Showing posts with label Mulayam Singh. Show all posts
Showing posts with label Mulayam Singh. Show all posts

Sunday, November 10, 2019

रामरायाचे मनापासून आभार मानेन...

 कोठारी बंधूंच्या बहिणीला भावना अनावर...


भविष्यात रामजन्मभूमीच्या आंदोलनाचा जेव्हा जेव्हा उल्लेख होईल, तेव्हा कोठारी बंधूंच्या बलिदानाचा कायमच आदराने आणि आठवणीने उल्लेख होईल... अयोध्येचे आंदोलन उभारण्यात महत्त्वाची भूमिका वठविणारे मोरोपंत पिंगळे, आंदोलनाची धग वाढविण्यासाठी देशभर रथयात्रा काढणारे भाजपचे नेते लालकृष्ण अडवाणी, श्रीराम मंदिराच्या निर्मितीसाठी हयात खर्ची घालणारे विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोकजी सिंघलशिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, साध्वी ऋतंभरा, उमा भारती, आचार्य धर्मेंद, विनय कटियार आणि चेहऱ्याविना कारसेवेत सहभागी होणाऱ्या लाखो कारसेवकांचा बहुतांश हिंदू समाज ऋणी असेल. यांच्याबरोबरच कदाचित पहिली आठवण येईल, ती राममंदिरासाठी बलिदान देणाऱ्या रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी यांची... 

श्रीराम मंदिर निर्मितीसाठी १९९०मध्ये जेव्हा पहिल्यांदा कारसेवा झाली तेव्हा कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी हे अयोध्येमध्ये पोहोचले. परिंदा भी पर नही मार सकेगा… अशी घोषणा उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी केली होती. मात्र, कोठारी बंधूंनी ३० ऑक्टोबर रोजी बाबरी मशि‍दीवर चढून भगवा झेंडा फडकविला. त्यावेळी कोठारी बंधूंना ताब्यात घेण्यात आले आणि फैजाबाद येथे नेऊन सोडून देण्यात आले. दोन नोव्हेंबर रोजी ते पुन्हा बाबरी मशि‍दीच्या परिसरात आंदोलनासाठी पोहोचले. त्यावेळी मुलायमसिंह यांच्या आदेशानंतर पोलिसांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात एकूण अकरा कारसेवकांना प्राण गमवावे लागले. त्यामध्ये कोठारी बंधूंचा समावेश होता… एकाच घरातील हाताशी आलेली दोन पोरं मारली गेली...

धर्मासाठी प्राणांचे बलिदान करणाऱ्या कोठारी बंधूंच्या आई-वडिलांचे निधन झाले असून, त्यांची बहीण पौर्णिमा सध्या भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती आहे. कोलकात्यामध्ये भाजपचे काम करते आहे. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर तिच्याशी बोलणं झालं... तिला दिवसभरात काही पत्रकारांचे फोन आले होते. बहुतांश फोन हे दिल्ली आणि पश्चिम बंगालमधील पत्रकारांचे होते. माझ्याशी बोलताना पौर्णिमा अनेकदा भावनिक होत होत्या... त्यांचा स्वर दाटून येत होता.


कोठारी कुटुंबासाठी आजचा दिवस आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा आहे. खरंतर सुवर्णदिन आहे. ज्या दिवसाची आम्ही सर्व आतुरतेनं वाट पाहत होतो, तोच हा दिवस. दुर्दैवाने आजचा दिवस पहायला माझे भाऊ नाहीत आणि आई-वडीलही नाहीत. आज जर आई-बाबा असते तर आपल्या मुलांच्या बलिदानाचे सार्थक झाले, अशी त्यांची भावना नक्कीच झाली असती. दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर ते खरं तर प्रभू श्रीरामांचे मंदिर कधी उभारले जाणार, यासाठीच आयुष्य जगत होते. माझ्या दोन्ही भावांना आणि त्यांच्या पश्चात अनेक वर्षांचा पुत्रवियोग सहन करणाऱ्या माझ्या आई-वडिलांच्या मृतात्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती मिळाली असेल… 

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल हा प्रचंड आनंददायक आणि बलिदानाचे सार्थक झाल्याची भावना निर्माण करणारा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा माझ्या भावांवर पगडा होता. संघाचे स्वयंसेवकच होते ते. त्यामुळेच हिंदुत्वाच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांनी राममंदिराच्या निर्मितीसाठी कारसेवेत सहभागी होण्याचे निश्चित केले आणि ते अयोध्येत पोहोचले. पुढे काय झाले, ते सर्वांना माहिती आहेच. हाताशी आलेली मुले गमाविल्यामुळे माझे आई-वडील त्यावेळी पार कोलमडून गेले होते. पण धर्मकार्यासाठी मुलांनी केलेले बलिदान वाया जाणार नाही, हा विश्वास आई-वडिलांमध्ये होता. तोच त्यांच्या जगण्याचा अधार होता. त्यामुळे त्यांनी भावांच्या मृत्यूचे दुःख कधीच व्यक्त केले नाही. जवळपास तीन दशके आम्ही जे सहन केले, त्याचे फळ आज खऱ्या अर्थाने मिळाले आहे,’ हे सांगताना पौर्णिमा यांचा कंठ दाटून आला होता.

माझ्या भावांनी अयोध्येमध्ये बलिदान दिल्यानंतर आमच्या कुटुंबाचे आणि अयोध्येचे एका वेगळ्या प्रकारचे ऋणानुंबध निर्माण झाले. त्यानंतर जेव्हा जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा माझे आई-वडील प्रत्येक कारसेवेत सहभागी होत असत. आम्ही दरवर्षी किमान तीन ते चारवेळा तरी अयोध्येला जायचोच. एकही वर्ष आमची अयोध्यावारी चुकली नाही. पुढच्या वेळी येऊ तेव्हा राममंदिराचा तिढा सुटलेला असू दे आणि श्रीराममंदिराची निर्मिती सुरू झालेली असू दे, हेच आमचे मागणे असायचे. आज माझे आई-वडील नाहीत. पण मी जेव्हा अयोध्येला जाईन, तेव्हा आमची प्रार्थना ऐकल्याबद्दल रामरायाचे आभार नक्की मानेन, असं त्या आवर्जून सांगतात.



भावांच्या बलिदानानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि हिंदुत्ववादी विचाराच्या संघटनांनी आम्हाला भरभरून प्रेम दिले. कधीच कशाची कमी पडली नाही. आईला दोन्ही पुत्र गमवावे लागले असले, तरीही देशभरातून अनेक पुत्र आईला मिळाले. अनेक जण भावांच्या रुपाने माझ्या पाठिशी ठाम उभे राहिले. आमच्या कठीण प्रसंगांमध्ये कायम मदतीला धावून आले. निधनापूर्वी आई जेव्हा हॉस्पिटलमध्ये होती, तेव्हा रोज पन्नास-साठ जण आईची सेवा-सुश्रूषा करण्यासाठी असायचे. आम्हाला कधीच कशाची कमी पडली नाही. एखाद्या कुटुंबाला देशभरातून किती भरभरून प्रेम मिळावं, याचा अनुभव आम्ही कायम घेतला... पौर्णिमा सांगत होत्या...

दोन्ही भावांचं झालेलं बलिदान आणि राममंदिराबाबत काहीच तोडगा दृष्टीपथात नव्हता. तेव्हा कधी निराशा नाही आली का, असा माझा प्रश्न होता. मात्र, मला काय किंवा माझ्या आई-वडिलांना मी कधीच हताश झालेलं, निराश झालेलं पाहिलं नाही. आपण सर्वकाही गमाविलं असलं, तरीही आपल्या मुलांचं बलिदान व्यर्थ जाणार नाही, याची खात्री त्यांना पदोपदी होती. त्यामुळंच ते कधीही खचलेले मी पाहिले नाहीत, असंही पौर्णिमा आवर्जून सांगतात...

पाच-दहा मिनिटे सुरू असलेला संवाद संपल्यानंतर खऱ्या अर्थाने मनापासून समाधान वाटले... माझ्याप्रमाणेच शेकडो नागरिकांनी त्यांच्याशी संवाद साधून कोठारी बंधूंच्या बलिदानाबद्दल आदर व्यक्त केला होता... माझे बंधू आणि आई-वडिलांबद्दल देशभरातील नागरिकांमध्ये असलेला आदरभाव पाहून मलाही खूप भरून येते आहे, अशीच भावना पौर्णिमा यांच्याकडून व्यक्त होत होती.

अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहीलच. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही त्यावर मोहोर उमटविली आहे. राममंदिर उभारल्यानंतर त्याच परिसरात कोठारी बंधूंसह सर्वच्या सर्व अकरा जणांचे एक स्मारक उभारायला हवे. श्रद्धा, भक्ती आणि समर्पण भाव यांचे प्रतीक म्हणून...

Tuesday, May 06, 2014

रामलला 'हम आएंगे'

मंदिर भव्य बनाऐंगे...

उत्तर प्रदेशात यायचं. लखनऊ, रायबरेली, अमेठी, वाराणसी आणि इतर ठिकाणी जायचं. पण अयोध्येला जायचं नाही, हे माझ्या मनाला कधीच पटणार नव्हतं. त्यामुळं व्हाया सुलतानपूर अयोध्येला निघालो. रात्री अयोध्येला पोहोचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरायचं. रामललाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं असं डोक्यात होतं. सुलतानपूरहून बसमध्ये बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर रामजन्मभूमी आंदोलनाचा सगळा पटच डोळ्यासमोरून जात होता. 



१९९० आणि १९९२ या दोन्ही वर्षी जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा मी अनुक्रमे सहावी आणि आठवीमध्ये होतो. तेव्लहा हान असलो आणि आता बावीस-चोवीस वर्ष उलटली असली तरीही सगळं काही, अगदी कालपरवा घडल्यासारखं डोळ्यासमोर आहे. पहिल्या वेळेस चुलत भाऊ शैलेश आणि नंतर चुलत बहिण अर्चना कारसेवेत सहभागी झाले होते. शिवाय आमच्या परिसरातील अनिल बर्वे, विक्रम सुर्वे, प्रकाश जोशी, धनंजय वाघ, विनायक राहुरकर, धनंजय घाटेसह इतरही अनेक मित्र कारसेवेला गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कहाण्या, किस्से आणि आठवणी ऐकल्या होत्या. 

अयोध्या, श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि तेव्हाचा सगळा काळ डोळ्यासमोरून तरळत होता. पुणे स्टेशनवर अयोध्येकडे जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी आणि खचाखच भरलेल्या रेल्वे दिसत होत्या. आताइतका माध्यमांचा धुमाकूळ नसल्यामुळे कुठून तरी उडत बातम्या येत असत. खरं तर बातम्या नाहीच. अफवाच त्या. मनोहर जोशी शिवसैनिकासह विमानाने कारसेवेला जाणार, कारसेवक पॅराशूटनं अयोध्येतील विवादित जागेजवळ उतरले वगैरे वगैरे बातम्या कूठून कुठून कानावर यायच्या. कुणीकुणी त्या बातम्या ऐकून फटाकेही फोडायचं आणि पेढेही वाटायचं. पण बऱ्याचशा बातम्यांमध्ये तथ्य नसायचे हे नंतर समजायचं. 



चौकाचौकांतील संदेश फलकांवर चिटकविलेल्या सामना आणि नवाकाळच्या बातम्या नि अग्रलेख वाचायला प्रचंड गर्दी होत असे. लोक उत्सुकतेने ते वाचत आणि त्यावर चर्चा व्हायची. नातूबागेच्या मैदानावर प्रमोद महाजन यांनी मोठी सभा घेऊन संघ स्वयंसेवकांच्या तिसऱ्या प्रकाराची व्याख्या केली होती. म्हणजे पहिला नियमित स्वयंसेवक, दुसरा नैमित्तिक कार्यक्रमांना येणारा स्वयंसेवक आणि तिसरा म्हणजे काय राडा करायचा आहे का,  तर येतो, असं विचारणारा स्वयंसेवक. रामजन्मभूमी आंदोलनात तिसऱ्या गटातील स्वयंसेवकांचा पुढाकार आहे, असं सांगून मिळविलेल्या टाळ्या... ते सगळं डोळ्यासमोर तरळत होतं. 

सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएेँगे..., तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से..., रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाऐंगे, मंदिर भव्य बनाऐंगे... जो न हमारे राम का, वो न हमारे काम का... सगळ्या घोेषणा पुन्हा एकदा कानात घुमत होत्या. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबराच्या नावानं तयार झालेली वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशभरात झालेला जल्लोष, रस्त्यारस्त्यावर वाटण्यात आलेली साखर आणि पेढे, रामजन्मभूमी आंदोलनाचा बदल घेण्यासाठी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत पेटविलेली दंगल आणि बाळासाहेब ठाकरे नि शिवसेनेनं त्याला दिलेलं चोख प्रत्युत्तर, नंतर कायमचा धडा शिकेलेले धर्मांध मुसलमान, अयोध्या तो एक झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है... ही वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर घुमलेली घोषणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर विनाकारण घातलेली बंदी आणि नंतर तोंडावर आपटलेलं सरकार, हिंदुत्ववाद्यांचे तेव्हा हिरो बनलेले कल्याणसिंह हे सारं काही सुलतानपूरहून अयोध्येला जाताना मला आठवत होतं. 



फैझाबादहून अयोध्येत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून शुचिर्भूत होऊन दर्शनासाठी निघालो. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. कुठं घरासमोर, दुकानांसमोर सडे घातले जात होते. रामचरितमानस, हनुमान चालिसा आणि राम-हनुमानाच्या भजनांचे स्वर कानावर येत होते. कुठे कचोरी (खस्ता), जिलेबी आणि सामोशाचे घाणे पडत होते. त्याचा गंध दरवळत होता. मंदिर मार्गावर जाताना दुकानदार मंडळी पेढे, प्रसाद, हार, फुलं घेण्यासाठी मागे लागत होती. तसे ते सगळीकडेच लागतात. त्या सर्वांना टाळून हनुमान गढीपर्यंत पोहोचलो.



चाळीस-पन्नास पायऱ्या चढून हनुमान गढीवर पोहोचलो. हनुमानाचे वंशज असलेल्या माकडांची वर्दळ मंदिरात सर्वत्र आहे. तुमच्या हातात प्रसाद असेल तर मग ते तुमच्या हातातून प्रसाद हिसकावतातच. तुम्ही दिला नाही, तर प्रसंगी चावतातही. हनुमान गढी इथं जाऊन 'राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की...' केलं. रामाचं दर्शन घेण्याआधी रामभक्त हनुमानाचं दर्शन घ्यावच लागणार. हनुमानाची दोन रुपं आहेत, एक वीर मारूती. जो पराक्रमी आहे, आक्रमक आहे. दुसरा आहे दास मारूती. महापराक्रमी परमप्रतापी वीर मारूती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाचा दास म्हणून दास मारूतीचं रुप आपल्याला फक्त रामाच्या मंदिरातच दिसतं. इतर ठिकाणी असलेला गदाधारी हनुमान रामांच्या चरणी हात जोडून असतो. 

हनुमान गढीनंतर, जनक भवन, कनक भवन, दशरथ गद्दी वगैरे पाहिलं. दशरथ गद्दी इथं सहा फुटी हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दशरथ गद्दी इथं जाताना गाइडनं एक गल्ली दाखविलं. १९९० मध्ये झालेल्या कारसेवेच्या वेळी दोन कारसेवक इथंच हुतात्मा झाले होते, असं त्यानं एका गल्लीत शिरताना मला सांगितलं आणि अंगावर अक्षरशः काटा आला. कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी या बंधूंचं राममंदिरासाठीचं बलिदन कोण विसरू शकेल. परिंदा भी पर मा नही सकेगा... या मुसलमानांचे मसीहा मुलायमसिंह यादव यांचं म्हणणं खोटं करून दाखविणाऱ्या कोठारी बंधूंनी लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाऐंगे... असं म्हणत राममंदिरासाठी प्राणांची बाजी लावली. ऐहिक सुखासाठी कशाचीच तमा न बाळगणाऱ्यांच्या या जगात कोठारी बंधूंनी एका ध्येयासाठी, विचारासाठी प्राणांचे बलिदान केले. गाइडनं अयोध्येची माहिती देताना बोलता बोलता सांगितलं, की अयोध्येमध्ये एकूण साडेसात हजार छोटी-मोठी मंदिरं आहेत. इतकी मंदिरं आहेत. राम, सीता, हनुमान, शंकर भगवान, माँ दुर्गा आणि अशा अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. माझ्यामते त्या साडेसात हजार मंदिरांमध्ये आणखी दोन मंदिर कम स्मारकं हवीत. एक म्हणजे रामकुमार कोठारी यांचं आणि दुसरं शरदकुमार कोेठारी यांचं.



रामललाचं दर्शन घेण्यापूर्वी रामाचा दास हनुमान याचं दर्शन घेतलं. तसंच रामासाठी प्राणापर्ण करणाऱ्या त्यांच्या दोन सर्वश्रेष्ठ भक्तांचंही दर्शन घडलं. तिथून मग राममंदिराच्या दिशेनं निघालो. संपूर्ण अयोध्येत आणि विशेषतः मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मंदिरासमोर जाईपर्यंत चारवेळा आपली काटोकोर तपासणी केली जाते. घड्याळ, मोबाईल, पेन ड्राईव्ह, सीम कार्ड, चिप वैगेर काहीही बरोबर नेऊ दिलं जात नाही. इतंकच सोडा कंगवा आणि टूथपिक सुद्धा त्यांनी काढून ठेवायला सांगितल्या. 



मंदिर मार्गावर प्रवेश केल्यानंतर सगळा मार्ग बंदिस्त आहे. तीनही बाजूंनी लोखंडी जाळीनं मार्ग बंदिस्त आहे. आपण फक्त चालत रहायचं. त्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे परिसरातील माकडांपासून आपला बचाव होतो. अनेक वळणं वळणं पार करून एका चढावर पोहोचल्यानंतर मंदिर दिसू लागतं. मंदिरावर डौलानं फडकणारा भगवा झेंडा दिसू लागतो. चढ चढल्यानंतर साधारण वीस-पंचवीस पावलं चालल्यानंतर बरोब्बर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहतो. मंदिर आणि आपल्यामध्ये पन्नास पावलांचं अंतर असतं. इथूनच आपल्याला रामललाचं दर्शन घ्यावं लागतं. पण प्रकाशव्यवस्था उत्तम असल्यामुळं दर्शन खूप मस्त होतं. तंबूसारख्या आकारच्या मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. मोठ्या थाटात आणि दिमाखात विराजमान बसले आहेत. त्यांच्यासमोर नतमस्त झाल्यानंतर मग साधारण एक-दीड किलोमीटरची पायपीट करून पुन्हा लॉकर रूमपाशी पोहोचलो. 

मुळात कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची फारशी उत्सुकता मला नसते. मात्र, अयोध्येचं राममंदिर त्याला अपवाद आहे. दलित समाजाच्या पुनरुत्थानात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आंदोलनाचं जे महत्त्व आहे, तेच हिंदू समाज संघटनाच्या इतिहासात राममंदिराच्या आंदोलनाचं महत्त्व आहे. त्यामुळं हे मंदिर इतर सर्व मंदिरापेक्षा वेगळं आहे. शिवाय काशी-मथुरेत मंदिराच्या बाजूला मशीद आहे. मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही. इथं राममंदिर पाडून त्यावर मशीद बांधण्यात आली होती. मशीद कसली वादग्रस्त वास्तूच होती ती. ना तिथं मुस्लिम कधी नमाज पढले ना तिथं कधी धार्मिक प्रथापरंपरा जपल्या गेल्या. त्यामुळं अयोध्येचं आंदोलन हा एक धडा होता. शांतपणे शेजारी रहाल तर कदाचित आपण सुखाने नांदू शकू. पण जर आक्रमण करून आमच्या छाताडावर तुमची संस्कृती नि तुमच्या परंपरा लादण्याचा प्रयत्न केलात, तर बाबरी मशिदीसारखे उद्ध्वस्त व्हाल. रामजन्मभूमी आंदोलनाचा खरं तर हाच धडा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. 



रामललाचं छान दर्शन झाल्यानंतर मग नाश्त्याकडे वळलो. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती. पुरीभाजी, कचौरी (खस्ता) आणि चहा घेतल्यानंतर मग अयोध्येतील लोकांशी थोडं बोललो. त्यांना काय वाटतं, काय नाही, हे जाणून घेतलं. अयोध्येतून 'लल्लूसिंह को इस बार नाही जिताया, तो भगवान राम भी हमें माफ नही करेंगे...' अयोध्येतील एका चहावाल्याची बोलकी प्रतिक्रिया. 'भैय्या मोदीजी का पीएम बनना तो तय है. इसबार नही तो कभी नही...' आणखी एक बोलकी प्रतिक्रिया. चहावाले, पानवाले, पुरीभाजीचे ठेले लावणारे, रस्त्यारस्त्यावरून भगवी वस्त्र घालून हिंडणारे साधू-साध्वी सगळ्यांच्याच तोंडी मोदीनामाचा जप. मंदिर बनेगा क्या... मंदिर बनना चाहिए क्या... या प्रश्नांना थेट उत्तर. 'मंदिर तो बनेगा. मंदिर बनने से कौन रोक सकता है. सब तय्यारी हो चुकी है. पत्थर काम भी पुरा हो  रहा है. अब सिर्फ मंजुरी मिलना बाकी है. एक दिन में मंदिर का काम शुरू हो जाएगा...' 



अयोध्यावासियांची प्रभू रामचंद्रांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढीच मंदिर बनणार आणि मोदीच ते बनविणार यावरही आहे. शौचालय व्हायलाच पाहिजे. पण देवालयही पाहिजे. विकास पाहिजे पण हेदेखील व्हायलाच पाहिजे, पण मूळ मुद्दे आणि विचार यांना तिलांजली देऊन नाही, यावरही आक्षेप असण्याचे कारण नाही. शिवाय आता बाबरी मशीद नामक वादग्रस्त वास्तू त्या ठिकाणी नाही. तिथं पुन्हा बाबरी मशीद बांधण्याची ताकद कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये नाही आणि मुख्य म्हणजे आता तिथं असलेलं रामललाचं मंदिर हटविण्याची हिंमत असलेला 'माई का लाल' जन्माला आलेला नाही आणि भविष्यात कधीही जन्माला यायची शक्यताही नाही.

भरपूर लोकांशी बोलल्यानंतर मग श्री अयोध्येतून निघालो. अयोध्यावासियांच्या शब्दात सांगायचे तर अयोध्याजी मधून निघालो. मनातल्या मनात जोरात घोषणा दिली, 'रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाऐंगे.' यामधील 'हम आएंगे' या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सूज्ञ वाचकांना सांगण्याची काहीच गरज नाही. 

तेव्हा अयोध्येतून लखनऊसाठी निघालो. लखनऊला जाऊन मग पुढं वाराणसीसाठी निघायचं होतं. नरेंद्र मोदींप्रमाणेच 'मुझे भी माँ गंगा बुला रही है...'

बोलो सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय.

Monday, May 05, 2014

जातीपातीची गुंतागुंत

उत्तर प्रदेशच्या राजकारणाची गंमत

उत्तर प्रदेशातील मतदारसंघातील लेखाजोख्याप्रमाणेच तेथील सामाजिक परिस्थितीबद्दलही वाचायला आवडेल किंवा लोकांचं राहणीमान तसंच आर्थिक परिस्थिती याबद्दलही थोडं लिही, असं काही जणांनी सुचविलं. वास्तविक पाहता, ते माझ्याशी डोक्यात होतंच. पण इथली जातीय गणितं इतकी गुंतागुंतीची आहेत की विचारता सोय नाही. त्यामुळं आधी खूप लोकांशी बोलावं आणि नंतरच लिहावं, असं ठरविल्यामुळंच लिहायला थोडा उशीर होतोय. 



उत्तर प्रदेशात इतक्या जाती आणि त्यांच्या उपजाती की बस्स... शिवाय कोणत्याच एका जातीची मक्तेदारी नाही. म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रात कसं, मराठा अधिक कुणबी अशी बेरीज केली की इतर सर्व जाती खिजगणतीतही राहत नाहीत. उत्तर प्रदेशात मात्र, ओबीसी, एससी-एसटी, ब्राह्मण, यादव आणि कुर्मी वगैरे सर्वच जातींची टक्केवारी ताकद दाखविण्याइतपत असल्याने इथली राजकीय गणितं किचकट नि गुंतागुंतीची आहेत. शिक्षण नाही, हेच याचं मुख्य कारण. 

शिक्षण नसल्यामुळे लोक छोट्या छोट्या गोष्टींवर अवलंबून राहतात. राजकारणी देखील दर पाच वर्षांनी नागरिकांना काही तरी आश्वासनांचा तुकडा टाकतात. मतदारही त्यावर समाधान मानतात आणि अशातच पाच वर्षे निघून जातात, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिकण्याचं प्रमाण वाढल्याशिवाव गत्यंतर नाही. तोपर्यंत राजकारणी जातीपातींचा आणि धाक दडपशाहीचा असाच उपयोग करीत राहणार.

ढोबळपणे विचार करावयाचा झाल्यास उत्तर प्रदेशात एससी मतदारांची टक्केवारी जवळपास २२ टक्के आहे. एसटी व्होट दोन ते अडीच टक्के. सर्वसाधारणपणे चौदा ते सोळा टक्के ब्राह्मण, १५ टक्के यादव, १५ टक्के कुर्मी, तीन टक्के लोध, दहा टक्के ठाकूर, तीन टक्के बनिया आणि २५ ते २८ टक्के मुस्लिम आहे. जवळपास १५ ते २० मतदारसंघांमध्ये मुस्लिमांची टक्केवारी पन्नासहून अधिक आहे. 

दलित समाजाला उत्तर प्रदेशात गौतम म्हणून संबोधिले जाते. अनुसूचित जाती आणिजमाती देखील किरकोळ किरकोळ जातींमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. चर्मकार, पासी (कैकाडी), राजभर (नदी काठावर राहणारे), केवट, मल्लाह (नावाडी), निषाद (अतिपिछडे) वगैरे जाती एससी कॅटॅगरीत येतात. आजही हा समाज बहुतांश ठिकाणी मायावती म्हणजेच बहुजन समाज पार्टीच्या पाठिशी आहे. दलित समाज आतापर्यंत बसपाशी एकनिष्ठ असला तरीही त्या बालेकिल्ल्याला तडे जाऊ लागले आहेत.  



भर, बिन्द, कहार, कश्यप, धीवर, केवट, धीमर, बाथम, माँझी, प्रजापती, कुम्हार, तुरहा, गौड आणि गौड समाजाला समाजवादी पार्टीने अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे या जातींमधील काही जाती मुलायमसिंह यांच्या पाठिशी उभ्या राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे मोदी लाटेचा परिणाम दलित समाजावरही काही प्रमाणात झाला असून काही टक्क्यांपर्यंत हिदू दलित भाजपकडे वळत असल्याचे चित्र आहे. अर्थात, ही टक्केवारी नेमकी किती आहे, ते निकालांनंतरच कळणार आहे. शिवाय गेल्या निवडणुकीत मायावती यांना साथ देणा-या ब्राह्मण समाजाने बसपाला कधीच सोडचिठ्ठी दिली असून त्यांनी पुन्हा एकदा  भाजपाशी घरोबा केला आहे. 


दुसरीकडे मुझफ्फरनगरच्या दंगलीनंतर मुस्लिम समाज दुखावला गेला असून त्यांनी काँग्रेसच्या पाठिशी ठामपणे उभे राहण्याचे मनोमन ठरविले आहे. समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजेंद्र चौधरी यांना ही गोष्ट मान्य नाही. ते म्हणतात, जरुर काही ठिकाणी मुस्लिम आमच्यावर नाराज होऊन काँग्रेसच्या पाठिशी गेला आहे. मात्र, सगळीकडेच हे चित्र नाही. मुलायमसिंह यादव यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यापासून मुस्लिमांची साथ समर्थपणे दिली आहे. शिवाय उत्तर प्रदेशात सत्तेवर आल्यानंतर आमच्या सरकारने अल्पसंख्याक समाजासाठी अनेक योजना राबविल्या आहेत. त्यामुळे मुस्लिम आमच्यापासून दूर गेला, असे म्हणणे चुकीचे आहे. 

मुलायम यांच्यासाठी आणखी एक धोकादायक गोष्ट म्हणजे त्यांची हक्काची व्होटबँक असलेल्या यादव समाजापैकी काहीजण त्यांच्यावर नाराज आहेत. मी देखील  विचारांनी कट्टर मुस्लिम असून आयुष्यभर राहीन, अशा आशयाचे काही विधान मुलायम यांनी काही महिन्यांपूर्वी केले होते. त्यामुळे अगदी अल्प असला तरीही यादव समाज त्यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे मुलायम यांच्या अडणचींमध्ये भरच पडली आहे. 



बहुतांश ठिकाणी मुस्लिम आणि काही ठिकाणी दलित तर काही ठिकाणी किरकोळ प्रमाणात ब्राह्मण मतदार काँग्रेसकडे एकवटला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसची हालत वाटते तितकी खराब होण्याची शक्यता नाही. उलट यंदा मोदी लाटेचा सर्वाधिक फटका नेताजी आणि बहनजी यांना बसणार आहे. काँग्रेसला फटका बसला तरीही  इतर राज्यांची तुलना करता तो किरकोळ स्वरुपाचा असेल. 


भाजपची यंदा चांदी आहे. हक्काचा ब्राह्मण मतदार त्यांच्याकडे वळला आहे. ठाकूर समाज त्यांच्या पाठिशी कायमच असतो. राजनाथसिंह मुख्यमंत्री असताना काही अतिपिछड्या जातींना आरक्शण देण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यापैकी काही समाज आजही भाजपच्या पाठिशी आहे. हिंदू-मुस्लिम धुव्रीकरणामुळे जसा मुस्लिम काँग्रेसकडे एकवटला तसा हिदू भाजपकडे एकवटतो आहे. त्यात एससी आणि एसटी समाजाच्या काही जातींचाही समावेश आहे. त्यामुळे इतर तीनही पार्टीना या ना त्या स्वरुपात फटका बसत असताना भाजप मात्र, एकटा फायद्यात आहे. तूर्त तरी. निकालांनंतर ही गणिते कितपत खरी आहेत, त्यावर शिक्कामोर्तब होईल.

प्रत्येक जातीला महत्त्व असल्यामुळे की काय अनेकदा तुम्हाला तुमची जात अगदी सहजपणे विचारली जाते. किंवा समोरचा माणूस सहजच बोलता बोलता स्वतःची जात सांगून जातो. भैय्या हम पासी है... चर्मकार, क्या आप पंडित हो..., यह यादव है मुलायमसिंह की जातवाले..., वो कुर्मी है... अशी वाक्य अगदी सहजपणे कानावर पडत असतात. आपण एक दिवस भेटणार, दोन तास गप्पा मारणार आणि मग कशाला हवीय जात न बित हा विचार इथं फोल ठरतो. प्रत्येकाला जातीचा अभिमान आहेच, पण समोरच्याची जात जाणून घेण्याची उत्सुकता पण आहे. 



जातीप्रमाणेच आपल्या राजकीय निष्ठेचं प्रदर्शन करणं इथल्या लौकांना प्रौढीचं वाटतं. म्हणजे लोक उगाचच मोदी किंवा आम आदमीच्या टोप्या घालून हिंडतील. प्रचारादरम्यान ठीक आहे. पण घरातून भाजी आणायला येताना, चहा प्यायला येतानाही टोप्या घालून येतील. स्वतःच्या घरांवर राजकीय पार्टींचे झेंडेच लावतील, हातगाडीवर किंवा सायकलरिक्शेवर किंवा ऑटोवर पार्टीचे झेंडे लावून हिडतील, दुकांनांवर मोठे स्टीकर्स किंवा बॅनर्स लावतील... असं बरच काही. स्टीकर्स, झेंडे, बिल्ले, बॅनर्स, काही ठिकाणी रंगविलेल्या भिंती, टोप्या, प्रचार करीत हिंडणा-या ऑटो असा आपल्या इथं काहीसा हरविलेला प्रचाराचा माहोल इथं अजूनही अनुभवायला मिळतो. 

अशा सर्व गोष्टींबरोबरच जाहीर सभा, मेळावे, पदयात्रा, कोपरा सभा यांच्यावर राजकीय पार्ट्यांचा आणि नेत्यांचा भर आहे. आपल्याला अनुकूल असलेल्या भागांमध्ये गावागावांत जाऊन मतदारांशी संवाद साधायचा, विशेष अनुकूल नसलेल्या गावांमध्ये धावती भेट द्यायची, मोठ्या शहरांमध्ये किंवा तालुक्याच्या गावांमध्ये रोडशो करून अधिकाधिक भाग कव्हर करायचा, एखाद्या आपल्या गावात विरोधकांकडून पैसा वाटला जातोय किंवा आमिष दाखवलं जातंय,  असं कानावर आल्यानंतर तातडीनं तिथं मिटींग लावणं वैगेरे गोष्टी आपल्याकडेही थोड्या बहुत प्रमाणात अशाच पद्धतीनं होतात. 

भाजपा, काँग्रेस आणि समाजवादी पार्टीचा प्रचार अशाच पद्धतीनं सुरू असला तरीही बसपाचा प्रचार इतर पार्टींसारखा जाणवत नाही. म्हणजे त्यांचे खूप बॅनर्स, खूप होर्डिंग्ज किंवा स्टीकर्स-पोस्टर्स दिसणार नाहीत. चौकाचौकात कोपरा सभा होताहेत, रॅली निघालीय, असं दृष्यही अभावानंच पहायला मिळेल. सभा फक्त बहनजी मायावती यांचीच. बसपाची प्रचार पद्धत एकदम निराळी. 




बसपाचा प्रचार सायलेंट स्वरुपात असतो. घरोघरी जाऊन प्रचार करणं ही बसपाची पद्धत. बसपाची बूथ स्तरावरील यंत्रणा भक्कम आहे. त्यांचे संघटन मजबूत आहे. बसपाने एससी सेल, एसटी सेल, ब्राह्मण सेल, ओबीसी सेल असे विविध जातींचे सेल बनविले आहेत. हे लोक विविध गावांमध्ये जाऊन संबंधित सेलमार्फत तेथील मतदारांचे मेळावे भरवितात. त्यांच्याशी संवाद साधतात. जास्त गाजावाज न करता मतदारांपर्यंत, त्यातही आपल्या हक्काच्या मतदारांपर्यंत पोहोचून व्होट बँक अबाधित ठेवण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे मतदारसंघात फिरल्यानंतर बसपाचा प्रचार पटकन जाणवत नाही. पण यंत्रणा कार्यरत असते. 

तूर्त तरी उत्तर प्रदेशातील जातीची गणितं अशी आहेत. ही समीकरणं अखेरच्या टप्प्यापर्यंत अशीच राहतात, की त्यामध्ये अचानक काही बदल होतात, ते आपल्याला निवडणूक निकालांनंतरच कळेल. तोपर्यंत तरी आहे हे असं आहे.