Monday, April 04, 2011

करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला

तमिळनाडूच्या प्रचारातून टू जी गायब


संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या टू जी घोटाळ्यामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या ए. राजा यांच्या तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या महाघोटाळ्याचा साधा उल्लेखही होताना दिसत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांनीही या मुद्द्दायाला हात न घालता थेट करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला चढविला आहे. पावणे दोन लाख कोटींच्या टू जी घोटाळ्यामुळे आम्हाला कुठे काय फरक पडतो, असा उलट सवाल विचारून तमिळ मतदारही हा मु्द्दा निकालात काढत आहेत.

केंद्र सरकारला अडचणीत आणणा-या टू जी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ए. राजा हे सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्शाचे. त्यामुळे द्रमुकला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्शनेत्या जे. जयललिता हा मुद्दा हिरीरीने मांडतील, असा विचार पुण्याहून चेन्नईला येताना मनात आला होता. मात्र, जयललिता नव्हे तर डीएमडीके पक्शाचे नेते विजयकांत यांनी देखील टू जी घोटाळ्याबद्दल ब्र देखील काढला नसून वाढती महागाई, राज्यातील विजेचे संकट आणि करुणानिधी यांच्या कुटुंबीयांची दादागिरी आणि राज्यभरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना या नेहमीच्याच मुद्द्यांभोवती विरोधकांचा प्रचार फिरत आहे.

करुणानिधी आता थकले असून वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांना विश्रांतीची गरज आहे. दुसरीकडे करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन आणि अळगिरी तसेच कन्या कनिमोळी यांच्यामध्ये नेतृत्त्वावरून प्रचंड मतभेद आहेत. हाच मुद्दा जयललिता त्यांच्या भाषणांमधून हायलाईट करीत आहेत. शिवाय जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश होईल, इतकी संपत्ती करुणानिधी कुटुंबाने ओरबाडली आहे, असा आरोप जयललिता करीत आहेत. दुसरीकडे कोईमतूर, सेलम आणि इरोड यासारख्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये रंगाचे कारखाने आणि यंत्रमाग यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना भारनियमनाचा फटका बसत असून हाच मुद्दा जयललिता यांनी लावून धरला आहे. तमिळनाडूच्या दक्शिण भागात द्रमुकच्या अळगिरी यांचे वर्चस्व असून त्यांची दादागिरी आणि तेथील वाढती गुन्हेगारी हे मुद्दे जयललिता यांच्या भाषणांमध्ये प्रामुख्याने येतात.

टू जी स्पेक्ट्रमसारखा महाप्रचंड घोटाळ्याचा मुद्दा हातात असतानाही जयललिता त्याला महत्त्व का देत नाहीत, यावर तमिळनाडूतील वरिष्ठ राजकीय विश्लेषक श्री. मणी म्हणाले, की मुळात टू जी हा घोटाळा तमिळनाडूतील लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. तो घोटाळा म्हणजे नक्की काय झाले आणि त्याचा आपल्याला थेट काय फटका बसणार हे त्यांना समजलेले नाही. अशा परिस्थितीत महागाई, भारनियमन आणि करुणानिधी यांच्या कुटुंबियांचे पटकन नजरेत भरणारे वैभव हे मुद्दे सामान्य नागरिकांच्ा अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. ते मुद्दे पटले तरच लोक मते देतील. टू जीमुळे फारशी मते मिळणार नाहीत, हे जयललिता यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी आणि विजयकांत यांनी हा मुद्दा भाषणांमध्ये काढला नाही.

बॉक्स

द्रमुकचे अध्यक्श एम. करुणानिधी हे त्यांच्या समर्थकांप्रमाणेच तमिळ लोकांमध्ये कलैंग्नार या नावाने ओळखले जातात. कलैंग्नार म्हणजे कलेचे मर्म जाणणारा निष्णात कलावंत. करुणानिधी हे कलैंग्नार नावाने ओळखले जातात तर जयललिता यांचे सुप्रसिद्ध नाव म्हणजे अम्मा. पण अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या पुरच्ची तलैवी या नावाने लोकप्रिय आहेत. पुरच्ची तलैवी म्हणजे क्रांतिकारी महिला नेत्या. जयललिता यांचे राजकीय गुरु एम. जी. रामचंद्रन हे पुरुच्ची तलैवर म्हणून ओळखले जायचे. पुरुच्ची तलैवरचे स्त्रीलिंगी रुप म्हणजे पुरुच्ची तलैवी. त्यामुळे हा सामना कलैंग्नार आणि पुरुच्ची तलैवी यांच्यातच आहे.

आजचा शब्दः अदिरेडी. त्याचा अर्थ खूप मोठा आणि महत्वाचा. विजय या शब्दाशी सुसंगत असलेला आणि वापरला जाणारा तमिळ शब्द. भारताच्या विश्वविजयाचे वर्णन करण्यासाठी दिनकरन आणि दिनमणि वृत्तपत्रांमध्ये हा शब्द वापरलेला आहे.

1 comment:

Ashish Sawant said...

हाय आशिष. आजच तुझा मटा मध्ये लेख वाचला. तेव्हा हे नाव वाचल्यासारखे वाटले होते. पण आठवत नव्हते कुठे? मला वाटले कदाचित असेच पेपर मध्ये वाचले असेल. आता मराठी ब्लोग्स वर तुमचे नाव दिसले.
चांगले आर्टीकल लिहिले आहे.ह्यात जयाललीताचा काही फायदा असल्याशिवाय त्या गप्पा बसणार नाही.