Tuesday, September 15, 2015

सुखद, समृद्ध आठवणी...



हैदराबादची ‘दम बिर्याणी’...

हैदराबाद आणि ई टीव्ही मराठी हे दोन्ही शब्द माझ्यासाठी समानार्थी शब्द आहेत. कधीकाळी हैदराबाद म्हणजे ई टीव्ही आणि ई टीव्ही म्हणजे हैदराबाद हेच समीकरण दृढ होतं. ई टीव्हीमध्ये हैदराबादला काम करण्याचा अनुभव ज्यांनी ज्यांनी घेतलाय, त्यांचीही अवस्था कदाचित अशीच असेल. पक्का पुणेकर असूनही हैदराबादला जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा तिथं आपलं कसं होईल, असा प्रश्नच मनात होताच. पण तरीही जायचं निश्चित केलं आणि गेलोच. जवळपास दीड वर्षांच्या कालावधीत हैदराबादनं खूप काही शिकवलं.

सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा... 
............................................


गेल्या काही महिन्यांपासून नवा ब्लॉग सुरु केला आहे, ‘वर्डप्रेस’वर. फक्त खाणे आणि भटकणे यावर लिहिण्यासाठी… मध्यंतरी हैदराबादला चक्कर झाली आणि ‘दम बिर्याणी’सह अनेक आठवणींना उजाळा मिळाला… हैदराबादच्या ‘दम बिर्याणी’वरील लेख आवर्जून वाचा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा…



धन्यवाद.

Wednesday, August 19, 2015

हे तर महाराष्ट्र दूषण...

बी ग्रेडी पिलावळीचा बंदोबस्त करा...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार देण्याच्या निमित्ताने निष्कारण झालेला वादविवाद आणि घुसळण यांच्यामुळे एक बरं झालं नेमकं कोण कोणत्या बाजूला आहे, हे स्पष्ट झालं. एकीकडे उठता बसता शाहू, फुले आणि आंबेडकरांचं नाव घ्यायचं, पुरोगामी महाराष्ट्र नि पुढारलेला महाराष्ट्र अशी जपमाळ ओढायची आणि दुसरीकडे जातीपातीवरून खुसपटं काढत बसायची. विशेषतः ब्राह्मणांबद्दल त्वेषानं आकस व्यक्त करायचा… अशी दुटप्पी भूमिका घेऊन भोंदूगिरी करणारे कोण आहेत, हे स्पष्ट झाले. पुरोगामीत्वाचे बुरखे टराटरा फाटले. जातीपाती निर्मूलनाची भूमिका घेऊन पुढे जाण्याच्या बाता करणाऱ्यांचे वस्त्रहरण झाले. नागव्यांची जत्रा अवघ्या महाराष्ट्राने पाहिली.


देश कुठे चालला आहे. जग कुठे चाललं आहे आणि ‘जाणता राजा’ म्हणून टेंभा मिरविणारी मंडळी लोकांना जातीपातीच्या राजकारणात गुंतवून स्वतःची पोळी भाजून घेण्यात मश्गूल आहेत. मराठ्यांचा नेता म्हणून ओळख असलेल्या या नेत्यानं ब्राह्मणांना टार्गेट करण्यासाठी ‘संभाजी ब्रिगेड’, ‘जिजाऊ ब्रिगेड’ आणि ‘मराठा सेवा संघ’ अशी जातीयवादी संघटनांची पिलावळ जन्मास घातली. खतपाणी घातलं. तरुणांची माथी भडकाविली. विषवल्ली फोफावत राहील, याची अगदी पुरेपूर काळजी घेतली. पुरोगामी महाराष्ट्रात जातीपातीची विषवल्ली पसरविणारी ही विखारी पिलावळ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्याच काळात फोफावली. आणि त्याला खतपाणी घातलं ‘जाणत्या राजा’नंच!

महाराष्ट्रात मनसोक्त सत्ता उपभोगणाऱ्या या जाणत्या राजानं आणि त्यांच्या पक्षानं स्वतःच्या जातीसाठी, म्हणजे मराठ्यांसाठी इतक्या वर्षांत काय केलं कोणास ठाऊक? वर्षानुवर्षे सत्ता उपभोगून ही मंडळी अजूनही मागासच आहेत. आरक्षणासाठी छात्या पिटताहेत. मोर्चे काढताहेत. निषेध करताहेत. आंदोलनं करताहेत. अहो, महाराष्ट्रात ४०-४५ टक्के असलेला तुमचा समाज. पाटीलकी, देशमुखी आणि इतर गोष्टींमधून सत्ता राबविण्याची परंपरा, सत्तेत बहुतांश मंत्री, आमदार तुमच्याच जातीचे. तरीही तुमचा समाज पिछाडलेला. का बुवा? आरक्षणाची भीक मागण्यासाठी हात पसरण्याची वेळ तुमच्यावर का आली? याचा विचार आधी करा. मग बाबासाहेब पुरंदरे, समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांच्या बदनामीची मोहीम उघडा. 



आणि तुम्ही ज्यांच्या नावाने खडे फोडताय, त्यांना संपविण्यासाठी आंदोलनं उभारताय, तीन टक्क्यांचं अस्तित्व संपविण्यासाठी जीवाचं रान करताय, तो ब्राह्मण समाज अनेक वर्षांपासून लढतोय, झटतोय आणि स्वतःचे महत्त्व दाखवून देतोय. बुद्धीच्या, ज्ञानाच्या, कष्टाच्या, मेहनतीच्या आणि परिश्रमाच्या जोरावर आजही प्रचंड विरोधाच्या जमान्यातही तग धरून आहे. याचा कधी तरी विचार कराल की नाही? महाराजांच्या नावानं राजकारण करणं आणि जातीयवात पसरविण्याचे धंदे बंद करा. ब्राह्मणच नाही, तर सर्वच जातीमधील कष्टाळू आणि परिश्रम घेण्याची तयारी असलेल्या प्रत्येकाचेच भवितव्य उज्ज्वल आहे. फक्त आरक्षणाने काहीही साध्य होत नाही, हे कधीतरी समजून घ्या. कष्ट करणं हे भांडारकर फोडण्याइतकं सोप्प नाही, हे कधीतरी तुमच्या कार्यकर्त्यांना सांगा. 

तर मुद्दा मराठा सेवा संघ आणि बी ग्रेडी संघटनांचा. मुळात शिवकालातील ब्राह्मण लोकांनाच टार्गेट करण्यासाठी या लोकांनी अभियान राबविलं. समर्थ रामदास हे ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. दादोजी कोंडदेव ब्राह्मण करा त्यांना टार्गेट. अफझलखानाचा वकील कोणतरी कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण. करा ब्राह्मणांना टार्गेट. ही मंडळी बाजीप्रभू देशपांडे यांनाही टार्गेट करायला निघाली होती. देशपांडे म्हणजे ब्राह्मणच अशी यांची धारणा. पण या येड्याखुळ्यांना कुठे माहितीये की सीकेपींमध्येही देशपांडे हे आडनाव असतं. बाजीप्रभू देशपांडे हे ब्राह्मण नव्हे तर सीकेपी होते. ही गोष्ट पुढे आल्यानंतर मग बी ग्रेडींचा कार्यक्रम मावळला. दुर्दैवाने बाबासाहेबांचं आडनाव पुरंदरे. म्हणजे ब्राह्मण. मग तेही या बी ग्रेडींच्या ‘टार्गेट लिस्ट’वर आले. 



स्वराज्याची चर्चा करताना कसला जातीपातीचा मुद्दा उपस्थित करता. जातींवर चर्चा करता. स्वराज्य आणि शिवाजी महाराज ही काय एकट्या मराठ्यांची जहागिरी आहे का? तुमच्याकडे शिवाजी महाराज या नावाचा मालकी हक्क कुणी दिलाय का? महाराज सर्वांचे आहेत. सर्व जातीधर्मांचे आहेत. फक्त महाराष्ट्राचे नाहीत, तर अवघ्या हिंदूराष्ट्राचे आहेत. ते होते म्हणून आज आपण आहोत, याची जरा तरी जाणीव ठेवा. स्वराज्य उभारण्यात अठरापगड जातींचा वाटा आहे, हे कसं विसरून चालेल आणि ही गोष्ट मान्य करावीच लागेल. अठरापगड जातींप्रमाणेच ब्राह्मणांनीही स्वराज्य उभारणीत योगदान दिलेलेच आहे. सिंहाचा वाटा नसेलही, पण खारीचा आहेच आहे. इतिहास संशोधक त्याबद्दल अधिक बोलू शकतील. तो माझा प्रांत नाही.

शिवाजी महाराजांकडे जसं जातीच्या चष्म्यातून पाहण्याची गरज नाही तसंच शिवरायांच्या कोणत्याही सरदाराकडे वा शिवकालीन व्यक्तिमत्वाकडे जातीच्या नजरेतून पाहण्याची गरज नाही. अहो, शाळेत असताना दादोजी कोंडदेव यांचं आडनाव कुलकर्णी होतं हे कोणाला तरी माहिती होतं का? ते ब्राह्मण होते, हे देखील माहिती नव्हतं. त्यामुळं त्याचा अभिमान बाळगण्याची आवश्यकताच नव्हती. कोंडदेव हे महार, माळी, कोळी, चांभार किंवा आणखी कोणत्या तरी जातीतील असते, तरीही आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच असता. आकसाने त्यांचा पुतळा हटविण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो नसतो. बी ग्रेडींच्या जातीपातीच्या राजाकारणामुळं दादोजींचं आडनाव कुलकर्णी होतं हे कळलं. फक्त ब्राह्मण म्हणून द्वेष करायचा. गुरू म्हणून तर नाकारायचंच पण तो माणूसच अस्तित्वात नव्हता, असेही दावे करायचे. कशामुळे तर फक्त ते ब्राह्मण होते म्हणून. ही कुठली दळभद्री वृत्ती. 

बाबासाहेबांच्या लिखाणावर आक्षेप घेणार कोण? बिनबुडाचे दावे करणार कोण श्रीमंत कोकाटे? इतिहास संशोधनात यांचे योगदान काय? महाराज गेले त्या किती ठिकाणी हा माणूस गेला? किती फिरला? किती कागदपत्रे यांनी तपासली आणि अभ्यासली. किती भाषांमधली कागदपत्रे पाहिली? फ्रेंच, इंग्रजी, फारसी, पर्शियन, मोडी आणि इतर किती भाषा इतिहासाची ओळख करून घेण्यासाठी आत्मसात केल्यात. त्यांची साथ कोण देणार पुरुषोत्तम खेडेकर. अहो, या खेडेकरचा आणि इतिहासाचा काय संबंध? ब्राह्मण बायका त्यांचे लैंगिक समाधान मराठ्यांकडून करून घ्यायच्या आणि उत्तान कपडे घालून काय काय करायच्या असलं बीभत्स नि अश्लील लिखाण करणारा हा खेडेकर कोर्टात शेपूट घालतो. बिनशर्त माफी मागतो आणि पुस्तक मागे घेतो. असली कोकाटे नि खेडेकर ही मंडळी बाबासाहेब पुरंदरेंच्या लेखनावर आक्षेप घेणार? बरं अत्यंत वाईट शब्दात लिहिणाऱ्या खेडेकरला शिक्षा काय तर काहीच नाही. फक्त माफीनामा आणि पुस्तक परत घेण्यावर भागलं. 
(खेडेकरच्या लेखणीची लायकी कळावी, म्हणून त्याच्या पुस्तकातील ब्लॉगमध्ये काही पानांचे जेपीजी मुद्दाम टाकले आहेत.)



अहो, बाबासाहेबांच्या पासंगाला तरी ही मंडळी पुरणार आहेत का? बाबासाहेबांनी जेवढं लेखन केलंय आणि जेवढी व्याख्यानं दिलीयेत तेवढं या मंडळींनी ऐकलं आणि वाचलं तरी आहे का? ‘जाणता राजा’ सारखं महानाट्य बाबासाहेबांनी उभं केलं, जगभर पोहोचविलं, त्यासाठी किती कष्ट त्यांनी उपसलेत हे पाहण्याचं भाग्य मला मिळालंय. त्यांच्या नाटकात सहभागी होण्याचं भाग्य आम्हाला मिळालंय. तुम्ही काय केलंय शिवराय जगभर पोहोचविण्यासाठी? अहो, ज्या माणासावर समोरच्या व्यक्तीच्या वयाचा मान ठेवण्याचे संस्कारही नाहीत, ती व्यक्ती काय लायकीची आहे, हे सांगायला कोणाचीही आवश्यकता नाही. आणि जितेंद्र आव्हाड सारखा बोलका पोपट असल्या दळभद्री लेखकांची तुलना बाबासाहेबांच्या लेखनाशी करतो. आव्हाडांनी खेडेकरच्या पुस्तकातील आक्षेपार्ह लेखनाबद्दल आधी बोलावे आणि मग इतिहासाचे ज्ञान पाजळावे. एक लक्षात ठेवा. बाबासाहेब ‘महाराष्ट्र भूषण’ आहेत, तर तुम्ही ‘महाराष्ट्र दूषण’ आहात.

पुरोगामी महाराष्ट्रात इतक्या नीच पातळीवर जाऊन जातीय राजकारण करणारी ही मंडळी महाराष्ट्राला लागलेली कीड आहे. अहो, महाराजांनी काय फक्त मराठ्यांच्या जोरावर स्वराज्य उभारलं नाही. मदारी मेहतर, जिवा महाला, शिवा काशीद, नेताजी पालकर, हिरोजी फर्जंद, दौलतखान आणि अशी असंख्य सरदार मंडळी मराठा होती का हो? प्रत्येक गोष्टीत जातपात पाहण्याचे संस्कार माझ्यावर नाहीत. घरातूनही नाही आणि ज्या संघटनेत वाढलो तिथंही नाही. पण किमान आडनावावरून तरी वाटत नाहीत. खंडोजी खोपडे, सूर्याजी पिसाळ, रांझेगावचा बाबाजी पाटील, जावळीचे चंद्रराव मोरे ही मंडळी मराठा होती का? हे देखील बी ग्रेडींनी तपासावं एकदा. म्हणजे महाराजांसाठी लढणारे कोण होते नि त्यांच्या विरोधात कोण होते, हे जगासमोर येऊ दे. होऊ दे चर्चा. जातपात काढण्याची गरज नाही. पण तुम्हाला खुमखुमीच असेल जात काढायचीच असेल तर सर्वांचीच जात काढा.

अगदी जाणतेपणी जातीपातीचे राजकारण करणारी ही नीच आणि दळभद्री वृत्ती तातडीने नष्ट करण्याची आवश्यकता आहे. अशी प्रवृत्ती पसरविणाऱ्या आणि विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी संघटनांची पिलावळ प्रसृत करणारे नेते स्वकर्मानेच नष्ट होतील. पण हा विखारी विचार नष्ट करण्याचे आव्हान मोठे आहे. आपल्याला जिथे जमेल, जसे जमेल तशा पद्धतीने हा विचार खोडून काढण्यासाठी, हा विखार नष्ट करण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. ही विषवल्ली ठेचून काढण्यात सर्वाधिक जबाबदारी सरकारची आहे. इतकी वर्षे जाणत्या राजांचेच राज्य होते. आता मात्र, अशा विखारी विचारांच्या लोकांचा देवेंद्र फडणवीस सरकारने चोख बंदोबस्त करावा, ही आमची आग्रहाची विनंती आहे.



जाता जाता एकच गोष्ट सांगतो. परवा एका छोटेखानी कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अगदी थोडक्यात पण मार्मिकपणे बाबासाहेब बोलले. ते म्हणाले, ‘परिस्थिती सर्वांना माहिती आहे. जे आहे ते सगळं तुमच्यासमोर आहे. जास्त बोलत नाही. एकच सांगतो, दुसऱ्याची रेघ छोटी करण्यासाठी स्वतःची रेघ मोठी करावी लागते. स्वतःची रेघ मोठी करा, म्हणजे दुसऱ्याची रेघ आपोआप छोटी होईल.’ 

वयाची ७० वर्षे इतिहासाची अखंड तपश्चर्या करून आखलेली रेघ छोटी करण्यासाठी दुसरी मोठी रेघ ओढण्याचे सामर्थ्य ना तुमच्यात आहे ना तुमच्या पुढील पिढ्यांमध्ये आहे. कारण फक्त आरक्षण मागून स्वतःची रेघ मोठी होत नाही. जाळपोळ, फोडाफोडी नि आकांडतांडव करून आपली रेघ मोठी होत नाही. टीव्हीवरच्या चर्चांमध्ये शिरा ताणून आणि आवाज चढवून आपली रेघ मोठी होत नाही. त्यासाठी आयुष्य खर्ची घालावं लागतं. हजारो-लाखो ग्रंथ आणि दस्तऐवज हाताखालून घालावे लागतात. देशोदेशीच्या भाषा अवगत करून घ्याव्या लागतात. प्रसंगी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवून संसार करावा लागतो. बाबासाहेबांनी ही कठोर तपश्चर्या यशस्वीपणे पूर्ण केली म्हणून ते आज इथं आहेत. त्या तपश्चर्येतील त लिहायचीही तुमची लायकी नाही, हे ध्यानात असू द्या…

संबंधित ब्लॉग...
ब्राह्मण समाजाचे नामोनिशाण मिटवा

Thursday, July 09, 2015

सर भेटले, जुने दिवस आठवले

नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी...


नोव्हेंबर १९९५… भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आली होती. त्याच दोन-तीन दिवसांमध्ये एका संध्याकाळी एस. पी. कॉलेजवर भाजपच्या नेत्यांची एकत्रित जाहीर सभा होती. अटलबिहारी वाजपेयी नि लालकृष्ण अडवाणी यांना एकत्र ऐकण्याची संधी तशी दुर्मिळच. तीही पुण्यात. तेव्हा आवर्जून त्या सभेला उपस्थित होतो. शिवाय सुषमा स्वराज, प्रमोद महाजन आणि भाजपची अनेक ज्येष्ठ नेते मंडळी पुण्यात आली होती. त्यांची भाषणं काही लक्षात नाहीत. पण वाजपेयी नेहमीप्रमाणेच सुंदर बोलले होते. तेव्हा फारसे थकलेही नव्हते. त्यांना भेट दिलेली तलवार उपसून बाहेर काढणारे वाजपेयी, असं फारच कॉन्ट्रास्ट चित्र त्यावेळी पहायला मिळालं होतं. (मी जर चुकत नसेन तर मित्रवर्य रवी पत्की यांनी त्याची फ्रेम घरी करून लावली होती.) 

‘दिवा विझण्यापूर्वी मोठा होतो. तसंच काँग्रेस सरकारचं आहे. हा दिवा आज ना उद्या विझणारच आहे,’ असं मार्मिक भाष्य अटलजींनी त्यावेळी केलं होतं. त्यानुसार काँग्रेसचा दिवा विझला नि भाजपची ‘पणती’ १३ दिवसांसाठी प्रज्वलित झाली. अर्थात, तेरा दिवसांतच ती पण विझली. मात्र, त्या तेरा दिवसांमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांना झालेला आनंद काकणभर अधिकच संस्मरणीय होता. कारण सर्वांचे लाडके अटलजी पंतप्रधान झाले होते. असो… तो विषय वेगळा. तर अटलजींचे भाषण संपले आणि मंडळी ‘एसपी’तून बाहेर पडू लागली. त्यावेळी पहिल्यांदा विकास मधुकर मठकरी या व्यक्तीचे दर्शन झाले. अर्थात, तेव्हा ते फक्त दिसले. ओळख मात्र, झाली नाही. 


आमचे मित्रवर्य आणि तेव्हाचे वॉर्डातील भाजपच्या युवा कार्यकर्त्यांचे मोहोळ जमविणारे सन्माननीय रवी व्यंकटेश पत्की यांनी दाखविले… ‘तो बघ विकास मठकरी. आपल्या वॉर्डाचा भाजपचा अध्यक्ष आहे. ‘अभाविप’चा पूर्णवेळ होता. आसाम आणि ईशान्य भारत, कुठल्या कुठल्या यात्रा वगैरेमध्ये सहभागी झाला होता. इइ…’ माहिती सन्माननीय रवी पत्की यांनी पुरविली. मठकरी या माणसाचं नाव माझ्या कानावर पहिल्यांदा पडलं. जीनची पँट, खादीचा शर्ट आणि पायात स्पोर्ट्स शूज. अजूनही मला तो पेहराव आठवतोय. पुढंही अनेकदा त्यांचा हाच पेहराव असायचा. तेव्हा सरांची राजदूत होती आय थिंक. कोणत्याही इतर मोटरसायकलपेक्षा जरा अधिकच फटफट आवाज करीत राजदूत निघायची. पुढे आणखी काही वर्षे तीच राजदूत ते वापरत होते. नमस्कार, मी विकास मधुकर मठकरी… ही त्यांची ओळख करून द्यायची ष्टाइल. हे शब्द अजूनही कानात आहेत.

नंतर मग परिसरातील संघशाखा भरणाऱ्या मैदानावर (संघाच्या भाषेत संघस्थानावर) स्थानिक नगरसेविकेनं गंडांतर आणण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्या नगरसेविकेला हैराण करून सोडण्याचे काम विकास मठकरी आणि दुसरे परममित्र धीरज घाटे या दोघांनी केलं होतं. ‘अटक्यात लोटकं, लोटक्यात दही… मैदानं लाटत चालली बाई’ किंवा ‘मुलांच्या जीवाशी खेळू नका, खेळाचं मैदान गिळू नका’ अशा घोषणा असो, घराघरांत पत्रक वाटणं असो, रस्त्यावर उभं राहून स्वाक्षरी मोहीम राबविणं असो किंवा इतर पर्याय असो. काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडून संबंधित नगरसेविकेला कानपिचक्या मिळतील, अशीही व्यवस्था करण्यात आली होती. अखेरीस ते मैदान वाचलं आणि ‘संघाच्या नादाला लागू नका,’ असा इशारा संबंधित नगरसेविकेला वरिष्ठांनी दिल्याचंही समजलं.


मला वाटतं विकास मठकरी आणि धीरज घाटे या दोघांनी आक्रमकपणे रस्त्यावर उतरून यशस्वी केलेलं ते पहिलं आंदोलन असावं. त्यानंतर मग विकास मठकरी यांची सातत्यानं भेट होऊ लागली. चहा पिता पिता गप्पा होऊ लागल्या. त्यांच्या घरी या ना त्या निमित्तानं जाणं-येणं होऊ लागलं. तेव्हा ते अंकुश काकडे यांच्या शेजारच्या इमारतीत रहायचे. आमच्या वॉर्डाचे भाजपचे अध्यक्ष हीच त्यांची ओळख होती. नगरसेवकपदासाठी उभे राहणार, एवढीच चर्चा होती. पण नगरसेवक नव्हते. विकास मठकरी या नावानं त्यांना आम्ही कधीच बोलावलं नाही. आमच्यासाठी ते कायमच मास्तर किंवा सर राहिले. सरांबद्दलची आणखी एक आठवण म्हणजे त्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा मटण खाल्लं होतं. नवी पेठेतल्याच कुठल्याशा गच्चीवर कार्यक्रम झाला होता. नीटसं आठवत नाही, पण कदाचित सरांच्याच गच्चीवर झाला होता.

सरांनी पहिली निवडणूक लढविली १९९७ साली. गोपाळ तिवारी यांच्याविरोधात. जोरदार प्रचार करून त्यांनी गोपाळदादांना घाम फोडला होता. इतके प्रयत्न करूनही मठकरी मास्तर पडणार, असाच होरा होता. मात्र, सर ठाम होते. ‘आशिष, मी जिंकणार. एक मतानं का होईना पण मी जिंकणार,’ हा सरांचा ठाम विश्वास होता. ‘उमेदवार झक्कास, मठकरी विकास’ असं सांगत कार्यकर्ते आख्ख्या वॉर्डभर हिंडत होते. पण गोपाळ तिवारी यांनी मतदारसंघ उत्तम बांधला होता. अखेरीस झालंही तसंच तेरा की चौदा मतांनी सर जिंकले आणि नगरसेवक झाले. नंतर सलग तीनवेळा निवडणूक जिंकले. मात्र, प्रत्येक वेळी त्यांना अडचणींचा सामना करावा लागला. अगदी सहजपणे काहीच हातात पडलं नाही. 



सरांची दुसरी टर्म त्याच भागातून होती. पण तेव्हा वॉर्डाचा प्रभाग झाला होता. त्या प्रभागात सर्वाधिक मताधिक्य त्यांचंच होतं. तेव्हा मी ‘केसरी’त बातमीदारी करीत होतो. काही महिने महापालिका बीटही होतं. तेव्हा त्यांची महापालिकेत भेट व्हायची. मात्र, नंतर मी ई टीव्हीत गेलो आणि संपर्क तुटला. तिसरी टर्म वेगळ्या मतदारसंघातून होती.

२००७ मध्ये बीएमसीसीच्या वॉर्डातून निवडणूक लढविण्याची संधी त्यांना मिळाली. तेव्हाही दोन दिग्गजांचे तिकिट कापून त्यांना उमेदवारी बहाल करण्यात आली होती. तेव्हा निवडणूक काळात कर्वे रोडच्या गिरीजात सरांची एकदा भेट झाली होती. तेव्हाही प्रचंड आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आणि देहबोलीत होता. ‘आशिष, मी जिंकणार रे.’ कुठे काय यंत्रणा लावलीय, कसे प्रयत्न चालू आहेत आणि कसे प्रयत्न चाललेत सगळं सविस्तर सांगून टाकलं. सर तिथूनही जिंकले आणि नगरसेवकपदाची हॅट्ट्रिक झाली. 

सर त्याच सुमारास ते बीएमसीसी कॉलेजच्या परिसरात रहायला गेले आणि आमच्या गाठीभेटी कमी झाल्या. क्वचित कधीतरी त्यांचा फोन यायचा. बातमी किंवा लेख वाचला, असं सांगायला येणारे फोनच अधिक. मी कधीतरीच त्यांना फोन करायचो. धीरजच्या कुठल्याशा कार्यक्रमात, कुठल्याशा सभा किंवा जाहीर कार्यक्रमात त्यांची भेट व्हायची. काय चाललंय, सध्या कुठे वगैरे विचारपूस व्हायची इतकंच. पुढे २००९ मध्ये त्यांचे लोकसभेसाठी प्रयत्न सुरू होते. नंतर विधानसभेला शिवाजीनगरमधून लढले. त्यावेळी मी साम मराठीत होतो. तेव्हा फोनवरून गप्पा व्हायच्या.


हे आता आठवण्याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वीच विकास मठकरी उर्फ मास्तर उर्फ सरांची कोथरूडमधल्या त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली. एका दिवशी सकाळी त्यांचा मला फोन आला आणि म्हणाले, की आशिष, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा… मी चाट पडलो. कारण त्या दिवशी वाढदिवस नव्हताच. सरांना धन्यवाद दिले आणि सांगितलं, की अहो आज माझा वाढदिवस नाहीये. त्यांच्याकडे चुकून त्या दिवशी माझा वाढदिवस अशी नोंद झाली होती. बाकी गप्पाटप्पा झाल्या. मला म्हटले, ‘अरे, आशिष किती दिवस झाले आपण भेटलो नाही. आता माझा उपयोग नाही, म्हणून भेटणं किंवा फोन करणं बंद करायचं का?’ 

बापरे, त्यांचं हे वाक्य मला खूप लागलं. अर्थात, जेव्हा ते चांगले होते. राजकारणात सक्रिय होते, तेव्हाही त्यांचं माझं भेटणं अगदी नैमित्तिक होतं. कामासाठी वगैरे तर नाहीच नाही. पण तरीही मला ते वाक्य ऐकून मनाला खूप वाईट वाटलं. सगळे लोक ‘उगवत्या सूर्याला नमस्कार’ करणारेच असतात. आज मठकरींकडे काही नाही, म्हणून आपण त्यांना फोन करत नाही किंवा भेटत नाही, असं वाटायला नको म्हणून त्यांना म्हटलं, ‘सर, अहो असं काही नाही. तुम्ही सांगा कधी भेटायचं. मी त्यादिवशी येतो भेटायला. वाटलं तर रवीला पण घेऊन येतो.’ ‘आज संध्याकाळी ये पाचनंतर मी मोकळा आहे.’ सरांनी फर्मान काढले. तुम्ही म्हणाल तेव्हा येतो, म्हटल्यामुळं मला पर्यायच नव्हता. त्यामुळं संध्याकाळी सव्वा पाच वाजता सरांच्या कोथरूडमधल्या निवासस्थानी पोहोचलो.


दीडएक वर्षांपूर्वी सरांना अर्धांगवायूचा त्रास झाला आणि खाटकन एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. उज्ज्वल राजकीय कारकिर्दीला ब्रेक लागला होता. अॅडमिट झाल्यानंतर वेगवेगळ्या बातम्या वाचनात यायच्या. त्यांनी हॉस्पिटलमध्ये भाजपच्या शहर कार्यकारिणीची बैठक घेतल्याचंही कळलं होतं. प्रकृतीत हळूहळू सुधारणा होते आहे, असं कानावर यायचं. नंतर दोन-तीनदा फोनवर बोलणंही झालं. विशेषतः निवडणुकीच्या काळात. तेव्हा ते रामदेव बाबांच्या आश्रमात उपचार घेत होते. मास्तर, वैशालीत येऊन गेले, भाजपच्या कार्यालयात त्यांनी उपस्थिती लावली, असंही अधनंमधनं कळायचं. धीरज मध्यंतरी सरांना टिळक टँकवर जाऊन भेटला होता. तिथले फोटोही त्यानं फेसबुकावर टाकले होते. एक-दोनदा सार्वजनिक कार्यक्रमात त्यांची भेटही झाली. पण निवांत गप्पा झाल्या नव्हत्या. त्या मारण्यासाठीच कोथरूडमधलं घर गाठलं. 

सर एकदम मस्त मूडमध्ये होते. पुतण्याकडून ‘शिवांबू’चे फायदे आणि शरीरावर होणारे शास्त्रीय परिणाम समजावून घेत होते. सध्या ‘शिवांबू’ची ट्रीटमेंट सुरू केलीय. ‘शिबांवू’ प्राशन, शिवांबूपासून मसाज वगैरे गोष्टी अगदी उत्साहानं सांगत होतं. शिवांबू प्राशन करण्याच्या कालावधीत काय खायचं आणि काय नाही खायचं, याचे स्पष्ट उल्लेख आयुर्वेदात आहेत, असं सांगत होते. शिवांबू घ्यायला लागल्यापासून खूप फरक जाणवतोय, असंही म्हणत होते. इतर पथ्य नि उपचार पद्धतींबद्दल सांगत होते. दिवसभर काय करतो, किती चालतो, याची माहिती देत होते. पूर्वी रोज दहा-बारा किलोमीटर सहज चालणं व्हायचं. सायकलिंग व्हायचं. पक्षाच्या बैठकीला एखाद्या मतदारसंघात गेलो तर तिथून चालतच घरी यायचो. अगदी वडगांव शेरीतूनही घरी चालत आलोय, असं हसत हसत सांगत होते. मी इतका फिट होतो… पण त्यादिवशी ढोलाचं टिपरू लागलं आणि मग पुढचं सगळं रामायण घडलं, हे सांगताना त्यांचा चेहरा पाहवत नव्हता.


पण इतकं सगळं असूनही पुन्हा एकदा नव्यानं मैदानात उतरण्याची जिद्द त्यांच्या बोलण्यात होती. नजरेत होती. सरांच्या या गोष्टीचं मला कायम अप्रूप वाटतं. त्यांच्यामध्ये असलेली लढण्याची प्रचंड जिद्द, दुर्दम्य आत्मविश्वास आणि पुन्हा एकदा पूर्वीसारखं राजकारणात उतरण्यासाठी चाललेली धडपड. एखादा असता तर खचलाच असता. गपचूप शिकविण्याचे काम करून सर्वसामान्य प्राध्यापकाचे जीवन जगण्यात धन्यता मानली असती. पण सहजपणे हार मानतील किंवा परिस्थितीला शरण जातील, ते सर कसले. या अतिअत्यंत प्रतिकूल परिस्थितीही त्यांना ‘फिनिक्स’ पक्षाप्रमाणे भरारी घ्यायची आहे. पुन्हा एकदा राजकारणात जायचं आहे. काही जणांना हे अवास्तव किंवा निरर्थक वाटू शकतं. पण मला मात्र, त्यांची लढाऊ वृत्ती यातून दिसते.

मास्तरांची लढाऊ वृत्ती अनेक निवडणुकांमधून दिसलीय. गोपाळ तिवारींविरोधात दिसलीय. अनिल शिरोळे यांच्याशी असलेल्या सुप्त संघर्षाच्या प्रसंगी दिसलीय. गोपीनाथ मुंडे यांनी कोत्या मनाने त्यांच्यावर टाकलेल्या बहिष्काराच्या प्रसंगी दिसलीय. खडकवासला भाजपकडे खेचून आणताना दिसलीय. गणेश बिडकर यांना स्थायी समिती अध्यक्ष करताना दिसलीय. पक्षांतर्गत विरोधकांना पुरून उरतानाही दिसलीय. सरांचा तो संघर्ष आजही सुरूय. आधी तो पक्षांतर्गत विरोधकांशी होता. विरोधी पक्षातल्या लोकांशी होता. आज तो परिस्थितीशी नि नियतीशी सुरू आहे.



पुण्या-मुंबईत झालेल्या उपाचारांनंतर त्यांनी उत्तराखंडमध्ये रामदेव बाबांचा आश्रम गाठला. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने रामदेव बाबांकडे शब्द टाकला. ‘हा माझा माणूस आहे. हा खणखणीत व्हायलाच पाहिजे. तुम्ही स्वतः लक्ष घाला.’ रामेदवबाबांचे उपचार आणि प्रचंड पथ्य यामुळे माझ्या प्रकृतीत खूप सुधारणा झाली, असं सर स्वतः सांगतात. अनेक पद्धतीचे उपचार, अनेक प्रकारचे व्यायाम, मालिश आणि इतर पूरक औषधांमुळे सध्या मी ७० टक्के बरा झालो आहे. लवकरच उर्वरित तीस टक्के बरा होईन, हे त्यांच्या बोलण्यातून अनेकदा ऐकायला मिळत होतं. 

कोणाचीही मदत न घेता सर स्वतः स्वतःचे चालत होते. स्वतःची काम स्वतः करत होते. मध्यंतरी पदवीधर मतदारसंघातील चंद्रकांतदादा पाटलांच्या विजयानिमित्त श्रमपरिहाराचे आयोजन करण्यात आले होते. तिथं सरांची भेट झाली होती. कुठल्याशा मिळालेल्या पत्रकाची त्यांनी स्वतः घडी घातली. एक हात आणि दात यांचा वापर करून घडी घातली नि पत्रक खिशात ठेवलं. खाली पडलेलं पत्रक स्वतः उचललं, कोणाच्याही आधाराविना स्वतः उठून उभे राहिले. उभं राहण्यासाठी दिलेला मदतीचा हात त्यांनी अत्यंत विनम्रपणे नाकारला. अशी स्वाभिमानी आणि स्वावलंबी वृत्ती तेव्हाही जाणवत होती. त्या तुलनेत परवा भेट झाली तेव्हा सरांची प्रकृती खूपच उत्तम वाटली. तब्येत खूप सुधारली आहे, हा त्यांचा दावा योग्य वाटत होता. 

पक्षाचं काय चाललंय, आठ आमदार आणि एक खासदार काय म्हणतायेत, कोण कशा पद्धतीनं काम करतंय, लोकांमध्ये आणि पत्रकारांमध्ये पक्षाबद्दल, सरकारबद्दल काय भावना आहे, केंद्र आणि राज्य सरकारबद्दल काय वाटतं? अशा असंख्य प्रश्नांचा भडिमार करत होते. त्यांच्या नसानसांमध्ये फक्त भाजपच ठासून भरलाय, असं पदोपदी जाणवतं होतं. ‘आशिष, माझी संधी हुकली रे…’ हीच त्यांची भावना होती. मागे दोन ते तीनवेळा त्यांनी फोनवर तसं बोलूनही दाखवलं होतं. परवा मात्र, ते थेट तसं बोलले नाहीत. पण भावना व्यक्त होत होती.


पुण्यातील भाजपचा आक्रमक, अभ्यासू आणि धडाकेबाज नगरसेवक आज अशा अवस्थेत आहे, हे पाहून खूपच वाईट वाटतं. एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, अभाविपच्या कामाचा अनुभव (सध्या भाजपमध्ये हा अनुभव सर्वाधिक महत्त्वाचा समजला जातो, अशी माझी ठाम भावना आहे.), मराठीसह हिंदी आणि इंग्रजी या भाषांवर प्रभुत्त्व, तुलनेनं तरूण नि धडाकेबाज असे अनेक नेतृत्व गुण त्यांच्याकडे होते-आहेत. पुण्याचे भावी खासदार किंवा भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. नरेंद्र मोदींच्या लाटेत गावगन्ना मंडळी आमदार-खासदार झाली. विकास मठकरी तर दोन हजार टक्के निवडून आले असते. पण आता ते त्यांच्या नशिबात नव्हते. आपल्याला याबद्दल इतकं वाईट वाटतं, तर स्वतः मठकरींना त्याबद्दल किती वाईट वाटत असेल. 

सरांना म्हटलं, सर तुम्ही बाकी काही विचार करू नका. आधी ठणठणीत व्हा. मस्त पहिल्यासारखे बरे व्हा. नशिबात जे लिहिलं असेल ते कधीच तुमच्यापासून कोणी हिरावून घेणार नाही. मिळणार असेल ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या. पण त्याचा विचार तुम्ही आता करू नका. नंतर ते नक्की मिळेल, यावर विश्वास ठेवा. त्यांनाही ते पटलं. पण आता मिळालं नाही, याचं दुःख त्यांना होतं. 

शिवाजीनगर मतदारसंघात पुन्हा एकदा फिरायचंय. जनसंपर्क अभियान राबवायचंय, असं म्हणत होते. अधूनमधून कार्यकर्त्यांचे एक-दोन फोनही येऊन गेले. आमच्या गप्पा सुरू असतानाच नारायण पेठेतील सरांचा (म्हणजेच पक्षाचाही जुनाच) कार्यकर्ता बिपीनही (आडनाव आठवत नाही आत्ता!) आला होता. कोथरुड मतदारसंघातील भाजपचे उपाध्यक्ष की चिटणीस होते, ते देखील सरांना भेटायला आले. ही मंडळी सरांना कायम भेटायला येत असावी. म्हणजे तसं त्यांच्या बोलण्यावरून जाणवत होतं. 


आधीही म्हटल्याप्रमाणे हल्लीचा जमाना हा ‘उगवत्या सूर्याला’ नमस्कार करणाऱ्यांचा आहे. राजकारणात तर दररोज नवे सूर्य उगवतात नि मावळतात. पण मला वाटतं, सर तुम्ही आता याचा अजिबात विचार करू नका. तुम्ही तुमच्या प्रकृतीची काळजी घ्या. तुम्हाला तुमच्या नशिबात आहे, ते नक्की मिळणार. आज नाही तर उद्या हमखास मिळणार. सुदैवाने तुम्ही ज्या पक्षात आहात, तो पक्ष कार्यकर्त्यांना न्याय देणारा आहे. तेव्हा तुम्हाला न्याय नक्की मिळेल. आणि जेव्हा मिळेल तेव्हा आतापर्यंतचा बॅकलॉग भरून निघेल इतकं मिळेल. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला…

तेव्हा लवकर बरे व्हा. तंदुरुस्त रहा…

तुमचे आरोग्य उत्तम राहो, हीच प्रार्थना.

Saturday, March 28, 2015

अॅथलिट्स ओन कंट्री… केरळ

अॅथलेटिक्स हा जीव की प्राण...

गुवाहाटी येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गेलो होतो तेव्हा केरळच्या अॅथलेटिक्स प्रेमाबद्दल बरीच माहिती मिळाली होती. केरळमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा नक्की कव्हर करायच्या, हे तेव्हाच ठरविलं होतं. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यात केरळमध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी तिथं गेलो होतो. कव्हर करायला नाही, पण आनंद लुटायला…


राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला महिन्याभराचा कालावधी उलटल्यानंतर हा ब्लॉग का, असा प्रश्न सर्वांच्याच मनात येऊ शकतो. मात्र, हा ब्लॉग राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबद्दल नाही. शिवाय क्रिकेटच्या फिव्हरमध्ये ब्लॉग लिहिण्यात मलाही रस नव्हता. म्हणूनच सर्वकाही संपल्यानंतर मुद्दाम ब्लॉग लिहित आहे.
‘गॉड्स ओन कंट्री’ ही केरळची खरी ओळख. तेच केरळ अॅथलिट्सची खाण आहे. भारतातील बहुतांश नावाजलेले अॅथलिट्स ही केरळची देण आहे. अगदी जुन्या काळातील टी. सी. योहोन्नन आणि सुरेश बाबू, माझ्या पिढीला माहिती असलेले पी. टी. उषा आणि शायनी विल्सन, अलिकडच्या काळातील के. एम. बीनामोल, टिंटू लुका, अंजू बॉबी जॉर्ज, प्रीजा श्रीधरन, रेंजित माहेश्वरी आणि ओ. पी. जैशा ही केरळची देण. नावं अजूनही निघतील. मात्र, ही अगदी पटकन सुचलेली आणि मिळालेली.
केरळमध्ये उद्योगधंद्यांची वानवा. इथला मुख्य उद्योग म्हणजे पर्यटन आणि पर्यटनाच्या अनुषंगानं चालत येणारे काही पूरक उद्योग. बाकी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारे उद्योग केरळमध्ये नाही. त्यामुळंच कदाचित देशभरात आणि परदेशात (विशेषतः मध्यपूर्वेला) मल्याळी मंडळी कामासाठी स्थलांतर करत असतात. 

तिथं राहणाऱ्या लोकांनाही रोजगाराची विशेष उपलब्धता नाही. त्यामुळंच खेड्यापाड्यातील मुलं आणि मुली क्रीडापटू होण्याची मनिषा बाळगतात. केरळच्या छोट्या छोट्या गावांमध्ये राहणाऱ्या या मंडळींना प्रचंड चालण्याची, वेगाने पळण्याची नि डोंगरदऱ्यांमध्ये सहजपणे वावरण्याची सवय असते. ही मंडळी काटक असतात. शारिरीक मजबुती ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरते. खेडोपाड्यातील मुला-मुलींना लहानपणापासूनच खूप चालण्याची किंवा धावण्याची सवय असते. शाळेत जाण्यासाठी त्यांना अनेकदा पाच-सात किलोमीटरची पायपीट करावी लागते. कमीत कमी. अधिकाधिक दिवसाकाठी पंधरा-सोळा किलोमीटरही. त्यामुळं शारिरीक कष्टांची त्यांना सवय झालेली असते. शिवाय अॅथलिट म्हणून जर उत्तम करियर झालं, तर केरळ सरकार किंवा केंद्र सरकारमध्ये नोकरी मिळेल आणि आयुष्याचा रोजगाराचा प्रश्न सुटेल, असा दुसरा हेतूही त्यांच्या मनात असतो. केरळमधून सर्वाधिक अॅथलिट निर्माण होण्याचं ही दोन मुख्य कारणं आहेत.


आणि ही लोकं अॅथलेटिक्ससाठी किती करतात. ऐकाल-वाचाल तर थक्क व्हाल. केरळमध्ये शाळांनी घेतलेल्या मेहनतीमुळे, लोकांच्या प्रेमामुळे, माध्यमांनी केलेल्या वार्तांकनामुळे नि सरकारी मदतीमुळे अॅथलिट घडतात. त्यांच्या घडण्यामध्ये या सर्वांचा महत्त्वाचा वाटा असतो. त्यामुळंच अॅथलिट घडविणं आणि त्यांना सांभाळणं ही आख्ख्या केरळची जबाबदारी असते, असं तिथं गमतीनं म्हटलं जातं. 

शालेय स्तरावरील स्पर्धांमध्ये भविष्यात चकमू शकणारे अॅथलिट्स वेचले जातात. राज्यस्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा ही केरळवासियांसाठी आणि अॅथलेटिक्स प्रेमींसाठी पर्वणी असते. इतर ठिकाणी स्थानिक पातळीवरील क्रिकेट सामन्यांना नसेल त्यापेक्षा कितीतरी पटीनं अधिक गर्दी आंतरशालेय क्रीडा स्पर्धांना असते. शाळांमधील क्रीडा शिक्षक तसेच इतर प्रमुख शिक्षकही स्पर्धांना आवर्जून उपस्थित असतात. स्थानिक वृत्तपत्रांमध्ये स्पर्धेच्या कालावधीत दोन विशेष पाने प्रसिद्ध होतात. त्यामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची माहिती, त्यांच्या घरगुती पार्श्वभूमी, सर्व स्पर्धांचे निकाल असे विस्तृत वार्तांकन करण्यात येते. अनेक न्यूज चॅनल्सवरून आंतरशालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असते. गुवाहाटीमध्ये मल्याळी माध्यमांचे जवळपास वीस ते पंचवीस प्रतिनिधी उपस्थित होते. गुवाहाटी आणि केरळात मराठी माध्यमांचे प्रतिनिधी किती? पाचच्या आत.

  (ओ. पी. जैशा आणि प्रिजा श्रीधरन.)
ही माहिती वाचून काही संस्था, कंपन्या किंवा सामाजिक संघटना छोट्या अॅथलिट्सना दत्तक घेतात. काही जण त्यांच्या खर्चाचा काही हिस्सा उचलतात. सर्वोत्तम खेळाडूंना आपल्या शाळेत ओढण्यासाठी शाळांमध्येही स्पर्धा असते. उदाहरणच द्यायचे तर एर्णाकुलम जिल्ह्यातील कोथमंगलम या ठिकाणी असलेल्या सेंट जॉर्ज आणि मार बॅसिल या दोन शाळांमध्ये खेळाडू आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी विशेष चुरस असते. या शाळांचे मुख्याध्यापक आणि ट्रस्टी वगैरे मंडळी चांगल्या कामगिरी करणाऱ्या खेळाडूंच्या पालकांशी संपर्क करतात, त्यांच्याशी संवाद साधतात, त्यांना काय सुविधा देणार याची जंत्रीच सादर करतात. त्यांच्या राहण्याचा, खाण्या-पिण्याचा, शिक्षणाचा, ट्रेनिंगचा आणि सर्व खर्च ही शाळांची जबाबदारी असते. अशा पद्धतीने ही मंडळी चांगल्या अथॅलिट्सना आपल्या शाळेमध्ये खेचून आणतात आणि त्यांना ट्रेन करतात.

हा झाला एक भाग. शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरावर पास झाल्यानंतर किंवा ते शिक्षण घेत असतानाच हे अॅथलिट्स राज्य सरकारच्या किंवा खासगी अकादमींमध्ये दाखल होतात. केरळमध्ये जवळपास प्रत्येक जिल्ह्यात क्रीडा अकादमी आहे. मुख्य म्हणजे ती सुस्थितीत आहे. अनेक खासगी अकादमीही आहेत. स्प्रिंट (धावपटूंसाठी), थ्रो (गोळा, हातोडा आणि भालाफेक) आणि जम्प (लांब, उंच आणि बांबूउडी) अशा वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांसाठी स्वतंत्र अकादमी आहेत. पी. टी. उषाची स्वतंत्र अकादमी आहे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत १० हजार मीटरची स्पर्धा विजेती ओ. पी. जैशा ही तिच्याच अकादमीची अॅथलिट आहे.


इतकं करून हे लोक स्वस्थ बसत नाहीत. जिथं जिथं अॅथलेटिक्सच्या स्पर्धा होतात तिथं तिथं ही चाहते मंडळी आवर्जून उपस्थिती लावतात. खेळाडूंना प्रोत्साहन देतात. अॅथलेटिक्स फॉलो करतात. त्यामुळं खेळाडू आणि अॅथलेटिक्स चाहते यांच्यात एक वेगळंच नातं निर्माण झालेलं असतं. अनेक चाहत्यांना खेळाडू अगदी पहिल्या नावानं ओळखत असतात. चाहते आणि अॅथलिट यांच्यातील हेच आगळवेगळं नातं केरळमधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत अगदी जवळून पहायला मिळालं. अनुभवायला मिळालं.

स्पर्धेतील केरळच्या अॅथलिटला इतकं प्रोत्साहन देतील की विचारू नका. प्रत्येक सुवर्णपदक आणि प्रत्येक पदक केरळच्या खेळाडूनेच जिंकले पाहिजे, अशी त्यांची अपेक्षा असावी. धावण्याच्या स्पर्धेत केरळच्या अॅथलिटने आघाडी घेतली की मग विचारूच नका. आरडाओरडा, त्याच्या नावानं प्रोत्साहन, शिट्ट्या, घोषणा आणि मेक्सिकन व्हेव्ज तयार करण्याचा प्रयत्न… काय करतील भरवसा नाही. माध्यम प्रतिनिधींचीही सुवर्णपदक आणि चांगली कामगिरी बजाविणाऱ्या अॅथलिट्सच्या विशेष मुलाखती नि बाइट्ससाठी धावपळ. एक्सक्लुझिव्हसाठी पळापळ. प्रत्येक दिवसानंतर तासाभराचा स्पेशल प्रोग्रॅम. त्यामध्ये थेट स्टेडियमवरून खेळाडू, माजी खेळाडू लाइव्ह आणि बरंच काही. अॅथलेटिक्स हे केरळमधील लोकांच्या नसानसात भिनलंय, असं म्हणायला हरकत नाही.

स्पर्धा संपल्यानंतर काही वेळ ट्रॅकवर होतो तेव्हा खेळाडू आणि पत्रकार तसेच खेळाडू आणि चाहते यांच्यातील निकटचं नातं पहायला मिळालं. पी. टी. उषा, शायनी विल्सन-अब्राहम, अंजू बॉबी जॉर्ज आणि तेव्हा नुकतीच निवृ्त्त झालेली प्रिजा श्रीधरन यांच्यासोबत छबी टिपण्यासाठी आणि त्यांच्याशी हस्तांदोलन करण्यासाठी अक्षरशः रांग लागली होती. सर्वाधिक लोकप्रिय अर्थातच, पायोली एक्स्प्रेस अर्थात, पीटी उषा. जवळपास दीड तास तिच्यासोबत फोटोसेशन सुरू होतं. 


 
दर दोन मिनिटांनी पाच-सात जणांचा नवा ग्रुप यायचा, कुटुंब यायचं आणि फोटो काढून घ्यायचं. मोठी माणसं सोबतच्या लहानग्यांना पीटी उषा म्हणजे नेमकी कोण, हे मल्याळममध्ये समजावून सांगत. काय सांगायचे ते कळत नव्हतं. पण लहानग्यांच्या चेहऱ्यावरचे भाव भारावून गेल्यासारखे असायचे. अनेकांना तर आपण देवासोबत फोटो काढून घेतला किंवा देवाशी हस्तांदोलन केलं, असंच वाटत होतं. अर्थातच, माझी भावना फार काही वेगळी नव्हती. शायनी विल्सन, अंजू बॉबी जॉर्ज आणि प्रिजा श्रीधरन यांच्यासोबत फोटो काढून घेण्यासाठीही लोकांची प्रचंड तारांबळ सुरू होती. 


 
पी. टी. उषाच्या अॅकॅडमीला भेट देण्याची आणि तिच्याशी निवांत गप्पा मारण्याची माझी खूप दिवसांपासूनची इच्छा आहे. भारतीय अॅथलेटिक्समध्ये पी. टी. उषानं केलेली कामगिरी कदाचितच भविष्यात कोणी करू शकेल. आणि केली तरी पीटीचं स्थान कोणीही घेऊ शकणार नाही. त्यामुळंच तिला भेटल्यानंतर मी तशी इच्छा व्यक्त केली. ‘अरे, आपण जरूर या. फक्त फोन करून मी आहे किंवा नाही, ते पाहून या. म्हणजे चुकामूक होणार नाही,’ असं निमंत्रण तिनं दिलं. जायचं निश्चित आहे. फक्त कधी आणि कसं ते पाहू. पण पीटी उषाशी संवाद साधून झाल्यानंतर मग थोडी टंगळ मंगळ करून मी स्टेडियममधून बाहेर पडलो.

तिरुवनंतपुरममध्ये ‘मी मराठी’
फोटोसेशन आणि गप्पा सुरू असतानाच एक फोन आला. फोनवर मराठी बोलणं ऐकून दोन तरुण माझ्याकडे ‘अरे, हा कोण इथं मराठीतून बोलतोय,’ असे भाव करून पहायला लागले. मला आधी वाटलं की खेळाडू किंवा प्रशिक्षक असतील. स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून  आलेले कोणीतरी. पण ते दोघे भलतेच निघाले आणि त्यांची भेट वेगळी माहिती देऊन गेली.

ते दोघे होते सांगलीच्या विटा तालुक्यातील खानापूरचे मालोजी चव्हाण आणि श्रीरंग चव्हाण. हे दोघे चुलत भाऊ गेल्या बारा वर्षांपासून तिरुवनंतपुरममध्ये आहेत. यांचा व्यवसाय सोनं शुद्ध करण्याचा. सोन्याची प्युरिटी तपासण्याचा आणि ते अधिक प्युअर करण्याचा. ‘नायट्रिक अॅसिड’चा वापर करून सोनं शुद्ध केलं जातं. संपूर्ण देशात या पद्धतीनं सोनं प्युअर करणारी मंडळी फक्त मराठीच आहेत आणि ते सर्व विट्यातील खानापूरचेच आहेत, ही नवी माहिती चव्हाण बंधूंकडून मिळाली. 



मालोजी आणि श्रीरंग यांचे चुलते मनोज चव्हाण हे १९८२ पासून तिरुवनंतपुरममध्ये आहेत. तिथं जवळपास १०० ते १२५ मराठी कुटुंब या व्यवसायात आहेत. तिथं त्यांनी दुकान थाटली आहेत आणि व्यवसायात चांगला जम बसविला आहे. श्रीरंग आणि मालोजी चव्हाण हे उत्तम मल्याळम बोलतात. वाचतात आणि लिहितातही. कारण सगळा व्यवसाय त्याच भाषेतून होतो. मल्याळम शिकायला त्यांना तीन वर्षे लागली. ‘मराठी माणूस जिथं जाईल, तिथला होऊन जातो. स्वतःचं वेगळेपण मुद्दामून दाखवून देत नाही,’ या म्हणण्याला पुन्हा एकदा पुष्टी मिळाली. 

सिद्धिनाथ गोल्ड रिफायनरी (एस एस ज्वेलरी वर्क्स) या नावानं त्यांनी तिथं दुकान थाटलं. छान व्यवसाय सुरूय. मला दुसऱ्या दिवशी पहाटेच निघायचं असल्यानं मला त्यांच्या दुकानाला भेट देता आली नाही. पुढच्या वेळी याल तेव्हा जरूर भेट द्या, असं आग्रहाचं निमंत्रण त्यांनीही दिलं. पुढच्या वेळी नक्की येतो, असं आश्वासन देऊन स्टेडियमला रामराम केला.

अॅथलिट बनल्या पत्रकार…
तिरुवनंतपुरमच्या प्रेसक्लबनं माध्यमकर्मींची उत्तम व्यवस्था केली होती. त्यांना वेळेत सर्व माहिती मिळेल, त्यांचं आदरातिथ्य उत्तम असेल अशी सर्व व्यवस्था प्रेसक्लबचे सदस्य आणि शिकाऊ पत्रकार यांनी चांगल्या पद्धतीनं पार पाडली होती. तिथं दोन-तीन युवा पत्रकार भेटल्या. इंटरनॅशनल अॅथलिट ज्युबी पिल्ले आणि स्वाती प्रभा. स्वाती प्रभा ही पी. टी. उषाच्या अकादमीमधून तयार झालेली. ज्युबी ही वायनाडची. कन्नूर स्पोर्ट्स अकादमीतून बाहेर पडलेली. तिघींमधील समानता आणि वैशिष्ट्य म्हणजे या तिघीही राष्ट्रीय स्तरावरच्या अॅथलिट्स. पण रोजगार नसल्यानं त्यांनी स्पोर्ट्स रिपोर्टर म्हणून करियर करण्याचा विचार केलाय. दोघी टीव्ही चॅनल्समध्ये रिपोर्टर आहेत. तर तिसरी (ज्युबी) पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण करतानाच ट्रेनी म्हणून जॉब करतेय. आहे ना गंमत…


ज्युबीशी गप्पा मारताना तिनं एक गमतीशीर गोष्ट सांगितली. तिला विचारलं, ‘कसं वाटतं तुम्हाला केरळकडून खेळताना. अॅथलिट म्हणून वावरताना. इतक लोक सपोर्ट करतात. प्रेम करतात तुमच्यावर. काय भावना असते तुमची…’ तिनं दिलेलं उत्तर मस्त होतं. ती म्हणाली, ‘एकदा का तुम्ही केरळ असं लिहिलेली जर्सी अंगावर घातली ना की मग तुम्ही देखील सर्वोत्तम कामगिरीच कराल. केरळची जर्सी घातली की तुम्ही कुठलेही असा, आख्खा केरळ तुमच्या पाठिशी उभा राहील. त्या बळावर तुम्ही नक्कीच नेहमीपेक्षा अधिक चांगली कामगिरी कराल.’