Thursday, September 30, 2010

जय श्रीराम....

न्यायालयाच्या आदेशाने

प्रभू श्रीरामचंद्रांचा वनवास संपला...




भव्य श्रीराम मंदिर बनणार...

Monday, September 27, 2010

प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक...



पुण्यातील लक्ष्मी-रस्त्यावर

गेल्या काही वर्षांपासून ऑर्कुट आणि फेसबुकसह विविध सोशल नेटवर्किंगचं प्रस्थ मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. शाळा, कॉलेज, क्लासेस किंवा इतर ठिकाणचे जुने मित्र-मैत्रिणी भेटतात. एखाद्या सुटीच्या दिवशी मस्त जमण्याचं प्लॅनिंग होतं आणि मग जुन्या आठवणींनी गप्पांचा फड हमखास रंगतो. चॅटिंग, व्हर्च्युअल फार्मिंग, डाटा शेअरिंग आणि इतर अनेक गोष्टींसाठी या सोशल नेटवर्किंगचा उपयोग होतो. पण या साईटस आणि इथलं सगळं विश्व व्हर्च्युअल आहे. प्रत्यक्षात असं काही नाही.

पुण्यामध्ये मात्र, खरंखुरं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक अस्तित्वात आहे. इथं तुम्हाला नवे मित्र मिळतात, जुन्या मित्र-मैत्रिणींची पुनर्भेट होते. वेगवेगळ्या मुद्द्यांवर पुणेकरांचं काय मत आहे, वेगवेगळ्या विषयांना ते कसे रिएक्ट करतात, ते इथं समजतं. पण इथं दररोज लॉगईन होता येत. वर्षभरातून फक्त एकदाच लॉगईन होता येतं. अनंत चतुर्दशीला. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीला. हेच पुण्यातलं प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक.

अनेक जण अनेक वर्षांपासून यामध्ये लॉगईन होताहोत. अनेक मंडळाचे कार्यकर्ते, पुणेकर, गणेशभक्त, पत्रकार, रंगावलीकार, कलाकार, आर्टिस्ट, गावोगावचे ढोलताशावाले, नव्याने उदयास आलेली पुणेरी ढोलताशा पथके आणि राज्यभरातले इतर नागरिक या ऑर्कुट-फेसबुकचे सदस्य आहेत. दरवर्षी तितक्याच उत्साहाने यामध्ये लॉगईन होताहेत. पोलिस आणि प्रशासनाला मात्र, इच्छा नसतानाही याचं सभासद व्हावं लागतं. पुण्याप्रमाणेच, आसपासच्या जिल्ह्यातलेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील, देशाच्या विविध भागातील मंडळी इथं लॉगईन होत आहेत. आता तर परदेशी पाहुण्यांनाही या ऑर्कुट-फेसबुकची भुरळ पडली आहे. गेल्या जवळपास पंधरा ते वीस वर्षांपासून मी या ऑर्कुट-फेसबुकमध्ये लॉगईन होतोय. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत तब्बल २३ तास रस्त्यांवर फिरल्यानंतर मला विसर्जन मिरवणूक ही देखील एकप्रकारचं ऑर्कुट-फेसबुक असल्याचं जाणवलं.



अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी कसबा गणपती लक्ष्मी रस्त्यावर आल्यानंतर रात्री दगडूशेठ गणपती विसर्जित होईपर्यंत तुम्ही याठिकाणी लॉगईन होऊ शकता. गणरायाला निरोप देण्यासाठी लक्ष्मी रस्त्यावर रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या जातात. दरवर्षी वेगवेगळे संदेश देणा-या रांगोळ्या आणि अधिकाधिक रंगावलीकारांची यामध्ये भरच पडत जातेय. रंगावलीप्रमाणेच मानाच्या पाच गणपतींसमोर असणारे देखावे, प्रबोधनकार संदेशांचे फलक, नव्या तालांसह, नव्या वादकांसह आणि नव्या नावांसह मिरवणुकीत सामील होणारी ढोल-ताशा पथके, प्रत्येकाची पेहरावाची आणि वादनाचीही विशिष्ट पद्धत या गोष्टी फक्त इथंच लॉगईन केल्यानंतर पहावयास मिळतात. मग कोणी हौसेनं नथ-नऊवारी नेसून घोड्यावर बसलेली असते, तर एखादा रांगडा गडी खास मराठमोळ्या वेशात जीव तोडून ढोल वाजवत असतो. कोणीतरी भगव्याची शान राखत तो नाचवत असतो, कुणी तलवारबाजीतील मर्दानीपणा दाखवत असतो, कुठे वेत्रचर्माचे आणि लाठ्याकाठ्यांची लढाई सुरु असते, तर काही हौशी बच्चे कंपनी महापुरुषांच्या वेशभूषा करुन इथं वावरत असतात. प्रत्येकासाठी हा एक सणच असतो. नटण्याचा, नाचण्याचा आणि डोळ्यात साठवून ठेवण्याचा.




विसर्जन मिरवणुकीत जर टिळक चौक ते बेलबाग चौक असा फेरफटका मारला तर आपले जुने मित्र आपल्याला नक्कीच भेटतात. कुणी कधीतरी आपल्या शेजारी राहणारा असतो, कोणी शाळेतला किंवा कॉलेजमधला असतो, एखादा आपल्या कामाच्या क्षेत्रातला असतो. कधी कधी तर वर्षभर आपण ज्याला भेटत नाही, असा एखादा नातेवाईकही आपल्याला इथं भेटू शकतो. नुसते जुने मित्र भेटत नाहीत तर हा त्याचा मित्र, ती त्याची मैत्रिण, हा त्यांच्याबरोबर असतो, असं करत करत नव्यानव्या मित्र-मैत्रिणींची यादीच आपल्या फ्रेंड लिस्टमध्ये ऍड होत जाते. त्यापैकी कोणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारायची आणि कोणाची धुडकावून लावायची, हे तुमच्या आणि त्याच्या हातात आहेच की. मला तर माझे अनेक जुने मित्र-मैत्रिणी, ओळखीचे-पाळखीचे या साईटवर भेटतात. अगदी परवाच्या मिरवणुकीतही जवळपास दहा ते पंधरा जुने मित्र-ओळखीचे याठिकाणी भेटले. तुम्हीही इथं नियमितपणे लॉगईन होत असाल तर तुमचाही हाच अनुभव असेल.



या ऑर्कुट-फेसबुकचे दोनच रंग. एक भगवा (सर्वधर्मसमभाववाले याला केशरी म्हणू शकतात) आणि दुसरा गुलाबी. पर्यावरणप्रेमींच्या ध्वनीप्रदूषणामुळे यातला गुलाबी रंग कमी होऊ लागला असला तरी भगव्याचे तेज दिवसेंदिवस वाढत जात आहे. नेटवरच्या ऑर्कुट-फेसबुकवर जशी टीका होते, तो फालतूपणा आहे, टाईमपास आहे, कुचाळक्या करणा-यांचा अड्डा आहे, असे ताशेरे ओढले जातात. तसेच ताशेरे या साईटवरही ओढले जातात. सगळ्याची वाट लावलीय, धंदा झालाय, परंपरेच्या नावाखाली धुडगूस घालतात, ध्वनीप्रदूषण तसेच वायूप्रदूषण आणि गर्दीमुळे जीव नकोसा होतो, अशी कितीही टीका झाली तरी दिवसेंदिवस या साईटची लोकप्रियता वाढतच जाते आहे. शिवाय जे मनापासून इथं एन्जॉय करतात, त्यांच्यावर असल्या टीकेचा फारसा परिणाम होत नाही. तिथं जसे काही आंबटशौकिन मज्जा करायला येतात, तसे इथंही काही असतात. काही मंडळी व्हायरससारखी असतात. पण काय पहायचं आणि व्हायरसला कसं रोखायचं हे आपल्याला माहिती असतं, ते इथल्या बाबतीतही अगदी तंतोतंत लागू पडतं.

काही जण मात्र, हे काय आहे, इथं काय काय चालतं हे प्रत्यक्ष न पाहता उगाचच घरात सोफ्यावर बसून मिरवणूक पाहतात आणि शिव्यांची लाखोली वाहतात. गर्दी दिवसेंदिवस वाढत जातेय, पुणेकरांपेक्षा बाहेरची मंडळी जास्त येतायेत. असं असलं तरी सकाळी किंवा रात्र यापैकी एकदा तरी पुणेकर इथं लॉगईन होतातच. मग त्याला वयाचं बंधन नसतं. अगदी चार वर्षांच्या चिमुरडीपासून सत्तर वर्षांच्या आजोबांपर्यंत सर्वजण इथं रंगतात. मला तर इथं लॉगईन झाल्याशिवाय चैनच पडत नाही. तुम्हीही इथं लॉगईन होऊन पहा, आवडलं तर पुन्हा पुन्हा लॉगईन व्हा्. अन्यथा पुन्हा लॉगईन होऊ नका... पहा हे प्रत्यक्षातलं ऑर्कुट-फेसबुक आवडतंय का ते...

Saturday, September 18, 2010

लालबाग-परळ...



पुण्यातील गणेशोत्सवाचा टिप्पिकल फिल...

वास्तविक पाहता गणपतीच्या काळात दहा दिवस राहणं, हे माझ्यासारख्याला खूप अवघड आहे. अगदी लहानपणीच्या उत्साहापासून ते अगदी अलिकडे रिपोर्टिंगच्या निमित्ताने प्रत्येक वर्षी पुण्यातील जवळपास सर्व प्रमुख मंडळ पायी हिंडून पाहणं, हा माझ्यासह आमच्या काही मंडळींचा आवडता छंद. मग रोज एखाद्या भागामधील गणपती पहायचे. रोज नव्या मित्रांबरोबर गणपती बघायला जायचं (मैत्रिणींबरोबर गणपती पहायला जाण्याचं भाग्य माझ्या नशीबात नव्हतं) हे अगदी ठरलेलं. कधी कॉलेजमधील मित्र, कधी घराजवळ राहणारे, कधी जुने शाळेतले मित्र, कधी घरच्यांबरोबर अथवा बाहेरगावाहून आलेल्या नातेवाईकांबरोबर. पण नित्यनियमानं आणि नव्या उत्साहानं रात्री लवकर बाहेर पडणं हे ठरलेलं.

ई टीव्ही साठी हैदराबादला बदली झाल्यानंतर मग त्यामध्ये खंड पडत गेला. तरीही एक वर्षाआड सुटी घेऊन पुण्याचा गणपती एन्जॉय केलाय. अगदी दहा दिवस नाही मिळाले तर किमान विसर्जन मिरवणुकीला तरी रात्र जागवायची हे ठरलेलं. गणेशोत्सवात पदोपदी जाणवणारी उर्जा, उत्साह आणि उदंड भक्ती यांच्या जोरावर पुढचं वर्ष आपोआप निघून जातं. साम मराठी आणि आता सामनासाठी मुंबईत आल्यानंतर गणेशोत्सवाचा हा जल्लोष मी खूप मिस करत होतो. रोजच्या दबडघ्यातून श्वास घ्यायला उसंत मिळत नाही, तिथं इतका प्रवास करुन मुंबईचा गणेशोत्सव एन्जॉय करायला जायचं कसं आणि कधी हा प्रश्न अनुत्तरीत होता. सामनामुळं आज ही संधी मिळाली. धन्यवाद सामना आणि माझा सहकारी मंगेश वरवडेकर. तसं पहायला गेलं तर लाईनीत वीस-वीस पंचवीस-पंचवीस तास उभा राहून एखाद्या देवाचं दर्शन घेण्याइतका मी देवभक्त नाही. त्याचप्रमाणे वीस-पंचवीस तास रांगेमध्ये उभं राहणा-या लोकांच्या भक्तीचा अपमान करुन मध्येच घुसत नेहमी नेहमी दर्शन घेणंही मला पटत नाही. त्यामुळं लोकप्रिय आणि गर्दी खेचणा-या देवांना जाणं टाळतो. पुण्यात सुद्धा मी विसर्जनाच्या दिवशी पहाटे जाऊन मानाचे पाच गणपती, भाऊ रंगारी, श्रीमंत दगडूशेठ हलवाई, मंडई आणि जिलब्या मारुती या मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेतो. रांगेमध्ये न थांबता. (कारण तेव्हा रांग नसतेच)




ह्याच कारणामुळे मी इतकी वर्षे लालबागचा राजा आणि प्रभादेवीचा सिद्धीविनायकाच्या दर्शनाला गेलेलो नाही. यंदा मात्र, राजाचा योग जुळून आला. अमर पटवर्धन नावाच्या पनवेलमधल्या एका मित्राच्या आग्रहाखातर आणि मंगेश वरवडेकर या कामगार नगरच्या राजाच्या कृपेमुळे मी लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकू शकलो. लोक नवस बोलतात, ते फेडण्यासाठी वीस वीस तास रांगेत थांबतात, हे सारंच माझ्या बुद्धीच्या पलिकडचं होतं. इतके दिवस वाटायचं मूर्ख आहेत साले फुकटचा वेळ वाया घालवतात. पण लालबागच्या राजाच्या चरणी माथा टेकल्यानंतर ही मंडळी इतका वेळ रांगेमध्ये का थांबतात आणि कशामुळे थांबू शकतात हे कोडं उलगडलं. कोणत्याही गणपतीच्या पुढ्यात उभं राहिलं की जी प्रसन्नता मिळते ती इथंही मिळते. राजा जणू काही आपल्यालाकडेच पाहतो आहे आणि आशीर्वाद देतो आहे, असं वाटतं. एखाद-दोन मिनिटांचा खेळ असतो. (रांगेतून गेलात तर काही सेकंदांचाच) पण हा एखाद दोन मिनिटांचा कालावधी वर्षभराचा क्षीण क्षणार्धात घालवून टाकतो. ऐसे तुम मोह को अती भावे... असं का म्हणतात ते तेव्हाच आपल्याला कळतं. अगदी सहजपणे राजाचं दर्शन झालं आणि कृतकृत्य झालो. दरवर्षी जाणं होईल की नाही माहिती नाही. दरवर्षी असं ओळखीतून दर्शन घेणं आवडेल असंही नाही. पण एका वर्षाची प्रत्यक्ष भेट आणखी काही वर्षांसाठी तरी पुरेशी असावी, हे मात्र नक्की.

लालबागच्या राजानंतर आम्ही दर्शन घेतलं गणेश गल्ली मित्र मंडळाचं. गणेश गल्ली म्हणजे उंच मूर्ती तयार करणारं मुंबईतील सर्वात पहिलं मंडळ. आजही या मंडळाची मूर्ती २५ की २७ फुटी असते. दरवर्षी कशावर तरी विराजमान झालेली गणरायांची मूर्ती हे मंडळ साकारतं. यंदाचं मंडळाचं ८३ वं वर्ष असून त्यांनी मूषकराज गणेश साकारला आहे. खरं तर पूर्वी गणेश गल्लीचा गणपती हाच सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू होता. त्यालाच जास्त गर्दी व्हायची. पण नंतर हळूहळू राजाचं प्रस्थ वाढत गेलं आणि सगळी गर्दी राजानं खेचली. गणेश गल्लीच्या गणपतीचं नाव खरं तर लालबाग सार्वजनिक मित्र मंडळ आणि लालबागच्या राजाचं पूर्वीचं नाव सार्वजनिक गणेशोत्सव, लालबाग. पण कालांतरानं मंडळानं नावाचं रजिस्ट्रेशनचं लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असं करुन घेतलं आहे. (आता पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मंडळाचं खरं नाव सुवर्णयुग तरुण मंडळ. पण हे फारसं कोणाला माहिती नाही. त्यातलाच हा प्रकार) त्यामुळं आवर्जून गणेश गल्लीच्या गणपतीचंही दर्शन घेतलं. सॉल्लिड मूर्ती एकदम. वादच नाही.



परळ आणि लालबाग हा मुंबईच्या गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू. पूर्वी लोकप्रियतेच्या शिखरावर असलेला गणेश गल्लीचा गणपती आणि आता लालबागचा राजा हे दोन्ही एकाच परिसरात असल्यामुळे इथल्या उत्सवाचं वातावरण पुण्यातील दगडूशेठ गणपती आणि सभोवतालच्या परिसराची आठवण करुन देणारं. आपण पुण्याचे गणपतीच पाहतो आहोत की काय, असं वाटावं इतकं वातावरण सारखं. पहावं तिकडं गणपती, बाहेर लांबच्या लांब रांगा, प्रचंड गर्दी आणि गणपतीपेक्षा खाण्याच्या गाड्यांवर तुफान गर्दी... टिप्पिकल पुण्यासारखंच. लालबागच्या राजाच्या निमित्तानं हे सारं अनुभवता आलं ही राजाच्या दर्शनाबरोबर मिळालेली फ्री गिफ्ट. खरं तर राजाचं दर्शन मिळालं ही गिफ्टच मोठी आहे. त्यामुळं त्यावर काही फ्री मिळतंय की नाही, याचा विचार करण्याची इतरांना गरज वाटणार नाही. पण मला मात्र, राजाच्या दर्शनाबरोबरच परिसरात अनुभवलेला गणेशोत्सवाचा तो टिप्पिकल फिलही तितकाच नसला तरी खूप महत्त्वाचा आहे.

Friday, September 10, 2010

गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया..

दर्शनमात्रे मन कामनापूर्ती...



१४ विद्या आणि ६४ कलांचा स्वामी, तमाम महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या गणरायाचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपला मुलगा परदेशातून किंवा परगावातून परत घरी येणार असेल किंवा एखादी माहेरवाशीण आपल्या घरी येणार असेल तर तिची वाट आपण जितक्या आतुरतेने पाहत असतो तितक्याच आतुरतेने आपण गणरायाची वाट पाहत असतो. दहा दिवस किंवा तो घरी असेपर्यंत आपल्याकडे कोणतरी घरचं खूप दिवसांनी आल्यासारखं वाटतं. त्यामुळंच गणरायाचं विसर्जन झाल्यानंतर चुकल्या चुकल्यासारखं वाटतं. तर आता पुढचे दहा दिवस बाप्पाचे आहेत. फक्त बाप्पाचे. तेव्हा मोठ्या दणक्यात, उत्साहात, जल्लोषात आणि सारी दुःख विसरुन बाप्पाचा उत्सव साजरा करुया...

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया...