Thursday, July 14, 2011

दळभद्री नालायकांनो



भारतात काय स्पिरीटचा कारखाना आहे...

नेमेचि येतो मग पावसाळा या धर्तीवर आता भारतामध्ये नेमेचि होतात मग बॉम्बस्फोट अशी पद्धत सुरु झाली आहे. भारतात कुठे ना कुठे तरी बॉम्बस्फोट होतात. मग कधी जयपूर, कधी वाराणसी, कधी पुणे, कधी दिल्ली, कधी सुरत, कधी बेंगळुरू, कधी अहमदाबाद, कधी गुवाहाटी आणि नेहमी मुंबई.

बॉम्बस्फोट होतात, मग नेहमीप्रमाणे एनआयएचे पथक स्फोटाला भेट देते. सर्व पुरावे गोळा करते, मग गृहमंत्री येतात. कधी पॅण्ट सांभाळतात कधी लुंगी सांभाळणारे असतात. तो येऊन लोकांना उगाच अक्कल शिकवतात. उगाचच बाहेर पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका, एकी बाळगा, सदैव जागरुक रहा इइ. फक्त गृहमंत्री येत नाहीत, विरोधी पक्षनेत्यांची भेट होते, मूड असेल तर पंतप्रधानही येऊन जातात. यूपीए अध्यक्ष सोनिया गांधीही येण्याची शक्यता असते. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यांचे नेते यांच्याही भेटी होतात. मिडीयाला बाईट देऊन तेही टीव्हीवर झळकतात. विरोधी पक्ष सरकारवर टीका करतात. सरकार म्हणतं विरोधी पक्षांनी स्फोटांचं राजकारण करु नये. हे नेहमीचंच झालं आहे.

लोकांना उगाचच अक्कल शिकवून मग काथ्याकूट होतो ते हा स्फोट कोणी घडवून आणला त्यावर. कोणी म्हणतं लष्करै तैय्यबा, कोण म्हणतं अल कायदा. सध्या इंडियन मुजाहिदीनचा जोर आहे. मग त्यासाठी आरडीएक्स वापरलं की अमोनियम नायट्रेट वापरलं याच्यावर चर्चा झडतात. मग बसस्टॉपला टार्गेट का केलं, रेल्वेला टार्गेट का केलं, यावर टीव्ही चॅनेल्सवर वादसंवाद रंगतो. जुन्या स्फोटांच्या तारखा आणि घडलेल्या घटना यांच्या आठवणी या निमित्ताने निघतात. सरकार आणि पोलीस काय करतात, यावर चर्चा रंगते. सरकारने काय करायला पाहिजे, याबद्दल तज्ज्ञ त्यांची त्यांची मतं मांडतात. कोणी पोलिसांच्या नावानं बोटं मोडतात, कोणी इंटेलिजन्सच्या नावानं खडे फोडतं. इंटरनेट, ट्वीटर, फेसबुक यांच्यावर देशप्रेमाचा उमाळा येतो.

अफझल गुरुच्या फाशीचा मुद्दा पुन्हा चर्चेत येतो, कसाब कसा बिर्याणी झोडतोय, यावर टीका होते. मग बाहेरुन येणाऱ्या लोंढ्यांचे काय हा मुद्दा चर्चेत येतो. सारीच वांझोटी चर्चा. आपण फक्त वांझोट्या चर्चाच करतो. सरकारला सामान्य माणसाचं काहीच देणंघेणं नाही. राजकीय पक्षांनाही काही पडलेली नाही. ऐसे हादसे होतेही रहते हे, असं राज्याचा गृहमंत्री म्हणतो. तर काँग्रेसचा युवराज म्हणतो हल्ले होतच राहणार. बोला आता तुम्ही आम्ही करणार काय. म्हणूनच सामान्य माणूस फेसबुर ट्वीटर रिअॅक्ट होत राहतो, टीव्हीवर चर्चा करत राहतो. त्यातून काहीही साध्य होत नाही. पण हे सोपस्कार पडत राहतात.

स्फोट झाल्याच्या दुसऱ्या दिवशी लोक कसे कामावर आले, शाळा कशा नेहमीप्रमाणे भरल्या, कॉलेज कट्टे कसे फुलून गेले, लोकल कशा भरभरून वाहताहेत, अशी दृष्य आणि बातम्या दाखवून न्यूज चॅनेल्स मुंबईच्या स्पिरीटची चर्चा करतात. अहो, कसलं स्पिरीट प्रत्येकाला उद्याची चिंता आहे. उद्या कामावर नाही गेलो तर एक दिवसाचा पगार कापला जाणार, शाळेत-कॉलेजात नाही गेलो आणि मार्क कमी पडले तर उद्या अॅडमिशन कोण देणार, या विवंचनेत तो घराबाहेर करतो. त्यामुळं हे काही स्पिरीट फिरीट नाही. ही हतबलता आहे. अहो, मुंबईच नाही तर इतर सर्व शहरे दुसऱ्या दिवशी नेहमीच्या व्यवहारांमध्ये गुंतून जातात. कारण त्यांना जगायचं आहे. मुंबईत आणि शहरांमध्ये काय स्पिरीटचा कारखाना आहे, सारखं स्पिरीट स्पिरीट करायला. ही हतबलता आहे, दुसरा पर्यायच नाही. त्याला काय करणार. खरं, तर हे स्पिरीट स्पिरीट करणाऱ्यांवरच या स्पिरीटचा उपयोग केला पाहिजे.

वाढलेल्या महागाईत रुपया रुपया कमाविण्यासाठी रोज मरावं लागतं. सामान्य माणूस रोजच मरतोय. या एसीमध्ये बसलेल्या राजकारण्यांना त्याचा काय पत्ता. त्यांचा काय समजणार हे. रोज मरणं आणि एकदाचं कायमचं मरणं, यातला फरकही आता मिटून चालला आहे. नालायक राजकारणी आणि निर्लज्ज यंत्रणा असलेल्या भारतात जन्माला आलो ते मरण्यासाठीच. त्यामुळे सामान्य माणसाला मरणाची भीती नाहीये. तो घरातून बाहेर पडतो तेच मरण्यासाठी.

असो. आता ११-७ झाले. २६-११ झाले. १३-२ झाले. काल १३-७ झाले. आता पुन्हा कोठे आणि कधी स्फोट होणार याची वाट पाहत बसण्यापेक्षा आणि त्यात आपण आणि आपले जवळचे नसावेत, यासाठी देवाचा धावा करत बसण्यापलिकडे सामान्यांच्या हातात काहीही नाही. कारण आपण सर्वसामान्य आहोत. अतिरेक्यांसाठी सॉफ्ट टार्गेट आहोत. निलाजऱ्या राजकारण्यांसाठी मतांची पेटी आहोत. महागाईच्या भस्मासुराचे भक्ष्य आहोत. नक्षलवद्यांचे लक्ष्य आहोत. कारण आपण सर्वसामान्य आहोत.


भारतासारख्या लोकशाहीप्रधान देशात सर्वसामान्य माणसाचे हे हाल, हे मजबूत लोकशाहीचेच 'लक्षण' आहे. एकीकडे आपण लोकशाहीचे गोडवे गायचे आणि दुसरीकडे हीच लोकशाही सर्वसामान्य माणसाचा गळा घोटणार.


जय हिंद, जय लोकशाही...

Sunday, July 10, 2011

उतू नका, मातू नका...

हवा डोक्यात जाऊ देऊ नका...

टीपटॉप नगर होतं. तिथं एक क्लब होता. टॉपफन क्लब असं त्याचं नाव. लोक संध्याकाळी यायचे, कुणी टेनिस खेळायचे, कुणी जिममध्ये जायचे, कुणी स्विमिंगचा आनंद लुटायचे, तर काही जण रिफ्रेशमेंटमध्ये जाऊन पोटपूजा करायचे. महिलांच्या किटी पार्टीजना तर मर्यादाच नव्हती. रोज दे धम्माल सुरु असायची. मस्त चाललंय आमचं, असं म्हणत क्लबची जोरात घोडदौड सुरु होती. आपण पण या क्लबचे मेंबर व्हावं, अशी इच्छा त्या नगरीतल्या प्रत्येक माणसाला असायची. कधी एकदा मी त्या क्लबचा मेंबर होतोय आणि एन्जॉय करतोय, असं त्याला व्हायचं. त्यासाठीच त्यांची सारी धडपड सुरु असायची. इतकी प्रतिष्ठा त्या क्लबला प्राप्त झाली होती.

नगरीतील बडीबडी मंडळी त्या क्लबचे मेंबर होते. कोणाला क्लबचं मेंबर करुन घ्यायचं आणि कोणाला मेंबरशिप द्यायची नाही, हे सगळं त्या क्लबच्या पदाधिकाऱ्यांवर अवलंबून होतं. अनेकदा पदाधिकारी लोकांना इतक्या वाईट पद्धतीनं झिडकारायचे की विचारता सोय नाही. इतकी त्या क्लबची चलती होती. चलती कसली दबदबा किंवा दराराच होता, असं म्हणा ना. अर्थात, फक्त पैसा पाहूनच त्या क्लबची मेंबरशिप मिळायची नाही. मेंबरशिप फी लाखो रुपये असायची पण फक्त पैसा असला की मेंबरशिप मिळाली असं नव्हतं. अभ्यासू, हुशार आणि विविध क्षेत्रात चमकलेल्या मंडळींना या क्लबचं मानद सदस्य करुन घेतलं जायचं. पण ती संख्या खूपच लिमिटेड होती. क्लबचे काही नियम तर भन्नाट होते. तुम्हाला क्लबची मेंबरशिप सोडायची असेल तर कारण सांगावं लागायचं. ते कारण संचालक मंडळाला पटलं तरच तुम्हाला क्लब सोडता यायचा. जर कारण पटलं नाही तर पन्नास हजार रुपयांचा दंड भरावा लागायचा. अन्यथा क्लबची मेंबरशिप सोडता यायची नाही.

क्लबची वाढती लोकप्रियता आणि लक्ष्मीची प्रसन्नता असल्यामुळे पदाधिकाऱ्यांना क्लबचा इतर शहरांमध्ये ब्रांचेस काढायच्या होत्या. इतकंच नाही तर हिल स्टेशन आणि टुरिस्ट स्पॉट्सवर रिसॉर्ट्स काढण्याचाही बेत होता. त्यादृष्टीनं त्यांची तयारी सुरु होती. तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन घेणं सुरु होतं. कशा पद्धतीनं वाटचाल करायची याबाबत मिटिंग्ज सुरु होत्या. अशा पद्धतीनं रिसॉर्ट्स आणि हॉलिडे होम चालविणाऱ्या मंडळींनी हे कसं सुरु केलं, त्याचं अवलोकन करणंही जोरात सुरु होतं. असंच काहीसं वेगळं करण्याची क्लबची इच्छा होती. सगळं जग पाहतच राहिल, असं जगातलं एक नंबरचं काहीतरी करण्याचा त्यांचा इरादा होता. शिवाय सगळी परिस्थिती त्यांच्या बाजून होती.

सगळं काही छान सुरु असताना नेमकं क्लबच्या मागं वेगळंच बालंट आलं. क्लबच्या स्विमिंग पुलामध्ये बुडून एकाचा मृत्यू झाला. वास्तविक पाहता जीवरक्षक वगैरे मंडळी होतीच. पण घडायचं ते घडून गेलं. काही दिवस क्लबमध्ये वातावरण सुन्न होतं. लोक पूर्वीसारखे यायचे नाही आणि आले तरी ते पूर्वीसारखे एन्जॉय करायचे नाहीत. स्विमिंग पुलावर तर कोणी फिरकेनासंच झालं. त्याची तर रयाच निघून गेली. क्लबच्या पदाधिकाऱ्यांना वाटलं, की थोड्या दिवसांनी लोक ही घटना विसरुन जातील आणि सगळं स्थिरस्थावर होईल. पण कसलं काय आणि कसलं काय. ज्यांना क्लबची मेंबरशिप मिळाली नव्हती, त्या चिडलेल्या लोकांनी अफवा पसरविण्यास सुरुवात केली, की स्विमिंग पुलामध्ये मरण पावलेल्या तरुणाचा आत्मा क्लबमध्ये अधूनमधून हिंडत असतो. त्याला बऱ्याच लोकांनी पाहिलंय, तो कधीकधी समोर असतो आणि पटकन गायब होतो इइ.

आता नगरी टिपटॉप असली तरीही काही लोक अंधश्रद्ध असतातंच ना. मग इतर लोकांनी त्याला तेल तिखट मीठ लावून अफवा पसरवायला सुरुवात केली. क्लबची मेंबरशिप घेतली तर घरात आक्रीत घडतं. काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीनं मेंबरशिप घेतली आणि दहा दिवसांमध्ये त्याची आई गेली. एकाने मेंबरशिप घेतली आणि त्याची नोकरी गेली. अशा अफवांना ऊत आला. त्याचा परिणाम असा, की लोकांनी त्या क्लबची मेंबरशिप सोडायला सुरुवात केली. लोकं वार्षिक मेंबरशिप रिन्यू करेनासे झाले. जे लाईफ मेंबर होते ते क्लबकडे फिरकेनासे झाले. त्यांनी आपल्या एन्जॉयमेंटसाठी नगरीतील इतर क्लबचा आसरा घेतला. अर्थात, सुरुवातीला नगरीतील इतर क्लब फारसे चांगले नव्हते. पण मेंबरशिप वाढल्यानंतर त्या क्लबचं स्टेटसही वाढलं.

एकीकडे नगरीतल्या इतर क्लबचं स्टेटस वाढत असताना टॉपफन क्लबचं मात्र दिवाळं निघण्याची वेळ आली होती. आर्थिक क्षेत्रात तर दाणादाणच उडाली होती. दुसरीकडे ग्राहक आणि मेंबर्सची संख्या कमालीनं कमी होत होती. तिसरीकडे दोन-दोन महिने पगार मिळत नसल्यामुळं कर्मचारीही राजीनामा देऊन दुसरा जॉब जॉईन करु लागले होते. त्यामुळे टॉपफन क्लबची अवस्था केविलवाणी झाली होती. संचालक मंडळाला तर काय करावं, हेच सुचेनासं झालं होतं. अशा परिस्थितीत एका संचालकाच्या डोक्यातून एक अफलातून कल्पना आली. त्यानं दुसऱ्याच दिवशी पेपरमध्ये अॅड दिली. पाच जणांना मेंबर करा आणि मेंबरशिप फुकट मिळवा. पूर्वी नाही का, पत्रक वाटली जायची. ही शंभर पत्रक छापून वाटा म्हणजे तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, लग्न ठरेल, पगार वाढेल, घर घ्याल. नाही वाटली तर कोण तरी जाईल, नोकरीवर गदा येईल आणि दुःखद घटनांचा भडिमार होईल. पूर्वी अशी पत्रकं वाटली जायची. आता असे ईमेल आणि एसएमएस येतात. काही मल्टिनॅशनल कंपन्याही अशाच पद्धतीनं मार्केटिंग करुन बकरे मिळवतात.

आता टॉपफन क्लबवरही मेंबर, कर्मचारी आणि व्यवसाय मिळविण्यासाठी ही वेळ आली होती. पाच मेंबर करा आणि मेंबरशिप मोफत मिळवा, वीस मेंबर करा आणि लाईफटाईम मेंबरशिप फ्री घ्या अशा योजना सुरु करण्याची वेळ क्लबवर आली होती. कुठे मेंबरशिप सोडताना पन्नास हजार रुपयांचा दंड द्यायचा आणि चेनमार्केटिंगसारखी योजना जाहीर करायची. क्लबची सगळीच वाट लागली होती. अशी योजना सुरु केल्यामुळे क्लबमध्ये क्लास येण्याऐवजी सगळी तळागाळातील मंडळी येऊ लागली. क्लबचा दर्जा हरवला. हुशार, श्रीमंत, प्रतिष्ठीत, अभ्यासू, नामवंत मंडळी इतर क्लबकडे जाऊ लागली आणि ज्यांना दुसरीकडे कुठेच मेंबरशिप मिळत नाही, ती मंडळी टॉपफन क्लबचे मेंबर होऊ लागली. कारण पाच बकरे मिळविणं हे लाखो रुपये भरण्यापेक्षा खूप सोप्प होतं.

क्लबच्या कामगारांनाही अशाच पद्धतीनं जुंपलं गेलं होतं. वर्षभरात पाच मेंबर करणं त्यांना कम्पल्सरी केलं होतं. पाच मेंबर केले नाहीत तर त्यांना पगारवाढ मिळायची नाही. पगारवाढच नाही तर त्यांचं प्रमोशनही त्यावरच अवलंबून असायचं. मेंबर करा आणि प्रमोशन घ्या, पगारवाढ घ्या. कामगाराची कुवत काय आहे, त्याचं शिक्षण काय आहे, त्याचा अनुभव काय आहे, याचा काहीही संबंध उरला नव्हता. त्यामुळं हुशार आणि सचोटीनं काम करणारी मंडळी मागं पडली आणि बाजारबुणगे कर्मचारी पुढं जाऊ लागले. वर्षानुवर्षे काम करणाऱ्या सज्जन आणि प्रामाणिकपणे काम करणारे कामगार असल्या कमअस्सल मंडळींच्या हाताखाली झटू लागले.

क्लबचे मेंबर आणि कामगार हे सुसंस्कृत नसल्यामुळे महिला आणि कुटुंबांचं क्लबमध्ये येणं थांबलंच होतं. देशी दारुचे अड्डे असतात तसं स्वरुप क्लबला आलं होतं. जिम, स्विमिंगपूल, टेनिस कोर्ट ओस पडलं होतं आणि क्लबमध्य़े नव्यानंच सुरु करण्यात आलेला बार जोरात सुरु होता. सकाळी आठ वाजल्यापासून रात्री दोन वाजेपर्यंत हाऊसफुल्ल. बरं, परदेशी मद्यापासून ते वाईनपर्यंत उंची मद्य घेणारी मंडळी कमी आणि संत्रीमोसंबी घेणारी मंडळी जास्त असा प्रकार सुरु झाला होता. क्लबची सगळीच वाट लागली होती आणि टॉपफन क्लब दारुड्या बेवड्यांचा अड्डा बनला होता. क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी ही परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. पण काहीच होत नाही म्हटल्यानंतर त्यांनीही क्लबचे राजीनामे देऊन दुसरीकडे जाणे पसंत केले. काही जण दुसऱ्या क्लबमध्ये जॉईन झाले तर काहींनी स्वतःचा बिझनेस सुरु केला. ज्यांना दुसरीकडे काहीच मिळालं नाही ती मंडळी नाईलाजानं टॉपफन क्लबमध्येच राहिले. अर्थात, टॉपफनमधील फन कधीच संपली होती आणि सगळा बाजारबुणग्यांचा खेळ उरला होता.

टिपटॉप नगरीतील मंडळींनीही टॉपफन क्लबकडे पाठ फिरविली होती आणि हा क्लब नगरीतल्या भणंग, दारुबाज आणि भुरट्या मंडळींचा अड्डा बनला होता. उतू नये, मातू नये, कोणावरही अशी वेळ ओढवू नये, असं म्हणत गावकरी नाराजी व्यक्त करत होते.

साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Saturday, July 02, 2011

ती आणि मी...

झालं संपलं सगळं. गेल्या पाच-सहा महिन्यांपासूनचा ऋणानुबंध संपुष्टात आला. तसं पहायला गेलं तर गेल्या आठ-दहा महिन्यांपूर्वीच आमचा स्नेह जुळला होता. दोघांनाही एकमेकांची इतकी सवय झाली होती, की विचारता सोय नाही. दोघांनाही एकमेकांवाचून करमायचं नाही. दोघांनी कधीच एकमेकांना एकटं सोडलं नव्हतं. मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांपासून ते ऑफिसातील सहकाऱ्यांपर्यंत सगळेच तिची आपुलकीनं विचारपूस करायचे. काय, कधीपासून, कशामुळे अशी बित्तंबात काढून घ्यायचे. अगदी सामनात असल्यापासून ती माझ्या बरोबर होती. पण महाराष्ट्र टाइम्समध्ये आल्यानंतर मला तिला कायमचं दूर करावंच लागलं.

अहो, भलतासलता विचार मनात आणू नका. मी बोलतोय ते माझ्या हनवटीखाली आलेल्या एका गाठीबद्दल. सामना वृत्तपत्रात असताना शेवटच्या काही दिवसांमध्ये मला त्या गाठीचं अस्तित्त्व जाणवत होतं. सुरुवातीला वाटलं, की वजन वाढल्यामुळं हनवटीखाली हनवटी (डबल चीन) आली की काय. त्यामुळं सुरुवातीला त्याकडं दुर्लक्ष झालं. पण नंतर हळूहळू ती गाठ असल्याचं स्पष्ट होत गेलं. मग ऑपरेशन करुन ती गाठ काढेपर्यंत जवळपास रोज मला त्या गाठीबद्दलचं एक्सप्लेनेशन कोणाला ना कोणाला तरी द्यावं लागायचं. पण दोन आठवड्यापूर्वी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन केल्यामुळं सगळेच प्रश्न निकाली निघाले. शिवाय, तुमच्या गाठीचा प्रश्न कायमचा सुटला आहे आणि आता पुन्हा तसं काही होणार नाही, असं आश्वासन डॉक्टर धनंजय केळकर यांनी दिल्यामुळे खरोखरच हा प्रश्न कायमचाच निकाली निघाला आहे.

वास्तविक पाहता त्या गाठीचा मला तसा काही त्रास नव्हता. सर्व तपासण्या आणि चाचण्या झाल्या होत्या. त्यामध्ये काहीही गंभीर नसल्याचे रिपोर्ट होते. पाण्यामुळं किंवा कुठल्या तरी लिक्विडमुळं (फ्लुईड) गाठ झाली असावी, असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. शिवाय ती गाठ बाहेरून आलेली होती. तेव्हा खाता-पिताना किंवा बोलतानाही काहीही त्रास व्हायचा नाही. तिला हात लावला तरीही दुखायचं नाही. गाठीचा मला काहीच त्रास नव्हता. फक्त दिसायला खराब दिसायचं आणि दाढी करताना थोडा त्रास व्हायचा. कारण रेझर मारताना अधिक काळजी घ्यावी लागत होती. इतकंच. दाढी करताना त्रास व्हायचा म्हणून कित्येक आठवडे दाढीही करायचो नाही. मग दाढी का केली नाही, याचं स्पष्टीकरण ओघानं आलंच. पण हे समजण्यासारखं आहे. (तसाही नियमित दाढी करण्याचा मला कंटाळाच आहे. दाढी ही काय रोज करण्याची गोष्ट आहे, असं मला अजिबात वाटत नाही.)

पण त्या गाठीमुळं मला लोकांनी जो त्रास दिलाय ना, तो जास्त तापदायक होता. अर्थात, बरीच जवळची मंडळी आपुलकीनं चौकशी करायची, हे समजू शकतो. पण ज्यांच्याशी साधी तोंड ओळखही नाही ते उगाच फालतू चौकशा करुन डोक्यात जायचे.
गाठ कशी आली, कधी आली, आयुर्वेदीक उपचार करा, हे औषध घ्या, ते औषध घ्या, ह्या डॉक्टरला भेटा, त्या बाबाला भेटा, ऑपरेशन हा काही उपाय नाही किंवा तोच एकमेव उपाय आहे, असं समजू नका इइ एक ना दोन शंभर फुकटचे सल्ले मंडळी द्यायची. त्यातील काही खवट पुणेकर तर काय कॅन्सर बिन्सर नाही ना, असं विचारून खात्री करून घ्यायचे. पहा, नीट चेक करुन घ्या. हल्ली कोणाला काय होईल, सांगता येत नाही, असं सांगून उगाच भीती निर्माण करायचे. त्यामुळं गाठ चालेल पण प्रश्न आवर, अशी परिस्थिती झाली होती.

सामनामधील मित्र राजेश शेलार यानं अगदी सुरुवातीलाच सांगितलं होतं, की ती गाठ आहे. ऑपरेशन केल्याशिवाय ती जाणार नाही. वेळीच डॉक्टरकडून तपासण्या करून घ्या आणि ऑपरेशन करून टाका. पण मुंबईत वेळही नव्हता आणि मुंबईत ऑपरेशन करणं शक्यही नव्हतं. त्यामुळं तेव्हापासून ते पुढं ढकललं गेलं. पण पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर दीनानाथला जाऊन तपासण्या केल्या आणि ऑपरेशनचा निर्णय पक्का झाला. पण काही ना काही अडचणी येतच होत्या. त्यामुळं ते पुढं ढकलावं लागत होतं. अर्थात, काही सिरीयस नाही, असं सांगितल्यामुळं मी पण थोडा रिलॅक्स होतो. पण मैत्री किंवा नातं नसलेली मंडळी उगाचच घाबरवून सोडायची. (आता मी गाठीला घाबरलो नाही, तर त्यांना काय घाबरणार, हा भाग अलहिदा.)

दोन आठवड्यांपूर्वी ऑपरेशन झालं आणि गाठ काढून टाकली. जवळपास सहा सेंटीमीटर बाय चार सेंटीमीटर बाय चार सेंटीमीटर अशा आकाराची ती गाठ होती. जी इतके दिवस माझ्या शरीरात होती तिला पहायचं भाग्य मला मिळालं नाही. मला शुद्ध येण्यापूर्वीच डॉक्टरांनी अधिक तपासण्यांसाठी तिला धाडलं होतं. पण रिपोर्ट पाहिल्यानंतर आणि डॉक्टरांनी सांगितल्यानंतर साधारण अंदाज आला. एक आठवडा जखमेवर स्टेप्लरच्या पिना मारल्या होत्या. हल्ली टाके असेच असतात असं म्हणतात. ते काढल्यानंतरही हनवटीखाली थोडा जडपणा जाणवत होता. पण आता जवळपास पूर्ण रिकव्हर झाल्यासारखं वाटत आहे. कारण ती आयुष्यातून निघून गेल्यामुळं निर्माण झालेली ‘पोकळी’ आता पूर्णपणे ‘भरुन’ आली आहे.