Showing posts with label Balgandharva. Show all posts
Showing posts with label Balgandharva. Show all posts

Friday, May 20, 2011

‘बाप’गंधर्व

आजि म्या बालगंधर्व पाहिला...



बालगंधर्व कसे होते, ते पहायची आम्हाला संधीच मिळाली नाही, असं कोणालाही यापुढे म्हणता येणार नाही. नितीन चंद्रकांत देसाई यांनी निर्मिलेल्या चित्रपटात सुबोध भावेनं साकरलेली बालगंधर्वांची भूमिका पाहिल्यानंतर सर्वांच्याच मनातील खंत दूर होते. जसं राम म्हटलं की आपल्यासमोर अरुण गोविल येतो, कृष्ण म्हटलं की नितीश भारद्वाज येतो, संत तुकाराम म्हटलं की विष्णुपंत पागनीस येतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की सूर्यकांत-चंद्रकांत येतात, अगदी अलिकडच्या काळातील डॉ. अमोल कोल्हे येतो (महेश मांजरेकर मात्र चुकूनही येत नाही) तसं बालगंधर्व म्हटल्यानंतर यापुढे आपल्या डोळ्यासमोर नक्की सुबोध भावेच येणार. कारण बालगंधर्वांना माझ्या पिढीनं (अगदी माझ्या वडिलांनीही) पाहिलेलं नाही. त्यामुळं सुबोध भावे हाच आपल्यासाठी नारायणराव आहे, बालगंधर्व आहे. कारण त्यानं बालगंधर्वांची भूमिका त्याच ताकदीनं वठवली आहे.
बालगंधर्व येणार येणार तेव्हापासून पिक्चर कसं असेल, याची उत्सुकता होती. मुळातच लहानपणापासून बालगंधर्व रंगमंदिरातील नारायणराव राजहंस आणि बालगंधर्व यांचे छायाचित्र पाहतच मोठे झालो. एखादा पुरुष नट बेमालूमपणे स्त्री पार्टांची भूमिका निभावू शकतो, यावर विश्वासच बसायचा नाही. बालगंधर्व स्त्री वेशामध्ये हळदी-कुंकवाचे समारंभांनाही उपस्थिती लावायचे, असे अनेक किस्से ऐकले होते. त्यांच्याबद्दल खूप खूप जाणून घ्यायची इच्छा चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होणार होती. त्यामुळंच चित्रपटाविषयी प्रचंड औत्सुक्य होतं. पण अनेकदा खूप आशा बाळगली, पदरी निराशा येते, असं म्हणतात. पण बालगंधर्व अजिबात भ्रमनिरास करत नाही.


मुळातच चित्रपटाचा वेग, पात्रांची निवड, संवाद, कॅमेरा अँगल्स, चित्रपटातील पदं आणि गाणी, वेशभूषा, प्रसंगांची निवड हे सर्व काही दर्जेदारच आहे. मुख्य म्हणजे जुन्या पिढीला त्या काळात ओढून नेणारे आहेत. चित्रपटामध्ये बालगंधर्वांच्या अनेक नाटकातील प्रसंग आहेत. कोणत्याही नाटकाचा रंगमंचावरील सेट जेव्हा डोळ्यासमोर येतो तो पाहून आजूबाजूच्या प्रेक्षकांमधून हमखाम नावं पुटपुटली जातात. शारदा, स्वयंवर, मानापमान. नाव समोर येण्यापूर्वीच लोकांपर्यंत ते नाटक पोहोचतं. हे देसाई यांचं अफलातून यश आहे. बालगंधर्व पाहताना लोक चित्रपटात खूप गुंतून जातात. बालगंधर्व जेव्हा अखेरचे माहिमला जायला निघतात, तेव्हा त्यांची पत्नी त्यांच्या हातावर दही देण्यासाठी पुढे येते आणि लवकर परत या, असे म्हणते. बालगंधर्वांच्या पुढचा डायलॉग येण्यापूर्वी मागच्या खुर्चीवर बसलेली एक महिला पुटपुटते, इट्स टू मच हं. म्हणजे लोक चित्रपटाशी किती एकरुप होतात ते पहा.
बालगंधर्वांच्या अगदी लहानपणापासून ते त्यांच्या कारकिर्दीला उतरती कळा लागेपर्यंतचा चित्रपटाचा प्रवास आणि प्रसंग थक्क करणारे आहेत. मुलगी मेलेली असताना रंगमंचावर प्रयोग करणारे कलावंत, मायबाप प्रेक्षकांसाठी किर्लोस्कर नाटक कंपनीतून तडकाफडकी बाहेर पडणारे नट, पंचवीस पंचवीस हजारांची अत्तरं खरेदी करणारे कंपनीचे मालक, यशाच्या उंच शिखरावर असूनही नाटकातील एका प्रसंगात ज्येष्ठ अभिनेते केशवराव भोसलेंच्या पायात वहाणा चढविण्यास मागेपुढे न पाहणारे दिलदार अभिनेते, स्वतःची कंपनी कर्जात बुडलेली असतानाही स्वराज्य फंडासाठी नाटकाचा प्रयोग करणारे देशप्रेमी, केवळ एक प्रेक्षक असतानाही त्याच्यासाठी प्रयोग करणारे रसिकप्रेमी, केवळ पैशासाठी स्वतःच्या सहा लाखांची ऑफर धुडकावणारे मनस्वी आणि पडत्या काळात कोणत्या तरी आलतूफालतू गायकांना मागे बसून तंबोऱ्याची साथ करणारे वादक अशी बालगंधर्वांची विवध रुपं चित्रपटामध्ये अगदी यथार्थ पद्धतीनं सादर करण्यात आली आहेत.

- दुःख नारायणाला झालंय, त्याचे चटके भामिनीला बसला कामा नये.
- भले भले कर्तृत्त्ववान पुरुष आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत काय, असं म्हणतात. पण मी हातात बांगड्या भरूनच पुरुषार्थ गाजवून दाखवेन.
असे संवाद चित्रपटांत जान आणतात. कधीकधी डोळ्यात पाणी आणतात आणि चित्रपटगृहात प्रेक्षकांच्या टाळ्या घेतात.

किर्लोस्कर नाटक मंडळी, गडकरी मास्तर, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे, भास्करबुवा बखले आणि इतर अनेक जणांनी बालगंधर्वांची साथ सोडल्यानंतरही लढण्याची जिद्द आणि पुन्हा भरारी घेण्याची उमेद बालगंधर्वांच्या प्रत्येक संवाद आणि दृष्यातून ठळकपणे जाणवते. बालगंधर्वांची किती क्रेझ होती, ते बायकांच्या छोट्या छोट्या संवादांमधून, दृष्यांमधून मांडण्यात आले आहे. सोबतील दैनिक केसरीचे जुने अंकही रेफरन्स म्हणून वापरले आहेत. बालगंधर्व ही काय चीज होती, हे त्यावरून अगदी मनोमन पटते. पडत्या काळातही गोहरबाईच्या तुलनेत प्रेक्षकांना म्हातारे बालगंधर्वच रुक्मिणी म्हणून अधिक रुचतात. मग श्रीकृष्णाच्या भूमिकेतील बालगंधर्वांनी रुक्मिणीचं पद म्हटलेलं प्रेक्षकांना चालतं. लोकप्रियतेच्या शिखरावर म्हणजे काय, यापेक्षा वेगळं ते काय...


बालगंधर्वचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्या महान नटाचा उतरता काळ किंवा वाईट दिवसही तितक्याच चांगल्या पद्धतीनं रंगविलेले आहेत. वास्तविक पाहता, बरेचदा मोठ्या लोकांची चांगली बाजू दाखविण्याचंच फॅड सध्या आहे. वाईट बाजू लोकांना आवडेल किंवा कसे, हे माहिती नसल्याने लोक रिस्क घेत नाहीत. त्यामुळं बालगंधर्वांच्या आयुष्यात घडलेल्या वाईट गोष्टीही उत्कृष्ट पद्धतीने दाखविलेल्या आहेत. त्याबद्दलही निमार्ते आणि दिग्दर्शकांचे अभिनंदन करायला हवे.


सरतेशेवटी बालगंधर्वांची भूमिका साकारणारे सुबोध भावे. एक नंबर अभिनय. बालगंधर्व जेव्हा एन्ट्री घेतात किंवा पदं सादर करताना चित्रपटातील प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या कोणत्या आणि चित्रपट पाहणाऱ्या प्रेक्षकांनी वाजविलेल्या टाळ्या कोणत्या, हे अजिबात कळत नाही इतक्या टाळ्या वाजतात. चित्रपटातील प्रेक्षक आणि चित्रपट पाहणारे प्रेक्षक दोघेही आळीपाळीनं वन्स मोअर ओरडत असतात. बालगंधर्व पहिल्या रात्री पत्नीच्या शेजारी स्त्रीवेषात आल्यानंतर चित्रपटगृहात टाळ्यांचा एकच कडकडाट होतो. भूमिकेशी समरस झालेल्या कलाकाराला यापेक्षा वेगळी दाद कोणती असू शकते.



संपूर्ण चित्रपट एकदम फक्कड झाला आहे. तरीही दोन-तीन खटकलेल्या गोष्टी नमूद करणे उचित वाटते. पहिली गोष्ट म्हणजे चित्रपटांत एकही पद सविस्तर दाखविलेलं नाही. त्याकाळातील पदं खूप मोठी असायची, हे जरी मान्य केली तरी केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांची जुलगबंदी थोडी आणखी लांबविता आली असती. अर्थात, चित्रपट दोन-सव्वादोन तासांत संपविण्याचा अट्टहास ठेवला नसता आणि थोडा वाढविला असता तरी चालले असते.
दुसरी गोष्ट म्हणजे गोहरजान बालंगधर्वांच्या आयुष्यात येते, तो प्रसंग खूप सविस्तर रंगविला आहे. मात्र, बालगंधर्वांच्या पडत्या काळात शेवटी तिचे काय झाले आणि ती कोठे गेली, हे प्रसंग दाखविले असते तर चित्रपट अधिक परिपूर्ण वाटला असता. त्याचप्रमाणे बालगंधर्वांच्या अखेरच्या काळात पत्नी, कन्या आणि माता कुठे होत्या, यावर थोडा प्रकाश टाकला असता तर शेवट व्यवस्थित वाटला असता. आता शेवट अचानकपणे (म्हणजेच अबरप्टली) केल्यासारखा वाटतो. य दोन-तीन गोष्टी टाळल्या असत्या तर बालगंधर्व म्हणजे खरोखरच ‘बाप’गंधर्व आहे.


ता.क. – चित्रपट संपल्यानंतरही प्रेक्षक चित्रपटगृह सोडून जात नाहीत. लोकांची नाव वाचण्यासाठी नाही तर बालगंधर्वांचे दुर्मिळ असे फोटो पाहण्यासाठी. एखादा कलाकार इतक्या वर्षांनंतरही लोकांना इतकी भुरळ घालू शकतो, यावर विश्वास बसत नाही. पण विश्वास ठेवावाच लागतो कारण तेच सत्य आहे.

Tuesday, February 24, 2009

"शिववडा'च्या निमित्तानं...


चला वडापावच्या गाड्यांवर...

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बटाटा वडा खाल्लाय. पण मुंबईतल्या एक-दोन ठिकाणचा (सोकॉल्ड कॉर्पोरेट वडापाव) अपवाद वगळला तर दुसरीकडे कुठेही बटाटा वड्याची चव खराब लागली नाही. त्यामुळं "शिववडा' तरी काय वेगळा असणार,'' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. हे वाचल्यानंतर मी खरोखरच विचार करु लागलो. रस्त्यावर ठिकठिकाणी लागणाऱ्या वडापावच्या गाड्यांवर अनेकवेळा वडा खाल्लाय. पण कुठेच मला वडा आवडला नाही, असं झालं नाही. आवडण्याचं प्रमाण कमी-अधिक असेल पण गाडीवरचा वडा आवडतोच. (मुळात वडापाव ही डिश माझी "वन ऑफ फेव्हरेट' आहे, हे सांगायला नकोच) त्यामुळं राज ठाकरेंच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे, हे मला पटलं आणि शिवसेना "शिववडा'च्या रुपानं नेमकं नवं काय देणार आहे, हा विचार उगाच मनात डोकावून गेला.
मुंबईतला वडापाव उर्वरित महाराष्ट्रात गेला आणि बटाटा वडा ही महाराष्ट्राची ओळख बनली. शिववडा मुंबईपुरताच मर्यादित असला तरी मला उगाचच पुण्यातल्या चवदार वड्यांचे स्पॉट्‌स डोळ्यासमोर उभे ठाकले. पुण्यात खरा वडा मिळतो तो हातगाड्यांवर. जोशी वडेवाले किंवा रोहित वडेवाले यांनी वडापावला गाडीवरुन दुकानात नेलं. पण गाडीवर मिळणारा वडापाव अजूनही लोकांच्या चवीस उतरतो. पूर्वी "प्रभा'च्या वड्याची चर्चा सगळीकडे होती. अजूनही जुन्या पिढीतले लोक "प्रभा'चं गुणगान गात असतात. पण हा झाला इतिहास. "प्रभा'च्या तोंडात मारतील असे "हॉटस्पॉट्‌स' आज पुण्यात आहेत. उलट प्रत्येकानं वड्याची स्वतःची वेगळी चव तयार केलीय. तसंच चव टिकवलीही आहे. त्यामुळं "प्रभा'ची प्रभावळ आता हळूहळू ओसरु लागलीय, यात शंका नाही.
टिळक स्मारक किंवा बालगंधर्वमध्ये कार्यक्रमाच्या मध्यंतराला मिळणारा बटाटा वडा हे देखील त्यात आहेतच. शनिपार चौकात भोज्या देवडी यांची गाडी, सहकारनगरमधला कृष्णा वडापाव, कॅम्पात लोकसत्ता कार्यालयाजवळ मिळणारा वडा, पत्र्या मारुतीच्या पाराजवळ लागणारी मामांची गाडी, दांडेकर पुलाजवळचे खराडे वडेवाले, नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळची गाडी, पुणे विद्यार्थी गृहाजवळचा वडापाव, शास्त्री रस्त्यावरच्या अजंठामधला वडा, वसंत चित्रपटगृहाजवळचा अन्नपूर्णाचा वडा, झेड ब्रिजच्या जंगली महाराज रस्त्याच्या बाजूची गाडी, रतन चित्रपटगृहाजवळची मधली गाडी, तुळशीबागेत सकाळी रौनकच्या दाराशी मिळणारा खर्डा-वडा किंवा अगदी खडकवासल्याच्या बॅकवॉटरजवळ असणाऱ्या वडापावच्या गाड्या... ही यादी अशीच वाढत जाईल. वडा किंवा भज्यांचा घाणा निघत असेल आणि आपण या परिसरातनं जात असू तर आपण वड्यांच्या गाडीकडे खेचलो जातोच. अगदी इच्छा नसतानाही. हीच तर त्यांच्या चवीची खासियत आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर नव्यानंच उघडण्यात आलेल्या "गोली वडापाव'चा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी वडापाव खाल्ल्याचा पश्‍चात्ताप कधीच झालेला नाही.
वडा गरमागरम असेल तर मग विचारुच नका. खोबरं-कोथिंबिरीची हिरवी तिखट चटणी, चिंचगुळाची किंवा खजुराची गोड-आंबट चटणी, कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि तळून खारावलेल्या मिरच्या या गोष्टी वड्याची चव वृद्धिंगत करतात. पण मूळच्या वड्याची चव खतरा असेल तर या पूरक गोष्टींची गरजच पडत नाही. प्रत्येक ठिकाणच्या वड्याची चव निराळी आणि पूरक पदार्थांचा मामलाही निराळा. त्यामुळं प्रत्येक वेळी नाविन्याचा अनुभव येतो. "प्रभा'च्या वड्यामध्ये लिंबाचा रस जाणीवपूर्वक वापरल्यासारखा वाटतो. दांडेकर पुलावरचा खराडेंचा वडा काहीच्या काही झणझणीत असतो की विचारता सोय नाही. पत्र्या मारुतीजवळ मामांच्या गाडीवर तिखट चटणी घेतल्याशिवाय वड्याची चव लागतच नाही. लोकसत्ताच्या जवळ मिळणाऱ्या वड्याचा आकार पाहूनच थक्क व्हायला होतं. तिथल्या मिरच्यांना मिठाप्रमाणेच हळदही लागलेली असते. म्हणजे भन्नाटच!
कृष्णा, खराडे आणि पत्र्या मारुती...
पूर्वी कृष्णाचा वडापाव एकदम मस्त होता. पण आता तिथल्या वड्याचा आकार कमी आणि पावाचा आकार भलता मोठा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गोंधळून जायला होतं. पण कृष्णाच्या वड्याची चव अजूनही तशीच आहे. शिवाय इथं घाणा काढल्या काढल्या वडे संपतात. त्यामुळं प्रत्येक वेळी गरमागरम वडा. त्यामुळं इथं फक्त वडा घेणं हेच सोईस्कर आहे. पत्र्या मारुतीजवळ मिळणारा वडा चवीला परिपूर्ण नसतोच. वड्याच्या आतल्या सारणामध्ये मीठ आणि तिखंट थोडंसं कमीच असतं. त्यामुळं पावाला झणझणीत चटणी लावल्यानंतर ही कसर भरुन निघते. म्हणूनच इथं वड्यासोबत चटणी घेतली तरच मजा आहे. नही तो बात जमेगी नही... खराडेंच्या वड्याचा पहिला घास घेतल्यानंतर पाणी मागितलं नाही तरच नवल. पण एक वडा खाल्ल्यानंतर दुसरा वडा खाण्यासाठी जीभ खवळली नाही असं कधीच होत नाही.
रामनाथचाही वडाच...
आणखीन एक राहिलं. पुण्यातल्या मिसळचा विषय निघाल्यानंतर टिळक रस्त्यावरच्या रामनाथचं नाव निघाल्यावाचून रहात नाही. पण रामनाथच्या मिसळइतकाच तिथला बटाटा वडा प्रसिद्ध आहे. कदाचित तिथल्या मिसळपेक्षा वडाच अधिच चवदार आहे. कारण रामनाथची मिसळ म्हणजे फक्त जाळ. अक्षरशः घाम निघतो आणि दुसऱ्या दिवशी त्रास होतोच होतो. पण बटाटा वड्याचं तसं नाही. इतर वड्यांपेक्षा आकाराला दुप्पट आणि चवीला काहीपट चांगला असणारा रामनाथचा वडा म्हणजे सुख. रामनाथ वड्यांसाठी प्रसिद्ध न होता मिसळसाठी कसा प्रसिद्ध झाला, हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
कर्जतच्या स्टेशनवर मिळणारा दिवाडकरचा वडा आता पुण्यातही मिळू लागलाय. तांबडी जोगेश्‍वरीच्या मंदिरासमोरच्या बोळात "दिवाडकर्स' हे नवं दुकान सुरु झालंय. पण तिथं खरोखरच कर्जतचा वडा मिळतो का हे मी तरी अजून "टेस्ट' केलेलं नाही. लवकरच तिथं जावं लागणार आहे, हे नक्की. तुमच्या मनातही वडापावच्या हॉटस्पॉट्‌सनी घर केलं असेल तर प्रतिक्रियांमध्ये त्याबद्दल लिहा. म्हणजे माझ्याप्रमाणेच इतरानांही त्याचा आस्वाद घेता येईल. सो लेट्‌स एन्जॉय. बटाटा वडा.