Monday, April 04, 2011

करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला

तमिळनाडूच्या प्रचारातून टू जी गायब


संपूर्ण देशाला हादरवून टाकणा-या टू जी घोटाळ्यामुळे मंत्रिपद गमवावे लागलेल्या ए. राजा यांच्या तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात या महाघोटाळ्याचा साधा उल्लेखही होताना दिसत नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे अण्णा द्रमुकच्या नेत्या जे. जयललिता यांनीही या मुद्द्दायाला हात न घालता थेट करुणानिधी यांच्या घराणेशाहीवरच हल्ला चढविला आहे. पावणे दोन लाख कोटींच्या टू जी घोटाळ्यामुळे आम्हाला कुठे काय फरक पडतो, असा उलट सवाल विचारून तमिळ मतदारही हा मु्द्दा निकालात काढत आहेत.

केंद्र सरकारला अडचणीत आणणा-या टू जी घोटाळ्यातील प्रमुख आरोपी ए. राजा हे सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम पक्शाचे. त्यामुळे द्रमुकला अडचणीत आणण्यासाठी विरोधी पक्शनेत्या जे. जयललिता हा मुद्दा हिरीरीने मांडतील, असा विचार पुण्याहून चेन्नईला येताना मनात आला होता. मात्र, जयललिता नव्हे तर डीएमडीके पक्शाचे नेते विजयकांत यांनी देखील टू जी घोटाळ्याबद्दल ब्र देखील काढला नसून वाढती महागाई, राज्यातील विजेचे संकट आणि करुणानिधी यांच्या कुटुंबीयांची दादागिरी आणि राज्यभरात वाढलेल्या गुन्हेगारीच्या घटना या नेहमीच्याच मुद्द्यांभोवती विरोधकांचा प्रचार फिरत आहे.

करुणानिधी आता थकले असून वयाच्या ८७ व्या वर्षी त्यांना विश्रांतीची गरज आहे. दुसरीकडे करुणानिधी यांचे पुत्र स्टॅलिन आणि अळगिरी तसेच कन्या कनिमोळी यांच्यामध्ये नेतृत्त्वावरून प्रचंड मतभेद आहेत. हाच मुद्दा जयललिता त्यांच्या भाषणांमधून हायलाईट करीत आहेत. शिवाय जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये समावेश होईल, इतकी संपत्ती करुणानिधी कुटुंबाने ओरबाडली आहे, असा आरोप जयललिता करीत आहेत. दुसरीकडे कोईमतूर, सेलम आणि इरोड यासारख्या पश्चिमी जिल्ह्यांमध्ये रंगाचे कारखाने आणि यंत्रमाग यांची संख्या प्रचंड आहे. त्यांना भारनियमनाचा फटका बसत असून हाच मुद्दा जयललिता यांनी लावून धरला आहे. तमिळनाडूच्या दक्शिण भागात द्रमुकच्या अळगिरी यांचे वर्चस्व असून त्यांची दादागिरी आणि तेथील वाढती गुन्हेगारी हे मुद्दे जयललिता यांच्या भाषणांमध्ये प्रामुख्याने येतात.

टू जी स्पेक्ट्रमसारखा महाप्रचंड घोटाळ्याचा मुद्दा हातात असतानाही जयललिता त्याला महत्त्व का देत नाहीत, यावर तमिळनाडूतील वरिष्ठ राजकीय विश्लेषक श्री. मणी म्हणाले, की मुळात टू जी हा घोटाळा तमिळनाडूतील लोकांपर्यंत पोहोचलेला नाही. तो घोटाळा म्हणजे नक्की काय झाले आणि त्याचा आपल्याला थेट काय फटका बसणार हे त्यांना समजलेले नाही. अशा परिस्थितीत महागाई, भारनियमन आणि करुणानिधी यांच्या कुटुंबियांचे पटकन नजरेत भरणारे वैभव हे मुद्दे सामान्य नागरिकांच्ा अत्यंत जिव्हाळ्याचे आहेत. ते मुद्दे पटले तरच लोक मते देतील. टू जीमुळे फारशी मते मिळणार नाहीत, हे जयललिता यांना ठाऊक आहे. त्यामुळेच त्यांनी आणि विजयकांत यांनी हा मुद्दा भाषणांमध्ये काढला नाही.

बॉक्स

द्रमुकचे अध्यक्श एम. करुणानिधी हे त्यांच्या समर्थकांप्रमाणेच तमिळ लोकांमध्ये कलैंग्नार या नावाने ओळखले जातात. कलैंग्नार म्हणजे कलेचे मर्म जाणणारा निष्णात कलावंत. करुणानिधी हे कलैंग्नार नावाने ओळखले जातात तर जयललिता यांचे सुप्रसिद्ध नाव म्हणजे अम्मा. पण अण्णा द्रमुकच्या कार्यकर्त्यांमध्ये त्या पुरच्ची तलैवी या नावाने लोकप्रिय आहेत. पुरच्ची तलैवी म्हणजे क्रांतिकारी महिला नेत्या. जयललिता यांचे राजकीय गुरु एम. जी. रामचंद्रन हे पुरुच्ची तलैवर म्हणून ओळखले जायचे. पुरुच्ची तलैवरचे स्त्रीलिंगी रुप म्हणजे पुरुच्ची तलैवी. त्यामुळे हा सामना कलैंग्नार आणि पुरुच्ची तलैवी यांच्यातच आहे.

आजचा शब्दः अदिरेडी. त्याचा अर्थ खूप मोठा आणि महत्वाचा. विजय या शब्दाशी सुसंगत असलेला आणि वापरला जाणारा तमिळ शब्द. भारताच्या विश्वविजयाचे वर्णन करण्यासाठी दिनकरन आणि दिनमणि वृत्तपत्रांमध्ये हा शब्द वापरलेला आहे.

हटविलेला पुतळा कण्णगी यांचा

चेन्नईतही पुतळ्याचे राजकारण

पुतळ्यावरून झालेले रणकंदन आणि त्यानंतर मध्यरात्रीच्या काळोखात अचानकपणे हलविला गेलेला पुतळा... पुण्यात घडलेल्या या घटनेसारखीच घटना चेन्नईमध्येही घडली होती, जवळपास दहा वर्षांपूर्वी. रातोरात हटविल्या
गेलेल्या पुतळ्यामुळे संपूर्ण तमिळनाडूत त्याचे तीव्र पडसाद उमटले होते आणि साहित्यिक, कलावंत सामान्य नागरिकांनही त्याचा तीव्र शब्दात निषेध केला होता. हटविण्यात आलेला पुतळा होता महिलांच्या न्यायासाठी झगडणा-या आणि तमिळ महिलांचा आदर्श असलेल्या कण्णगी यांचा.

आठव्या शतकातील एका तमिळ महाकाव्यामध्ये कण्णगी या नायिका असून त्यांनी न्यायाच्या रक्शणासाठी आणि महिलांच्या हक्कांसाठी लढा दिला, असे त्या महाकाव्याचा आशय आहे. त्यामुळे गेल्या अनेक शतकांपासून कण्णगी या तमिळ अस्मितेच्या मानबिंदू बनलेल्या आहेत. कण्णगी हे पात्र काल्पनिक असले तरी
तमिळनाडूच्या काही भागात त्यांची आजही पूजा केली जाते. १९६८ साली झालेल्या वर्ल्ड तमिळ क़ॉन्फरन्समध्ये ठराव केल्यानंतर कण्णगी यांचा पुतळा मरीना बीच येथे बसविण्यात आला होता. पण २००१ मध्ये अण्णा द्रमुकचे
सरकार सत्तेवर असताना तो पुतळा एकाएकी रात्री अचानक हलविण्यात आला. त्यावेळी अण्णा द्रमुकचे . पनीरसेल्वम हे मुख्यमंत्री होते. जयललिता यांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी
पनीरसेल्वम आले होते.



पुतळा हटविण्याची तीन वेगवेगळी कारणे सांगितली जातात. पहिले कारण म्हणजे जयललिता यांच्यावर ओढविलेले संकट हे कण्णगी यांच्या पुतळ्यामुळे आलेले आहे. तो पुतळा त्याठिकाणी असल्यामुळेच जयललिता यांचा कठीण काळ सुरु झाला आहे, असे कोणीतरी जयललिता यांच्या मनात भरविल्यामुळेच तो पुतळा हटविण्यात आला, अशी एक थिअरी आहे. दुसरे म्हणजे कण्णगी यांच्या पुतळ्याची पाठ समुद्राकडे आहे, त्यामुळे पावसाने तमिळनाडूकडे पाठ फिरविली आहे, अशा कंड्या कोणीतरी पिकविल्या आणि त्यामुळे पुतळा हटविण्यात आला, असे काही जण सांगतात. अर्थात, सरकारने दिलेले कारण म्हणजे वाहतुकीला होत असलेला अडथळा. एका वाहनाने कण्णगी यांच्या पुतळ्याला धडक दिली होती, त्यामुळे तो दुरुस्तीसाठी हटविण्यात आला, अशी माहिती मुथ्थू रामचंद्रन यांनी दिली.

पुतळा हटविण्यात आल्यानंतर राज्यभरात सर्वत्र हलकल्लोळ माजला होता. लोकांनी निषेध मोर्चे काढले. विरोधकांनी एकत्र येऊन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण जयललिता या कोणालाही बधल्या नाहीत. पुतळ्याला हानी पोहोचू नये, म्हणून तो वस्तूसंग्रहालयात ठेवण्यात आलेला आहे. पुतळा सुस्थितीत आहे, इतकेच जयललिता आणि पनीरसेल्वम माध्यमांना सांगत होते.

पुतळा हटविण्याचा विषय २००६ साली झालेल्या निवडणुकीचा मुद्दा झाला होता. पुन्हा सत्तेवर आलो तर पूर्वीच्याच ठिकाणी पुतळा पुन्हा सन्मानाने बसवू, असे आश्वासन करुणानिधी यांनी दिले होते. ते त्यांनी पाळले देखील. आज
कण्णगी यांचा पुतळा मरीना बीचवर मोठ्या दिमाखात उभा आहे. त्या पुतळा हटविण्याचा आणि पुन्हा बसविल्याचा उल्लेख करण्यास करुणानिधी अजिबात विसरलेले नाहीत.

बसमधून प्रवास करताना एका सहप्रवाशाला विचारले, की यंदा जयललिता सत्तेवर आल्यातर पुन्हा पुतळा हटवतील का? त्यावर त्याने उत्तर दिले, सरकार कोणाचे येणार याचा अंदाज अजून राजकीय पक्शांनाही आलेला नाही. त्यामुळे आपण येणार की नाही, याच चिंतेत ते आहेत. त्यामुळे त्यांना पुतळ्या बितळ्याची चिंता
सध्या नाही. तो नंतरचा प्रश्न आहे.

एसएसएम क़ॉलेजमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्शण घेणा-या महेशकुमारला पुतळ्याबद्दल विचारले तर तो म्हणाला, नो आयडिया सरजी. आता बोला.

एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक...
मरीना बीचवरच तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि तमिळनाडूतील सर्वाधिक लोकप्रिय सुपरस्टार एम जी रामचंद्रन यांची समाधी आहे. २४ डिसेंबर १९८७ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाचे दुःख सहन झाल्यामुळे तमिळनाडूत त्यावेळी ३० जणांनी आत्महत्या करून आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या बरोबरच जीवन संपविले होते. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी मरीना बीच येथे एमजीआर यांची समाधी बांधण्यात आली आहे. द्रविडीयन चळवळीचे प्रमुख नेते अण्णादुराई आणि एमजीआर यांची समाधी शेजारीशेजारीच आहेत.

एमजीआर यांना महागडी घड्याळे जमविण्याचा आणि घालण्याचा मोठा शौक होता. त्यामुळे एमजीआर यांच्या काही अस्थि आणि त्यांच्या आवडीचे घड्याळ समाधीखाली ठेवण्यात आलेले आहे संपूर्ण काळ्या कुळकुळीत कडप्प्याने ही समाधी साकारलेली आहे. मध्यंतरीच्या काळात कोणीतरी अशी आवई उठविली की, समाधीच्या पृष्ठभागाला कान लावले, की अजूनही एमजीआर यांच्या घड्याळाची टिकटिक ऐकू येते. (पुण्यातही शनिवारवाड्यावर अजूनही काका, मला वाचवा, असे आवाज येत असल्याची अफवा गमतीनं का होईना कानावर येतेच) समाधीचे दर्शन घेण्यासाठी आलेले लोक दर्शन घेण्यापूर्वीच समाधीला कान लावून खरंच टीकटीक
ऐकू येते का? ते पाहतात.



वास्तविक पाहता २४ वर्षांनंतर घड्याळाची टीकटीक कशी ऐकू येईल? पण आजही अनेक जण नित्यनियमाने कान लावून आवाज येतो का? ते ऐकतात. अगदी जीन्सची पँट आणि टी-शर्ट घातलेले तरुण-तरुणी यांनाही मोह आवरता येत नाही. मग काय, मी देखील उत्सुकतेपोटी समाधीला कान लावून काही ऐकू येतंय का, ते पाहिलं.
पण अपेक्शेप्रमाणे काहीच ऐकू येत नव्हतं. माझ्यानंतर एका क़ॉलेजमधल्या तरुणानं कान लावला. त्यालाही काही ऐकू आलं नाहीच. त्याला विचारलं, काही ऐकून आलं का? हे सगळे मूर्ख आहेत, हे वाक्य उच्चारण्यापूर्वी त्यानं जो
एक शब्द (खरं तर अपशब्द) उच्चारला तो ऐकून पुण्यातच असल्याचा भास झाला आणि धन्य झालो.

आजचे वाक्यः बसमधून प्रवास करताना शेजारी बसलेल्या एका मुलाला विचारलं,
मला तमिळ शिकायचंय, हे तमिळमध्ये कसं बोलणार?
तो म्हणाला, नानकू तमिळ कोत्तुकोनम्...

तमिळनाडू डायरी...

खरा प्रचार चॅनल्सवरूनच

तमिळनाडू म्हटलं, की आपल्या डोळ्यासमोर चित्र येतं मोठमोठाले फ्लेक्स, भव्य कटआऊट्स आणि फ्लोरसंट रंगांनी रंगविलेल्या भिंती. चित्रपटातील नटनट्यांचे मोठमोठाले फ्लेक्स पाहून राजकीय नेत्यांचेही तसेच भव्य फ्लेक्स वगैरे असतील, अशी धारणा होती. पण निवडणूक आयोगाच्या निर्बंधांमुळं इथं ते काहीही नाही. भव्य फ्लेक्स आहेत. पण ते द्रमुक आणि अण्णा द्रमुकच्या कार्यालयांमध्ये. प्रचाराचा विचार करता रस्त्यांवर शुकशुकाट आहे. मधूनच एखाद दोन रिक्शा द्रमुक किंवा अण्णा द्रमुकचे झेंडे लावून चाललेल्या दिसतात. पण बाकी सारे शांतशांतच.



नुसते रस्तेच नाही तर द्रमुक आणि अण्णा द्रमुक या राज्यातील दोन प्रमुख कार्यालयांमध्येही शुकशुकाट. नेते नाहीतच आणि त्यामुळे कार्यकर्तेही नाहीत. आहेत फक्त सिक्युरिटी गार्डस आणि पोलीस. हाताच्या बोटावर मोजण्याइतके जे कार्यकर्ते दिसतात ते आपापल्या भागात प्रचार करताना येणा-या अडचणी सांगायला आलेले. द्रमुक अध्यक्श एम. करुणानिधी, त्यांचे पुत्र स्टॅलिन आणि अण्णा द्रमुकच्या सरचिटणीस जे. जयललिता यांनी सध्या चेन्नई आणि परिसरावर लक्श केंद्रीत केले आहे. जयललिता यांनी शुक्रवारी संध्याकाळी चेन्नई शहरात रोड शो घेऊन मतदारांशी संवाद साधला. तर स्टॅलिन हे शनिवारी कोळथ्थूर (चेन्नई ग्रामीण) या त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघात प्रचार करणार आहेत. रविवारी कलैंग्नार करुणानिधी यांची चेन्नईमध्ये जाहीर सभा आहे.

प्रचाराची खरी रंगत येते आहे, ती कलैंग्नार आणि जया टीव्ही या दोन चॅनल्सवर. कलैंग्नार हा करुणानिधी यांच्या मालकीचा चॅनल. तर जयललिता या जया टीव्हीच्या मालकीणबाई. अण्णा अरिवालयम इथं कलैंग्नार टीव्हीचं मुख्य कार्यालय आणि तिथंच द्रमुकचं हेडऑफिस. तर पोएज गार्डनमध्ये जे. जयललिता यांचा बंगला आणि शेजारीच जया टीव्हीचं हेडक्वार्टर. करुणानिधी यांच्या जाहीर सभा कलैंग्नारवरून लाईव्ह टेलिकास्ट केल्या जात आहेत. तर जयललिता यांचे रोड शोमधील भाषण जया टीव्हीवरून दिवसभर ऐकायला मिळतं. भाषा कळत नसली तरी जयललिता सगळीकडे एकच भाषण करतात, हे कळतं. ते देखील समोर लिहिलेल्या कागदावर वाचून. उलट करुणानिधी हे भाषणामधून मनमोकळा संवाद साधतात.

डीएमडीके पक्शाचे अध्यक्श आणि तमिळ अभिनेते विजयकांत यांनी आपल्याच कार्यकर्त्याच्या कानफटात लगाविल्याचे वृत्त सध्या इथल्या टीव्हीवर चर्चेने चघळते जाते आहे. विजयकांत यांची जयललिता यांच्याशी युती असल्याने जया टीव्हीवर त्या वृत्ताला थारा नाही. मात्र, कलैंग्नार आणि सन टीव्हीवर प्रत्येक बातमीपत्रात वारंवार ते दृष्य दाखवून चघळलं जातंय. सन टीव्ही हा दयानिधी कलानिधी मारन यांच्या मालकीचा चॅनल आहे. शिवाय दक्शिणेच्या चार राज्यांमधील ८५ टक्के केबल व्यवसाय करुणानिधी आणि कुटुंबीयांच्या हातात आहे.



इथं, जाणवलेला आणखी एक प्रकार म्हणजे लोक आपापल्या नेत्याबद्दल भरभरून बोलतात. मत देऊन आम्हाला काय फायदा, आम्ही मतदान केल्यामुळे थोडाच फरक पडणार आहे, आम्ही मतदानच करत नाही, असली वाक्य इथं ऐकायलाही मिळत नाही. अम्मा किंवा कलैंग्नार यापैकी त्याच्या आवडत्या व्यक्तीचे कौतुक तो सुरुच करतो. नुसतं कोण असं नाही तर ती व्यक्ती का पाहिजे, ते देखील दोन-चार वाक्यांमध्ये सांगतो. अर्थात, ते आपल्याला कळत नाही. पण भावना पोहोचतात.

चेन्नई म्हणजे दुसरी मुंबई. एक तर प्रशस्त रस्ते. दुसरं म्हणजे शहरातील बसव्यवस्था एकदम उत्तम आणि तिसरं म्हणजे समुद्र किनारा जवळच असल्यामुळं घाम आणि उकाडा यांचा अतूट संबंध. सकाळी आठ वाजताच अकरा साडेअकरा वाजल्यासारखं वाटतं. पण संध्याकाळ नंतर गार वारे वाहू लागल्यानंतर बरं वाटतं. इथले लोक तोडकं मोडकं हिंदी बोलतात. पण त्यापेक्शा उत्तम हिंदी बोलतात. तमिळा... असं म्हणून आपल्याला तमिळ येतं की नाही, याची खात्री करून घेतात आणि मग गाडी इंग्लिशकडे वळवितात. अर्थात, तरुण तरुणी मात्र, अधिक चांगल्या पद्धतीने हिंदीतून संवाद साधतात.

लिंबू सरवतवाल्याकडून शिकलेला आजचा तमिळ शब्दः नन्ड्री (धन्यवाद)