Sunday, June 10, 2012

मुक्काम पोस्ट हरिहरेश्वर

मस्त बंगला, स्वादिष्ट भोजन आणि स्वच्छ बीच

अनेक दिवसांपास्नं हरिहरेश्वरला जायचं होतं, अखेरीस मे महिन्यात तो योग आला. वास्तविक पाहता, आमच्या घरातील मंडळी अनेकदा हरिहरेश्वरला भेट देऊन आलेली आहेत. मात्र, मला कधीच जायला जमलं नव्हतं. माणगांवपर्यंत आम्ही गेलो होतो. पण हरिहरेश्वर राहिलंच होतं. त्यामुळं हरिहरेश्वरबद्दल ऐकलेलं बरंच प्रत्यक्ष पाहण्यासाठी मी आतूर झालो होतो.

माणगांवला गेलो होतो, तेव्हा मी आणि माझा मित्र योगेश ब्रह्मे आम्ही बाईकवर गेलो होतो. त्यामुळं ताम्हिणी घाट वगैरे याबद्दल माहिती होतीच. पण त्यालाही आता बरीच वर्ष उलटल्यामुळं पुन्हा एकदा तो निसर्ग डोळ्यात साठवून घ्यायचा होता. यंदा ‘हम पाँच’ सॅन्ट्रोतनं निघालो. मी, चुलत भाऊ सपत्नीक आणि दोन बहिणी. ताम्हिणी घाटातील जंगल आणि घनदाट हिरवाई कधी एकदा पाहतोय, असं झालं होतं. मुळशी धरणाच्या बॅकवॉटरच्या कडेकडेनं जात होतो. मुळशी किती मोठं आहे आणि किती आटलं आहे, हे प्रथमच पहायला मिळत होतं. पाहता पाहता ताम्हिणी घाटात कधी पोहोचलो कळलंच नाही. पण रस्ता एकदम बकवास. म्हणजे प्रत्येक शंभर मीटरला रस्त्याची अवस्था बदललेली. कधी गुळगुळीत तर कधी एकदम खड्डेमय. त्यामुळं गाडी चालविणं, हा भलताच मनस्ताप होऊन बसला होता. कदाचित टोल भरा नाहीतर असेच भिक्कारडे रस्ते सहन करा, असा संदेशच महाराष्ट्र सरकारला द्यायचा असेल.


ताम्हिणी घाटातील वळणं वळणं, हेअर पिन टर्न्स, भरदुपारी संध्याकाळचं वातावरण वाटावं अशी घनदाट जंगल आणि माथ्यावर पोहोचता क्षणी होणारं कोकणाचं दर्शन सर्व काही भन्नाट. पुणे जिल्ह्याची हद्द संपली आणि रायगड जिल्ह्याची हद्द लागली. तेव्हा रस्ता खूपच गुळगुळीत आणि मस्त असल्याचं जाणवलं. (पालकमंत्री अजित पवार याकडे लक्ष देतील का) घाट उतरायला फारसा वेळ लागला नाही. मग निजामपूर आणि माणगांव मागे टाकून हरिहरेश्वरच्या रस्त्याला लागलो. तरी तिथून ५०-६० किलोमीटर अंतर होतं. पण थोडाफार भाग वगळता सर्व रस्ता वळणावळणांचा असल्यामुळं अंतर कापायला वेळ लागत होता. परत रस्त्याची साथ होतीच असं नाही. खड्ड्यांनी तर वैताग आणला होता. मला सांगा पर्यटन स्थळांकडे जाणारे रस्ते इतके भंगार, मग कोणते पर्यटक बाहेरून महाराष्ट्रात येणार...

असो. कोकणच्या हिरवाईनं मात्र, सरकारच्या निलाजरेपणाला आणि उदासीनतेला कधीच पराभूत केलं होतं. त्यामुळंच खडबडीत रस्त्यांपेक्षाही हिरवकंच कोकणच आम्हाला अधिक लक्षात राहिलं. कोकण म्हणजे काय याचा सुखद अनुभव हरिहरेश्वरच्या रस्त्यावर लागल्यानंतर येऊ लागला. फक्त खंडाळ्याच्याच नव्हे तर कोकणातील प्रत्येक घाटासाठीच या ओळी अगदी शंभर टक्के लागू आहेत.

हिरव्या हिरव्या रंगाची झाडी घनदाट,
सांगवो चेडवा दिसता कसो, खंडाळ्याचो घाट


मजल दरमजल करीत हरिहरेश्वरला पोहोचलो. आमचे बंधू शिरीष चांदोरकर यांचे मामे बंधू यशोधन जोशी यांनी हरिहरेश्वरजवळील मारळ या गावी मस्त दुमजली बंगला बांधला आहे. आठ-दहा गुंठ्यांचा परिसर. त्यापैकी साधारण तीन गुठ्यांवर बांधकाम. खास चिपळूणहून आणलेल्या लाल चिऱ्यांपासून बांधलेला बंगला. बाहेरुन दिसायला अगदी कोकणातील घरासारखा. पण आतून अगदी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये असतील अशा सोयी-सुविधा. दोन बेडरुम, एक हॉल आणि स्वयंपाकघर. अगदी बारीकसारीक विचार केल्याचं बंगल्यात शिरल्यानंतर ठायीठायी दिसतं. बंगल्याच्या मागील बाजूस मस्त बाग. चिक्कू, आंबा, केळी, अननस, करवंद, जांभळ वगैरे सगळा कोकणातील मेवा तिथं पहायला मिळतो. बागेच्या मध्यभागी एक झोपडी बांधलेली. त्यामुळं रात्री शेकोटी करायला किंवा बार्बेक्यू लावून मस्त कबाब वगैरे खायला अगदी उपयुक्त.

अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क...

http://wikimapia.org/11324238/Joshiwadi-Maral-Yashodhan-Suchitra-Joshi-s-beach-house


अर्थात, आम्ही जेवण तयार करण्याच्या भानगडीत आम्ही पडलो नाही. आम्ही मस्त फ्रेश होऊन. मोहन कुटुंबे यांच्याकडे उदरभरणासाठी गेलो. कुटुंबे यांच्याकडे गेलो आणि अगदी तृप्त झालो. अगदी घरी जेवल्याचा आनंद प्रत्येकाच्याच चेहऱ्यावर झळकत होता. घडीच्या पोळया, आमटी-भात, भेंडीची परतून भाजी, मटकीची उसळ, पापड आणि ताक असा अगदी साग्रसंगीत मेन्यू कुटुंबेंनी तयार ठेवला होता. सकाळपासून गाडी चालविल्यामुळं मजबूत भूक लागली होती. त्यामुळं तुडुंब जेवलो आणि मगच पानावरुन उठलो. जेवण झाल्यानंतर कुटुंबे काकांनी उकडीचे मोदक आणि साजूक तूप यांनी भरलेलं ताट आमच्यासमोर आणलं. बोट लावेपर्यंत जेवल्यानंतरही उकडीचे मोदक पाहून कोणालाच राहवलं नाही आणि प्रत्येकानं साधारण दोन-दोन मोदक हाणलेच. त्यामुलं हरिहरेश्वरला गेलात, तर मोहन कुटुंबे यांच्याकडेच जेवा आणि यशोधन जोशी यांच्या बंगल्यातच रहा. तृप्त मनानं आणि भरल्या पोटानं मग बंगल्या मागं असलेल्या मोकळ्या जागेत मस्त गप्पांचा फड रंगला. सोबतीला होती फक्त शांतता आणि सागराची गाज. (लाटांचा येणारा आवाज)



दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो आणि पुन्हा एकदा कुटुंबे यांच्याकडे थडकलो नाश्त्यासाठी. आधीच सांगितल्यानुसार काकूंनी मस्त आंबोळीचा बेत केला होता. तांदूळ, उडीद डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, नावापुरते गहू, मेथी आणि एक-दोन जिन्नस एकत्र दळून आंबोळीचं पिठ तयार होतं. मग ते रात्री किंवा सकाळी भिजवायचं आणि आंबोळ्या करायच्या. आंबोळी म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर घावन. सोबतीला कच्च्या करवंदांची वा खोबऱ्याची चटणी. दोन्हीतील समानता एकच म्हणजे लसणाचं प्रमाण खूपच अधिक. मागं पालीला गेलो होतो, तेव्हा विलास चांदोरकर यांच्या घरी आंबोळी आणि कच्च्या करवंदांच्या चटणीचा योग जुळून आला होता. किमान चार आंबोळ्या तरी नक्की खाल्ल्या जातात. बाकी मग तुमच्या तब्येतीनुसार.



सकाळचा भरपेट नाश्ता केल्यानंतर मग समुद्रावर गेलो. हरिहरेश्वरच्या मंदिरामागचा आणि बाजूचा किनारा धोकादायक असला तरी मारळचा समुद्र स्वच्छ, निर्मनुष्य आणि शांत आहे. त्यामुळं तो मला अधिक आवडला. नाहीतर उगाचच पुण्यासारखी गर्दी समुद्र किनाऱ्यावर असेल तर मग मजा येत नाही. साधारण दोन-अडीच तास डुंबलो. आधी पाण्यात फार जाण्याची माझी इच्छा नव्हती. पण स्वतःला रोखू शकलो नाही. मग अडीच तास वगैरे सागरीस्नान झालं. एव्हाना सूर्य डोक्यावरून पुढं सरकायला लागला होता आणि वाळू भट्टीसारखी तापली होती. त्यामुळं अधिक वेळ न दवडता तिथून निघालो आणि बंगल्यावर येऊन पुन्हा फ्रेश झालो. चालत अवघ्या चार मिनिटांवर जोश्यांचा बंगला आहे.

नंतर दुपारचं जेवणाची वेळ झाली. पुन्हा कुटुंबे यांच्याकडे न जाता मासे खाण्यासाठी प्रधान यांच्या घरी पोहोचलो. पण त्यांच्याकडे मासे नव्हते आणि कोकणात जाऊन चिकन खाण्यात मला इंटरेस्ट नव्हता. मग हरिहरेश्वर मंदिराच्या मार्गावर असलेल्या कुठल्याशा हॉटेलात मासे खाल्ले. मासे चांगले होते, पण पुण्याचा रेट त्यानं लावला होता. त्यामुळं कोकणात मासे खाल्ल्यासारखं वाटलंच नाही. शिवाय जास्त व्हरायटीही नव्हती. अखेरीस सुरमईवर समाधान मानून मस्त्याहार केला.





पोटोबा झाल्यानंतर मग विठोबा. हरिहरेश्वर मंदिरात गेलो. पारंपरिक पद्धतीनं दर्शन वगैरे झालं. म्हणजे काळभैरव, हरिहरेश्वर आणि आणखी एक-दोन देव. त्यानंतर मग प्रदक्षिणेसाठी निघालो. प्रदक्षिणेच्या मार्गावर असलेल्या घळीतून दिसणारा समुद्र म्हणजे वेडच लागायचं राहिलं होतं. निसर्गासारखा दुसरा कोणताही कलाकार असूच शकत नाही, हे पाहण्यासाठी तरी हरिहरेश्वरला जायला हवं. सागरापर्यंत पोहोचण्यासाठी अरुंद खिंडीतून असलेल्या पायऱ्या आणि सागराच्या लाटांमुळे तयार झालेली दगडांवरील नक्षी पाहून तिथं आल्याचं सार्थक झालं.







दगडांवर आदळणाऱ्या सागराच्या लाटा पाहूनच हृदयात धडकी भरेल, अशी परिस्थिती. मग समुद्र खवळल्यावर काय होत असेल, याचा विचारच केलेला बरा. आता अशा समुद्राच्या नादाला काही अतिउत्साही, आगाव आणि मूर्ख लोक का लागतात, या प्रश्नाचं उत्तर कधीच न मिळणारं आहे. सागराच्या वाटेला गेलेले लोक बुडून मेल्याच्या बातम्या अधून मधून येत असतात. पण इतका भयंकर समुद्र असूनही लोकं मृत्यूच्या तोंडात का शिरतात, हे त्यांचं त्यांनाच ठावूक.



हरिहरेश्वरला प्रदक्षिणा मारल्यानंतर मग पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि निघालो पुण्याच्या दिशेनं. साधारण पाचच्या सुमारास निघालो. येतानाच रस्ता पाठ झाला होता. त्यामुळं जाताना चुकाचुकी आणि इतर भानगडी झाल्या नाहीत. पण वळणावळणाचा रस्ता असल्यामुळं कमी अंतर असूनही तुलनेनं जास्त वेळ लागत होता. माणगांवला चहासाठी थांबून मग रात्रीच्या किर्र अंधारात ताम्हिणीतून निघालो. एखादा तरी प्राणी वगैरे दिसेल, अशी आशा होती. पण काहीच दिसलं नाही. तुलनेनं वाहनांची वर्दळ जास्त होती. खड्ड्यांमधील रस्त्यांमुळे नुसती चीड नाही, तर वैताग, फ्रस्ट्रेशन सर्व काही आलं होतं. अखेर मजल दरमजल करीत रात्री साडेअकराच्या सुमारास पुण्यात पोहोचलो.

हरिहरेश्वरचा समुद्रकिनारा, प्रदक्षिणा मार्ग, यशोधन जोशी यांचा बंगला आणि मोहन कुटुंबे यांचे जेवण या गोष्टी मनात अगदी घर करून राहिल्या आहेत. हीच आमच्या ट्रीपची फलनिष्पत्ती होती. निदान माझ्यासाठी तरी...

7 comments:

Anonymous said...

Mastach re... chala aata amhaas gheun ja ki...

Prasad

mannab said...

प्रवाही लेखनशैली आणि उत्तम छायाचित्रे असल्यावर तुमचा हा लेख आणि अशा लेखांचे इ-पुस्तक आवडणार नाही असे कसे होईल ?
मंगेश नाबर.

Unknown said...

आशिषजी तुम्ही केलेलं वर्णन आणि टाकलेले फोटो यामुळे हरिहरेश्वरदर्शन झालं. पण मला सर्वात महत्त्वाचं वाटलं ते हे की तुम्ही कारने ताम्हिणी घाटातून गेलात, परत आलात तरीही तुमच्या कारच्या ब्रेकमध्ये कोणत्याही प्रकारचा बॉल आला नाही. त्यामुळे तुम्हाला घाम फुटला नाही आणि इतर.............. काहीच घडले नाही. वाह झक्कास.......

Panchtarankit said...

तुमचा सचित्र लेख वाचून
त्या खाचंखळगे असलेल्या रस्त्यांवरून हरी हरेश्वर ला जावे से वाटत आहे.
बहुत बढीया

sagar said...

ठरलं तर मग..पुन्हा हरिहरेश्वरला जाऊ तेव्हा मुक्काम शोधन जोशी यांचा बंगला आणि कुटुंबें यांच्याकडचे उकडीचे मोदक आणि इतर कोकणी मेवा..

Anonymous said...

कोकणात जाणं कधीही सुखावहच असतं. नेहमीच सुंदर अनुभव. सुंदर जमलाय ब्लॉग. नेहमीसारखाच. फोटो टाकल्यामुळे त्याच्या सौंदर्यात भर टाकली गेलीये.
=======================
Regards,

SK

नरेंद्र said...

yasodhan Joshi ha Maza Friend ahe