भातोबा, इडलोबा आणि डोसोबा...
तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या कव्हरेजसाठी येण्याचं निश्चित झालं तेव्हा अनेकांनी अभिनंदन करताना म्हटलं, की आता काय मजा आहे. इडली, डोसा आणि भात खाऊन दिवस काढायचे आहेत तुला. तसं पहायला गेलं तर मला हे सगळ्ळं खूप आवडतं. त्यातून इडली तर माझी एकदम लाडकी. त्यामुळं मी पण मनातल्या मनात खूप खूष होतो. चेन्नईत पोहोचलो तेव्हा सुरुवातीचे तीन दिवस टाइम्सच्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था होती. तिथला आचारी हा उत्तर प्रदेशचा होता. रमेश यादव. दोन दिवसांनंतर त्याच्याजागी उत्तर प्रदेशचाच दुसरा कोणतरी आला. त्यामुळं सुरुवातीचे तीन दिवस मला दाक्षिणात्य पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेता आला नव्हता. जेवणात रोज पोळ्या असायच्याच. सकाळी नाश्त्याला मसाला डोसा (घावन स्टाईलचा) किंवा इडल्या ठरलेल्या. एका दिवशी छोटे उत्तप्पेही होते. पदार्थ मस्त असायचे पण ती चव रेग्युलर चव नव्हती. म्हणजे खास दाक्षिणात्य हॉटेलात असते तशी नव्हती.
नाही म्हणायला पहिल्या दिवशी टेन्यामपेट भागातील एका छोट्या हॉटेलात पुरी भाजी आणि कर्ड राईस खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी अड्यार गेट परिसरातच एका ठिकाणी मसाला डोसा आणि पुन्हा एका कर्ड राईस खाल्ला. मसाला डोसा पुण्यात मिळतो तसाच होता. फारसा फरक नव्हता. पण दोन्हीकडील कर्ड राईस अमुलाग्र वेगळा. रसरशीत आणि मी आंबट. सोबत किसलेले गाजर किंवा गाजराचे तुकडे त्यामध्ये टाकलेले. लेमन राईस, कर्ड राईस, सांबार राईस, पोंगल, स्वीट राईस असे राईसचे किमान पाच-सात प्रकार प्रत्येक टिफीनमध्ये मिळतात.
चेन्नईसोडून पुद्दुचेरीला पोहोचलो आणि तिथं खऱ्या अर्थानं स्पेशल तमिळ राईस प्लेट मिळाली. पुद्दुचेरी बसस्टँडसमोरच स्री सब्थगिरी (मराठीत श्री सप्तगिरी) नावाचे हॉटेल आहे. एक नंबर प्रकार. पन्नास रुपयांमध्ये भरपूर जेवण. म्हणजे एक पोळी आणि हवा तेवढा राईस. सुरुवातीला ताटात आठ-दहा वाट्या, एक पोळी आणि एक पापड असा मेन्यू येतो. एक वाटी भेंडीच्या भाजीची, एक वांग्याच्या भाजीची, एकामध्ये सांबार, एकात सारम्, एकात दही, एकात मिरचीचा खर्डा लावलेलं ताक, आणखी एकात खीर (ती देखील भाताचीच), आणखी एका वाटीत आणखी कसलीशी भाजी. (किती लक्षात ठेवायचं)
एक पोळी संपल्यावर त्याला म्हटलं आणखी एक पोळी दे बाबा. तो म्हटला, वन्ली वन सर. तुम्हाला हवा तेवढा भात घ्या, पण पोळी एकच. बाबा पैसे देईन एक्स्ट्रॉ, असं म्हटल्यावर तो तयार झाला. दोन पोळ्या घेतल्यानंतर त्यानं जो भात वाढला तो पाहून चक्करच यायची बाकी होती. परत इतकं वाढून आणखी वाढू का, असं विचारत होता. म्हटलं, बाबा काय मारतोस की काय भात खायला घालून. हैदराबादची आठवण झाली. तिथंही राईस प्लेटही खरोखरच राईस प्लेट होती. फक्त राईस राईस आणि राईस. पहिला भात, मधला भात आणि शेवटचा भात. आंबट आणि आपल्यापेक्षा थोडं जास्त तिखट असं जेवून तृप्त मनानं उठलो.
तिथंच दुसऱ्या दिवशी सकाळी मसाला डोसा खाल्ला. मसाला डोसा हा कुठेही खा तो कुरकुरीत अजिबात नसतो. घावनसारखाच जाडसर असतो. (मला तर वाटतं, पुण्यातल्या तमाम उडुपी हॉटेल्स कुरकुरीत डोसाच्या नावाखाली लोकांना जास्त पैसे घेऊन फसवितात. अन्यथा हैदराबाद, चेन्नई, पुद्दुचेरी कुठेही जा, कुरकुरीत डोसा कुठेही मिळत नाही. मग ही मंडळीच कुठून ही शक्कल लढवितात. बरं, आपण पण कुरकुरीत डोसा, कुरकुरीत डोसा करून त्यांच्या घशात बक्कळ पैसे ओतत असतो.) सोबतीला दोन-तीन चटण्या आणि घट्ट सांबार. पुद्दुचेरीहून कुडलूर, चिदंबरम, कुंभकोणममार्गे तंजावूरला पोहोचलो. (आपल्याला फक्त पुलंच्या असामी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम माहिती होता. कुंभकोणम नावाचं गाव आहे, ते आजच कळलं. अर्थात, चिदंबरम नावाचं गाव आहे, हे माहिती होतं.)
तंजावूर इथं बसस्टँडच्या जवळच आर्य भुवन नावाचं एक सॉल्लिड टिफीन सेंटर आहे. तिथं इडली खाल्ली. खाल्ली नाही खाल्ल्या नाही. मस्त केळीचं पान. त्यावर दोन गरमागर इडल्या. समोर दोन वाट्या सांबार. नंतर तीन प्रकारच्या चटण्या. एक नारळाची पांढरी चटणी. एक हिरवी तिखट चटणी. आपण तयार करतो तशी. आणि एक लाल चटणी. टोमॅटो आणि लाल मिरची घालून तयार केलेली आंबट चटणी. गरमागरम मऊ लुसलुशीत चटणी कशाबरोबर खायची ते तुम्ही ठरवा आणि तुटून पडा. दोनवर थोडंच भागणार आहे. मग आणखी दोन मागविल्या. तेव्हा कुठं समाधान झालं. नंतर मस्त कडक कॉफी घेतली आणि बाहेर पडलो.
आर्य भुवनच्या जवळच एक छोटंस स्नॅक्स सेंटर आहे. तिथं गरीब लोकांची गर्दी जास्त. दोन रुपयांना ओनियन वडा, उडीद वडा, तीन रुपयांना पॅटिस किंवा सामोसा, चार रुपयांना चहा किंवा सहा रुपयांना ऑरेंज सरबत, असा अगदी सामान्य गरीबांना परवडेल असा मेन्यू. सोबतील चिवडा आणि चकण्याचे अनेक आयटम्स. लाडू, जिलेबी आणि इतर पदार्थही. तिथं खाणारी आणि घरी नेणारी मंडळी मोठ्य़ा संख्येनं इथं दिसतात. इडली, डोसा आणि भाताचे अजूनही काही दिवस बाकी आहेत. तेव्हा पुन्हा एकदा लवकरच भेटू नव्या शहरांसह, नव्या पदार्थांसह आणि नव्या चवीसह.
नन्ड्री.
तमिळनाडूमध्ये विधानसभेच्या कव्हरेजसाठी येण्याचं निश्चित झालं तेव्हा अनेकांनी अभिनंदन करताना म्हटलं, की आता काय मजा आहे. इडली, डोसा आणि भात खाऊन दिवस काढायचे आहेत तुला. तसं पहायला गेलं तर मला हे सगळ्ळं खूप आवडतं. त्यातून इडली तर माझी एकदम लाडकी. त्यामुळं मी पण मनातल्या मनात खूप खूष होतो. चेन्नईत पोहोचलो तेव्हा सुरुवातीचे तीन दिवस टाइम्सच्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था होती. तिथला आचारी हा उत्तर प्रदेशचा होता. रमेश यादव. दोन दिवसांनंतर त्याच्याजागी उत्तर प्रदेशचाच दुसरा कोणतरी आला. त्यामुळं सुरुवातीचे तीन दिवस मला दाक्षिणात्य पदार्थांचा पुरेपूर आस्वाद घेता आला नव्हता. जेवणात रोज पोळ्या असायच्याच. सकाळी नाश्त्याला मसाला डोसा (घावन स्टाईलचा) किंवा इडल्या ठरलेल्या. एका दिवशी छोटे उत्तप्पेही होते. पदार्थ मस्त असायचे पण ती चव रेग्युलर चव नव्हती. म्हणजे खास दाक्षिणात्य हॉटेलात असते तशी नव्हती.
नाही म्हणायला पहिल्या दिवशी टेन्यामपेट भागातील एका छोट्या हॉटेलात पुरी भाजी आणि कर्ड राईस खाल्ला होता. दुसऱ्या दिवशी अड्यार गेट परिसरातच एका ठिकाणी मसाला डोसा आणि पुन्हा एका कर्ड राईस खाल्ला. मसाला डोसा पुण्यात मिळतो तसाच होता. फारसा फरक नव्हता. पण दोन्हीकडील कर्ड राईस अमुलाग्र वेगळा. रसरशीत आणि मी आंबट. सोबत किसलेले गाजर किंवा गाजराचे तुकडे त्यामध्ये टाकलेले. लेमन राईस, कर्ड राईस, सांबार राईस, पोंगल, स्वीट राईस असे राईसचे किमान पाच-सात प्रकार प्रत्येक टिफीनमध्ये मिळतात.
चेन्नईसोडून पुद्दुचेरीला पोहोचलो आणि तिथं खऱ्या अर्थानं स्पेशल तमिळ राईस प्लेट मिळाली. पुद्दुचेरी बसस्टँडसमोरच स्री सब्थगिरी (मराठीत श्री सप्तगिरी) नावाचे हॉटेल आहे. एक नंबर प्रकार. पन्नास रुपयांमध्ये भरपूर जेवण. म्हणजे एक पोळी आणि हवा तेवढा राईस. सुरुवातीला ताटात आठ-दहा वाट्या, एक पोळी आणि एक पापड असा मेन्यू येतो. एक वाटी भेंडीच्या भाजीची, एक वांग्याच्या भाजीची, एकामध्ये सांबार, एकात सारम्, एकात दही, एकात मिरचीचा खर्डा लावलेलं ताक, आणखी एकात खीर (ती देखील भाताचीच), आणखी एका वाटीत आणखी कसलीशी भाजी. (किती लक्षात ठेवायचं)
एक पोळी संपल्यावर त्याला म्हटलं आणखी एक पोळी दे बाबा. तो म्हटला, वन्ली वन सर. तुम्हाला हवा तेवढा भात घ्या, पण पोळी एकच. बाबा पैसे देईन एक्स्ट्रॉ, असं म्हटल्यावर तो तयार झाला. दोन पोळ्या घेतल्यानंतर त्यानं जो भात वाढला तो पाहून चक्करच यायची बाकी होती. परत इतकं वाढून आणखी वाढू का, असं विचारत होता. म्हटलं, बाबा काय मारतोस की काय भात खायला घालून. हैदराबादची आठवण झाली. तिथंही राईस प्लेटही खरोखरच राईस प्लेट होती. फक्त राईस राईस आणि राईस. पहिला भात, मधला भात आणि शेवटचा भात. आंबट आणि आपल्यापेक्षा थोडं जास्त तिखट असं जेवून तृप्त मनानं उठलो.
तिथंच दुसऱ्या दिवशी सकाळी मसाला डोसा खाल्ला. मसाला डोसा हा कुठेही खा तो कुरकुरीत अजिबात नसतो. घावनसारखाच जाडसर असतो. (मला तर वाटतं, पुण्यातल्या तमाम उडुपी हॉटेल्स कुरकुरीत डोसाच्या नावाखाली लोकांना जास्त पैसे घेऊन फसवितात. अन्यथा हैदराबाद, चेन्नई, पुद्दुचेरी कुठेही जा, कुरकुरीत डोसा कुठेही मिळत नाही. मग ही मंडळीच कुठून ही शक्कल लढवितात. बरं, आपण पण कुरकुरीत डोसा, कुरकुरीत डोसा करून त्यांच्या घशात बक्कळ पैसे ओतत असतो.) सोबतीला दोन-तीन चटण्या आणि घट्ट सांबार. पुद्दुचेरीहून कुडलूर, चिदंबरम, कुंभकोणममार्गे तंजावूरला पोहोचलो. (आपल्याला फक्त पुलंच्या असामी असामी मधला प्रोफेसर कुंभकोणम माहिती होता. कुंभकोणम नावाचं गाव आहे, ते आजच कळलं. अर्थात, चिदंबरम नावाचं गाव आहे, हे माहिती होतं.)
तंजावूर इथं बसस्टँडच्या जवळच आर्य भुवन नावाचं एक सॉल्लिड टिफीन सेंटर आहे. तिथं इडली खाल्ली. खाल्ली नाही खाल्ल्या नाही. मस्त केळीचं पान. त्यावर दोन गरमागर इडल्या. समोर दोन वाट्या सांबार. नंतर तीन प्रकारच्या चटण्या. एक नारळाची पांढरी चटणी. एक हिरवी तिखट चटणी. आपण तयार करतो तशी. आणि एक लाल चटणी. टोमॅटो आणि लाल मिरची घालून तयार केलेली आंबट चटणी. गरमागरम मऊ लुसलुशीत चटणी कशाबरोबर खायची ते तुम्ही ठरवा आणि तुटून पडा. दोनवर थोडंच भागणार आहे. मग आणखी दोन मागविल्या. तेव्हा कुठं समाधान झालं. नंतर मस्त कडक कॉफी घेतली आणि बाहेर पडलो.
आर्य भुवनच्या जवळच एक छोटंस स्नॅक्स सेंटर आहे. तिथं गरीब लोकांची गर्दी जास्त. दोन रुपयांना ओनियन वडा, उडीद वडा, तीन रुपयांना पॅटिस किंवा सामोसा, चार रुपयांना चहा किंवा सहा रुपयांना ऑरेंज सरबत, असा अगदी सामान्य गरीबांना परवडेल असा मेन्यू. सोबतील चिवडा आणि चकण्याचे अनेक आयटम्स. लाडू, जिलेबी आणि इतर पदार्थही. तिथं खाणारी आणि घरी नेणारी मंडळी मोठ्य़ा संख्येनं इथं दिसतात. इडली, डोसा आणि भाताचे अजूनही काही दिवस बाकी आहेत. तेव्हा पुन्हा एकदा लवकरच भेटू नव्या शहरांसह, नव्या पदार्थांसह आणि नव्या चवीसह.
नन्ड्री.

