून खूपच वाईट वाटतं. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, अभाविपच्या कामाचा अनुभव (सध्या भाजपमध्ये हा अनुभव सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो, अशी माझी ठाम भावना आहे.), मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्त्व, तुलनेनं तरूण नि धडाकेबाज असे अनेक नेतृत्व गुण त्यांच्याकडे होते-आहेत. पुण्याचे भावी खासदार किंवा भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. नरेंद्र मोदींच्या लाटेत गावगन्ना मंडळी आमदार-खासदार झाली. विकास मठकरी तर दोन हजार टक्के निवडून आले असते. पण आता ते त्यांच्या नशिबात नव्हते. आपल्याला याबद्दल इतकं वाईट वाटतं, तर स्वतः मठकरींना त्याबद्दल किती वाईट वाटत असेल. 

सरांना म्हटलं, सर तुम्ही बाकी काही विचार करू नका. आधी ठणठणीत व्हा. मस्त पहिल्यासारखे बरे व्हा. नशिबात जे लिहिलं असेल ते कधीच तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. मिळणार असेल ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या. पण त्याचा विचार तुम्ही आता करू नका. नंतर ते नक्की मिळेल, यावर विश्वास ठेवा. त्यांनाही ते पटलं. पण आता मिळालं नाही, याचं दुःख त्यांना होतं. 

शिवाजीनगर मतदारसंघात पुन्हा एकदा फिरायचंय. जनसंपर्क अभियान राबवायचंय, असं म्हणत होते. अधूनमधून कार्यकर्त्यांचे एक-दोन फोनही येऊन गेले. आमच्या गप्पा सुरू असतानाच नारायण पेठेतील सरांचा (म्हणजेच पक्षाचाही जुनाच) कार्यकर्ता बिपीनही (आडनाव आठवत नाही आत्ता!) आला होता. कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष की चिटणीस होते, ते देखील सरांना भेटायला आले. ही मंडळी सरांना कायम भेटायला येत असावी. म्हणजे तसं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. 


आधीही म्हटल्याप्रमाणे हल्लीचा जमाना हा ‘उगवत्या सूर्याला’ नमस्कार करणाऱ्यांचा आहे. राजकारणात तर दररोज नवे सूर्य उगवतात नि मावळतात. पण मला वाटतं, सर तुम्ही आता याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या नशिबात आहे, ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या हमखास मिळणार. सुदैवाने तुम्ही ज्या पक्षात आहात, तो पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देणारा आहे. तेव्हा तुम्हाला न्याय नक्की मिळेल. आणि जेव्हा मिळेल तेव्हा आतापर्यंतचा बॅकलॉग भरून निघेल इतकं मिळेल. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला…

तेव्हा लवकर बरे व्हा. तंदुरुस्त रहा…

तुमचे आरोग्य उत्तम राहो, हीच प्रार्थना.