Showing posts with label Ashok Singhal. Show all posts
Showing posts with label Ashok Singhal. Show all posts

Sunday, November 10, 2019

रामरायाचे मनापासून आभार मानेन...

 कोठारी बंधूंच्या बहिणीला भावना अनावर...


भविष्यात रामजन्मभूमीच्या आंदोलनाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, तेव्हा कोठारी बंधूंच्या बलिदानाचा कायमच आदराने आणि आठवणीने उल्लेख होईल... अयोध्येचे आंदोलन उभारण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे मोरोपंत पिंगळे, आंदोलनाची धग वाढविण्यासाठी देशभर रथयात्रा काढणारे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी हयात खर्ची घालणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंघलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, आचार्य धर्मेंद, विनय कटियार आणि चेहऱ्याविना कारसेवेत सहभागी होणाऱ्या लाखो कारसेवकांचा बहुतांश हिंदू समाज ऋणी असेल. यांच्याबरोबरच कदाचित पहिली आठवण येईल, ती राममंदिरासाठी बलिदान देणाऱ्या रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी यांची... 

श्रीराम मंदिर निर्मितीसाठी १९९०मध्ये जेव्हा पहिल्यांदा कारसेवा झाली तेव्हा कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी हे अयोध्येमध्ये पोहोचले. परिंदा भी पर नही मार सकेगा… अशी घोषणा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. मात्र, कोठारी बंधूंनी ३० ऑक्टोबर रोजी बाबरी मशि‍दीवर चढून भगवा झेंडा फडकविला. त्यावेळी कोठारी बंधूंना ताब्यात घेण्यात आले आणि फैजाबाद येथे नेऊन सोडून देण्यात आले. दोन नोव्हेंबर रोजी ते पुन्हा बाबरी मशि‍दीच्या परिसरात आंदोलनासाठी पोहोचले. त्यावेळी मुलायमसिंह यांच्या आदेशानंतर पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एकूण अकरा कारसेवकांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये कोठारी बंधूंचा समावेश होता… एकाच घरातील हाताशी आलेली दोन पोरं मारली गेली...

धर्मासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या कोठारी बंधूंच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, त्यांची बहीण पौर्णिमा सध्या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे. कोलकात्यामध्ये भाजपचे काम करते आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी बोलणं झालं... तिला दिवसभरात काही पत्रकारांचे फोन आले होते. बहुतांश फोन हे दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील पत्रकारांचे होते. माझ्याशी बोलताना पौर्णिमा अनेकदा भावनिक होत होत्या... त्यांचा स्वर दाटून येत होता.


कोठारी कुटुंबासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आहे. खरंतर सुवर्णदिन आहे. ज्या दिवसाची आम्ही सर्व आतुरतेनं वाट पाहत होतो, तोच हा दिवस. दुर्दैवाने आजचा दिवस पहायला माझे भाऊ नाहीत आणि आई-वडीलही नाहीत. आज जर आई-बाबा असते तर आपल्या मुलांच्या बलिदानाचे सार्थक झाले, अशी त्यांची भावना नक्कीच झाली असती. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ते खरं तर प्रभू श्रीरामांचे मंदिर कधी उभारले जाणार, यासाठीच आयुष्य जगत होते. माझ्या दोन्ही भावांना आणि त्यांच्या पश्चात अनेक वर्षांचा पुत्रवियोग सहन करणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या मृतात्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल… 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा प्रचंड आनंददायक आणि बलिदानाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा माझ्या भावांवर पगडा होता. संघाचे स्वयंसेवकच होते ते. त्यामुळेच हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राममंदिराच्या निर्मितीसाठी कारसेवेत सहभागी होण्याचे निश्चित केले आणि ते अयोध्येत पोहोचले. पुढे काय झाले, ते सर्वांना माहिती आहेच. हाताशी आलेली मुले गमाविल्यामुळे माझे आई-वडील त्यावेळी पार कोलमडून गेले होते. पण धर्मकार्यासाठी मुलांनी केलेले बलिदान वाया जाणार नाही, हा विश्वास आई-वडिलांमध्ये होता. तोच त्यांच्या जगण्याचा अधार होता. त्यामुळे त्यांनी भावांच्या मृत्यूचे दुःख कधीच व्यक्त केले नाही. जवळपास तीन दशके आम्ही जे सहन केले, त्याचे फळ आज खऱ्या अर्थाने मिळाले आहे,’ हे सांगताना पौर्णिमा यांचा कंठ दाटून आला होता.

माझ्या भावांनी अयोध्येमध्ये बलिदान दिल्यानंतर आमच्या कुटुंबाचे आणि अयोध्येचे एका वेगळ्या प्रकारचे ऋणानुंबध निर्माण झाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा माझे आई-वडील प्रत्येक कारसेवेत सहभागी होत असत. आम्ही दरवर्षी किमान तीन ते चारवेळा तरी अयोध्येला जायचोच. एकही वर्ष आमची अयोध्यावारी चुकली नाही. पुढच्या वेळी येऊ तेव्हा राममंदिराचा तिढा सुटलेला असू दे आणि श्रीराममंदिराची निर्मिती सुरू झालेली असू दे, हेच आमचे मागणे असायचे. आज माझे आई-वडील नाहीत. पण मी जेव्हा अयोध्येला जाईन, तेव्हा आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल रामरायाचे आभार नक्की मानेन, असं त्या आवर्जून सांगतात.



भावांच्या बलिदानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. कधीच कशाची कमी पडली नाही. आईला दोन्ही पुत्र गमवावे लागले असले, तरीही देशभरातून अनेक पुत्र आईला मिळाले. अनेक जण भावांच्या रुपाने माझ्या पाठिशी ठाम उभे राहिले. आमच्या कठीण प्रसंगांमध्ये कायम मदतीला धावून आले. निधनापूर्वी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा रोज पन्नास-साठ जण आईची सेवा-सुश्रूषा करण्यासाठी असायचे. आम्हाला कधीच कशाची कमी पडली नाही. एखाद्या कुटुंबाला देशभरातून किती भरभरून प्रेम मिळावं, याचा अनुभव आम्ही कायम घेतला... पौर्णिमा सांगत होत्या...

दोन्ही भावांचं झालेलं बलिदान आणि राममंदिराबाबत काहीच तोडगा दृष्टीपथात नव्हता. तेव्हा कधी निराशा नाही आली का, असा माझा प्रश्न होता. मात्र, मला काय किंवा माझ्या आई-वडिलांना मी कधीच हताश झालेलं, निराश झालेलं पाहिलं नाही. आपण सर्वकाही गमाविलं असलं, तरीही आपल्या मुलांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची खात्री त्यांना पदोपदी होती. त्यामुळंच ते कधीही खचलेले मी पाहिले नाहीत, असंही पौर्णिमा आवर्जून सांगतात...

पाच-दहा मिनिटे सुरू असलेला संवाद संपल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून समाधान वाटले... माझ्याप्रमाणेच शेकडो नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधून कोठारी बंधूंच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला होता... माझे बंधू आणि आई-वडिलांबद्दल देशभरातील नागरिकांमध्ये असलेला आदरभाव पाहून मलाही खूप भरून येते आहे, अशीच भावना पौर्णिमा यांच्याकडून व्यक्त होत होती.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहीलच. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर मोहोर उमटविली आहे. राममंदिर उभारल्यानंतर त्याच परिसरात कोठारी बंधूंसह सर्वच्या सर्व अकरा जणांचे एक स्मारक उभारायला हवे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भाव यांचे प्रतीक म्हणून...

Tuesday, February 25, 2014

हम दो हमारे पाँच…

बुरसटलेला विचार...


प्रत्येक हिंदू दांपत्याने किमान पाच मुलांना जन्म दिला पाहिजे, हे विश्व हिंदू परिषदेचे सर्वाधिक ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांचे वक्तव्य वाचून हसावे की रडावे हेच समजेनासे झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि परिवारातील संघटना बुरसटलेल्या विचारांच्या आहेत, अशी टीका नेहमीच केली जाते. त्यात बहुतांश प्रमाणात तथ्य नसले तरीही सिंघल यांच्यासारखी मंडळी टीकाकारांना अशी संधी देण्याचे काम करीत असतात.


संघटनेचे नाव विश्व हिंदू परिषद असले तरीही जगातील सर्व हिंदूंच्या हिताचा ठेका संबंधित संघटनेकडे नाही. उलटपक्षी संघ परिवारातील सर्वाधिक उग्र आणि भडक संघटना हीच विश्व हिंदू परिषदेची ओळख आहे. शिवाय १९८९ आणि १९९१च्या काळात असलेली संघटनेची लोकप्रियताही आता राहिलेली नाही. रामजन्मभूमीचे आंदोलन उभारून बाबरी मशीद पाडल्यानंतर त्याची जबाबदारी स्वीकारण्यापासून पळ काढणारी हीच विश्व हिंदू परिषद आणि हेच ते अशोक सिंघल. त्यामुळे संघ परिवारातील अनेक स्वयंसेवकांचाही या संघटनेवर विशेष लोभ नाही.

हिंदू दांपत्याला पाच मुले हवीत, हे सिंघल यांचे हे वैयक्तिक मत आहे, की विश्व हिंदू परिषदेचे मत आहे, की संघाचीही हीच भूमिका आहे, याबद्दल काही स्पष्ट झालेले नाही. अर्थात, त्याने फारसा फरक पडणार नाही. असे वक्तव्य करणारी कोणतीही व्यक्ती किंवा संघटना मूर्खच म्हणायला हवी. मध्यंतरी कोची येथे पार पडलेल्या संघाच्या प्रतिनिधी सभेच्या बैठकीत दत्तात्रय होस्बाळे यांनी हिंदू दांपत्यांनी कमीत कमी तीन मुलांना जन्म द्यायला हवा, अशी बुरसटलेली भूमिका मांडली होती. तेव्हाही संघ आणि होस्बाळे टीकेचे धनी झाले होते. तेव्हा संघही सिंघल यांच्यापेक्षा खूप काही वेगळी भूमिका मांडणारा नाही.

१९८० च्या दशकांत जेव्हा राजीव गांधी यांनी संगणकीकरणाचा धडाका सुरू केला होता, तेव्हा संघ परिवारातील भारतीय मजदूर संघ नावाच्या एका संघटनेने अशीच बुरसटलेली आणि प्रगती रोखणारी भूमिका घेत संगणकीकरणाला विरोध केला होता. काय झाले आता त्या भूमिकेचे. मजदूर संघाच्या कार्यकर्त्यांची पोरं नि पोरी आता मोबाईलवर इंटरनेट पाहण्यात मग्न असतील. त्यावेळी कामगार कपातीची भीती दाखवून मजदूर संघाने त्रागा केला होता. सिंघल यांची ही भूमिका देखील त्याच बुरसटलेल्या विचारांच्या पंक्तीत बसणारी आहे.

साधूसंत आणि भगव्या वेशातील मंडळींच्या गराड्यात अडकलेल्या अशोक सिंघल यांचा भारतातील मध्यमवर्गीय आणि गोरगरीब जनतेशी दुरान्वयेही संबंध राहिलेला नाही, हेच त्यांच्या वक्तव्यातून समोर येते. मुळात सध्या नवरा आणि बायको अशा दोघांनी नोकऱ्या केल्यानंतरही घर चालविणे कठीण होऊन बसले आहे. अवकाशात गेलेले महागाईचे रॉकेट खाली येण्याचे नाव घेत नाही. सिंघल यांच्याच विचारांचे नरेंद्र मोदी सत्तेवर आले तरी ते महागाई कमी करू शकतील, यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे महागाई वाढतच जाणार.

महागाईने खिशावर मारलेला डल्ला, घरासाठीचे हप्ते, इतर कुठले कुठले हप्ते, एका किंवा फारतर दोन पोरांच्या शिक्षणावरील खर्च, अगदी सामान्यपणे आयुष्य जगतानाही होणारी त्रेधातिरपीट यांच्यामुळे सर्वसामान्य माणूस कसाबसा दिवस ढकलतो आहे. तो छान आनंदात जगतो आहे, असा कोणाचाही  दावा नाही. सिंघल यांचे समर्थक कदाचित असा दावा करू शकतील. भविष्यात पेट्रोल भडकणार, गॅस सिलिंडरचे दर महागणार, भाज्या आणि तेलाचे दर वधारणार, घरांच्या किंमती आणखी वाढणार नि उत्तम तसेच दर्जेदार शिक्षणही सामान्यांच्या आवाक्याबाहेर होत जाणार. त्यामुळे मिळेल तितके उत्पन्न कमी, अशीच परिस्थिती असणार आहे.

त्यातून मुलांची किंवा घरातील ज्येष्ठांची आजारपणं, वाढत्या वयाबरोबर वाढत जाणारा शिक्षणावरील खर्च, अॅडमिशनसाठी अव्वाच्या सव्वा घेतली जाणारी डोनेशन्स, आजूबाजूच्या नवनवीन व्यवधानांमुळं मुलांच्या पालकांकडून वाढत जाणाऱ्या अपेक्षा आणि त्यावर वाढत जाणार खर्च, त्यांच्या भविष्यासाठी करावी लागणारी तरतूद अशा सर्व गोष्टींची सिंघल तुम्हाला काहीच कल्पना दिसत नाहीये. बायको आणि एक-दोन पोरांचा संसार रेटताना माणूस मेटाकुटीला येतोय. तुमचं काय जातंय, ‘पाच पोरं जन्माला घाला,’ असं सांगायला.


तुम्हाला नसली तरीही या सर्व परिस्थितीची जाण हिंदू धर्मातील मध्यमवर्गीय आणि गरीब दांपत्याला आहे. कारण तो सोसतो आहे. त्यामुळेच ‘हम दो हमारे दो’वरून ‘हम दो हमारा एक’ असा नवा नारा घराघरातून दिला जातोय. सरकारने कोणताही जनजागृती न करताच नागरिकांनी स्वतःहूनच हे धोरण स्वीकारले आहे. कारण त्याशिवाय दुसरा कोणता पर्यायच त्यांच्यासमोर नाही. तेव्हा तुमच्या परिषदेने कितीही चिंतन बैठका घेतल्या, बौद्धिकं घेतली, घरोघरी जनसंपर्क अभियान राबविले तरीही हिंदू समाज तुमच्या अशा मूर्खासारख्या वक्तव्यांना बधणार नाही.

सिंघल, अहो सारा हिंदू समाज सोडा. तुमच्या संघटनेच्या आणि संघ परिवारातील कार्यकर्त्यांना किंवा स्वयंसेवकांना विचारा. ‘हम दो हमारे पाँच’चा अंगीकार करण्यास ते तयार आहेत का? एकदा तरी तुम्ही हे विचारलं असतं ना, तरी तुम्हाला इतकं काही काही ऐकावं लागलं असतं की ते वक्तव्य करण्याची हिंमतही तुम्ही केली नसती. तेव्हा हिंदू समाजाप्रमाणेच परिषदेच्या कार्यकर्त्यांशी असलेला संपर्कही घटलेला दिसतोय.

भारतातील विविध धर्मियांची टक्केवारी किती ते पाहूयात. २००१ च्या जनगणेनुसार भारतात एकूण एक अब्ज दोन कोटी ८६ लाख दहा हजार ३२८ नागरिक आहेत. त्यापैकी ८२ कोटी ७५ लाख ७८ हजार ८६८ हिंदू आहेत. एकूण लोकसंखेच्या ८०.५ टक्के. मुस्लिम आहेत तेरा कोटी ८१ लाख ८८ हजार २४०. एकूण लोकसंख्येच्या १३.४ टक्के. ख्रिश्चन आहेत दोन कोटी ४० लाख ८० हजार १६. एकूण टक्केवारी अवघे दोन पूर्णांक तीन. बाकी शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ज्यू मंडळींच्या लोकसंख्येशी सिंघल प्रभृतींना काही वावडे वाटण्याची शक्यता नाही. तेव्हा येत्या पन्नास वर्षांमध्ये तरी सिंघल यांना जी भीती वाटतेय, ती प्रत्यक्षात येण्याची शक्यता नाही. 



तुम्हाला जर मुस्लिमांचे आणि ख्रिश्चनांचे अनुकरणच करायचे असेल ना, तर ते ‘हम दो हमारे पाँच’ अशा चुकीच्या पद्धतीने करू नका. हिंदू नागरिकांचा सेक्स रेशो ९३१ आहे. मुस्लिमांचा तो ९३६ आहे आणि ख्रिश्चनांचा १००९ आहे. मुलगा आणि मुलगी यांचा सेक्स रेशो सुधारण्यात दोन्ही धर्मांचा आदर्श घ्या. हिंदू धर्मातील चाइल्ड सेक्स रेशो फक्त ९२५ आहे. मुस्लिमांमध्ये तो ९५० आणि ख्रिश्चनांमध्ये ९६४ इतका आहे. अनुकरण करायचे ना तर इथे करा. ख्रिश्चनांचा साक्षरता दर ८०.३ टक्के आहे. हिंदू धर्मातील साक्षरता ६५ टक्क्यांवरच अडकलीय. ती ८० टक्क्यांपेक्षा अधिक करा. हिंदू धर्मात महिलांचे साक्षरतेचे प्रमाण ५३.२ इतकी आहे. दुर्गा भारतीच्या मदतीने हा दर कसा वाढले, यावर लक्ष केंद्रीत करा. इतके केलेत तरी खूप पुरेसे आहे.


शिवाय ‘हम पाच हमारे पच्चीस’ ही घोषणा भाजपवाल्यांनी प्रसिद्ध केलेली. त्यात तथ्य किती आणि फक्त घोषणेसाठी घोषणा किती, याचा अभ्यास कोणीही केलेला नाही. मात्र, हिंदू असो, ख्रिश्चन असो, मुस्लिम असो किंवा शीख असो महागाई तसेच जगतानाच्या समस्या सर्वांसाठीच सारख्या आहेत. त्यामुळे आपल्या मुलांना उत्तम आणि उज्ज्व भविष्य मिळावे, अशी इच्छा असलेला कोणताही सर्वसामान्य मध्यमवर्गीय किंवा गरीब पालक दोनपेक्षा अधिक मुलांना जन्म देण्याचे धाडस करणार नाही. मग तो कोणत्याही धर्माचा असो. त्यामुळे सुशिक्षित आणि सुसंस्कृत मुस्लिम माणूसही ‘हम पाँच हमारे पच्चीस’ किंवा ‘हम दो हमारे पाँच’ची भूमिका मान्य करेल, याची ‘सूत’राम शक्यता नाही.

तेव्हा सिंघल हिंदू धर्माच्या संकेतांप्रमाणे निवृत्ती स्वीकारून वानप्रस्थाक्षमाची वाट धरा. तेच तुमच्यासाठी, हिंदू धर्मासाठी आणि संघ परिवारासाठीही योग्य आहे.

ता. क. – हिंदू दांपत्यांनी एक किंवा दोनऐवजी पाच-पाच मुलांना जन्म दिला, तरी संघशाखांची रोडावलेली संख्या वाढेल, अशी आशा बाळगू नका. हिंदू समाजाची संख्या कशी वाढेल, यापेक्षा परिवाराने संघाचा कणा असलेल्या शाखांची आणि शाखांवरची संख्या कशी वाढेल, याचा विचार केल्यास ते सर्वांसाठीच चांगले आहे.