Thursday, April 30, 2009

राज्यात युतीचेच पारडे जड...


महाराष्ट्रात तरी नाकर्ते हटणार...

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं राज्याच्या विविध भागांत फिरण्याची संधी मिळाली. राज्यातल्या जवळपास 80 टक्के मतदारसंघांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये "मी महाराष्ट्र बोलतोय...'ची टीम फिरली. नागरिकांची मतं, त्यांच्या अपेक्षा आणि त्यांचा कौल जाणून घेतला. अनेक ठिकाणी मतदारांनी राजकीय नेत्यांवर कडक शब्दांमध्ये टीका केली. तर काही ठिकाणी नागरिकांनी राजकारण्यांवर बोलणं देखील टाळलं. नागरिकांशी बोलल्यानंतर आणि मतदारसंघांमध्ये फिरल्यानंतर साधारणपणे तिथला निकाल काय असेल किंवा राज्यातलं एकूण चित्र कसं असेल, याचा अंदाज येतो. तेच चित्र इथं रेखाटण्याचा प्रयत्न मी करत आहे...

अटलबिहारी वाजपेयी सरकारला घरी बसायला लावणाऱ्या 2004 च्या निवडणुकीत महाराष्ट्रानं शिवसेना-भाजप युतीला निसटती आघाडी दिली होती. त्यावेळी अनेक ठिकाणी अनपेक्षित निकाल लागले होते. बहुजन समाज पक्षाच्या उमेदवारांमुळे विदर्भात काही ठिकाणी युतीला फायदा झाला होता. वर्धा, चिमूर आणि भंडारासारख्या जागा युतीच्या पारड्यात पडल्या होत्या. तर लातूर आणि नांदेडमध्येही भगवा फडकला होता. मुंबईतल्या मतदारांनी अनपेक्षितपणे युतीला झिडकारलं होतं. मनोहर जोशी सरांसारखा नेता दादरचा समावेश असलेल्या मतदारसंघात पराभव झाला होता. त्यावेळी राज्यात कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्षाला प्रत्येकी 13 जागा मिळाल्या होत्या. तर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसला नऊ जागांवर समाधान मानावं लागलं होतं. तर पंढरपूरमधल्या जागेवर रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या तिकिटावर निवडून आले होते. म्हणजेच शिवसेना-भाजप युतीला 25 तर कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23 जागा मिळाल्या होत्या.

यंदाची परिस्थिती मात्र वेगळी होती. कारण मतदारसंघांचं चित्र बदललं आहे. त्यामुळं नव्यानं अस्तित्वात आलेल्या मतदारसंघांमध्ये कोणाचं भाग्य फळफळणार आणि कोणाला गाशा गुंडाळावा लागणार, याचा काहीच अंदाज येत नव्हता. काही मतदारसंघ गायब झाले होते. काहींचा भूगोल बदलला होता. त्यामुळं नागरिकांमध्ये, राजकारणात रुची बाळगणाऱ्यांमध्ये उत्सुकता होती. अजूनही आहे. त्याचप्रमाणे गेल्या चार साडेचार वर्षांमध्ये राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचं सरकार आहे. तर केंद्रात संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार आहे. दोन्ही ठिकाणी एकाच आघाडीचं सरकार असल्यामुळं राज्य आणि केंद्रातल्या सरकारांनी राबविलेल्या योजना, त्यांची कार्य या गोष्टींचा विचार मतदानावर निश्‍चितपणे होणार आहे. दोन्ही सरकारांची कामगिरी मतदारांवर निश्‍चित प्रभाव टाकणारी आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शेतकऱ्यांना मिळालेली कर्जमाफी, शेतकऱ्यांचे सातबारे कोरे करण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेनं उभारलेलं आंदोलन, मनसेचा मराठीसाठीचा लढा, मुंबईवर झालेला अतिरेकी हल्ला, वाढती महागाई आणि राज्यात सर्वत्र असलेली वीज-पाणी-सिंचन तसंच बेरोजगारीची समस्या अशा अनेक गोष्टी मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या ठरतील, असं प्रथम दर्शनी दिसतंय. तसंच अनेक ठिकाणी स्थानिक मुद्देही प्रभावी ठरत आहेत.

विदर्भात युतीचा बोलबाला...
विदर्भाचा विचार करता गेल्या निवडणुकीच्या आकड्यांमध्ये फारसा फरक पडेल, असं वाटत नाही. काही जागांची अदलाबदल होईल पण आकडा मात्र, कायम राहण्याची चिन्हे आहेत. नागपूरमध्ये विलास मुत्तेमवार यांना पराभूत करुन बनवारीलाल पुरोहित निवडून येतील, असं स्पष्टपणे जाणवतंय. तिथं अनिस अहमद, सतीश चतुर्वेदी आणि नितीन राऊत यांनी मुत्तेमवार यांना पूर्णपणे असहकार्य केलंय. त्याचा फटका कॉंग्रेसला बसण्याची शक्‍यता आहे. रामटेक हा शिवसेनेचा बालेकिल्ला. गेल्या तीन निवडणुकांपासून इथून शिवसेनेचा उमेदवार विजयी होतोय. त्यामुळं यंदा कृपाल तुमाने यांच्यासारखा कार्यकर्ता विजयी झाल्यास आश्चर्य वाटू नये. काँग्रेसनं इथून मुकुल वासनिक यांना उमेदवारी दिलीय. पण सुलेखा कुंभारे यांच्या उमेदवारीमुळं वासनिक यांची मतं फुटतील. त्याचा फायदा तुमाने यांना होईल.
वर्ध्यातनं दत्ता मेघे यांना चांगली संधी आहे. सुरेश वाघमारे यांना भाजपच्या मतविभागणीचा फटका बसण्याची शक्‍यता आहे. अर्थात, वर्ध्यात प्रभा राव यांच्या समर्थकांनी दत्ता मेघेंना सहकार्य केलं तरच हा बदल घडू शकतो. भंडाऱ्यात नाना पटोले यांच्या बंडखोरीचा फायदा भाजपच्या शिशुपाल पटले यांना होणार असं दिसतंय. तर गडचिरोली-चिमूरमध्ये बसपच्या महाराजांची उमेदवारी भाजपच्या अशोक नेते यांच्यासाठी फायदेशीर ठरु शकते.

शिवसेनेचे आनंदराव अडसूळ अमरावतीची जागा राखतील, हे नक्की आहे. तर अडसूळ यांच्या पूर्वीच्या बुलडाणा मतदारसंघात राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे प्रतापराव जाधव यांच्यातली टक्कर काट्याची असेल. पण शिंगणे यांचं पारडं इथं जड वाटतंय. बाकी चंद्रपूरमध्ये हंसराज अहिर, यवतमाळ-वाशिममध्ये शिवसेनेच्या धडाडीच्या खासदार भावना गवळी, अकोल्यात विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे विजय जवळपास निश्‍चित आहेत. नरेश पुगलिया यांच्याविरुद्धची नाराजी आणि जोरदार लोकसंपर्क अहिर यांच्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. तर हरिभाऊ राठोड यांची बंडखोरी आणि कॉंग्रेसच्या उत्तमराव राठोड यांची नाराजी गवळी यांच्यासाठी पूरक आहे. तिकडे बाळासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब धाबेकर यांच्यातल्या मतविभागणीचा फायदा धोत्रे यांनी होईल. एकूणातच विदर्भातल्या तेरापैकी 11 ते 12 जागा युतीच्या नावावर निश्‍चितपणे नोंदल्या जातील.

मराठवाड्यातही युतीच!
मराठवाड्यातल्या आठ मतदारसंघांमध्येही युतीचेच पारडे जड दिसते आहे. हिंगोलीमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो. तिथं शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांच्या उमेदवारीमुळं राष्ट्रवादीच्या केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागण्याची शक्‍यता आहे. वानखेडे यांची स्वच्छ प्रतिमा, अफाट जनसंपर्क आणि त्यांनी आमदार म्हणून केलेली कामं वानखेडे यांच्या जमेच्या बाजू आहेत. तर राज्य आणि केंद्र सरकारच्या अपयशी कामगिरीचा फटका सूर्यकांता पाटील यांना बसण्याची शक्‍यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेला सव्वा ते दीड लाख नागरिकांनी लावलेली हजेरी हिंगोली मतदारसंघाच्या निकालाबाबत पुरेशी बोलकी आहे.

हिंगोलीला खेटून असलेल्या परभणीत पुन्हा एकदा भगवा फडकणार हे निश्‍चित आहे. इथं शिवसेनेनं गणेश दुधगांवकर यांना उमेदवारी दिलीय. खासदार तुकाराम रेंगे-पाटील यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्यामुळं हा मतदारसंघ चर्चेत आला. निवडून आलेल्या खासदारानं शिवसेनेला "जय महाराष्ट्र' करणं इथल्या मतरादांना नवीन नाही. अशोक देशमुख, सुरेश जाधव आणि आता रेंगे-पाटील. पण या सर्वांना पक्ष सोडल्यानंतरही पुन्हा शिवसेनेचाच उमेदवार इथं निवडून आला. हा मतदारसंघ शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला आहे. त्यामुळं शिवसेनेनं इथं दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल, असं म्हणतात. यंदाची निवडणूकही त्याला अपवाद असणार नाही.

मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात नांदेड जिल्हा बॅंकेचे बुडीत प्रकरण, गुरु-ता-गद्दीसाठी पैसा येऊनही त्याचे नियोजन न झाल्यामुळं लोकांचा रोष व भास्करराव खतगांवकर यांच्याबद्दलची नाराजी कॉंग्रेसचे उमेदवार खतगांवकर यांच्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मेव्हण्याच्या विजयासाठी विशेष मेहनत घेतलीय. पण तरीही खतगांवकर यांच्या वाट्याला पुन्हा पराभव येतो की काय, अशी शंका उपस्थिती केली जातेय. तिकडे भाजपनं संभाजी पवार यांना उमेदवारी दिलीय. त्यांचा विजय झाला तर तो कॉंग्रेस आणि कॉंग्रेस उमेदवाराबद्दलच्या नाराजीमुळं असेल हे निश्‍चित.
लातूरमध्ये भाजपच्या गायकवाड यांचा विजय निश्‍चित आहे. तिथं जयवंतराव आवळे हे बाहेरचे उमेदवार आहे. त्यात ते धर्मानं ख्रिश्‍चन आहेत. दुसरीकडे भाजपचे गायकवाड हे स्थानिक उमेदवार आहेत. या मतदारसंघात लिंगायत नागरिक बहुसंख्येनं आहेत. हा समाज कट्टर हिंदू म्हणून ओळखला जातो. या गोष्टी निकालासाठी निर्णायक ठरण्याची शक्‍यता आहे. तिकडे उस्मानाबादमध्ये शिवसेनेचे प्रा. रवी गायकवाड आणि राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील यांच्यात सरळ लढत आहे. इथली लढत काट्याची असून दोघांनाही विजयाची समान संधी आहे, असं बोललं जातंय. त्यामुळं "प्रेडिक्‍शन' करणं चुकीचं ठरेल.

युतीचा बोलबाला...
बीड, औरंगाबाद आणि जालना इथंही युतीचेच पारडे वरचढ आहे. बीडमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे उभे आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादीनं नवोदित रमेश आडस्कर यांना रिंगणात उतरवलंय. मराठा-वंजारी अशी लढत करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केला असला तरी मुंडे यांची आजवरची कारकिर्द आणि जयसिंग गायकवाड यांनी केलेला शिवसेनाप्रमुख या गोष्टी मुंडे यांच्यासाठी पूरक आहेत. मुंडे यांच्यासाठी हा खूप मोठा विजय असेल.

तिकडे औरंगाबादमध्ये शांतीगिरी महाराज उभे असले तरी औरंगाबाद हा सेनेचा आणखी एक गड आहे. तिथं खैरे यांचं बऱ्यापैकी काम आणि जनसंपर्क आहे. तसंच शांतीगिरी महाराज हे फक्त खैरे यांची मतं खातील, असं मानणं चूक आहे. शिवाय महाराज आणि बाबांना लोकप्रतिनिधीत्व करण्याची संधी देण्याची महाराष्ट्राची परंपरा नाही. त्यामुळं शांतीगिरी महाराज फारसे यशस्वी होतील, असं मला वाटत नाही. तेव्हा उत्तमसिंह पवार यांना विजयासाठी खूप झगडावं लागेल. जालन्यात विद्यमान खासदार भाजपचे रावसाहेब दानवे यांच्यापुढं औरंगाबादच्या कल्याण काळे यांचं आव्हान आहे. हा मतदारसंघ युतीचा अनेक वर्षांपासून बालेकिल्ला आहे. इथं बदल होण्याची शक्‍यता आहे आणि काळे यांचं कल्याण होणं अवघड दिसतंय.

उत्तर महाराष्ट्रात समसमान...
उत्तर महाराष्ट्रातलं प्रमुख शहर असलेल्या नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना घाम फुटलाय. त्यांनी नाशिकबाहेर पडून प्रचार केल्याचंही ऐकिवात नाही. इथं समीर भुजबळ यांच्याविरोधात मराठा समाज एकवटला असल्याचं दिसतंय. तसंच मराठा आरक्षणाला भुजबळ यांचा विरोध असल्यामुळं हा मुद्दा शिवसेनेच्या दत्ता गायकवाड यांच्यासाठी दिलासादायक ठरतोय. भुजबळ यांना मोठं होऊ न देण्यासाठी राष्ट्रवादीतलेच काही नेते कार्यरत असल्याची चर्चा ऐकायला मिळते आहे. पण तरीही भुजबळ यांनी त्यांच्या भुजातलं बळ एकवटल्यामुळं गायकवाड यांच्यासाठी ही लढत सोपी नाही.

तिकडे दिंडोरीत भाजपचे हरिश्‍चंद्र चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळू यांच्यात "कॉंटे की टक्कर' आहे. पण राष्ट्रवादीचेच अर्जुन तुकाराम पवार हे पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. त्यामुळं ते आतून चव्हाण यांना मदत करत असल्याची चर्चा कानावर येतेय. तसंच इथून माकपनं जिवा पांडू गावित यांना उभं केल्यानं धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणारेय. त्याचा फायदा चव्हाण यांना होईल. त्यामुळंच चव्हाण यांचं पारडं काकणभर का होईना पण सरस आहे.

जळगावात भाजपची बाजी...
जळगावातल्या दोन्ही जागा भाजपकडे जाणार हे निश्‍चित आहे. जळगाव शहरातून भाजपचे ए. टी. पाटील आणि राष्ट्रवादीचे वसंतराव मोरे यांच्यात लढत आहे. ए.टी. पाटील हे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले होते. त्यामुळं त्यांच्याविरुद्ध कार्यकर्त्यांमध्ये काहीशी नाराजी आहे. त्यांच्याऐवजी बी. एस. पाटील यांनी तिकिट मिळालं असतं तर ते सहज निवडून आले असते. पण नाथाभाऊ खडसे आणि सुरेशदादा जैन यांच्या ताकदीच्या जोरावर जळगावची जागा भाजप जिंकेल, असं दिसतंय. जळगाव जिल्ह्यातली रावेरची जागा भाजपसाठी सर्वाधिक सुरक्षित आहे. हा मतदारसंघ भाजपसाठी "बारामती' आहे. त्यामुळं इथून हरिभाऊ जावळे अगदी दोनशे टक्के निवडून येणार यात शंका नाही.

नंदूरबार आणि धुळे हे एकेकाळचे कॉंग्रेसचे बालेकिल्ले. पण या बालेकिल्ल्याचे बुरुज आता हळूहळू ढासळू लागले आहेत. धुळ्यात तर प्रतापदादा सोनावणे यांच्या विजयाची शक्‍यताही आहे. मालेगावचे दोन मतदारसंघ आणि सटाणा यांचा धुळे मतदारसंघात समावेश आहे. धुळ्यातले तीन आणि नाशिकमधले तीन मतदारसंघ यामध्ये येतात. निहाल अहमद यांच्या उमेदवारीमुळं कॉंग्रेसच्या अमरिश पटेल यांना फटका बसेल. या मतदारसंघात पटेल हे विकासाचा मुद्दा घेऊन उतरलेत. त्याचा त्यांना फायदा होईल. पण पटेल अमराठी आहेत, हा मुद्दाही इथं प्रभावी ठरतोय. त्यामुळं त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे सोनावणे यांना होणरेय. त्यामुळं धुळ्यात यंदा परिवर्तन होण्याची शक्‍यता आहे.

नंदूरबारमध्येही माणिकराव गावित यांच्याविरोधात वातावरण आहे. तसंच राष्ट्रवादीचे नेते विजयकुमार गावित यांचे भाऊ शरद गावित यांनी उमेदवारी दाखल केल्यामुळं मतविभागणी होणारेय. त्याचा फायदा भाजपच्या डॉ. सुहास नटावदकर यांना होईल. पण आदिवासी मतांच्या जोरावर माणिकराव गावित बाजी मारतील, असं वाटतं. इथं परिवर्तन होण्याची शक्‍यता कमी आहे. पण झालंच तर आश्‍चर्य वाटायला नको.

पश्चिम मराहाष्ट्रात पवारांना धक्का?
शिर्डीमध्ये कॉंग्रेसच्या कोट्यातून जागा मिळवलेल्या रामदास आठवले यांना विजयासाठी झुंजावं लागतं की काय, अशी परिस्थिती आहे. बाळासाहेब विखे-पाटील यांनी वरुन आठवले यांचे काम करण्याचे आदेश दिले असले तरी आतून ते नक्की काय करणार हे कोणीच सांगू शकत नाही. दुसरीकडे प्रेमानंद रुपवते हे काही प्रमाणात कॉंग्रेसची मते खाणार हे देखील पक्कं आहे. दुसरीकडे भाऊसाहेब वाकचौरे हे स्थानिक आहेत आणि अनेक महिन्यांपासून त्यांनी तयारी सुरु केली आहे. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. "ऍट्रॉसिटी'चा मुद्दा आणि दलित-सवर्ण अशा संघर्षाची पार्श्‍वभूमी लक्षात घेता आठवले यांना लढत अवघड आहे. पण आठवले यांची सीट पडली दलित समाजात वेगळा संदेश जाईल, म्हणून कॉंग्रेस-राष्ट्रवादीला जिवाचं रान करुन ही जागा जिंकून दाखवावीच लागेल. तिकडे नगरमध्ये दिलीप गांधी हे निवडून आल्यातच जमा आहेत. राजीव राजळे, तुकाराम गडाख आणि राष्ट्रवादीचे शिवाजी कर्डिले यांच्यात धर्मनिरपेक्ष मतांची विभागणी होणार आणि गांधी सहज विजयी होणार, असं इथलं गणित आहे.

सुशीलकुमारांचे अवघड...
सोलापुरात भाजपचे शरद बनसोडे आणि कॉंग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांच्यात घमासान आहे. बनसोडे यांची खूप पूर्वीच जाहीर झालेली उमेदवारी, सुभाष देशमुख यांच्या कामाचा होणारा फायदा, मंगळवेढा मतदारसंघातल्या 22 गावांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार आणि माकपच्या आडम मास्तरांनी "बसप'च्या उमेदवाराला जाहीर केलेला पाठिंबा या सर्व गोष्टी सुशीलकुमारांच्या छातीत धडकी भरवणाऱ्या आहेत. त्यामुळंच शरद बनसोडे यांनाही विजयाची संधी नक्की आहे. तिकडे माढ्यातनं शरद पवार येणार यात शंका नाही. पण त्यांचं मताधिक्‍य किती असेल हे औत्सुक्‍याचं असेल. प्रत्येक मतदारसंघातून एक लाख असे मिळून सहा लाखांनी पवारांना निवडून आणण्याचा चंग राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. पण सुभाषबापूंच्या शिस्तबद्ध प्रचारामुळं तसंच सरकारविरोधातल्या नाराजीमुळं हे मताधिक्‍य दोन लाखांपर्यंत खाली आलं तर आश्‍चर्य वाटायला नको.

पुण्यातही बदल शक्य...
पुण्यात कॉंग्रेसच्या सुरेश कलमाडी यांना यंदा धक्का बसू शकतो. कॉंग्रेसचे पक्षांतर्गत विरोधक, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली असहकाराची भूमिका, भारतीय जनता पक्षाचे अनिल शिरोळे हे 96 कुळी मराठा उमेदवारी आणि कसबा पेठ, कोथरुड आणि शिवाजीनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर झालेलं मतदान या गोष्टी कलमाडी यांच्यासाठी धोकादायक आहेत. अनेक ठिकाणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपला मतदान केलेलं आहे. ज्यांना कमळावर मत टाकणं जमणार नाही, त्यांनी हत्ती चालवावा, अशी पक्षांतर्गत सूचना असल्याचं ऐकू येतंय. त्यामुळं कलमाडी यांना दिल्ली दूरच दिसतेय. इथं डीएसके, रणजित शिरोळे आणि अरुण भाटिया हे सर्व मिळून पन्नास-साठ हजारांच्या वर जात नाहीत, हे ही नक्की.

बारामतीत सुप्रियाताई सुळे येणार हे सांगायला राजकीय विश्‍लेषकाची गरज नाही. तर शिरुरमधून शिवाजीराव आढळराव-पाटील यांची सीट बसणार यातही दुमत असण्याचं कारण नाही. आढळराव यांचा जिवंत संपर्क त्यांच्यासाठी फायद्याचा आहे. तिकडे मावळमधून गजानन बाबर यांची खासदारकी निश्‍चित मानली जातेय. घाटाखाली शिवसेना आणि शेकाप यांची छुपी युती बाबर यांच्या विजयात महत्वाचा वाटा उचलेल. शिवाय राष्ट्रवादीच्या आझमभाई पानसरे यांच्या उमेदवारीमुळं मतदारसंघात हिंदू-मुस्लीम या आधारे मतविभागणी होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही. त्यामुळं बाबर यांच्या नावामागं खासदार हे पद लागणार अशी चिन्ह आहेत.

राजू शेट्टी यांना संधी...
सातारा आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या तीन मतदारसंघातही गमतीदार लढती आहेत. साताऱ्यात उदयनराजे निवडून येणार असले तरी सातारा आणि कऱ्हाडमधल्या राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते आणि नागरिक यांनी महाराजांच्या विरोधात कौल दिलाय. त्यामुळं शिवसेनेच्या पुरुषोत्तम जाधव यांच्या मतांची संख्या वाढून महाराजांच्या मताधिक्‍या कदाचित कमी होईल. तिकडे सांगलीत कॉंग्रेसचे प्रतीक पाटील आणि कॉंग्रेस बंडखोर अजित घोरपडे यांच्यात सरळ लढत आहे. युतीनं इथं घोरपडेंना पाठिंबा जाहीर केलाय. राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही आतून घोरपडेंचं काम करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळं कॉंग्रेसचा आणि वसंतदादा घराण्याचा हा बालेकिल्ला यंदा ढासळण्याची शक्‍यता निर्माण झालीय.

कोल्हापुरात संभाजीराजे निवडून येतील, असं वातावरण जरी असलं तरी सदाशिव मंडलिक यांनी शरद पवारांना घाम फोडला यात वाद नाही. शिवाय धनंजय महाडिक आतून मंडलिक यांचं काम करत असल्याचं बोललं जातंय. त्यामुळं संभाजीराजे आणि मंडलिक यांच्यात फार अंतर असणार नाही. हातकणंगलेमधून मात्र, राजू शेट्टी यांच्या विजयाची शक्‍यता आहे. नागरिकांनी एक-एक रुपया गोळा करुन शेट्टी यांना चाळीस लाख रुपये जमा करुन दिले आहेत. तसंच शेट्टी यांची शेतकऱ्यांसाठी लढण्याची भूमिका पाहता शेट्टी यांना भरघोस मतं मिळतील आणि कदाचित ते निवेदिता माने यांना मागे टाकून दिल्लीत पोचतीलही.

कोकणात भगवाच फडकणार...
सिंधुदुर्ग-रत्नागिरी आणि रत्नागिरी-रायगड या विचित्र मतदारसंघांमध्ये दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकेल, असं दिसतंय. खाणी आणि प्रकल्पांच्या मुद्‌द्‌यावर नागरिक, कॉंग्रेस नेते-कार्यकर्ते नारायण राणे यांच्यावर नाराज आहेत. अनेकांनी उघड तर काहींनी छुपी भूमिका घेतलीय. सावंतवाडी, देवगड, रत्नागिरी, संगमेश्‍वर, राजापूर आणि चिपळूण भागात युतीचं पारडं जड आहे. त्यामुळं फक्त मालवण, कणकवली आणि वेंगुर्ला यांच्या जोरावर निलेश राणे खासदार होणं अवघड आहे. शिवाय डॉ. सुरेश प्रभू यांची शांत-संयमी-अभ्यासू प्रतिमा आणि त्या तुलनेत निलेश राणे यांचं उथळ नेतृत्व हे मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरतील.

वरती अनंत गीते हे बॅरिस्टर अब्दुल रेहमान अंतुले यांना धूळ चारल्यावाचून राहणार नाहीत. दापोली, मंडणगड, गुहागर आणि श्रीवर्धन हे युतीचे बालेकिल्ले . तिकडे अलिबाग आणि पेणमध्ये शिवसेनेला शेकापची साथ आहे. शिवाय 26-11 नंतर अंतुले यांनी केलेली बडबड त्यांच्या अंगाशी आली नाही तरच नवल. इथं कॉंग्रेसच्या प्रवीण ठाकूर यांनी केलेली बंडखोरीही गीते यांच्याच पथ्यावर पडेल. एकूण काय तर अनंत गीते पुन्हा दिल्लीत पोचतील, असं दिसतंय.

शिवसेनेचे ठाणे राहणार का?
ठाणे मतदारसंघ आता पूर्णपणे बदलला आहे. नवी मुंबईत गणेश नाईक यांचं असलेलं वर्चस्व, कल्याण-डोंबिवली यांचं ठाण्यातून वगळणं आणि विजय चौगुले यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी या सर्व गोष्टी शिवसेनेसाठी धोकादायक आहेत. पण ठाणे हा हिंदुत्ववाद्यांचा बालेकिल्ला आहे. तिथं उमेदवार कोणीही असला तरी कमळ किंवा धनुष्यबाण यांच्यापलिकडे मतदार जात नाहीत. शिवाय ऐरोली हा विजय चौगुले यांचे "होमपिच'. शिवाय मंदा म्हात्रे, मीरा-भाईंदरचे गिल्बर्ट मेंडोसा, मुझफ्फर हुसेन, नवी मुंबईचे कॉंग्रेसचे नामदेव भगत ही मंडळी गणेश नाईक यांचे पारंपरिक विरोधक. या गोष्टी शिवसेनेला दिलासादायक आहेत. पण मनसेचे राजन राजे यांच्या उमेदवारीमुळं शिवसेनेला धोका निर्माण झालाय. ते जर अधिक चालले तर चौगुले यांचा विजय दुरापास्त वाटतो. पण आजवरचा इतिहास पाहिला आणि एकनाथ शिंदे यांचे राजकीय कसब पाहिले तर चौगुले निवडून येतील, असं आता तरी वाटतंय.

कल्याणमध्ये आनंद परांजपे निवडून येतील. कल्याण, डोंबिवली आणि अंबरनाथच्या जोरावर ते बाजी मारणार हे नक्की. पालघरमध्ये भाजपच्या चिंतामण वनगा यांचा मार्ग सोपा आहे. भाई ठाकूर यांनी उभा केलेल्या उमेदवारामुळं कॉंग्रेसच्या दामू शिंगडा यांची मते फुटणार आणि त्याचा फायदा वनगा यांना होईल, असं दिसतंय. त्यामुळं पालघरमध्ये बदल निश्‍चित दिसतोय.

तिकडे नव्यानं अस्तित्वात आलेल्या भिवंडीमध्ये सध्या तरी काहीच सांगता येत नाही. गेल्यावेळी कल्याणमधून (विधानसभेला) उमेदवारी नाकारण्यात आलेल्या जगन्नाथ पाटील यांना भाजपनं उमेदवारी दिलीय. तर कुणबी सेनेच्या विश्‍वनाथ पाटील यांनीही इथं उमेदवारी दाखल केलीय. शिवसेनेचे आमदार योगेश पाटील यांनी भाजपला मतदारसंघ सोडण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. या सर्व गोष्टींचा फटका भाजपलाच बसणार आहे. पण भाजपसाठी दिलासादायक म्हणजे कॉंग्रेसच्या सुरेश टावरे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या आर आर पाटील यांनी केलेली बंडखोरी. पाटील हे समाजवादी पक्षाच्या तिकिटावर रिंगणात उतरले आहेत. त्यामुळं इथली लढत रंगतदार होईल. अगदी शेवटपर्यंत काय होईल, काहीच सांगता येणार नाही.

मुंबईत यंदा परिवर्तन...
गेल्या वेळी युतीला फक्त एक खासदार देणाऱ्या मुंबईतून यंदा युतीचे किमान चार खासदार निवडून येतील असं दिसतंय. राम नाईक, किरीट सोमय्या, गजानन किर्तीकर आणि मोहन रावले हे युतीचे उमेदवार निवडून येण्याची दाट शक्‍यता आहे. अर्थात, ईशान्य मुंबईत संजय पाटील तसेच मनसेचे शिशिर शिंदे आणि दक्षिण मुंबईत मनसेच्या बाळा नांदगांवकर यांनी जोरदार आव्हान उभं केलंय. बाकी ठिकाणी मनसेचे उमेदवार नावाला आहेत.

शिरीष पारकर हे उत्तर मुंबईत राम नाईक यांची मतं घेणार हे नक्की असलं तरी त्यांचा फारसा फटका नाईकांना बसणार नाही. शिवाय संजय निरुपम यांच्या रुपानं कॉंग्रेसचा दुबळा उमेदवार नाईक यांच्यासमोर आहे. त्यामुळं नाईक यंदा दिल्ली गाठणार असं दिसतंय. तिकडे आबू आझमी यांच्या उमेदवारीमुळं गजाभाऊंचा मार्ग सुकर झालाय. तसंच स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून केलेली काम गजाभाऊंना उपयोगी पडणारेत. गुरुदास कामत यांच्यासाठी हा मतदारसंघ नवीन आहे. ते बाहेरचे आहेत, असाही प्रचार होतोय. त्यामळं कामत यांच्यावर घरी बसण्याची वेळ येणारेय.

प्रिया दत्त ही कॉंग्रेसची एकमेव सीट निश्‍चित आहे. दलित, मुस्लिम आणि उत्तर भारतीय मतदारांच्या प्राबल्यामुळं महेश जेठमलानी यांची डाळ इथं शिजणार नाही आणि ते "केस' हरतील, असं दिसतंय. दक्षिण मध्य मुंबईतून माहिमचे आमदार सुरेश गंभीर आणि खासदार एकनाथ गायकवाड यांच्यात "टसल' आहे. दादर, माहिम, वडाळा, सायन हे शिवसेनेचे बालेकिल्ले, शिवाय धारावीतही त्यांना काही प्रमाणात मते मिळतील. या जोरावर त्यांनी गायकवाड यांच्यासमोर जोरदार आव्हान उभं केलंय. पण उर्वरित ठिकाणी चेंबूर, धारावी आणि अणुशक्तीनगर इथं एकनाथ गायकवाड यांना मिळणारं मताधिक्‍य गंभीर यांना मोठ्या प्रमाणावर तोडावं लागेल. तरच ते जिंकतील.
दुसरीकडे ईशान्य मुंबईतही कॉंटे की टक्कर आहे. मुलुंड, घाटकोपर आणि विक्रोळी इथं युतीला भरभरुन मतदान होणार. तर भांडुपमध्ये संजय पाटील जरा जास्त चालतील. मराठी मतांच्या जोरावर आणि होमपिच मुलुंडमुळं शिशिर शिंदे यांनाही थोडाफार फायदा होईल. त्यामुळं तेही इथं आव्हान निर्माण करतील. पण गुजराती मतांच्या जोरावर सोमय्या यांचेच पारडे इथं जड वाटतंय.

मनसेनं जोरदार हवा निर्माण केली असली तरी मराठी मतदार सूज्ञ आहे, हे ठाणे, पुणे, मुंबई आणि नाशिकमधल्या महापालिका निवडणुकीत सिद्ध झालंय. याठिकाणी मराठी मतांची विभागणी फार मोठ्या प्रमाणावर झाली नव्हती. त्यामुळं मनसेची जितकी हवा होती तितके त्यांचे उमेदवार निवडून आले नाहीत. अर्थात, त्यानंतर मनसेनं अनेक आंदोलनं करुन त्यांचा "बेस' वाढविला. पण ठोस कार्यक्रम नसल्यानं मतदार त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर वळतील, असं वाटत नाही. किमान लोकसभेसाठी तरी. विधानसभेला गणित वेगळी असू शकतात.

एकूण काय तर राज्यात शिवसेना-भाजप युतीची हवा असून जवळपास ३० ते ३२ जागा युतीला मिळू शकतात. तर उर्वरित १६ ते १८ ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी विजयी ठरेल. शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यंदाच्या निवडणुकीत बराच मोठा पल्ला मारेल, असं वाटत होतं. पण पवार यांच्या खात्याबद्दल असलेली नाराजी आणि सरकारविरोधी वातावरण यामुळं गेल्या निवडणुकीतला नऊचा आकडा गाठण्यासाठीही त्यांना झगडावं लागेल असं दिसतंय.
राज्यातील संभाव्य विजेते
1) दक्षिण मुंबई - मोहन रावले (सेना)
2) दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड (कॉं) किंवा सुरेश गंभीर (सेना)
3) उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त (कॉं)
4) वायव्य मुंबई - गजानन किर्तीकर (सेना)
5) ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या (भाजप)
6) उत्तर मुंबई - राम नाईक (भाजप)
7) ठाणे - विजय चौगुले (सेना)
8) कल्याण - आनंद परांजपे (सेना)
9) भिवंडी - सुरेश टावरे (कॉं) किंवा जगन्नाथ पाटील (भाजप)
10) पालघर - चिंतामण वनगा (भाजप)
11) रायगड-रत्नागिरी - अनंत गीते (सेना)
12) रत्नागिरी-सिंधुदुर्ग - सुरेश प्रभू (सेना) किंवा निलेश राणे (कॉं)
13) कोल्हापूर - छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रवादी)
14) हातकणंगले - राजू शेट्टी (अपक्ष) किंवा निवेदिता माने (राष्ट्रवादी)
15) सांगली - अजित घोरपडे (अपक्ष)
16) सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
17) पुणे - अनिल शिरोळे (भाजप)
18) बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
19) मावळ - गजानन बाबर (सेना)
20) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील (सेना)
21) माढा - शरद पवार (राष्ट्रवादी)
22) सोलापूर - शरद बनसोडे (भाजप) किंवा सुशीलकुमार शिंदे (कॉं)
23) अहमदनगर - दिलीप गांधी (भाजप)
24) शिर्डी - रामदास आठवले (रिपब्लिकन) किंवा भाऊसाहेब वाकचौरे (सेना)
25) नाशिक - रत्नाकर गायकवाड (सेना) किंवा समीर भुजबळ (राष्ट्रवादी)
26) दिंडोरी - हरिश्‍चंद्र चव्हाण (भाजप)
27) धुळे - प्रतापदादा सोनावणे (भाजप)
28) नंदूरबार - माणिकराव गावित (कॉं)
29) जळगाव - ए. टी. पाटील (भाजप)
30) रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप)
31) बुलडाणा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) किंवा प्रताप जाधव (सेना)
32) अकोला - संजय धोत्रे (भाजप)
33) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (सेना)
34) अमरावती - आनंदराव अडसूळ (सेना)
35) वर्धा - दत्ता मेघे (कॉं) किंवा सुरेश वाघमारे (भाजप)
36) नागपूर - बनवारीलाल पुरोहित (भाजप)
37) रामटेक - कृपाल तुमाने (सेना)
38) भंडारा-गोंदिया - शिशुपाल पटले (भाजप)
39) गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) किंवा मारोतराव कोवासे (कॉं)
40) चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप)
41) नांदेड - संभाजी पवार (भाजप) किंवा भास्करराव पाटील (कॉं)
42) हिंगोली - सुभाष वानखेडे (सेना) किंवा सूर्यकांता पाटील (राष्ट्रवादी)
43) परभणी - गणेश दुधगांवकर (सेना)
44) बीड - गोपीनाथ मुंडे (भाजप)
45) लातूर - सुनील गायकवाड (भाजप)
46) उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी) किंवा प्रा. रवी गायकवाड (सेना)
47) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (सेना)
48) जालना - रावसाहेब दानवे (भाजप)
भाजप (निश्‍चित) - 16
शिवसेना (निश्‍चित) - 12
कॉंग्रेस (निश्‍चित) - 2
राष्ट्रवादी (निश्‍चित) - 4
अपक्ष - 1
संदिग्ध - 13

14 comments:

Anonymous said...

मित्रा तु केलेले विश्लेषण तुझ्या परिने योग्य आहे. फक्त एक गोष्ट विसरला आहेस त्याची आठवण करून देतो. आपण २००४ साली अशाच प्रकारचा आडाखा बांधला होता. विदर्भात तुम्ही बरोबर ठरलात पण मुंबई सह उर्वरीत महाराष्ट्रात आपला असंदाज सपशेल चुकला. पश्चिम महाराष्ट्रातबद्दल सांगायचे झाल्यास कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला हादरा बसणार हे १०० टक्के नक्की... पण बारामती आणि मावळ या दोन्ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात जातील. याशिवाय सोलापूर, माढा, अहमदनगर,सातारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस असेल. रामटेकमध्ये सुलेखा कुंभारे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवली असली तरी अंतीम टप्प्यात त्यांनी वासनिक यांना पाठींबा दिला आहे. तशा जाहिरातीही त्यांनी प्रसिद्ध केल्या. भंडारामध्ये नाना पटोले यांचा फारसा प्रभाव पडणार नाही कारण पटोलेंचा मतदारसंघ वगळता इतरत्र काँग्रेसची यंत्रणा कमजोर आहे. हिंगोलीमध्ये सूर्यकांता पाटील पराभूत होतील हा अंदाज खरा आहे. पण परभणी, नांदेडमध्ये चित्र वेगळे असेल. औरंगाबादमध्ये चंद्रकांत खैरेंच्या विरोधात स्थानिक शिवसेनेत नाराजी आहे. महाराजांची उमेदवारी त्यांना हमखास नडणार.... उस्मानाबादमध्ये डॉक्टर येतील कारण त्यांना बार्शीने मोठी साथ दिली आहे. याशिवाय त्यांची इतर परंपरागत मतेही यावेळेस त्यांच्या मागे आहेत. बीडमध्ये मुंडे असणार याबाबत दुमत नाही. गडचिरोलीमध्ये कोवासेंचा पराभव नक्की आहे. येथे अशोक नेते हमखास विजयी होतील. नागपूरात कुणी कितीही जोर लावला तरी बनवारीलाल दिल्लीत जाऊ शकणार नाही हि काळ्या दगडावरील पांढरी रेघ....अकोला मतदारसंघातून धोत्रे पुन्हा एकदा दिल्लीकडे प्रयाण करतील. वर्ध्यात दत्ता मेघे, यवतमाळ-वाशिममध्ये हरीभाऊ राठोड ( त्यांनी बंडखोरी केलेली नाही तर त्यांना अधिकृतपणे काँग्रेसचे तिकीट देण्यात आले आहे. उत्तमराव पाटील हे बंडखोर आहेत. ) नंदूरबारमध्ये माणिकराव गावित अडचणीत आहेत. धुळ्यात अमरीश पटेल, दिंडोरीमध्ये हरिश्चंद्र चव्हाण, शिर्डा रामदास आठवले ( आठवले निवडून आले नाहीत तर विखे पाटील यांचे साम्राज्य धोक्यात येईल की राव.... दहा जनपथसोबत पंगा घेणे त्यांना परवडणार आहे का...) कोकणातील दोन्ही जागा युतीकडे.... दक्षिण मुंबई- मिलींद देवरा, दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड, उत्तर मध्य- प्रिया दत्त, वायव्य- किर्तीकर, ईशान्य - सोमय्या, उत्तर- राम नाईक, ठाणे - संजीव नाईक, कल्याण- सध्यातरी अंदाज अवघड, पण शिवसेनेचा परंपरागत मतदार असल्यामुळे परांजपेची शक्यता आहे. भिवंडी- टावरे..., पालघर- दामू शिंगडा, राहता राहिला अहमदनगरचा विषय तर दिलीप गांधी हे पुन्हा दिल्लीत येत नाहीत. कर्डीलेची वाकडी टोपी लोकसभेत दिसेल ( तेथेही हा पठ्ठ्या पाच वर्षे झोपा काढणार आहे कंत्राटदारीचे राजकारण करणार )

Dr. Atul R Thakare said...

Ashish Sir tumhi Hadache BJP kaaryakarte distahet. Anyways Good Analysis.

Ashish said...

pratyek media wala ha congress chya khallya tukdyanna jagn tyanche ude ude karat ahe,
pan apan khare kay te lihayache dhadas kele ahe...

aapale abhinanadan,
MaharashtraMajha.com

Onkar Danke said...

तुमचे विश्लेषण खरे झाले तर मला आनंद होईल.परंतु तुम्ही भाजप-सेनेला थोडं सढळ हातानं जागा दिल्यात.विदर्भात युतीला फटका नक्की बसेल.नाशिक-ठाणे जागाही मनसेमुळे जातील.महाराष्ट्रात युती 26 आणि कांग्रेस आघाडी 22 होईल असा माझा अंदाज आहे.असो पण जे वाटतं ते सरळ लिहल्याबद्दल खरंच अभिनंदन

Anonymous said...

nice work good predictions but it will not ber so easy for shivsena and bjp.
about pune its hard to remove kalmaadi and in thane,pune and nashik mns factor will be harmful for shiv-bjp alliance.milind deora is sure seat and rane from sindhdurg ,its sad
but its truth i will very haapy if your predictions are right
i will comment again after result
its sad but cong -ncp will get min 25 seats.

अमित said...

माझाही अंदाज तोच आहे युतीला ३२ जागा मिळतील पण इथे शिवसेना भाजप ची कावीळ आहे अश्या लोकांना नक्कीच तुमच्या लेखात आक्षेप असेल यात वादच नाही. असो १६ तारखेला सगळे कळेलच! आणि तुमच्या तोंडात साखर पडो.. विरोधकांना देव पाण्यात बुडवल्याची शिक्षा मिळो!

मेघराज पाटील said...

आशिष, तुझा ब्लॉग वाचला, छान लिहिलंयस...
मलाही थोड्याफार फरकाने असंच वाटतं, पण विदर्भात यावेळी काँग्रेसला नागपूर ऐवजी चंद्रपूरची
जागा मिळण्याची शक्यता आहे तर गडचिरोलीत बसपाची शक्यता जास्त वाटते.

तसंच

2) दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड (कॉं) किंवा सुरेश गंभीर (सेना)

9) भिवंडी - सुरेश टावरे (कॉं) किंवा जगन्नाथ पाटील (भाजप)


तुम्ही लिहिलेल्या या जागांवर दोन्ही प्रमुख उमेदवारांची नावे दिलीत, म्हणजे ते काही भाकित होत नाही... कारण या दोन्हीपैकी कोणीतरी एकजण निवडूण येणारच...



7) ठाणे - विजय चौगुले (सेना)

ठाण्यात मला संजीव नाईकांची शक्यता वाटते, कारण ठाण्यात मनसेमुळे शिवसेनेची बरीच पडझड झालीय. त्याचा फायदा गणेश नाईक यांनी उचललाय.

11) रायगड-रत्नागिरी - अनंत गीते (सेना)

12) रत्नागिरी-सिंधुदुर्ग - सुरेश प्रभू (सेना) किंवा निलेश राणे (कॉं)

या ठिकाणीही दोन शिवाय इतर तिसऱ्या उमेदवारांची शक्यताच नाही. मला तिथे निलेश नाईक यांची शक्यता वाटते.

13) कोल्हापूर - छत्रपती संभाजीराजे (राष्ट्रवादी)
ही जागासुद्धा संकटात आहे, महाडिकांनी काय केलंय, ते 16 तारखेलाच स्पष्ट होईल...

14) हातकणंगले - राजू शेट्टी (अपक्ष) किंवा निवेदिता माने (राष्ट्रवादी)
इथेही राष्ट्रवादीची जागा गेल्यात जमा आहे... स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेटट्टी यांना लोकांचा उत्स्फूर्त पांठिबा आहे...

15) सांगली - अजित घोरपडे (अपक्ष)
16) सातारा - उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
17) पुणे - अनिल शिरोळे (भाजप) - हा चमत्कार असेल, सध्यातरी त्याची शक्यता वाटत नाही...

18) बारामती - सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी)
19) मावळ - गजानन बाबर (सेना)
20) शिरुर - शिवाजीराव आढळराव-पाटील (सेना)
21) माढा - शरद पवार (राष्ट्रवादी)
22) सोलापूर - शरद बनसोडे (भाजप) किंवा सुशीलकुमार शिंदे (कॉं)

या जागेवरही तिसरा कुणी सशक्त उमेदवारच नाही, जो कुणी येईल, या दोघांमधलाच असेल, शरद बनसोडे, एखाद्या चमत्कारानेच येऊ शकतील

23) अहमदनगर - दिलीप गांधी (भाजप)
24) शिर्डी - रामदास आठवले (रिपब्लिकन) किंवा भाऊसाहेब वाकचौरे (सेना)
25) नाशिक - रत्नाकर गायकवाड (सेना) किंवा समीर भुजबळ (राष्ट्रवादी)

नाशकात मला मनसेच्या हेमंत गोडसेची शक्यता सर्वाधिक वाटते..

26) दिंडोरी - हरिश्‍चंद्र चव्हाण (भाजप)
27) धुळे - प्रतापदादा सोनावणे (भाजप)
28) नंदूरबार - माणिकराव गावित (कॉं)
इथे विजयराव गावितांच्या भावाची बंडखोरी माणिकरावांची दिल्ली वारी रोखेल..

29) जळगाव - ए. टी. पाटील (भाजप)
30) रावेर - हरिभाऊ जावळे (भाजप)
31) बुलडाणा - राजेंद्र शिंगणे (राष्ट्रवादी) किंवा प्रताप जाधव (सेना)
32) अकोला - संजय धोत्रे (भाजप)
33) यवतमाळ-वाशिम - भावना गवळी (सेना)
34) अमरावती - आनंदराव अडसूळ (सेना)
35) वर्धा - दत्ता मेघे (कॉं) किंवा सुरेश वाघमारे (भाजप)
36) नागपूर - बनवारीलाल पुरोहित (भाजप)
37) रामटेक - कृपाल तुमाने (सेना)
38) भंडारा-गोंदिया - शिशुपाल पटले (भाजप)
39) गडचिरोली-चिमूर - अशोक नेते (भाजप) किंवा मारोतराव कोवासे (कॉं)
40) चंद्रपूर - हंसराज अहिर (भाजप)
41) नांदेड - संभाजी पवार (भाजप) किंवा भास्करराव पाटील (कॉं)
42) हिंगोली - सुभाष वानखेडे (सेना) किंवा सूर्यकांता पाटील (राष्ट्रवादी)
43) परभणी - गणेश दुधगांवकर (सेना)
44) बीड - गोपीनाथ मुंडे (भाजप)
45) लातूर - सुनील गायकवाड (भाजप)
46) उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील (राष्ट्रवादी) किंवा प्रा. रवी गायकवाड (सेना)
47) औरंगाबाद - चंद्रकांत खैरे (सेना)
48) जालना - रावसाहेब दानवे (भाजप)

Dr.Chinmay Kulkarni said...

tumacha Gujrat chaa andaaj achuk hotaa.tyaamule tumachyaakadun apekshaa aahet.baaki tumachyaa aani itar media chyaa andaajaat itaki tafaavat kaa asate???

Anonymous said...

I think Uti will go up to 28 +/-2
Chances of -2 are more, but hope for the best. I will be happy to see the number 30 for the Uti.
Bye the way, good work.

nakuldhotre said...

There are only 10(not 13) seats in Vidarbha. Must be a typo. Anyway I am too naive to judge your analysis but the article is really nice. Let's hope your predictions stand true, not just the overall figure but those of each constituency.
Thanks

Anonymous said...

its nice analysis....but u r pakka karyakarta of bjp....as a reporter never mk such biased analysis especially when u r reporting...put your assumptions away...think practically...sure bjp n allies will get more seats than cong-ncp, but you exxagerated the fact...think...

Anil patil said...

itka vait prediction lahan mulga suddha karu sakto

Dr. Atul R Thakare said...

Ashish Sir, Tumcha Analysis mostly incorrect tharala. Yutila parat ekda parabhav patkarava lagalay. Nagpurchi jaaga tumhi dili ti kadhich Banwarilalkade jaanar nawhti aani MNSmule Mumbai, Pune aani Nashikaat yutila parabhavala saamore jaava laagala. MNSla tumhi underestimate karayla nako hota. Raj Thakare is the future CM of Maharashtra, same as Rahul Gandhi is the future PM of India.

Thank You

Anonymous said...

nice work good predictions but it will not ber so easy for shivsena and bjp.
about pune its hard to remove kalmaadi and in thane,pune and nashik mns factor will be harmful for shiv-bjp alliance.milind deora is sure seat and rane from sindhdurg ,its sad
but its truth i will very haapy if your predictions are right
i will comment again after result
its sad but cong -ncp will get min 25 seats.

i send this msg when u wrote this article before election .
as i said my predictions are near than u sir .
ncpe and cong .get 23 seats .
best of luck for next prediction for assembly election