Sunday, February 21, 2016

मुंडू, वेष्टीच्या गोष्टी


लुंगी नव्हे धोती...

साधारण पाच वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. विधानसभा निवडणुकीसाठी तमिळनाडूत गेलो होतो. मदुराईत गेल्यानंतर सुप्रसिद्ध मिनाक्षी मंदिरात दर्शनासाठी गेलो होतो. तंजावूर ते मदुराई बस प्रवासात दोस्त झालेला एन. बी. दीपक हा देखील माझ्याबरोबर होता. मंदिरात जात असताना एक बोर्ड वाचला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. तो बोर्ड होता, ‘LUNGIES NOT ALLOWED’. तमिळनाडूतील मंदिरांमध्ये लुंगी नेसणाऱ्या मंडळींना परवानगी नाही, तर मग कोणाला? लोक नेमकं नेसून तरी काय जातात मग मंदिरात? आपल्या प्रवेश मिळणार काय? अशी प्रश्नांची सरबत्तीच मी दीपकवर केली. माझा नेमका काय गोंधळ झालाय हे त्याच्या लक्षात आलं आणि त्यानं सविस्तर खुलासा केला.



दाक्षिणात्य मंडळींबद्दल आपले जे काही समज-गैरसमज असतात, त्यापैकीच तो एक होता, असं नंतर माझ्या लक्षात आलं. दक्षिणेकडील चारही राज्यांमध्ये पुरुष मंडळी कमरेला जे वस्त्र गुंडाळतात, ते म्हणजे लुंगी, असं आपल्याला वाटतं. मात्र, तसं अजिबात नाही. लुंगी म्हणजे चित्रविचित्र रंगांमध्ये असलेले, ठिपक्या ठिपक्यांपासून ते प्राण्या-पक्ष्यांपर्यंत कशाचेही डिझाइन छापलेले, चेक्समध्ये उपलब्ध असलेले वस्त्र म्हणजे लुंगी. दोन्हीत काही ठिकाणी आढळणारा आणखी एक फरक म्हणजे लुंगी गोलाकार असते. त्याला मोकळी बाजू नसते. तर धोतीच्या दोन्ही बाजू मोकळ्या असतात. तशा पद्धतीची लुंगी नेसून मंदिरात जायला मनाई आहे, असं दीपकनं मला समजावून सांगितलं.

लुंगी नव्हे धोती
मग माझा पुढचा प्रश्न होता, की पांढरी लुंगी असते त्याला काय म्हणतात? तमिळनाडूत त्याला धोती किंवा ‘वेष्टी’ म्हणतात, असं त्यानं सांगितलं. धोती मी समजू शकत होतो. पण वेष्टी म्हणजे काय? या प्रश्नावर त्यानं दिलेलं उत्तर भारी होतं. ‘मला माहिती नाही. बहुधा ‘वेस्ट’ला (कमरेला) गुंडाळतात, म्हणून ‘वेष्टी’ असेल,’ असं एकदम भारी उत्तर त्यानं मला दिलं. अर्थातच, ते चुकीचं होतं. तमिळमध्ये ‘वेट्टी’ म्हणजे कापलेले कापड. त्याचा अपभ्रंश होत होत ‘वेष्टी’ हा शब्द आला, असे काही जण सांगतात. तर काहींच्या मते संस्कृत शब्द ‘वेष्टन’ (कव्हर) या शब्दावरून आला असावा. हे झालं तमिळनाडूचं. केरळमध्ये त्याला मुंडू म्हणतात. काही जण केरला धोती म्हणूनही त्याचा उल्लेख करतात. आंध्रप्रदेश आणि तेलंगणमध्ये पंचा म्हणतात. तर कर्नाटकात लुंगीच म्हणतात. कन्नड भाषेतही लुंगीसाठी वेगळा शब्द नाही.


लुंगी म्हणजे घरात नेसायची किंवा बाजारहाटाला जाताना नेसायचे वस्त्र. धोतीच्या तुलनेत लुंगीला प्रतिष्ठा कमी. देवाच्या दरबारी तर लुंगी हद्दपारच. पांढरी शुभ्र, क्रीम कलरची किंवा क्वचित प्रसंगी भगव्या रंगाची (कावी मुंडू) स्वच्छ धुतलेली धोतीच मंदिरामध्ये जाताना हवी. त्यातही काही अपवाद आहेतच. केरळमधील मंदिरांमध्ये अय्यप्पा भक्तांना फक्त काळे मुंडूच नेसावे लागते. इतर रंगांचे मुंडू चालत नाही. पण त्याच काळ्या धोतीला तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातील अनेक मंदिरांमध्ये स्थान नाही. तिथं शुभ्र पांढऱ्या किंवा फिकट क्रीम रंगाची धोतीच हवी. कर्नाटकातील काही मंदिरांमध्ये जर गाभाऱ्यामध्ये जाऊन पूजा करायची असेल तर जरीच्या काठांचे रेशमी धोतीच आवश्यक असते. काही मंदिरांत फक्त धोतीच नाही, तर खांद्यावर उपरणे घेऊनच प्रवेश करावा लागतो.

कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात काही ठिकाणी मजूर किंवा कष्टकरी वर्ग हे रंगीबेरंगी प्रकारातील लुंगी परिधान करतात. अनेकदा त्याचे रंग भडकच असतात. त्याचे कारणही अगदी योग्य आहे. कष्टाची कामे करताना लुंगीचा रंग जितका मळखाऊ असेल किंवा भडक असेल, तितके ते उत्तम असते. त्यामुळेच कष्टकरी मंडळी भडक रंगाची लुंगी परिधान करून कष्टाची कामे करताना दिसतात. आंध्र प्रदेशात रायलसीमा किंवा किनारपट्टीच्या काही भागांमध्ये पांढऱ्या शुभ्र रंगाचे पंचे (धोती) परिधान करणारी मंडळी ही प्रामुख्याने देशमुख किंवा पाटील समाजाची किंवा गावातील प्रतिष्ठीत मंडळी असतात.

नेसण्याच्या पद्धतींमध्ये वैविध्य 
अनेक जण प्युअर कॉटनची धोती नेसणे पसंत करतात. मुख्य म्हणजे कॉटनची धोती असेल तर बहुतेक मंडळी पट्टा बांधत नाहीत. मात्र, धोती टेरिकॉटची असेल तर मात्र, आवर्जून पट्टा बांधावा लागतो. मुंडू बांधण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. निऱ्या करून ते अशा विशिष्ट पद्धतीने खोचतात, की काहीही झालं तरी ते सुटत नाही. ते कमरेवर एकदम फिट्ट बसते. तमिळनाडूमध्येही काहीशा अशाच पद्धतीने वेष्टी नेसतात.


मुंडू किंवा वेष्टी नेसण्याची प्रत्येक ठिकाणाची पद्धती वेगवेगळी आहे. केरळमध्ये हिंदू आणि ख्रिश्चन मंडळी मुंडू नेसताना त्याची मोकळी बाजू (ज्याला मल्याळममध्ये कडा म्हणतात) उजवीकडे येईल अशा पद्धतीने नेसतात. केरळमधील मलबार प्रांतातील मुस्लिम मंडळी बरोबर उलट्या पद्धतीने म्हणजे मोकळी बाजू डावीकडे येईल, अशा पद्धतीने मुंडू परिधान करतात. तमिळनाडूतील अय्यंगार ब्राह्मण मंडळी अशाच पद्धतीने उजवीकडून डावीकडे (मोकळी बाजू डावीकडे) वेष्टी परिधान करतात. तर तमिळनाडूत उर्वरित बहुतांश मंडळींच्या धोतीची कडा उजवीकडेच येते. आंध्र प्रदेशात किंवा कर्नाटकात मात्र, विशिष्ट जाती किंवा धर्मासाठी विशिष्ट पद्धतीनेच पंचे वा लुंगी परिधान केली पाहिजे, असे संकेत नाहीत. ही मंडळी सर्वसाधारणपणे मोकळी बाजू उजवीकडे येईल, अशाच पद्धतीने वस्त्र नेसतात.

मुंडू नेसण्याच्या या पद्धतीची मला ओळख झाली ती केरळमध्ये. एका लग्नाच्या निमित्ताने मी केरळमध्ये गेलो होतो. लग्नाच्या वेळी खास केरळी पद्धतीने पेहराव करावा, या हेतूने मी ‘कासाव मुंडू’ही सोबत नेले होते. ते मी माझ्या पद्धतीने नेसून तयार झालो होतो. त्यावेळी नव्यानेच मित्र झालेला अश्रफ थैवलप्पू हा मदतीला धावून आला. मी नेसलोले मुंडू हे एकदम चुकीचे आहे, असे सांगून त्याने मला योग्य पद्धतीने मुंडू नेसण्यास शिकविले. त्यावेळी त्याचा पहिला प्रश्न मला होता, की तू हिंदू ना? ‘मी म्हटलं हो. पण त्याचा इथे काय संबंध?’. त्यावेळी त्यानं मला हिंदू आणि मुस्लिम मंडळींच्या मुंडू नेसण्यातील पद्धतीमधील फरक समजावून सांगितला.

सिंगल की डबल… 
धोतीमध्ये सिंगल आणि डबल अशा दोन प्रकार उपलब्ध आहेत. साधारणपणे सिंगल म्हणजे दोन ते अडीच मीटर तर डबल म्हणजे चार मीटर किंवा त्यापेक्षा अधिक रुंद अशा पद्धतीने मोजणी होते. सिंगल धोतीचे धागे अधिक घट्ट पद्धतीने विणलेले असतात. शिवाय ते धागे अधिक जड असतात. अशा पद्धतीने ही रचना करण्याचे कारण म्हणजे सिंगल असली तरीही ती धोती पारदर्शक असत नाही. हे शक्य होते धाग्यांच्या दाटपणामुळे. तुलनेने दुहेरी धोतीचे धागे हे पातळ आणि सुटसुटीतपणे विणलेले असतात. दोन्ही धोतींच्या धाग्यांमध्ये इतका फरक असतो, की सिंगल धोती ही डबलच्या तुलनेच अधिक जड असते. बहुतांश मंडळीही कॉटनचीच धोती परिधान करतात कारण त्यामध्ये लोकांना अधिक कम्फर्टेबल वाटते.

काठांच्या दुनियेत…
दक्षिणेतील चारही राज्यांच्या तुलनेत केरळमधील मुंडूचे काठ हे खूप कमी रुंद असतात आणि त्या काठांचा रंगही अगदी फिकट असतो. त्यात भडकपणा अजिबात नसतो. सण, समारंभ किंवा देवळातील विशिष्ट पूजेच्या प्रसंगी सोनेरी रंगाच्या काठाचे मुंडू नेसण्याची पद्धती आहे. केरळमध्ये त्याला ‘कासाव मुंडू’ म्हणतात. हे मुंडू पांढऱ्या रंगाचे किंवा क्रिम कलरचेच असते. केरळच्या तुलनेत तमिळनाडूमध्ये काठ थोडेसे अधिक रुंद असतात. तर कर्नाटक आणि आंध्र प्रदेश (आता तेलंगणही) येथील धोतीचे काठ खूपच रुंद असल्याचे आढळते. तसेच केरळच्या तुलनेत उर्वरित राज्यांमधील काठांचे रंग हे खूपच भडक असतात, असे निरीक्षण तज्ज्ञ मंडळी नोंदवितात. लाल, केशरी, निळे, तपकिरी किंवा चॉकलेटी रंगाच्या काठांमध्ये जरीची नक्षी अशा पद्धतीच्या धोती सर्रास नेसल्या जातात. 


तमिळनाडूमध्ये ‘पॉलिटिकल पार्टी धोती’ असा वेगळाच प्रकार आढळतो. पांढऱ्या शुभ्र रंगाच्या धोतीचे काढ हे राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंगांप्रमाणे असतात. म्हणजे द्रमुकचे नेते किंवा कार्यकर्ते काळ्या आणि लाल अशा दोन रंगांचे काठ असलेली धोती परिधान करतात. तर अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांसाठी तयार केलेल्या धोतीमध्ये काळ्या आणि लाल रंगाप्रमाणेच पांढऱ्या रंगाच्या पट्ट्याचाही समावेश असतो. अशाच पद्धतीने इतर राजकीय पक्षांच्या झेंड्यातील रंग धोतीच्या काठांवर उतरलेले असतात.

फॅशनच्या दुनियेत…
बदलत्या काळानुसार धोतीमध्ये आवश्यक अशा अॅडिशन्स होऊ लागल्या आहेत. म्हणजे वस्त्र परिधान केल्यानंतर बरोबर उजव्या किंवा डाव्या हाताला एक खिसा येईल अशा पद्धतीने मुंडूची रचना केलेली असते. अर्थात, इतकी वर्षे लोकांना खिसा नसतानाही पैसे आणि इतर आवश्यक गोष्टी कशा ठेवायच्या याची सवय झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे खिसा असलेले मुंडू विशेष लोकप्रिय ठरत नसल्याचीही स्पष्ट झाले आहे. दुसरी गोष्ट म्हणजे धोती अचानक सुटू नये, यासाठी लोक खबरदारी घेतातच. प्रसंगी बेल्टही बांधतात. यावर उपाय म्हणून आता खास ‘वेलक्रो धोती’ बाजारात उपलब्ध आहेत.


काय आहेत एटिकेट्स…
धोती परिधान केल्यानंतर ऑफिसमधील वरिष्ठ अधिकारी, वयाने ज्येष्ठ व्यक्ती किंवा एखादी महिला समोर असेल तर धोती गुडघ्यापर्यंत वर घेऊ नये, असा संकेत आहे. आणि अर्थातच, तो पाळला जातो. मग ते गुडघ्यापर्यंत वर कधी घ्यायचं? तर भराभर चालायचं असेल, पाऊस पडत असेल आणि रस्त्यात पाणी साचलं असेल, तर ते वर घेतलं जातं. शिवाय एखाद्याला दम द्यायचा असेल किंवा तावातावानं भांडायचं असेल, तर आपोआपच गुडघ्यापर्यंत वर घेतलं जातं. शिवाय मंदिरामध्ये दर्शनाला जाताना किंवा सण-समारंभ असेल, लग्नासारखा प्रसंग असेल, तर ते गुडघ्यापर्यंत वर घेणे टाळणेच इष्ट.

धोतीचे महत्त्व…
मध्यंतरी चेन्नईमध्ये एका खासगी क्लबने धोती परिधान केलेल्या मंडळींना क्लबमध्ये प्रवेश दिला जाणार नाही, असा फतवा काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी तातडीने तमिळनाडू सरकारने अशा पद्धतीने बंदी घालण्यास मनाई करणारा कायदाच करून टाकला. वेष्टी ही तमिळनाडूच्या संस्कृती आणि परंपरेचा भाग आहे. त्यावर घाला घालाल, तर तुमचे सर्व सवलती बंद करू आणि विशेषाधिकार काढून टाकू, अशी तंबीही कायद्याद्वारे देण्यात आली होती. तमिळनाडूत तर काही दूरचित्रवाहिन्यांवर चर्चेसाठी येणारे पाहुणे आणि बातम्या देणारे पुरुष न्यूज अँकर्स यांना ‘वेष्टी’ हा ड्रेसकोड आवश्यक आहे. ‘पट्टली मक्कल कच्ची’च्या ‘पुथिया तमिळगम’ या वाहिनीचे पुरुष अँकर्स हे आधी सुटाबुटात बातम्या देत असत. ‘पीएमके’चे पक्षाध्यक्ष डॉ. एस. रामदॉस यांनी पाश्चिमात्य ड्रेसकोड बदलून त्यांना वेष्टी नेसूनच बातम्या देणे बंधनकारक केले.


(प्रसिद्धीः महाराष्ट्र टाइम्स, संवाद पुरवणी २१ फेब्रुवारी २०१६)

Monday, January 11, 2016

संघशक्तीचा अपूर्व संगम



महाराष्ट्रातही दिसली संघाची ताकद

आयुष्यात काही प्रसंग, घटना किंवा आंदोलने अशी असतात, की जे अनुभवण्याची संधी क्वचितच मिळते. वैयक्तिक आयुष्यातही आणि संघटनेच्या आयुष्यातही. अशा दुर्मिळ प्रसंगांचे जे साक्षीदार होतात, ते स्वतःला भाग्यवान समजतात. त्यासाठी तळजाईचे शिबिर किंवा रामजन्मभूमीचे आंदोलन अशी काही उदाहरणे देता येतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या अपूर्व अशा शिवशक्ती संगमला अशाच कार्यक्रमांच्या पंक्तीत बसविले पाहिजे. केरळ, मेंगळुरू, कर्नाटकातील इतर शहरे, महाकोशल वगैरे प्रांतांमध्ये झालेल्या संघाच्या भव्य एकत्रीकरणांच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो. त्यांच्या ध्वनिचित्रफिती पाहून आनंदी होतो. मात्र, महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे अतिभव्य एकत्रीकरण आपण का घेऊ शकत नाही, याची सल प्रत्येक स्वयंसेवकाच्या मनात होती. ती सल शिवशक्ती संगमच्या निमित्ताने दूर झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने संघाचे भव्यदिव्य शिबिर गेल्या काही दशकांमध्ये पार पडले नव्हते. प्रत्येक वेळी दाखला दिला जायचा तो १९८३ साली पार पडलेल्या तळजाईच्या शिबिराचा. त्यानंतर संघाचे अशा प्रकारे अतिविराट एकत्रीकरण महाराष्ट्रात झाले नव्हते. माजी सरसंघचालक माननीय राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांना मानवंदना देण्यासाठी २००० किंवा २००१ मध्ये मुंबईत शिवाजी पार्कवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माटुंग्याहून संचलन करून शिवाजी पार्कवर पोहोचल्यानंतर तिथे सरसंघचालक प्रणाम आणि मा. रज्जूभैय्या यांचे बोलणे, असा कार्यक्रम होता. मात्र, संख्यात्मकदृष्ट्या तो कार्यक्रम तळजाईच्या शिबिराला मागे टाकू शकला नव्हता. मुंबई म्हणजे राज्याच्या एका टोकाला असलेले स्थान हा त्यामधील मुख्य अडसर ठरला असावा. त्यामुळेच यावेळी संघाने नव्या रचनेतील प्रांतशः एकत्रीकरण घेण्याचे ऩिश्चित केले असावे. मध्यंतरी मराठवाडा प्रांताचे एकत्रीकरण औरंगाबाद येथे पार पडले आणि आता पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे शिवशक्ती संगम हे ‘न भूतो’ असे एकत्रीकरण मोठ्या दिमाखात संपन्न झाले.


नाशिक, नगर, पुणे महानगर, पुणे जिल्हा, सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधून स्वयंसेवक संपूर्ण गणवेशात (दंड नाही) जांबे, नेरे आणि मारुंजी या तीन गावांच्या सीमांवर आय़ोजित करण्यात आलेल्या शिवशक्ती संगममध्ये सहभागी झाले. पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास एक लाख साठ हजार स्वयंसेवकांनी या संगमसाठी नोंदणी केली होती नि त्यापैकी निम्म्याहून अधिक स्वसंयेवक गणवेशात उपस्थित राहिले. पन्नास ते साठ हजारहून अधिक नागरिक हा भव्यदिव्य सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी मारुंजी येथे आवर्जून आले होते. त्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांचाही समावेश होता.

भोजनासह सर्व व्यवस्था अत्यंत चोखपणे आणि ठरलेल्या नियोजनानुसार पार पडत होत्या. कुठे धक्काबुक्की नाही. चेंगराचेंगरी नाही. सारे काही शिस्तीत. हीच शिस्त कार्यक्रम संपल्यानंतरही अनुभवायला मिळत होती. कार्यक्रम संपल्यानंतरही कुठे महिलांच्या छेडछाडीच्या घटना घडल्या नाहीत. रस्त्यावरील दुकाने लुटल्याच्या बातम्या छापून आल्या नाहीत. अपघाताच्या घटना घडल्या नाहीत. दारू पिऊन धिंगाणा घातल्याचे वृत्त कानावर आले नाही. इतर राजकीय पक्ष (काही सन्मान्य अपवाद वगळता) आणि संघटनांच्या महाएकत्रीकरणानंतर जे जे ऐकायला मिळते, त्यापैकी कशाचाही अनुभव शिवशक्ती संगम संपल्यानंतर आला नाही. हे संघाचे आणखी एक वैशिष्ट्य.


कार्यक्रमाच्या मुख्य प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेला धनुष्यबाण अनेकांचे लक्ष वेधून घेत होता. भुवयाही उंचवायला लावत होता. मात्र, संघाचे संघटन हे हिंदूंचे आहे. हिंदुत्वाला मानणाऱ्यांचे आहे. हिंदुत्वाचा विचार करणारे कोणीही आम्हाला परके नाही. हाच संदेश देण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारावर धनुष्यबाणाची प्रतिकृती साकारण्यात आली होती. प्रभू श्रीरामचंद्रांचा हा धनुष्यबाण सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरला होता.

मुख्य कार्यक्रमाच्या ठिकाणी उभारलेले भव्यदिव्य असे व्यासपीठ आणि अत्यंत शिस्तबद्धपणे करण्यात आलेली आखणी, चर्चेचा विषय ठरली होती. संघस्थानाच्या परिसरात शिवकालीन वातावरण निर्माण करण्यात आले होते. विविध किल्ल्यांमधील दिंडी दरवाजांच्या प्रतिकृती साकारण्यात आल्या होत्या. तटबंदीचे स्वरुप देण्यात आले होते. छत्रपती शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांचे पुतळे, हत्ती, आणि घोड्यांच्या प्रतिकृती शिवकालात घेऊन जात होत्या. महाराष्ट्रातील सामाजिक महापुरुषांची शिल्प साकारण्यात आली होती. कार्यक्रमाला येणारा प्रत्येक जण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले, महर्षि धोंडो केशव कर्वे, अण्णा भाऊ साठे, सयाजीराव गायकवाड, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू संत तुकाराम यांच्या पुतळ्यांपाशी आवर्जून थांबत होता. हात जोडत होता. अभिवादन करत होता.

तीन जानेवारीचा अनुभव ज्यांनी घेतला, त्यांना संघाच्या विराट रुपाचे दर्शन घडले. रविवारी सकाळी नऊ वाजल्यापासूनच स्वयंसेवकांचे जथ्थेच्या जथ्थे संघस्थानाच्या दिशेने येताना दिसत होते. अगदी दुपारी दोन-अडीच वाजेपर्यंत ‘जनांचा प्रवाहो’ मारुंजीमध्ये दाखल होत होता. त्यांच्यात उत्साह होता, आपण एका भव्यदिव्य कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी आलो आहोत, याचा आनंद चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. जगातील सर्वाधिक मोठ्या संघटनेचा आपण एक बिंदू आहोत, याचा स्वाभिमान त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत होता. नोंदणी न झालेल्या पण शिवशक्ती संगमचा भाग होण्यासाठी उत्सुक असलेल्या स्वयंसेवकांसाठी ऐनवेळी नोंदणी करण्याची सवलत देण्यात आली होती. त्या ठिकाणीही लांबच लांब रांगा लागल्या होत्या. गणवेशाची पूर्तता करण्यासाठीही अनेकांची धावपळ सुरू होती.


आपल्या वडिलांचे बोट धरून आलेल्या छोट्या स्वयंसेवकांपासून ते शंभरी पार ज्येष्ठ स्वयंसेवकांपर्यंत अनेक जण खास शिवशक्ती संगमसाठी उपस्थित होते. एकाच कुटुंबातील आठ-दहा जण, एकाच घरातील चार पिढ्या अशीही दृष्ये बघायला मिळत होती. काही जणांनी खास शिवशक्ती संगमसाठी गणवेश पूर्ण केला होता. अनेकांनी प्रथमच संघाची अर्धी विजार चढविली होती. संघकामापासून काही वर्षे दूर गेलेले स्वयंसेवकही सारे काही विसरून या एकत्रीकरणासाठी उपस्थित होते. संघकामाचे एक वैशिष्ट्य आहे. एखादी व्यक्ती संघाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर, संघाच्या भूमिका किंवा निर्णयांवर जरूर नाराज होते. काही काळ संघकामापासून दूर जाते. पण बहुतांश स्वयंसेवकांच्या मनात संघाबद्दल कटू भाव नसतात. त्यामुळे ते स्वयंसेवक या ना त्या निमित्ताने पुन्हा एकदा रचनेमध्ये फिट्ट बसतात. असेही काही स्वयंसेवक शिवशक्ती संगमच्या निमित्ताने पुन्हा एकदा नव्या उमेदीने कामासाठी सज्ज झालेले दिसले.

स्वयंसेवकांच्या आगमनापासून ते संघस्थानावर जाईपर्यंत सर्वच कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्धपणे आणि नियोजनाप्रमाणे सुरू होते. सिद्धता केंद्रांमध्ये नोंदणी करण्याचे काम असो किंवा भोजनाची रांग असो, सर्वच ठिकाणी संघाची शिस्त ठायीठायी दिसत होती. शिवशक्ती संगमच्या परिसरात लाख-सव्वा लाख स्वयंसेवक आहेत आणि तरीही सर्व कार्यक्रम शांतपणे सुरू आहे, हे त्रयस्थ माणसाला सांगितले असते, तर विश्वासही बसला नसता. इतकी शांतता आणि शिस्त सर्वत्र होती. अर्थात, संघाचा कार्यक्रम आहे, याचा अर्थ तो शिस्तबद्धपणे आणि वक्तशीरच होणार, यात नवीन ते काही नाही. त्याचाच प्रत्यय शिवशक्ती संगमच्या निमित्ताने आला इतकेच.


संघ ब्राह्मणांचा आहे, संघ उच्चवर्णीयांचा आहे, संघ शहरी लोकांचा आहे, संघ उच्चशिक्षितांचा आहे, संघ म्हाताऱ्यांचा आहे, अशी टीका संघावर अनेकदा होते. अशी टीका करणारी मंडळी जर मारुंजीमध्ये उपस्थित असती, तर त्यांची तोंडे कायमची बंद झाली असती. सर्व सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरातील स्वयंसेवक या एकत्रीकरणाला उपस्थित होते. संघाने जात-धर्म कधीच पाळला नाही, त्यामुळे कोणत्या जातीचे किती होते वगैरे चर्चा करण्यात काहीच हशील नाही. राहता राहिला प्रश्न वयाचा, तर शिवशक्ती संगमला जवळपास चाळीस टक्के संख्या ही तरुणांची होती. संघदृष्ट्या तरूण नव्हे तर लौकिक अर्थाने ज्यांना तरुण म्हणता येईल, असे तरूण. त्यामुळे संघावर होणाऱ्या सर्व आरोपांना शिवशक्ती संगमच्या माध्यमातून आपसूक उत्तर मिळाले.

संघावर होणार आणखी एक आरोप म्हणजे संघामधील महिलांचा सहभाग. राष्ट्र सेविका समिती आणि संघ परिवारातील विविध संघटनांशी संबंधित अशा हजारो महिला शिवशक्ती संगमच्या व्यवस्थेमध्ये सहभागी झाल्या होत्या. भगवे दुपट्टे परिधान केलेल्या शेकडो महिलांचे लोंढेच्या लोंढे सोपविलेल्या व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडण्यासाठी मारुंजी येथे येऊन धडकत होते. सिद्धता केंद्र वगळता सर्वच व्यवस्थांमध्ये महिलांचा सहभाग पहायला मिळत होता. शिवाय बाहेरगावाहून आलेल्या स्वयंसेवकांना परत जाताना शिदोरी देण्याची व्यवस्था करण्यात आली होती. जवळपास अकरा लाख पुऱ्या जमा करण्याचा विश्वविक्रम या निमित्ताने नोंदला गेला. त्याची बहुतांश व्यवस्था ही महिलांनीच पार पाडल्यामुळेत त्यांच्या सहभागाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांचे सारे प्रश्न वासलात निघाले.

अनेकदा संघाच्या शाखांवर टीका होते. हे काय पाच-दहा स्वयंसेवक एकत्र येतात आणि एक तासानंतर आपापल्या घरी जातात. अशातून काय राष्ट्रकार्य साध्य होणार आहे, अशी टीका अनादि काळापासून सर्रास होताना दिसते. मात्र, शिवशक्तीच्या निमित्ताने संघाच्या स्वयंसेवकांचे जे विराट रुप समाजाला दिसले, त्यातून संघ स्वयंसेवकांमध्ये दुर्दम्य असा आत्मविश्वास निर्माण झालेला पहायला मिळाला. शाखेत जरी आम्ही दहा-पंधरा असलो, तरीही आमची संघटना लाखो-करोडो स्वयंसेवकांची आहे, हे स्वयंसेवकांना समजले. समाजातील कोणत्याही समस्येवर किंवा अडचणींवर संघशक्तीच्या जोरावर आपण लीलया मात करू शकतो, असा ठाम विश्वास स्वयंसेवकांमध्ये पहायला मिळाला. ज्या गावांत आतापर्यंत संघ किंवा संघाचे स्वयंसेवक पोहोचू शकले नव्हते, अशा सर्व ठिकाणांपर्यंत शिवशक्तीच्या निमित्ताने संपर्क झाला. काही नवीन कार्यकर्ते संघकामामध्ये आले. नवीन गावे जोडली गेली. त्यामुळे संघाचा हा कार्यक्रम घेण्यामागचा जो मूळ उद्देश होता, तो या निमित्ताने साध्य झाल्याचे दिसून आले. 



माध्यमांमध्ये आणि सोशल मीडियावरही शिवशक्तीच्या अपूर्व संगमाचे जोरदार पडघम वाजताना दिसले. अगदी परदेशी माध्यमे आणि वृत्तसंस्थांचे प्रतिनिधीही या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे वार्तांकन करण्यासाठी जातीने उपस्थित होते. भारतातील इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांचे (प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक दोन्हीही) प्रतिनिधीही मारुंजी येथे हजर होते. अनेकांनी तर कार्यक्रमाचे आणि परमपूजनीय सरसंघचालकांचे भाषण लाइव्ह प्रसारित केले. दुसऱ्या दिवशीही सर्वच वृत्तपत्रांमध्ये कार्यक्रमाचे उत्तम वार्तांकन पहायला-वाचायला मिळाले. फेसबुक आणि ट्वीटरवर तर शिवशक्ती संगमचा ट्रेंड झालेला पहायला मिळाला. जो तो या अपूर्व संगमाची आठवण आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात किंवा कॅमेऱ्यामध्ये साठवून घेण्यासाठी धडपडत होता. ड्रोनच्या माध्यमातून होणारी फोटोग्राफी आणि शूटिंग, ड्रोनमधून होणारी पुष्पवृष्टी असे काही हटके प्रकारही या निमित्ताने अनुभवायला मिळाले.

शिवशक्ती संगममध्ये आलेला प्रत्येक जण ते वातावरण पाहून भारून गेला होता. असेच दोन अनुभव या निमित्ताने मला अनुभवता आले. पहिला अनुभव संघाच्या ज्येष्ठ प्रचारकांचा. शिवशक्ती संगमचे भव्य व्यासपीठ आणि इतर व्यवस्था पाहून या प्रचारकांची प्रतिक्रिया काय होती… ‘आज जरी मला देवाने बोलवून घेतले, तरी मी आनंदाने जायला तयार आहे. माझ्या आयुष्याचे सार्थक झाले, असे मी मानतो.’

संघाचे खूप जुने आणि निष्ठावंत स्वयंसेवक सु. ह. जोशी शिवशक्ती संगममध्ये भेटले. ‘अभूतपूर्व. डॉक्टरांनी लावलेल्या रोपट्याचे विशाल वृक्षामध्ये रुपांतर झाले आहे. आणि मी या क्षणांचा साक्षीदार आहे, हे मी माझे भाग्य समजतो. डॉक्टरांची पुण्याई, त्यांची दूरदृष्टी आणि संघाच्या स्वयंसेवकांची अपार मेहनत यांच्यामुळेच हे क्षण आज आपल्याला अनुभवायला मिळत आहेत.’ जवळपास प्रत्येक स्वयंसेवकांच्या मनातील भावनाच सुहंनी त्यावेळी व्यक्त केली.

शिवशक्तीच्या अपूर्व संगमाला आणखी एक किनार आहे. केरळ आणि कर्नाटकमध्ये यापूर्वी अशा पद्धतीचे कार्यक्रम अनेकदा झाले असतील आणि इतक्या वर्षांनंतर महाराष्ट्रात असे कार्यक्रम होत आहेत. वास्तविक पाहता, नागपूरनंतर संघाचे काम सर्वप्रथम पुण्यात सुरू झाले नि नंतर पश्चिम महाराष्ट्रात. मात्र, तरीही इतक्या वर्षांमध्ये अतिविराट कार्यक्रम घेणे संघाला जमले नव्हते. त्याची अनेक कारणे असतील. पण मला वाटते, की त्यापैकी महत्त्वाचे कारण म्हणजे गांधीहत्येनंतर संघकामाला बसलेला फटका. 


असे म्हणतात, की गांधीहत्येनंतर संघाचे काम पन्नास वर्षे मागे गेले. संघाचे काम करणाऱ्या अनेकांना त्याचा चटका बसला. संघाच्या स्वयंसेवकांची घरे जाळली, त्यांच्यावर बहिष्कार टाकण्यात आला. हे हेतुपुरस्सर करण्यात आले होते. त्या चटक्यामुळे अनेक जण संघापासून आणि संघकामापासून दूर गेले. अनेकांनी संघाशी असलेले संबंध तोडले. त्यामुळेच संघाचे काम अनेक वर्षे मागे गेले. मात्र, अशाही परिस्थितीत संघविचारांवर निष्ठा ठेवून जी मंडळी, जे स्वयंसेवक संघकामात कार्यरत राहिले, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांनी संघविचारांची पालखी खाली ठेवली नाही, अशा सर्वांच्या प्रयत्नांचे यश म्हणजे शिवशक्ती संगम आहे.

केंद्रात सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले भाषण खूप गाजले होते. त्यात मोदी म्हणाले होते, की हे माझे एकट्याचे यश नाही. भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे. इतकेच नाही, तर जनसंघ आणि भाजपला गावागावांत पोहोचविण्यासाठी ज्या चार-पाच पिढ्या खपल्या त्या सर्व पिढ्यांमुळे आपण हा दिवस पाहू शकतो आहोत. शिवशक्ती संमगच्या बाबतीतही तेच लागू आहे. शिवशक्ती संगमसाठी गेली दोन वर्षे झटणाऱ्या प्रत्येक स्वयंवसेकाचे आणि अधिकाऱ्यांचे हे यश आहे. त्याचप्रमाणे संघावर गांधीहत्येचा आरोप झाल्यानंतरही विचलित न होता संघकाम सुरूच ठेवणाऱ्या आणि आणीबाणीत महिन्मोमहिने तुरुंगात काढावे लागल्यानंतरही हसतमुखाने पुन्हा संघाच्या दैनंदिन कामात सहभागी झालेल्या स्वयंसेवकांचे हे यश आहे. राकट, कणखर आणि काळ्या पाषाणापासून बनलेल्या महाराष्ट्रात संघाची पाळेमुळे रुजविण्यासाठी धडपडणाऱ्या संघाच्या चार-पाच पिढ्यांमधील अधिकाऱ्यांचे, प्रचारकांचे आणि स्वयंसेवकांचे हे यश आहे.

१९४८ साली गांधी हत्येमुळे संघाला फटका बसला आणि संघाचे काम ५० वर्षे मागे गेले, असे जर मान्य केले. तर २०१५ साली पार पडलेल्या अपूर्व अशा शिवशक्ती संगममुळे संघाचे काम पुन्हा एकदा पूर्वपदावर आले आहे, असे म्हणायला हरकत नाही. आणि हेच शिवशक्ती संगमच्या आय़ोजनाचे यश आहे.


(विवेकच्या मंथन पेजवर प्रसिद्ध झालेला लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...)

कोण म्हणते संघ कामात महिलांचे योगदान नाही?


(काही छायाचित्रे मिलिंद वेर्लेकर यांच्या फेसबुक वॉलवरून साभाjर...)