Monday, September 27, 2010

प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक...



पुण्यातील लक्ष्मी-रस्त्यावर

गेल्या काही वर्षांपासून ऑर्कुट आणि फेसबुकसह विविध सोशल नेटवर्किंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. शाळा, कॉलेज, क्लासेस किंवा इतर ठिकाणचे जुने मित्र-मैत्रिणी भेटतात. एखाद्या सुटीच्या दिवशी मस्त जमण्याचं प्लॅनिंग होतं आणि मग जुन्या आठवणींनी गप्पांचा फड हमखास रंगतो. चॅटिंग, व्हर्च्युअल फार्मिंग, डाटा शेअरिंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी या सोशल नेटवर्किंगचा उपयोग होतो. पण या साईटस आणि इथलं सगळं विश्व व्हर्च्युअल आहे. प्रत्यक्षात असं काही नाही.

पुण्यामध्ये मात्र, खरंखुरं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक अस्तित्वात आहे. इथं तुम्हाला नवे मित्र मिळतात, जुन्या मित्र-मैत्रिणींची पुनर्भेट होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुणेकरांचं काय मत आहे, वेगवेगळ्या विषयांना ते कसे रिएक्ट करतात, ते इथं समजतं. पण इथं दररोज लॉगईन होता येत. वर्षभरातून फक्त एकदाच लॉगईन होता येतं. अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला. हेच पुण्यातलं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक.

अनेक जण अनेक वर्षांपासून यामध्ये लॉगईन होताहोत. अनेक मंडळाचे कार्यकर्ते, पुणेकर, गणेशभक्त, पत्रकार, रंगावलीकार, कलाकार, आर्टिस्ट, गावोगावचे ढोलताशावाले, नव्याने उदयास आलेली पुणेरी ढोलताशा पथके आणि राज्यभरातले इतर नागरिक या ऑर्कुट-फेसबुकचे सदस्य आहेत. दरवर्षी तितक्याच उत्साहाने यामध्ये लॉगईन होताहेत. पोलिस आणि प्रशासनाला मात्र, इच्छा नसतानाही याचं सभासद व्हावं लागतं. पुण्याप्रमाणेच, आसपासच्या जिल्ह्यातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील, देशाच्या विविध भागातील मंडळी इथं लॉगईन होत आहेत. आता तर परदेशी पाहुण्यांनाही या ऑर्कुट-फेसबुकची भुरळ पडली आहे. गेल्या जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासून मी या ऑर्कुट-फेसबुकमध्ये लॉगईन होतोय. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत तब्बल २३ तास रस्त्यांवर फिरल्यानंतर मला विसर्जन मिरवणूक ही देखील एकप्रकारचं ऑर्कुट-फेसबुक असल्याचं जाणवलं.



अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी कसबा गणपती लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर रात्री दगडूशेठ गणपती विसर्जित होईपर्यंत तुम्ही याठिकाणी लॉगईन होऊ शकता. गणरायाला निरोप देण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. दरवर्षी वेगवेगळे संदेश देणा-या रांगोळ्या आणि अधिकाधिक रंगावलीकारांची यामध्ये भरच पडत जातेय. रंगावलीप्रमाणेच मानाच्या पाच गणपतींसमोर असणारे देखावे, प्रबोधनकार संदेशांचे फलक, नव्या तालांसह, नव्या वादकांसह आणि नव्या नावांसह मिरवणुकीत सामील होणारी ढोल-ताशा पथके, प्रत्येकाची पेहरावाची आणि वादनाचीही विशिष्ट पद्धत या गोष्टी फक्त इथंच लॉगईन केल्यानंतर पहावयास मिळतात. मग कोणी हौसेनं नथ-नऊवारी नेसून घोड्यावर बसलेली असते, तर एखादा रांगडा गडी खास मराठमोळ्या वेशात जीव तोडून ढोल वाजवत असतो. कोणीतरी भगव्याची शान राखत तो नाचवत असतो, कुणी तलवारबाजीतील मर्दानीपणा दाखवत असतो, कुठे वेत्रचर्माचे आणि लाठ्याकाठ्यांची लढाई सुरु असते, तर काही हौशी बच्चे कंपनी महापुरुषांच्या वेशभूषा करुन इथं वावरत असतात. प्रत्येकासाठी हा एक सणच असतो. नटण्याचा, नाचण्याचा आणि डोळ्यात साठवून ठेवण्याचा.




विसर्जन मिरवणुकीत जर टिळक चौक ते बेलबाग चौक असा फेरफटका मारला तर आपले जुने मित्र आपल्याला नक्कीच भेटतात. कुणी कधीतरी आपल्या शेजारी राहणारा असतो, कोणी शाळेतला किंवा कॉलेजमधला असतो, एखादा आपल्या कामाच्या क्षेत्रातला असतो. कधी कधी तर वर्षभर आपण ज्याला भेटत नाही, असा एखादा नातेवाईकही आपल्याला इथं भेटू शकतो. नुसते जुने मित्र भेटत नाहीत तर हा त्याचा मित्र, ती त्याची मैत्रिण, हा त्यांच्याबरोबर असतो, असं करत करत नव्यानव्या मित्र-मैत्रिणींची यादीच आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये ऍड होत जाते. त्यापैकी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायची आणि कोणाची धुडकावून लावायची, हे तुमच्या आणि त्याच्या हातात आहेच की. मला तर माझे अनेक जुने मित्र-मैत्रिणी, ओळखीचे-पाळखीचे या साईटवर भेटतात. अगदी परवाच्या मिरवणुकीतही जवळपास दहा ते पंधरा जुने मित्र-ओळखीचे याठिकाणी भेटले. तुम्हीही इथं नियमितपणे लॉगईन होत असाल तर तुमचाही हाच अनुभव असेल.



या ऑर्कुट-फेसबुकचे दोनच रंग. एक भगवा (सर्वधर्मसमभाववाले याला केशरी म्हणू शकतात) आणि दुसरा गुलाबी. पर्यावरणप्रेमींच्या ध्वनीप्रदूषणामुळे यातला गुलाबी रंग कमी होऊ लागला असला तरी भगव्याचे तेज दिवसेंदिवस वाढत जात आहे. नेटवरच्या ऑर्कुट-फेसबुकवर जशी टीका होते, तो फालतूपणा आहे, टाईमपास आहे, कुचाळक्या करणा-यांचा अड्डा आहे, असे ताशेरे ओढले जातात. तसेच ताशेरे या साईटवरही ओढले जातात. सगळ्याची वाट लावलीय, धंदा झालाय, परंपरेच्या नावाखाली धुडगूस घालतात, ध्वनीप्रदूषण तसेच वायूप्रदूषण आणि गर्दीमुळे जीव नकोसा होतो, अशी कितीही टीका झाली तरी दिवसेंदिवस या साईटची लोकप्रियता वाढतच जाते आहे. शिवाय जे मनापासून इथं एन्जॉय करतात, त्यांच्यावर असल्या टीकेचा फारसा परिणाम होत नाही. तिथं जसे काही आंबटशौकिन मज्जा करायला येतात, तसे इथंही काही असतात. काही मंडळी व्हायरससारखी असतात. पण काय पहायचं आणि व्हायरसला कसं रोखायचं हे आपल्याला माहिती असतं, ते इथल्या बाबतीतही अगदी तंतोतंत लागू पडतं.

काही जण मात्र, हे काय आहे, इथं काय काय चालतं हे प्रत्यक्ष न पाहता उगाचच घरात सोफ्यावर बसून मिरवणूक पाहतात आणि शिव्यांची लाखोली वाहतात. गर्दी दिवसेंदिवस वाढत जातेय, पुणेकरांपेक्षा बाहेरची मंडळी जास्त येतायेत. असं असलं तरी सकाळी किंवा रात्र यापैकी एकदा तरी पुणेकर इथं लॉगईन होतातच. मग त्याला वयाचं बंधन नसतं. अगदी चार वर्षांच्या चिमुरडीपासून सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वजण इथं रंगतात. मला तर इथं लॉगईन झाल्याशिवाय चैनच पडत नाही. तुम्हीही इथं लॉगईन होऊन पहा, आवडलं तर पुन्हा पुन्हा लॉगईन व्हा्. अन्यथा पुन्हा लॉगईन होऊ नका... पहा हे प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक आवडतंय का ते...

Saturday, September 18, 2010

लालबाग-परळ...



पुण्यातील गणेशोत्सवाचा टिप्पिकल फिल...

वास्तविक पाहता गणपतीच्या काळात दहा दिवस राहणं, हे माझ्यासारख्याला खूप अवघड आहे. अगदी लहानपणीच्या उत्साहापासून ते अगदी अलिकडे रिपोर्टिंगच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी पुण्यातील जवळपास सर्व प्रमुख मंडळ पायी हिंडून पाहणं, हा माझ्यासह आमच्या काही मंडळींचा आवडता छंद. मग रोज एखाद्या भागामधील गणपती पहायचे. रोज नव्या मित्रांबरोबर गणपती बघायला जायचं (मैत्रिणींबरोबर गणपती पहायला जाण्याचं भाग्य माझ्या नशीबात नव्हतं) हे अगदी ठरलेलं. कधी कॉलेजमधील मित्र, कधी घराजवळ राहणारे, कधी जुने शाळेतले मित्र, कधी घरच्यांबरोबर अथवा बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांबरोबर. पण नित्यनियमानं आणि नव्या उत्साहानं रात्री लवकर बाहेर पडणं हे ठरलेलं.

ई टीव्ही साठी हैदराबादला बदली झाल्यानंतर मग त्यामध्ये खंड पडत गेला. तरीही एक वर्षाआड सुटी घेऊन पुण्याचा गणपती एन्जॉय केलाय. अगदी दहा दिवस नाही मिळाले तर किमान विसर्जन मिरवणुकीला तरी रात्र जागवायची हे ठरलेलं. गणेशोत्सवात पदोपदी जाणवणारी उर्जा, उत्साह आणि उदंड भक्ती यांच्या जोरावर पुढचं वर्ष आपोआप निघून जातं. साम मराठी आणि आता सामनासाठी मुंबईत आल्यानंतर गणेशोत्सवाचा हा जल्लोष मी खूप मिस करत होतो. रोजच्या दबडघ्यातून श्वास घ्यायला उसंत मिळत नाही, तिथं इतका प्रवास करुन मुंबईचा गणेशोत्सव एन्जॉय करायला जायचं कसं आणि कधी हा प्रश्न अनुत्तरीत होता. सामनामुळं आज ही संधी मिळाली. धन्यवाद सामना आणि माझा सहकारी मंगेश वरवडेकर. तसं पहायला गेलं तर लाईनीत वीस-वीस पंचवीस-पंचवीस तास उभा राहून एखाद्या देवाचं दर्शन घेण्याइतका मी देवभक्त नाही. त्याचप्रमाणे वीस-पंचवीस तास रांगेमध्ये उभं राहणा-या लोकांच्या भक्तीचा अपमान करुन मध्येच घुसत नेहमी नेहमी दर्शन घेणंही मला पटत नाही. त्यामुळं लोकप्रिय आणि गर्दी खेचणा-या देवांना जाणं टाळतो. पुण्यात सुद्धा मी विसर्जनाच्या दिवशी पहाटे जाऊन मानाचे पाच गणपती, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई आणि जिलब्या मारुती या मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेतो. रांगेमध्ये न थांबता. (कारण तेव्हा रांग नसतेच)




ह्याच कारणामुळे मी इतकी वर्षे लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलेलो नाही. यंदा मात्र, राजाचा योग जुळून आला. अमर पटवर्धन नावाच्या पनवेलमधल्या एका मित्राच्या आग्रहाखातर आणि मंगेश वरवडेकर या कामगार नगरच्या राजाच्या कृपेमुळे मी लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकू शकलो. लोक नवस बोलतात, ते फेडण्यासाठी वीस वीस तास रांगेत थांबतात, हे सारंच माझ्या बुद्धीच्या पलिकडचं होतं. इतके दिवस वाटायचं मूर्ख आहेत साले फुकटचा वेळ वाया घालवतात. पण लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकल्यानंतर ही मंडळी इतका वेळ रांगेमध्ये का थांबतात आणि कशामुळे थांबू शकतात हे कोडं उलगडलं. कोणत्याही गणपतीच्या पुढ्यात उभं राहिलं की जी प्रसन्नता मिळते ती इथंही मिळते. राजा जणू काही आपल्यालाकडेच पाहतो आहे आणि आशीर्वाद देतो आहे, असं वाटतं. एखाद-दोन मिनिटांचा खेळ असतो. (रांगेतून गेलात तर काही सेकंदांचाच) पण हा एखाद दोन मिनिटांचा कालावधी वर्षभराचा क्षीण क्षणार्धात घालवून टाकतो. ऐसे तुम मोह को अती भावे... असं का म्हणतात ते तेव्हाच आपल्याला कळतं. अगदी सहजपणे राजाचं दर्शन झालं आणि कृतकृत्य झालो. दरवर्षी जाणं होईल की नाही माहिती नाही. दरवर्षी असं ओळखीतून दर्शन घेणं आवडेल असंही नाही. पण एका वर्षाची प्रत्यक्ष भेट आणखी काही वर्षांसाठी तरी पुरेशी असावी, हे मात्र नक्की.

लालबागच्या राजानंतर आम्ही दर्शन घेतलं गणेश गल्ली मित्र मंडळाचं. गणेश गल्ली म्हणजे उंच मूर्ती तयार करणारं मुंबईतील सर्वात पहिलं मंडळ. आजही या मंडळाची मूर्ती २५ की २७ फुटी असते. दरवर्षी कशावर तरी विराजमान झालेली गणरायांची मूर्ती हे मंडळ साकारतं. यंदाचं मंडळाचं ८३ वं वर्ष असून त्यांनी मूषकराज गणेश साकारला आहे. खरं तर पूर्वी गणेश गल्लीचा गणपती हाच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू होता. त्यालाच जास्त गर्दी व्हायची. पण नंतर हळूहळू राजाचं प्रस्थ वाढत गेलं आणि सगळी गर्दी राजानं खेचली. गणेश गल्लीच्या गणपतीचं नाव खरं तर लालबाग सार्वजनिक मित्र मंडळ आणि लालबागच्या राजाचं पूर्वीचं नाव सार्वजनिक गणेशोत्सव, लालबाग. पण कालांतरानं मंडळानं नावाचं रजिस्ट्रेशनचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं करुन घेतलं आहे. (आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडळाचं खरं नाव सुवर्णयुग तरुण मंडळ. पण हे फारसं कोणाला माहिती नाही. त्यातलाच हा प्रकार) त्यामुळं आवर्जून गणेश गल्लीच्या गणपतीचंही दर्शन घेतलं. सॉल्लिड मूर्ती एकदम. वादच नाही.



परळ आणि लालबाग हा मुंबईच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू. पूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला गणेश गल्लीचा गणपती आणि आता लालबागचा राजा हे दोन्ही एकाच परिसरात असल्यामुळे इथल्या उत्सवाचं वातावरण पुण्यातील दगडूशेठ गणपती आणि सभोवतालच्या परिसराची आठवण करुन देणारं. आपण पुण्याचे गणपतीच पाहतो आहोत की काय, असं वाटावं इतकं वातावरण सारखं. पहावं तिकडं गणपती, बाहेर लांबच्या लांब रांगा, प्रचंड गर्दी आणि गणपतीपेक्षा खाण्याच्या गाड्यांवर तुफान गर्दी... टिप्पिकल पुण्यासारखंच. लालबागच्या राजाच्या निमित्तानं हे सारं अनुभवता आलं ही राजाच्या दर्शनाबरोबर मिळालेली फ्री गिफ्ट. खरं तर राजाचं दर्शन मिळालं ही गिफ्टच मोठी आहे. त्यामुळं त्यावर काही फ्री मिळतंय की नाही, याचा विचार करण्याची इतरांना गरज वाटणार नाही. पण मला मात्र, राजाच्या दर्शनाबरोबरच परिसरात अनुभवलेला गणेशोत्सवाचा तो टिप्पिकल फिलही तितकाच नसला तरी खूप महत्त्वाचा आहे.

Friday, September 10, 2010

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती...



१४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी, तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला मुलगा परदेशातून किंवा परगावातून परत घरी येणार असेल किंवा एखादी माहेरवाशीण आपल्या घरी येणार असेल तर तिची वाट आपण जितक्या आतुरतेने पाहत असतो तितक्याच आतुरतेने आपण गणरायाची वाट पाहत असतो. दहा दिवस किंवा तो घरी असेपर्यंत आपल्याकडे कोणतरी घरचं खूप दिवसांनी आल्यासारखं वाटतं. त्यामुळंच गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तर आता पुढचे दहा दिवस बाप्पाचे आहेत. फक्त बाप्पाचे. तेव्हा मोठ्या दणक्यात, उत्साहात, जल्लोषात आणि सारी दुःख विसरुन बाप्पाचा उत्सव साजरा करुया...

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया...

Thursday, August 26, 2010

जरा सांभाळून बोला...



अमितची बदनामी करणा-यांचा तीव्र निषेध...

गेल्या दोन आठवड्यात दोन बातम्या ऐकून मन खूप व्यथित झालं. (व्यथित हा शब्द खूप जड वाटत असेल तर खूप वाईट वाटलं, असे वाचावे) एक म्हणजे विश्ननाथन आनंद हा हिंदुस्थानी नाही, असा जावईशोध केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने लावला. आणि दुसरे म्हणजे झी २४ तासचा प्रतिनिधी आणि आमचा जिवलग मित्र (GD) अमित जोशी याने मुलींची छेड काढली म्हणून त्याला लोकांनी मारला - इति आरं आरं आबा.

द ग्रेट आणि ट्रू जिनिअस असणारा विश्वनाथन आनंद हिंदुस्थानी नाही. मग हिंदुस्थानी कोण... अहो ज्या माणसामुळं आज हिंदुस्थान बुद्धिबळामध्ये सुपर पॉवर बनू पाहतोय, ज्याच्यामुळे पुण्यापासून ते चेन्नईपर्यंत शेकडो नव्हे हजारो जण बुद्धिबळामध्ये करियर करण्याचा विचार करु लागले, ज्याने असंख्य वेळा हिंदुस्थानचा तिरंगा जगभरात फडकावला, तो आनंद हिंदुस्थानी नाही. अहो मग हिंदुस्थानी कोण. एसी ऑफिसमध्ये बसून निर्णय घेणारे आयएएस अधिकारी, मनुष्य बळाच्या नावाखाली मनुष्य छळ करणारे एचआर वाले की आनंदच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरही त्याबद्दल अनभिज्ञ असणारे केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल. असो त्यावर बरंच चर्वित चर्वण झालंय आणि त्यावर उमटलेली रिऍक्शन इतकी स्ट्राँग होती की, तत्काळ केंद्रीय मंत्र्यांना स्वतः फोन करुन माफी मागावी लागली. त्यामुळे त्यावर अधिक बोलण्यात-लिहिण्यात काय उपयोग नाही.

दुसरा मुद्द अमित जोशीचा. गृहमंत्र्यांनी अमितबद्दल जे बिनबुडाचं वक्तव्य केलंय त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. (मी असं म्हटलोच नाही, अशी टिप्पिकल पॉलिटिकल भूमिका घेत दुस-याच दिवशी आरं आरं आबांनी कोलांटउडी मारली) म्हणजे अमित जोशीनं पोरीची छेडछाड काढली. अहो एकवेळ एखादी पोरगी अमित जोशीची छेडछाड काढेल. पण अमित जोशी त्याच्या स्वप्नातही तसं करु शकणार नाही. त्याची इतकी ठाम खात्री मी देऊ शकतो कारण हैदराबादमध्ये ई टीव्हीत असताना मी आणि अमित जवळपास एक ते दीड वर्षे रुममेट (घरभाऊ) होतो. त्याच्याइतका सज्जन आणि सालस मुलगा आख्ख्या ई टीव्हीत नव्हता. किमान आम्ही तरी पाहिली नव्हता.

पत्रकारितेची परीक्षा उत्तीर्ण होऊन ताज्या दमाचा अमित ई टीव्हीत दाखल झाला होता. त्याची ती पहिलीच नोकरी. मी १२ जुलैला (२००३) ई टीव्हीमध्ये जॉईन झालो आणि तो १४ जूनला. त्यामुळे मी, अमित, सचिन फुलपगारे, सचिन देशपांडे आम्ही चौघांनी दिलसुखनगरला एकाच घरात रहायचो. (नंतर राजेंद्र हुंजे आणि श्रीरंग खरे यांनी दोघांना रिप्लेस केलं.) गडकिल्ले, ट्रेकिंग, पुस्तक आणि पेपर वाचन, कॉपी सुधारणं, बातमी अधिकाधिक चांगली कशा पद्धतीनं देता येईल आणि जास्तीत जास्त माहिती कशी मिळेल, यामध्येच त्याचा सारा वेळ जायचा. ऑफिसमध्ये आणि घरी एकत्रच असल्यामुळे मला त्याची खडा न् खडा माहिती होती. आम्ही गंमती गंमतीमध्ये जरी कधी एखाद्या मुलीचा विषय काढला किंवा एखाद्या मुलीवरुन त्याला चिडवलं तरी त्याला त्यामध्ये फारसं स्वारस्य नसायचं.



ई टीव्हीमध्ये त्यावेळी असलेल्या एका मुलीवरुन आम्ही त्याला कायम चिडवायचो. (ई टीव्हीमध्ये असलेल्यांना ते नाव माहिती आहे. सो ते इथे उघड करत नाही.) ते दोघं खूप चांगले मित्र होते. आम्ही त्याला नेहमी म्हणायचो की, बघ ती तुझ्यावर फिदा आहे, बघ, प्रपोज मारुन टाक इ.इ. पण अमित त्यामुळं कधीच हुरळून गेला नाही किंवा आमच्या बोलण्याला बळीही पडला नाही. आमची पवित्र मैत्री आहे... या पलिकडे त्यानं कधी उडी मारली नाही. सांगण्याचा उद्देश्य असा की, पोरींची छेडछाड, लफडी, अफेअर्स हा त्याचा प्रांतच नाही. गड किल्ल्यांवर हिंडायचं, कोणते तरी भोकातले कोणालाही माहिती नसलेले किल्ले सर करायचे आणि त्याबद्दल मित्रांना सांगायचे, हा त्याचा आवडता छंद. वेगवेगळ्या पदार्थांवर दाबून ताव मारायचा, मनसोक्त हादडायचं ही त्याची आवड. बसमधून किंवा काही वेळा आठ-आठ किलोमीटर चालत हैदराबाद पालथं घालायचं, ही त्याची सवय. (हा पठ्ठ्या मुंबईहून हैदराबाद सायकलवरुन येणार होता. पण त्याला आम्ही वेळीच रोखलं होतं.)

पत्रकारितेतही त्याला उथळपणा पसंत नव्हता. एखाद्या विशिष्ट बीटवर अधिक खोलवर जाऊन बातम्या कशा करता येतील, असा त्याचा प्रयत्न असायचा, असतो. तसं तो बोलूनही दाखवतो. संरक्षण, विज्ञान-तंत्रज्ञान, रेल्वे आणि ऑफकोर्स गडकिल्ले हे त्याचे आवडीचे विषय होते. अन् या विषयातील बातम्या कव्हर करण्यासाठी, अधिक जाणून घेण्यासाठी तो सदैव तयार असतो, उत्सुक असतो. लफडी करुन पोरी पटवायच्या आणि मजा मारायची, असल्या गोष्टींसाठी त्याच्याकडे कधीच वेळ नव्हता. वेळ असला तरी त्याला इच्छा नव्हती. कधी कधी त्याच्या या आरबट चरबटपणाची आम्ही खिल्ली उडवायचो, त्याची खेचायचो, त्याची चारचौघांत टिंगलटवाळी करायचो, पण अमितच्या साधेपणाबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नव्हती आणि नाहीही. अंडी देखील धुवून घेणारा, चार जणांसाठी पातेलंभर चहा करणारा, साजूक तुपामध्ये आमटी करणा-या आमच्या या मित्राची आम्ही भरपूर चेष्टा केली. त्याच्या पुढे केली. त्याच्या पाठीवर कधी नाही केली. त्याच्या या अतरंगीपणाबद्दल आम्ही अक्षरशः लोळायचो. हसून हसून पोट दुखायचं.

पण आबांसारख्या जबाबदार माणसानं कोणतीही खातरजमा न करता अशोभनीय विधान करुन आम्हा सर्वांनाच धक्का दिला. असल्या फालतू गोष्टींचा विचार आमच्या मनातही कधी आला नाही, तो आबांनी जगजाहीरपणे बोलून दाखविला. दु्र्दैव दुसरे ते काय. त्यामुळे आबा तुम्ही स्वतःची प्रतिमा जपण्यासाठी प्रयत्नशील असताना. मग मिळालेल्या माहितीची खातरजमा न करता केलेल्या वक्तव्यामुळे दुस-याची प्रतिमा काळवंडणार नाही, याची खबरदारी बाळगा. (त्या परिसरातल्या एका पोलिस अधिका-यांच्या वसुली एजंटांनीच अमितवर हल्ला केला. त्यामुळे पोलिसही त्यांना अडविण्यासाठी पुढे सरसावले नाहीत, अशी चर्चा कानावर आली. तथ्य ते काय माहिती नाही. पण त्या अधिका-यानेच तर ही माहिती आबांना पुरविली नसेल ना, अशी शंका राहून राहून येते.)कालच केईममध्ये जाऊन त्याला भेटून आलो. अमितनंही आबांच्या वक्तव्याचा मुद्दा फारसा गांभीर्यानं घेतला नव्हता. पण मला रहावलं नाही. अगदी आपल्या जिवलग मित्राबद्दल कोणीतरी काहीतरी फालतू बडबड करतंय, असं समजल्यानंतर मन अस्वस्थ झालं, म्हणून हा लेखप्रपंच.

(एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अमित पुन्हा ताज्या दमानं फिल्डवर रुजू होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.)

Sunday, August 15, 2010

स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...



तांत्रिक अडचणींपासून मिळाले स्वातंत्र्य...

तांत्रिक अडचणी किती त्रासदायक असून शकतात आणि त्यामुळं किती पारतंत्र्य येऊ शकतं, हे मी गेले काही महिने अनुभवत होतो. गेल्या कित्येक दिवसांपासून काही तांत्रिक कारणांमुळे मला ब्लॉग लिहिणं शक्य झालं नव्हतं. पण आता ती तांत्रिक अडचण दूर झाली आहे आणि तांत्रिक अडचणींपासून मला स्वातंत्र्य मिळालं आहे. तेव्हा मी पुन्हा नव्या जोमानं ब्लॉग लिहीन असं म्हणतोय. मध्यंतरी अनेक ठिकाणी जाऊन आलो, अनेक वेगवेगळे पदार्थ खाल्ले, अनेक चित्र-विचित्र अनुभव आले, त्यावर लिहायची खूप इच्छा होती. पण मला ते शक्य झालं नाही. उल्लेखच करायचा झाला तर आमची कोकणची ट्रीप, आमचं कोकणातलं देवरुख जवळचं घर, ऐन पावसात भिजून घरी गेल्यानंतर ओरपलेलं गरमागरम कुळथाचं पिठलं-भात आणि मुंबईहून पुण्याला येताना कर्जतच्या घाटातली निसर्गाची नवलाई हे दोन प्रसंग लिहिण्याची अतीव इच्छा होती. पण ती उत्स्फूर्तता आता नाही. माझ्या लेखनाचा मेगाब्लॉक सुरु असताना अनेकांनी मी ब्लॉग बंद केला आहे का, असा थेट सवालही केला. पण माझा नाईलाज होता. इच्छा असूनही मी काहीच करु शकत नव्हतो. पण आता मार्ग सापडला आहे आणि मी पुन्हा लिहिता झालो आहे.

ठिकठिकाणच्या वडापावपासून ते रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवर मिळणा-या रगडा पावापर्यंत आणि सचिवालय जिमखान्यापासून ते पुण्यातील अभिषेकपर्यंत अनेक ठिकाणचा आस्वाद घेतला आहे. परळमधल्या प्रकाश सारख्या गावाची आठवण आणणा-या हॉटेलवर लिहायचं आहे. अनेक विषय आहेत. तेव्हा आता वारंवार भेटतच राहू.

हिंदुस्थानच्या ६४ व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा...
हिंदुस्थानचा स्वातंत्र्यदिन चिरायू होवो, अशी प्रार्थना...


जयहिंद आणि जय महाराष्ट्र...

Wednesday, May 26, 2010

... आणि विठ्ठलाने बोलावूनच घेतले

एकादशीला झाली पंढरपूर वारी...

देवाच्या इच्छेपुढे आपले काही चालत नाही, असं म्हणतात. नुकताच याचा प्रत्यय आम्हाला आला. (आम्हाला म्हणजे मी, विश्वनाथ गरुड, देविदास देशपांडे आणि प्रशांत अनासपुरे) सकाळमध्ये काम करत असताना आमची सोनेरी टोळी होती. सकाळमध्ये टोमणे खाल्ल्याशिवाय काम करताच येत नाही. मी, विश्वनाथ, देविदास आणि आमचा आणखी एक मित्र नंदकुमार वाघमारे. ही आमची सोनेरी टोळी. सवॆ जण आमच्यावर जळायचे. असो. चांगला लेख आहे. वेगळा विषय नको. तर नंदकुमार या आमच्या मित्राचं सोलापुरात लग्न होतं. आम्ही सोमवारी लग्नासाठी सोलापूर गाठलं. म्हणजे पहा २४ मे हा तो दिवस होता. हाच दिवस आमच्यासाठी आश्चयॆकारक ठरला.



सकाळी सातच्या सुमारास सोलापूरसाठी निघालो. मजल दरमजल करत (म्हणजे विविध ठिकाणी खाद्यपदाथॆ आणि पेयपानाचा फडशा पाडत) आम्ही दोनच्या सुमारास लग्न समारंभी म्हणजे विजापूर रोडला पोचलो. हाय हॅलो, शुभेच्छा, ओळखी-पाळखी, काय कसं पार पडलं, हनिमूनला कुठे जाणार अशी विचारपूस हे सगळे सोपस्कार पार पडल्यानंतर जेवण उरकलं. मिष्टान्न इतरे जनः असं म्हणतात. ते आमच्या बाबतीत नेहमीच खरं असतं. जेवण झालं. थोडावेळ थांबलो. मग विजापूर रोडवरुन निघालो.

मग सिद्धेश्वराचं दशॆन घेतलं. सोलापुरात येऊन तिथं गेलो नाही, असं बरोबर वाटत नाही. मग आमचे मित्र आणि ई टीव्हीचे पत्रकार बाबा फुंदे यांच्याबरोबर सिद्धेश्वर मंदिरात गेलो. तिथं एक कथा लिहिली होती. विठ्ठलाचे दशॆन घेण्यासाठी पंढरपूरला जाण्याची गरज नाही. मनात देव असेल तर तो कुठेही दशॆन देतो, असं सिद्धेश्वर यांनी कोणाला तरी सांगितल्याची ती कथा होती. म्हटलं बरंच आहे. पंढरपूरला गेलो नाही तरी हरकत नाही. सिद्धेश्वराचं दशॆन हेच विठ्ठलाचं दशॆन, असं मानून आम्ही मनोभावे नमस्कार करुन निघालो.

साधारण संध्याकाळचे सहा वाजले असतील. पुण्याकडे निघालो. सहाला निघालो म्हणजे बारा-एक वाजेपयॆंत पोचू, असा अंदाज होता. वाटेत मोहोळला गाडीमध्ये पेट्रोल भरले आणि पुढे निघालो. (इथपासून माझा डोळा लागला होता. आपल्याला काय कुठेही झोप लागते. मग मस्त गार वारं सुटलं असताना गाडीत झोप नाही लागली तरच नवल. असो) साधारणतः एक तासभर गेला असेल. रस्ता अनोळखी वाटत होता. वाटेत लागलेला टोलनाकाही येताना लागला होता असं वाटतं नव्हतं. ट्रॅफिकही थोडा कमीच वाटत होता. रस्ता वळणावळणाचा होता. सरळसोट नव्हता. आपण रस्ता चुकलो तर नाही ना, यावर बोलणं सुरु होतं. (त्या तिघांचं) हाच विषय सुरु असताना (इतर तिघे कारण मी झोपलोच होतो) गाडी एका नदीवरच्या फरशी पुलापाशी येऊन पोचली.

च्या मारी... येताना हा पूल आणि ही नदी लागलीच नव्हती. पूल ओलांडला आणि पुढे जाऊन पाहतो तर काय समोर वाळवंट. आई शप्पथ. गाडी पंढरपुरात येऊन पोचली होती. विश्वनाथ आणि प्रशांत ओरडलेच. आपण पंढरपुरात येऊन पोचलो आहोत. त्या आरडा ओरड्याने मला जाग आली. झालं पंढरपुरात आलो म्हणजे प्रवासातील साधारणतः एक तास वाया गेला, असा निष्कषॆ काढत पोटोबाची सोय शोधू लागलो. आधी पोटोबा मग विठोबा हे त्यादिवशी खरेखुरे अनुभवले. दोन-चार भज्यांच्या गाड्यांपैकी एक त्यातल्या त्यात चांगली गाडी पाहिली आणि मस्त गरमागरम भजी मागविली. गरमागरम भजी आल्यानंतर मी फक्त चहाच पिणार, असं म्हणणा-यांचे हातही भजीकडे वळले. दुसरी प्लेट मागविली. मग कोणीतरी शेवचिवडा आणि तळलेल्या मिरच्या मागविल्या. शेवटी दोन कडक स्पेशल घेऊन उठलो. तृप्त मनाने केलेली भक्ती अधिक चांगली असते, असं म्हणतात. (खरं तर असं कोणी काही म्हणत नाही. आपणच आपलं कोणाच्या तरी नावावर बिल फाडायचं...)

पंढरपुरात येऊन विठ्ठलाचे दशॆन न घेता गेलो असतो तर... मनाला पटतच नाही. मग विठ्ठलाचे दशॆन घेऊन जाण्याचंच ठरलं. विठ्ठलानेच आपल्याला बोलावून घेतलं. अन्यथा रस्ता चुकण्याचं आणि मुद्दाम या वाटेने येण्याचं काहीच कारण नव्हतं. तसंच चौघांनाही पुणे-सोलापूर रस्ता काही नवीन नव्हता. प्रत्येकानं किमान पंधरा ते वीस वेळा तरी सोलापूरची वारी केली असेल. मग हे सारं घडलं कसं. पंढरपूरला जायचं ठरलं नसतानाही आणि चौघांनाही सगळे रस्ते व्यवस्थित माहिती असतानाही हे झालंच कसं.
नरेंद्र दाभोळकरांसारखी मंडळी याला निव्वळ योगायोग म्हणतील. पण त्यावर आमचा विश्वास नाही. रस्ताच चुकायचा होता तर तो चुकून आम्ही पंढरपुरातच का आलो. अक्कलकोट किंवा हैदराबादच्या दिशेने का नाही गेलो? किंवा एखाद्या म्हस्के वस्ती, दांगटवाडी किंवा परबाची वाडी इथं का नाही पोचलो... याचं उत्तर कोणीच देऊ शकणार नाही. दाभोळकर सुद्धा नाही. शिवाय दीड सालाच्या नियोजनातही हा विषय नव्हता. शेवटी आम्हालाही पटलं नियोजन न करताही काही गोष्टी चांगल्या होऊ शकतात आणि फसलेल्या बेतांचाही असा चांगला शेवट असू शकतो.

थोडक्यात म्हणजे तुम्ही कितीही प्लॅनिंग करा, काहीही करा, त्याच्या इच्छेपुढे कोणाचेच काहीही चालत नाही....

बोला पुंडलिक वरदे हरि विठ्ठल,
श्री द्यानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय...

Saturday, May 15, 2010

मनःपूवॆक आदरांजली...

निष्ठावंत आणि राजकारण्यांचे गुरु...



साधारणपणे 1950 चे दशक! राजस्थानमध्ये त्यावेळी जनसंघाची फारशी ताकद नसली तरी 1958 साली विधानसभेत जनसंघाचे आठ आमदार होते. त्यावेळी राजस्थानमधील कॉंग्रेस सरकारने जहागिरदारी (वतनदारी) संपुष्टात आणण्यासाठी विधेयक आणले. जनसंघही जहागिरदारी संपुष्टात आणण्याच्या बाजूने होता. त्यामुळे सरकारने आणलेल्या विधेयकाला विरोध करण्याचा प्रश्‍नच नव्हता. तेव्हा जनसंघाने त्यांच्या आमदारांना सरकारने आणलेल्या विधेयकाला पाठिंबा देण्याची सूचना केली.

अर्थात, जनसंघाचे आठही आमदार वतनदार होते. त्यांची प्रत्येकाची मोठ्या प्रमाणावर जमीन होती. त्यामुळे जनसंघाच्या आठपैकी सात आमदारांनी पक्षादेश डावलून विधेयकाच्या विरोधात मतदान केले. एका आमदाराने मात्र, स्वतः जहागिरदार असून केवळ पक्षादेश शिरोधार्य मानून जहागिरदारी संपुष्टात आणण्यासाठी मतदान केले. तो आमदार म्हणजे माजी उपराष्टपती भैरौसिंह शेखावत!

जनसंघाच्या सात आमदारांनी विरोधात मतदान करुनही ते विधेयक संमत झाले. विधेयकाच्या विरोधात मतदान करणारे सात आमदार पुन्हा जिंकले, हरले किंवा त्यांचे पुढे काय झाले, कोणाच्याही स्मरणात नाही. पण भैरोसिंह शेखावत हे नाव मात्र, त्यानंतर प्रादेशिक आणि राष्ट्रीय राजकारणात संस्मरणीय ठरले. तीनवेळा राजस्थानचे मुख्यमंत्रीपद भूषविणारे शेखावत पाच वर्षे भारताचे उपराष्ट्रपती होते.



बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर भारतीय जनता पक्शाची उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान अशी तीनही सरकारं बरखास्त केली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत फक्त राजस्थानमध्ये पुन्हा भाजपची सत्ता आली. भैरोसिंह शेखावत यांच्या अप्रतिम मॅनेजमेंटच्या जोरावरच तिथे भाजप पुन्हा सत्तेवर आला. शेखावत तिस-यांदा राजस्थानचे मुख्यमंत्री झाले.

काही महिन्यानंतर शेखावत यांच्यावर अमेरिकेत बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली. कदाचित दुसरी असावी. ते अमेरिकेत असताना त्यांच्या मंत्रीमंडळातील एका कनिष्ठ सहका-याने शेखावत यांच्याविरुद्ध बंड केले. शेखावत यांचे नेतृत्व आम्हाला अमान्य असून आता मीच मुख्यमंत्री अशा थाटात त्याने जुळवाजुळव सुरु केली होती. आमदारांचा एक गटही त्याच्या गळाला लागला होता. शस्त्रक्रिया झाल्यानंतर महिनाभराच्या कालावधीने शेखावत पुन्हा भारतात परतणार होते. शस्त्रक्रियेनंतर विश्रांती घेता-घेता शेखावत यांनी अशी काही जादूची कांडी फिरविली की विचारता सोय नाही. ज्या दिवशी शेखावत पुन्हा राजस्थानात परतले त्याच दिवशी तो बंडखोर आमदारानं शेखावत यांच्या पायावर लोटांगणच घातलं. जो हो गया सो हो गया. अब आप ही तो हमारे नेता है भेरोसिंहजी... असं म्हणत त्या आमदारानं आपली तलवार म्यान केली.

सत्ता टिकविण्यासाठी जे राजकीय चातुयॆ, धूतॆपणा आणि इतरांना मॅनेज करण्याचं कौशल्य लागतं ते शेखावत यांच्याकडे होतं आणि त्या जोरावरच त्यांनी राजस्थानात सत्ता गाजविली. अनेक चढ-उतार आले तरी त्यांनी निष्ठा बदलल्या नाहीत. त्यामुळंच त्यांना तीनवेळा मुख्यमंत्री आणि एकदा उपराष्टपती होता आलं.

अशा या महान नेत्यांना मनोभावे आदरांजली...

Sunday, April 18, 2010

`मोदी`केअर



आयपीएलचा `गॉ़ड`

आयपीएलच्या निमित्ताने सध्या जे अकांडतांडव केले जात आहे, त्याचा केंद्रस्थानी आहेत शशी थरुर आणि ललितकुमार मोदी. पण आता हा केंद्रबिदू ललितकुमार मोदी यांच्या दिशेने सरकला असून मोदींना टार्गेट करण्यासाठीच हे सुरु आहे की काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यानिमित्ताने कोण आहेत हे ललित मोदी हा मुद्दा पुढे आलाय. तमाम हिंदुस्थानींना वेड लावणा-या आयपीएलचे ते आयुक्त आहेत. पण मोदी यांची आयपीएलचे आयुक्त ही ओळख अगदीच त्रोटक असून ती मोदी यांच्या एकूण कायॆ कतृत्त्वाच्या दहा-वीस टक्केही नाहीत.

हिंदुस्थानमधल्या मोदी एंटरप्रायजेस या चार हजार कोटी रुपयांच्या उद्योग समूहाचे अध्यक्श आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. साबण, शॅम्पू आणि विविध सौंदयॆवधॆक उत्पादने बनविणारी मोदी केअर ही कंपनी ललित मोदींचीच. फोर स्क्वेअर ही भारतातील सुप्रसिद्ध सिगारेट बनविणारी गॉडफ्रे फिलीप ही कंपनीही मोदींचीच. मोदी त्याचे कायॆकारी संचालक. इतकंच नाही तर शेती उत्पादने, स्टील, तंबाखू, चहा आणि शिक्शण अशा पाच-पन्नास गोष्टींचं उत्पादन करणा-या कंपन्यांचे मोदी हे सर्वेसर्वा आहेत.

ईएसपीएन या क्रीडा वाहिनीला भारतात आणण्याचं सारं श्रेय मोदींनाच जातं. ईएसपीएनवर क्रिकेटच्या सामन्यांचं थेट प्रक्शेपण व्हावं आणि क्रिकेट त्यांच्या अजेंड्यावर यावं, यासाठी पाठपुरावा करणारे ललितकुमार मोदीच. आयपीएल सुरु करण्यामागचा मेंदूही मोदींचाच. हिंदुस्थानमध्ये क्रिकेटमध्ये सोन्याची खाण आहे. जितकं काढू तितकं कमी. क्रिकेटमध्ये किमान दोन हजार कोटी रुपयांचा धंदा आहे, हे मोदींनी खूप वरषांपूऱ्वीच सांगितलं होतं. हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना केवळ रुपयांमध्ये मानधन मिळू नये. तर फुटबॉलपटू किंवा अमेरिकी बास्केटबॉलपटूंप्रमाणे डॉलरमध्ये त्यांनी खेळावं, ही मोदींची इच्छा. त्यासाठीच मोदींनी आयपीएल अस्तित्वात आणली. वास्तविक पाहता १९९० च्या दशकांतच त्यांनी कमी षटकांच्या सामन्यांची योजना मांडली होती. पण बीसीसीआयनं ती बासनात गुंडाळून ठेवली.

पुढे मोदी मोदींनी राजस्थान क्रिकेट परिषदेवर गेले. तिथे अध्यक्श बनले. जगमोहन दालमिया यांच्याविरोधात शरद पवार यांना साथ देऊन मोदी पवारांच्या गुडबुकमध्ये गेले. बीसीसीआयचे ते सवात तरुण उपाध्यक्श बनले. मग शरद पवार यांनीही त्यांना आयपीएलचे आयुक्त करुन मदतीची परतफेड केली. आयपीएलचे आयुक्त म्हणून गेल्या वषीच्या पहिल्या सहा महिन्यांतच आठ कोटी रुपयांचा कर भरणारे मोदी हे वषॆभरात सवाॆधिक कर भरणारे हिंदुस्थानी ठरले. हिंदुस्थानातील पहिल्या तीस प्रभावशाली व्यक्तींमध्ये त्यांचा समावेश करण्यात आला आहे. फटकळ स्वभावामुळे आणि त्यांच्या कायॆशैलीमुळे मोदी हे फार काळ कोणाच्या फ्रेंडलिस्टमध्ये राहत नाहीत. असे असले तरी मोदी हे कुशल व्यवस्थापक म्हणून ओळखले जातात. गेल्या वषी हिंदुस्थानात निवडणुका असल्यामुळे दक्शिण आफ्रिकेत आयपीएल भरवून त्या तितकीच लोकप्रिय झाल्या. मोदींची कायॆकुशलता सिद्ध करण्यास इतकेच उदाहरण पुरेसे आहे. त्यांना कायम प्रसिद्धीच्या झोतात रहायला आवडते.



अशा या चौफेर वावर असणा-या मोदींना सध्या झेड प्लस सुरक्शा आहे. दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलकडून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्यामुळे मोदी सध्या पंचवीस-तीस कमांडोंच्या गराड्यातच वावरतात. मोदी आयपीएलचे आयुक्त म्हणून राहिले किंवा नाही राहिले तरी क्रिकेटचं स्वरुप बदलून टाकणारा द्रष्टा म्हणूनच त्यांची ओळख राहिल.

मोदींच्या क्रीडा
ललितकुमार मोदींना लहानपणी शाळेत जायला आवडायचे नाही. त्यामुळे ते शाळा सुरु असताना मधूनच पळून जायचे. पण शालेय शिक्शणानंतर त्यांनी अभ्यासावरच लक्श केंद्रीत केले. अमेरिकेत शिकताना त्यांना अंमली पदाथॆ जवळ बाळगले म्हणून शिक्शा झाली होती. तसेच अपहरणाचा गुन्हाही त्यांच्यावर होता. त्यांना दोन वषांची शिक्शाही ठोठावण्यात आली होती. पण नंतर ती माफ करण्यात आली.

मोदी आणि थरुर
ललित मोदी आणि शशी थरुर यांच्यात गेल्या वषी पार पडलेल्या आयपीएलवेळीच ठिणगी पडली. मिस आयपीएल बॉलिवूड या स्पधेत गॅब्रिएला दिमित्रीएड ही ललना सहभागी झाली होती. खरं तर तीच स्पधेची विजेती झाली असती. पण मोदींचे आणि तिचे संबंध चांगले नव्हते. म्हणूनच ती जिंकली नाही, अशी चचा होती. तिला हिंदुस्थानात येण्यासाठी व्हिसा देऊ नये, अशी विनंती मोदी यांनी थरुर यांना जानेवारी २०१० मध्ये केली. पण थरुर यांनी विनंती अव्हेरली आणि तिला गॅब्रिएलाला व्हिसा दिलाच. तेव्हापासून मोदी-थरुर यांच्यात अधिक कटुता निमाण झाल्याची चचा आहे.

((सामनाच्या रविवार दिनांक १८ एप्रिल २०१० च्या अंकात वरील लेख प्रसिद्ध झाला आहे.)

Friday, April 16, 2010

दखल घेतली आणि विषय थांबला...

भाजीवाल्याचा वडा...


गेल्या काही दिवसांपासून भाजीवाल्याचा झाला वडा... ही मालिका या ब्लॉगच्या माध्यमातून लिहित होतो. वास्तविक पाहता, ही कथा कोणा एकावर बेतलेली नव्हती. ती कोणाला उद्देश्यून किंवा कोणाला टारगेट करण्यासाठी लिहिली होती, असेही नाही. पण तरीही काहींना ती आपलीच कथा आहे असे वाटत होते. त्यामुळे कथा थांबविण्याची विनंती वजा सूचना उणे धमकी गुणिले सल्ला मिळाला. या कथेतून कोणालाही काहीही सांगायचे नसले तरी त्यातून ज्यांना काही बोध घ्यायचा होता त्यांनी तो घेतला, असावा असे दिसते. योग्य त्या माणसांकडून योग्य ती दखल घेण्यात आली आहे आणि कदाचित भविष्यातही घेण्यात येईल, असे वाटते. त्यामुळे सध्या तरी भाजीवाल्याचा झाला वडा... ही कथा येथेच थांबवित आहोत. सदूचे कॉस्टकटिंग, गुणा जोशी, वड्याचे लाँचिंग (...रिलँचिंग) यासह अखेरीस भाजीवाल्याचा झाला ‍-वडा- असे भाग लिहून तयार आहेत. पण योग्य त्या व्यक्तींनी योग्य ती दखल घेतल्यामुळे हे भाग सध्या तरी प्रकाशित होणार नाहीत. भविष्यात वेळ पडलीच तर योग्यवेळी आणि योग्य माध्यमातून ही कथा सुरु करता येईल. पण निश्चित असे काही नाही.

राहता राहिली गोष्ट माझ्यावर झालेल्या आरोपांची, तर जे स्वतःचं नाव गुलदस्त्यात ठेवून अनामिकपणे प्रतिक्रिया नोंदवितात त्यांनी आपले चंबू गबाळे आवरावयास घ्यावे. अशा लोकांच्या प्रतिक्रियांकडे ढुंकूनही पाहण्याची गरज नाही. पाठीमागून वार करणा-यांच्या अवलादीकडे लक्श देणार नाही आणि समोरुन वार करणा-यांना सोडणार नाही, अशीच भूमिका असते आणि राहील. त्यामुळे अशा लोकांना, अनामिकांना अशा प्रकारच्या कथा लिहिण्यामागचा हेतू किंवा इतर गोष्टींचा अथॆ समजण्याइतकी त्यांची व्यापकता नाही. मनाची तर नाहीच नाही. असो...

सध्या तरी इतकंच भेटूया लवकरच नव्या ब्लॉगसह... तोवर धन्यवाद.

Friday, March 12, 2010

Joined Samana...

After doing Job for more than four years in Sakal Media Group Now I have Joined Samana, Mouthpiece of Shivsena. I Joined Samana on 31st January 2010. As there is lot of problems of Marathi Keyboard and Inscript I was unable to write blogs regulerly. But now it seems that i will start once again with the help of my friend Devidas Deshpande.

I promised to write about Bhajiwalyacha Zala Wada on my blog. It will come on blog in few days. It may comes in parts as I have to write the story in detail. So that readers can enjoy more. So Now am ready to start again after one month rest...

Ashish Chandorkar...

Thursday, January 28, 2010

शंभर टक्के मराठी, दोनशे टक्के मुंबईकर!



खमंग आणि रुचकर वडापाव

मध्यंतरीच्या काळात माझ्या ब्लॉगवर (http://ashishchandorkar.blogspot.com) "वडापाव'वर एक लेख लिहिला होता. त्याला वेगवेगळ्या ठिकाणहून काही प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील सर्वात वेगळी आणि आनंददायक प्रतिक्रिया होती ती अमेरिकेतल्या संदीप नावाच्या एका ब्लॉग वाचकाची. संदीप म्हणतो, ""तुमचा लेख मला खूपच आवडला. तुमचा लेख वाचल्यानंतर मला अमेरिकेतील शिकागो शहरातील एका दुकानाची आठवण झाल्यावाचून राहत नाही. त्या ठिकाणी सुखाडिया नावाच्या माणसाने एक भव्य दुकान थाटलेय. "शॉपिंग मॉल'च म्हणा ना. तिथल्या "रेस्तरॉं'च्या "मेन्यू कार्ड'वर "बॉम्बे वडापाव'चा उल्लेख आहे. हा "बॉम्बे वडापाव' तीन डॉलर्सला मिळतो.''

शंभर टक्के मुंबईचा असलेला वडापाव आता फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नव्हे; तर परदेशातही मिळू लागला आहे आणि तिथेही त्याचे नाव नुसते वडापाव असे न राहता "बॉम्बे वडापाव' असे नोंदले गेले आहे. त्यातच वडापावची लोकप्रियता लक्षात येते. तसेच वडापाव आणि मुंबई यांचे किती अतूट नाते आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. त्यामुळे मुंबईने महाराष्ट्राला काय दिले, असा प्रश्‍न विचारल्यानंतर अनेकांची अनेक उत्तरे असतील. कोणी म्हणेल बाळासाहेब ठाकरे, कोणी म्हणेल सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर, कोणी म्हणेल "फायटिंग स्पिरीट', कोणी म्हणेल बॉलीवूडची मायानगरी इ.इ. पण मला विचारले तर माझे उत्तर असेल- मुंबईने महाराष्ट्राला "वडापाव' दिला.

महाराष्ट्राबाहेर मराठी पदार्थ म्हणून मान्यता पावलेला आणि अस्सल खवय्यांच्या पसंतीस उतरलेला सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ म्हणजे वडापाव. अस्सल मराठमोळा आणि 100 टक्के मुंबईकर. अगदी दिल्लीपासून ते हैदराबादपर्यंत आणि अहमदाबादपासून ते कोलकत्तापर्यंत बॉम्बे वडापाव (शिवसेनेच्या भाषेत बोलायचे झाले तर मुंबई वडापाव) मिळू लागलाय. भारतातील बहुतांश राज्यात वडापाव मिळतो आहे. प्रांतानुरूप आणि तिथल्या चवीनुरूप काही किरकोळ बदल झाले आहेत. म्हणजे गुजरातमध्ये कापलेला कांदा, बीट आणि कोबी यांच्या सलाडबरोबर वडापाव "सर्व्ह' करतात. तर हैदराबादमध्ये "आलू बोंडा' म्हणून ब्रेडच्या स्लाईसबरोबर वडा दिला जातो. प्रत्येक ठिकाणची चव आणि स्वरूप वेगळे; पण वडापाव तोच अस्सल मराठमोळा.

साबुदाणा खिचडी, थालिपीठ, झुणका-भाकरी, मटारच्या करंज्या, खारी पॅटीस, झणझणीत मिसळ आणि इतरही अनेक पदार्थांच्या तुलनेत वडापाव हा अधिक झपाट्याने महाराष्ट्रभर रुजला आणि सामोसा किंवा कचोरीच्या स्पर्धेतही टिकला. बटाट्यापासून केलेले सारण हाच बटाटा वड्याचा खरा आत्मा. त्याची चव जितकी चांगली तितका वडापाव रुचकर. सोबतीला गोड किंवा तिखट अशी ओली चटणी, कांदा लसूण मसाला किंवा सुकी चटणी असा लवाजमा असतो. पण खरी चव असते ती नुसत्या वड्याचीच. मग तो किती झणझणीत आहे, त्यातील मसाला कसा आहे, त्यात लिंबाचा रस मिसळला आहे का, अशा अनेक गोष्टींवर वड्याची चव ठरते. मग तो वडा नुसता खाल्ला काय किंवा पावाबरोबर खाल्ला काय, एकदम जन्नत. बरोबर तळलेली लवंगी मिरची मात्र हवी. मग गोड-तिखट चटण्या असो किंवा नसो.

मुंबईतील छबिलदास जवळच्या "श्रीकृष्ण'चा अतिमहागडा वडा, कीर्ती कॉलेजजवळचा खमंग वडापाव (हा विक्रेता चुरापाव विकूनही पैसे वसूल करतो), हुतात्मा चौकातील (टेलिफोन एक्‍स्चेंजजवळचा) वडापाव, परळच्या भोईवाडा चौकातील वडापाव, सीएसटीसमोरचा आरामचा वडापाव, ठाण्यातील कुंजविहारचा वडापाव, कर्जतचा दिवाडकरचा वडा, पुण्यातील जोशींचा वडा, सहकारनगरचा कृष्णा किंवा कॅम्पातील फेमस वडापाव, औरंगाबादचा भोला वडापाव, कोल्हापूरचा दीपकचा वडा इ.इ. ही यादी आणखी खूप वाढत जाईल आणि अनेक जण त्यामध्ये नवे नवे स्पॉट्‌स नमूद करता येतील. थोडक्‍यात म्हणजे मुंबईत उगम
पावलेल्या वडापावची ओळख आणि चव सगळीकडे पोचलीय.

फार लवाजमा नसल्यामुळे अगदी गल्लोगल्लीच्या गाड्यांवरही वडापाव दिसू लागला. तयार करायला सोपा आणि ग्राहकही पुष्कळ त्यामुळे "वडापाव' लवकरच सर्वदूर पोचला. गरिबातील गरीबापासून ते गर्भश्रीमंतापर्यंत प्रत्येकाला खमंग वडापाव आवडतो. मग तो सचिन तेंडुलकर का असेना. वडाभाव हा त्याचा "वीक पॉईंट' असतो. त्यामुळे गल्लोगल्ली गाड्यांवर मिळणाऱ्या वडापावलाही "हायजिनिक' स्वरूप देण्याच्या नादात "वडापाव' दुकानांमध्ये गेला. मग तो "प्लॅस्टिक'चे ग्लोव्हज घालून तयार करण्यात येणारा जम्बो किंग वडापाव असो, गोली वडा असो किंवा शिवसेनेचा "शिववडा'. पुण्यातील जोशी वडेवाले असो किंवा रोहित वडेवाला. शिवसेनेनेही आता चौकाचौकांत "शिववडा'च्या गाड्या टाकून ब्रॅंडिंगचा प्रयत्न सुरू केला आहे. वडापावची देखील साखळी पद्धतीची दुकाने निघतील, याची कल्पना कोणीच केली नव्हती. पण आता ती वस्तुस्थिती आहे.

"फक्त एका रुपयात वडापाव' अशा जाहिरातीपासून सुरू झालेले मार्केटिंग आता "हायजिनिक वडापाव'पर्यंत येऊन पोचले आहे. पण कोणी कितीही आणि काहीही म्हटले तरी गाडीवर कढईतल्या उकळत्या तेलात तळले जाणारे गरमागरम खमंग वडे खाण्याची मजा काही औरच. मग थोडंसं तोंड भाजलं तरी त्याचं काही वाटत नाही. आणि एकदा तोंड खवळलं की दुसरा वडापाव खाल्ल्याशिवाय आपण तिथून हलत नाही. अशा वडापावची चव नेहमी आपल्या जिभेवर रेंगाळायला लावण्याचे श्रेय दुसऱ्या-तिसऱ्या कोणाचे नसून या मुंबापुरीचे आहे, हे विसरून चालणार नाही. त्यामुळेच मुंबई बाहेरच्या मंडळींना मुंबईत गेलो आणि वडापाव खाल्ला नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. ते त्यामुळेच.


(मुंबई सकाळच्या वर्धापनदिनानिमित्त निघालेल्या विशेष पुरवणीतील लेख...)

Saturday, January 23, 2010

ऋषितुल्य युगपुरुष...

हिंदूहृदयसम्राट आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 83 वा वाढदिवस. साहेबांनी आज 84 व्या वर्षांत पदार्पण केलंय. साहेबांना दीर्घायुष्य
लाभो, याच शुभेच्छा आणि देवाकडे प्रार्थना. साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने साहेबांच्या काही मोजक्‍या छायाचित्रांच्या माध्यमातून साहेबांना माझ्या ब्लॉगकडून शुभेच्छा...

आशिष चांदोरकर




















Tuesday, January 19, 2010

`आपल्या` ब्लॉगला पुरस्कार...



माझ्या नियमित आणि अनियमित वाचकांना नमस्कार

गेल्या चार साडेचार वर्षांपासून ब्लॉग लिहितोय. दोन वर्षांपूर्वी स्टार माझा या वृत्तवाहिनीनं घेतलेल्या स्पर्धेत ब्लॉगला उत्तेजनार्थ पारितोषिक मिळालं होतं. २०१० या नव्या वर्षाची सुरवातही चांगली झालीय. औरंगाबादच्या ओम एचआरडी इन्स्टिट्यूटनं आशिषचांदोरकर.ब्लॉगस्पॉट.कॉम या ब्लॉगलची पुरस्कारासाठी निवड केली आणि सोमवारी (दिनांक १८ जानेवारी) हा पुरस्कार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते प्रदानही झाला.

माझी दिवंगत आई, बाबा आणि इतर कुटुंबियांना माझ्या ब्लॉगसाठीचा हा दुसरा वुसरा पुरस्कार प्रदान. त्यांच्यामुळेच मी इथवर पोचलो आहे आणि त्यांच्या आशीर्वादानेच मला यापुढेही यश मिळत राहील, असं वाटतो. सो इटस टू देम ओन्ली...

पुरस्कार वितरण समारंभाची बातमी विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्याची लिंक खाली देत आहे. यापुढेही आपला लोभ माझ्यावर (माझ्यापेक्षा माझ्या ब्लॉगवर अधिक) राहील, अशी अपेक्षा आणि विश्वास मला आहे.


आपला,

आशिष अरविंद चांदोरकर


कार्यक्रमाची व्हिडिओ क्लिप...



लोकसत्ता...

Monday, January 11, 2010

वेड लावणा-या कलाकृती...



'आठवणी'चा समृद्ध व सुंदर खजिना...!

कलाकार हा जन्मजात असावा लागतो, असं म्हणतात. ते खरंही आहे. शाळा-कॉलेजातून अभ्यासक्रम पूर्ण करुन कलाकार होता येत नाही. कला ही उपजतच असावी लागते. ही आणि अशी अनेक वाक्य आपण प्रत्येकवेळी ऐकलेली असतात. पण जर अशा गोष्टींचा प्रत्यय आला तर आपला त्यावर चटकन विश्वास बसतो. असंच काहीसं माझं झालंय.

देव कोणाच्या हातात काय कला निर्माण करेल काही सांगता येत नाही, हे पाहण्याची संधी मला नुकतीच मुंबईत मिळाली. शशिकांत धोत्रे या अगदी उदयोन्मुख कलावंतानं साकारलेल्या चित्रांचं प्रदर्शन पाहिलं आणि मला ही गोष्ट मनोमन पटली. सोलापूरातल्या मोहोळ तालुक्यामधल्या एका छोट्याशा खेड्यात वाढलेल्या शशिकांत धोत्रे नामक चित्रकाराची ही गोष्ट. ही गोष्ट एखाद्या हिंदी किंवा मराठी चित्रपटात हुबेहूब शोभेल अशीच वाटते.



वडार समाजात जन्माला आलेल्या शशिकांतचे वडील दगड फोडण्याचं काम करतात. आई गृहिणी आहे. रस्त्याच्या कडेला बसून दगड फोडण्याचं काम करणारे अनेक जण आपण आतापर्यंत पाहिले असतील. मोठे-मोठे दगड फोडून त्याचे बारीक दगड करण्याचं काम किती कष्टाचं असू शकतं याची आपण कल्पनाच केलेली बरी. तर असं वडार काम करणा-या घरात शशिकांतचा जन्म झाला. पण वडिल करतात ते दगड फोडण्याचं पारंपरिक काम करण्याची वेळ शशिकांतवर आली नाही. कारण देवानं त्याच्या हातामध्ये दगड फोडण्यासाठी लागणा-या सामर्थ्यापेक्षा चित्र साकारण्याचं कसब निर्माण केलं होतं.

शाळेत असताना चित्र काढण्यावरुन त्यानं अनेकदा शिक्षकांचा ओरडा खाल्ला होता. प्रसंगी मारही खाल्ला होता. शाळेतल्या अनेक भिंती शशिकांतनं चितारलेल्या कलाकृतींनी भरुन गेल्या होत्या. मग कधी त्या त्यानं स्वतःहून काढलेल्या होत्या. तर कधी शाळेतल्या काही कलासक्त शिक्षकांनी त्याच्याकडून करवून घेतल्या होत्या. पुढे दहावी-बारावीचा टप्पा पार करुन शशिकांत मुंबईच्या सुप्रसिद्ध जेजे महाविद्यालयात शिकण्यासाठी दाखल झाला. पण तिथं महिना-दोन महिने काढल्यानंतर शशिकांतनं तिथनं पळ काढला आणि स्वतःच कलेची आराधना करु लागला.



शशिकांतच्या चित्रांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं ही चित्र फक्त पेन्सिलच्या सहाय्यानं काढली आहेत. भारतात अशा पद्धतीनं चित्र काढणारे चित्रकार खूप थोडे आहे. जगामध्ये मायकेल एंजेलो हा चित्रकार अशा पद्धतीनं चित्र काढायचा. शशिकांतनं काळ्या पेपरवर काढलेली ही चित्र पाहिली की डोळे दिपून जातात. एकेक चित्र काढायला साधारण सहा ते आठ दिवसांचा कालावधी लागतो. मुंबईतल्या तुलिका आर्ट गॅलरीमध्ये भरलेल्या प्रदर्शनात शशिकांतची दहा-बारा चित्र लावलेली आहेत. त्यापैकी एकही चित्र ७५ हजार रुपयांपेक्षा कमी नाही. तर प्रदर्शनातलं सर्वाधिक महागडं चित्र दीड लाख रुपयांना आहे. मुख्य म्हणजे प्रदर्शनातील सर्वच्या सर्व चित्र विकली गेलेली आहेत.

व्यक्तीचित्र रेखाटताना शशिकांतनं अगदी बारीक सारीक गोष्टींचा विचार करुन ते चित्र चितारलं आहे. गफ्फार नावाच्या त्याच्या लहानपणीच्या मित्राचं काढलेलं चित्र तर प्रचंड अफलातून आहे. त्याची बसण्याची लकब, पायावर जखमेची खूण, गोट्यांचे रंग, गोट्या खेळताना चेह-यावर असणारे भाव अशा सर्व गोष्टी त्यानं हुबेहूब हेरल्या आहेत. तन्वी साळकर या मैत्रिणीची दोन पोट्रेट काढताना त्यानं थोडंसं वेगळेपण जपलं आहे. एक चित्र लग्नापूर्वीचं तर दुसरं लग्नानंतरचं आहे. ही दोन्ही चित्र पाहिली की शशिकांतच्या कलेला दाद दिल्याशिवाय रहावत नाही. घराच्या खिडकीतून नव-याची वाट पाहणारी नवविवाहिती तर अफलातून आहे. (म्हणजे चित्र अफलातून आहे.) आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देणारे हे 'रिमेम्बरन्स' नक्की पहायला हवं.

एखाद्या खेड्यातनं आणि प्रचंड गरीबीतून वर आलेला शशिकांत आता चांगलाच लोकप्रिय झालाय. त्याला अनेक प्रतिष्ठित पारितोषिकांनी गौरवण्यात आलंय. येत्या काही महिन्यात तो लंडनलाही जाणार आहे. शशिकांतच्या भविष्यातील वाटचालीस माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा...

शशिकांत धोत्रेबद्दल अधिक माहितीसाठी क्लिक करा...

http://www.tulikaartsgallery.com/index.php?page=2&isArtist=315

Friday, January 08, 2010

अस्सल मराठमोळं जेवण...



तांबे उपहारगृह

गिरगांव म्हणजे मराठी माणसाची जान. मराठी माणसाची शान. गिरगावातल्या सत्कार नावाच्या हॉटेलवर मी यापूर्वीच लिहिलं आहे. सत्कारप्रमाणेच किंवा सत्कारपेक्षाही अधिक लोकप्रिय आणि नावाजलेलं आणखी एक उपहारगृह म्हणजे तांबे उपहारगृह. मरीन लाईन्स रेल्वेस्थानकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर व सीएसटीपास्नं टॅक्सीनं फक्त तेरा ते पंधरा रुपये अंतरावर. त्यामुळं इच्छित स्थळी पोहोचणं फारसं अवघड नाही. (आणि जरी अवघड असलं तरी खरा खवय्या कसंही करुन इथं आल्याशिवाय राहणार नाही, हे सांगायला नकोच.)

अफलातून चव...
तांबे उपहारगृहाची खरी ओळख म्हणजे इथल्या मराठमोळ्या खाद्यपदार्थांची अफलातून चव. कोथिंबीर वडी, आळू वडी, भाजणीच्या पिठाचं थालिपीठ आणि लोणी, डाळिंब्यांची (सोललेल्या कडव्या वालाची) उसळ, आळूची पातळ भाजी (आळूचं फदफदं), उकडलेल्या बटाट्याची डोसा भाजी (घरगुती पद्धतीनं केलेली उडप्यासारखी नव्हे...) मूग आणि मटकीची उसळ, कढी-भात, कढी- मूगडाळ खिचडी, चवळी-पालक आणि इतर अनेक चविष्ट पदार्थ. ओल्या काजूची (काजूगराची) उसळ हे इथलं आणखी एक वैशिष्ट्य!

औरंगाबाद सकाळचे मुख्य वार्ताहर अभय निकाळजे, मुंबई सकाळमधील सहकारी अभय न. जोशी तसंच मंगेश मधुकर कुलकर्णी आणि मी असे आम्ही चौघे तांबे उपहारगृहामध्ये गेलो होतो. सकाळचे चौघे तांबे उपहारगृहामध्ये जाऊन अक्षरशः खूष झालो. तिथल्या जेवणावर दिलखूष झालं. कुठं जायचं कुठं जायचं असं ठरत असतानाच तांबे उपहारगृहाचं नाव पुढे आलं आणि सर्वांनीच त्याला पसंती दिली. मग सकाळच्या फोर्ट कार्यालयातनं ठाकूरद्वार गाठलं.

ब्राह्मणी जेवण...
ब्राह्मणी पद्धतीचं मराठी जेवण इथं फर्स्ट क्लास मिळतं. ब्राह्मणी कुटुंबामध्ये ज्या पद्धतीनं तिखट बेताचंच आणि गुळाचा वापर सढळ हाताने असतो, त्याच पद्धतीची चव इथं चाखायला मिळते. कमी तिखट असलं तरी हे मराठी पदार्थ कमी तिखट असले तरच किंवा थोडेसे गूळचट असले तरच चांगले लागतात, हे सांगायला नको. आळूची भाजी त्याच पठडीतली. पण आळूच्या भाजीला लाल मिरच्यांची फोडणी दिलेली असते. हे इथलं वेगळेपण. त्यामुळंच चवही थोडीशी वेगळी.



डाळिंब्याची उसळ...
इथं गेल्यानंतर आवर्जून खायची गोष्ट म्हणजे डाळिंब्याची उसळ. एकदम घट्ट (रस्सा एकदम कमी) अशी ही उसळ पुण्यातल्या कोहिनूर मंगल कार्यालय किंवा ज्ञानल मंगल कार्यालयातल्या उसळीची आठवण करुन देते. डाळिंब्याची उसळही थोडीशी गोड असेल तर अधिक चांगली लागते. तांबेंनीही हे जाणलंय. पालक पनीरपेक्षा पालक-चवळी असं वेगळंच कॉम्बिनेशन इथं चाखायला मिळतं. शिवाय झुणका-भाकर आहेच. अर्थात, झुणका हा तिखट नाही, हे वेगळं सांगायला नकोच. पण झुणका झणझणीत असेल तरच चांगला लागतो. त्यामुळं इथं झुणका-भाकरी न खाणंच उत्तम. इतर पदार्थ ट्राय केले तर उत्तम.

अनेक पर्याय...
द बेस्ट गोष्ट म्हणजे इथं लिमिटेड किंवा अनलिमिटेड स्वरुपात थाळी मिळतेच. पण तुम्हाला थाळी नको असेल तर भाज्या आणि उसळी यांच्यासाठी प्लेट सिस्टीमही आहे. त्यामुळं आवडीच्या दोन-चार भाज्या, भाकरी किंवा पोळ्या, सोबतीला आळूवडी किंवा कोथिंबीर वडी, एखादं थालिपीठ अशी ऑर्डर दिली तर मग विचारायलाच नको. शिवाय भाजी किंवा उसळीची क्वांटीटी दोघांना पुरेल इतकी असते. त्या अंदाजानं आपण ऑर्डर देऊ शकतो. शेवटी मूगडाळ खिचडी आणि कढी किंवा पांढरा भात आणि कढी हा मेन्यू बेस्ट. एक प्लेट भात किंवा खिचडी दोघांना पुरते. त्यामुळं इथंही अंदाज घेऊनच ऑर्डर देऊ शकतो. इतकं सगळं खाल्ल्यानंतर तुमच्या पोटात थोडी जागा असेल तर एक ग्लास सोलकढी प्या. (आम्ही प्यायली होती, हे आलंच)

स्वच्छता आणि टापटीप....
इथली आणखी एक ओळख म्हणजे इथली स्वच्छता आणि टापटीप. स्वच्छतेकडे अनेकदा दुर्लक्ष केलं जातं. पण इथले वेटरही एकदम स्वच्छ आहेत. शिवाय टिपिकल मराठी उपहारगृहांमध्ये ग्राहकाकडे ज्या तुच्छतेनं पाहिलं जातं तो अनुभव इथं येत नाही. फक्त काहीवेळा पदार्थ लवकर संपलेले असतात. त्याला पर्याय नाही, असं म्हणायचं आणि दुर्लक्ष करायचं. इथले दरही खूप जास्त आहेत, असं नाही. माफक दर आणि उत्तम चव असं वर्णन करायला हरकत नाही. चार जणांनी यथेच्छ हादडल्यानंतर साधारणपणे तीनशे रुपयांपर्यंत बिल येतं, असा अनुभव आहे. साधारण तीन-चार वेळचा. त्यामुळं जास्त चिंता करु नका आणि ओरपा...


तांबे उपहारगृह
२७७, मापला महल,
जे. एस. मार्ग, ठाकूरद्वार,
गिरगांव, मुंबई – ४००००४
०२२-२३८९९००९
०२२-२३८६४२२३

मायेच्या हाताची मराठी चव...



श्रीयोग डायनिंग हॉल (डोंबिवली)

मुंबईमध्ये आल्यानंतर काही वेळचा अपवाद वगळला तर रोजरोज अण्णाकडे खाऊन ('साम'चा कॅन्टिनवाला) वैताग आला होता. मग महाराष्ट्रीयन पद्धतीचं आणि अगदी घरच्यासारखं जेवण जेवायची खूप इच्छा झाली होती. एकदम साधं, शुद्ध शाकाहारी आणि सात्विक जेवण जेवायला कुठंतरी जायला हवं, असं कित्येक दिवसांपास्नं वाटत होतं. दोनवेळा अचानक हा योग जुळून आला. पहिला योग म्हणजे डोंबिवलीमधल्या श्रीयोग डायनिंग हॉलमधलं (आईच्या हाताची चव...) जेवण आणि दुसरं म्हणजं गिरगावातल्या ठाकूरद्वारजवळच्या तांबे उपहारगृहामधलं जेवण. दोन्ही ठिकाणचं जेवण म्हणजे लय भारी. पहिल्या ठिकाणी मराठी पद्धतीनं तयार केलेली थाळी तर दुसरीकडे टिपिकल मराठी पद्धतीचं बिसमिल्लाह जेवण!

श्रीयोग डायनिंग हॉल...!

मध्यंतरी ई टीव्हीतला माझा जुना सहकारी आणि सध्या आयबीएन-लोकमतचे निखिल वागळे यांच्यानंतरचे आधारस्तंभ श्री.राजेंद्र हुंजे याच्या घरी गेलो होतो. तरी साधारणपणे दोन महिने उलटले. तेव्हा रात्री कुठंतरी 'कार्यक्रम' करायचा आणि थोडंसं जेवायचं, असं ठरलं होतं. पण नेमके एक-दोन जण आलेच नाहीत. मग उरलो फक्त मी आणि राजेंद्रच. मग 'कार्यक्रम' करायचं रद्द झालं आणि महाराष्ट्रीयन पद्धतीचं जेवायचं ठरलं. राजेंद्रनं आई भोजनालयात जाऊ असं म्हटलं. मी पण होकार दिला. स्टेशनजवळच (पूर्वेला) आई भोजनालय म्हणजेच श्रीयोग डायनिंग हॉल आहे. अगदी पाच मिनिटांवर.

आईच्या हाताची चव...

मायेच्या हाताची मराठी चव... अशीच जाहिरात करण्यात आल्यामुळं जेवण कसं असणार याची उत्सुकता होतीच. शिवाय श्रीकांत मोघे, सुनील बर्वे, प्रशांत दामले आणि इतर अनेक नेते-अभिनेते तिथं जेवून गेले असल्यामुळं उत्सुकता अधिकच ताणली गेली. मेन्यू कार्ड न पाहताच दोन थाळीची (अनलिमिटेड हे आलंच!) ऑर्डर दिली. सुरळीच्या वड्या, बिटाची कोशिंबीर, छोल्यांची उसळ, टॉमेटो-बटाटा रस्सा भाजी, आळूची भाजी, मऊसूद घडीच्या पोळ्या, एक मोठी वाटी श्रीखंड, ताक आणि सरतेशेवटी मस्त सोलकढी... सोबतीला इतर काही पदार्थ असतील तर ते लक्षात नाही. पण ताट एकदम खचाखच भरलेलं आणि वाढपाची सेवाही अगदी शिस्तीत. (आखडता हात न घेता...)

घरचं जेवण...

पोळ्या म्हणजे अगदी घरच्या सारख्या. मऊ आणि तेल लावलेल्या. इतर ठिकाणी मिळणा-या वातड पोळ्या खाऊन इतका कंटाळा आला होता की, मायेच्या हाताच्या मराठी चवीमुळं दोन काय चांगल्या चार पोळ्या जास्त गेल्या. शिवाय सोबतीला आळूची भाजी (काही जण त्याला छद्मीपणे फदफदं असं म्हणतात) असल्यामुळं व्वा! क्या बात है... आळूची भाजी माझी मोस्ट फेव्हरेट असल्यामुळं मला वेड लागलं होतं. पुण्यात श्रुती मंगल कार्यालयात किंवा पूना गेस्ट हाऊसमधल्या चवीला थोडीशी गुळचट असणा-या आळूच्या भाजीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. छोले, आमटी आणि टोमॅटो-बटाटा रस्सा भाजीही चवीला घरच्यासारखीच. तिखट बेताचंच. गूळही थोडा सैल हातानंच वापरलेला. भातही मोकळा आणि गरमागरम. भात मोकळा असला तरी त्यामध्ये सोडा मात्र नव्हता. कारण नंतर पोट डब्ब होत नाही.

ताकही घट्ट आणि गोड. इतर अनेक ठिकाणी ताकाच्या नावाखाली पांढरं पाणी देण्याची वाईट खोड असते. पण इथलं ताक म्हणजे एकदम घट्ट आणि गोड. जेवताना अधूनमधून ताक पिऊन संपवलं तरी हरकत नाही. जेवणानंतर अपेटायझर म्हणून सोलकढी आहेच. ती पण एखाद्या मालवणी रेस्तरॉच्या तोंडात मारेल अशी. ताटात स्वीट म्हणून दोन-तीन ऑप्शन्स. गुलाबजाम, अंगूर मलाई, श्रीखंड आणि एखाद दुसरा... तुम्हाला आवडेल ते घ्या. स्वीटपेक्षा या सर्व गोष्टींचीच चव इतकी तोंडावर राहते की विचारता सोय नाही. सर्व पदार्थांवर यथेच्छ ताव मारल्यानंतर आपण अगदी तृप्त भावनेनं बाहेर पडू लागतो. इथं एका थाळीचा भाव १३० रुपये इतका आहे. पण स्वीट नको असेल तर किंवा इतर दिवशी हा दर कमी असतो. साधारण शंभर रुपयांच्या आसपास. पण पैसा वसूल जेवण आहे. सो डोन्ट वरी एन्जॉय इट!!!

श्रीयोग डॉयनिंग हॉल
(मायेच्या हाताची मराठी चव... श्रीयोग)
पी. मालवीय मार्ग, रामनगर,
डोंबिवली (पूर्व) – ४२१२०१.
२८६०८७१, (फॅक्स) – २८६१६०३
sachin_bodas@yahoo.com

Monday, January 04, 2010

इडियटगिरीपेक्षा गांधीगिरीच श्रेष्ठ!



ऑल इट नॉट दॅट वेल...

"मुन्नाभाई एमबीबीएस" आणि "लगे रहो मुन्नाभाई...' या गाजलेल्या चित्रपटांचा दिग्दर्शक राजकुमार हिरानी याचा थ्री इडियटस हा चित्रपट कसा आहे, हे पाहण्याची प्रचंड उत्सुकता होती. पण थ्री इडियटस हा चित्रपट त्या दोन्ही चित्रपटांची उंची गाठू शकलेला नाही, असं मला प्रामाणिकपणे इथं कबूल करावसं वाटतं. माझ्या या मताशी फार कोणी सहमत होणार नाही. पण तरीही मला ते मत मांडल्याशिवाय रहावत नाही.

आपलं शिक्षण हे सर्वोत्तम विद्यार्थी कोण आहे, हे शोधण्यासाठी उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काय सर्वोत्तम आहे, हे शोधण्यासाठी आपली शिक्षण पद्धती उपयुक्त नाही. त्यामुळंच आपली महाविद्यालयं ही एकाच साच्यातून एकाच पद्धतीचे विद्यार्थी तयार करणारा कारखाना आहे, अशी टीका होते. ती खरीही आहे. त्यावरच थ्री इडिटस बेतलेला आहे. नेहमीप्रमाणेच आमीर खान आणि माधवन यांच्या भूमिका झक्कास आहेत. शर्मन जोशी देखील कमी पडल्याचं जाणवत नाही. करीना कपूरही छोट्या रोलमध्ये लक्षात राहते.

सर्वप्रथम म्हणजे थ्री इडियटसचा विषय एकदम भन्नाट आहे. परंपरागत शिक्षणपद्धती किती बोगस आणि तकलादू आहे, हे त्यात दाखवण्यात आलंय. आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये फक्त पहिला येणाऱ्याला महत्त्व आहे. दुसऱ्या, तिसऱ्या आणि त्यानंतरच्या लोकांना इथं फारसं महत्त्व नाही. त्यामुळं जो तो पहिल्या क्रमांकासाठी धावतोय. आपण किती मनापासून शिकतो, त्याचा आपल्याला आयुष्यात किती उपयोग होतो, दैनंदिन जीवनात आपल्याला शिक्षणाचा किती उपयोग होतो, याचा काहीही विचार न करता आपण पाठांतर करतो आणि परीक्षेमध्ये सगळं बाहेर काढतो. अशा या शिक्षण पद्धतीवर थ्री इडियटसनं प्रकाशझोत टाकलाय.

अभियांत्रिकीचं शिक्षण घेण्यासाठी आलेल्या तीन (किंवा चार) तरुणांची ही कथा आहे. इंजिनिअर किंवा डॉक्टर व्यतिरिक्त माणसानं काही होऊच नये की काय, अशा पद्धतीनं पालक विचार करतात आणि त्या ओझ्याखाली विद्यार्थी-विद्यार्थिनी पार दबून जातात. मग कोणी परीक्षेच्या टेन्शनमुळं आत्महत्या करतं तर कोणी वाईल्ड फोटोग्राफीचा छंद सोडून इंजिनिअर होण्यासाठी रॅट रेसमध्ये उतरतो. थोडक्यात म्हणजे जो तो स्वतःच्या आवडी निवडी सोडून पारंपरिक शिक्षणाच्या मागं धावतोय. अशा या जळजळीत विषयावर राजकुमार हिरानी स्टाईलनं कोरडे ओढण्यात आले आहेत.

कॉलेजमधलं रॅगिंग, विद्यार्थ्यांच्या गमती-जमती, आमीर आणि त्याच्या मित्रांनी केलेल्या करामती अशा अनेक गोष्टींमुळे चित्रपटाला मस्त तडका मिळालाय. कॉलेजच्या गॅदरिंगच्या वेळी उडालेली धम्माल किंवा जावेद जाफरीच्या घरी माधवन आणि शर्मन जोशी यांनी वठवलेला प्रसंग पोट धरुन लोळायला लावणारे आहेत. इतरही काही प्रसंगांमधून पोट धरुन हसायला होतं. पण चित्रपट म्हणून जी सलगता हवी किंवा लिंक रहायला हवी, ती थोडीशी इथं जाणवत नाही. वेगवेगळे प्रसंग फक्त एकत्र केल्यासारखे वाटतात. काही वेळा तर अतर्क्य आणि अशक्यप्राय गोष्टी दाखवून चित्रपटाला थोडंसं वास्तवतेपासून दूर नेल्यासारखं वाटतं.

आमीर खाननं वेगवेगळ्या शहरांमध्ये वेषांतर करुन जाऊन चित्रपटाची पब्लिसिटी केली होती. त्याचा प्रसिद्धी माध्यमांमधून चांगलाच गवगवा झाला होता. चेतन भगत यांच्या फाईव्ह पॉईंट समवन या पुस्तकावर हा चित्रपट आधारित आहे. मात्र, चित्रपटाच्या श्रेय नामावलीत भगत यांचा अनुल्लेख केल्यामुळे भगत चांगलेच भडकले आहेत. त्यांचा आणि आमीर खान यांचा वाद सध्या चांगलाच रंगलाय. बॉक्स ऑफिसवरही चित्रपट तुफान चालतोय. वेगळा विषय, वेगळी मांडणी आणि आमीरच ग्लॅमर यामुळं चित्रपटाला चांगला गल्ला तयार करताय आलाय.

इतकं सगळं असूनही मनापासनं सांगायचं तर मला हा चित्रपट तितकासा आवडलेला नाही. दोन मुन्नाभाईंच्या तुलनेत थ्री इडियटस फिका पडतो आणि तुफान मनोरंजनाची अपेक्षा ठेवली तर अपेक्षाभंग झाल्याशिवाय राहत नाही.इतकं सगळं असलं तरी डोन्ट वरी एकदा बघायला नक्कीच हरकत नाही...

Saturday, December 19, 2009

भाजीवाल्याचा झाला 'वडा...'

गेल्या काही दिवसांपास्नं थोडंसं 'आयडल' झाल्यासारखं वाटत होतं. पण पुन्हा एकदा नव्या जोमाने ब्लॉग लिहिण्यास सुरवात करणार आहे. गेल्या काही दिवसांपास्नं ब्लॉग लिहिण्यास वेळच मिळत नव्हता. खरं सांगायचं तर मनच होत नव्हतं. पण 'शो मस्ट गो ऑन'ही गोष्ट ध्यानात ठेवून आता हा ब्लॉग पुन्हा पहिल्यासारखा लिहिता राहिल.

थोड्याच दिवसांत एक आगळ्यावेगळ्या भाजीवाल्याची कथा घेऊन येतोय. ही गोष्ट आहे एका भाजी विक्रेत्याची. ज्या भाजी विक्रेत्याला आपल्या भाजीच्या स्टॉलबरोबरच वडे विक्रीचा स्टॉल सुरु करायचा होता. त्याचं एक्स्पान्शन करायचं होतं. लोकांपर्यत आपला ब्रँड पोचवायचा होता आणि जगातला सर्वाधिक मोठा वडा विक्रेता व्हायचं होतं...

भाजी विक्रेत्याचे वडे लोकप्रिय ठरतात का, त्याचे वडे खरोखरंच चमचमीत आणि खमंग असतात का, भाजीप्रमाणेच वड्यांसाठीही तो वाखाणला जातो का... या आणि इतर अनेक प्रश्नांची उत्तर घेऊन येतोय माझा नवा ब्लॉग 'भाजीवाल्याचा झाला वडा...' लवकरच...

Friday, October 30, 2009

रविवार सकाळ @ मातोश्री...



"जब वुई मेट' चित्रपटातलं "ते" दृष्य आठवतंय...? शाहिद कपूर करिनाला सोडून आल्यानंतर प्रथमच "शेअर होल्डर्स'ना सामोरा जातो. तेव्हा त्याच्या तोंडचे संवाद आठवतात...? ""आदित्य कश्‍यप अपने फादर की जगह नही ले सकता. कंपनी स्पिल्ट होनेवाली है. हमारे शेअर प्रायझेस ऑल टाईम लो है. सारे नये ब्रॅंड्‌स फ्लॉप हो चुके है. उपर से 572 क्‍लेम्स. इन आदर वर्डस अपनी हालत बहुत खराब हो गई है बॉस. अपनी तो बॅंण्ड बज गई है बॉस...'' इइ.

परिस्थिती अगदी तशीच्या तशी नसली तरी शिवसेनेचे कार्यप्रमुख उद्धव यांची अवस्था काहीशी अशीच आहे. उद्धव हे अगदी चोहोबाजूंनी समस्या आणि अडीअडचणींनी घेरले गेले आहेत. राज-राणे यांच्या बंडखोरीतून शिवसेनेला बाहेर काढून सैनिकांमध्ये मनोधैर्य निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले. पण लोकसभा निवडणुकीत मुंबईत बसायचा तो फटका बसलाच. त्यावेळी किमान मराठवाड्यानं तरी साथ दिली होती. पण विधानसभा निवडणुकीत मुंबईप्रमाणेच मराठवाड्यानंही पाठ फिरविली. त्यामुळं उद्धव यांच्या नेतृत्वाच्या क्षमतेबाबतच प्रश्‍नचिन्ह निर्माण केलं जातंय. मराठी मतदार आणि शिवसैनिकांमध्येही काही प्रमाणात कुजबूज सुरु झालीय.

च्या दिवशी उद्धव ठाकरे पत्रकारांना सामोरेही गेले नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया काय, ते पराभवाचं विश्‍लेषण कसं करतात हे जाणून घेण्याची उत्सुकता होती. त्यामुळंच भेटण्याची इच्छा व्यक्त करणारा डचड उद्धव यांना टाकला. अनपेक्षितपणे उद्धव यांचा तातडीनं "रिप्लाय' आला, "उद्या दुपारी साडेबारा वाजता मातोश्री..." निमंत्रण स्वीकारलं आणि रविवारी मध्यान्हीला (पत्रकार परिषदेच्या आदल्या दिवशीच...) मी आणि माझा सहकारी हृषिकेश देशपांडे मातोश्रीवर पोचलो. उद्धव यांच्याशी सविस्तर चर्चा तर झालीच पण ठाकरे कुटुंबियांचा जिव्हाळा अनुभवण्याची संधीही मिळाली.

एखाद्या घरात गेल्यानंतर यजमानाकडनं होणारं स्वागत, नुकतीच दिवाळी झाल्यामुळं फराळासाठी होणारा आग्रह अथवा खास "सीकेपी' पद्धतीनं तयार केलेल्या "कानुल्या' किंवा पोहे खाण्यासाठी रश्‍मी वहिनींकडून होणारा आग्रह... हे सगळं अनपेक्षित तर होतंच पण त्यापेक्षाही आश्‍चर्यकारक होतं. मातोश्रीवर पोचलो तेव्हा उद्धव हे मनोहर जोशी यांच्याशी बोलत होते. त्यामुळं रश्‍मी वहिनींनी सुरवातीला आमचं आदरातिथ्य केलं. अगदी कोण कुठनं उभं होतं किंवा माध्यमं कशी एकांगी बातम्या देतात इथपासून ते "सीकेपी' खाद्यपदार्थ किंवा मराठीचा मुद्दा किती महत्वाचा आहे, इथपर्यंत सर्वच विषयांवर त्या मोकळेपणानं बोलत होत्या. माध्यमांवर त्यांची किती "नजर' आहे, हे त्या देत असलेल्या संदर्भांवरनं अगदी क्षणोक्षणी जाणवत होतं.

सरांशी "गुफ्तगू' झाल्यानंतर उद्धव आमच्याशी "शिवसंवाद' साधायला आले. तत्पूर्वी त्यांनी निखील वागळे यांच्या "आजचा सवाल'चं उत्तर दिलेलं होतं. गेल्या पाच वर्षांत उद्धव यांनी जितकी आंदोलनं केली तितकी राज्यातल्या एकाही नेत्यानं केली नाहीत. कापूस दिंडी, कर्जमुक्ती देता का जाता, ऊस दरासाठी आंदोलन किंवा "शिवसंवाद' दौरा... इतक्‍यांदा जनतेमध्ये गेलेला हा नेता निकालानंतर पुरता हताश झाला असेल किंवा खचून गेला असेल, असं आम्हाला वाटलं होतं. राजचा दबदबा वाढत जातोय. दुसरीकडे मुंबई आणि मराठवाड्यासारखे बालेकिल्ले पडताहेत. याची चिंता त्यांच्या चेहऱ्यावर जाणवत होतीच. पण मी इतक्‍यानं खचून जाणाऱ्यातला नाही, हे देखील त्यांच्या बोलण्यातनं जाणवत होतं.

"मी महाराष्ट्र बोलतोय...'च्या निमित्तानं आम्ही राज्यात काय काय पाहिलं, याची माहिती ते आवर्जून घेत होते. शिवसेनेचे लोकप्रतिनिधी असलेला भागही कसा अविकसित आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. तसंच एकाच उमेदवाराला अनेकदा संधी दिल्यामुळंही काही ठिकाणी फटका बसला असावा, असं सांगितलं. त्यावर बरीच चर्चा झाली. त्यांनी मांडलेली बाजू कार्यप्रमुखातली माणुसकी दाखवणारी होती.

""नारायण राणे सेनेतून बाहेर पडले तेव्हा त्यांनी मराठवाड्यातल्या प्रत्येक आमदाराला चुचकारलं होतं. पण त्यांनी सेनेवरची निष्ठा ढळू दिली नाही. त्यात अनेक ज्येष्ठांचाही समावेश होता. सांदिपान भुमरें अथवा अण्णासाहेब माने यांना पुन्हा तिकिट मिळालं ते त्यांच्या निष्ठेमुळंच. त्यांचा पराभव झाला. पण सेनेत निष्ठावंतांनाच तिकिटं मिळतात, हे दाखवून देण्यासाठी त्यांना पुन्हा उमेदवारी दिली होती. सेनेत तिकिटं विकली जात नाहीत, हे दाखवून द्यायचं होतं,'' असं उद्धव यांचं स्पष्टीकरण वेगळा आयाम मांडणारं होतं.

दुसरीकडे अनुसूया खेडकर (कै. आमदार प्रकाश खेडकर यांच्या पत्नी) यांनी इच्छा नसताना पण सेनेला गरज असताना नांदेडमधून निवडणूक लढविली. मग आता दुसरा उमेदवार मिळाला म्हणून त्यांना उमेदवारी डावलणं मला माणूस म्हणून पटलं नाही, हे स्पष्टीकरणही शांत आणि संयमी नेत्याची आणखी एक बाजू दाखवणारं होतं. माध्यमांकडून दोन्ही बाजूनी होणाऱ्या टीकेला सामोरं जाताना उद्धव भूमिकेवर ठाम होते. ज्येष्ठांना तिकिटं द्या किंवा त्यांची तिकिटं कापा, टीका होतेच. शिवसेना राडेबाज, शिवराळ भाषा वापरणारी किंवा गुंडप्रवृत्तीची म्हणूनही टीका होत होती आणि आता संस्कृती बदलतोय तरीही टीका होतेच. त्यामुळं माध्यमं दोन्ही बाजूनं बोलतात आणि शिवसेनेवरच टीका करतात, हे त्यांनी सोदाहरण दाखवून दिलं. तसंच आम्ही आमचा मार्ग सोडणार नाही, हेही निक्षून सांगितलं.

""मराठवाड्यातल्या आणि विदर्भातल्या जनतेमध्ये गेलो. इतर कोणीही गेलं नाही इतके वेळा गेलो. तरीही मला आणि शिवसेनेला अपयश का आलं,'' याचं उत्तर त्यांना जास्त सतावत होतं. कदाचित उद्धव जितके कार्यरत आहेत तितके त्यांचे आमदार-खासदार नाहीत, हेच त्याचं उत्तर आहे. आपल्या भागाचा विकास करण्यात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी पुढे नाहीत आणि हे आम्ही प्रत्यक्ष पाहिल्यामुळं आम्हाला माहिती होतं. ते त्यांनाही सांगितलं. शिवसेना रस्त्यावर उतरून आंदोलन करत असताना सभागृहात मात्र, पक्ष तितका सक्षम वाटत नव्हता. अशा काही विधानांच्या वेळी त्यांचा चेहरा पुरेसा बोलका होता.

आता मुंबईतली पक्ष संघटना वॉर्ड स्तरापासून पुन्हा बांधून काढायची, मराठवाडा-विदर्भात फक्त आंदोलन न करता विधायक तसंच विकासकामंही सुरु करायची, पुन्हा एकदा त्याच तडफेनं स्वकीय तसंच परकीयांशी दोन हात करायचे आणि मुख्य म्हणजे या सर्वांच्या जोडीला पुन्हा एकदा ज्वलंत हिंदुत्व हातात घ्यायचं, अशा अनेक गोष्टींचे संकेत कळत नकळत मिळत होते. जवळपास तास दीडतासांच्या भेटीमध्ये उद्धव यांच्याशी अगदी मोकळेपणानं चर्चा झाली.

राज आणि राणे यांच्या तडाख्यामुळं शिवसेनेची पडझड होणार, हे माहिती होतंच. पण उद्धव पराभूत झाले असले तरी "फिनिक्‍स' पक्षाप्रमाणे उभं राहण्याची जिद्द त्यांच्यात आहे. शांत, संयमी आणि सुसंस्कृत आहेत. ते चिवट आहेत. लोकांमध्ये मिसळण्यात आणि आंदोलनांचं नेतृत्व करण्यात त्यांना शरम वाटत नाही. तरीही शिवसेनेचे 44 आमदार आहेत. त्यातला 26 तरुण आहेत. लोकांसाठी जनतेमध्ये जाऊन आंदोलनं करणारा आणि त्यांच्या व्यथा समजून घेणारा उद्धव यांच्या व्यतिरिक्त एकही नेता नाही. अशा त्यामुळंच त्यांच्या या प्रयत्नांना लोकांची आज ना उद्या साथ लाभणार का, याचीच उत्सुकता आहे.

लेखाच्या सुरवातीला "जब वुई मेट' या चित्रपटात वापरलेल्या संवादाचा उत्तरार्ध खालील बाजूस आहे. फक्त चित्रपटात शोभेल असाच तो आहे.

""... इससे बुरा और कुछ हो नही सकता. अब सिर्फ अच्छा हो सकता है और होगा. इन्सान जो कुछ रियली चाहता है ना, ऍक्‍च्युली... उसे हमेशा वोही मिलता है. और इस बार मे रियल मे चाहता हूँ. ऍक्‍च्युअल मे. हर प्रॉब्लेम को में सामने से फेस करु. हर इनकमप्लिट प्लॅन को कम्प्लिट करु. इस कंपनी को वहा तक ले जाऊ जहा खुद डॅड भी नही सोच सकते...''

चित्रपटाच्या उत्तरार्धात शाहिद कपूर त्याच्या वडिलांची कंपनी खूप मोठी करतो. त्याला खूप फायदा होतो वगैरे वगैरे... तुलना करण्याची इच्छा नाही. पण तरीही उद्धव यांच्या आयुष्यातही हा संवाद खरा ठरेल का... असा विचार करतच "मातोश्री'तून बाहेर पडलो... समाधानी मनानं!

Thursday, October 29, 2009

युवराज आदित्याय नमः



रंग उडालेली स्काय ब्लू जीन्स, केल्विन क्‍लेनचा टी-शर्ट, चेहऱ्यावर "डिट्टो' वडिलांसारखं हास्य, वारश्‍यानंच चालत आलेला बोलण्या-चालण्यातला आत्मविश्‍वास आणि मिश्‍किल वृत्ती... ठाकरे घराण्यातल्या चौथ्या पिढीचा प्रतिनिधी असलेल्या आदित्य उद्धव ठाकरेची ही पहिली ओळख. "साम मराठी'साठी आदित्यची मुलाखत घेण्यासाठी "मातोश्री'वर गेलो होतो. तेव्हा आदित्यची ही ओळख मनावर ठसा उमटवून गेली. मुलाखत जसजशी रंगत गेली तसतसा त्याच्यातला "कॉन्फिडन्स' दुणावत गेला.

पुरोगामी विचारांचे प्रबोधनकार ठाकरे, ज्वलंत हिंदुत्ववादी आणि मराठी माणसाचा मानबिंदू असलेले बाळासाहेब तर सभ्य आणि सुंस्कृत राजकारणी अशी ओळख असलेले उद्धव ठाकरे... या तीनपैकी कोणती प्रतिमा तुला अधिक जवळची वाटते किंवा कोणत्या प्रतिमेत तू "फिट्ट' बसतो, असं विचारल्यानंतर आदित्यनं दिलेलं उत्तर त्याची वाटचाल परिपक्वतेच्या दिशेनं सुरु असल्याचं द्योतक वाटलं. ""तिघांच्याही भूमिका त्या-त्या काळाशी सुसंगत होत्या. किंवा संबंधित भूमिका ही त्या काळाची गरज होती. त्यामुळं कालानुरुप विचार केला तर तिघांच्याही भूमिका जवळच्या वाटतात. भविष्यात कालानुरुप आवश्‍यक असेल तशीच माझी भूमिका असेल. कदाचित ती या तिघांपेक्षा वेगळीही असेल,'' असे सांगून आदित्यनं त्याच्यातला "स्पार्क' दाखवून दिला.

घरातल्या प्रत्येक नात्यापासून ते राज ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांबद्दल आणि विधानसभेच्या प्रचारापासून ते स्वयंसेवी कामाबद्दल प्रत्येक विषयावर तो अगदी स्पष्टपणे बोलतो. खास ठाकरे शैलीप्रमाणे कोणताही आडपडदा न बाळगता! सध्या तो "झेवियर्स'मधून बीए करतोय. राज्यशास्त्र आणि इतिहास ते त्याच्या आवडीचे विषय आहेत. बीए झाल्यानंतर पुढचं शिक्षण आणि करियर कशात करायचं याबद्दल विचार करायचा, असं तो सांगतो. बाबांप्रमाणे स्वतःला पूर्णपणे राजकारणात झोकून देणार का, या प्रश्‍नावर सध्या तरी त्याच्याकडे उत्तर नाही. सुरवातीला शिक्षण या विषयात काहीतरी ठोस करण्याची त्याची इच्छा आहे. त्याची सुरवात प्राध्यापकांच्या संपाच्या निमित्ताने झाली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर आदित्यला "प्रोजेक्‍ट' करण्यात आलं, असं माध्यमांना वाटत असलं तरी हे विधान तो खोडून काढतो. मी प्रचारात उतरण्याचा विचार करतोय, पण राजकारणात सक्रिय होईन किंवा नाही हे अजूनही ठरलेले नाही. मग "प्रोजेक्‍ट' करण्याचा प्रश्‍न येतोच कुठं, असा प्रतिप्रश्‍न तो विचारतो.

तूर्तास तरी अभ्यास, कविता लेखन, फोटोग्राफी, कॉलेजियन्सशी निगडित आंदोलनं आणि स्वयंसेवी संस्था यांच्यापुरतंच मर्यादित राहण्याचं आदित्यनं ठरवलंय. कार्यप्रमुखांनी आदेश दिला तरच तो प्रचारात उतरणार आहे. पण फक्त निवडणुकीपुरतं. नंतर पुन्हा कॉलेज, अभ्यास आणि सामाजिक काम. नाही म्हटलं तरी आदित्यच्या "शिवसेना भवन'च्या फेऱ्या वाढल्या आहेत. शिवसेनेच्या कार्य पद्धतीची जवळून ओळख व्हावी, यासाठी तो सेना भवनावर असतो. पण तिथं गेलं की त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांची निमंत्रण येऊ लागतात. आमच्याकडे दौऱ्यावर या, प्रचारासाठी या वगैरे वगैरे. नुकतंच त्याला अकोल्यामध्ये प्रचाराला येण्याचं निमंत्रण आलंय. काही ठिकाणी तो बाबांबरोबर प्रचाराला जाईलही. पण अजून काही निश्‍चित झालेलं नाही. जगभरातल्या शिक्षणतज्ज्ञांचे शिक्षणविषयक प्रबंध आणि पेपर्सचा अभ्यास करणं,

बाहेरच्यांसाठी जहाल किंवा कठोर वाटणारे बाळासाहेब खूप हळवे आणि "इमोशनल' आहेत, असं आदित्यला वाटतं. घरी आई आणि बाबा यापैकी कोणाचा मार जास्त खाल्ला आहे, याला मिळालेलं उत्तर धक्कादायक पण गमतीशीर आहे. आदित्य म्हणतो, ""कोणाचाच मार खाल्लेला नाही. मुळात आमच्याकडे असा नियमच आहे. कोणीही कोणावरही हात उगारायचा नाही. त्यामुळं ओरडा खाल्ला पण मार खाल्लेला नाही. आईकडून नाही आणि बाबांकडूनही नाही.'' ""माझा जन्म जरी ठाकरे घराण्यात झालेला असला तरी आईनं आम्हाला कायम जमिनीवर ठेवलं. आम्ही वेगळे किंवा असामान्य आहोत, असं जाणवूच दिलं नाही. जिथं रांग असेल तिथं रांगेत उभं रहायचं, शाळेत झालेली शिक्षा इतरांप्रमाणेच भोगायची आणि ठाकरे नावाचा गैरवापर करायचा नाही, हे आईनं आमच्या मनावर चांगलंच ठसवलं आहे,'' असं आदित्य आवर्जून सांगतो.

""कॉलेजमध्ये ओळख करुन देताना मी फक्त आदित्य इतकीच ओळख सांगतो. कोणी अगदीच विचारलं तर "आदित्य टी' असं सांगतो. अगदीच जर कोणी खोदून खोदून विचारलं तर आदित्य ठाकरे अशी ओळख करुन देतो. ठाकरे नावाचा मला अभिमान आहे. पण त्यामुळं आपसूक मिळणारे फायदे मला नको आहेत,'' असं आदित्य सांगतो. "व्हॅलेन्टाईन डे'च्या दिवशी आदित्य शक्‍यतो कॉलेजला जाण्याचं टाळतो. गेल्या दोन-तीन वर्षांपासून हा मुद्दा तितकाचा वादग्रस्त राहिलेला नाही. त्यामुळं "व्हॅलेन्टाईन डे'ला "गोची' होत नाही, असं आदित्यचं म्हणणं आहे.

शिवसेना या राजकीय पक्षाचं वलय आणि कार्यप्रमुखांचा मुलगा असल्याचा अहंकार त्याच्यामध्ये जाणवत नाही. कदाचित हीच गोष्ट भविष्यात त्याच्यासाठी "प्लस पॉईंट' ठरु शकेल. आदित्यचं वागणं बोलणं हे जवळपास उद्धव ठाकरे यांच्यासरखंच आहे. त्यामुळंच तो शांत आणि संयमी वाटत असावा. आदित्य राजकारणात प्रवेश करेल किंवा त्याला लोक स्वीकारतील की नाही, याबद्दल आताच बोलायची गरज नाही. पण बंदे मे दम है... यात वाद नाही.

Friday, October 16, 2009

दिन दिन दिवाळी...!



दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा...!!!

काही वर्षांपूर्वी दिवाळीच्या कालावधीत "लोकसत्ता'मध्ये एक अग्रलेख आला होता. विषय अर्थातच, दिवाळीचा होता. प्रकाशाचा उत्सव, जल्लोषाचा आणि उत्साहाचा सण, फटाके, फराळ, दिवाळी अंक आणि दिवाळीच्या अनुषंगानं येणारे नेहमीचेच इतर मुद्दे त्यामध्ये होते. पण त्यातला एक मुद्दा नवीन होता आणि त्यामुळंच कायम लक्षात राहण्याजोगा होता. त्याचा काही अंश असा...

"आपलं रोजचं आयुष्य हातावरच्या किंवा भिंतीवरच्या घड्याळाभोवती फिरत असतं. पण आपल्या कुटुंबाचं आयुष्य हे एका वेगळ्याच घड्याळाभोवती फिरत असतं. त्या घड्याळाचं नाव आहे "दिवाळी! हो दिवाळी!! घराला रंग द्यायचा असो, गाडी घ्यायची असो, इंटिरियर चेंज करायचं असो किंवा टीव्ही, फ्रीज किंवा सोन्या-चांदीचे दागिने घ्यायचे असोत. या खरेदीसाठी दिवाळीपेक्षा सर्वोत्तम मुहूर्त नसतो. त्यामुळेच एखादी महत्वाची खरेदी असेल तर ""... दिवाळीला घेऊयात की...'' असे संवाद आपल्याला घरातून ऐकू येतात. अशा या दिवाळीच्या घड्याळाभोवती आपलं आयुष्य फिरत असतं. आपलं कुटुंब फिरत असतं....''

अश्‍शी ही दिवाळी. दिवाळी येण्यापूर्वी जवळपास महिनी दीड महिना तिची चाहूल लागते. घरातल्या भांड्याकुंड्यांची स्वच्छता होते. घराची पण साफसफाई होते. मग कोणाला कोणते कपडे घ्यायचे किंवा यंदा दिवाळीला काय घ्यायचं याच्यावर चर्चा सुरु होते. पगार आणि बोनस (अर्थातच, मंदीच्या जमान्यात मिळाला तर...) झाल्यावर कपड्यांच्या खरेदीची लगबग सुरु होते. आकाशकंदिल, पणत्या विकत घेतल्या जातात. दिवाळीला आठवडा राहिला असताना घराघरातून फराळाच्या पदार्थांचे सुगंध दरवळू लागतात. हल्ली धावपळीच्या जगातही किमान एखादा तरी पदार्थ घरी केला जातोच. मग ती चकली असेल, लाडू असेल, ओल्या नारळाची करंजी असेल किंवा शेव-चिवडा असेल. फराळाचं आटोपलं आणि दिवाळीला एक-दोन दिवस बाकी असताना. मोती साबण आणि प्रवीणच्या उटण्याची खरेदी होते. (मोती साबण ही दिवाळीची खरी ओळख. मोती साबणाच्या आंघोळीशिवाय दिवाळी असल्याचं वाटतंच नाही.) फटाक्‍यांची खरेदी पार पडते. अशा पद्धतीनं सर्व प्रकारची खरेदी करुन आपण जय्यत तयारीनिशी दिवाळीचं स्वागत करण्यासाठी सज्ज होतो.

पूर्वी दिवाळीच्या निमित्तानं महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या "दिवाळी बंपर'चं तिकिट बहुतांश घरांमध्ये खरेदी केलं जायचं. बाबाही ते कायम खरेदी करायचे. आम्हाला ते कधीच लागलं नाही, ही गोष्ट सोडून द्या. पण दिवाळीच्या वेळी लॉटरीचं तिकिट हे मोती साबणाइतकंच घट्ट रुजलेलं समीकरण होतं. आता कदाचित ते तितकसं राहिलेलं नाही. पण दिवाळीचा आनंद आणि उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. दिवाळीत घरासमोर पहिला फटाका कोण वाजवणार यासाठी लागणारी स्पर्धा. त्यासाठी सक्काळी सक्काळी लवकर उठून अभ्यंगस्नान करुन तयार होणं, फटाके वाजवून झाल्यावर सारसबागेत किंवा एखाद्या देवळात दर्शनाला जाणं, त्यानंतर घरी येऊन दाबून फराळ करणं आणि सरतेशेवटी गादीवर लोळत दिवाळी अंकातला एखादा लेख वाचून काढणं... हे सारं आहे तसं सुरु आहे.

दिवाळी निमित्तानं मित्र-मैत्रिणी किंवा नातेवाईक एकत्र येऊन कल्ला करणं किंवा जुन्या आठवणी काढून हास्यकल्लोळात बुडून जाणं, यामध्ये जराही खंड नाही. जगणं बदलतंय असं आपण म्हणतो. पण अजूनही लहानग्यांना दिवाळीच्या किल्ल्यांचं आकर्षण आहेच. ते किल्ले करतात. कदाचित तुमच्या-माझ्याकडून यामध्ये क्वचित प्रसंगी खंड पडला असेलही. तरी पण आपल्यासारख्या इतर अनेकांकडून ही परंपरा पार पाडली जात आहे, पुढे नेली जात आहे. हेच तर दिवाळीचं वैशिष्ट्य आहे.

दिवाळी आणि "पोस्त' हे तर कधीच एकमेकांपासून वेगळे केले जाऊ शकत नाही. मग तो इमारतीचा वॉचमन असो, परिसरात गस्त घालणारा गुरखा असो, घरात काम करणाऱ्या मावशी असोत, महापालिकेचे कर्मचारी असो किंवा संदेशवाहक पोस्टमन असो. प्रत्येकालाच "दिवाळी' हवी असते. मग आपणही त्यांना फारसा विरोध करत नाही. आपल्याला शक्‍य असेल तितकी "दिवाळी' त्यांना देऊनच टाकतो. घरातली कामवाली आणि पत्र घेऊन येणारा पोस्टमन यांना दिली जाणारी "पोस्त' ही काहीशी अधिक खुषीनं दिली जाते. इतरांना दिल्या जाणाऱ्या "दिवाळी'त आपुलकीचा ओलावा कदाचित नसेलही. पण "पोस्टमन'च्या कामातला प्रामाणिकपणा आणि त्याची चिकाटी लक्षात घेतली तर तो मागेल तितकी "पोस्ट' आपण त्याला देतोच. तिथं आपण कमीजास्तचा विचार करत नाही.

पूर्वी दिवाळीसारखा उत्सव वर्षातून एकदा यायचा. त्यावेळी भरभरुन खरेदी व्हायची. अनेकांकडे तर दिवाळी आणि वाढदिवस अशी दोनच वेळा खरेदी व्हायची. काही ठिकाणी अजूनही होत असेल. पण कितीही मंदी असली किंवा पगार कितीही कमी असले तरी प्रत्येक घरात दिवाळीचा तोच आनंद असतो, दिवाळी साजरी करण्यात तोच उत्साह असतो. स्वरुपातला फरक इथं गौण ठरतो. जागतिकीकरणामुळं आता अनेक कुटुंबांची आर्थिक घडी पूर्णपणे बदललीय. पूर्वीइतकी गरीबी त्यांच्याकडे नाही. अनेकांना गलेलठ्ठ पगार आहेत. त्यामुळं वर्षभरात कधीही काहीही खरेदी करण्याची क्षमता ते बाळगून असतात. पण अशाही परिस्थितीत दिवाळीचं महत्व पूर्वीइतकंच आहे. कारण फक्त पैसा आणि खरेदी म्हणजेच दिवाळी नाही. श्रीमंती आणि ऐश्‍वर्य म्हणजे दिवाळी नाही. घराबाहेर एखादा आकाशकंदील आणि दोन-चार पणत्या लावल्या तरी घराचं आणि दिवाळीचं वेगळेपण त्यातनं स्पष्टपणे जाणवतं.

सो बी हॅप्पी आणि हॅप्पी दिवाली... शुभ दीपावली...!!!

Thursday, October 08, 2009

या टोपीखाली दडलंय काय?



आघाडीप्रमाणेच विजयाची संधी युतीलाही!

महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक ऐन रंगात आलीय. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला हॅटट्रिक करण्याची संधी मिळणार का, नाकर्ते हटून शिवसेना-भाजपचे सरकार सत्तेवर येणार, याची उत्सुकता शिगेला पोचलीय. राजकीय अभ्यासकांचीही, नागरिकांचीही आणि अर्थातच माझीही.

पण काही जणांना या निवडणुकीत काय होणार, हे माझ्याकडून जाणून घेण्याची उत्सुकता लागून राहिली आहे. लोकसभेच्या वेळी मी व्यक्त केलेले अंदाज काही प्रमाणात चुकले होते. त्यामुळे यंदा मी व्यक्त केलेले अंदाज खरे ठरतात की मी पुन्हा तोंडावर आपटतो, याचीच उत्सुकता काही जणांना लागून राहिलीय. माझ्या गेल्या दोन-तीन पोस्टच्या कॉमेंटसवरुन हे स्पष्ट होतंय. कोणीतरी नाव न लिहिता मला अंदाज व्यक्त करा, अंदाज व्यक्त करा, असा आग्रह करतंय. वास्तविक पाहता जे नाव न लिहिता आव्हान देतात, प्रतिक्रिया व्यक्त करतात, त्यांच्या मताला फारसं महत्व देऊ नये, असं माझं मत आहे. जे आहे ते रोखठोक असावं, तोंडावर असावं, अशी माझी इच्छा असते. पण माझ्या अंदाजांची कोण तरी वाट पाहतं आहे (मी चुकेन की नाही हे पाहण्यासाठी का होईना!) हे वाचूनच मला खूप भरुन आलंय. पण खरं सांगायचं झालं तर काहीच मत व्यक्त करणं अवघड आहे.

गेल्या वेळेसप्रमाणेच यंदाही आम्ही `मी महाराष्ट्र बोलतोय...` या कार्यक्रमासाठी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दौ-यावर गेलो होतो. मुंबईतही थोडंसं फिरलो. कोकण, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही सामान्य लोकांशी, पत्रकारांशी, मित्रांशी बोलतोय. तिथली परिस्थिती जाणून घेतोय. पण काहीच अंदाज अजून लागत नाहीये. निवडणुकीपूर्वी म्हणजे दौ-यावर बाहेर पडेपर्यंत मला असं वाटत होतं की लोकांमध्ये सरकारविरोधी आणि शिवसेना-भाजप युतीच्या बाजूने लाट आहे. पण तसं काहीही नाहीये. लोकांमध्ये शिवसेना-भाजपबद्दल सहानुभूती आहे. पण त्यांच्या बाजूने लाट नाही. अनेक ठिकाणी स्थानिक मुद्द्यांमुळे लोक युतीच्या बाजूने आहेत. काही ठिकाणी युतीच्या उमेदवारांचाही प्रभाव आहे. पण लाट नाही.

मराठवाड्यात काही प्रमाणात युतीच्या (जास्त करुन शिवसेनेच्या) जागा वाढतील, असं वाटतंय. पण काही जागा त्यांना गमवाव्याही लागतील. (कदाचित बीड). पण अमुक एक जागा अमुक एका पक्षाला मिळेल, असं ठामपणे अवघड आहे. विदर्भातही काही प्रमाणात अशीच परिस्थिती आहे, असं म्हणावं लागेल. पण उत्तर महाराष्ट्रात युतीला मिळणा-या जागांची संख्या घटेल, असा अंदाज आहे. त्यामुळं युतीची लाट आहे, असं म्हणता येणार नाही. पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी-काँग्रेसचा बालेकिल्ला. पण त्यांचे बंडखोर आणि काही ठिकाणी अपक्ष उमेदवारांमुळे ठामपणे कोणाला किती जागा मिळणार, याचं भाकित करणं, खूप अवघड आहे.

अनेक ठिकाणी हिंडल्यानंतर युती आणि आघाडी या दोघांचंही जागावाटप काही ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं झाल्याचं जाणवलं. त्यामुळंच तिथं उमेदवारांबद्दल नाराजी आहे. कुठं बंडखोरीही झालीय. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये हे प्रमाण अधिक असलं तरी शिवसेना आणि भाजपमध्ये मात्र, हे नाहीच असं नाही. चारही प्रमुख पक्षांना या गोष्टींचा फटका बसणार आहे. अपक्ष आणि बंडखोर यांच्यामुळं काहीच अंदाज व्यक्त करता येत नाही. तसंच रिपब्लिकन डावी लोकशाही आघाडीचे उमेदवार काँग्रेस-राष्ट्रवादीचे किती उमेदवार पाडणार, यावरही काही ठिकाणचे निकाल अवलंबून आहेत.

दुसरीकडे मुंबईतली मनसेची जादू गेल्यावेळेस इतकी चालेल की नाही, याचाही अंदाज अजून येत नाहीये. लोकांशी बोलल्यानंतर मनसेची जादू काही प्रमाणात कमी झाल्याचं जाणवतं आहे. पण नेमकं हे प्रमाण किती कमी झालं त्याबद्दलचं भाकित व्यक्त करता येत नाही. मनसेचा आकडा दहापर्यंत जाणार की पाचच्या आतच आटोपतं घ्यावं लागणार, याचा अंदाज लागत नाहीये. मुख्य म्हणजे मनसेचे किती उमेदवार येणार यापेक्षा ते युतीचे किती उमेदवार पाडणार याची उत्सुकता आहे. पण गेल्या निवडणुकीत युतीला फक्त १५ जागा होत्या आणि आघाडीला १९. यंदा मनसेनं कितीही प्रयत्न केले तरी युतीच्या १५-१६ जागा नक्की येतील असं चित्र आहे. त्यामुळं मनसेनं कितीही मतं खाल्ली किंवा सुपारीबाज पद्धत अवलंबली तरी युतीच्या जागा १५ च्या खाली जाणार नाही, हे नक्की.

तिकडे कोकणात युतीला गेल्यावेळी जितका फटका बसला होता तितका यंदा बसणार नाही. चिपळूण, रत्नागिरी, राजापूर किंवा अगदी महाडची जागाही यंदा युतीला मिळू शकते. म्हणजे कोकणातून युतीला फायदा होणार, असं दिसतंय. ठाण्यातही राजन राजे यांची यंदा हवा नाही. ठाण्यातल्या तीनही जागा युतीलाच मिळण्याची शक्यता अधिक आहे. कळवा-मुंब्राची जागा जितेंद्र आव्हाड यांच्याकडे जाईलही कदाचित. पण त्यातही कदाचित आहेच. ठाण्यातल्या एकूण चित्र गेल्यावेळेसपेक्षा वेगळं असण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी-काँग्रेसनं इथून स्वीप केला होता. पण यंदा इथंही युतीच्या जागा वाढताहेत. तिकडे वसई-विरार पट्ट्यात बहुजन विकास आघाडीचा बोलबाला आहे. तिथंही आघाडीची डाळ शिजणा नाहीये. त्यामुळं या पट्ट्यात युतीच्या जागा वाढतील पण आघाडीच्या कमी होतील. (बहुजन विकास आघाडी काँग्रेसचीच बटिक आहे. पण चिन्ह पंजा नाही. त्यामुळं संख्याबळात ते इतर म्हणूनच गणले जातील)

एकूणच सगळं चित्र अस्पष्ट आणि धूसर आहे. काही ठिकाणी जागांची अदलाबदली होईल. कुठं युतीच्या जागा वाढतील तर कुठं आघाडी युतीकडून काही जागा हिसकावून घेईल. पण नेमकं काय होईल, हे आताच सांगणं अवघड आहे. कदाचित १९९५ प्रमाणे ४५ अपक्ष (बंडखोर आणि इतर किरकोळ उमेदवार) निवडून आले तर कदाचित परिस्थिती वेगळी असू शकते. अपक्ष, बंडखोर आणि तिस-या आघाडीचे किंवा तिस-या पक्षाचे उमेदवार यांचा फटका काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीलाच सर्वाधिक बसणार आहे. शिवसेना-भाजप युतीला कमी फटका बसेल. त्यामुळं यंदा युतीला गेल्या दोन वेळेसपेक्षा सर्वाधिक संधी आहे. यंदा नाही तर पुढच्या दोन टर्म तर नक्की नाही, अशी परिस्थिती आहे.

पण युतीचं जागावाटप, राज-उद्धव यांचे वाद, गडकरी-मुंडे यांच्या वादामुळं झालेलं जागावाटप, परस्परांचं काम करताना सेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेली नाराजी आणि मुख्य म्हणजे विनय नातू यांच्या तिकिटावरुन झालेलं रामायण अशा सर्व गोष्टी पाहता युतीला फटका बसला तर तो त्यांच्याच कृत्याचं फळ असेल. पुढं ताट वाढून ठेवलंय. पण ते खाण्याची शिवसेना-भाजप युतीची इच्छाच नसेल तर कोण काय करणार... युतीला संधी नक्की आहे. गेल्या दोनवेळेस पेक्षा नक्कीच अधिक आहे. पण युतीची लाट नाही. त्यामुळं त्यांना झगडून यश मिळवावं लागणारेय. उद्धव ठाकरेंनी एकट्यानं जिवाचं रान करुन उपयोग नाही. शिवसेनेला ७०-७५ पेक्षा अधिक जागा नक्की मिळतील. गडकरी-मुंडे-खडसे यांनीही भाजपच्या किमान ५० जागा तरी निवडून आणल्या पाहिजेत. तरच युतीची सत्ता येण्याची शक्यता आहे. पाहूयात खरंच हा बदल होतो का...

Tuesday, October 06, 2009

कोण आहेत मिलिंद नार्वेकर?



शिवसेनेचे 'डेप्युटी' कार्यप्रमुख!!!

प्रत्येक निवडणूक जवळ आली की मिलिंद नार्वेकर या नावाची चर्चा होते. यावेळीही शिवसेनेचे औरंगाबादेतले बंडखोर माजी खासदार प्रदीप जैस्वाल यांच्या आरोपांमुळे नार्वेकर गाजले. पण हे नार्वेकर कोण आहेत? ते मातोश्रीपर्यंत पोहोचले कसे? असे प्रश्न आपल्याला पडत असतात. पण प्रत्येक वेळी त्याचं उत्तर मिळतंच असं नाही. मिळालं तरी ते सविस्तर असतं असंही नाही. पण माझा मित्र सचिन परब यानं मिलिंद नार्वेकरबद्दल खूप सविस्तर लिहिलंय आणि अगदी बारीकसारीक माहितीही त्यानं दिलीय. सचिन परब आणि मटा ऑनलाईनच्या परवानगीनं हा लेख माझ्या ब्लॉगच्या वाचकांसाठी खास!!!


रणजीत देसाईंनी श्रीमान योगी लिहायचं ठरवलं तेव्हा प्रख्यात विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी त्यांना एक पत्र लिहिले. ते पत्रच श्रीमान योगीची प्रस्तावना म्हणूनही छापले आहे. त्यात कुरुंदकरांनी देसाईंना औरंगजेब प्रभावीपणे रंगवायला सांगितलाय. कारण जेवढा औरंगजेब मोठा दाखवाल, तेवढेच शिवाजी मोठे ठरणार आहेत. नारायण राणेंनी हे वाचलेलं नसणार हे निश्चित. पण त्यांच्यातल्या अंगभूत शहाणपणाने त्यांनी याचं मर्म ओळखलं असणार बहुतेक. म्हणून तर त्यांनी शिवसेना सोडताना आपली मोठी प्रतिमा उभी करण्यासाठी आपल्या कहाणीत एक नवा औरंगजेब रंगवला. त्याचं नाव मिलिंद नार्वेकर.

मिलिंदशी राणेंचं काही वैयक्तिक वैर नव्हतंच. तेव्हा उद्धवचा फोन आला तरी राणे घरी उठून उभे राहायचे. त्याकाळात अनेकदा आपल्या कल्पना उद्धवच्या गळी उतरवताना त्यांनी मिलिंदची मदतही घेतलीय. पण तरीही पक्ष सोडताना त्यांनी बाळासाहेब, उद्धव, सुभाष देसाई, मनोहर जोशी यांना थेट टार्गेट करण्याऐवजी केलं ते मिलिंदला. सर्वसामान्य शिवसैनिक आणि पदाधिकारीही मिलिंदला मातोश्री आणि आपल्यामधली धोंडच समजत होता. मिलिंदचा रूबाब, श्रीमंती आणि वेगाने झालेले प्रगती त्यांच्याही डोळ्यात भरत होती. त्यामुळे राणे यांनी आपलं सॉफ्ट टार्गेट ठरवलं. तो मीडियाच्याही ब्लॅक लिस्टमध्येच होता. त्यांनीही त्याला मस्त काळ्या रंगात रंगवला. या सगळ्यामुळे आज कुणाची इच्छा असो अगर नसो, महाराष्ट्राच्या ओळखीचा बनलाय.

मुळात मिलिंद साधा शिवसैनिक होता. मालाडच्या लिबर्टी गार्डन भागातला गटप्रमुख. ९२च्या महापालिका निवडणुकांआधी त्याच्या एरियातला वॉर्ड विभागला. म्हणून नव्या वॉर्डचं शाखाप्रमुखपद मिळेल या आशेने मातोश्रीवर पोहोचला. चुणचुणीत, हुशार, स्मार्ट, बोलण्यात पटाईत असा हा पंचविशीतला मुलगा उद्धव ठाकरेंच्या नजरेत भरला. ते स्वत:च तेव्हा सुभाष देसाईंचं बोट पकडून सेनेत सक्रिय होत होते. उद्धवनी त्याला विचारलं, फक्त शाखाप्रमुख बनायचंय की आणखी काही जबाबदारी उचलायची तयारी आहे. मिलिंद पटकन उत्तरला, तुम्ही सांगाल ते.

आधी मातोश्रीवर पडेल ते काम केलं आणि साधारण ९४ सालच्या उत्तरार्धात मिलिंद रितसर उद्धव ठाकरे यांचा पीए बनला. अपॉइण्टमेण्ट घेणं, डायरी ठेवणं, फोन घेणं, दौरे आखणं, व्यवस्था करणं अशी कामं तो करू लागला. पुढे स्मिता आणि राज ठाकरे मातोश्रीतील सत्ताकेंद्राच्या वर्तुळाबाहेर सरकली आणि उद्धवकडे सेनेची अनभिषिक्त सत्ता आली. उद्धव मोठे होत होते आणि मिलिंदही. कधीच कोणत्याही गोष्टीला नाही न म्हणणारा, सांगितलेली गोष्ट काहीही करून पूर्ण करून देणारा, गोड बोलणारा, प्रसंगी स्वत:कडे वाईटपणा घेणारा, लोकांना कटवण्यात चतुर असणारा हा पीए उद्धव यांच्या गळ्यातला ताईत बनला. उद्धव बाळासाहेबांसारखे चोवीस तास लोकांत रमणारे नेते नव्हते. घरात, कुटुंबात आणि आपल्या छंदांत रमणारा हा साधा मध्यमवर्गीय डोक्याचा माणूस. त्यामुळे त्यांच्या अपॉइण्टमेण्ट कार्यकर्त्यांनाच काय पण पदाधिकारी आणि पत्रकारांनाही महाग होत्या. त्यामुळ मिलिंदचं महत्त्व वाढत चाललं.

कार्यकारी अध्यक्षांशी अपॉइण्टमेण्ट नक्की कोण टाळतं, स्वत: धाकटेसाहेब की मिलिंद हे भल्याभल्यांना कळत नव्हतं. पण मिलिंदच्या मातोश्रीवरच्या वर्चस्वाची चर्चा सगळ्यांमध्येच होती. पण २००४ च्या निवडणुकांत सत्ता दोन बोटं उरल्यामुळे त्याची जाहीर वाच्यता कुठे होत नव्हती. त्याला तोंड फोडलं आमदार भास्कर जाधवांनी. त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. आणि बंडखोरी केली. याच कारण त्यांनी आपल्याला मातोश्रीवर मिलिंदने अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप केला. तेव्हा पहिल्यांदा मिलिंदचं नाव गाजलं. पण त्यादिवसांत राणे मिलिंदची बाजू घेऊन जाधवांच्या विरोधात प्रचार करत होते. पुढे सत्ता आली नाहीच उलट राणेंच्या बंडाने सगळंच बदललं.

राणेंनी मिलिंदकडून आर्थिक व्यवहार होत असल्याचे आरोप केले. राणेंनी मिलिंदविरोधात केलेली हवा इतकी जबरदस्त होती, की त्याच्यावरच्या आरोपांची शहानिशा करण्याची तसदीही कोणी घेतली नाही. पण यातून मिलिंदच मोठा होत होता. भल्याभल्यांना जेरीस आणणा - या राणेंचेही मिलिंदसमोर काही चालले नाही, असे चित्र राणेंच्याच प्रचारातून उभे राहिले. राणेंच्या पोटनिवडणुकीत कणकवलीला तिथल्या लोकांनी मिलिंदला पाहण्यासाठी गर्दी केली होती, यातच सगळं आलं. पुढे राज यांनीही मिलिंदला सोडलं नाही. त्यांनी सांगितलेल्या मातोश्रीवरच्या चांडाळचौकटीत दुसरे तीन कोण हे स्पष्ट नव्हतं, पण त्यातला एक मिलिंद असल्याचं सगळ्यांना माहीत होतं. वर एवढा गहजब झाल्यानंतरही उद्धवच्या दरबारी त्याचं स्थान बळकट होतं आणि आहे.

राज यांच्या बंडानंतर उद्धव बरेच अॅक्सेसेबल झाले. छोटे मेळावे घेत होते. राज्यभर फिरत होते. शिवसेना भवनावर नियमित बसू लागले. मातोश्रीवर पोहोचणं तुलनेनं सोपं झालं. उद्धवपर्यंत पोहोचण्यासाठी अनिल देसाई, विनायक राऊत असे पर्यायही उभे राहिले. पालिकेतल्या विजयानंतर सेनेविषयी वातारवणही बदललं. त्यात अपक्ष आणि गवळीच्या नगरसेवकांना सेनेपर्यंत आणण्यात मिलिंदने महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे मिलिंदला विधानपरिषदेवर पाठवायला हवं, अशी चर्चा त्याच्या हितशत्रूंनी केली. पण या सगळ्यात मिलिंदचं आधीचं प्रस्थ कमी झालं, पण मातोश्रीवरचं महत्त्व नाही. अजूनही त्याचा मातोश्रीवरचा वावर तसाच आहे. त्याचं उद्धवसोबत दौ-यावर जाणं तसंच आहे. उगाच काहीतरी कारणं सांगून स्टेजवर उद्धवच्या कानाशी लागणं थांबलेलं नाही.