Sunday, February 17, 2008

पत्र्या मारुतीजवळ मिळेल...

पॅटिस आणि वाटाण्याचा अस्सल रगडा

"रगडा पॅटिस'. हा पदार्थ मला पाणीपुरी इतकाच आणि भेळपेक्षा जास्त आवडतो. अगदी लहानपणी सारसबागेत असलेल्या विविध भेळेच्या स्टॉलवर गेल्यानंतर भेळ की रगडा पॅटिस असा प्रश्‍न विचारल्यानंतर माझं हमखास उत्तर असायचं रगडा पॅटिस!
थोडक्‍यात काय मला रगडा पॅटिस अगदी मनापासून आवडते. त्यामुळे पुण्यात विविध ठिकाणी कोठे काय चांगले मिळते, याचा शोध घेत असताना मला रगडा पॅटिस मिळण्याचे एक अप्रतिम ठिकाण सापडले. पत्र्या मारुतीजवळ उभ्या असलेल्या एका भेळेच्या गाडीवर भेळेपेक्षाही रगडा पॅटिसच अधिक चविष्ट असते.
गेल्या अनेक वर्षांपासून अगदी नेमकेपणानं सांगायचं झालं तर दहा वर्षांपासून आम्ही पत्र्या मारुतीजवळ असलेल्या त्या भेळेच्या गाडीवर नित्यनियमाने भेट देत आहोत. रमणबागेच्या चौकातून लक्ष्मी रस्त्याकडे जायला लागलो की, पहिल्याच चौकात (पत्र्या मारुतीच्या) तीन-चार गाड्या उभ्या असतात. त्यात सुरवातील भेळेच्या दोन गाड्या, नंतर कच्छी दाबेलीची एक गाडी आणि सर्वात शेवटी नीरा व सरबतांचा एक स्टॉल आहे.
भेळेची पहिली गाडी सोडून द्या. सोडून द्या म्हणजे तिकडे फक्त भेळच चांगली मिळते. पण दुसरी गाडी मात्र, एकदम अष्टपैलू आहे. भेळ, रगडा पॅटिस, रगडा पुरी, एसबीडीपी आणि अगदी पाणीपुरीही लय भारी!साधारण साठीच्या आसपास असलेले वडील आणि त्यांची दोन अफलातून मुलं गाडीवर असतात. पण वैशिष्ट्य असं की, गाडीवर कोणीही असलं तरी चवीमध्ये फारसा फरक पडत नाही. इतर गाड्यांवर मिळतात ते सर्व पदार्थ मिळत असले तरी तुम्ही आवर्जून रगडा पॅटिस टेस्ट करा. आम्ही इतके वर्ष "टेस्ट' करतो आहोत म्हणूनच सांगतोय.
अनेक ठिकाणी रगडा पॅटिसमध्ये जो बटाटा किंवा वाटाणे असतात ते पूर्णपणे शिजलेले नसतात. त्यामुळे ते चावताना त्रास होतो. तसेच गोड नाही पण तिखट पाण्याची चवही रगडा पॅटिसमध्ये महत्वाची असते. रगड्याची ही भट्टी या गाडीवर अगदी जबरदस्तपणे जमलेली आहे. रगडा आणि पॅटिस हे पूर्णतः शिजलेले असल्यामुळे दोन्ही वाटाणे आणि पॅटिस एकमेकांमध्ये मिसळून जातात आणि रगडा एकदम "झकास' होतो. त्यात गोड आणि तिखट पाणी, तिखट, मीठ, मसाला व चाट मसाला यांचे मिश्रण अगदी योग्य प्रमाणात टाकले जाते. त्यामुळे पदार्थाला येणारी चव अगदी अप्रतिम असते.
एकदा का रगड्याने भरलेली ही डिश तुमच्या पुढे आली की, ती व्यवस्थितपणे कालवून घ्या आणि एक-दोन चमचे "टेस्ट' करा. मग तुम्हाला कळेल खरे रगडा पॅटिस कशाला म्हणतात. दोन-तीन चमचे खाल्ल्यानंतर पुन्हा थांबा. थोडे तिखट आणि गोड पाणी त्यात मिसळा. पुन्हा रगडा व्यवस्थित कालवा. चव आणखी सुधारली आहे, असे तुम्हाला जाणवले. एका प्लेटमध्ये इतके रगडा पॅटिस येते की, तुम्ही कितीही खादाड असाल तरी तुमची भूक नक्कीच भागते. इतर ठिकाणी हे समाधान क्वचितच मिळते.
रगडा पॅटिसननंतर पाणीपुरीची एक प्लेट जरुर घ्या. एकट्याला एक जाणार असेल तर उत्तमच. पण नसेल तर दोघा-तिघांमध्ये एक तरी अवश्‍य घ्या. पाणीपुरी झाल्यानंतर गाडीवर असलेला माणूस तुम्हाला तिखट-गोड पाणी हवे का, असे विचारेल. नेहमी घेत नसाल तरी येथे जरुर पाणी प्या. सरते शेवटी इतर ठिकाणांप्रमाणेच येथेही मसाला पुरी मागायला विसरु नका. हे सर्व झाल्यानंतर तुमचा आत्मा तृप्त नाही झाला तरच नवल.

Sunday, February 03, 2008

शनिवारवाड्याजवळ "दिल्ली चाट'


पाणीपुरी प्रेमींसाठी नवा "स्पॉट'

भेळेच्या गाडीवर गेल्यानंतर तुम्ही रगडा पॅटिस, रगडा पुरी, भेळ किंवा एसबीडीपी (शेव बटाटा दहीपुरी) यापैकी काहीही खा पण सर्वात शेवटी एक प्लेट पाणीपुरी होणारच. पाणीपुरी हा पदार्थ आवडत नाही, अशी व्यक्ती अगदी विरळ. माझ्या ओळखीत आहेत एक-दोन जण असे पण बहुतेक सर्वांनाच पाणीपुरी आवडते.
तुम्ही जर पाणीपुरीचे अगदी "डाय हार्ड' फॅन असाल तर शनिवार वाड्याजवळ उभ्या असणाऱ्या भेळ-पाणीपुरीच्या अनेक गाड्यांपैकी "दिल्ली चाट' अशी पाटी असलेल्या गाडीवर जाऊन पाणीपुरी खाच. तुम्ही जर अस्सल चाहते असाल तर फक्त एक प्लेट खाऊन तुम्ही स्वस्थ बसूच शकणार नाही. दुसरी प्लेटही पाहता पाहता संपून जाईल.
बालगंधर्व पुलावरील गाडी, पत्र्या मारुतीजवळील गाड्यांपैकी लक्ष्मी रस्त्याकडील गाडी, पेशवाईच्या चौकातील गाडी, एसएनडीटीजवळ किंवा बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर असलेली "कल्याण भेळ', सारसबागेतील भेळ व चाटची तमाम दुकाने, डेक्कन- संभाजी बाग परिसरातील तमाम गाड्या व इतर भागांमध्ये मिळणाऱ्या पाणीपुरीच्या तुलनेत शनिवारवाड्याजवळ उभ्या असलेल्या या गाडीवरील पाणीपुरी नक्कीच वरचढ आहे, असा दावा मी छातीठोकपणे करु शकतो. गेल्या दीड-दोन वर्षांपासून या ठिकाणची पाणीपुरी खाऊन हे शिक्कमोर्तब करण्यात आले आहे. फक्त मीच नाही तर आमच्या ऑफिसमधील अनेकांनी हे मान्य केले आहे.
पाणीपुरीचा आत्मा असतो पुदीना चटणीचे पाणी. पाणीपुरीतील पुरी सर्व ठिकाणी सारखीच असते. शिजविलेले वाटाणेही सगळीकडेच असतात. पण "दिल्ली चाट'च्या पाणीपुरीत जे तिखट पाणी टाकतात, त्याला तोडच नाही. मिरचीचा ठेचा व पुदीना चटणी यांचे जे काही अफलातून मिश्रण असते ते प्रत्यक्ष चव चाखूनच पाहिले पाहिजे. पाणीपुरी तयार करणारा जो "चाचा' आहे तो स्वतः ते पाणी तयार करतो. त्यामुळे रोज पाण्याची चव सारखीच असते.
शिवाय तुम्हाला तिखट किंवा गोड पाणीपुरी जशी पाणीपुरी हवी असेल त्यानुसार अप्रतिम "कॉम्बिनेशन' तुम्हाला मिळते. चिंच-गुळाचे गोड पाणी व मिरची-पुदीनाचे तिखट पाणी यांची चव इतर ठिकाणपेक्षा येथे अगदी "हटके' आहे. त्यामुळेच एकदा येथे येऊन गेलेला खवय्या पुन्हा फिरकला नाही, असे होणारच नाही.

पाणीपुरीसाठी कोठेही जायची तुमची तयारी असेल तर मग एकदा शनिवारवाड्याजवळ येऊन जाच!