Tuesday, April 21, 2009

मी महाराष्ट्र बोलतोय...

लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं साम मराठी वाहिनीनं "मी महाराष्ट्र बोलतोय...' या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. राज्यातल्या विविध मतदारसंघात जायचं, गावागावात फिरायचं, तिथल्या लोकांचं मत जाणून घ्यायचं, त्यांच्यांशी बोलायचं, समस्या जाणून घ्यायच्या असं या कार्यक्रमाचं स्वरुप होतं. त्या निमित्तानं राज्याच्या विविध भागात हिंडलो. दौऱ्यादरम्यान आलेले काही अनुभव येथे देत आहोत...

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा... महाराष्ट्राचं हे वर्णन कधीतरी लहानपणी कवितांच्या पानांमध्ये वाचलं होतं. प्रत्यक्षात मात्र, आता अनुभवलं. निवडणुकीच्या निमित्तानं. महाराष्ट्राचं मत जाणून घेण्यासाठी आम्ही 25 मार्च रोजी निघालो आणि पंचवीस दिवस महाराष्ट्रभर गावागावात हिंडलो. जवळपास साडेसहा हजार किलोमीटर, तीस जिल्हे आणि लोकसभेच्या अठ्ठावीस-तीस मतदारसंघातून फिरून साम मराठीच्या टीमनं जनमताचा कौल घेतला. लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. राजकारण्यांच्या सभा आणि मेळावे हे आमच्यासाठी दुय्यम होतं. आम्हाला जाणून घ्यायचं होतं सामान्यातल्या सामान्य माणसाचं मत. सामान्य माणसाला केंद्रस्थानी ठेवूनच आम्हाला महाराष्ट्र बोलता करायचा होता.

राज्यातल्या जवळपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्ह्यात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योगधंदे आणि वाढती बेरोजगारी या समस्यांनी अक्षरशः उग्र रुप धारण केलंय. पाण्याचं सुख वगळता पश्‍चिम आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्र देखील त्याला अपवाद नाही. मात्र, अशा वादग्रस्त मुद्‌द्‌यांना हात घालण्याची राजकीय पक्षांची इच्छा नाही. हिंमत नाही, असं म्हटलं तरी चालेल. ही गोष्ट सामान्यातल्या सामान्य माणसाला कळलेली आहे. त्यामुळं सामान्य माणूस कधी राजकारण्यांवर टीका करतो तर कधी आपल्याच कर्माला दोष देतो. पुढारी दरवेळी मतं मागायला तेवढे येतात पण नंतर आमच्याकडे कधी ढुंकूनही पाहत नाहीत, ही खंत कानाकोपऱ्यात ऐकायला मिळते.

वीजटंचाई आणि पाणीटंचाई यापेक्षाही महाराष्ट्राला आज भेडसावणारी सर्वात मोठी समस्या म्हणजे बेरोजगारीची. या बेरोजगारीमुळंच धुळ्यातला एमए, बीएड झालेला तरुण फक्त पन्नास रुपायांसाठी दिवसभराचे दहा तास मान मोडून काम करतो. फक्त अकोला व वाशिम जिल्ह्यातले जवळपास दहा ते बारा हजार तरुण लष्कर भरतीसाठी अमरावतीत येतात. कुणी बारावी पास तर कुणी ग्रॅज्युएट. सैन्याच्या नोकरीची कोणतीही हमी नसताना दोनदोन-तीनतीन रात्री रस्त्यावर झोपूून काढतात. गावात उद्योग नाहीत, त्यामुळं नोकऱ्या नाहीत, राजकारणी आमच्यासाठी काहीच करत नाहीत, इतकं शिकून फायदा काय... बंदुकीतनं गोळी सुटावी, तसे प्रश्‍न बेरोजगार तरुणांच्या तोंडातनं सुटतात. उत्तर कोणाकडेच नसतं. आम्ही पण हे धगधगत वास्तव पचवण्याचा प्रयत्न करतो. पण ते पचत नाही.

विदर्भ, मराठवाड्यात जिथं शेतीची कामं नाहीत तिथं वीटभट्टीवर मोलमजुरी करुन पोट भरणारी मंडळी आम्हाला भेटली. दिवसाकाठी हजार विटा तयार केल्या की, त्यांचे 120 रुपये सुटतात. बीडमध्ये दिवसभर उन्हातान्हात राबून कापूस वेचणाऱ्या महिला भेटल्या. नंदूरबारमध्ये ऊसाच्या मळ्यात मोलमजुरी करणारे आदिवासी भेटले. पाण्याची समस्या असताना शेत हिरवीगार करण्याचा प्रयत्न करणारे शेतकरी यवतमाळमध्ये भेटले. तर अवघ्या पाच-सात रुपयांसाठी साठ साठ किलो माणसांना वाहून नेणारे सायकल रिक्षावाले नागपूरमध्ये दिसले. सूर्य डोक्‍यावर आग ओकत असताना दिवसभर या महिला, हे शेतकरी काम करुच कसं शकतात, हा प्रश्‍न अजूनही आम्हाला सुटलेला नाही. पण सारं काही पोटासाठी हे जीवनाचं सूत्र लक्षात ठेवून आम्ही आमचा प्रवास सुरु ठेवला. या मंडळींना वेळेवर रेशनचं धान्य मिळत नाही, केरोसिन पण मिळत नाही. दाद मागितली तर ती देखील मिळत नाही.

स्वातंत्र्याला साठ वर्ष उलटली तरी दुःखाची गोष्ट अशी की, अजूनही अनेक ठिकाणी महिलांना पुरुषांइतकी मजुरी मिळत नाही. ""आम्ही पण पुरुषांइतकंच काम करतो. कदाचित थोडं जास्तच. मग आम्हाला पुरुषांच्या निम्मी मजुरी का...'' हा नंदूरबारमधल्या एका आदिवासी महिलेनं विचारलेला प्रश्‍न आम्हाला अनुत्तरित करणारा होता. कदाचित राज्याचं नेतृत्व करणाऱ्या मंत्र्या संत्र्यांकडेही त्याचं उत्तर नसावं.

सिंचनाची समस्या असल्यामुळं विदर्भ आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आहे. सिंचन हीच इथली सर्वात महत्वाची समस्या आहे. शेतीच्या पाण्याची समस्या आहे. पाणीच नसल्यामुळं उद्योगधंद्यांनीही पाठ फिरवलीय. अर्थात, गेल्या साठ वर्षात सत्ताधाऱ्यांनी केलं काय, हा प्रश्‍न आपल्याला पडतोच पडतो. पाऊस नसल्यामुळं सिंचनाचा प्रश्‍न निर्माण झाला, हे सरळसोट उत्तर पटूच शकत नाही. गुजरातच्या नरेंद्र मोदींनी साबरमतीचं पाणी कच्छच्या वाळवंटात नेऊन शेतं हिरवीगार केली. मोदींच्या नावानं खडे फोडणाऱ्यांनी अशा पद्धतीनं विदर्भ-मराठवाड्याचा सिंचनाचा प्रश्‍न का सोडवला नाही? तशी इच्छाशक्ती महाराष्ट्रातल्या नेत्यांना का दाखवता आली नाही, या प्रश्‍नाला खरं तर उत्तर मिळालं पाहिजे. पण ते मिळत नाही आणि मिळणार नाही.

धुळ्यात तर अनेक ठिकाणी तापी बॅरेजमुळं पाणी आहे, काळी कसदार जमीनही आहे. पण विजेच्या अनियमिततेमुळ बॅरेजमधलं पाणी उचलून शेतीला देणं शेतकऱ्यांना परवडत नाही. त्यामुळंच ज्यांच्याकडे पैसे आहेत तेच शेतकरी शेती करतात. अशीच काहीशी परिस्थिती नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाची आहे. बॅरेजचं पाणी उचलून शेतीसाठी वापरायचं तर ते बिसलेरी पाण्याच्या दरानं पडतं. मग असला उपद्‌व्याप कोण करणार? जमीन आहे, पाणी आहे. पण तरीही आपण काहीच करु शकत नाही, यापेक्षा अधिक दुर्भागी शेतकरी कोणता असेल. असा शेतकरी दाद मागणार तरी कोणाकडे?

सिंचनाच्या समस्येमुळं शेतीसाठी पावसावर अवलंबून रहावं लागतं. पावसाचा लहरीपणा लक्षात घेता पेरलेलं बियाणं, खतं आणि इतर खर्च वाया जाण्याची शक्‍यताच अधिक. अशा परिस्थितीत शेतकरी कर्जबाजारी झाला नाही तरच नवल. मग तुम्ही कितीकी कर्जमाफी द्या किंवा कर्जमुक्ती करा, सातबारे कोरे करा नाही तर त्याला आर्थिक सहाय्य द्या, काहीही फायदा नाही. शेतीसाठी नियमित पाणी द्या आणि शेतीमालाला हमी भाव द्या इतकीच मागणी शेतकऱ्यांची आहे. कधी बियाणांमध्ये फसवणूक तर कधी खतांची टंचाई अशा परिस्थिती शेतकरी नाडला जातो आणि कर्जाच्या दुष्टचक्रात अडकतो. मग कोणतीच कर्जमाफी त्याला सावरु शकत नाही आणि आत्महत्यांचा आकडा फुगत जातो.

आत्महत्यांच्या प्रदेशात...
अकोल्याजवळच्या एका खेड्यात शेतकरी आत्महत्या केलेल्या कुटुंबाच्या घरी आम्ही पोचलो. आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीसह घरात पाच जणी. स्वतः पत्नी आणि चार मुली. आधी पाच मुली होत्या. पण आजारपणात औषधांअभावी एक मुलगी दगावली. आता या चार मुलींच्या आईला आठवड्यातनं तीन-चार दिवस मजुरीची काम मिळतात. रोजची मजुरी पंचवीस रुपये. आता या पंचवीस रुपयांमध्ये पाच जणींचा संसार चालणार कसा, हे कोडं कोणताच अर्थमंत्री सोडवू शकत नाही. मग कधी कधी फक्त पाणी पिऊन झोपणं, हा एकमेव उपाय त्यांच्या हातात असतो. मुळात मुलगा व्हावा, या हव्यासापायी अजूनही अडाणी-अशिक्षित नागरिक चार-पाच मुलींना जन्म देतात, ही गोष्ट क्‍लेशदायक नाही का? याबाबत जागृती करण्यासाठी कोणताच पक्ष का पुढे येत नाही???

अकोल्यासारख्या शहरात दहा दहा दिवसांनी पाणी येतं. त्यामुळं इथल्या नागरिकांना आपल्या घरी पाहुणेच येऊ नये, असं वाटतं. थोडंसं आश्‍चर्य वाटेल, पण हे खरंय. दुसरीकडे गावातल्या नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. म्हातोडी... अकोल्यापास्नं अवघ्या पंधरा किलोमीटरवर असलेलं छोटं खेडेगाव. आटलेल्या नदीमध्ये चार-पाच फूट खड्डे खणून मग वाटी किंवा भांड्याच्या सहाय्यानं पाणी गोळा केलं जातं. रात्री दोन-चार वाजताही पाण्यासाठी नदी गाठावी लागते. मग सहावीत शिकणाऱ्या ममतालाही आपल्या वजनाइतका पाण्याचा हंडा उचलावाच लागतो किंवा परीक्षा सुरु असतानाही बाळूला चार-पाच तास पाणी भरण्यासाठी वेचावे लागतात. या मंडळींच्या आयुष्यात "जय हो...' कधी होणार आणि कोण करणार?

म्हातोडीपास्नं पाच मिनिटांच्या अंतरावर असलेल्या आणखी एका गावातली परिस्थिती गमतीशीर आहे. गावात पाणी नाही, वीज नाही पण मोबाईल टॉवर मात्र दिमाखात उभा आहे. मोबाईलला रेंज आहे. पण मोबाईल चार्ज करण्यासाठी वीज मात्र नाही. विकासाची ही थट्टा पाहून आम्हाला सरकारची किंवा यंत्रणेची कीव करावीशी वाटली.

विकासाची बोंबाबोंब
धुळे आणि नगर जिल्ह्यासाठी बांधण्यात येणाऱ्या काही धरणांची कामं तर गेल्या पंचवीस-पंचवीस वर्षांपास्नं रखडली आहेत. आता या धरणांच्या बांधकामाचा खर्च हजारो कोटींनी वाढलाय. त्याला जबाबदार कोण? आणि कोणाच्या खिशातनं त्याची वसुली करायची, असा सवाल करायला लोक मागेपुढे पाहत नाही. शहरातनं बाहेर पडलं की टोलनाका आलाच. मुंबई-नागपूर रिटर्न या मार्गावर जवळपास पंचवीसशे रुपयांचा टोल द्यावा लागतो. सर्व रस्ते बीओटी तत्वावर बांधायचे असतील आणि खासगी कंपन्यांच्या घशात पैसे कोंबायचे असतील तर सरकारचं सार्वजनिक बांधकाम खातं करायचं काय, असा खणखणीत सवाल ट्रकचालक विचारतात.

कोणी "जय हो...'चा नारा देऊन निवडणूक लढतोय, तर कोणी देशाला कणखर नेतृत्व देण्याची घोषणा करतोय. पण सर्वसामान्य नागरिकांच्या वीज, पाणी आणि नोकरी अशा अगदी माफक मागण्यांकडे लक्ष द्यायला कुणालाच वेळ नाही. कारण जाहीरनामे, भाषणबाजी आणि मतदारांना आश्‍वासनांचे बोल बच्चन देणाऱ्या राजकीय पक्षांसाठी अशा गोष्टी अडचणीच्या ठरतात. त्यामुळंच समर्थ भारत, सक्षम भारत अशा गुळगुळीत संज्ञांचा प्रचारात वापर होतो आणि मूळ मुद्दे दुर्लक्षितच राहतात.

अशामुळेच नंदूरबारमधनं सलग आठ वेळा निवडून आलेले कॉंग्रेसचे माणिकराव गावित अजूनही विकासाच्या मुद्‌द्‌यावर नव्हे तर कॉंग्रेसच्या पुण्याईवर दिल्ली गाठतात. सलग तीनवेळा खासदार होऊनही भावनाताई गवळी वाशिमचा कायापालट करु शकत नाही. कॉंग्रेसला एकहाती पाठिंबा देऊनही धुळ्याच्या अक्कलपाडा धरणाचा प्रश्‍न पंचवीस वर्षांपास्नं प्रलंबित राहतो. शिवसेनेच्या पाठिशी उभं राहूनही परभणीत उद्योगधंदे येत नाहीत, रोजगारनिर्मिती होत नाही. अमरावतीत अनंत गुढे यांच्याबद्दलही तीच ओरड ऐकू येते.

गुरु ता गद्दी सोहळ्यासाठी आलेला निधी कसा वापरायचा याचं नियोजन न झाल्याचा सूर मुख्यमंत्र्यांच्या नांदेडमध्ये ऐकू येतो. दहा-दहा वर्षे आमदारकी भूषवूनही माढ्याचा एसटी स्टॅंड अत्यंत थर्ड क्‍लास स्वरुपाचा वाटतो. मग शरद पवारांसारखा नेता येईल आणि तो स्टॅंडची सुधारणा करेल, अशी भाबडी आशा इथल्या गावकऱ्यांना वाटते. स्टॅंड सुधारणं हे खासदाराचं काम नाही, हे त्यांना सांगूनही पटत नाही. अकलूजचा विकास होतो. पण अकलूजपास्नं पंधरा किलोमीटरवर असलेलं माळशिरस हे तालुक्‍याचं ठिकाण अजूनही अविकसितच राहतं, हे कशाचं उदाहरण म्हटलं पाहिजे.

गावागावात फिरताना अशा अनेक गोष्टी आम्ही ऐकल्या. काळवंडलेले चेहरे आणि पिचलेली माणसं अधिक पोटतिकडीनं बोलतात. पोटावर हात असलेल्या लोकांपेक्षा हातावर पोट असलेले लोक अधिक तडफडीनं समस्या मांडतात. आपलं म्हणणं ऐकून घ्यायला कोणीच नाही. सरकार नाही, मंत्री नाही, आमदार-खासदार नाही, पोलिस नाही, न्याययंत्रणा नाही, अगदी कोणीकोणीच नाही. मग हे च्यानलवाले तरी आपलं म्हणणं ऐकून घेताहेत याचंच त्यांना बरं वाटतं. आपल्या मागण्यांना दाद मिळेल किंवा नाही, याची फिकीर तो करत नाही. पण आपलं म्हणणं ऐकून घेतल्याचं समाधान त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. हेच समाधान आम्हाला हवं होतं. कारण आम्हाला जो महाराष्ट्र बोलता करायचा होता तो हाच होता...

Tuesday, February 24, 2009

"शिववडा'च्या निमित्तानं...


चला वडापावच्या गाड्यांवर...

महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी बटाटा वडा खाल्लाय. पण मुंबईतल्या एक-दोन ठिकाणचा (सोकॉल्ड कॉर्पोरेट वडापाव) अपवाद वगळला तर दुसरीकडे कुठेही बटाटा वड्याची चव खराब लागली नाही. त्यामुळं "शिववडा' तरी काय वेगळा असणार,'' असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विचारलाय. हे वाचल्यानंतर मी खरोखरच विचार करु लागलो. रस्त्यावर ठिकठिकाणी लागणाऱ्या वडापावच्या गाड्यांवर अनेकवेळा वडा खाल्लाय. पण कुठेच मला वडा आवडला नाही, असं झालं नाही. आवडण्याचं प्रमाण कमी-अधिक असेल पण गाडीवरचा वडा आवडतोच. (मुळात वडापाव ही डिश माझी "वन ऑफ फेव्हरेट' आहे, हे सांगायला नकोच) त्यामुळं राज ठाकरेंच्या म्हणण्यात नक्कीच तथ्य आहे, हे मला पटलं आणि शिवसेना "शिववडा'च्या रुपानं नेमकं नवं काय देणार आहे, हा विचार उगाच मनात डोकावून गेला.
मुंबईतला वडापाव उर्वरित महाराष्ट्रात गेला आणि बटाटा वडा ही महाराष्ट्राची ओळख बनली. शिववडा मुंबईपुरताच मर्यादित असला तरी मला उगाचच पुण्यातल्या चवदार वड्यांचे स्पॉट्‌स डोळ्यासमोर उभे ठाकले. पुण्यात खरा वडा मिळतो तो हातगाड्यांवर. जोशी वडेवाले किंवा रोहित वडेवाले यांनी वडापावला गाडीवरुन दुकानात नेलं. पण गाडीवर मिळणारा वडापाव अजूनही लोकांच्या चवीस उतरतो. पूर्वी "प्रभा'च्या वड्याची चर्चा सगळीकडे होती. अजूनही जुन्या पिढीतले लोक "प्रभा'चं गुणगान गात असतात. पण हा झाला इतिहास. "प्रभा'च्या तोंडात मारतील असे "हॉटस्पॉट्‌स' आज पुण्यात आहेत. उलट प्रत्येकानं वड्याची स्वतःची वेगळी चव तयार केलीय. तसंच चव टिकवलीही आहे. त्यामुळं "प्रभा'ची प्रभावळ आता हळूहळू ओसरु लागलीय, यात शंका नाही.
टिळक स्मारक किंवा बालगंधर्वमध्ये कार्यक्रमाच्या मध्यंतराला मिळणारा बटाटा वडा हे देखील त्यात आहेतच. शनिपार चौकात भोज्या देवडी यांची गाडी, सहकारनगरमधला कृष्णा वडापाव, कॅम्पात लोकसत्ता कार्यालयाजवळ मिळणारा वडा, पत्र्या मारुतीच्या पाराजवळ लागणारी मामांची गाडी, दांडेकर पुलाजवळचे खराडे वडेवाले, नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळची गाडी, पुणे विद्यार्थी गृहाजवळचा वडापाव, शास्त्री रस्त्यावरच्या अजंठामधला वडा, वसंत चित्रपटगृहाजवळचा अन्नपूर्णाचा वडा, झेड ब्रिजच्या जंगली महाराज रस्त्याच्या बाजूची गाडी, रतन चित्रपटगृहाजवळची मधली गाडी, तुळशीबागेत सकाळी रौनकच्या दाराशी मिळणारा खर्डा-वडा किंवा अगदी खडकवासल्याच्या बॅकवॉटरजवळ असणाऱ्या वडापावच्या गाड्या... ही यादी अशीच वाढत जाईल. वडा किंवा भज्यांचा घाणा निघत असेल आणि आपण या परिसरातनं जात असू तर आपण वड्यांच्या गाडीकडे खेचलो जातोच. अगदी इच्छा नसतानाही. हीच तर त्यांच्या चवीची खासियत आहे. दगडूशेठ गणपती मंदिराच्या समोर नव्यानंच उघडण्यात आलेल्या "गोली वडापाव'चा अपवाद सोडला तर बहुतांश ठिकाणी वडापाव खाल्ल्याचा पश्‍चात्ताप कधीच झालेला नाही.
वडा गरमागरम असेल तर मग विचारुच नका. खोबरं-कोथिंबिरीची हिरवी तिखट चटणी, चिंचगुळाची किंवा खजुराची गोड-आंबट चटणी, कांदा लसूण मसाला, बारीक चिरलेला कांदा आणि तळून खारावलेल्या मिरच्या या गोष्टी वड्याची चव वृद्धिंगत करतात. पण मूळच्या वड्याची चव खतरा असेल तर या पूरक गोष्टींची गरजच पडत नाही. प्रत्येक ठिकाणच्या वड्याची चव निराळी आणि पूरक पदार्थांचा मामलाही निराळा. त्यामुळं प्रत्येक वेळी नाविन्याचा अनुभव येतो. "प्रभा'च्या वड्यामध्ये लिंबाचा रस जाणीवपूर्वक वापरल्यासारखा वाटतो. दांडेकर पुलावरचा खराडेंचा वडा काहीच्या काही झणझणीत असतो की विचारता सोय नाही. पत्र्या मारुतीजवळ मामांच्या गाडीवर तिखट चटणी घेतल्याशिवाय वड्याची चव लागतच नाही. लोकसत्ताच्या जवळ मिळणाऱ्या वड्याचा आकार पाहूनच थक्क व्हायला होतं. तिथल्या मिरच्यांना मिठाप्रमाणेच हळदही लागलेली असते. म्हणजे भन्नाटच!
कृष्णा, खराडे आणि पत्र्या मारुती...
पूर्वी कृष्णाचा वडापाव एकदम मस्त होता. पण आता तिथल्या वड्याचा आकार कमी आणि पावाचा आकार भलता मोठा अशी परिस्थिती आहे. त्यामुळे गोंधळून जायला होतं. पण कृष्णाच्या वड्याची चव अजूनही तशीच आहे. शिवाय इथं घाणा काढल्या काढल्या वडे संपतात. त्यामुळं प्रत्येक वेळी गरमागरम वडा. त्यामुळं इथं फक्त वडा घेणं हेच सोईस्कर आहे. पत्र्या मारुतीजवळ मिळणारा वडा चवीला परिपूर्ण नसतोच. वड्याच्या आतल्या सारणामध्ये मीठ आणि तिखंट थोडंसं कमीच असतं. त्यामुळं पावाला झणझणीत चटणी लावल्यानंतर ही कसर भरुन निघते. म्हणूनच इथं वड्यासोबत चटणी घेतली तरच मजा आहे. नही तो बात जमेगी नही... खराडेंच्या वड्याचा पहिला घास घेतल्यानंतर पाणी मागितलं नाही तरच नवल. पण एक वडा खाल्ल्यानंतर दुसरा वडा खाण्यासाठी जीभ खवळली नाही असं कधीच होत नाही.
रामनाथचाही वडाच...
आणखीन एक राहिलं. पुण्यातल्या मिसळचा विषय निघाल्यानंतर टिळक रस्त्यावरच्या रामनाथचं नाव निघाल्यावाचून रहात नाही. पण रामनाथच्या मिसळइतकाच तिथला बटाटा वडा प्रसिद्ध आहे. कदाचित तिथल्या मिसळपेक्षा वडाच अधिच चवदार आहे. कारण रामनाथची मिसळ म्हणजे फक्त जाळ. अक्षरशः घाम निघतो आणि दुसऱ्या दिवशी त्रास होतोच होतो. पण बटाटा वड्याचं तसं नाही. इतर वड्यांपेक्षा आकाराला दुप्पट आणि चवीला काहीपट चांगला असणारा रामनाथचा वडा म्हणजे सुख. रामनाथ वड्यांसाठी प्रसिद्ध न होता मिसळसाठी कसा प्रसिद्ध झाला, हे मला न उलगडलेलं कोडं आहे.
कर्जतच्या स्टेशनवर मिळणारा दिवाडकरचा वडा आता पुण्यातही मिळू लागलाय. तांबडी जोगेश्‍वरीच्या मंदिरासमोरच्या बोळात "दिवाडकर्स' हे नवं दुकान सुरु झालंय. पण तिथं खरोखरच कर्जतचा वडा मिळतो का हे मी तरी अजून "टेस्ट' केलेलं नाही. लवकरच तिथं जावं लागणार आहे, हे नक्की. तुमच्या मनातही वडापावच्या हॉटस्पॉट्‌सनी घर केलं असेल तर प्रतिक्रियांमध्ये त्याबद्दल लिहा. म्हणजे माझ्याप्रमाणेच इतरानांही त्याचा आस्वाद घेता येईल. सो लेट्‌स एन्जॉय. बटाटा वडा.

"मांदेली फ्राय' जरुर ट्राय करा...


गिरगावातला "सत्कार'!!!

बऱ्याच दिवसांपास्नं लिहायचं होतं. पण आज मुहूर्त मिळाला असंच म्हटलं पाहिजे. शेवटी हा सत्कार समारंभ पार पाडलाच पाहिजे, असं ठरवून आज ब्लॉग लिहितोय. एकदा का एखाद्या ठिकाणची चव जिभेवर रुळली की पुन्हा पुन्हा तिथं जायचं आणि वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घ्यायचा ही जुनी खोड. त्यामुळंच मुंबईत आलं आणि गिरगावातल्या सत्कार हॉटेलात गेलो नाही, असं कधीच झालं नाही. अगदी अप्रतिम चवीचे मासे याठिकाणी तुम्हाला मिळतील. पापलेटपासून ते बांगड्यापर्यंत बरीच "व्हरायटी' इथे मिळते. सत्कार हे थोडंसं खानावळीच्या अंगानं जाणारं असलं तरी अगदी घरगुती पद्धतीनं बनवलेलं (बहुधा मालवणी पद्धतीनं) जेवण ही इथली खासियत. त्यामुळे दुपारी दोनपूर्वी आणि संध्याकाळी आठनंतर अगदी बिनदिक्कतपणे तुम्हाला इथं आडवा हात मारु शकाल.

अगदी सुरवातीला म्हणजे "ई टीव्ही'मध्ये काम करत असताना (जवळपास तीन वर्षांपूर्वी) विश्‍वनाथ गरुड, अजय खापे आणि स्वप्नसौरभ कुलश्रेष्ठ या "रानडे'तल्या मित्रांबरोबर पहिल्यांदा सत्कारमध्ये गेलो होतो. तेव्हापास्नं अजूनही गिरगावाकडे पावलं वळतात. मग जेव्हा जेव्हा मुंबईला आलो तेव्हा तेव्हा इथं जाणं व्हायचं. सध्या मुंबईतच आहे. पण फक्त एकदाच सत्कारची पायरी चढलीय. आता कधी एकदा तिथं जाऊन "फिश करी' ओरपतोय, असं झालंय.
वेस्टर्न लाईनच्या मरीन लाईन्स स्टेशनला उतरायचं. चर्चगेटच्या दिशेनं जाऊ लागलो की, अखेरच्या ब्रिजवरनं उतरायचं आणि डावीकडे वळून थेट चालायला लागायचं. पहिला चौक ओलांडला डाव्या हातालाच सत्कार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरनंही इथं यायला बसेस आहे. अगदी टॅक्सीनं यायचं म्हटलं तरी वीस-पंचवीस रुपयांपेक्षा जास्त मीटर पडणार नाही.

पापलेट किंवा सुरमई थाळी हा इथला "द बेस्ट' ऑप्शन. अगदी "मेन्यू कार्ड' देखील पहायची काहीही आवश्‍यकता नाही. "सत्कार'मध्ये शिरल्यानंतर तुम्ही थेट एखाद्या थाळीची "ऑर्डर' देऊन टाका. "फिश करी'चा स्वाद हे इथलं वैशिष्ट्य. थाळीमध्ये एक सुका फिश, एक करी फिश आणि चपात्या येतात. "फिश करी' खूपच चविष्ट असल्यानं ती ओरपलीच जाते. त्यामुळे दोन-तीन वेळा तरी इथं करी मागवावी लागते. त्याचे स्वतंत्र पैसे पडत नाही. पण जादा पैसे पडत असले तरी हरकत नाही. पुन्हा पुन्हा "करी' हवीच. मासा कोणताही असला तरी तो इतका ताजा असतो (त्यामुळेच सॉफ्टही असतो) की जणू काही तो नुकताच समुद्रातनं पकडून आपल्याला "सर्व्ह' केलाय की काय, अशी शंका येते. अगदी लुसलुशीत मासा आणि अप्रतिम चवीची "फिश करी' यामुळे पाहता पाहता किती चपात्या संपतात ते कळतही नाही.

कोणतीही फिश थाळी मागविली तरी त्याच्या जोडीला "मांदेली फ्राय' ही डिश हवीच. "बोंबिल फ्राय' असेल तर तो "ऑप्शन'ही "ट्राय' करायला हरकत नाही. पण मला विचाराल तर "मांदेली फ्राय' हाच उत्तम पर्याय आहे. एका "प्लेट'मध्ये किमान बारा ते पंधरा मांदेली नक्की असतात. दोन जणांमध्ये एक "प्लेट' अगदी सहज संपते. इथली मांदेली इतकी मस्त आहे की, रत्नागिरीतल्या "शुभम' शिवाय इतकी सुंदर मांदेली दुसरीकडे कुठेच मिळालेली नाही. किमान मला तरी! (कोणाला माहिती असेल तर नक्की सांगा) जास्त लोक असतील तर त्या प्रमाणात तुम्ही "ऑर्डर' द्या. चपात्या आणि "फिश'वर भरपेट ताव मारल्यानंतर एक प्लेट भात तुमची वाट पाहत असेल. तो खाण्याची क्षमता तुमच्यात असेल तर भात खा; अन्यथा त्याबदल्यात एक-दोन चपात्या आणखी घ्या. माशांची चव जिभेवर रेंगाळत ठेवायची असेल तर मग तुम्ही थेट बिल मागवा. नाहीतर इथली "सोलकढी' पण चांगली असते. किमान मी तरी "सोलकढी' घेतल्याशिवाय इथनं बाहेर पडत नाही. तुम्हीपण शक्‍यतो "सोलकढी' घ्याच.
दोन फिश थाळी, भरपूर चपात्या, "मांदेली फ्राय' किंवा "बोंबिल फ्राय'ची प्लेट आणि नंतर एक-दोन ग्लास "सोलकढी' हे झालं दोन जणांचं भरपेट जेवण आणि बिलाची रक्कम अवघी पावणेदोनशे दोनशे रुपये. बिल देऊन बाहेर पडल्यानंतर फक्त एक रस्ता क्रॉस केला की, समोरच पानाचा एक ठेला आहे. मसाला (मिठा) पानापासून ते फुलचंदपर्यंत सर्वप्रकारची पानं तिकडं मिळतात. फुलचंदही चांगलं कडक असतं. त्यामुळं तुम्ही पानाचे "शोकिन' असाल तर "सत्कार'समोरच्या पानवाल्यालाही "व्हिझिट' कराच.

Friday, January 02, 2009

साक्रीच्या मार्गावरची खाद्ययात्रा १


ताहराबादचा खान्देशी पाहुणचार..
सचिनच्या लग्नामध्ये शेव-जिलेबीचा पाहुणचार स्वीकारुन आम्ही पुन्हा बेलापूरच्या दिशेने निघालो. खान्देशमध्ये येऊनही वांग्याचं भरीत, वांग्याची भाजी, भाकरी आणि खिचडी असा खास खान्देशी पाहुणचार न घेतल्याचं सल आमच्या मनात होतं. त्यामुळं जाता जाता एखाद्या हॉटेल किंवा ढाब्यावर या पदार्थांचा आस्वाद घेता येतोय का, याचा शोध घेत निघालो.

साक्रीतनं बाहेर पडताना एक-दोन ठिकाणी चौकशी केली. पण त्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर तिथं जेवावसंच वाटलं नाही. त्यामुळं पुढे निघालो. वाटेत ताहराबाद इथं साई गार्डन नावाचा ढाबा आहे. तिथं चांगल्या पद्धतीनं खान्देशी जेवण मिळेल, असं एकानं सांगतिलं. चला तिथं ट्राय मारु, असा विचार करुन आम्ही साई गार्डनमध्ये पोचलो.

बरं हा ढाबा आंध्र प्रदेशातल्या एका साईभक्त अण्णाचा होता आणि काम करायला (आचारी, वेटर, वाढपी वगैरे वगैरे) उत्तर प्रदेशी तसंच बिहारी. तिथं आम्ही खान्देशी पदार्थांची चव चाखण्यासाठी थांबलो. एकापेक्षा एक खवय्ये आणि खादाड असल्यामुळं चांगली दणकून ऑर्डर दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे शेवभाजी, बैंगन मसाला, बैंगन भरता, ज्वारीची भाकरी, मिरचीचा खर्डा आणि सरतेशेवटी दाल खिचडी. स्टार्टर म्हणून मागावले नाचणीचे (नालगीचे) पापड. नाचणीच्या पापडाचा आकार नेहमीच्या पापडापेक्षा जरा जास्तच मोठा होता. पण कांदा-टोमॅटो किंवा चाट मसाला न टाकताही नाचणीचा पापड मसाला पापडपेक्षा अधिक चविष्ट लागत होता.

साधारण दहा-पंधरा मिनिटं वाट पहायला लावल्यानंतर जेवण आलं. बैंगन मसालामध्ये झणझणीतपणा आणि चव यांचा सुवर्णमध्य साधण्यात आला होता. त्यामुळं भाजी काहीशी तिखट वाटत असली तरी मसाल्याची चव बिघडली नव्हती. शिवाय तर्री देखील जास्त नव्हती. काटेदार देठांसह वांग्याची भाजी करण्यात आल्यामुळं वांग्याची भाजी अगदी `टिपिकल` वाटत होती.

पण अशा ढाब्यांमध्ये भाज्या एकाच पद्धतीनं तयार केल्या जातात, असं ऐकलं होतं. एकच करी असते आणि त्यामध्ये हवी ती भाजी टाकली जाते. त्यामुळं बैंगन मसाला चांगला होता. त्याचं मला काही विशेष वाटलं नाही. पण वांग्याचं भरीत खाल्लं आणि चवीचं महत्व पटलं. वांग्याच्या भरतामध्ये कांदा आणि दाण्याच्या कुटाचा इतका अफलातून वापर करण्यात आला होता की विचारता सोय नाही. जेवता जेवता वांग्याचं भरीत आणि बैंगन भरता याच्या एक-दोन एक्स्ट्रा डिशेस मागवल्या. जोडीला मिरचीचा खर्डा होताच. अगदी झणझणीत. व्वा. व्वा...

दुर्गेश सोनार यांचा जोर शेवभाजीवर होता. पूर्वी एकदा खाल्लेली शेवभाजी त्यांच्या अजूनही स्मरणात होती. तेव्हा ते शेवभाजीवर तुटून पडले. शेवभाजीही अप्रतिम होती. काहीशी घट्ट आणि बैंगन मसालाचीच करी वापरल्यामुळं दोन्ही चवींमध्ये फारसा फरत वाटत नव्हता. पण तरीही शेवेची स्वतःची चव होतीच. मला वाटतं की शेवभाजीची डिशही आम्ही एक्स्ट्रॉ मागवली.

इतके सगळे चविष्ट पदार्थ असताना एक-दोन भाक-यांवर आम्ही थोडेच थांबणार होतो. दोनच्या चार भाकरी कधी झाल्या कळलंच नाही. सगळ्यांनी तीनपेक्षा जास्त भाक-या तोडल्या. इतकं सगळं ओढल्यानंतर खिचडी मागवायची की नाही, असा प्रश्न उपस्थित झालाच नाही. एक प्लेट खिचडी मागावली. दुर्गेश आणि अमोल हे अगदी थोडा हातभार लावणार होते. माझ्यावर आणि संदीपवर खिचडी संपवण्याची जबाबदारी होती. पण सर्वांनी समान वाटा उचलला. त्यामुळं खिचडी पण उत्तम असल्याचं स्पष्ट झालं.

सहा जण अगदी रेटून जेवल्यानंतरही आमचं बिल अगदीच माफक होतं. तीनशे की सव्वातीनशे फक्त. इतकं चविष्ट आणि भरपूर जेवण फक्त काही रुपयांमध्ये ही चैन पुण्या-मुंबईला करता येत नाही. साक्री किंवा एखाद्या आडगावातच ही सोय आहे. नाशिक-सटाणा मार्गे कधी धुळे-साक्रीला जाण्याचा योग आला तर ताहराबादच्या साई गार्डनमध्ये जरुर स्टॉप घ्या आणि आडवा हात माराच...

साक्रीच्या मार्गावरची खाद्ययात्रा


मिसळपाव @ सटाणा डॉट कॉम...

आमचा जुना दोस्त सचिन बाबुलाल फुलपगारे याचं लग्न नुकतंच धुळ्यातल्या साक्री इथं पार पडलं. हैदराबादपासनं (ई टीव्ही) आम्ही एकत्र (रुममेट) असल्यामुळं त्याच्या लग्नाला मी जाणारच होतो. आमचे प्रमुख अशोक सुरवसे, मी, दुर्गेश सोनार, अमोल परांजपे आणि ई टीव्हीतला जुना सहकारी संदीप साखरे असे आम्ही सर्व साक्रीसाठी निघालो. सर्वच जण खवय्ये असल्यामुळे ट्रीपला एक वेगळीच मजा आली. झकास. यापूर्वी अनेक ठिकाणी मित्रांबरोबर गेलो होतो. पण साक्री म्हणजे साक्री...

बेलापूरहून निघालो ते बदलापूरला वैभव नावाच्या एका ढाब्यावर थांबलो होतो. तिथं खान-पान उरकल्यानंतर आम्ही नाशिकच्या दिशेनं रवाना झालो. मुंबई-नाशिक महामार्गावर दोन ठिकाणी चहासाठी थांबल्यानंतर मग थेट नाशिक गाठलं. जुन्या सीबीएस बाहेरच्या चहाच्या गाडीवर मस्त दोन कप चहा मारल्यानंतर मग साक्रीच्या दिशेनं रवाना झालो.

साधारण साडेसातच्या सुमारास सटाणा (बागलाण) इथं पोचलो. तिथं चहा घ्यावा आणि मग पुढे जावं असा विचार होता. तिथं पोचल्यानंतर `झंकार` नावाच्या एका छोट्या हॉटेलसमोर गाडी थांबली. तिथं सकाळच्या नाश्त्याची तयारी सुरु होती. मिसळ, पोहे आणि बटाटे वडे असा मेन्यू तयार होत होता. मग काय, फक्त चहावर थांबणं शक्यच नव्हतं. जे काही पहिल्यांदा तयार होईल, त्यावर ताव मारुन मगच गाडी बाहेर काढायची असं ठरलं.

मिसळीसाठी आवश्यक मसाला आणि तर्री तयार करताना पाहिल्यानंतर भूक आणखी चाळवली जात होती. आदल्यादिवशी ब-यापैकी रेटलं होतं. तरीपण सक्काळी सक्काळी कडकडून भूक लागली होती दहा-पंधरा मिनिटं कळ काढल्यानंतर पोहे आणि मिसळ तयार झाली.

सुरवातीला प्रत्येकानं एक-एक मिसळ आणि पाव घेण्याचं ठरवलं पोहे, शेव, पातळ पोह्याचा चिवडा आणि या सर्वांवर मटकीच्या उसळीचा रस्सा व्वा.. व्वा... पुण्यातल्या तमाम मिसळवाल्यांच्या तोडीस तोड मिसळीचा आस्वाद घेताना स्वर्गीय सुखाचा आनंद होत होता. मिसळ इतकी झणझणीत होती की, घाम निघत होता. पण तरीही दोनदा रस्सा घेण्याचा मोह मी टाळू शकलो नाही. पुणेकरांना लाजवतील इतक्या पाट्या `झंकार`मध्ये होत्या. त्यातली एक पाटी अशी होती की, रस्सा पुन्हा पुन्हा मिळणार नाही. पण कदाचित आम्ही बाहेरगावाहून आल्यामुळं आम्हाला पुन्हा पुन्हा रस्सा देताना त्यानं का-कू केलं नाही. फक्त रस्साच नाही तर कांदा, शेव आणि लिंबूही त्यानं दोन-तीनदा फिरवलं.

मिसळ इतकी झक्कास होती की, सुरवातील फक्त पोहे खाण्याची तयारी दर्शवणा-यांनाही मिसळ खाण्याचा मोह आवरत नव्हता. मिसळीचा पहिला राऊंड होईपर्यंत पोहे तयार झाले होते. मग काय, सर्वांनी पोह्यांकडे मोर्चा वळवला. पोहे पण लय भारी होते. पोहे करताना झणझणीत ठेच्याप्रमाणेच त्यामध्ये लिंबू आणि साखरेची चव जाणवण्यासारखी होती. त्यामुळे त्याला अगदी (माझ्या) घरच्या पोह्यांसारखी चव आली होती. पोहे आणि मटकीचा रस्सा हे अफलातून कॉम्बिनेशन वेड लावणारं होतं. पोह्यांचा पहिला राऊंड झाल्यानंतर मी आणि संदीपनं दोघात एक प्लेट पोहे मागवले. (किती खाल्लं त्याचा विचार केला की, अगदी कसं कसं होतं.)

आणखी सांगायची (किंवा न सांगण्यासारखी म्हणाल तर अधिक उत्तम.) गोष्ट अशी की, त्याठिकाणी आमच्या पोह्याच्या दोन प्लेट संपल्यानंतर `झंकार`चा आचारी वडे काढयला घेत होता. बटाटे स्मॅश करुन त्यामध्ये घालण्यासाठी मिरच्या आणि इतर मसाला तयार करत होता. पोहे संपल्यानंतर आम्हाला खरं तर तिथला वडा टेस्ट करायचा होता. त्यामुळे चहा पिऊन होईपयर्यंत जर वडे काढले तर एक-एक वडा टेस्ट करु, असं ठरलं. पण दुर्दैवानं आम्ही तिथून निघेपर्यंत वडे निघाले नव्हते. सो बॅड ना...

इतकं सगळं रेटल्यानंतर चहा हवाच. `झंकार`समोरच योगेश्वर टी` नावाची एक छोटीशी चहाची टपरी होती. साध्या चहापेक्षा स्पेशल चहा मागवला. काहीसा कडक आणि कमी गोड ही माझ्या स्पेशल चहाची व्याख्या. माझ्या अपेक्षेपेक्षा अधिक चांगला चहा मला तिथं मिळाला. दुधात पाणी मिसळलं नसल्यानं म्हणजेच फक्त दूध वापरुन चहा केल्यामुळं त्याची चव आणखीनच चांगली लागत होती चहा चांगला असल्यामुळं आणखी एका स्पेशल मागवला.

मिसळ-पाव, दीड-दोन प्लेट पोहे आणि मग फक्कड चहा घेतल्यानंतर आम्ही साक्रीच्या दिशेनं निघालो... सचिनच्या लग्नामध्ये अस्सल खान्देशी मेन्यू असेल असा विचार मनात ठेवून. संस्कृतमध्ये एक म्हणच आहे की, `मिष्टान्न इतरे जनः` अर्थात, लग्नामध्ये जेवण काय आहे, गोड काय आहे, यामध्येच बहुतेकांना रस असतो. त्यानुसार आम्हालाही तिथल्या जेवणाबद्दल उत्सुकता होतीच.

तुम्ही जर कधी सटाण्याला गेलात तर एस. टी. स्टॅण्डच्या अलिकडे असलेल्या (किंवा पेट्रोल पंपासमोर असलेल्या) झंकार आणि योगेश्वर या स्टॉल्सला नक्की भेट द्या.

Saturday, December 27, 2008

बंगाली दिग्दर्शकाचा कौतुकास्पद प्रयत्न


"तहान' पाणी प्रश्‍न सोडवण्याची...

पाणी हाच धर्म... हे संत गाडगेबाबांचं ब्रीद शाहू, फुले आणि आंबेडकरांच्या नावानं राज्य करणारी मंडळी विसरली आहेत की काय, अशी शंका येण्याइतकी परिस्थिती नक्कीच आहे. निदान महाराष्ट्राच्या काही भागात तरी आहे. पिण्याच्या पाण्याची वानवा आहे. भारनियमनाची बोंबाबोंब तर सगळीकडेच आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातलं शेतकरी आत्महत्यांचं लोण पश्‍चिम महाराष्ट्रातही पसरलंय. आबांच्या "सो कॉल्ड' कडक शासनानंतरही सावकारीचा पाश कायम आहे. अजूनही अनेक ठिकाणी पाण्यावरुन दलित-सवर्ण वाद धगधगतोय. पाण्याच्या खासगीकरणाचा मुद्दा येत्या काही वर्षांत वादग्रस्त बनण्याची चिन्हे आहेत. पण या सर्व परिस्थितीकडे माध्यमांचं विशेषतः चित्रपट माध्यमवाल्यांचं फार कमी लक्ष जातं.

मुळातच या विषयात काही सनसनाटी नाही. शहरी मध्यमवर्गाला आकर्षून घेण्याजोगा हा विषय नाही. शहरी मध्यमवर्गानं पाठ फिरवणं म्हणजे चित्रपट आपटण्याची हमखास हमी. त्यामुळं अशा गंभीर आणि धगधगत्या वास्तवाकडे वळण्याचं धाडस कोणी करताना दिसत नाही. पण हा किचकट आणि चित्रपटासाठी कंटाळवाणा ठरु शकणारा विषय हाताळण्याचं धाडस एका दिग्दर्शकानं केलंय. महाराष्ट्रातली समस्या मांडणारा हा माणूस मराठी नाही. हा माणूस आहे बंगाली. दासबाबू असं त्याचं नाव. गेली अनेक वर्षे दासबाबू यांनी "दूरदर्शन'साठी काम केलंय. "हे बंध रेशमांचे', "एक धागा सुखाचा', "वाजवा रे वाजवा' आणि "श्रीमंताची लेक' असे अनेक चित्रपट-मालिका दासबाबू यांनी दिग्दर्शित केल्या आहेत.

दासबाबूंचा "अशी ही तहान' हा चित्रपट सांगली आणि सातारापाठोपाठ आता मुंबईत प्रदर्शित झालाय. सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले, अरुण नलावडे, सुनील बर्वे, अश्‍विनी एकबोटे, विजय चव्हाण, कुलदीप पवार अशी स्टार कास्ट आहे. विषय चांगला आहे. पण विविध शहरांमध्ये प्रामुख्यानं ग्रामीण भागात हा चित्रपट प्रदर्शित होण्यास अनेक अडचणी आहेत. चित्रपटगृह हा चित्रपट लावून घेण्यास तयार नाहीत. त्यामुळं या चित्रपटातून मला फार काही पैसा मिळणार नाहीये. पण मी झगडतोय ते शेतकऱ्यांपर्यंत संदेश पोचवण्यासाठी. आत्महत्या न करता समस्यांच्या विरोधात पेटून उठा, असा संदेश देण्याचा प्रयत्न दासबाबू "तहान'च्या माध्यमातून करताहेत. मुळात म्हणजे एका बंगाली माणसानं हा विषय हाताळला हीच गोष्ट कौतुकास्पद आणि काहीशी आश्‍चर्यकारक आहे. हा चित्रपट पाहताना तेलुगू चित्रपटांची आठवण येते. जमिनीच्या मुद्‌द्‌यावरुन शेतकऱ्यांना छळणारा सावकार किंवा जमीनदारांच्या विरोधात उभी राहणारी आंदोलनं हे विषयही तिथं चित्रपटात दिसायचे. त्याचीच आठवण "तहान' पाहताना होते.

किशोर नांदलस्करला कर्जासाठी छळणारा सावकार, दलित असल्यामुळे अश्‍विनी एकबोटेला घरच्या विहिरीवर पाणी भरु न देणारी सावकाराची बायको, एक घागर पाण्यासाठी अश्‍विनी एकबोटेला आपल्याबरोबर शय्यासोबत करायला लावणारा सावकार (शरद समेळ), नदीचं खासगीकरण करुन गावकऱ्यांना पाण्याला मोताद करणारं सरकार, "फिल्टर वॉटर'च्या कंपनीला नदी विकणारे आणि त्या कंपनीमध्ये भागीदारी करणारे मुख्यमंत्री असे अनेक प्रसंग वास्तवाची दाहकता दाखवून जातात. शेतकऱ्यांच्या आत्महत्याप्रश्‍नी कसं राजकारण होतं, सरकार किंवा मंत्री जनतेची आणि पत्रकारांची कशी फसवणूक करतात हे अगदी योग्य रितीनं यामध्ये दाखवण्यात आलंय. चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद लोकसत्ताचे पत्रकार श्रीकांत बोजेवार यांचे आहेत. त्यामुळे ते "दोन फुल एक हाफ' इतकेच दर्जेदार आहेत. जगदीश खेबुडकरांच्या गीतांनी (आणि एका लावणीनं...) चित्रपटात धमाल आणलीय. चित्रपटातली तीन गाणी पाणी या विषयाभोवतीच आहेत. "टाकी तुडुंब भरा...' अशी लावणी दिलखेच आहे.

ही "राजकीय फॅंटसी' आहे, असं दिग्दर्शकांचं म्हणणं आहे. त्यामुळं यामध्ये कथा कशीही वळवली तरी ते विचित्र वाटत नाही. प्रत्यक्षात अनपेक्षित वाटणारे अनेक प्रसंग आणि घटना या चित्रपटामध्ये अगदी जोर देऊन चित्रित केले आहेत. शिवाय चित्रपटाचा वेग मंदावला आहे. हल्लीच्या वेगवान दुनियेत हा चित्रपट वेगाच्या दृष्टीनं म्हणजे "दूरदर्शन'च्या जुन्या काळातली "डॉक्‍युमेन्ट्री'च म्हटली पाहिजे. पण तरीही हा चित्रपट एकदा पहायला हरकत नाही. शहरी भागामध्ये पाण्याची समस्या इतकी जाणवत नाही. पण आपण जसजसं ग्रामीण भागात जातो तसतशी आपल्याला ही समस्या जाणवू लागते. त्यामुळंच ग्रामीण भागात या चित्रपटाला जोरदार प्रतिसाद मिळेल, यात शंकाच नाही. समस्या आहे ती चित्रपटाला चित्रपटगृह मिळतील किंवा कसे याचीच. दासबाबू हे यासाठी प्रयत्नशील आहेत.

दासबाबू
(दिग्दर्शक, लेखक आणि सहाय्यक सरव्यवस्थापक एमटीएनएल)
9869011212 आणि 9869281212
dasbabu_director@rediffmail.com

Monday, December 08, 2008

शूरा मी वंदिले...


माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु... जिंकू किंवा मरु... अनेक वर्ष फक्त टीव्ही वर पाहिलेलं हे समरगीत... या गीताचा प्रत्यक्ष अनुभव आला तो अतिरेक्‍यांनी संपूर्ण मुंबईला वेठीस धरल्यानंतरच... प्रत्यक्षात पुढं मृत्यू उभा ठाकल्यानंतरही निधड्या छातीनं फक्त आणि फक्त देशासाठी प्राण देण्याची तयारी म्हणजे काय हे मुंबईवरच्या हल्ल्यामुळं अगदी जवळनं अनुभवता आलं. मृत्युच्या गुहेत शिरुन मृत्यूचाच खातमा करणं प्रचंड अवघड, थरारक आणि जिगरीचं काम... पण एनएसजी कमांडो, लष्कराचे जवान, अग्निशमन दलाचे अधिकारी आणि महाराष्ट्राचे पोलिस हे काम जीवावर उदार होऊन करत होते. अगदी दिवस-रात्र... तब्बल सलग सत्तावन्न तास...

अतिरेक्‍यांच्या तुलनेत महाराष्ट्र पोलिसांकडे अत्याधुनिक शस्त्र सामुग्री नसेलही... पण आहे त्या शस्त्रांनिशी लढण्याचा प्रयत्न पोलिस करत होते. पोलिस दलाच्या आधुनिकीकरणाच्या चर्चा आता खूप होतील. पण तक्रार न करता आहे त्या शस्त्रांनिशी युद्धभूमीवर जायला आणि शत्रूचा सामना करायला अंगात धमक लागते. ती महाराष्ट्र पोलिसांनी दाखवली त्याबद्दल महाराष्ट्र पोलिसांना सलाम.

हेमंत करकरे, अशोक कामटे आणि विजय साळस्कर यांनी आधी पूर्ण माहिती घेऊन नंतरच मैदानात उतरायला हवं होतं, असा सूर आता ऐकू येतोय. पण प्रतापराव गुजरांच्या या महाराष्ट्रात शत्रूला संपवण्यासाठी वेडात हे तीन वीर दौडले त्यांचा पराक्रम अगदी बिनतोड... संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर आणि ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर फिल्मी मंडळींसह टूर काढायला पोलिस म्हणजे काही राजकारणी नाहीत. माझ्या मुंबईत काही तरी विपरित घडलंय आणि मला ते थांबवायचंय. त्यासाठी मला तातडीनं घटनास्थळी गेलंच पाहिजे, हेच अधिकाऱ्यांच्या डोक्‍यात होतं. हे प्रकरण आपल्या जीवावर बेतू शकेल, याचा अंदाज त्यांना कदाचित असेलही. पण असं असतानाही तातडीनं "फिल्ड'वर येऊन प्राणांची आहुती देणाऱ्या प्रतापराव गुजरांच्या या तीन सरदारांना सलाम.

अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांसाठी आगीची धग तर नेहमीचीच. पण दहशतवादाची धग ते प्रथमच अनुभवत होते. युद्धभूमीप्रमाणे गोळीबार सुरु आहे. ग्रेनेड हल्ले होत होते. पण तरीही हॉटेलचं नुकसान होऊ द्यायचं नाही आणि लागलेली आग तातडीनं विझवायचीय हेच त्यांचं महत्वाचं काम होतं. त्यासाठी ते प्राणांची बाजी लावत होते. गोळीबार सुरु असताना ताजला लागलेली आग विझवण्यासाठी झटत होते. आपलं मरण डोळ्यासमोर असतानाही जवानांच्या खांद्याला खांदा लावून लढणाऱ्या अग्निशमन दलाच्या जवानांना सलाम.

अतिरेक्‍यांना संपवून टाकण्यासाठी युद्ध सुरु होतं. हे युद्ध कव्हर करण्यासाठी काही अतिउत्साही पत्रकारही आले होते. तसंच काही नागरिक क्रिकेटचा सामना पाहण्यासाठी येतात तसे ही लढाई पाहण्यासाठी आले होते. ही बघ्यांची गर्दी आवरण्याचं काम शीघ्र कृती दलाचे जवान, महाराष्ट्र पोलिस आणि राखीव पोलिस दलाच्या जवानांची होती. नेमून दिलेलं काम चोख पार पाडून ऑपरेशला मदत करणाऱ्या या सर्वांना सलाम.

राष्ट्रीय सुरक्षा दल म्हणजेच एनएसजीचे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या अभिनंदनासाठी तर शब्दच अपुरे पडतील, अशी परिस्थिती आहे. अतिरेक्‍यांना कंठस्नान घालून त्यांनी मुंबईकरांसह सर्व भारतीयांना मोकळा श्‍वास घेण्याची संधी दिलीच. पण हे करताना हॉटेलमधल्या बंधकांना सोडविण्याची अवघड कामगिरीही त्यांनी पार पाडली. अतिरेक्‍यांचा खातमा करताना एकाही नागरिकाचा प्राण जाणार नाही, याची काळजी जवानांनी घेतली.

स्वातंत्रपूर्व काळात क्रांतिकारक जसे हातावर प्राण घेऊन इंग्रजांशी लढायचे. तशाच पद्धतीनं आधुनिक काळातले हे भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरु लढत होते. कुणासाठी फक्त देशासाठी... हल्ली देशासाठी काहीतरी करण्याची बोल बच्चनगिरी करणारे पुष्कळ आहेत. पण प्रत्यक्ष कृती करणारे अगदी थोडे. त्या यादीत लष्कराचे जवान किंवा एनएसजीचे कमांडो यांचं स्थान अगदी वरचं. ही यादी त्यांच्यापासूनच सुरु होते, असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळंच कमांडो आणि जवानांना त्रिवार नव्हे, शतशः नव्हे, लाखो नव्हे अगदी अनंत अगणित सलाम.

अतिरेकी कितीही असो... आम्हाला कोणतंही काम अवघड नाही... जोपर्यंत एनएसजी आहे तोपर्यंत भारताकडे कोणीही वाकडा डोळा करुन पाहू शकत नाही, असं सांगणाऱ्या एनएसजी कमांडोजच्या आत्मविश्‍वासाला सलाम. सारं करुनही आपण काहीच न केल्याच्या आर्विभावात वावरणाऱ्या लष्करी जवानांच्या निरपेक्ष वृत्तीला सलाम. ऑपरेशन फत्ते झाल्यानंतर प्रेमानं दिलेलं गुलाबाचं फुल स्वीकारण्यासाठी शंभरदा विचार करणाऱ्या जवानांच्या निस्वार्थी हेतूंना सलाम. काळ्या कपड्यात राहूनही पांढऱ्या कपड्यांमधल्या बगळ्यांपेक्षा अधिक स्वच्छ आणि शुद्ध असलेल्या जवानांच्या खऱ्याखुऱ्या देशभक्तीला सलाम. अतिरेक्‍यांशी लढण्यात इस्रायलचे जवान सर्वाधिक पटाईत. अशा इस्रायलच्या पंतप्रधानांकडून कौतुकाचा वर्षाव होत असलेल्या एनएसजी कमांडोजच्या शौर्याला आणि लढवय्या वृत्तीला सलाम.

अतिरेक्‍यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या सर्वसामान्य नागरिकांना सलाम, जखमींना रुग्णालयात नेऊन माणुसकी जिवंत असल्याचं दाखवून देणाऱ्या मुंबईकरांना सलाम, जखमी रुग्णांवर अहोरात्र उपचार करणाऱ्या डॉक्‍टर तसंच परिचारकांना सलाम, हल्ला झाल्यानंतर रक्तदानासाठी तातडीनं ब्लड बॅंक गाठणाऱ्या रक्तदात्यांना सलाम, दक्ष मुंबईकरांना सलाम, युद्धजन्य परिस्थितीतही प्रेक्षकांपर्यंत सर्व माहिती पोचवणाऱ्या पत्रकारांना सलाम, काही न्यूज चॅनेल्सच अफवा पसरवत होती. पण तरीही या अफवांवर विश्‍वास न ठेवणाऱ्या आणि स्वतः अफवा न पसरवणाऱ्या सामान्यातल्या सामान्य नागरिकाला सलाम...

प्रत्यक्ष अनुभव 28-11 चा...


अनुभवला थरार दहशतवादाचा ...

मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळं सारं जग हादरलं. भारत तर पुरता कोलमडून गेला. अशा पद्धतीनं हल्ला होईल, अशी अपेक्षाही कोणाला नव्हती. गुप्तचर संस्था आणि सुरक्षा रक्षकांचं अपयश किती महाग पडू शकतं, याचा अनुभव भारतानं घेतला. भारताची लक्तरं जगाच्या वेशीवर टांगली गेली. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानकावर अतिरेक्‍यांनी केलेला अंदाधुद गोळीबार, नरिमन हाऊस, हॉटेल ओबेरॉय तसंच हॉटेल ताज इथं सुरु असलेली कारवाई चक्रावून टाकणारी होती.

मुंबईवर हा दहशतवादी हल्ला झाला तेव्हा मी पुण्यात होतो. माझी सुटी संपत असल्यानं दुसऱ्या दिवशी बेलापूरला जायचं होतं. त्यानुसार मी 27 नोव्हेंबरला सकाळी दहा-साडेदहाच्या सुमारास बेलापूरला पोचलो. पण ही कारवाई संपण्याचं नाव घेईना. मी येण्यापूर्वी संपूर्ण रात्र आमच्या टीमनं तासातासाला अपडेट बुलेटिन काढली होती. तसंच कमी मनुष्यबळ आणि अपुऱ्या सोईसुविधा असतानाही आम्ही झगडत होतो. बेलापूरला पोचल्यानंतर तो संपूर्ण दिवस "डेस्क'वरच होतो. संध्याकाळी सात ते रात्री साडेअकरा असं साडेचार तास "लाईव्ह' करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आवश्‍यक मुलाखती आणि इतर बातम्या मागावून घेतल्या. तसंच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातल्या महत्वाच्या व्यक्तींचे फोनो आणि अधूम मधून अँकरमध्ये डिस्कशन अशापद्धतीनं साडेचार तास अक्षरशः खेचून काढलं. पण मजा आली. अशा पद्धतीनं काहीही तयारी नसताना प्रथमच इतक्‍या मोठी "रिस्क' आम्ही घेतली होती. पण तरीही वेळ मारुन नेली.

रात्रभरात कारवाई संपेल आणि पुन्हा परिस्थिती पूर्वपदावर येईल, असं आमचे वार्ताहर सांगत होते. त्यामुळं मी रात्री ऑफिसमध्येच थांबलो होतो. कदाचित ऐनवेळी रात्री विशेष बातमीपत्र काढावं लागलं असतं. त्यामुळं मी ऑफिसमध्येच थांबण्याचा निर्णय घेतला. पण तसं झालंच नाही आणि दुसऱ्या दिवशीही म्हणजेच 28 तारखेलाही हे रण सुरुच होतं. मुंबईमध्ये चकमक सुरु आहे आणि मी तिथं जाऊ शकत नाही, हे माझ्या मनाला खटकत होतं. यावेळी मला ज्येष्ठ पत्रकार माधव गडकरी यांचं एक वाक्‍य आठवतं. जगात जिथे जिथे काहीतरी महत्वाच्या घडामोडी घडत असतील तिथं बातमीदार म्हणून मला जावंसं वाटतं, असं गडकरी म्हणायचे. ही गोष्ट कायम माझ्या मनात असते. त्यामुळंच मी परवानगी घेऊन मुंबईत रिर्पोंटिगसाठी गेलो.

प्रथम आनंद गायकवाड याच्यासह नरिमन हाऊस इथं जाऊन तिथं परिस्थिती कशी आहे, हे पाहून आलो. तिथली कारवाई सर्वाधिक अवघड होती. नरिमन हाऊस हे मध्यमवर्गीय आणि कनिष्ठ मध्यमवर्गीय नागरिकांच्या वसाहतीमध्ये वसलेले आहे. त्यामुळं तिथं कारवाई सुरु असताना नागरिक क्रिकेटच्या मॅचला जमतात तसे जमले होते. शिवाय काही अतिउत्साही पत्रकार "लाईव्ह'चा थरार अनुभवण्यासाठी पुढे पुढे करत होते. इथली कारवाई लवकर संपेल, असं चित्र होतं. तसंच तिथं आनंद असल्यामुलं मी ताज इथं "रिर्पोटिंग'साठी गेलो. तिथं साधारण रात्री साडेसातच्या सुमारास पोचलो. तेव्हापासून दुसऱ्या दिवशी सकाळी अकरापर्यंत अनुभवला थरार, थरार आणि फक्त थरार.

""माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरु, जिंकू किंवा मरू...'' हे समरगीत मी फक्त ऐकलं किंवा पाहिलं होतं. ते अनुभवण्याची संधी मला त्या रात्री मिळाली. आपण जणू काही दिवाळीतल्या फटाक्‍यांचे आवाज ऐकतोय, अशा पद्धतीनं गोळीबार आणि ग्रेनेड हल्ले सुरु होते. रात्री बारा ते साडेतीन या कालावधीत सारं कसं शांत शांत होतं. त्यानंतर मात्र, पुन्हा एकदा रणधुमाळी सुरु झाली. मध्यरात्रीनंतर चकमक थांबली असली तरी पत्रकारांचे गोळीबार सुरुच होते. एका पत्रकारानं तर फोनो देताना अकलेचे तारेच तोडले होते. ""ताजमध्ये सहा अतिरेकी आहेत. त्यापैकी दोन महिला अतिरेकी आहेत. त्यांनी नुकतंच रात्रीचं जेवण केलंय आणि आता पुन्हा एकदा ते चकमक करण्यासाठी सज्ज झाले आहेत...'' अशी बडबड ऐकल्यानंतर मला तर सुन्न व्हायला झालं. मुळात संबंधित पत्रकाराला ही माहिती दिली कोणी आणि इतकी "डिटेल' माहिती याच्याकडे असेल तर मग त्याला गुप्तचर खात्यातच नोकरी दिली पाहिजे, असा विचार माझ्या मनाला शिवला. पण अशी फेकचंदगिरी करणाऱ्या पत्रकाराला जोड्यानं का मारु नये, असंही मला वाटलं.

शायना एन. सी. नामक भाजपची एक चकमो नेता आहे. ती लग्नाला आल्यासारखी "गेट वे ऑफ इंडिया'जवळ आली होती, रात्री दीड वाजता. आपला कोणी बाईट घेईल किंवा मुलाखत घेईल का, याचा अंदाज शायना एन. सी. घेत होत्या. पण त्यांना फारसं कोणी विचारत नव्हतं. अखेर "लाईव्ह इंडिया' नामक वाहिनी तिच्या चमकोगिरीला बळी पडली आणि वाहिद खान नावाच्या अतिउत्साही पत्रकारानं तिची मुलाखत घेतली, अवघी पंधरा मिनिटं. ऍलेक पद्‌मसी हे ऍड विश्‍वातलं हे नामांकित व्यक्तिमत्व. हे महाशय पण रात्री अडीचच्या सुमारास तिथं आले. "बीबीसी'च्या एका पत्रकाराक डून त्यांनी आधी माहिती घेतली आणि मग तीच माहिती दुसऱ्या एका वाहिनीच्या मुलाखतीत सांगितली. त्यामुळं या महाशयांचे टीव्ही प्रेमही उघड झाले. हवशे, नवशे आणि गवशे असे असंख्य नागरिक-पत्रकार तिथं होते.

पहाटे साडेतीनच्या सुमारास चकमक पुन्हा सुरु झाली आणि आता ती वेगानं सुरु होती. अतिरेक्‍यांची एखादी गोळी आपल्या दिशेनं येऊ नये किंवा ग्रेनेडचे तुकडे फुटून आपल्या अंगावर येऊ नयेत, अशी प्रार्थना करुन आम्ही तिथं थांबलो होतो. माझ्या परिस्थितीवरुन तिथं लढणारे कमांडो आणि लष्कराचे जवान यांच्या धैर्याची कल्पना मला येत होती. त्यामुळंच त्यांचं करावं तितकं अभिनंदन कमीच आहे, अशी माझी भावना आहे. सकाळी सकाळी म्हणजे साडेसातच्या सुमारास ही चकमक अंतिम टप्प्यात असल्याचं जाणवलं. कारण गोळीबार आणि ग्रेनेड हल्ल्यांचा वेग वाढला होता. ताजच्या डाव्या कोपऱ्यातल्या तळ मजल्याला आगा लागली. ती प्रचंड वेगानं पसरत होती. पहिल्या मजल्याचा काही भागही आगीच्या भक्ष्यस्थानी आला होता. ही आग अतिरेक्‍यांनीच लावली, असा आमचा अंदाज होता. पण प्रत्यक्षात मात्र, ही आग लष्कराच्या जवानांनी ग्रेनेड हल्ला करुन लावली होती. पण तेव्हा साधारण अंदाज आला होता की, ही चकमक काही मिनिटांतच संपुष्टात येणार आहे. झालंही तसंच. साडेआठ पावणे नवाच्या सुमारास सारं काही शांत शांत झालं. एक व्यक्ती ताज हॉटेलच्या खिडकीतनं बाहेर पडताना सगळ्यांना दिसला. तोच ताजमधला शेवटचा अतिरेकी आणि त्याचा खात्मा करण्यात लष्कराला यश आलं होतं.

त्यानंतर जवान आणि कमांडो अगदी रिलॅक्‍स दिसत होते. अग्निशामक दलाचे जवानही अगदी बिनधास्तपणे आग विझवत होते. शिवाय ज्या पहिल्या आणि तळ मजल्यावर संघर्ष सुरु होता, तिथं आता जवानांनी ताबा मिळवला होता. त्यामुळं कारवाई स्पष्ट झाल्याचं जाणवतं होतं. हो कारवाई संपलीच होती. कारवाई पार पडल्यानंतर विश्रांती घेत असलेल्या एका "एनएसजी' कमांडोशी गप्पा मारत असताना त्यांच्यातल्या आत्मविश्‍वाचा प्रत्यय आला. ही कारवाई थोडी अवघड होती, असं नाही वाटत का? या माझ्या प्रश्‍नावर त्यानं नकारार्थी उत्तर दिलं. "एनएसजी'साठी कोणतीच कारवाई अवघड नाही. आम्ही कोणाचाही सामना करु शकतो आणि देश वाचवू शकतो. हे अतिरेकी अद्ययावत आणि फिट होते, त्यामुळं आम्हाला अंदाज यायला थोडा वेळ लागला. पण अखेरीस ते संपलेच. आम्ही कोणापुढेही हार पत्करत नाही... असं त्या कमांडोनं सांगितल्यानंतर मला धन्य झाल्यासारखं वाटलं.

Monday, November 17, 2008

उसळ आणि शिकरणीचे दिवस संपले...


पुणेकरांची बदलती खाद्यसंस्कृती...
करा लेको, खा खा मटार उसळ खा, शिकरण खा... पुणेकरांची चैनीची सीमा म्हणजे मटार उसळ आणि शिकरण... मराठी साहित्य विश्‍वाचं अविभाज्य अंग असलेल्या पु. ल. देशपांडे यांच्या "तुम्हाला कोण व्हायचंय? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर... ' या सुप्रसिद्ध प्रकरणातील हा एक अप्रतिम उतारा. पुणेकरांच्या संकुचित खाद्य संस्कृतीवर अगदी परखडपणे ताशेरे ओढतो.

पण आता काळ बदललाय. पु.लं.च्याच भाषेत बोलायचं झालं तर "पूर्वीचं पुणं राहिलं नाही...' एकेकाळी मटार उसळ, मटार पॅटिस आणि शिकरणापर्यंतच मर्यादित असलेल्या पुण्याच्या खाद्य संस्कृतीचं ताट आता विस्तारलंय. त्यामध्ये नवनव्या पदार्थ समाविष्ट होत आहेत आणि अर्थातच, खवय्येगिरीत आघाडीवर असलेल्या पुणेकरांनी या पदार्थांचा अगदी आपुलकीनं स्वीकार केलाय.

सक्काळी सक्काळी न्याहारीसाठी बेडेकर, श्री, संजीवनी, बेहेरे किंवा श्रीकृष्ण इथली मिसळ अक्षरशः ओरपायची. लक्ष्मी रस्त्यावर काकाकुवा मॅन्शन किंवा बाजीराव रस्त्यावर बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या इथं गरमागरम पोहे, उप्पीट किंवा झणझणीत चटणीसह वडा खायचा. अमृततुल्यात जाऊन फक्कड चहा प्यायचा, हा खवय्यांचा हमखास ठरलेला बेत.

तुम्हाला दाक्षिणात्य नाश्‍ता करायचाय तर मग थेट रास्ता पेठेतलं केईएम हॉस्पिटल गाठायचं. तिथं समोरच अण्णांच्या अनेक गाड्या दिसतील. त्यामध्ये इडली, वडा, डोसा, उत्तप्पा, अप्पम्‌ आणि टेस्टी सांबार-इडली यांच्या जोडीनं मैफल जमते. जंगली महाराज रस्त्यावरच्या वैशाली आणि रुपालीचा रुबाब थोडा जास्त. त्यामुळं तिथं "व्हाईट कॉलर' खवय्ये अधिक असतात. कुरकुरीत डोसा किंवा वाफाळलेली इडली आणि मग कडक कॉफी ही इथं दिली जाणारी हमखास ऑर्डर. बाजीराव रस्त्यावरच्या वाडेश्‍वरमधली इडली चटणी पण चटकदार. तिथं मिळणारा आलू पराठा देखील टेस्ट करायला हरकत नाही. पण आता जमाना आहे "स्पेशलायझेशन'चा. त्यामुळं फक्त डोसाची ऑर्डर पुरवणारे "डोसा प्लाझा' उभे राहताहेत. तिथं डोशाच्या एकशेदहापेक्षा अधिक "व्हरायटी' आहेत.

थोडं निवांत असाल तर मग कॅम्पातलं नाझ किंवा महानाझ, डेक्कनवरचं लक्की अथवा गुडलकमध्ये जायचं. थेट ऑम्लेट पाव किंवा बन मस्काची ऑर्डर द्यायची. "इराणी रेस्तरॉं'मध्ये जाल तर इराणी सामोशाची ऑर्डर द्याच. एका प्लेटमध्ये आठ-दहा सामोसे आणि सोबतीला भोपळ्याचा सॉस तुमच्यासमोर येईल. खायचे तितके सामोसे खा. हे वैविध्य झालं न्याहारीचं. आणि हो, तुम्ही कोठेही गेलात तरी गर्दी असणारंच. त्यामुळं थोडासा वेळ घेऊनच जा.

कधी काळी सतपोतदारांचं पूना गेस्ट हाऊस, पेरुगेटजवळचं पूना बोर्डिंग, बादशाही बोर्डिंग हाऊस, प्रभात रस्त्यावरचं सुवर्णरेखा, डेक्कनवरचं जनसेवा किंवा आपटे रस्त्यावरचं आशा डायनिंग हॉल अशा अगदी मर्यादित खानावळी होत्या. खानावळीच म्हटलं पाहिजे. अगदी घरगुती पद्धतीचं आणि घरच्या चवीचं जेवण इथं मिळायचं. मग बाहेर जेवायला जायचं (शक्‍यतो रविवारी सकाळी) म्हणजे इथं कुठंतरी जायचं, असा नेम ठरलेला असायचा. ज्या पुणेकरांच्या खिशात जास्तच पैसा खुळखुळायचा ती मंडळी आपटे रस्त्यावरच्या श्रेयसमध्ये जायची.

हळूहळू काळ बदलत गेला आणि महाराष्ट्रीय किंवा थाळी पद्धतीच्या जेवणाला अनेक पर्याय निर्माण होऊ लागले. एव्हाना गिरीजा किंवा जयश्री पावभाजीची धूम निर्माण झाली होती. गिरीजा किंवा जयश्रीमध्ये जाऊन खायचं हे प्रेस्टिजियस असायचं. कुुटुंबातल्या सर्वांनी एकत्र जायचं तर मग म्हात्रे पुलाजवळचं स्वीकार किंवा जंगली महाराज रस्त्यावरचं पांचाली यांची निवड व्हायची. तिथं "राईस प्लेट'प्रमाणेच साऊथ इंडियन आणि पंजाबीतल्या डिशेस मिळायच्या. औंधजवळचं सर्जा, बालगंधर्वजवळचं गंधर्व, बाजीराव रस्त्यावरचं गणराज आणि अशी असंख्य "मल्टिक्‍युझीन रेस्तरॉं' एव्हाना सुरु झाली होती.

पण जागतिकीकरणाच्या रेट्यामध्ये हॉटेलमध्ये जाणं ही चैनीची गोष्ट राहिली नाही. ती एक गरज बनली. त्यामुळं दर शनिवारी आणि रविवारची संध्याकाळी बाहेरच जेवायाला जाणाऱ्या पुणेकरांची संख्या प्रचंड वाढली. त्यामुळं "रेस्तरॉं'ची संख्याही तिपटी चौपटीनं वाढली व खाद्यपदार्थांमध्येही "व्हरायटी' मिळू लागल्या. "रेस्तरॉं' खऱ्या अर्थानं "मल्टिक्‍युसीन' झाली.

अंडाभुर्जीच्या गाड्यांप्रमाणेच एव्हाना चायनीच्या गाड्या रस्त्यांवर दाखल झाल्या होत्या. टपरी वजा हॉटेल्सलाही सुरवात झाली होती. पण तिथं सहकुटुंब जाणं थोडंसं धाडसाचं असायचं. त्यामुळं फक्त चायनीज खाद्यपदार्थांना वाहिलेली "रेस्तरॉं' सुरु झाली. एफसी रोडवरचं हाका, जंगली महाराज रस्त्यावरचं फॅट कॉंग आणि चायनागेट सारखी असंख्य "चायनीज रेस्तरॉं' सुरु झाली. साऊथ इंडियन किंवा महाराष्ट्रीय "रेस्तरॉं'मधून पंजाबी डिशेस मिळायच्या. पण फक्त पंजाबी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी कोंढवा किंवा विमाननगर परिसरात असलेलं "देव अंकल्स किचन', नगर रस्त्यावरचं "नॉदर्न फ्रंटियर' व बाणेरमधलं राजवाडा किंवा सर्जा अशी विशेष पंजाबी "रेस्तरॉं' दिमाखात सुरु झाली. अनेक पराठा हाऊसही दमदार व्यवसाय करु लागली.

पण पुणेकरांच्या आवडीनिवडी सातासमुद्रापार गेल्या आणि परदेशातल्या खाद्यपदार्थांनाही पुणेकरांनी आपलसं केलं. मेक्‍सिकन, कॉन्टिनेन्टल, मलेशियन, थाई, इटालियन, लेबनीज आणि अशा असंख्य देशांमधलं खाद्यजीवन पुण्यात बहरत गेलं. औंधमधलं "पोल्का डॉट्‌स', मुकुंदनगरमधलं "मारी गोल्ड' किंवा कर्वे रस्त्यावरचं "ऑफ बिट' ही अशाच काही "रेस्तरॉं'ची उदाहरणं. "इटालियन पिझ्झा आणि पास्ता'ची फर्माईश द्यायची असेल तर तशीही सुविधा कोरेगाव पार्क किंवा कॅम्प भागात उपलब्ध आहे.

शाकाहारी प्रमाणेच मांसाहारी खवय्यांचीही पुण्यात चैन आहे. पूर्वीची "जय भवानी' नावानं साखळी खानावळ प्रसिद्ध आहे. त्याच धर्तीवर सातव बंधूंची "कावेरी हॉटेल्स'ची साखळी उघडण्यात आलीय. तसंच जोंधळे चौकातली आवारे खानावळ शंभर वर्षांपासून चव टिकवून आहे. आता तर या खानावळीचं रुप पुरतं पालटलंय. सदाशिव पेठेतल्या "त्या' सुप्रसिद्ध गल्लीचं रुपही आता पालटलंय. गोपी, आशीर्वाद आणि दुर्गा यांना साथ मिळतेय ती "सृष्टी'च्या "सी फूड'ची तसंच "पुरेपूर कोल्हापूर'सारख्या झणझणीत ठिय्यांची. मांसाहारी "रेस्तरॉं'ची संख्या इतकी वाढलीय की, विचारता सोय नाही. मग नळस्टॉपजवळचं "निसर्ग', लाल देवळाजवळचं "महेश लंच होम' किंवा कर्वे रस्त्यावरचं "कवी' अशी खास फिश फेव्हरेट "रेस्तरॉं' सुरु झाली आणि बहरलीही. ठिकठिकाणी छोटे-छोटे मालवणी अड्डे सुरु झाले. तिरंगासारखं फक्त "बिर्याणी'साठी ओळखलं जाणारं "रेस्तरॉं' सुरु झालं.

सारसबागेत, संभाजी बागेत किंवा शनवारवाड्याजवळ गाड्यांवर मिळणारी भेळ तसंच पाणीपुरी आता कॉर्पोरेट झालीय. एसएनडीटीजवळ किंवा कात्रज-कोंढवा रस्त्यावर "कल्याण' नावानं भेळेचं दुकानंच थाटण्यात आलंय. तिथं अगदी प्लॅस्टिकचे हातमोजे वगैरे घालून भेळ तयार होतेय. इतर काही ठिकाणी बिसलेरीच्या पाण्यापास्नं पाणीपुरी केली जाते. इतकी खबरदारी घेतली जात असल्यामुळं इतरवेळी नाकं मुरडणारी मंडळीही "चाट'कडे वळताहेत.

पानाच्या टपऱ्यांमध्येही कॉर्पोरेट कल्चर आलंय. "शौकिन'सारखी दुकानं महिलांनाही पानाच्या दुकानात येण्यास प्रवृत्त करतात आणि महिलाही अगदी बिनदिक्कतपणे "एक साधा फूलचंद' असं पान अगदी सहजपणे मागू शकतात.

पुणं बदलतंय. देशभरातनंच नव्हे तर जगभरातनं लोकं व्यवसाय-शिक्षणासाठी पुण्यात येताहेत. स्थायिक होताहेत. त्यामुळं त्यांच्या खाद्यसंस्कृती पुण्यात रुजू लागलीय. पुणेकरांनीही या संस्कृतीला परकं मानलेलं नाही. कारण पुणेकर फक्त खाण्यावर प्रेम करतो. पटेल, पचेल आणि रुचेल ते खातो.

Saturday, November 15, 2008

Raj's Video about BHAIYYA...

Raj Thackrey in his recent controversial MMS clip....

Wednesday, October 29, 2008

राज यांचे राजकारण...!

निवडणुकीचे राजकारण जमणार?
पुण्यात नुकतीच राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा रंगली. स्पर्धेची वातावरण निर्मिती करण्यासाठी आयोजकांनी प्रत्येक जिल्ह्यात युथ बॅटन रिलेचं आयोजन केलं होतं. आता राज ठाकरे यांची आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्याराज्यात पोहोचावी म्हणून राज्य सरकार आणि पोलिसांनी राज ठाकरे अटक बॅटन रिले आयोजित केलीय.
सुरवातीला विक्रोळी, नंतर वांद्रे, मग मानपाडा आता कल्याण आणि नंतर कदाचित जळगाव, सोलापूर, पंढरपूर ..... आणि महाराष्ट्रातलं प्रत्येक शहर अगदी छोटं छोटं गाव. हो कारणंच तसं आहे. राज यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची चढाओढ पोलिसांमध्ये लागलीय. जळगावमध्ये दहा ठिकाणी तर नाशिकमध्ये सात ठिकाणी गुन्हे नोंदले गेलेत. पुण्यातही कोथरुड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदला गेलाय. सोलापुरात आणि पंढरपुरात गुन्हा दाखल झालाय. लवकरच प्रत्येक जिल्ह्यात असे गुन्हे नोंदतील. मग प्रत्येक ठिकाणीचे पोलिस त्यांना अटक करण्यासाठी येतील आणि राज ठाकरे आणखी मोठे होतील. राज यांना आणखी मोठं करण्यासाठीच पोलिस प्रयत्नशील आहे. कदाचित त्यांना वरुन तसे आदेशही मिळाले असतील.
हो सरकारला आणि पोलिसांना राज यांना गावागावात पोहोचवायचंय. निवडणुका झाल्या तर राज्य सरकार गोत्यात येईल, अशी परिस्थिती आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेसनं राज्य कारभाराचा बट्ट्याबोळ केलाय. त्यामुळंच ते शिवसेनेची मतं फोडण्यासाठी राज यांना मोठं करताहेत. हे आम्ही नाही तर देशातला प्रत्येक राजकीय पक्ष करतोय. अगदी भाजप, संयुक्त जनता दल आणि समाजवादी पक्षही आहे. भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह, समाजवादी पक्षाचे सरचिटणीस अमरसिंह आणि मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते प्रकाश करात यांनीही अशाच प्रकारचं विधान केलंय.
मराठीच्या मुद्‌द्‌यावर राज ठाकरे यांनी उभारलेलं आंदोलन योग्यच आहे. त्याला विरोध करण्याचं कारण नाही. मराठी पाट्यांचा मुद्दा असो किंवा जया बच्चन यांनी मराठी भाषकांचा केलेला अपमान असो. राज ठाकरे अगदी शंभर टक्के मान्य. मराठी तरुणांच्या नोकऱ्या हिसकावून घेणाऱ्या उत्तर भारतीयांना फटकावलंच पाहिजे. मग ते राज ठाकरे यांच्या मनसेचे कार्यकर्ते असोत, शिवसेनेचे असोत किंवा अगदी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे. राष्ट्रीय पक्षांनीही अशी भूमिका घेतली तरी कोणालाच वाईट वाटणार नाही.
सध्या तरी राज ठाकरेच आक्रमक भूमिका घेत आहेत. ती त्यांची गरज आहे, असं म्हटलं तर अधिक योग्य ठरेल. म्हणजे राज यांचा मुद्याही योग्यच आहे. त्यांचा मार्गही काही प्रमाणात योग्य आहे. शिवाय राज्य सरकारचा त्याला आतून पाठिंबा आहे, अशीही चर्चा आहे. राज यांच्या आंदोलनाला हवा मिळाली तर त्याचा निवडणुकीत मनसेला फायदाच होईल. शिवसेनेची मतं फुटतील. शिवसेनेच्या मतफुटीमुळं सरकार तरुन जाईल, असे मनसुबे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने बांधले आहेत. त्यामुळं राज ठाकरे यांच्या बाबतीत सरकार नरमाईचं धोरण स्वीकारत होतं.
कदाचित हेच कारण असल्यामुळं सरकारनं विक्रोळी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवताना शंभरवेळा विचार केला होता. अन्‌ राज ठाकरे यांना अटक लांबवली होती. पण ठाण्यातल्या घडामोडींनंतर राज यांना पहाटे पहाटेच उचलण्यात आलं. आता राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात राज यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदले जाताहेत. पोलिसही कधी नव्हे इतकी घाई करताहेत. इतकी तत्परता दाखवण्यात राज्य सरकारचा कोणताच छुपा हेतू नाही, यावर विश्‍वास बसणं कठीण जातंय.
राज यांचे आंदोलन त्यांच्या पक्षाची भूमिका लोकांपर्यंत जाण्यासाठी आणि पक्षविस्तार करण्यासाठी अगदी योग्य आहे. त्यांच्या पक्षाचा पायाही विस्तारला जाईल. शिवाय मराठीच्या मुद्‌द्‌यासाठी लढणारा आणखी एक शिलेदार महाराष्ट्राला मिळेल. पण राज यांच्या संघटनेसमोरचा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे त्यांच्याकडे नेत्यांची दुसरी फळी नाही.
शिशिर शिंदे, शिरीष पारकर, प्रवीण दरेकर, अतुल सरपोतदार आणि दीपक पायगुडे... या पलिकडे नेत्यांची यादी जाणार नाही. शिवाय राज ठाकरे यांची पुण्यात पहिली सभा लावणाऱ्या गणेश सातपुते यांच्यासारख्या कार्यकर्त्यानं मनसेला राम राम ठोकून पुन्हा शिवसेनेत प्रवेश केलाय. हिंदुत्व सोडून काम करणं जमत नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. इतर कार्यकर्त्यांची अवस्थाही आज ना उद्या तशीच होणारेय.
पक्षापुढे कार्यक्रम नाही, कार्यकर्ते आहेत पण नेत्यांची दुसरी फळी नाही आणि मुख्य म्हणजे सभांना गर्दी मतांमध्ये रुपांतरित होत नाही, हा बाळासाहेब यांचा वर्षानुवर्षाचा अनुभव पाहता राज ठाकरे यांच्यासमोरचे आव्हान खूप मोठे आहे. त्यांचं भवितव्य खडतर आहे. नागरिक भावनिक होऊन मतदान करत नाही. हा प्रत्यय राज आणि राणे यांना मुंबईच्या महापालिका निवडणुकीत आलेलाच आहे.
तरुणांमध्ये राज ठाकरेंची लोकप्रियता अफाट आहे. त्यांचे मुद्देही योग्य आहेत. पण तरीही पुढच्या निवडणुकीत राज यांचे भवितव्य खडतरच आहे.

Wednesday, October 15, 2008

शिवसेनेचा चेहरा बदलणारा नेता...


संघटक आणि शिस्तप्रिय कार्याध्यक्ष
ठाकरे हे आडनाव ऐकलं की, कोणत्याही मराठी माणसाचे कान टवकारणच! मग ते बाळासाहेब असोत, राज असो किंवा उद्धव. अगदी स्मिता ठाकरे हे नाव ऐकलं तरी टवकारणारे कान आहेतच. ठाकरे घराण्याबद्दल मराठी माणसाला पहिल्यापासून आकर्षण आहे. आदित्य ठाकरे एक अल्बम बाजारात आणतो आणि माध्यमांमध्ये चर्चेत राहतो. ही आहे ठाकरे या आडनावाची जादू.

उद्धव हे नाव अगदी अलिकडेच पुढे आलेलं. नाही म्हटलं तरी पाच वर्ष झाली. महाबळेश्‍वर इथं झालेल्या शिवसेना मेळाव्यात उद्धव यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घालण्यात आली. तेव्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या पहिल्यावहिल्या पत्रकार परिषदेला मी होतो. तेव्हापासून त्यांच्यात होत गेलेला बदल, घडत गेलेला कुशल संघटक आणि परिपक्व राजकारणी मी पाहतो आहे.

उद्धव हा कारकुनांचा नेता आहे, तो बाळासाहेबांइतका प्रभावी वक्ता नाही, उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना मवाळ होतेय... असे एक ना अनेक आरोप उद्धव यांच्या होत राहिले. ते राजकारणीच नाहीत, असंही काही जण म्हणत होते. पण या सर्वांकडे दुर्लक्ष करत उद्धव यांची वाटचाल सुरुच होती. नारायण राणे गेले, राजही सोडून गेला, अनेक छोटे-मोठे नेते उद्धव यांच्यावर आरोप करुन निघून जात होते. पण उद्धव त्यांच्या कार्यपद्धतीवर ठाम होते.

"फर्स्ट क्‍लास' कारकिर्द!
लागोपाठ दोन वेळा मुंबई महापालिकेवरची सत्ता अबाधित राखून त्यांनी कुशल संघटकाची आणि कार्याध्यक्षपदाची परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होण्याची कामगिरी केली होती. राणेंचा अश्‍वमेध रायगडमध्येच रोखून तुकाराम सुर्वे यांना विधानसभेत पोहोचविले होते. रामटेकमध्येही सुबोध मोहिते हे प्रकाश जाधव यांच्यापुढे चारी मुंड्या चीत झाले. ठाण्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत आख्खी राष्ट्रवादी कॉंग्रेस ठाण्यात एकवटली होती. पण तिथंही उद्धव यांची मुत्सद्देगिरी यशस्वी ठरली. राज आणि राणे बाहेर पडले तरी उद्धव यांनी हळूहळू संघटना इतकी उत्तम रितीने बांधली होती की, त्याला अधिक तडे गेले नाहीत. त्यांनी शिवसेनेला दिशा दिली.

बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना आणि उद्धव यांच्या काळातील शिवसेना पूर्णपणे वेगळी आहे. एका अर्थानं तिला "कॉर्पोरेट लुक' आला आहे. पण दुसरीकडे तळागाळातल्या नागरिकांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रसंगी "राडा' करण्याची रगही शिवसैनिकांमध्ये आहे. ऊस, कापूस आणि भारनियमनासारख्या प्रश्‍नांवर संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करत हिंडणारा एकमेव नेता म्हणजे उद्धव ठाकरे, झोपडपट्टीवासियांसाठी मुंबईत रस्त्यावर उतरणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे आणि मराठीच्या फेऱ्यात अडकवून न ठेवता सर्व मुंबईकरांमध्ये शिवसेनेला नेण्याचा प्रयत्न करणारा नेता म्हणजे उद्धव ठाकरे. त्यामुळेच उद्धव यांच्या कार्यपद्धतीबद्दल, निर्णयक्षमतेबद्दल आणि एकूणच त्यांच्या व्यक्तिमत्वाबद्दल मला आकर्षण होतं. त्यांना अगदी जवळून न्याहाळण्याची आणि मनसोक्त गप्पा मारण्याची इच्छा होती. काही दिवसांपूर्वीच ही इच्छा पूर्ण झाली.

"डिट्टो' कॉपी
दसरा मेळाव्याच्या निमित्तानं "साम मराठी' वाहिनीसाठी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घ्यायची होती. ज्येष्ठ पत्रकार संजीव लाटकर यांनी ही मुलाखत घेतली. पण मला उपस्थित राहण्याची संधी मिळाली आणि उद्धव ठाकरे यांचं अगदी जवळून निरीक्षण करता आलं. शिवसेना भवनात सैनिकांचा राबता कायमच. साहेबांना भेटण्यासाठी आलेले असंख्य कार्यकर्ते. उद्धव यांचे निकटवर्तीय विनायक राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांची सुरु असलेली धावपळ. अशा परिस्थितीत बाळासाहेब आणि राज यांची डिट्टो कॉपी वाटावी, अशा पद्धतीनं उद्धव यांचं आगमन झालं. आज काय, पेपरमध्ये काय वगैरे माहिती घेऊन साहेब आले. मध्येच कार्यकर्त्यांची चौकशी करुन मग मुलाखतीसाठी तयार झाले. बोला, विचारा प्रश्‍न असं म्हणून थेट सुरवात. त्यामुळे कॅमेरामन व लाटकर यांची थोडी धावपळ. माध्यमांना एकदमच किरकोळीत काढण्याची ठाकरे घराण्याची सवय उद्धव यांच्यामध्येही दिसून येते.

उद्धव यांच्या मुलाखतीमध्ये जाणवलेल्या काही गोष्टी म्हणजे आपल्यात काय कमी आहे, याची उद्धव यांना चांगली जाणीव आहे. त्यावर मात करुन किंवा त्याकडे दुर्लक्ष करुन उद्धव यांना पुढे वाटचाल करायची आहे. ""मी चांगला वक्ता नाही. मला बाळासाहेबांसारखं (आणि राजसारखंही) भाषण करता येत नाही. त्यामुळे बाळासाहेब आणि माझी कार्यपद्धती वेगळी आहे. त्यामुळेच शिवसेनेचा तोंडावळा वेगळा आहे,'' हे उद्धव अगदी स्वतःहून मान्य करतात. मी फर्डा वक्ता नाही, मला वक्तृत्व जमत नाही. पण त्यामुळं मी संघटना वाढवू शकत नाही, इतकंच त्यांचं म्हणणं आहे.

नवनिर्माणाचे वाटोळे
अगदी बरोबर राज हे बाळासाहेबांप्रमाणेच फर्डे वक्ते आहेत. त्यांच्यासारखेच उत्तम नकलाकार आहेत. फर्स्ट क्‍लास व्यंगचित्रकारही आहेत. पण "मनसे'चे अध्यक्ष म्हणून राज ठाकरे यांची कारकिर्द अगदीच व्यर्थ आहे. मराठीच्या मुद्‌द्‌यावर दहशत निर्माण करण्याची त्यांची वृत्ती म्हणजे पक्षाला आणि कार्यकर्त्यांना कोणताच कार्यक्रम नसल्याचे द्योतक आहे. गेल्या दोन वर्षांत जो उत्तम संघटन करु शकला नाही आणि कार्यकर्त्यांना चांगला कार्यक्रम देऊ शकला नाही, तो नेता महाराष्ट्राचे नवनिर्माण काय करणार, हा कोणालाच न सुटणारा प्रश्‍न आहे. राज ठाकरे यांच्या भाषणांमध्येही आता तेच तेच मुद्दे येताहेत. नाविन्य संपले आहे. म्हणूनच लवकरच राज यांच्या नवनिर्माणाचे वाटोळे झाले नाही तरच नवल! त्या तुलनेत उद्धव यांचा मार्ग अधिकाधिक प्रशस्त होताना दिसतो आहे.

आहे हे असं आहे...
दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना आपल्या छंदांबद्दल प्रचंड अभिमान आहे. असतात एकेकाला महागडे छंद. आता मला मासे पाळण्याचा छंद आहे आणि माझ्याकडे काही लाखांचा मासा होता, त्याला माझा काय दोष? माझा त्याच्यावर जीव जडला होता आणि तो गेला म्हणून मला दुःख झालं. त्यात माझं काय चुकलं? असा सवाल उद्धव कसलीच भीडभाड न बाळगता उपस्थित करतात. मासा मेला ही माध्यमांसाठी (लोकसत्ताच!) मथळ्याची बातमी होते पण दोन आठवड्यांपूर्वी चार दिवसांत नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, त्याची बातमी माध्यमांना महत्वाची वाटत नाही. हीच का तुमची बातमीदारी, असा सवाल उपस्थित करुन ते स्वतःची बाजू समर्थपणे मांडतात. लपवाछपवी करण्याची गरज त्यांना वाटत नाही. आहे हे असं आहे, पटत असेल तर या अन्यथा धन्यवाद हा सावरकरी विचारांचा वसा घेऊन ते पुढे निघालेत. (येतील त्यांच्या सह, नाही येणार त्यांच्याविना आणि आड येतील त्यांना पार करुन ः सावरकर)

शेतीतलं कळत नाही...
आपल्याला जे कळत नाही, ते स्पष्टपणे मान्य करण्याचा मोठा गुण त्यांच्याकडे दिसतो. म्हणूनच ते म्हणातात, मला शेतीतलं कळत नाही. कारण मी कधीच शेतात गेलो नाही. पण शेतकरी मरतो आहे, हे मी उघड्या डोळ्यानी पाहू शकतो. वीज मोफत, पाणी मोफत, कर्जही माफ पण तरीही शेतकरी आत्महत्या करतोय. कारण त्याला बी-बियाणं नाही, खतं वेळेवर मिळत नाही, पावसाचा पत्ताच नाही, पाणी मिळालंच तर पिक येतं. पण त्याला सरकार भावच देत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना आत्महत्या करण्यावाचून पर्याय राहत नाही. म्हणूनच शेतकऱ्यांच्या पिकाला भरपूर भाव दिल्याखेरीज आत्महत्या थांबणार नाही, हे कळण्यासाठी शेतीतलं कळलंच पाहिजे, असं नाही. उद्धव ठाकरे यांचा हा मुद्दा पटतोही. कारण शेतीतलं कळणारे सत्तेत असतानाही शेतकरी आत्महत्या करताहेत. त्यांचाच नेता कृषीमंत्री आहे. मग उपयोग काय
त्यांना शेतीतलं कळून?

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेवर प्रचंड पकड मिळविली आहे. शिवसेनेला एका दिशेने आणि एका विचाराने नेण्याचा त्यांचा मानस आहे. जुन्या नेत्यांना न दुखावता त्यांनी स्वतःचं स्वतंत्र सल्लागार मंडळ स्थापन केलं आहे. विनायक, संजय आणि भारतकुमार ही राऊत मंडळी, मिलिंद नार्वेकर, दिवाकर रावते आणि सुभाष देसाई या सहा सल्लागारांच्या सहाय्याने त्यांचा कारभार सुरु आहे. त्यांनी संघटना मुळापासून बांधून काढली आहे. भविष्यात त्यांना कितपत यश प्राप्त होतं त्याचं भाकित आताच करणं अवघड आहे. पण शिवसेना संपली, असं म्हणणाऱ्यांना या "कारकुनांच्या नेत्या'नं चोख उत्तर दिलंय...

Monday, August 04, 2008

शास्त्री रस्त्यावरील सुप्रसिद्ध अजंठा

गेल्या अनेक वर्षांपासून जिभेवर रेंगाळणारी चव काही दिवसांपूर्वी पुन्हा एकदा चाखायला मिळाली. निमित्त होते माझे जुने मित्र आणि लोकसत्ताचे पत्रकार विनायक करमरकर शास्त्री यांच्या भेटीचे. शास्त्री रस्त्यावर एक कार्यक्रम कव्हर करण्यासाठी ते आले होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत भारतीय जनता युवा मोर्चाचे संदीप खर्डेकर देखील होते. त्यावेळी चला अजंठामध्ये जाऊ असा सूर शास्त्रींनी आळवल्याने मला थोडासा धक्काच बसला आणि अजंठाच्या चवीची ओळख करमरकर बुवांनाही असल्याचे ऐकून थोडेसे बरेही वाटले.

सांगायची गोष्ट अशी की, शास्त्री रस्त्यावर तेव्हा फार कमी हॉटेल्स किंवा रेस्तराँ होती. अर्थात, आजच्या घडीला खूप आहेत अशातील काही गोष्ट नाही. पण तेव्हा चॉईसच नव्हता. पण त्यावेळीही जे काही तीन-चार स्पॉटस होते त्यात अजंठाची अगदीच न्यारी होती. शास्त्री-खर्डेकर यांच्याबरोबर गेल्यानंतर चव अजूनही कायम राखली असल्याचे जाणवले. गरमागरम वडा आणि इडली सांबार ही अजंठाची वैशिष्ट्य. पण इथे मिळणारी दहा पंधरा प्रकारची श्रीखंड, भेळ-मिसळ आणि फक्कड चहा यांचीही तोड नाही. पण वडा द बेस्ट.

अजंठाचा वडा
वड्याचा आकार म्हणाल तर इतर ठिकाणच्या वड्यांच्या तोंडात मारेल असा. आणि चव थोडीशी झणझणीत. सोबतीला त्यापेक्षा झणझणीत हिरवी चटणी. हवी असेल तर चिंचगूळ आणि खजूर यांची चटणीही आहेच एकावेळी कमीत कमी दोन वडे खाल्ल्याशिवाय पठ्ठा उठणारच नाही. बाहेर मिळत असलेल्या वड्यांच्या तुलनेत अजंठाच्या वड्याची किंमत थोडी अधिक असेल पण चव चांगली असेल तर खवय्यांची कोणतीही किंमत मोजायची तयारी असते

काही दिवसांपूर्वी अजंठाच्या बरोबर समोर जोशी वडेवालेची शाखा सुरु झाली होती. तेव्हा अजंठाचा खप कमी होणार, अशी सर्वांचीच अटकळ होती. पण अजंठाची चव आणि त्यामुळे विक्री आहे तशीच आहे. त्यामुळे जरा बरं वाटलं.

इडली सांबारमध्ये बुडली
वड्याप्रमाणेच इथला आणखी एक लोकप्रिय प्रकार म्हणजे इडली सांबार. आता इडली सांबारमध्ये काय आहे खाण्यासारखं आणि ते देखील एका मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. पण एकदा खाऊन पहाच. आकाराने मोठी आणि तरीही हलकी अशी वाफाळलेली इडली तुमच्यासमोर असेल तर काय हिंमत तुम्ही इडली गट्टम करणार नाही. कोणत्याही अण्णाच्या तोंडात मारेल अशी इडली हे अजंठाचं वैशिष्ट्य आहेच.

पण सांबार ही इथली दुसरी खासियत. पूर्वी कुमठेकर रस्त्यावर असलेल्या स्वीट होममध्ये (आणि आताही) सांबारची जी चव होती तीच चव अजंठामध्ये आहे. तूरडाळीचं वरण, त्याला सांबारची चव आणि वरुन झणझणीत तर्री असा सांबार खाताना अक्षरशः घाम निघतो. पण चव कायम लक्षात राहते अर्थातच दुसऱ्या दिवशी होणाऱ्या परिणामामुळे नव्हे.

श्रीखंडाची रेलचेल
श्रीखंड म्हटलं की एक-दोन प्रकार आपल्याला आठवतात. वेलची, आम्रखंड आणि फारफार तर केशरबदाम किंवा केशर पिस्ता. पण तुम्ही स्ट्रॉबेरी, पायनापल, चॉकलेट आणि असे काही एकदम हटके प्रकार कधी ऐकले आहेत का. नाही ना मग तुम्ही एकदा तरी अजंठाला भेट द्यायलाच हवी. कारण इथे मिळणारी ही व्हरायटी तुम्हाला दुसरीकडे क्वचितच मिळेल.

Wednesday, July 23, 2008

तिसऱ्या आघाडीसाठी सुगीचे दिवस

सरकार वाचलं असलं तरी सहा-आठ महिन्यांनी निवडणुका होणारच आहेत. आता सरकार वाचलं आणि अणु कराराची पुढील कार्यवाही झाली तरी निवडणुकीत त्याचा सरकारला विशेष फायदा होईल, असं वाटत नाही. विश्‍वासदर्शक ठराव केंद्र सरकारनं जिंकला असला तरी त्यामुळं भविष्यातील केंद्रातील राजकारणावर विशेष परिणाम होणार नाही. मनमोहनसिंग सरकारचे आजचे मरण उद्यावर ढकलले गेले आहे इतकेच! पण कॉंग्रेस सरकारची गच्छंती निश्‍चित आहे. पण कॉंग्रेसऐवजी कोण की पुन्हा कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली छोट्या मोठ्या पक्षांची खिचडी? त्यामुळं भविष्यातील राजकीय स्थिती कशी असेल, यावर घेतलेला हा लेखाजोखा...

पंतप्रधानापदाचे बाशिंग बांधून बसलेल्या लालकृष्ण अडवानी यांच्या भारतीय जनता पक्षाची अवस्था फारशी काही चांगली नाही. अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि सध्याची "रालोआ' यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. ममता बॅनर्जी यांची तृणमूल कॉंग्रेस व चंद्राबाबू नायडू यांचा तेलुगू देसम "रालोआ'बरोबर नाही. जयललितादेखील भाजपबरोबर येण्याच्या मनःस्थितीत नाही.

बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या संयुक्त जनता दलात प्रचंड धुसफूस सुरु आहे. भाजप आणि संयुक्त जनता दलाचे फारसे सख्य नाही. तिकडे अकाली दलाचे नेतेही पंजाब प्रदेश भाजप नेत्यांवर खार खाऊन आहेत. पण तरीही अकाली दल भाजपची साथ सोडणार नाही, हे निश्‍चित. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात शिवसेना, ओरिसात बिजू जनता दल व पंजाबमध्ये अकाली दल हेच खरेखुरे साथीदार भाजपच्या मदतीला असतील. शिवाय अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा हुकुमी एक्का या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी सक्रिय नसेल, ही गोष्ट कुंपणावरच्या मतदारांना आकृष्ट करताना महत्त्वाची ठरणार आहे. तसेच निवडणुकीच्या व्यवस्थापनात हातखंडा असलेल्या प्रमोद महाजन यांचीही उणीव पक्षाला जाणवेल.

सध्यातरी लालकृष्ण अडवानी यांच्याइतका दुसरा सर्वमान्य नेता भाजपकडे नाही. राजनाथसिंह, व्यंकय्या नायडू, सुषमा स्वराज, अरुण जेटली, रवीशंकर प्रसाद आणि दुसऱ्या फळीतील इतर नेत्यांमध्ये सुरु असलेले हेवेदावे देखील कामगिरीवर प्रतिकूल परिणाम करु शकतात. पक्षांतर्गत धुसफूस लक्षात घेता 134 चा आकडा पुन्हा गाठणे हे देखील भाजपपुढे आव्हान असेल. मित्रपक्षांची घटती संख्या पाहिली तर "रालोआ'चे बळ देखील वाढणे अवघडच वाटते आहे.

कॉंग्रेसची गोची
प्रचंड वाढलेली महागाई हा एकच मुद्दा कॉंग्रेसला निवडणुकीत पराभूत करण्यासाठी कारणीभूत आहे. विरोधक जर संघटित आणि शक्तिशाली असते, तर पुढील निवडणुकीत कॉंग्रेसला नक्कीच शंभरचा आकडा गाठता आला नसता. पण सोनिया गांधींचे नेतृत्व आणि कमकुवत विरोधक यामुळे कॉंग्रेस पक्षाला दारुण पराभव पत्करावा लागणार नाही. अणुकरार झाला काय किंवा नाही झाला काय, याचा विचार सामान्य नागरिक मतदान करताना करणार नाही. तेव्हा आमच्यामुळे अणुकरार झाला किंवा विरोधकांमुळे अणुकरार रखडला, असा कोणत्याही स्वरुपाचा मुद्दा कॉंग्रेसने पुढे केला तरी त्याला भारतीय नागरिक कितपत साथ देतील, याबाबत साशंकता आहे.

महागाईचा भस्मासूर रोखण्यासाठी तुम्ही काय केले, पेट्रोल आणि घरगुती गॅसचे दर आटोक्‍यात ठेवण्यात तुम्ही अपयशी का ठरला, असे प्रश्‍न नागरिकांनी विचारले, तर त्याचे फारसे समाधानकारक उत्तर कॉंग्रेसकडे नसेल आणि जे उत्तर कॉंग्रेस पक्ष प्रचारादरम्यान देईल, त्यामुळे नागरिकांचे समाधान होईल, असे काही वाटत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाला "अँटीइन्कम्बन्सी'चा फटका बसणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सरकारविरोधी वातावरणाचा फटका कमी बसावा यासाठी कॉंग्रेस कोणती उपाययोजना करते आणि त्यात त्यांना कितपत यश येते, यावर कॉंग्रेस कितपत मजल मारेल, हे ठरणार आहे. पण भाजपप्रमाणेच कॉंग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची शक्‍यता धूसरच वाटते आहे.

नव्या पर्यायांचा विचार
अशा परिस्थितीत पुन्हा तथाकथित तिसरी आघाडी आणि डावी आघाडी यांना सरकार स्थापनेची सर्वाधिक संधी असेल. केंद्रीय राजकारणात महत्वाची भूमिका बजाविणाऱ्या प्रादेशिक पक्षांचा राज्यांमध्ये क्रमांक एकचा शत्रू कॉंग्रेसच आहे. त्यामुळे तेलुगू देसम पक्ष, अण्णा द्रमुक, लोकदल किंवा बहुजन समाज पक्ष असे पक्ष कॉंग्रेसला दूर ठेवण्यासाठी एकत्र येऊ शकतात. हे पक्ष पूर्वी भाजपच्या तंबूत होते. पण तेव्हा नेतृत्व अटलबिहारी वाजपेयी यांचे होते. आता तसे नाही. त्यामुळेच ही मंडळी भाजपबरोबर निवडणूकपूर्व युती किंवा निवडणुकीनंतर आघाडी करण्याची शक्‍यता फारच थोडी आहे.

प्रादेशिक पक्षांना शक्‍यतो कॉंग्रेसबरोबर युती नको आहे. त्यामुळेच भाजप आणि कॉंग्रेस यांना समान अंतरावर ठेवणारा एखादा पर्याय पुढे येत असेल, तर त्याला या पक्षांची पसंती असेल. अण्णा द्रमुक व तेलुगू देसम या पक्षांना गेल्या निवडणुकीत जबर फटका बसला होता. मात्र, आंध्र प्रदेश व तमिळनाडू येथील राजकारणाची सद्यस्थिती पाहता यंदाच्या निवडणुकीत जयललिता व चंद्राबाबू यांचे पक्ष पुन्हा बहरात येण्याची शक्‍यता आहे. दोन्ही पक्षांनी जर "क्‍लिन स्वीप' मिळविला, तर 65 ते 70 खासदारांचा एक गट तयार होईल व हाच गट सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावेल.

महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद गेल्या काही वर्षांमध्ये चांगलीच वाढली आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका अशा विविध निवडणुकांमधून त्याचा प्रत्यय आला आहे. शिवाय हा पक्ष फक्त ग्रामीण भागापुरता मर्यादित राहिला नसून, शहरी मतदारांनाही त्यांनी आकर्षित केले आहे. विधानसभेच्या निवडणुकीत तर त्यांनी सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का दिला होता. अशा परिस्थितीत यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पंधराचा आकडा ओलांडेल, अशी अपेक्षा करावयास हरकत नाही. भाजप आणि कॉंग्रेस यांना बाजूला ठेवून नवा पर्याय अस्तित्वात येत असेल, तर राष्ट्रवादीही त्यात सहभागी होऊ शकते.

हरियाणात लोकदल, आसाममध्ये आसाम गण परिषद, पश्‍चिम बंगालमध्ये तृणमूल कॉंग्रेस आणि उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्ष या पक्षांची भूमिका काही प्रमाणात अशीच असेल. शिवाय लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, देवेगौडांचा धर्मनिरपेक्ष जनता दल व शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा हे पक्षही तिसऱ्या पर्यायाला समर्थन देऊ शकतात.

पश्‍चिम बंगाल आणि केरळ हे डाव्यांचे बालेकिल्ले. शिवाय तमिळनाडू, आंध्र प्रदेश व देशाच्या इतर राज्यांमधून एखाद दुसरा खासदार निवडून आणण्याची ताकद डाव्यांमध्ये आहे. सध्या डाव्यांचा आकडा साठपर्यंत पोचतो. यंदाच्या निवडणुकीत डाव्यांना हा "जॅकपॉट' लागण्याची शक्‍यता कमीच. तरीही डावे 45-50 पर्यंत नक्की पोचतील, अशी परिस्थिती आहे.

अशा परिस्थितीत तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीचे सरकार व त्याला कॉंग्रेसचा बाहेरून पाठिंबा हा पर्यायही निवडणुकीनंतर अस्तित्वात येऊ शकतो. कॉंग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांचे खासदार जवळपास समान झाले आणि दोघांनाही दीडशे-पावणेदोनशेचा आकडा ओलांडता आला नाही तर पुन्हा एकदा एच. डी. देवेगौडा किंवा इंद्रकुमार गुजराल यांच्याप्रमाणेच नवा पंतप्रधान देशाला मिळण्याची शक्‍यता निश्‍चित आहे.

Friday, June 13, 2008

चविष्ट कोल्हापूर

कोल्हापूर हे शहर माझ्या मनात कायमचं कोरलं गेलं. यापूर्वी कोल्हापूरला आम्ही जायचो ते फक्त अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी. अंबाबाईचं दर्शन घ्यायचं आणि पुण्याला परतायचं किंवा मग रत्नागिरीत उतरायचं. पण कोल्हापूरमध्ये राहण्याचा प्रसंग कधीच आला नव्हता. कोल्हापूरमध्ये राहण्याची संधी मिळाली आणि शहराचं सांस्कृतिक, क्रीडा तसंच खाद्यवैभव अगदी जवळून अनुभवता आलं.
कुस्ती असो किंवा मिसळ, फेटा असो किंवा तांबडा-पांढरा रस्सा, दागिन्यांचा साज असो किंवा धारोष्ण दूध कोल्हापूरची आठवण अगदी प्रकर्षानं होते.
कोल्हापूरमधील आमच्या खाद्ययात्रेची सुरवात झाली ती फडतरेंच्या मिसळनं. कोल्हापुरी मिसळ म्हणजे झणझणीत आणि जाळ हा माझा समज पुण्यातील काटा किर्रर...नादच खुळा या उपहारगृहानं यापूर्वीच खोडून काढला होता. पण काटा किर्रर...ला मिळणारी मिसळ ही फडतरेंच्या मिसळची चक्क कॉपी असल्याचं अगदी पहिला चमचा घेतल्यानंतर जाणवलं.
एका स्टीलच्या वाडग्यात मिसळ देण्याची परंपरा फडतरेंनी 1991 मध्ये सुरु केली. मूग किंवा मटकीची उसळ, बटाट्याची भाजी, कांदा, बारीक शेव आणि त्यावर तर्री असलेला रस्सा. रस्सा रंगावरुन खूप जाळ असेल असं वाटत असलं तरी तसं नाही. आपण अगदी सहजपणे खाऊ शकू असा हा रस्सा असतो. चवीला काहीसा कडवट. अर्थात, ही कडवट चव तिखटाची आणि ती देखील गूळ न घातल्यानं आलेली. रस्सा घालून झाला की त्यावर एक चमचा दही घालून मिसळची डिश तुमच्यासमोर ठेवली जाते. सोबतीला लादी पाव. रस्सा कितीही खा दुसऱ्या दिवशी कोणताच त्रास होणार नाही याची हमी. घसा धरणार नाही किंवा जास्त धावपळही करावी लागणार नाही.
सकाळी चार वाजल्यापासून रस्सा (पातळ भाजी किंवा कट) तयार करण्यास प्रारंभ होतो. रोज साधारणपणे अडीचशे डिश जातात, असं प्रवीण फडतरे सांगतात. कोल्हापूरमध्ये चोरगे, दत्त आणि इतरही अनेक मिसळवाले आहेत. पण फडतरे ते फडतरेच असं इथले खवय्ये सांगतात. आता माझाही त्यावर विश्‍वास बसलाय.
पांढरा-तांबडा रस्सा हा देखील तितकाच अप्रतिम. पुण्यात काही ठिकाणी पांढरा रस्सा मिळतो पण तो अस्सल नाही हे इथं आल्याशिवाय कळत नाही. तांबड्यापेक्षा पांढरा रस्साच अधिक चांगला वाटला. मिसळीचा कट आणि मटणाबरोबर मिळणारा तांबडा रस्सा यामध्ये थोडाफार फरक आहे. पण दोन्ही भाऊ भाऊच!
पांढरा रस्सा म्हणजे मटणाचं पाणी, नारळाचं दूध, थोडीशी हळद आणि मीठ. काही चतुर मंडळी यामध्ये "कॉर्न फ्लॉवर' किंवा इतर पदार्थ मिसळून बनवाबनवी करतात. पण आमचे मित्र चारुदत्त जोशी यांचे मित्र संजय निकम यांच्या वूडीज या हॉटेलमध्ये तांबडा आणि पांढरा रस्सा पिऊन मन तृप्त झालं.
कोल्हापूरमध्ये आवडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे दीपकचा वडा. इतर ठिकाणी मिळते तशीच बटाट्याची भाजी किंवा सारण. पण वरील आवरण मूगाच्या पिठापासून तयार केलेले किंवा कदाचित हरभरा डाळच अधिक जाड दळून ते कालविले असावे. पण डाळ दाताखाली येईल अशी व्यवस्था त्यात होती. त्यामुळे फक्त सारणाची चव न लागता वरच्या आवरणाचीही चव लागावी अशी व्यवस्था. पुण्या-मुंबईत चार-पाच रुपयांत मिळणारा वडा येथे आठ रुपयांना ऐकून डोळेच चमकतात. पण आकार काहीसा मोठा आणि चवही अप्रतिम त्यामुळे "लेट्‌स एन्जॉय'! सोबतीला पावभाजीचा पाव न देता लादीपाव दिला जातो. त्यामुळे वडापाव घेण्याऐवजी नुसता वडाच घेण्यात हशील आहे.
शिवाजी चौकामध्ये मिळणारा दावणगिरी लोणी डोसा एकदा तरी खावाच. मी पुन्हा एकदा जाऊन खाणार आहे. नेहमीच्या डोसा पिठापेक्षा काहीसे पातळ पीठ. शिवाय नेहमीच्या डोशापेक्षा आकाराला वेगळा. हा डोसा पातळ नसतो आणि घावनसारखा असतो. पण त्यावर लोणी अक्षरशः ओतले जाते. अगदी मोकळ्या हाताने. शिवाय एकदा लोणी टाकल्यानंतर तो जेव्हा पलटी करतात तेव्हा तितकेच लोणी पुन्हा एकदा टाकून पाघळलेल्या लोण्यात तो डोसा अक्षरशः घोळविला जातो. "हेल्थ कॉन्शस' लोकांनी इकडे वळू देखील नये. मी हा डोसा दोनवेळा खाल्ला. लहान आकारामधील स्पंज डोसा (तीन) देखील "ट्राय' करायला हरकत नाही.
गुरुवारी सकाळी कोल्हापूर स्टेशनजवळ खालेल्ला भडंगचा प्रकारही चांगला आहे. स्टेशनपलिकडे जाधव चौकात लाड बंधू भडंगची गाडी आहे. त्यावर सात रुपयात एक प्लेट भडंग मिळते. लाड यांनी घरी तयार केलेलं झणझणीत भडंग. त्यावर कांदा, टोमॅटो, बारीक शेव आणि कोथिंबीर टाकून मिळणारं भडंग एकदम चटकदार. कोल्हापूरमध्ये राहून इतकं वैविध्यपूर्ण आणि चविष्ट खाल्लं आहे की विचारता सोय नाही. पुन्हा पुन्हा अशीच संधी मिळावी, अशीच अपेक्षा आहे. म्हणजे आता टेस्ट केलेले पदार्थ पुन्हा एकदा खाता येतील आणि जे राहिलं आहे त्यावर आडवा हात मारता येईल.

Saturday, May 24, 2008

वडापाव ते बर्गर...

प्रत्येक राज्याची एक खाद्यसंस्कृती असते. तशी महाराष्ट्रानेही स्वतःची खाद्यसंस्कृती जपली आहे. समुद्रकिनारा लाभलेल्या कोकणापासून ते रणरणत्या उन्हात भाजून निघणाऱ्या नागपूरपर्यंत पसरलेल्या महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे.

गरमागरम पुरणपोळीपासून ते झणझणीत तांबड्या रश्‍श्‍यापर्यंत आणि पाघळणाऱ्या लोण्यामुळे लज्जत वाढणाऱ्या कांद्याच्या थालिपीठापासून ते वऱ्हाडी मंडळींच्या अभिमानाचा विषय असलेल्या वडाभातापर्यंत साऱ्या पदार्थांची नुसती नावे ऐकली तरी तोंडाला पाणी सुटणारच. त्यात मालवणी मसाले वापरून केलेले पॉम्फ्रेट किंवा सुरमई मासे, सोलकढी, कोल्हापुरी पद्धतीने बनविलेले झणझणीत चिकन-मटण, खानदेशचे वैशिष्ट्य वांग्याचे भरीत-भाकरी आणि खिचडी, सोलापूरचं सुकं मटण आणि शेंगादाण्याची चटणी, मराठवड्यात प्रसिद्ध असलेली शेंगाची पोळी आणि अस्सल ब्राह्मणी संस्कृतीमध्ये मुरलेले श्रीखंड, सोललेल्या वालाची (डाळिंब्यांची) उसळ व आळूची भाजी.

मराठी खाद्यपदार्थांची यादी करण्याचे ठरविले व प्रत्येक ठिकाणच्या खाद्यपदार्थांची नावे काढण्यास सुरवात केली तर मग विचारता सोय नाही. अर्थात, महाराष्ट्राची खाद्यपताका महाराष्ट्राबाहेरही फडकत ठेवणारा एकमेव पदार्थ म्हणजे अस्सल मराठी वडापाव. महाराष्ट्राला वडापाव ही काही नवी गोष्ट नाही. शिवसेनेने मुंबईमध्ये वडापावला लोकमान्यता मिळवून दिली. हळूहळू मुंबईबाहेरही वडापावची लोकप्रियता वाढली व वडापाव ही महाराष्ट्राची ओळख बनली. पोहे, पुरी भाजी, कट वडा व वडा उसळ या नाश्‍त्यासाठीच्या अस्सल मराठी पदार्थांच्या यादीत वडापाव रुजू झाला.

महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकतापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसैनिकांच्या भाषेत मुंबई वडापाव) मिळू लागला आहे. प्रत्येक प्रांतामध्ये त्या ठिकाणच्या आवडीनिवडीनुसार चवीमध्ये बदल होत गेला पण वडापाव कायम राहिला.

झणझणीत मिसळ, पुरणपोळी आणि वडापाव यासारखे महाराष्ट्रीयन पदार्थ जसे महाराष्ट्राबाहेरही लोकप्रिय ठरले तसेच महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतही अनेक बदल होत गेले. सर्वसमावेशाची संस्कृती जोपासणाऱ्या महाराष्ट्राने परप्रांतामधील खाद्यपदार्थांनाही कधी दुय्यम वागणूक दिली नाही. नेहमी भरभरुन प्रेमच केले आहे.

गुजरातमधील कच्छी दाबेली, ढोकळा, फाफडा, खाकरा, ठेपला आणि उँधियो यांनी कधी "मेन्यू कार्ड'मध्ये आणि खवय्यांच्या हृदयामध्ये स्थान मिळविले ते समजले देखील नाही. तीच गोष्ट दक्षिण भारतातील इडली, डोसा, मेदूवडा आणि सांबार-रस्समची! बंगालचा रसगुल्ला, केरळचा मलबारी पराठा, पंजाबची लस्सी आणि शेकडो प्रकारचे "स्टफ' पराठे, राजस्थानची दाल-बाटी, इंदूरची कचोरी, हैदराबादची चिकन-मटण बिर्याणी हे महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीत इतके बेमालूमपणे मिसळून गेले आहेत की हे पदार्थ बाहेरचे आहेत यावर विश्‍वासही बसणार नाही.

परराज्यातीलच नव्हे तर परराष्ट्रातील खाद्यपदार्थांनाही मराठी माणसाने आपलेसे केले आहे. वेगवेगळ्या प्रकारचे राईस-नूडल्स आणि सूप्स यांचा समावेश असलेली चायनीज खाद्यसंस्कृती, बर्गर, फ्रॅंकी, हॉटडॉग अशी "जंकफूड'ची संस्कृती जोपासणारे अमेरिकी खाद्यपदार्थ, पिझ्झा आणि पास्ता हे इटालियन खाद्यपदार्थ, नेपाळ, भूतान तसेच भारताच्या ईशान्य भागात लोकप्रिय असलेले मोमोज असे अनेकविध पदार्थ मराठी माणसाच्या जिभेचे चोचले पुरवित आहेत.

मेक्‍सिकन, लेबनीज, थाई, जॅपनीज आणि कॉन्टिनेन्टल संस्कृतींमधील शेकडो खाद्यपदार्थ भारतात आणि महाराष्ट्रात कधीच दाखल झाले आहेत. त्यामुळेच वेगवेगळ्या खाद्यसंस्कृतीमधील पदार्थ मिळणारी "मल्टिक्‍युझिन रेस्तरॉं'ची लोकप्रियता वाढू लागली आहे. अर्थात, परराज्यातील आणि परराष्ट्रातील खाद्यपदार्थ कितीही लोकप्रिय झाले तरी त्याचा फटका मराठमोळ्या खाद्यपदार्थांना कधीच बसला नाही आणि यापुढेही बसणार नाही.

मराठी माणसाच्या हृदयातील महाराष्ट्रीयन खाद्यपदर्थांचे स्थान अढळ आहे. पावसाचा वर्षाव सुरु असताना वाफाळलेला चहा व सोबत गरमागरम कांदा भजी खाण्याचा मोह कोणाला आवरणार नाही. रस्त्यावरुन जात असताना उकळत्या तेलात वडे सोडल्यानंतर सुटलेला घमघमाट तुम्हाला त्या गाडीपाशी खेचून नेतो. वरण-भात, पोळी भाजी व आमटी किंवा तिखट कालवण हे नेहमी साधंच वाटणारं जेवण महिनाभर घराबाहेर राहिल्यानंतर स्वर्गसुखासारखं वाटू लागतं.

जी गोष्ट शाकाहारी पदार्थांची तीच मांसाहारी पदार्थांची. बाहेर हॉटेलमध्ये कितीही उत्तम नॉनव्हेज मिळू दे पण घरगुती पद्धतीनं वाटण करुन तयार केलेल्या चिकन किंवा मटणाला वेगळीच चव असते. त्यामुळेच अनेकदा "रेस्तरॉं'मध्ये खास घरगुती पद्धतीने बनविलेले अमुक अमुक पदार्थ येथे मिळतील, अशा पाट्या लावाव्या लागतात. थोडक्‍यात काय तर महाराष्ट्राला समृद्ध व संपन्न करण्यासाठी जे प्रयत्न झाले किंवा होत आहेत त्यात महाराष्ट्राबाहेरुन आलेल्या व्यक्तींचाही महत्वाचा वाटा आहे. तसाच महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती संपन्न करण्यात मराठमोळ्या पदार्थांप्रमाणेच महाराष्ट्राबाहेरील पदार्थांचाही खारीचा का होईना पण वाटा आहेच. सर्वसमावेशकता हा गुण महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने स्वतःच्या खाद्यसंस्कृतीचा विसर न पडू देता पडला आहे, हे विशेष.

सरतेशेवटी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणायचे ती एकच गोष्ट महत्वाची. स्वातंत्र्यवीरांना मासे प्रचंड आवडायचे. त्यांना काही जणांनी विचारले की, तुम्ही तर ब्राह्मण मग तुम्ही मासे कसे काय खाता? सावरकरांनी त्यावेळी दिलेले उत्तर खूप महत्वाचे आहे. सावरकर म्हणाले, ""प्रत्येकाने आपल्याला रुचेल ते आणि महत्वाचे म्हणजे पचेल ते खावे.'' धर्म, संस्कृती, जात, देश, भाषा आणि वर्ण या गोष्टींचा संबंध खाद्यपदार्थांशी जोडला जाऊ नये हेच त्यांना सुचवायचे होते. सामाजिक क्षेत्रातही क्रांतिकारक विचार जोपासणाऱ्या सावरकरांचे खाद्यसंस्कृतीबद्दलचे हे विचारही आजच्या जमान्यात तितकेच उपयुक्त आहेत.

(This Article was Published in Sakal's SATARA editon on 25th May 2008)

Tuesday, March 11, 2008

अन्नपूर्णा आणि महालक्ष्मी...


गरमागरम बटाटे वडा आणि फक्कड चहा

वडेवाले जोशी, रोहित वडेवाले, गोली वडापाव, जम्बो वडापाव आणि चौकाचौकांमध्ये गाड्यांवर मिळणाऱ्या वड्याची चव चाखून कंटाळा आला असेल तर शिवाजी रस्त्यावर असलेल्या "प्रकाश स्टोअर्स'च्या गल्लीत असलेल्या अन्नपूर्णाला एकवार जरुर भेट द्या.

आपण त्या गल्लीत शिरल्यानंतर जसजसे "अन्नपूर्णा'च्या जवळ जायला लागू तसतसा आपल्याला वडे तळण्याचा घमघमाट जाणवू लागतो. तेथेच आपली विकेट पडते. मग "एक प्लेट' वडा किंवा दोन वडापाव खाल्ल्याशिवाय आपला आत्मा थंड होत नाही. वास्तविक पाहता अन्नपूर्णा हे खरोखरच नावाप्रमाणे आहे. बटाटा वड्यापासून ते भाजणीच्या वड्यापर्यंत बऱ्याच "व्हरायटी' येथे मिळतात. मग त्यात उडीद वडा व साबुदाणा वडा हे प्रकारही आलेच. दक्षिणेकडील इडली-चटणी देखील आहे. मराठमोळी ओल्या नारळाची करंजीही आहे. पण बटाटा वड्याची चव म्हणाल तर काही औरच!

साधारणपणे संध्याकाळी पाच वाजल्यानंतर शिवाजी रस्त्यावरील गर्दी वाढू लागते आणि अन्नपूर्णासमोर उभे राहून खाद्यपदार्थ खाणाऱ्या खवय्यांचीही. पूर्वी कुमठेकर रस्त्यावरील प्रभा विश्रांती गृहातील वडा हा इतरांपेक्षा वेगळा होता. तो अजूनही आहे. पण अनेक अटी आणि नियमांच्या चौकटीत अडकलेला तो वडा न खाल्लेलाच बरा अशी अवस्था होऊन जाते. अन्नपूर्णाचा वडा अगदी तसाच आहे. म्हणजे अटी व नियमांच्या चौकटीत अडकलेला नव्हे. तर चवीला अगदी हटके!

इथे गर्दीच इतकी असते की प्रत्येक घाण्यातील वडे अगदी हातोहात संपतात. त्यामुळे प्रत्येक वेळी गरमगरम वडे हमखास मिळतात. वड्यातील सारणामध्ये बटाटा व कांदा यांच्या जोडीला लसूणाचाही हलका स्वाद असतो. शिवाय या सारणामध्ये लिंबाचीही थोडी चव जाणवते. त्यामुळेच हा वडा इतरांपेक्षा वेगळा ठरतो. चणा डाळीच्या पिठातही मीठ व तिखट असते त्यामुळे तेही बेचव लागत नाही. शिवाय वड्याला चण्याच्या पिठाचे आवरण अगदी पातळ असते. त्यामुळे वडा आणखी लज्जतदार लागतो.

"अन्नपूर्णा'तील चटणीही अगदी चविष्ट. बटाटा वड्यासोबत मिळणारी हिरवी किंवा साबुदाणा वड्यासोबत मिळणारी दाण्याची चटणी दोन्ही चटण्या तितक्‍याच चवदार. "चटणी वड्यातच टाकली आहे' असे कुमठेकर रस्त्यावरील उपहारगृहात हमखास मिळणारे उत्तर येथे मिळत नाही. वड्याला पुरेशी चटणी येथे दिली जाते. आणखी हवी असेल तर परतही चटणी मिळते. साबुदाणा वडा तितकाच खमंग अन्‌ भाजणीचा वडाही चांगलाच खुसखुशीत. पण माझे ऐकाल तर अनेकदा भेट दिल्यानंतर बटाटा वड्याची चव तुमच्या जिभेवर रुळली की मगच इतर खाद्यपदार्थांकडे वळा.

वडा खाल्ल्यानंतर चहा आलाच. अर्थात, वडा खाल्ला नाही तरी चहा आहेच पण खाल्ल्यानंतर आवर्जून आहेच. चहाची तल्लफ भागविण्यासाठी तुम्हाला खूप दूर जाण्याची गरज नाही. "प्रकाश स्टोअर्स'कडून "रॉंग साईड'ने (अर्थातच, चालत) तुम्ही नाना वाड्याकडे जाऊ लागा. नाना वाड्यासमोर कॉर्नरला महालक्ष्मी नावाचे अमृततुल्य आहे. दूध जास्त आणि पाणी कमी अशा द्रवापासून वेलचीयुक्त चहा प्यायल्यानंतर खाद्य यात्रेचे एक वर्तुळ पूर्ण होईल.

पेरुगेट जवळील "नर्मदेश्‍वर'सारखा चहा पुण्यातील असंख्य अमृततुल्यांमध्ये मिळतो. "महालक्ष्मी' येथील चहा त्याजवळ जाणारा पण अगदी तसा नाही. येथे दूधाचे प्रमाण पाण्यापेक्षा अधिक असल्यामुळे साधा चहाच अगदी "स्पेशल'सारखा वाटतो. "अन्नपूर्णा'चा वडा आणि "महालक्ष्मी'चा चहा यांच्यासाठी शिवाजी रस्त्यावर जाच!