Saturday, June 16, 2007

रेस झाली तर उत्तमच... पण होणे अवघड!

पुणे, ता. 15 ः भारतामध्ये "फॉर्म्युला वन' शर्यत झाली तर मला खरोखरच आनंद होईल; पण "एफ वन' शर्यतींचे आयोजन करणे ही सोपी गोष्ट नव्हे. भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सोयीसुविधांची उभारणी करणे हे मोठे आव्हान आहे. त्यात आपण यशस्वी झालो तरच शर्यतींचे आयोजन करणे शक्‍य आहे, असे प्रतिपादन भारताचा "फॉर्म्युला वन' ड्रायव्हर नरेन कार्तिकेयन याने केले.
भारतात दिल्ली येथे "फॉर्म्युला वन' शर्यत होण्यासाठी भारतीय ऑलिंपिक संघटनेने पुढाकार घेतला असून त्या दृष्टीने आवश्‍यक करारांची पूर्तता लवकरच करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी गुरुवारी दिली होती. त्या पार्श्‍वभूमीवर कार्तिकेयन याची प्रतिक्रिया विचारली असता त्याने, तसे झाले तर उत्तमच; पण ते अवघड आहे, अशी साधी सरळ प्रतिक्रिया व्यक्त केली.

"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स' आणि "ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया' यांच्या संयुक्त विद्यमाने "बाहा एसएई इंडिया 2007' स्पर्धेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेचे उद्‌घाटन कार्तिकेयन याच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर तो पत्रकारांशी बोलत होता.

"भारतात स्पर्धेसाठी आवश्‍यक पायाभूत सुविधांची निर्मिती करणे हे मोठे आव्हान असणार आहे. फक्त "रेसिंग ट्रॅक'ची निर्मिती करणे हेदेखील खूप खर्चिक काम आहे. ट्रॅकसाठी मोठ्या प्रमाणावर जमीनही आवश्‍यक आहे. बहारिनसारख्या देशात निधीची उपलब्धता ही समस्या नव्हती. मात्र, भारतातही तशीच परिस्थिती असेल, याबद्दल कोणीच खात्री देऊ शकणार नाही. मध्यंतरी चंद्राबाबू नायडू यांनी "एफ वन'साठी सर्व सहकार्य करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, निवडणुकीनंतर तेच सत्तेवरून दूर झाले व "एफ वन'चा बाडबिस्तरा गुंडाळावा लागला. भारतात अजूनही क्रीडा क्षेत्रासाठी इतकी गुंतवणूक हवीच का, असे विचारणारे आहेत. तेव्हा "एफ वन' शर्यत भारतात होण्यात प्रचंड गुंतागुंत आहे,'' असे कार्तिकेयनने सांगितले.

भारत आता खऱ्या अर्थाने बदलतो आहे. नवे तंत्रज्ञान येत आहे. केवळ जगभरातच नव्हे तर भारतातही "एफ वन' शर्यतींची लोकप्रियता वाढते आहे. शिवाय बहारिनप्रमाणेच मलेशिया आणि भारताचा शेजारी चीन येथेही "फॉर्म्युला वन'चा ट्रॅक उपलब्ध आहे. त्या पार्श्‍वभूमीवर भारतात ट्रॅक का नको, असा सवाल त्याने उपस्थित केला.

कार्तिकेयन सध्या "विल्यम्स'चा टेस्ट ड्रायव्हर असून 2009 मध्ये भारतात शर्यत झालीच तर भारतातील ट्रॅकवर "ड्राईव्ह' करण्यास मला निश्‍चित आवडेल, असे सांगून तो म्हणाला, ""तोपर्यंत माझे वय 32 वर्षे झालेले असेल. त्या वेळीही वय माझ्या बाजूने असेल आणि मी शर्यतीत सहभागी होण्यास निश्‍चितच पात्र असेन. त्यामुळे मी आता योग्य संधीची वाट पाहत आहे.


भारतात प्रथमच "बाहा एसएई' स्पर्धा

अमेरिकेच्या धर्तीवर भारतात प्रथमच "बाहा एसएई इंडिया 2007' या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून, ही स्पर्धा 21 ते 23 डिसेंबरदरम्यान इंदूरजवळील पीथमपूर येथे पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित कार्यशाळेचे उद्‌घाटन भारताचा "फॉर्म्युला वन' रेसर कार्तिकेयन याच्या हस्ते आज झाले.

"सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ने (एसएई) स्पर्धेचे आयोजन केले असून, या स्पर्धेत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचा व बुद्धिकौशल्याचा कस लागणार आहे. कमी किमतीमध्ये व कोणत्याही भूप्रदेशात, कितीही खडतर भूपृष्ठावर टिकाव धरू शकेल, असे वाहन सहा महिन्यांच्या कालावधीत विद्यार्थ्यांना विकसित करावयाचे आहे. त्यासाठी सहभागी संघांना दोन लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात येणार असून, कमीत कमी पैसे खर्च करणाऱ्या संघाला अधिक गुण दिले जाणार आहेत.


कार्तिकेयनचे अभियंत्यांना आवाहन

कार्यशाळेचे उद्‌घाटन केल्यानंतर नरेन कार्तिकेयन याने "एफ वन'च्या कारकिर्दीतील चढ-उतार आणि काही किस्से ऐकविले. ""पूर्वी "एफ वन' शर्यतींमध्ये युरोप आणि अमेरिका खंडातील व्यक्तींचा अधिक भरणा होता. आशियाई नावे शोधूनही सापडायची नाहीत. मात्र, आता परिस्थिती बदलत आहे. केवळ ड्रायव्हर्स नव्हे, तर अभियंते आणि इतर तंत्रज्ञही मोठ्या प्रमाणात आशियाई आहेत. काही भारतीयही "एफ वन'मध्ये अभियंते म्हणून कार्यरत आहेत. ही गोष्ट बदलती परिस्थिती दर्शविणारी आहे,'' असे तो म्हणाला.

कार्तिकेयनने काही अभियंत्यांना बरोबर घेऊन एक गट स्थापन केला आहे. हा गट "एफ वन' शर्यतींवर कार्यरत आहे. "ज्या "ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स'ना माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा असेल त्यांनी माझ्याबरोबर यावे,' असे आवाहन त्याने केल्यानंतर कार्यक्रमात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

देशभरातील 52 अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी संगणकावर नोंदणी केली होती. त्यातून एकूण 27 संघांची निवड या स्पर्धेसाठी करण्यात आली आहे. "एसएई इंडिया'चे अध्यक्ष डॉ. पवन गोएंका, "एसएई इंडिया'चे उपाध्यक्ष श्रीकांत मराठे, "जे. के. टायर्स'चे मोटर स्पोर्टस विभागप्रमुख संजय शर्मा, "फोर्ड इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक अरविंद मॅथ्यू आदींचीही या वेळी भाषणे झाली.

2 comments:

c said...

i thought karthikyn was 29 three yrs back... nvtheless i dont think delhi hs the appropriate security and infrastructure to host such an event a place like vizag would have been ideal

An2 said...

Yekdum Sahi aahe ha Blog,,,, I really love this , now count me in as regular reader... ;)