Showing posts with label Samosa. Show all posts
Showing posts with label Samosa. Show all posts

Tuesday, April 05, 2011

तमिळनाडू खाद्ययात्रा

भातोबा, इडलोबा आणि डोसोबा...
तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या कव्हरेजसाठी येण्याचं निश्चित झालं तेव्हा अनेकांनी अभिनंदन करताना म्हटलं, की आता काय मजा आहे. इडली, डोसा आणि भात खाऊन दिवस काढायचे आहेत तुला. तसं पहायला गेलं तर मला हे सगळ्ळं खूप आवडतं. त्यातून इडली तर माझी एकदम लाडकी. त्यामुळं मी पण मनातल्या मनात खूप खूष होतो. चेन्नईत पोहोचलो तेव्हा सुरुवातीचे तीन दिवस टाइम्सच्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था होती. तिथला आचारी हा उत्तर प्रदेशचा होता. रमेश यादव. दोन दिवसांनंतर त्याच्याजागी उत्तर प्रदेशचाच दुसरा कोणतरी आला. त्यामुळं सुरुवातीचे तीन दिवस मला दाक्षिणात्य पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेता आला नव्हता. जेवणात रोज पोळ्या असायच्याच. सकाळी नाश्त्याला मसाला डोसा (घावन स्टाईलचा) किंवा इडल्या ठरलेल्या. एका दिवशी छोटे उत्तप्पेही होते. पदार्थ मस्त असायचे पण ती चव रेग्युलर चव नव्हती. म्हणजे खास दाक्षिणात्य हॉटेलात असते तशी नव्हती.

नाही म्हणायला पहिल्या दिवशी टेन्यामपेट भागातील एका छोट्या हॉटेलात पुरी भाजी आणि कर्ड राईस खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी अड्यार गेट परिसरातच एका ठिकाणी मसाला डोसा आणि पुन्हा एका कर्ड राईस खाल्ला. मसाला डोसा पुण्यात मिळतो तसाच होता. फारसा फरक नव्हता. पण दोन्हीकडील कर्ड राईस अमुलाग्र वेगळा. रसरशीत आणि मी आंबट. सोबत किसलेले गाजर किंवा गाजराचे तुकडे त्यामध्ये टाकलेले. लेमन राईस, कर्ड राईस, सांबार राईस, पोंगल, स्वीट राईस असे राईसचे किमान पाच-सात प्रकार प्रत्येक टिफीनमध्ये मिळतात.

चेन्नईसोडून पुद्दुचेरीला पोहोचलो आणि तिथं खऱ्या अर्थानं स्पेशल तमिळ राईस प्लेट मिळाली. पुद्दुचेरी बसस्टँडसमोरच स्री सब्थगिरी (मराठीत श्री सप्तगिरी) नावाचे हॉटेल आहे. एक नंबर प्रकार. पन्नास रुपयांमध्ये भरपूर जेवण. म्हणजे एक पोळी आणि हवा तेवढा राईस. सुरुवातीला ताटात आठ-दहा वाट्या, एक पोळी आणि एक पापड असा मेन्यू येतो. एक वाटी भेंडीच्या भाजीची, एक वांग्याच्या भाजीची, एकामध्ये सांबार, एकात सारम्, एकात दही, एकात मिरचीचा खर्डा लावलेलं ताक, आणखी एकात खीर (ती देखील भाताचीच), आणखी एका वाटीत आणखी कसलीशी भाजी. (किती लक्षात ठेवायचं)


एक पोळी संपल्यावर त्याला म्हटलं आणखी एक पोळी दे बाबा. तो म्हटला, वन्ली वन सर. तुम्हाला हवा तेवढा भात घ्या, पण पोळी एकच. बाबा पैसे देईन एक्स्ट्रॉ, असं म्हटल्यावर तो तयार झाला. दोन पोळ्या घेतल्यानंतर त्यानं जो भात वाढला तो पाहून चक्करच यायची बाकी होती. परत इतकं वाढून आणखी वाढू का, असं विचारत होता. म्हटलं, बाबा काय मारतोस की काय भात खायला घालून. हैदराबादची आठवण झाली. तिथंही राईस प्लेटही खरोखरच राईस प्लेट होती. फक्त राईस राईस आणि राईस. पहिला भात, मधला भात आणि शेवटचा भात. आंबट आणि आपल्यापेक्षा थोडं जास्त तिखट असं जेवून तृप्त मनानं उठलो.

तिथंच दुसऱ्या दिवशी सकाळी मसाला डोसा खाल्ला. मसाला डोसा हा कुठेही खा तो कुरकुरीत अजिबात नसतो. घावनसारखाच जाडसर असतो. (मला तर वाटतं, पुण्यातल्या तमाम उडुपी हॉटेल्स कुरकुरीत डोसाच्या नावाखाली लोकांना जास्त पैसे घेऊन फसवितात. अन्यथा हैदराबाद, चेन्नई, पुद्दुचेरी कुठेही जा, कुरकुरीत डोसा कुठेही मिळत नाही. मग ही मंडळीच कुठून ही शक्कल लढवितात. बरं, आपण पण कुरकुरीत डोसा, कुरकुरीत डोसा करून त्यांच्या घशात बक्कळ पैसे ओतत असतो.) सोबतीला दोन-तीन चटण्या आणि घट्ट सांबार. पुद्दुचेरीहून कुडलूर, चिदंबरम, कुंभकोणममार्गे तंजावूरला पोहोचलो. (आपल्याला फक्त पुलंच्या असामी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम माहिती होता. कुंभकोणम नावाचं गाव आहे, ते आजच कळलं. अर्थात, चिदंबरम नावाचं गाव आहे, हे माहिती होतं.)

तंजावूर इथं बसस्टँडच्या जवळच आर्य भुवन नावाचं एक सॉल्लिड टिफीन सेंटर आहे. तिथं इडली खाल्ली. खाल्ली नाही खाल्ल्या नाही. मस्त केळीचं पान. त्यावर दोन गरमागर इडल्या. समोर दोन वाट्या सांबार. नंतर तीन प्रकारच्या चटण्या. एक नारळाची पांढरी चटणी. एक हिरवी तिखट चटणी. आपण तयार करतो तशी. आणि एक लाल चटणी. टोमॅटो आणि लाल मिरची घालून तयार केलेली आंबट चटणी. गरमागरम मऊ लुसलुशीत चटणी कशाबरोबर खायची ते तुम्ही ठरवा आणि तुटून पडा. दोनवर थोडंच भागणार आहे. मग आणखी दोन मागविल्या. तेव्हा कुठं समाधान झालं. नंतर मस्त कडक कॉफी घेतली आणि बाहेर पडलो.


आर्य भुवनच्या जवळच एक छोटंस स्नॅक्स सेंटर आहे. तिथं गरीब लोकांची गर्दी जास्त. दोन रुपयांना ओनियन वडा, उडीद वडा, तीन रुपयांना पॅटिस किंवा सामोसा, चार रुपयांना चहा किंवा सहा रुपयांना ऑरेंज सरबत, असा अगदी सामान्य गरीबांना परवडेल असा मेन्यू. सोबतील चिवडा आणि चकण्याचे अनेक आयटम्स. लाडू, जिलेबी आणि इतर पदार्थही. तिथं खाणारी आणि घरी नेणारी मंडळी मोठ्य़ा संख्येनं इथं दिसतात. इडली, डोसा आणि भाताचे अजूनही काही दिवस बाकी आहेत. तेव्हा पुन्हा एकदा लवकरच भेटू नव्या शहरांसह, नव्या पदार्थांसह आणि नव्या चवीसह.

नन्ड्री.

Saturday, August 18, 2007

भारताचा राष्ट्रीय खाद्यपदार्थ कोणता?

पुरीभाजी, सामोसा की पाणीपुरी

भारताचा राष्ट्रध्वज ः तिरंगा, राष्ट्रगीत ः जन गण मन, राष्ट्रीय पक्षी ः मोर, राष्ट्रीय प्राणी ः वाघ, राष्ट्रीय खेळ ः हॉकी, राष्ट्रीय फूल ः कमळ आणि राष्ट्रीय खाद्यपदार्थ ः ? नाही ना माहिती. खरं सांगायाचं झालं तर मलाही माहिती नाही आणि असा कुठलाच खाद्यपदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून निश्‍चित झालेला नाही. पण माझं मत विचाराल तर पुरीभाजी, पाणीपुरी किंवा सामोसा हे तीन पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ म्हणून मान्यताप्राप्त होण्यास अडचण नाही.
महाराष्ट्रातील बाभळेश्‍वर (जि. नगर) येथील एका टपरीपासून ते भारताच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या गुवाहाटीतील (आसाम) एका हातगाडीपर्यंत सर्वच ठिकाणी चहा आणि कॉफीप्रमाणे मिळणारा खाद्यपदार्थ म्हणजे पुरीभाजी आणि सामोसा!वेगवेगळ्या कारणांनी भारताच्या विविध भागांमध्ये गेल्यानंतर अगदी सहजपणे आणि स्वस्तात उपलब्ध होणारे दोन पदार्थ अशी पुरीभाजी आणि सामोसा यांची ओळख करुन द्यावी लागेल.

भारताच्या कोणत्याही भागात गेल्यानंतर पंजाबी खाद्यपदार्थ, दाक्षिणात्य पदार्थ, चाट, भेळ आणि पाणीपुरी तसेच चायनीज खाद्यपदार्थ मिळतात. पण तरीही त्यांची ओळख विशिष्ट राज्यापुरती किंवा विशिष्ट राज्यांपुरतीच आहे. भेळ हा आणखी एक पदार्थ या स्पर्धेत उतरु शकला असता. पण भारतातील सर्वच ठिकाणी भेळ मिळते की नाही, याबाबत साशंकता आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर हैद्राबादमध्ये सहजासहजी भेळ मिळत नाही. अगदी एखाद-दोन ठिकाणी मिळते. त्यामुळे भेळ हा पदार्थ यादीत घेऊ नये, असं मला वाटतं.

पुरीभाजी, पाणीपुरी व सामोसा या पदार्थांची ओळख एखाद्याच राज्यापुरती मर्यादित नाही. ते काही महाराष्ट्रीयन नाहीत, दाक्षिणात्य नाहीत वा पंजाबीही नाहीत. पण तरीही भारतभर हे पदार्थ अगदी सहजपणे मिळतात, म्हणूनच त्या पदार्थांना "राष्ट्रीय' म्हणावेसे वाटते. अभिजीत कांबळे नावाच्या माझ्या मित्राचं लग्न नगर जिल्ह्यातील बाभळेश्‍वर जवळच्या एका गावात होतं. त्या निमित्तानं बाभळेश्‍वरला मुक्कामाची संधी मिळाली. त्यावेळी सकाळी टपरीवर चहा पिण्याच्या हेतूनं गेलो. पाहतो तर काय चहावाला मस्त पुरीचा घाणा काढत होता. त्याला म्हटलं भाजी कोणती आहे. तेव्हा नवाच प्रकार पहायला मिळाला. कांदा-बटाट्याची परतून केलेली भाजी (डोसा) त्यानं डिशमध्ये घेतली आणि त्यावर झणझणीत तर्री असलेली मटकीची उसळ अक्षरशः ओतली. वेगळ्या डिशमध्ये पुरी देऊन माझ्यासमोर ठेवत म्हटलं "घ्या साहेब'.

नाही म्हटलं तरी पुण्या-मुंबईतल्या हॉटेलांमध्येही पुरीभाजी मिळतेच की. "पुरीभाजी'ची "ऑर्डर' दिली की पुरीसोबत येते बटाट्याची परतून केलेली भाजी आणि पातळ भाजी हवी असेल तर "ऑर्डर' द्या "कुर्मापुरी'ची. नाशिकपासून ते नागपूरपर्यंत आणि औरंगाबादपासून ते सोलापूरपर्यंत पुरीभाजी किंवा कुर्मापुरी मिळत नसलेलं हॉटेल शोधून सापडणं अवघड!

हैद्राबादमध्ये असताना तशी सगळीकडेच पुरीभाजी मिळायची. पण आमचा एक ठरलेला चाचा होता. त्याच्याकडे कांदा, बटाटा, टॉमेटो व इतर काही अगम्य भाज्या घालून "कुर्मा'सारखी भाजी केलेली असायची. थोडीशी आंबट चव (चिंचेमुळे) असलेली भाजी चवीला काही निराळीच! अगदी उडुपी दुकांनांमधून वा रस्त्यांवरील गाड्यांवरही पुरीभाजीची विक्री व्हायची. पाच रुपयांमध्ये चार पुऱ्या आणि "अनलिमिटेड' भाजी. तिकडं बटाट्याच्या परतून भाजीची बात नश्‍शे. एक-दोन दुकांनांमध्ये "डोसाभाजी'ची रस्साभाजी मिळायची. पण खरं सांगांयचं तर एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा ती रस्सा "डोसाभाजी' खायची इच्छाच झाली नाही.

मध्य आणि उत्तर भारतात भोपाळ, ग्वाल्हेर, झॉंशी, मथुरा, आग्रा आणि खुद्द दिल्लीतही अगदी सक्काळी सक्काळी भरपेट नाश्‍ता करण्याची पद्धत आहे. गरमा-गरम दूध, जिलेबी आणि पकोडे या नाश्‍त्याच्या सोबतीला स्टॉलवर किंवा हॉटेलांमध्ये मिळते ते पुरीभाजी! तिथली भाजीही रस्सा भाजीकडे झुकलेली आणि पुऱ्या आकाराला अंमळ मोठ्या व भटुऱ्याच्या जवळ जाणाऱ्या. चना-भटुरा हा देखील पुरीभाजीच्याच जवळ जाणारा आणखी एक खाद्यपदार्थ. गुजरातेतही सुरत, भरुच, बडोदा, अहमदाबाद आणि राजकोटवासियांनाही हा पदार्थ नवीन नाही. सुरतची पुरीभाजी तर अगदी सुप्रसिद्ध होती. आता इतरही पदार्थ आल्यानं तिची लोकप्रियता घटली असावी.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटीला जाणं झालं व पश्‍चिम बंगाल तसंच आसाममध्येही हा पदार्थ अगदी सहजपणे मिळत असल्याचं स्पष्ट झालं. हावडा स्टेशनसमोर असलेल्या छोट्या टपरीवजा हॉटेलवर सकाळी पुऱ्यांचा घाणा निघत असतो. गुवाहाटीमध्ये सकाळी चहाबरोबर नाश्‍त्याला पुरीभाजी तसंच सामोसा हे दोन पदार्थ हमखासपणे मिळतात. इतकंच काय तर एका अण्णाच्या हॉटेलवरही पुरीभाजीचा "मेन्यू'मध्ये समावेश असल्याचं दिसतं. चव मात्र, अगदी आपल्या महाराष्ट्रात मिळते तशीच!
तमिळनाडू आणि केरळमध्ये जाणं झालं नाही, पण आमचा दाक्षिणात्य मित्र देविदास देशपांडे यानं सांगतिलेल्या माहितीनुसार केरळ आणि तमिळनाडूतही पुरीभाजी अगदी सर्रास उपलब्ध असते. फक्त तिकडं पुऱ्या मैद्याच्या असतात. पण त्यात काही विशेष नाही आसाम, बंगाल आणि अगदी हैद्राबादेतही पुऱ्या मैद्याच्याच असतात. तसंच केरळ आणि तमिळनाडूत भाजीमध्ये धने पावडर मोठ्या प्रमाणावर वापरलेली असते. त्यामुळं तिथल्या भाजील जराशी निराळी चव असते. मेघालयाची राजधानी शिलॉंगमध्येही पुरीभाजी मिळते. (अधिका माहिती म्हणजे तिकडं तिथं वडापाव देखील मिळतो.)

पाणीपुरी पण स्पर्धेत...
पाणीपुरी न आवडणारी व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. सापडलीच तर ती व्यक्ती संशोधानाचा विषय होऊ शकते. पाणीपुरीला काही ठिकाणी (विशेषतः उत्तर भारतात) गोलगप्पे म्हणून संबोधलं जातं. पण नाव बदललं म्हणून चव बदलत नाही. शिजवलेल्या वाटाण्याचा किंवा हरभऱ्याचा रगडा, पुदीना आणि मिरचीच्या ठेच्यापासून बनविलेलं तिखट पाणी तसंच चिंच आणि गूळ यांच्यापासून बनविलेलं आंबटगोड पाणी यांचं अफलातून मिश्रण म्हणजे पाणीपुरी. आता भारतातल्या काही भागात फक्त तिखट पाणीच पाणीपुरीमध्ये टाकलं जातं. तर काही ठिकाणी पाणीपुरी खाताना बरोबर बारीक चिरलेला कांदा दिला जातो. पाणीपुरी मिळाल्यानंतर काही शौकिन कांदा टाकून आस्वाद घेतात.
पाणीपुरी देण्याची पद्धतही औरच असते. बहुतांश ठिकाणी प्लेटनुसार पाणीपुरी दिली जाते व प्लेटमधील पाच, सहा किंवा आठ पुऱ्या संपल्यानंतर विक्रेता आपल्याला एक प्लेट झाल्याची सूचना देतो. त्यानंतर हवी असेल तर दुसरी प्लेट सुरु करतो. गुजरातमध्ये अनेक भागात आपण पुरे म्हणेपर्यंत विक्रेता आपल्या प्लेटमध्ये पुऱ्या ठेवत असतो. तिकडे प्लेटची बात नसतेच. आपण जितक्‍या पुऱ्या खाऊ त्याचे तो आठ आण्याप्रमाणे पैसे आकारतो. आहे की नाही गंमत.

... आणि सामोसाही!
सामोश्‍याबद्दल तर काहीच बोलायला नको. हा पदार्थ भारताच्या कानाकोपऱ्यात मिळतो. त्यातही इराण्यांच्या दुकानात मिळणारा सामोसा थोडासा निराळा. त्याच्या सारणात कोबीचा भरणा अधिक. इतर ठिकाणच्या सामोश्‍यात बटाटा आणि मटार (किंवा वाटाणा) यांची मक्तेदारी. आता काही ठिकाणी पट्टीचे सामोसेही मिळू लागले आहेत. पण त्यात फारसा दम नाही. सारण कमी आणि चावण्याचेच श्रम जास्त.
तुम्हाला काय वाटतं कोणता पदार्थ भाराताच राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास अधिक पात्र आहे. या तीनपैकी एखादा पदार्थ असावा की आपल्या मतानुसार आणखी एखादा पदार्थ राष्ट्रीय खाद्यपदार्थ बनण्यास लायक आहे. तुमची प्रतिक्रिया "कॉमेंट्‌स'मध्ये नक्की लिहा.

Thursday, August 09, 2007

खाकरा, ढोकला, फाफडा आणि मठिये


कडकडून भूक लागली आहे आणि आपल्यासमोर कोणीतरी विविध पदार्थांनी भरलेली गुजराती थाळी आपल्यासमोर आली की काय खावं आणि काय नको, अशी आपली अवस्था होऊन जाते. अनेकदा सुरवात कशानं करावी, हे देखील समजत नाही. फक्त गुजराती जेवताना अशी परिस्थिती होत असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. कारण तुम्ही गुजराती खाद्यपदार्थांच्या एखाद्या दुकानात गेला तर विविध खाद्यपदार्थांच रेलचेल व एकाच पदार्थाचे विविध प्रकार पाहिल्यानंतर गुज्जू भाईंच्या आस्वादक वृत्तीचा प्रत्यय येईल.

काही कारणानिमित्तानं बडोदा (वडोदरा) इथं जाणं झालं. तशी धावतीच भेट झाली. पण तरीही आवर्जून वेळ काढून टिपिकल गुजराती पदार्थ मिळणाऱ्या बडोद्यातील एखाद्या दुकानात भेट देणं ओघानं आलंच. प्रतिष्ठित अलकापुरी भागातील "पायल' नावाचं दुकान विशेष लोकप्रिय असल्याचं समजलं आणि थेट दुकान गाठलं. एका दुकानाचे तीन भाग करुन एका भागात गरमागरम ताजे पदार्थ, दुसऱ्या भागात खारा माल आणि तिसऱ्या बाजूला गोड पदार्थ असं विभागणी करुन येणाऱ्या प्रत्येक गिऱ्हाईकाच्या आवडी-निवडीची काळजी घेण्यात आली होती.

लज्जतदार खाकरे...
पाच पंचवीस प्रकारचे खाकरे, पन्नास प्रकारच्या आणि जाडीच्या शेव, स्पेशल गुजराती मठिये, विविध प्रकारचे वेफर्स आणि चिवडे अशी जवळपास शे-सव्वाशे रकाने नुसत्या खाद्यपदार्थांच्या "व्हरायटी'ने भरलेले होते. खाकरा म्हणजे पापडाच्या जाडीची कडक पुरी. लसण शेव, पालक शेव, मेथी शेव, लसण-पालक, पालक-मेथी आणि मेथी-लसण अशा विविध चवींमध्ये शेव उपलब्ध होते. हेच प्रकार जाड शेव, बारीस शेव, गाठी शेव अशा स्वरुपातही उपलब्ध होते. खाकऱ्याचीही गोष्ट काही वेगळी नव्हती. लसूण घातलेला, न घातलेला, पालक, मेथी व इतर अनेक चवींमधील खाकरे ग्राहकांची आशेनं वाटत पाहत होते. यांच्या जोडीला बटाट्याचा आणि मक्‍याचा चिवडा, केळ्याचे नि बटाट्याचे तिखट-बिनतिखट वेफर्स अगदी तय्यारीत होते.

चविष्ट मठिये...
मठिये हा खास गुजराती पदार्थ गुजराती तसंच बिगर गुजराती ग्राहकांचंही आकर्षण होता. गुजरातीत मटकीला मठ असं म्हणतात. त्यामुळं मटकीच्या पिठापासून केलेल्या पाणीपुरीच्या आकाराइतक्‍या तिखट-मिठाच्या पुऱ्या म्हणजे मठिये. तिखट-मीठ असूनही थोडे गोडाकडं झुकणारे मठिये तोंडाला वेगळीच चव देणारे आहेत.

सुरळीची वडीही...
ताज्या पदार्थांमध्येही सुरळीची वडी, साधा आणि तिखट ढोकळा, सॅंडविच ढोकळा, तिखट कचोरी, उपवासाची कचोरी, बटाट्याचे पॅटिस, पंजाबी सामोसा, इटुकला-पिटुकला सामोसा, आलू वडा (म्हणजे आपल्या बटाटा वड्याच्या जवळपासही न फिरकणारा पदार्थ) आणि पालक, मेथी, कांदा तसंच बटाटा भजी... इतकं वैविध्य पाहिल्यानंतर पटकन सांगता येईल काय खायचं आणि काय नाही ते! या सर्व पदार्थांबरोबर मिळणारी ढोकळ्याच्या चुऱ्यापासून बनविलेली हिरवी चटणी खासच. नुसती चटणीही तितकीच चांगली. आणि हो एक राहिलंच की, गुजरातची खासियत म्हणजे गरमागरम फाफडा. डाळीच्या पिठापासून तयार केलेला आकाराने लांबडा पदार्थ. गरमागरम चटणीसह खायला एकदम उत्तम.

फुल्ल खादाडी...
अर्थात गुजराती माणसाला किंमतीकडं पाहून खरेदी करण्याची सवय नसल्यानं पदार्थांच्या किंमतीही थोड्याशा चढ्याच. पण पदार्थ खाल्ल्यानंतर पैसा वसूल. त्यामुळं जादा पैसा गेल्याचं दुःख नाही. शेवची भाजी, गाठीची भाजी, शेव टॉमेटो भाजी हे पदार्थ अस्सल गुजराती. आपल्याकडं जशा वडापावच्या गाड्या असतात, तशा तिथं शेवऊसळच्या गाड्या सकाळपासून रात्रीपर्यंत असतात. वाटाण्याची उसळ, वरुन शेव आणि सोबतीला पुरी किंवा पाव ही गुजराती लोकांची आवडती डिश!

मसाला डोसा आणि इतर दाक्षिणात्य पदार्थ, भेळ, रगडा पॅटिस आणि पाणीपुरीसह चाटचे विविध प्रकार, पंजाबी डिशेस, चायनीज खाद्यपदार्थ यांच्या गाड्यांचीही रेलचेलही आपल्याला रस्त्यारस्त्यांवर दिसते. त्या गाड्यांभोवती असलेली तुडुंब गर्दी पाहिली की गुज्जू लोकांच्या "तबियत का राज' समजतं. पण हे सारं आपल्याकडंही अगदी मुबलक प्रमाणात मिळत असल्यानं तिकडं फिरकण्याचा प्रश्‍नच नव्हता.

भरुचनी सेंग...
रेल्वेनं येताना भरुच नावाचं स्टेशन लागतं. हे ठिकाण खारे शेंगदाणे आणि फुटाणे यांच्यासाठी प्रसिद्ध! मुंबईहून जाताना नर्मदा नदीवरील जवळपास दीड किलोमीटर लांबीचा पूल ओलांडला की गाडी थेट भरुच स्थानकात घुसते. तिथं स्टेशनवर किंवा आपण मोटारीनं जात असलो की "हायवे'वर असंख्य विक्रेते आपल्यापुढं खारे शेंगादाण्याचे पुडे घेऊन उभे असतात. त्यातही दोन-तीन प्रकार आहेत. लहान, मध्यम आणि मोठ्या आकारावरुन शेंगादाण्याच्या किंमती ठरतात. मध्यम आकाराचा शेंगादाणाही भलताच मोठा असतो. किलोला साधारण 80 ते 100 रुपये पडतात.

भरुचमध्ये शेंगादाणे पिकत नाहीत. ते येतात सौराष्ट्राहून. पण भरुचचे कारागिर उत्तम असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळं इथले खारे शेंगादाणे अधिक प्रसिद्ध आहेत. मोठाल्या कढईतील रेतीमध्ये भाजण्याच्या आदल्या रात्री हे शेंगदाणे रात्रभर खाऱ्या पाण्यात भिजवून ठेवले जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते चांगले भाजले जातात आणि त्यावेळी पुन्हा त्यावर खाऱ्या पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळं भरुचच्या शेंगादाण्यांची चव अगदीच न्यारी वाटते. रोज भरुचमध्ये जवळपास 20 टन शेंगादाणे सौराष्ट्र आणि दक्षिण भारतातून भरुचमध्ये येतात. थोडा माल "एक्‍सपोर्ट' होतो आणि काही माल भारताच्या इतर भागांमध्ये पाठविला जातो. पण बाकी सारा माल भरुच आणि गुजरातमध्येच खपतो.