Showing posts with label Shivaji Park. Show all posts
Showing posts with label Shivaji Park. Show all posts

Friday, November 23, 2012

बाळासाहेब… देशातील महाराष्ट्राची ओळख



 
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटी इथंगेलो होतो. २००७ मध्ये. त्यावेळी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय असलेले पोलॉक महंत नावाचे एक गृहस्थ भेटले होते. वय साधारण चाळीस असेल. ते तिथल्या ट्रान्सपोर्ट कमिटीचे अध्यक्ष होते. मी महाराष्ट्रातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी विचारलेला पहिलाच प्रश्न मला बुचकळ्यात टाकणारा होता. ‘अरे, आपके बालासाहब कैसे है…’ मला प्रश्न पडला, की याला लेकाला बाळासाहेबांची एकदम आठवण येण्याचे कारण काय. तेव्हा त्यानं सांगितलेला किस्सा एकदम अफलातून होता.
महंत हे तिसरी चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेले होते. त्यावेळी दादरजवळ गर्दीमध्ये ते हरविले. लहान असल्यामुळे त्यांना तसे काहीच कळत नव्हते आणि घरचे सोबत नाही, म्हटल्यावर त्यांना रडू कोसळले. तेव्हा ही गोष्टी शिवसैनिकांनी पाहिली. त्यांनी महंत यांना एका शिवसैनिकाच्या घरी नेले. तिथे त्यांची विचारपूस केली. का रडत आहे किंवा कुठून आले वगैरे. नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये महंत हे त्यांच्या आई-वडिलांच्या जवळ होते.
‘ही गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. त्यामुळेच माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबध आहे. त्यामुळेच मी विचारले, बाळासाहेब कसे आहेत?’ असे महंत यांनी सांगितल्यानंतर थोडासा धक्काच बसला.

दुसरा अनुभव आला पुदुच्चेरीमध्ये. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो, तेव्हा पुदुच्चेरीलाही गेलो होतो. तिथे रस्त्यावरून फिरत असताना एल गणपती नावाचे एक अॅडव्होकेट भेटले. साधारण पन्नाशीकडे झुकलेले. बाळासाहेबांचे डायहार्ड फॅन. कट्टर हिंदुत्त्ववादी आणि काँग्रेसला ठणकावून सांगणारे नेते म्हणून गणपती यांना बाळासाहेब आवडायचे. बाळासाहेबांनी आवाज दिला, की पाकिस्तानमध्येही त्याची दखल घेतली जाते इतकी त्यांची दहशत आहे, वगैरे भरभरून बोलत होते. जे पटत नाही, त्याविरोधात आवाज देण्याचा बाळासाहेबांचा गुण गणपती यांना विशेष भावत होता.
पुदुच्चेरीचे तेव्हाचे माजी आणि सध्याचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी कसा त्रास दिला किंवा सोनिया गांधी यांनीही कट्टर कार्यकर्त्याकडे कसे दुर्लक्ष केले, यावर गणपती भरभरून बोलत होते. काँग्रेसमध्ये सगळे असेच लोक आहेत. त्यांना वठणीवर आणणारा एखादा नेता आम्हालाही हवा आहे. कदाचित बाळासाहेबच हे काम करू शकतील. म्हणूनच शिवसेनेची शाखा पुदुच्चेरीमध्ये उघडायला हवी, अशी गणपती यांची मागणी होती.
 
यासह इतर विषयांवरही गप्पा झाल्या आणि मग मी त्यांचा निरोप घेतला. अर्थात, बाळासाहेबांच्या राज्यातून आलेल्या माणसाला भेटलो आणि त्याच्याशी भेटलो याचेच कदाचित त्यांना समाधान होते. आशिष चांदोरकर भेटल्याचे कमी. 


 
महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. अगदी आंडू, पांडू आणि झंडू नेत्यांपासून ते राष्ट्रीत नेते म्हणून मिरविणा-यापर्यंत अनेक नेत्यांची रांगच आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर त्यापैकी एकाही नेत्याची ओळख महाराष्ट्राचा नेता म्हणून नाही. कोणतेही पद किंवा सत्ता न उपभोगलेल्या बाळासाहेबांना हे भाग्य कसे लाभले, हाच विचार माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. बाळासाहेब गेल्यानंतर तोच विचार अधिक प्रकर्षानं जाणवायला लागला. मुंबईत बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेल्यानंतर चाहत्यांचा उसळलेला अतिमहाप्रचंड जनसागर पाहिला आणि तेव्हापासून तोच विचार मनात घोळतोय.

राजकारणात असलेल्या एखाद्या माणसावर इतकं निस्सीम आणि निस्वार्थी प्रेम करणारे इतके चाहते असू शकतात, ही गोष्टच आश्चर्यकारक वाटते. म्हणजे दक्षिणेत एन. टी. रामाराव किंवा एम. जी. रामचंद्रन या कलाकारांना जी लोकप्रियता लाभली, त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोकप्रिय बाळासाहेब आहेत, याचं यथार्थ दर्शन रविवारी घडलं. महासागर लोटला म्हणजे काय, याचा अर्थ माझ्या आणि नंतरच्या मंडळींना त्यादिवशीच ख-या अर्थाने कळला.

विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यातील शेतक-यापासून ते मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या एखाद्या गर्भश्रीमंत धनाढ्यापर्यंत, अमिताभ बच्चन-अनिल अंबानी यांच्यापासून ते एखाद्या तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत आणि गांधी टोपीवाल्या म्हाता-या माणसापासून ते थ्री फोर्थ घातलेल्या तरुण ललनांपर्यंत सर्वांचीच या जनसागरात उपस्थिती होती. त्यापैकी बाळासाहेबांचे थेट उपकार असलेले राजकारणी, त्यांच्या सान्निध्यात आलेले विविध क्षेत्रातील महनीय आणि सामान्य शिवसैनिक सोडले तर बाकीचे लोक कोण होते… बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणारे निस्वार्थी चाहते होते. आपलं जवळचं कोणीतरी गेलं आहे आणि त्याचं अंत्यदर्शन घेतल्याशिवाय चैन पडणार नाही, अशाच भावनेने मुंबईत महासागर लोटला होता.

तुमच्या आमच्या भाषेत बोलणारे बाळासाहेब होते. आपल्या अन्याय-अत्याचाराविरूद्ध असलेली चीड, एखाद्या घटनेबद्दलचा रोष ते आपल्या शब्दांतच व्यक्त करायचे. भडव्यांनोपासून ते यडझव्यापर्यंत बोलीभाषेतील अनेक शिव्या ते अगदी सहजपणे भाषणांमधून देत. पण त्यातून त्यांचा राग व्यक्त होत असे. उगाच भाषणांत रंगत आणायची म्हणून किंवा स्टाईल जपायची म्हणून त्या नसायच्या. उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हा झालेल्या भाषणात त्यांनी तेव्हाचे मुख्य निवडणूक आयुक्त जेम्स मायकेल लिंगडोह यांचा ‘कोण रे तो डोहात लिंग बुडवून बसलेला…’ असा उल्लेख पोट धरून हसायला लावणारा होता. बाळासाहेब असेच बिनधास्त होते, बेधडक होते आणि जसे होते तसेच होते. आतून एक आणि भाषणात एक अशी भानगड नव्हती. लोकांसमोर होते. म्हणूनच ते लोकप्रिय झाले. 


व्यंगचित्रकार म्हणून ते महान होते, उत्तम पत्रकार होते, राजकारणात राहून पदाचा मोह त्यांना झाला नाही, कर्तृत्व, नेतृत्व आणि वर्क्तृत्व यामध्ये अजोड होते आणि बरेच काही होते. पण त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटायचा तो त्यांच्या मोकळेढाकळेपणामुळे. इतका मोठा नेता असूनही आपल्यासारखेच बोलतो, वागतो यामुळे. बोललेला शब्द फिरवित नाही म्हणून. संघ परिवाराने जबाबदारी टाळल्यानंतरही ‘बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ असे अगदी बिनधास्तपणे जाहीर करतो म्हणून. हिंदुत्त्ववादी म्हणून मिरवणा-यांनी पाठ फिरविल्यानंतरही ‘साध्वी प्रज्ञासिंहला सर्व कायदेशीर मदत करण्यासाठी शिवसेना तयार आहे,’ असे सांगणा-या संघटनेचे प्रमुख होते म्हणून. पाकड्यांना खेळू देणार नाही म्हणजे नाही, हा शब्द शेवटपर्यंत पाळला म्हणून. मुंबईत शिवतीर्थावर जो अथांग जनसागर उसळला तो यामुळेच. एखादा राजकारणी आपल्याला सोडून गेला म्हणून लोक आनंद व्यक्त करतात. पण इथे लाखोंच्या डोळ्यात अश्रू होते. हीच बाळासाहेबांची श्रीमंती होती. पुण्याई होती. 

बाळासाहेब गेले, हे मानायला मन तयार नाही. अजूनही असं वाटतं, की कधीतरी लुंगीपुचाट चिदंबरम यांना बाळासाहेब ‘सामना’तून दम भरतील. ‘शिवसेनाप्रमुखांच्या इशा-यामुळे पाकिस्तानची हातभर फाटली’ असं शीर्षक पुन्हा एकदा ‘सामना’मध्ये वाचायला मिळेल. छोट्या-मोठ्या कलाकारापासून ते राजकारण्यांपर्यंत कोणतरी आज मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली, असा फोटो पहायला मिळेल. शिवसेनाप्रमुखांची आज अमक्या अमक्या वाहिनीवर मुलाखत, अशी जाहिरात पहायला मिळेल. साहेबांची संजय राऊत साहेबांनी घेतलेली मॅरेथॉन मुलाखत तीन-चार महिन्यांनी वाचायला मिळेल. ‘सामना’तून साहेबांच्या शुभेच्छा किंवा एखादं निवेदन वाचायला मिळेल. पण… आता यापैकी काहीच घडणार नाही.