Monday, December 08, 2008

प्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...


अनुभवला थरार दहशतवादाचा ...

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं सारं जग हादरलं. भारत तर पुरता कोलमडून गेला. अशा पद्धतीनं हल्ला होईल, अशी अपेक्षाही कोणाला नव्हती. गुप्तचर संस्था आणि सुरक्षा रक्षकांचं अपयश किती महाग पडू शकतं, याचा अनुभव भारतानं घेतला. भारताची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली गेली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर अतिरेक्‍यांनी केलेला अंदाधुद गोळीबार, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय तसंच हॉटेल ताज इथं सुरु असलेली कारवाई चक्रावून टाकणारी होती.

मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मी पुण्यात होतो. माझी सुटी संपत असल्यानं दुसऱ्या दिवशी बेलापूरला जायचं होतं. त्यानुसार मी 27 नोव्हेंबरला सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास बेलापूरला पोचलो. पण ही कारवाई संपण्याचं नाव घेईना. मी येण्यापूर्वी संपूर्ण रात्र आमच्या टीमनं तासातासाला अपडेट बुलेटिन काढली होती. तसंच कमी मनुष्यबळ आणि अपुऱ्या सोईसुविधा असतानाही आम्ही झगडत होतो. बेलापूरला पोचल्यानंतर तो संपूर्ण दिवस "डेस्क'वरच होतो. संध्याकाळी सात ते रात्री साडेअकरा असं साडेचार तास "लाईव्ह' करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्‍यक मुलाखती आणि इतर बातम्या मागावून घेतल्या. तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचे फोनो आणि अधूम मधून अँकरमध्ये डिस्कशन अशापद्धतीनं साडेचार तास अक्षरशः खेचून काढलं. पण मजा आली. अशा पद्धतीनं काहीही तयारी नसताना प्रथमच इतक्‍या मोठी "रिस्क' आम्ही घेतली होती. पण तरीही वेळ मारुन नेली.

रात्रभरात कारवाई संपेल आणि पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं आमचे वार्ताहर सांगत होते. त्यामुळं मी रात्री ऑफिसमध्येच थांबलो होतो. कदाचित ऐनवेळी रात्री विशेष बातमीपत्र काढावं लागलं असतं. त्यामुळं मी ऑफिसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. पण तसं झालंच नाही आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजेच 28 तारखेलाही हे रण सुरुच होतं. मुंबईमध्ये चकमक सुरु आहे आणि मी तिथं जाऊ शकत नाही, हे माझ्या मनाला खटकत होतं. यावेळी मला ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचं एक वाक्‍य आठवतं. जगात जिथे जिथे काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडत असतील तिथं बातमीदार म्हणून मला जावंसं वाटतं, असं गडकरी म्हणायचे. ही गोष्ट कायम माझ्या मनात असते. त्यामुळंच मी परवानगी घेऊन मुंबईत रिर्पोंटिगसाठी गेलो.

प्रथम आनंद गायकवाड याच्यासह नरिमन हाऊस इथं जाऊन तिथं परिस्थिती कशी आहे, हे पाहून आलो. तिथली कारवाई सर्वाधिक अवघड होती. नरिमन हाऊस हे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांच्या वसाहतीमध्ये वसलेले आहे. त्यामुळं तिथं कारवाई सुरु असताना नागरिक क्रिकेटच्या मॅचला जमतात तसे जमले होते. शिवाय काही अतिउत्साही पत्रकार "लाईव्ह'चा थरार अनुभवण्यासाठी पुढे पुढे करत होते. इथली कारवाई लवकर संपेल, असं चित्र होतं. तसंच तिथं आनंद असल्यामुलं मी ताज इथं "रिर्पोटिंग'साठी गेलो. तिथं साधारण रात्री साडेसातच्या सुमारास पोचलो. तेव्हापासून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत अनुभवला थरार, थरार आणि फक्त थरार.

""माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु, जिंकू किंवा मरू...'' हे समरगीत मी फक्त ऐकलं किंवा पाहिलं होतं. ते अनुभवण्याची संधी मला त्या रात्री मिळाली. आपण जणू काही दिवाळीतल्या फटाक्‍यांचे आवाज ऐकतोय, अशा पद्धतीनं गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरु होते. रात्री बारा ते साडेतीन या कालावधीत सारं कसं शांत शांत होतं. त्यानंतर मात्र, पुन्हा एकदा रणधुमाळी सुरु झाली. मध्यरात्रीनंतर चकमक थांबली असली तरी पत्रकारांचे गोळीबार सुरुच होते. एका पत्रकारानं तर फोनो देताना अकलेचे तारेच तोडले होते. ""ताजमध्ये सहा अतिरेकी आहेत. त्यापैकी दोन महिला अतिरेकी आहेत. त्यांनी नुकतंच रात्रीचं जेवण केलंय आणि आता पुन्हा एकदा ते चकमक करण्यासाठी सज्ज झाले आहेत...'' अशी बडबड ऐकल्यानंतर मला तर सुन्न व्हायला झालं. मुळात संबंधित पत्रकाराला ही माहिती दिली कोणी आणि इतकी "डिटेल' माहिती याच्याकडे असेल तर मग त्याला गुप्तचर खात्यातच नोकरी दिली पाहिजे, असा विचार माझ्या मनाला शिवला. पण अशी फेकचंदगिरी करणाऱ्या पत्रकाराला जोड्यानं का मारु नये, असंही मला वाटलं.

शायना एन. सी. नामक भाजपची एक चकमो नेता आहे. ती लग्नाला आल्यासारखी "गेट वे ऑफ इंडिया'जवळ आली होती, रात्री दीड वाजता. आपला कोणी बाईट घेईल किंवा मुलाखत घेईल का, याचा अंदाज शायना एन. सी. घेत होत्या. पण त्यांना फारसं कोणी विचारत नव्हतं. अखेर "लाईव्ह इंडिया' नामक वाहिनी तिच्या चमकोगिरीला बळी पडली आणि वाहिद खान नावाच्या अतिउत्साही पत्रकारानं तिची मुलाखत घेतली, अवघी पंधरा मिनिटं. ऍलेक पद्‌मसी हे ऍड विश्‍वातलं हे नामांकित व्यक्तिमत्व. हे महाशय पण रात्री अडीचच्या सुमारास तिथं आले. "बीबीसी'च्या एका पत्रकाराक डून त्यांनी आधी माहिती घेतली आणि मग तीच माहिती दुसऱ्या एका वाहिनीच्या मुलाखतीत सांगितली. त्यामुळं या महाशयांचे टीव्ही प्रेमही उघड झाले. हवशे, नवशे आणि गवशे असे असंख्य नागरिक-पत्रकार तिथं होते.

पहाटे साडेतीनच्या सुमारास चकमक पुन्हा सुरु झाली आणि आता ती वेगानं सुरु होती. अतिरेक्‍यांची एखादी गोळी आपल्या दिशेनं येऊ नये किंवा ग्रेनेडचे तुकडे फुटून आपल्या अंगावर येऊ नयेत, अशी प्रार्थना करुन आम्ही तिथं थांबलो होतो. माझ्या परिस्थितीवरुन तिथं लढणारे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या धैर्याची कल्पना मला येत होती. त्यामुळंच त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे, अशी माझी भावना आहे. सकाळी सकाळी म्हणजे साडेसातच्या सुमारास ही चकमक अंतिम टप्प्यात असल्याचं जाणवलं. कारण गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यांचा वेग वाढला होता. ताजच्या डाव्या कोपऱ्यातल्या तळ मजल्याला आगा लागली. ती प्रचंड वेगानं पसरत होती. पहिल्या मजल्याचा काही भागही आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. ही आग अतिरेक्‍यांनीच लावली, असा आमचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मात्र, ही आग लष्कराच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करुन लावली होती. पण तेव्हा साधारण अंदाज आला होता की, ही चकमक काही मिनिटांतच संपुष्टात येणार आहे. झालंही तसंच. साडेआठ पावणे नवाच्या सुमारास सारं काही शांत शांत झालं. एक व्यक्ती ताज हॉटेलच्या खिडकीतनं बाहेर पडताना सगळ्यांना दिसला. तोच ताजमधला शेवटचा अतिरेकी आणि त्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं होतं.

त्यानंतर जवान आणि कमांडो अगदी रिलॅक्‍स दिसत होते. अग्निशामक दलाचे जवानही अगदी बिनधास्तपणे आग विझवत होते. शिवाय ज्या पहिल्या आणि तळ मजल्यावर संघर्ष सुरु होता, तिथं आता जवानांनी ताबा मिळवला होता. त्यामुळं कारवाई स्पष्ट झाल्याचं जाणवतं होतं. हो कारवाई संपलीच होती. कारवाई पार पडल्यानंतर विश्रांती घेत असलेल्या एका "एनएसजी' कमांडोशी गप्पा मारत असताना त्यांच्यातल्या आत्मविश्‍वाचा प्रत्यय आला. ही कारवाई थोडी अवघड होती, असं नाही वाटत का? या माझ्या प्रश्‍नावर त्यानं नकारार्थी उत्तर दिलं. "एनएसजी'साठी कोणतीच कारवाई अवघड नाही. आम्ही कोणाचाही सामना करु शकतो आणि देश वाचवू शकतो. हे अतिरेकी अद्ययावत आणि फिट होते, त्यामुळं आम्हाला अंदाज यायला थोडा वेळ लागला. पण अखेरीस ते संपलेच. आम्ही कोणापुढेही हार पत्करत नाही... असं त्या कमांडोनं सांगितल्यानंतर मला धन्य झाल्यासारखं वाटलं.

3 comments:

Anonymous said...

Chhan ahe re lekh.
Pahilach anubhav ekdum thararak hota ase disat aahe.

Ravindra Dashaputre...

Anonymous said...

very nice...
sharing is important..
chan vatle vachun..
karan pratyekacha anubhav sarkha aslya tari bhavna ani shabd vegle astat..

Rupali Pethkar-Joshi

Narendra prabhu said...

असं काही ओरीजनल वाचायला मिळालं की बरं वाटतं. सगळेच मिडीयावाले वाईट नसतात, तुमचा प्रयत्न चांगला होता, लेखही चांगला आहे. माझा ब्लॉग http://prabhunarendra.blogspot.com/ वाचा

नरेन्द्र प्रभू