Thursday, October 29, 2009

युवराज आदित्याय नमः



रंग उडालेली स्काय ब्लू जीन्स, केल्विन क्‍लेनचा टी-शर्ट, चेहऱ्यावर "डिट्टो' वडिलांसारखं हास्य, वारश्‍यानंच चालत आलेला बोलण्या-चालण्यातला आत्मविश्‍वास आणि मिश्‍किल वृत्ती... ठाकरे घराण्यातल्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या आदित्य उद्धव ठाकरेची ही पहिली ओळख. "साम मराठी'साठी आदित्यची मुलाखत घेण्यासाठी "मातोश्री'वर गेलो होतो. तेव्हा आदित्यची ही ओळख मनावर ठसा उमटवून गेली. मुलाखत जसजशी रंगत गेली तसतसा त्याच्यातला "कॉन्फिडन्स' दुणावत गेला.

पुरोगामी विचारांचे प्रबोधनकार ठाकरे, ज्वलंत हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचा मानबिंदू असलेले बाळासाहेब तर सभ्य आणि सुंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे... या तीनपैकी कोणती प्रतिमा तुला अधिक जवळची वाटते किंवा कोणत्या प्रतिमेत तू "फिट्ट' बसतो, असं विचारल्यानंतर आदित्यनं दिलेलं उत्तर त्याची वाटचाल परिपक्वतेच्या दिशेनं सुरु असल्याचं द्योतक वाटलं. ""तिघांच्याही भूमिका त्या-त्या काळाशी सुसंगत होत्या. किंवा संबंधित भूमिका ही त्या काळाची गरज होती. त्यामुळं कालानुरुप विचार केला तर तिघांच्याही भूमिका जवळच्या वाटतात. भविष्यात कालानुरुप आवश्‍यक असेल तशीच माझी भूमिका असेल. कदाचित ती या तिघांपेक्षा वेगळीही असेल,'' असे सांगून आदित्यनं त्याच्यातला "स्पार्क' दाखवून दिला.

घरातल्या प्रत्येक नात्यापासून ते राज ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल आणि विधानसभेच्या प्रचारापासून ते स्वयंसेवी कामाबद्दल प्रत्येक विषयावर तो अगदी स्पष्टपणे बोलतो. खास ठाकरे शैलीप्रमाणे कोणताही आडपडदा न बाळगता! सध्या तो "झेवियर्स'मधून बीए करतोय. राज्यशास्त्र आणि इतिहास ते त्याच्या आवडीचे विषय आहेत. बीए झाल्यानंतर पुढचं शिक्षण आणि करियर कशात करायचं याबद्दल विचार करायचा, असं तो सांगतो. बाबांप्रमाणे स्वतःला पूर्णपणे राजकारणात झोकून देणार का, या प्रश्‍नावर सध्या तरी त्याच्याकडे उत्तर नाही. सुरवातीला शिक्षण या विषयात काहीतरी ठोस करण्याची त्याची इच्छा आहे. त्याची सुरवात प्राध्यापकांच्या संपाच्या निमित्ताने झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यला "प्रोजेक्‍ट' करण्यात आलं, असं माध्यमांना वाटत असलं तरी हे विधान तो खोडून काढतो. मी प्रचारात उतरण्याचा विचार करतोय, पण राजकारणात सक्रिय होईन किंवा नाही हे अजूनही ठरलेले नाही. मग "प्रोजेक्‍ट' करण्याचा प्रश्‍न येतोच कुठं, असा प्रतिप्रश्‍न तो विचारतो.

तूर्तास तरी अभ्यास, कविता लेखन, फोटोग्राफी, कॉलेजियन्सशी निगडित आंदोलनं आणि स्वयंसेवी संस्था यांच्यापुरतंच मर्यादित राहण्याचं आदित्यनं ठरवलंय. कार्यप्रमुखांनी आदेश दिला तरच तो प्रचारात उतरणार आहे. पण फक्त निवडणुकीपुरतं. नंतर पुन्हा कॉलेज, अभ्यास आणि सामाजिक काम. नाही म्हटलं तरी आदित्यच्या "शिवसेना भवन'च्या फेऱ्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या कार्य पद्धतीची जवळून ओळख व्हावी, यासाठी तो सेना भवनावर असतो. पण तिथं गेलं की त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांची निमंत्रण येऊ लागतात. आमच्याकडे दौऱ्यावर या, प्रचारासाठी या वगैरे वगैरे. नुकतंच त्याला अकोल्यामध्ये प्रचाराला येण्याचं निमंत्रण आलंय. काही ठिकाणी तो बाबांबरोबर प्रचाराला जाईलही. पण अजून काही निश्‍चित झालेलं नाही. जगभरातल्या शिक्षणतज्ज्ञांचे शिक्षणविषयक प्रबंध आणि पेपर्सचा अभ्यास करणं,

बाहेरच्यांसाठी जहाल किंवा कठोर वाटणारे बाळासाहेब खूप हळवे आणि "इमोशनल' आहेत, असं आदित्यला वाटतं. घरी आई आणि बाबा यापैकी कोणाचा मार जास्त खाल्ला आहे, याला मिळालेलं उत्तर धक्कादायक पण गमतीशीर आहे. आदित्य म्हणतो, ""कोणाचाच मार खाल्लेला नाही. मुळात आमच्याकडे असा नियमच आहे. कोणीही कोणावरही हात उगारायचा नाही. त्यामुळं ओरडा खाल्ला पण मार खाल्लेला नाही. आईकडून नाही आणि बाबांकडूनही नाही.'' ""माझा जन्म जरी ठाकरे घराण्यात झालेला असला तरी आईनं आम्हाला कायम जमिनीवर ठेवलं. आम्ही वेगळे किंवा असामान्य आहोत, असं जाणवूच दिलं नाही. जिथं रांग असेल तिथं रांगेत उभं रहायचं, शाळेत झालेली शिक्षा इतरांप्रमाणेच भोगायची आणि ठाकरे नावाचा गैरवापर करायचा नाही, हे आईनं आमच्या मनावर चांगलंच ठसवलं आहे,'' असं आदित्य आवर्जून सांगतो.

""कॉलेजमध्ये ओळख करुन देताना मी फक्त आदित्य इतकीच ओळख सांगतो. कोणी अगदीच विचारलं तर "आदित्य टी' असं सांगतो. अगदीच जर कोणी खोदून खोदून विचारलं तर आदित्य ठाकरे अशी ओळख करुन देतो. ठाकरे नावाचा मला अभिमान आहे. पण त्यामुळं आपसूक मिळणारे फायदे मला नको आहेत,'' असं आदित्य सांगतो. "व्हॅलेन्टाईन डे'च्या दिवशी आदित्य शक्‍यतो कॉलेजला जाण्याचं टाळतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा तितकाचा वादग्रस्त राहिलेला नाही. त्यामुळं "व्हॅलेन्टाईन डे'ला "गोची' होत नाही, असं आदित्यचं म्हणणं आहे.

शिवसेना या राजकीय पक्षाचं वलय आणि कार्यप्रमुखांचा मुलगा असल्याचा अहंकार त्याच्यामध्ये जाणवत नाही. कदाचित हीच गोष्ट भविष्यात त्याच्यासाठी "प्लस पॉईंट' ठरु शकेल. आदित्यचं वागणं बोलणं हे जवळपास उद्धव ठाकरे यांच्यासरखंच आहे. त्यामुळंच तो शांत आणि संयमी वाटत असावा. आदित्य राजकारणात प्रवेश करेल किंवा त्याला लोक स्वीकारतील की नाही, याबद्दल आताच बोलायची गरज नाही. पण बंदे मे दम है... यात वाद नाही.

No comments: