Thursday, May 22, 2014

धर्मापलिकडची ‘चाह’

उत्तर प्रदेशातील महान चहावाला


उत्तर प्रदेशात निवडणुकीचा माहौल अनुभवण्यासाठी जाण्यापूर्वीच काही गोष्टी ठरविल्या होत्या. त्यापैकी एक म्हणजे ऐकूलाल या लखनऊमधील चहाविक्रेत्याची आवर्जून भेट घ्यायची. ‘सोनी टीव्ही’वरील ‘क्राइम पॅट्रोल–दस्तक’ या कार्यक्रमात ऐकूलाल या चहाविक्रेत्याचा एपिसोड पाहिला होता. ज्यांनी ज्यांनी हा एपिसोड पाहिला असेल त्यांना त्या माणसाच्या मोठेपणाची महती यापूर्वीच कळली असेल. खूप मोठं काम करणाऱ्या सामान्य माणसाला भेटण्याची इच्छा तीव्र होती. त्यामुळे लखनऊला गेल्यानंतर दोन दिवसांपैकी एक दिवस इतर गोष्टींप्रमाणेच ऐकूलाल यांच्यासाठी राखून ठेवला.


लखनऊमधील कैसरबाग या मुस्लिमबहुल भागात ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल आणि त्यांच्या मागेच झोपडीवजा घर आहे. ‘आगे दुकान पिछे मकान स्टाइल’. टीव्हीवर झळकलेला असून देखील ऐकूलाल या चहावाल्याला कैसरबाग परिसरात कोणीही ओळखत नव्हतं, याचं खरं तर आश्चर्य वाटलं. चहावाले, पानवाले, रिक्षावाले, सायकल रिक्षावाले, इतकंच काय कैसरबाग पोलिस चौकीत जाऊनही चौकशी केली. पण ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल नेमका कुठं आहे, त्याबद्दल कोणालाच काहीही सांगता येईना. अनेकांना ऐकूलाल कोण हे देखील माहिती नव्हतं.

थोड्याशा निराश मनानंच तिथून निघण्याचं ठरवलं. पण म्हटलं अजून एकदा नेटवर सर्च करून पाहूयात, कुठं नेमका पत्ता मिळतो का ते. नेटवर सर्च केल्यानंतर काही बातम्या वाचल्या, पण कोणीही कैसरबाग या पलिकडे जाऊन पत्ता दिलेला नव्हता. अखेर ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या बातमीनं माझं काम फत्ते केलं. त्या बातमीमध्ये कैसरबागमधील बारादरी परिसरातील लखनऊ पार्क येथे ऐकूलाल यांचा चहाचा स्टॉल आहे, असा स्पष्ट उल्लेख होता. खरा बातमीदार अखेर ‘इंडियन एक्स्प्रेस’चाच निघाला. बाकीच्यांच्या बातम्या फक्त पोकळच. 
 
एकदा सविस्तर पत्ता कळल्यानंतर मग ऐकूलाल यांचा स्टॉल शोधून काढणं फार काही अवघड नव्हतं. पाचच मिनिटांमध्ये त्यांच्या चहाच्या स्टॉलवर गेलो. टीव्हीवर आपले नाव ऐकून थेट महाराष्ट्रातून एक जण आपल्याला भेटायला आला आहे, यामुळं त्यांनाच भरून आलं. खरं तर त्या माणसाच्या मोठेपणामुळं मलाच भरून आल्यासारखं झालं होतं. फक्कड चहा पाजून त्यांनी माझं स्वागत केलं. मग गप्पा सुरू झाल्या. 

लखनऊमधील हजारो चहावाल्यांपैकी एक चहावाला ही ऐकूलाल यांची ओळख नाहीच. आपल्या चहाच्या गाडीजवळच्या पार्कमध्ये सापडलेल्या अडीच वर्षाच्या मुस्लिम मुलाचा सांभाळ करणारा हिंदू पिता, ही त्यांची खरी ओळख. धर्मांचा उल्लेख करण्याची काही आवश्यकता नाही, असं अनेकांना वाटू शकतं. मात्र, उत्तर प्रदेशसारख्या राज्यात ही घटना घडल्यामुळं धर्मांचा उल्लेख मला आवश्यक वाटतो आहे. तसंही दोन्ही धर्मांमधील एकूणच संबंध पाहता, भारतात कुठंही ही घटना घडली असती तरी धर्मांचा उल्लेख करावाच लागला असता. ऐकूलाल यांनी खूप मोठे काम अगदी सहजपणे केले आहे. 


… तर ही घटना आहे २००२ मधली. फेब्रुवारी महिन्यात ऐकूलाल यांना सकाळच्या सुमारास लखनऊ पार्कमध्ये एक मुलगा सापडला. तो तेव्हा साधारण अडीच वर्षांचा असावा. तो स्वतःचं नाव अकबर सांगत होता. त्याला फक्त अम्मी, अब्बू आणि अकबर हे तीनच शब्द माहिती होते. त्यावेळी ऐकूलाल यांनी त्याला घरी आणलं. त्याला खाऊपिऊ घातलं. मग पोलिसांकडे जाऊन अकबर सापडला असल्याची माहिती दिली. काही आठवडे, काही महिने उलटल्यानंतरही पोलिस अकबरच्या खऱ्या आई-वडिलांचा शोध घेऊ शकले नाही. दरम्यानच्या काळात अकबर ऐकूलालकडेच आनंदानं रहात होता. 

अकबरला अनाथालयात देऊन टाक, असा सल्ला शेजारच्या पाजारच्यांनी, मित्रांनी दिला. मात्र, ऐकूलाल यांच्या मनाला ती गोष्ट पटत नव्हती. त्यामुळे अकबरचे खरे आई-वडील मिळेपर्यंत स्वतःच त्याचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला. अकबर मिळाला तेव्हा तो खूपच अशक्त होता. त्याच्या हात-पाय तिरके होते. त्याला लिव्हरचा त्रास होता. त्यामुळं त्याचं पोट काही खाल्लं-प्यायलं की फुगायचं. त्याला मलेरियाही झाला होता. होतं नव्हतं ते सगळं विकून पैसा उभा केला आणि ऐकूलाल यांनी त्याच्यावर प्रचंड उपचार केले. त्याला सुदृढ बनविलं. 


पाहता पाहता काही वर्ष उलटली तरीही पोलिसांना त्याचे खरे आई-वडील कोण, याचा पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी लखनऊसह उत्तर प्रदेशात अकबरचा फोटो आणि सर्व माहिती पाठविली. कुठे मिसिंगची कम्प्लेंट नोंदविलण्यात आली आहे का, हे पाहिलं. पण तशी नोंद कुठंच नव्हती. मुळात अकबरच्या वडिल अलाहाबाद इथं राहणारे. गुत्त्यावर जाऊन दारू पिल्यानंतर ते अकबरला तिथं विसरून आले. आधीही दोनदा ते आपल्या पोटच्या पोराला दारुच्या गुत्त्यावर विसरले होते. मात्र, सुदैवानं त्यांना अकबर सापडला. तिसऱ्यांदा मात्र, अकबर पुन्हा त्यांच्याकडे परतलाच नाही. इकडे ऐकूलालनंही आसपासच्या मशिदींमध्ये अकबरच्या आई-वडिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. येणाऱ्यांपैकी कोणाचा मुलगा हरवला आहे का, हे विचारून पाहिलं. पोलिसांप्रमाणेच त्यालाही यश आलं नाही. 

अकबर ऐकूलालकडे राहूनच मोठा होत होता. ऐकूलालनं घेतलेला सर्वात महत्त्वाचा निर्णय म्हणजे त्यांनी अकबरचा धर्म आणि नाव बदललं नाही. त्याचा धर्म मुस्लिमच ठेवला. अकबरला मुस्लिम पद्धतीनं शिक्षण मिळेल, याची व्यवस्था केली. त्याला कुराण शिकविलं जाईल, मुस्लिम धर्मानुसार चांगली तालीम मिळेल, मुस्लिम धर्मानुसार जे काही संस्कार असतील ते त्याच्यावर होतील, याची खबरदारी घेतली. तो नियमितपणे नमाज पढेल, याची काळजी घेतली. मात्र, अकबरला शाळेत घालण्याच्या वेळी अडचण आली. त्याचं नाव, वडिलांचं नाव आणि आडनाव यामध्ये विसंगती असल्यानं शाळेनं त्याला सुरुवातीला प्रवेश नाकारला. अशा मुलाला शाळेत इतर कोणीही स्वीकारणार नाही वगैरे वगैरे. पण अखेरीस सत्य परिस्थिती सांगितल्यानंतर शाळेनंही अकबरला प्रवेश दिला. 

ऐकूलाल आणि अकबर यांच्यावर एका चॅनेलनं स्टोरी केली. ती स्टोरी अकबरच्या खऱ्या आई-वडिलांनी पाहिली आणि त्यांनी मग ऐकूलालकडे त्याचा ताबा मागण्यासाठी धाव घेतली. नंतर अकबरच्या ताब्यासाठी ते सेशन कोर्टात गेले. अकबरने ऐकूलाल हेच त्याचे वडिल आहेत आणि मला त्यांच्याकडेच रहायचे आहे, असं स्पष्टपणे सांगितल्यामुळं खऱ्या पालकांच्या अडचणी वाढल्या होत्या. पण देव आणि दैव ऐकूलालच्या बाजूनं होतं. प्रथम सेशन कोर्टानं आणि नंतर हायकोर्टानंही ऐकूलालच्या बाजूनंच निकाल दिला. ऐकूलालची आर्थिक परिस्थिती आणि इतर गोष्टी लक्षात घेतल्या तर ही केस लढणं देखील त्यांना मुश्किल होतं. पण संकटाच्या समयी अनेक हात मदतीला धावून येतात, तसे अनेक मदतीचे हात ऐकूलालच्या दिशेनं पुढे आले. वकिलांनी रुपयाही न घेता ही केस लढली. अनेकांनी अकबरच्या पालन पोषणासाठी आर्थिक मदत केली इइ.


ऐकूलालकडेच अकबरचा ताबा राहील, असा निकाल देताना कोर्टानं खूप छान मत व्यक्त केलंय. आपल्या देशाच्या कायद्यात किंवा घटनेमध्ये हिंदू पिता मुस्लिम पाल्याचा (म्हणजेच एका धर्माचा पालक आणि दुसऱ्या धर्माचा पाल्य) सांभाळ करू शकत नाही, असे लिहिलेले नाही. शिवाय भारतासारख्या धर्मनिरपेक्षतेची शिकवण देणाऱ्या देशामध्ये अशा घटनांचा गौरवपूर्ण उल्लेख केला पाहिजे. आंतरधर्मीय विवाह आपण सहजपणे स्वीकारतो, तशाच पद्धतीनं अशा घटनांकडे पाहिलं पाहिजे नि स्वीकारलं पाहिजे, असं सांगत हायकोर्टानं निकाल ऐकूलालच्या बाजूनं दिला. सध्या सुप्रीम कोर्टात ही केस सुरू आहे. 

अकबर सध्या दहावीत शिकत असून त्याचं वय चौदा वर्षे आहे. आजही त्याला ऐकूलालकडेच राहण्याची इच्छा आहे. त्याचे आई-वडील पोराच्या ओढीनं काही महिन्यांनी भेटायला येतात. ऐकूलालच्याच घरी राहतात. ऐकूलालची गरिबी आणि खऱ्या आई-वडिलांची श्रीमंती अशी परिस्थिती असूनही अकबरला ऐकूलाल यांच्याकडेच रहायचे आहे. त्यांच्याकडेच तो वडिल म्हणून पाहतो आहे. त्याला मूळ आई-वडिलांकडे जाण्याची अजिबात इच्छा नाही.  
या संपूर्ण खटल्यामध्ये एक साक्ष महत्त्वाची ठरली, ती म्हणजे ऐकूलालच्या भावाची. ऐकूलाल या माणसाचं आयुष्य चमत्कृतीपूर्ण घटनांनी भरलेलं. चौधरी मूर्तझा हुसेन यांना अडीच-तीन वर्षांचा एक मुलगा घराजवळ सापडला. एक तारखेला सापडला म्हणून नाव ठेवलं ऐकूलाल. मूर्तझा हुसेन यांनी स्वतःच्या मुलाप्रमाणे त्याचा सांभाळ केला. त्यांनी त्याला हिंदूच ठेवले. इतकंच नाही, तर स्वतःच्या घरीही त्याच्यासाठी वेगळा स्वयंपाक होईल, अशी व्यवस्था केली. मूर्तझा हुसेन आणि त्यांच्या पत्नीचे यावरून अनेकदा खटके उडायचे. मात्र, हुसेन त्यांच्या निर्णयावर ठाम होते. मूर्तझा यांनी त्याचा सांभाळ केल्यामुळं ऐकूलालचं आयुष्यच बदलून गेलं. 


अखेरच्या दिवसांमध्ये हुसेन यांनी दोन्ही मुलांमध्ये संपत्तीची समान वाटणी करण्याचे ठरविले. हुसेन यांनी ऐकूलालचा सांभाळ कर्तव्य म्हणूनच केला होता. मात्र, आपल्यावर केलेल्या उपकारांची जाण ऐकूलाल यांना होती. त्यामुळं ऐकूलालनं त्यांची चहाची गाडी चालविण्याची परवानगी द्या, इतकीच मागणी केली आणि बाकीच्या संपत्तीवर दावा केला नाही. नंतर वडील गेले, आईही गेली नि ऐकूलालचा भाऊ परदेशात नोकरी करण्यासाठी निघून गेला. तो लखनऊत आला होता. त्यानं सांगितलेल्या या घटनेमुळं खटल्याला वेगळीच दिशा मिळाली आणि अकबरचा ताबा ऐकूलाल यांच्याकडेच राहिला.

अशा ऐकूलाल आणि अकबरची भेट घेण्याची खूप इच्छा होती. त्यामुळंच इतका सव्यापसव्य करून शोधून काढलं. अगदी छोटंसं घर. त्यामध्ये एका बाजूला चहाचा स्टोव्ह पेटलेला. तिथंच दोन खुर्च्या टाकून एकावर ऐकूलाल बसलेले. खोलीच्या दुसऱ्या बाजूला पलंग, बाजूला पाण्याचं पिंप आणि आतल्या बाजूला थोडीशी मोकळी जागा. हाच ऐकूलाल यांचा संसार. ‘मागेल त्या प्रत्येकाला मी चहा पाजतो. त्यापैकी काही जणांकडे पैसे नसतात. तरीही त्यांना चहा देतो. त्यापैकी अनेक जण सायकल रिक्षावाले किंवा कष्टकरी असतात. अनेक जण मग नंतर जमतील तसे पैसे आणून देतात,’ असं ते सांगत होते. थोडक्यात काय तर देत जायचं हा त्यांचा स्वभाव आहे. अकबरचं पालनपोषण ते कसं करीत असतील, हा प्रश्नच आपल्याला पडतो. मात्र, आजपर्यंत मला कधीही पैसा कमी पडला नाही. जेव्हा गरज पडली, तेव्हा पैसे आणि माणसं कायमच माझ्या बाजूनं उभी राहिली, असं ऐकूलाल सांगतात.
सहज गप्पांमध्ये नरेंद्र मोदी यांचा विषय निघाला. मोदींनी कधी काळी चहा विकलेला आणि ऐकूलाल आयुष्यभर चहा विकत आहेत. हिंदू आणि मुस्लिम या दोन शब्दांमुळेच दोघेही चर्चेत आलेले. एक लोकप्रियतेच्या झोतात, तर दुसरा वादाच्या भोवऱ्यात. त्यामुळं ऐकूलाल यांना मोदी यांच्याबद्दल काय वाटतं, ते जाणून घेण्याची मला खूप उत्सुकता होती. 


देशात परिवर्तनाची हवा तर जाणवतेच आहे. एक चहावाला जर देशाचा पंतप्रधान झाला, तर मलाही अभिमान वाटेल. कोणाचे नशीब कधीही पालटू शकते, असे म्हणतात. मोदी यांच्याबद्दल अनेत वाद-प्रवाद आहेत. मला त्यात जायचे नाही. मात्र, मी माझ्या अकबरच्या बाबतीत जे धोरण स्वीकारले, तसे उदार धोरण त्यांनी सरकार चालविताना स्वीकारले तर मग देशभरअमन आणि शांतीचा माहौल निर्माण होईल,’ अशी सूचक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. खूपच मोजकं पण महत्त्वाचं बोलले ऐकूलाल.

सुरुवातीला खूप त्रास झाला. अनेकांनी मला अकबरचा सांभाळ करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. अनाथालयात दाखल करा वगैरे सांगितलं. पण मी ते मानलं नाही. मला जे मिळाले ते परत देण्याची संधी ईश्वरानं मला दिली होती. ती संधी मला गमवायची नव्हती. मानवतेच्या दृष्टिकोनातून मी अकबरला सांभाळतो आहे. माझ्या वडिलांनी जसे मला वाढविले, तोच आदर्श माझ्यासमोर आहे. एक प्रकारे मला माझ्यावरील उपकारांची परतफेड करण्याची संधी ईश्वराने दिली. त्याबद्दल मी ईश्वराचा खूप ऋणी आहे,’ असं ऐकूलाल म्हणतात.


पत्रकारांनी आणि टीव्हीवाल्यांनी मला खूप प्रसिद्धी दिली, असं म्हणून जुन्या बातम्यांची कात्रण वगैरे उत्साहानं दाखवत होते. कोर्टाच्या निकालाची प्रतही दाखविली. गप्पांच्या ओघात आणखी दोन कप चहा झाला. मग मात्र, मला पुढच्या कार्यक्रमासाठी निघणं भाग होतं. त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्रात आलात, तर आवर्जून पुण्याला या, असं निमंत्रण दिलं. माझी लखनऊभेट सार्थकी लागल्याचा आनंद घेऊन मी तिथून बाहेर पडलो.

Saturday, May 17, 2014

अंधेरा छटा, सूरज निकला, कमल खिला…

अरे, अर्धी चड्डीवाले आले की!

१६ मे २०१४… भारतीय लोकशाहीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवून ठेवण्यासारखा दिवस. भारतीय जनता पक्ष या दिवशी स्वबळावर सत्तेवर आला. १९५१ साली स्थापन झालेल्या जनसंघाचे पहिल्या निवडणुकीत तीन, तर १९८० साली स्थापन झालेल्या भाजपचे १९८४ मध्ये अवघे दोन खासदार संसदेत पोहोचले होते. त्याच भाजपने १६ मे रोजी स्वबळावर दिल्लीत सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न साकार केले आहे.



भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला तब्बल ३३७ जागा मिळाल्या. पैकी भाजपच्या एकट्याच्या जागा आहेत २८३. भगवा रंग अंगावर घेण्यास लाज वाटत नाही, अशा भाजप, शिवसेना आणि शिरोमणी अकाली दलाचे जवळपास तीनशेहून अधिक खासदार लोकसभेत पोहोचले. अनेकांनी प्रयत्न करूनही त्यांना नरेंद्र मोदींना रोखता आले नाही. अखेरीस भाजपचे सरकार सत्तेवर आलेच. आश्चर्य म्हणजे आयुष्यभर अर्धी चड्डी अभिमानाने घालणाऱ्या नरेंद्र मोदी यांचा भारताचे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शरद पवार यांच्यासारख्या निष्ठेतील न देखील माहिती नसलेल्या नेत्यांनी कितीही आदळआपट केली तरी शेवटी मोदी दिल्लीच्या तख्तावर विराजमान होणार आहेत. आणखी एक लक्षणीय गोष्ट म्हणजे भाजपच्याही किमान निम्म्याहून अधिक खासदारांना ‘अर्धी चड्डी’ घालण्यात कोणताही कमीपणा वाटत नाही. त्यामुळे भारतीय जनतेने मोठ्या निर्धास्तपणे ‘अर्ध्या चड्डी’च्या हाती देश सोपविला आहे.

आयुष्यभर ज्यांनी विचार सर्वतोपरी मानले, संघटनेचा आदेश शिरसावंद्य मानला, असे नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार ही गोष्ट भाजपसाठी आनंदाची, अभिमानाची आणि भाजपच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य वाढविणारी आहे. भाजपचा हा विजय नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वामुळे साकारला आहे, यात वादच नाही. तरीही मला वाटतं, हा विजय भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा, स्थापनेपासून आतापर्यंत भाजप आणि संघपरिवारासाठी रक्ताचे पाणी केलेल्या नेत्यांचा-अधिकाऱ्यांचा आणि सामान्य भारतीय जनतेचा आहे.

जनसंघाची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली ते श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना किती आनंद झाला असता आजचा हा सुवर्णदिन पाहून. ‘एक देश में दोन विधान, दोन निशान, दो प्रधान… नही चलेंगे नही चलेंगे…’ असं म्हणत जम्मू-काश्मीरमध्ये आंदोलन करताना तुरुंगात गेलेल्या श्यामाप्रसाद यांचा तुरुंगातच गूढ मृत्यू झाला. दीनदयाळ यांचा मृतदेह उत्तर प्रदेशातील मुगलसराय रेल्वे स्टेशनच्या परिसरात बेवारस अवस्थेत सापडला. दोन्ही मृत्यू नैसर्गिक नव्हतेच कदाचित. ती राजकीय हत्याच असावी. त्या दोन्ही नेत्यांच्या आत्म्यांना आज खऱ्या अर्थाने शांती लाभली असेल. 

या आधी भाजपचे सरकार आले नव्हते का? तर आले होते. तब्बल तीनवेळा आले होते. पण त्यावेळी सरकार स्वबळावर नव्हते. म्हणजे अटलबिहारी वाजपेयी तीनवेळा भारताचे पंतप्रधान बनले. मात्र, प्रत्येक वेळी सहकारी पक्षांच्या कुबड्या घेऊन. त्याच सहकारी पक्षांनी वेळोवेळी त्यांना बेजार केले. हैराण केले. मात्र, यंदा नरेंद्र मोदी यांनी भाजपला स्वबळावर सत्तेत आणले आहे. त्यामुळेच मुखर्जी-उपाध्याय यांना १६ मेच्या दिवशी मुक्ती मिळाली असेल, असे मानायला हरकत नाही. अर्थात, फक्त मुखर्जी-उपाध्यायच नाही. तर भाजपचे असे कितीतरी नेते होते ज्यांनी आयुष्यभर पक्षासाठी खस्ता खाल्ल्या आणि सत्तेचा घास हाता-तोंडाशी आला असताना त्यांचे वय झाले होते. 
के. आर. मलकानी, सुंदरसिंह भंडारी, कृष्णलाल शर्मा, भाई महावीर, मध्य प्रदेशात कुशाभाऊ ठाकरे, महाराष्ट्रात वसंतराव भागवत आणि उत्तमराव पाटील, तमिळनाडूत जना कृष्णमूर्ती, केरळमध्ये ओ. राजगोपाल अशी प्रत्येक राज्यातील भाजप नेत्यांची असंख्य नावे काढता येतील. अर्थातच, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरलीमनोहर जोशी या तिघांच्या उल्लेखाशिवाय भाजपचा इतिहास केवळ अपूर्ण आहे. मात्र, त्यांना त्यांच्या कष्टांचे फळ पुरेसे मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. उत्तर प्रदेशात फिरताना एक उत्तम घोषणा ऐकायला मिळाली, ‘भाजपा की तीन धरोहर… अटल, अडवाणी और मनोहर’. किती योग्य आहे ही घोषणा. संघटनेने आदेश दिला म्हणून पक्षाचे काम करायला लागले आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय निरलस भावनेने काम करीत राहिले. त्या सर्वांच्या परिश्रमाची फलनिष्पत्ती १६ मे रोजी झाली, असे म्हणायला हरकत नाही. 

पण सरकार सत्तेवर आले तरीही अजूनही काही ठिकाणी भाजप शून्यच आहे. तिथे आजही भाजप रुजविण्याचे कार्य सुरूच आहे. अनेक ठिकाणी दगडावर डोके आपटून घेण्यासारखीच परिस्थिती आहे. तरीही कार्यकर्ते तिथं जीव तोडून मेहनत घेत आहेत. हेच पाहा ना. केरळमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून ओ. राजगोपाल एकाकी झुंजत आहेत. मुस्लिम-ख्रिश्चन यांची प्रचंड लोकसंख्या आणि काँग्रेस तसेच डाव्या आघाडीमध्ये होणारी हिंदू मतांची विभागणी यामुळे तिथे भाजपला यश मिळणे केवळ अशक्य आहे. तरीही ते लढत आहेत. यंदा तर त्यांचा विजय अवघ्या बारा हजार मतांनी हुकला. जी गोष्ट केरळची तीच तमिळनाडूची. तिथे हिंदू मुन्नानीचे पाँडी राधाकृष्ण अथक मेहनत घेऊन लढत आहेत.

अर्थात, फक्त भाजपचेच नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचेही कितीतरी नेते संघ स्थापनेपासून देशभर प्रचारासाठी गेले. डॉक्टर हेडगेवार यांच्या एका शब्दासाठी दत्तोपंत ठेंगडी उठून केरळमध्ये गेले आणि आज तिथं संघाचे सर्वाधिक काम आहे. गायकीचा अभ्यास सोडून यादवराव जोशी यांनी कर्नाटकात आज बिनतोड काम निर्माण केले आहे. भाऊराव देवरस उत्तर प्रदेशात गेले नि तीच त्यांनी आपली कर्मभूमी बनविली. शिवरामपंत जोगळेकर तमिळनाडूत गेले आणि तिथे संघाचे काम शिखरावर नेले. बाळासाहेब देशपांडे यांनी वनवासी कल्याण आश्रमासाठी आयुष्य अर्पण केले. उच्चविद्याविभूषित असलेल्या अशोक सिंघल यांनी त्यांचे सारे आयुष्य विश्व हिंदू परिषदेच्या संवर्धनात खर्ची घातले. ही काही पटकन डोळ्यासमोर येणारी नावे असली तरीही अशी असंख्य अगणित नावे. 

अर्थात, भाजपला सत्तेवर आणणे हे काही संघाचे काम नाही. संघ त्यासाठी काम करीतही नाही. मात्र, जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते आहे, असे लक्षात आल्यानंतर परिवार पूर्णपणे झोकून रणांगणात उतरतो. त्याचाच प्रत्यय आज आला. भाजपप्रमाणेच संघ आणि परिवारातील अशा अनेक असंख्य पदाधिकाऱ्यांच्या कष्टांचे काही प्रमाणात चीज झाले, असे म्हणायला हरकत नाही. 

जनसंघाच्या स्थापनेनंतर किंवा भाजपच्या निर्मितीनंतर अनेकांना माहिती होते, की आपल्याला पडण्यासाठीच उभे रहायचे आहे. भाजपच्या पक्क्या मतदारांनाही माहिती होते, की आपला उमेदवार काही जिंकत नाही. तरीही त्यांनी पडणाऱ्या उमेदवारावर निष्ठेने वर्षानुवर्षे शिक्के मारले. डावीकडे नाव न पाहता उजवीकडे शिक्के मारत राहिले. कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता भाजपचे नेते, कार्यकर्ते आणि मतदार पक्षाशी एकनिष्ठ राहिले, अशा कोट्यवधी लोकांच्या जीवावरच भाजपला आजचे हे सुगीचे दिवस पहायला मिळाले आहेत.  

आणखी एक गोष्ट म्हणजे सामान्य मतदाराला याचे श्रेय देण्यापासून कोण रोखू शकेल. सामान्य मतदार सर्वाधिक हुशार आणि चतुर आहे. अनेकदा राजकारणी त्याला गृहित धरतात. मात्र, तो आपली ताकद निवडणुकीमध्ये दाखवूनच देतो. भाजपच्या अनेक उमेदवारांचे लाखांच्या फरकाने झालेले विजय हे त्याचेच द्योतक आहे. इतक्या फरकाने उमेदवार जिंकतील, हे खुद्द उमेदवारांनाही आणि राजकीय विश्लेषकांनाही वाटत नव्हते. मात्र, तसे झाले आहे. ते केवळ आणि केवळ मतदारराजाच्या इच्छेमुळे. सत्ताधारी नको आणि मोदीच हवा, या एका आणि एकाच इच्छेमुळे प्रचंड बहुमतांनी त्यांनी भाजपला विजयी केले आहे. 

सर्वात शेवटी म्हणजे भाजपचा छोट्यातला छोटा कार्यकर्ता. कोणत्याही हेतूशिवाय तो काम करीत राहिला. ना त्याला दिवसाच्या पाचशे रुपयांच्या आमिषाची हाव होती, ना बिर्याणी-दारूची. ज्याने आयुष्यभर पोस्टर्स चिटकविली, भिंती रंगविल्या, आयुष्यभर स्लिपा वाटल्या नि गमतीने म्हणतात तसं सतरंज्या घातल्या, त्या सामान्य कार्यकर्त्यामुळंच भाजपला आज हे दिवस आले आहेत. पूर्वी भाजपचा कार्यकर्ता अशी कामं करायचा. हाच कार्यकर्ता आता फेसबुक, ट्वीटर नि सोशल मीडियावर भाजपचा प्रचार करतो. स्वतःची पदरमोड करून लष्कराच्या भाकऱ्या भाजतो. त्याला पक्षाकडून काहीही अपेक्षा नसते. भाजपच्या ह्याच सामान्यातील सामान्य कार्यकर्त्यामुळे नरेंद्र मोदी सत्तेचा सोपान स्वबळावर चढले आहेत. 

मुख्य म्हणजे नरेंद्र मोदीही ही गोष्ट आनंदानं मान्य करतील. पराभव झाला तर सामूहिक जबाबदारी आणि विजयी झालो तर फक्त माझ्यामुळे ही काँग्रेसी परंपरा भाजपमध्ये नाही. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांचे श्रेय मोदीही मान्य करतीलच.
तेव्हा नरेंद्र मोदी यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...

Thursday, May 08, 2014

मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या

इंद्रेशजींच्या समवेत एक दिवस

राजकीय नेत्यांबरोबर एक दिवस... हा कार्यक्रम आपण अनेकदा पाहिला आहे. वार्तांकन अनेकदा वाचले आहे. वाराणतीस आल्यानंतर मी देखील एक दिवस एका नेत्याबरोबर हिंडलो. अर्थात, तो नेता, ती व्यक्ती राजकारणी नव्हती. ती व्यक्ती म्हणजे संघाचे ज्येष्ठ प्रचारक असलेले इंद्रेशकुमारजी. 



अनेक दशकांपासून प्रचारक असलेल्या इंद्रेशजी यांच्यावर सध्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाची जबाबदारी आहे. 2002 मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या मंचाचे मार्गदर्शक म्हणून इंद्रेशजी यांच्यावर जबाबदारी आहे. देशभर मंचाचे काम विस्तारले आहे. देशाच्या पंतप्रधानपदी योग्य व्यक्तीची निवड व्हावी आणि त्यात मुस्लिम समाजाचेही योगदान असावे, या हेतूने हा मंच निवडणुकीत कार्यरत आहे. उत्तर प्रदेशात विविध ठिकाणी दौरे आटोपल्यानंतर इंद्रेशजी आणि त्यांचे सहकारी सध्या वाराणसी येथे मुक्कामी आहेत. त्यामुळे एकदिवस त्यांच्यासोबत राहण्याची संधी मिळाली. 



सकाळी दोन-चार ठिकाणी जाऊन मग दुपारच्या सुमारास डॉ. राजीव श्रीवास्तव यांच्या सिगरी थाना भागातील विशाल भारत संस्थान या कार्यालयात पोहोचलो. श्रीवास्तव हा माणूस भलताच अवलिया. काशी हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाचा प्राध्यापक. मात्र, ही त्याची ओळख अपुरी आणि अर्धवट आहे. श्रीवास्तव यांच्यावर नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा प्रभाव आहे. त्यांनी 1988-89 मध्ये विशाल भारत संस्थान ही संस्था सुरू केली.  मुस्लिम मोहल्ल्यांमध्ये ज्यांचे कोणीही नाही, अशा लहान मुला-मुलींचा ते सांभाळ करतात. अनाथ, पोरके असे शब्द वापरलेले त्यांना आवडत नाहीत. ज्यांचा कोणी नाही, त्यांचा अल्ला आहे, अशी विचारधारा. आतापर्यंत त्यांनी जवळपास 465 मुला-मुलींचा सांभाळ करून मार्गस्थ केले आहे. सध्या त्यांच्याकडे दीडशे मुलं आहेत. त्या सर्वांच्या राहण्याची, शिक्षणाची, जेवणा-खाणाची जबाबदारी श्रीवास्तव हेच उचलतात. साधी साधी माणसं काय कमाल उंचीची काम करू शकतात, हे श्रीवास्तव यांच्याकडे पाहिल्यानंतर समजतं.



चार महिन्यांपूर्वी एक चार महिन्यांची मुलगी त्यांच्या घरासमोर कुणीतरी ठेवून गेलं. तिचाही सांभाळही व्यवस्थित सुरू आहे. संस्थेत दाखल झाल्यानंतर श्रीवास्तव तिला रितसर दत्तक घेतात. मुला-मुलीचं नाव, नंतर वडील म्हणून राजीव यांचं नाव आणि आडनाव भारतवंशी, अशी पद्धत. कार्यालयात गेल्यानंतर जय हिंद सर असं म्हणून आपलं स्वागत होतं. चिल्ड्रेन बँक आणि लहान मुलांची संसद वगैरे उपक्रमही संस्थेत राबविले जातात. 

श्रीवास्तव यांचे दुसरे संस्थात्मक अपत्य म्हणजे मुस्लिम महिला फौंडेशन. ही संस्था मुस्लिम महिलांच्या विशेषतः विणकर महिलांच्या समस्यांचे-अडीअडचणींचे निराकरण करते. त्यांना बँकेतून लवकर कर्ज उपलब्ध व्हावे, शिवणकामासाठी सिलाई मशीन स्वस्तात उपलब्ध करून देणे, आरोग्य शिबिरे आयोजित करणे, कायदेशीर मार्गदर्शन करणे वगैरे वगैरे. अर्चना भारतवंशी, नाजनीन अन्सारी, नजमा परवीन यांच्याकडे मुस्लिम महिला फौंडेशनची जबाबदारी आहे. दहा ते बारा हजार मुुस्लिम महिला त्यामार्फत जोडल्या गेल्या आहेत. गेल्याच वर्षी 23 जानेवारीला त्यांनी भारतीय अवाम पार्टीची स्थापना केली आहे. यात 90 टक्के महिला आरक्षण आहे. या पार्टीत सर्व महिलांना प्रवेश असला तरीही मुस्लिम महिलांची संख्या अधिक आहे. आतापर्यंत 35 हजार महिलांनी त्याचं सदस्यत्व घेतलं आहे. 

मुस्लिम महिला फौंडेशनमार्फत सध्या विणकर वस्त्यांमध्ये जनजागृतीसाठी आणि परिवर्तनाचा नारा देण्यासाठी महिला मेळावे घेतले जात आहेत. अशाच एका मेळाव्याला इंद्रेशकुमारजी उपस्थित राहणार होते. महिलांशी संवाद साधून त्यांना योग्य उमेदवाराची निवड करण्याचे आवाहन करण्याचे काम इंद्रेशजी उत्तर प्रदेशात सर्वत्र करीत आहेत. त्यामुळे  राजीव श्रीवास्तव यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आम्ही इंद्रेशजी यांच्याकडे जाण्यासाठी निघणार होतो. तिथं आम्हाला जॉईन झाले, भारतीय जनता पार्टीचे राजेंद्र प्रताप गुप्ता. भाजपाचा जाहीरनामा लिहिणाऱ्यांच्या समितीत गुप्ता यांचा समावेश होता. 

मग आम्ही सर्व पोहोचलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात पोहोचलो. तिथं इंद्रेशजी यांच्या सोबत अॅडव्होकेट नूर फातिमा, संस्कृत अध्ययनासाठी काशी येेथे आलेला एक विद्यार्थी स्वयंसेवक आणि पंजाबमधून वाराणसीत प्रचारासाठी आलेले स्वयंसेवक होते. इंद्रेशजी यांना कार्यकर्त्यांचे फोन येत होते. त्यांच्याशी ते संवाद साधून मार्गदर्शन करीत होते. पंधरा मिनिटं बातम्यांचा आढावा घेण्यात गेली. त्यानंतर आम्ही निघालो. नूर फातिमा या शिया पंथीय मुस्लिम असून शिवभक्त आहेत. त्यांनी कंधवा गेट परिसरात भव्य असे शिवमंदिर बांधले आहे. इंद्रेशजी यांचा उल्लेख त्या भाईसाहब असा करत असतात.

 


संघ कार्यालयातून बाहेर पडणार तेवढ्यात एक सुरक्षारक्षक आत येतो आणि वाटेतील गाडी बाजूला घ्यायला लावतो. तेवढ्यात एक आलिशान गाडी प्रवेशद्वारातून आत शिरते. त्यातून उत्तर प्रदेशात भाजपची हवा निर्माण करण्यात मोलाची कामगिरी बजाविणारे अमित शहा उतरतात. ते संघ कार्यालयात वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलेले असतात. अत्यंत विनम्रतेने ते इंद्रेशजी यांना नमस्कार करतात. इंद्रेशजी देखील त्यांना मिठी मारतात. कार्यालयातील एका खोलीत पाच मिनिटे अमित शहा यांच्याशी चर्चा करून इंद्रेशजी बाहेर येतात. मग आम्ही निघतो सरैय्या हा मुस्लिमबहुल भागात.



तसं पहायला गेलं तर वस्ती एकदम बकाल. झोपड्या कम बैठ्या घरांची वस्ती. बकऱ्यांची बे बे, पटकन डोळ्याला दिसणारे दोन-तीन खाटिक, उघडी गटारं, गप्पा मारत बसलेले वयोवृद्ध मुस्लिम नागरिक... असं कुठल्याही मुस्लिम मोहल्ल्यात दिसणारं चित्र इथंही होतं. काँग्रेस, समाजवादी आणि बसपाचे नेते नरेंद्र मोदींच्या नावाने कंठशोष करतात ना, की मोदींनी मुस्लिमांवर अन्याय केला, दुर्लक्ष केले. लेकांनो, तुम्ही तरी कुठं मुस्लिमांचा विकास केला. पहा जरा त्या वस्त्यांकडे पहा. असो.



एका छोटेखानी कार्यालयातील खोलीमध्ये आम्ही शिरतो. तिथं आधीपासूनच सुमारे सत्तर ते ऐंशी मुस्लिम महिला इंद्रेशजींची वाट पाहत असतात. मग प्रथेप्रमाणे त्यांचं पुष्पहार वगैरे घालून स्वागत होतं. त्यांच्याबरोबरच्या इतरांचीही ओळख करून दिली जाते. अर्चना भारतवंशी आणि राजीव श्रीवास्तव यांनी प्रस्तावना करून दिल्यानंतर मग इंद्रेशजी हे बोलण्याठी उभे राहतात. सुरुवातीला ते गैरराजकीय विचार मांडतात. कुराण, मज्बे इस्लाम, कुठले कुठले शायर आणि सुफी संत यांचे दाखले देत अस्सल उर्दूतून ते संवाद साधतात. मुस्लिम महिलांनी मुलांना शिकविले पाहिजे. संस्कारित केले पाहिजे. एखादी व्यक्ती जन्मतः गरीब, कमजोर आणि मजबूर असू शकते. पण त्या परिस्थितीत मुलांना शिक्षित आणि सुसंस्कृत करण्याची जबाबदारी महिलांची आहे. तेव्हा मुलांना सुसंस्कृत आणि शिक्षित करा, असं आवाहन ते मुस्लिम महिलांना करतात. दारू आणि इतर व्यसनांच्या आहारी तुमची मुलं जाणार नाहीत, याची काळजी घ्या. त्यामुळंच वाट लागते इइ. 



मग ते राजकीय मुद्द्यावर येतात. हे पहा. तुम्हाला समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बहुजन समाज पार्टीनं अनेकदा अनेक आश्वासनं दिली. अनेकदा खोटंनाटं सांगून घाबरवलंही. पण तुम्हीच सांगा, परवा नरेंद्र मोदी यांनी अर्ज भरला तेव्हा तीन लाखांहून अधिक लोक जमले होते. तेव्हा त्यांनी मुस्लिमांवर हल्ला केला का, मुस्लिम महिलांकडे वाईट नजरेने पाहिले का, तुमच्या घरांवर दगडफेक झाली का, तुम्हाला संपविण्याचा प्रयत्न केला का... नाही ना. मग तुम्ही इतरांच्या भूलथापांना आणि भीतीला बळी पडू नका. बिजली, पानी आणि विकास ही त्रिसूत्री आहे. ती जो तुम्हाला देईल, असं वाटतं त्याला मतदान करा. सुरतचा विणकर आज चांगल्या स्थितीत आहे. तुम्हालाही जर तशीच आर्थिक परिस्थिती हवी असल्यास नीट विचार करून मतदान करा. नवरा सांगेल त्याला मतदान करू नका. उलट तुमच्या नवऱ्यालाच तुम्ही योग्य उमेदवाराला मतदान करण्याची गळ घाला. अत्यंत सूचक आणि मार्मिकपणे बोलतानाही ते नरेंद्र मोदींना मतदान करा, असं थेट आवाहन करीत नाही. 



साधारण पंचवीस-तीस मिनिटांच्या भाषणानंतर कार्यक्रम संपतो. मग उपस्थित महिलांशी ते नावानं संवाद साधतात. कसंय, मुलगा कुठंय, मुलगी काय करते इइ. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीचा प्रतिनिधी त्यांचा बाईट घेण्यासाठी आलेला असतो. त्याला ते सविस्तर मुलाखत देतात. ते थांबले आहेत, ही संधी साधून मग मी त्या महिलांशी संवाद साधतो. चूल आणि मूल यांच्यापुरतेच आयुष्य मर्यादित असल्याचे समजते. नवरा किंवा कुणीतरी घरात काम आणून देतो. टाके घालण्याचं, डिझाईननुसार विणण्याचं किंवा शिलाईचं. ते घरातूनच पूर्ण करून द्यायचं. कामाच्या तुलनेत पैसे खूप कमी मिळतात, असं सांगून त्या नेमके किती पैसे मिळतात ते सांगत नाहीत. या संस्थेत देखील यायला मिळतं कारण इथं सगळया महिला आहेत. अन्यथा तसं मोकळेपणानं वावरणं मुश्किल वगैरे. 



याच मुस्लिम महिला फौंडेशनच्या काही महिलांमार्फत नरेंद्र मोदी यांना राखी पाठविली जाते. त्यामुळं उत्सुकतेनं मी तिथं उपस्थित असलेल्यांपैकी काहींना विचारलं. वाराणसी येथून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी तुम्हाला नरेंद्र मोदी कोण आहेत, हे माहिती होतं का. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दहा ते बारापैकी आठ जणींनी नाही असं उत्तर दिलं. म्हणजे त्यांनी नरेंद्र मोदी, गोध्रा हत्याकांड, त्यानंतर उसळलेली दंगल, हिंदू-मुस्लिमांची झालेली कत्तल यापैकी काहीही माहिती नव्हतं. माझा विश्वास बसेना म्हणून परत परत विचारलं. खरं सांगा, त्यांचं नाव तरी ऐकलं होतं ना. वाराणसीमुळंच आम्हाला त्यांचं नाव कळलं, असं त्या वारंवार सांगत होत्या. आश्चर्याच्या धक्क्यातून सावरण्याच्या आतच आम्ही इंद्रेशजी यांच्यासोबत बाहेर पडतो.

दुसरीकडे जात असतानाच गाडीमध्ये श्रीवास्तव यांना फोन येतो. तुमच्यावर सरैय्या परिसरातील मुस्लिम पुरुष नाराजा झाले आहेत. इंद्रेशजी यांच्यासारखा माणूस फक्त महिलांशी संवाद साधतात आणि आमच्याशी नाही, ही गोष्ट त्यांना खटकलेली असते. मग दुसऱ्या दिवशी परिसरातील पुरुषांसमवेत इंद्रेशजी यांच्या गप्पागोष्टींचा कार्यक्रम निश्चित होतो. गाडीमध्ये इंद्रेशजी यांचा फोन खणाणतच असतो. कधी कुठल्या रिपोर्टरचा प्रतिक्रियेसाठी. तर कधी कार्यकर्त्यांचा माहिती देण्यासाठी किंवा दौरा विचारण्यासाठी. 



आता आम्ही चाललो होतो, सी एम अँग्लो बंगाली कॉलेजमध्ये. तिथं संस्कृती संसद २०१४ आयोजित करण्यात आलेली असते. काशीमधील पंडित, अभ्यासक, प्राध्यापक, संगीत विशारद, गायक वगैरे मंडळींचा जमावडा असतो. क्लासिकल गायक छन्नुलाल मिश्र, विवेक ओबेरॉय, भोजपुरी गायक मनोज तिवारी आणि असे अनेक जण तिथं असतात. काशी नगरीचे महत्त्व आणि ते अबाधित ठेवण्यासाठी योग्य व्यक्ती जिंकून येणे, कसे आवश्यक आहे, यावर तिथं चर्चा होते. दहा-पंधरा मिनिटं विचार मांडून ते तिथून निघतात. 



इंद्रेशजी यांना रात्रीच्या भोजनासाठी त्यांच्या मानलेल्या बहिणीकडे निमंत्रण असते. मी त्यांची रजा घेण्यासाठी विचारतो. मात्र, ते म्हणतात, तुम भी चलो. ओळख ना पाळख, शिवाय चार जण येणार म्हटल्यानंतर उगाच लोक वाढले तर अडचण नको, म्हणून जाणं टाळण्याचा प्रयत्न करतो. तेवढ्यात इंद्रेशजी म्हणतात, अरे चार लोक आएेंगे, मतलब आठ-दस लोगोंका खाना तो बनेगा ना. ये उत्तर प्रदेश है आशिष... 

काशी हिंदू विश्वविद्यालयात प्राध्यापक असलेल्या त्यांच्या बहिणीकडे भलताच तामजाम असतो. वेलकम ड्रिंकपासून ते आइस्क्रिमपर्यंत. शिवाय पंधरा एक लोकं सहजपणे जेवतील, अशी व्यवस्था केलेली असते. तिथं इंद्रेशजी फिरताना आलेले अनुभव, नरेंद्र मोदी यांना भेटल्यानंतरच्या आठवणी, भृगू ऋषिंनी लिहून ठेवलेल्या भविष्याचा किस्सा अशी मग गप्पांची मैफल रंगते. रात्रीचे अकरा वाजल्याचे समजल्यानंतर मग निघण्याच्या गोष्टी होतात. 

आमचा दिवस संपला असला तरीही इंद्रेशजींचा दिवस अजूनही सुरूच असतो. लखऊहून आलेल्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाच्या कार्यकर्त्यांसमवेत पुढील दिशा ठरविण्यासाठी ते निघून जातात.

अत्यंत मृदूभाषी, कार्यकर्त्यांना जपणारा, प्रचंड अभ्यासू आणि अनुभवी असूनही समोरच्या व्यक्तीच्या भाषेत बोलणारे, राजकारणापासून अत्यंत निकट असूनही सीमारेषा न ओलांडणारे, सामाजिक क्षेत्रात वावरताना अनेक नवी नाती जोडून ती रक्ताच्या नात्यांइतकीच जपणारे आणि मुख्य म्हणजे संघटना आणि देशासाठी वैयक्तिक आयुष्य अर्पण करूनही गर्वाचा लवलेशही नसलेले संघ अधिकारी म्हणजे इंद्रेशकुमारजी. इंद्रेशजी हे झालं एक उदाहरण. संघाचे असे हजारो अधिकारी आणि कोट्यवधी स्वयंसेवक एका ध्येयासाठी आणि उद्दिष्टासाठी अहोरात्र झटत आहेत. परिवर्तन घडविण्यासाठी. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी. 

माध्यमांना ही ताकद कधीच दिसणार नाही. पण ही ताकद आहे आणि जेव्हा जेव्हा ती ताकद ठरविते तेव्हा परिवर्तन घडतेच. आणीबाणीनंतरचे परिवर्तन असो, अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एक मताने पडल्यानंतरची निवडणूक असो किंवा सध्याची लोकसभा निवडणूक असो. जेव्हा जेव्हा संघ परिवार मैदानात उतरतो, तेव्हा चित्र पालटवून टाकतो...

आशीर्वाद दे गंगा मय्या...

काशी चलाए देश की नय्या... 

हिंदूंसाठी धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या काशीला सध्या अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. शिक्षण, साहित्य, कला, संस्कृती आणि परंपरा यासह अनेक गोष्टींचा संगम असलेलं काशी. गीता नि गाय यांच्या इतकीच पवित्र असलेल्या गंगेच्या तीरावर वसलेलं काशी. प्रत्येक हिंदूनं आयुष्यात एकदा तरी जाऊन गंगेत डुबकी मारावं, असं म्हटलं जातं ती काशीच. काशीस जावे, नित्य वदावे... सुरतनु जिमण अने काशीनु मरण... असं बरंच काही.



काशीचा विश्वेश्वर आणि गंगा माता यांना काशीच्या जीवनात अनन्यसाधारण स्थान आहे. हर हर महादेव ही घोषणा आणि कोणत्याही सांस्कृतिक-धार्मिक कार्यक्रमाच्या सुरुवातीला होणारं गंगास्तोत्राचं पठण हे त्याचंंच द्योतक. दररोज संध्याकाळी सात ते पावणेआठच्या दरम्यान गंगातिरी होणारी गंगा आरती ही इथं आल्यानंतर आवर्जून पाहण्यासारखी अनुभवण्यासारखी. वाराणसी नि गंगेबद्दल लिहायचं तर असं आणखी बरंच लिहिता येईल. पण नंतर कधीतरी...

सध्या मात्र, ही काशी वेगळ्याच कारणांसाठी चर्चेत आहे. अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलेल्या वाराणसी मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे सर्वांचे डोळे वाराणसीकडे लागले आहेत. उत्तर प्रदेश दौऱ्याची सुरूवात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या लखनऊ मतदारसंघापासून केल्यानंतर सांगता भारताच्या भावी पंतप्रधानांच्या मतदारसंघापासून करावी, असं डोक्यात होतं. शिवाय वाराणसीचं मतदानही शेवटच्या टप्प्यात असल्यामुळं इथं सर्वात शेवटी आलो.



जुन्या खुण्या जपणारं वाराणसी खूपच गजबजलेलं आहे. रस्ते अरुंद असल्या कारणानं जागोजागी होणारी वाहनांची कोंडी, त्यातून मार्ग काढत पुढे जाणाऱ्या सायकल रिक्षा, खचाखच भरलेल्या ऑटो रिक्षा, रस्त्याच्या कडेला पथारी टाकून बसलेले व्यावसायिक, चौकाचौकांत असलेले चहाचे ठेले, पानाच्या टपऱ्या नि कचौडी-सामोसे नि खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, इडली नि डोशाचेही ठेले, लस्सीची दुकानं, दुमजली किंवा फारतर तीन मजली इमारती अशी काहीशी वाराणसी. अर्थात, काशी विश्वनाथाच्या मंदिराच्या जवळ खूपच अस्वच्छता, दाटीवाटी, कोंडी आणि गर्दी. हिंदूंच्या कोणत्याही मंदिराजवळ जसं गलिच्छ वातावरण असतं तसंच काहीसं इथंही आढळतं. मुस्लिम मोहल्ल्यांतही इतर शहरांमध्ये असतो तसाच अंधःकार...

हे जसं वाराणसी शहराचं एक चित्र आहे, तसंच आणखी एक चित्रही आहे. भव्य मॉल्स, बारा-पंधरा मजली इमारती, बंगल्यांची वसाहत, सहा पदरी चकाचक रस्ते, भरधाव वेगानं धावणाऱ्या महागड्या एसयूव्ही, तारांकित हॉटेल्स आणि इतर शहरांमध्ये मिळणाऱ्या सर्व सोयी-सुविधा. विकसित होत असलेल्या वाराणसीचं हे दुसरं रुप.

एकाच शहराला तीन-तीन नावं कशी, याची उत्सुकता मला पहिल्यापासून होती. त्या उत्सुकतेचं शमन काशी हिंदू विश्वविद्यालयात इतिहासाचे प्राध्यापक असलेल्या डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी केलं. श्रीवास्तव हे मुस्लिम महिला फौंडेशनचे संस्थापक आहेत. काशी हे शहराचं प्राचीन-अर्वाचीन नाव. अगदी वेद आणि पुराणांमध्येही काशी नगरीचा उल्लेख आढळतो. वाराणसी हे नाव नद्यांवरून पडलेलं. वारूणा आणि अस्सी या दोन नद्यांच्या मध्ये वसलेलं गाव म्हणजे वाराणसी. तर उद्ध्वस्त झालेले काशी शहर बनार नावाच्या राजाने पुन्हा वसविली म्हणून बनारस. धर्म-संस्कृती-परंपरा मानणारे लोक या शहराचा उल्लेख काशी असा करतात, स्वतःला बुद्धिजीवी समजणारे आणि धीरगंभीर असणारे लोक या नगरीला वाराणसी म्हणतात. तर जे लोक खुशमिसाज, रंगीन आणि शौकीन आहेत, ते या शहराला बनारस म्हणून संबोधतात, अशी गमतीशीर माहिती श्रीवास्तव यांनी दिली. देश स्वतंत्र झाल्यानंतर सरकारी अध्यादेशानुसार या शहराचे नामकरण वाराणसी असे झाले.



आल्यानंतर पहिल्यांदा गंगेमध्ये डुबकी मारून स्नान केलं आणि मग आवरून बाहेर पडलो. शहरात जागोजागी नरेंद्र मोदींचे स्टीकर्स, पोस्टर्स नि मोठे फ्लेक्स लावलेले दिसतात. काशी आणि गंगा से मेरा रिश्ता पुराना है... किंवा आशीर्वाद दे गंगा मय्या, काशी चलाए देश की नय्या... अशा घोषणा लिहिलेले भव्यदिव्य होर्डिंग्ज दिसतात. भाजपच्या भगव्या टोप्या घालून हिंडणारे सायकल रिक्षावाले, मोदींचा प्रचार करणारे चहावाले आणि मोदींचे बिल्ले लावून बसलेले दुकानदार दिसतात. मोदींची टोपी, उपरणं किंवा बिल्ला लावून हिंडणं हा रोजच्या पेहरावातील अविभाज्य भाग आहे, असं वाटावं इतकी नागरिकांची संख्या जाणवते. वाराणसी येथे पोहोचल्यानंतर तेथील वातावरण अनुभवले आणि मोदी लहर म्हणजे नेमकी काय याचा अनुभव आला. सगळीकडे मोदी, मोदी आणि मोदी. प्रत्येकाच्या तोंडी एकच नाव नरेंद्र मोदी... 



अरविंद केजरीवाल यांचे बाहेरून आलेले समर्थक हे चौकाचौकांत झाडू हलवित उभे राहून नागरिकांकडे मतांचा जोगवा मागतात. आम आदमीच्या टोप्यांचे जागोजागी वाटप करतात. मोदी हे कसे नालायक, हरामखोर आणि भ्रष्ट आहेत, बनारसची वाट लावणार आहेत, अशा आशयाची पत्रक वाटतात. अब की बार मोदी सरकार, यानी आ बैल मुझे मार... अशा घोषणांचे स्टीकर्स चिकटवितात. केजरीवाल से जो डरता है, वो दो जगह से लढता है... ही केजरीवाल समर्थकांची आवडती घोषणा. बाकी मग काँग्रेसचे अजय राय, समाजवादी पक्ष नि बहुजन समाज पक्षाचं अस्तित्त्व अगदीच किरकोळ.

आल्यानंतर सर्वप्रथम भाजपच्या कार्यालयात गेलो. तिथं कार्यकर्ते नि पदाधिकाऱ्यांची फौजच्या फौज होती. भारताच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी आले होते. तमिळनाडू, केरळ, कर्नाटकपासून ते महाराष्ट्र, बिहार, झारखंड, राजस्थान, दिल्ली नि छत्तीसगड वगैरे. वाराणसीतील संबंधित राज्यांच्या नागरिकांपर्यंत पोहोचण्याचे त्यांना दिले आहे. शिवाय प्रचाराच्या इतर कामांमध्ये कसा उपयोग करून घेता येईल, याची यंत्रणाही आहे. भाजपचे विविध राज्यांतील मंत्री आणि प्रदेश पदाधिकारी असे शंभर ते सव्वाशे लोक वाराणसीत आहेत.



दुसरीकडे कोणत्या भागात आपल्या किती फेऱ्या झाल्या, याचा आढावा घेणारी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत आहे. स्वतःहून उत्साहाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्या त्यांच्या भागांमध्ये संपर्क करण्याची जबाबदारी सोपविण्यात येते आहे. डॉक्टर, इंजीनिअर, वकील, प्राध्यापक, व्यावसायिक, प्रशासकीय परीक्षा देणारे विद्यार्थी, इतर विद्यार्थी, साहित्यिक-लेखक आणि अशा विविध ग्रुपपर्यंत पोहोचून त्यांना मोदी कसे आवश्यक आहेत, या संदर्भात माहिती दिली जात आहे. चर्चा घडवून आणल्या जात आहेत.

माध्यमे आणि कार्यलयात बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्यांचा नि कामांचा निपटारा करण्याची, माहिती देण्याची जबाबदारी झारखंडचे संघटनमंत्री राजिंदरसिंगजी यांच्यावर आहे. त्यांनी संबंधित व्यक्तीला मला जोडून दिले. त्यामुळं मी माझ्या पुढच्या कामांना मोकळा झालो.

आम आदमी पार्टीच्या कार्यालयात गेल्यानंतर बरोबर वेगळे चित्र अनुभवायला मिळाले. माध्यमांशी बोलण्यासाठी तिथं कोणीही नव्हतं. पाच मिनिटांत कोणतरी येईल, असं सांगितल्यानंतर जवळपास तासभर वाट पाहूनही कोणीच आलं नाही. विविध राज्यांतून कार्यकर्ते हे केजरीवाल यांच्या प्रचारासाठी येत आहेत. कर्नाटक, आंध्र प्रदेश, दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश इत्यादी. आल्यानंतर त्यांनी वहीत नाव नोंदवायचं आणि मग त्यांची राहण्याची व्यवस्था लावली जाते, अशी पद्धत. मात्र, रस्त्यात उभे राहून झाडू हलवायचे, पत्रक वाटायची, टोप्या वाटायच्या या पलिकडे आपचा प्रचार नाही.

 

आम आदमीच्याच कार्यालयात एकानं किस्सा सांगितला. सगळेच बाहेरून आलेले असल्यामुळं कोणालाच शहराची आणि मतदारयादीची बारीक माहिती नाही. बाहेरून आलेल्या लोकांना एखाद्या भागात पत्रक वाटण्यासाठी पाठविले जाते. मात्र, तो भाग कुठून कसा आहे, हे माहिती नसल्यानं ते मिळेल त्या ठिकाणी पत्रक नि प्रचार साहित्य वाटत सुटतात. अनेकदा असं झालं, की एकाच वस्तीत एकाच दिवशी तीनवेळा आपचे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले. शेवटी लोक वैतागले. असं अनेकदा अनेक ठिकाणी घडतंय. त्यामुळं कार्यकर्ते असले तरीही आपकडे मजबूत यंत्रणा नाही, हे त्यांच्या कार्यालयातील व्यक्तीनंच कबूल केलं. शिवाय आपचे कार्यकर्ते शहरात प्रचार करीत असले तरीही ग्रामीण भागात त्यांचे अजिबात नेटवर्क नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आपचा प्रचार निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह प्रचार केला, की नरेंद्र मोदींनाच फायदा होतो, हे २००२ पासून सर्वज्ञात आहे. तरीही तीच चूक केजरीवाल करीत आहेत.



केजरीवाल हे मोदीना जोरदार टक्कर देणार, अशी परिस्थिती माध्यमांमधून निर्माण केली जात असली तरीही इथलं वास्तव वेगळं आहे. केजरीवाल यांना वाराणसीतून किंमत कळेल, अशीच परिस्थिती आहे. मोदी बाहेरचे असले तरीही भाजपची यंत्रणा मजबूत आहे. ती सोय केजरीवाल यांच्याकडे नाही. त्यामुळं केजरीवालांनी मोदींवर आरोप करण्याचा सपाटा लावला आहे. स्वतः काय करणार याऐवजी समोरचा कसा नालायक आहे, हे दाखविण्यातच त्यांचा वेळ जात आहे. केजरीवाल समर्थकांनी व्हिस्परिंग कॅम्पेन सुरू केले आहे. कशाला उगाच मोदींना मत देताय. ते वाराणसीचा राजीनामा देऊन वडोदऱ्याची सीट कायम ठेवणार आहेत. पुन्हा निवडणूक, पुन्हा मतदान. त्यापेक्षा केजरीवाल यांना मत द्या... असा प्रचार सुरू आहे. तरीही वाराणसीच्या जनतेने मोदी यांना दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्मरणात ठेवून मोदी इथला राजीनामा देणार नाहीत, असं ठाम प्रतिपादन अनेक मंडळी हिरीरीनं करतात.

माध्यमांनी उभा केलेला आणखी एक बागुलबुवा म्हणजे अजय राय आणि मुख्तार अन्सारी हे एक झाल्यामुळे मोदींच्या समस्येत भर पडली आहे. मुळात अजय राय यांना वाराणसीकर वैतागले आहे. आधी भाजप, मग समाजवादी पार्टी आणि आता काँग्रेसच्या वळचणीला गेलेल्या राय यांना वाराणसी नगरीत विशेष सन्मान नाही. राजकीय कारकिर्द संपुष्टात येण्याच्या दिशेने राय त्यांचा प्रवास सुरू आहे, असं इथं अनेकांनी सांगितलं. भरीस भर म्हणजे अन्सारी यांचा पाठिंबा घेतल्यामुळे राय यांच्या काही नातेवाईकांनीही मोदी यांना पाठिंबा दिला आहे. शिवाय गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या अन्सारी यांचा पाठिंबा घेतल्यामुळे काँग्रेसचे अनेक कार्यकर्तेही निराश झाले आहेत.

शिवाय मुख्तार अन्सारी हे पठाणी मुस्लिम आहेत. त्यांच्या जातीची वाराणसीतील मते अवघी तीन ते पाच हजार आहेत. वाराणसीत सर्वाधिक मुस्लिम समाज बुनकर म्हणजेच जुलाहा आहे. जुलाहा समाजाची जवळपास सव्वा लाख मते आहेत. जुलाहा आणि पठाणी मुस्लिम यांचे फारसे पटत नाही. त्यामुळे विणकर समाजाची मते काँग्रेसला मिळण्याची शक्यता फार थोडी आहे. विणकर समाजात मुस्लिम महिला फौंडेशनचे उत्तम काम आहे. या महिला दरवर्षी नरेंद्र मोदी यांना राखीपौर्णिमेला राखी वगैरे पाठवितात. त्यामुळे जवळपास पन्नास ते साठ हजार मुस्लिम मते मोदींना मिळविण्याचे टार्गेट श्रीवास्तव यांनी डोळ्यासमोर ठेवले आहे. उत्तर प्रदेशात मुस्लिम मतदारांनी काँग्रेसला साथ देण्याचे ठरविले आहे. तेवढाच काय तो अजय राय यांना दिलासा आहे. 




तेव्हा नरेंद्र मोदी वाराणसीतून जिंकणार आणि घसघशीत मताधिक्याने जिंकणार. किमान दोन ते तीन लाखांच्या मताधिक्यानं मोदी वाराणसीतून विजयी होणार, हे नक्की. वडोदरा आणि वाराणसी अशा दोन्हीकडून जिंकल्यानंतर ते वडोदरा सोडतील आणि इथली जागा कायम ठेवणार, हे निर्विवाद आहे. निवडणूक अर्ज भरताना ज्या पद्धतीने तीन-साडेतीन लाख लोक रस्त्यावर आले होते. ते पाहता मोदी हे वाराणसी सोडणार नाहीत, हे सांगण्यासाठी कोणत्याही राजकीय विश्लेषकाची गरज नाही. वाराणसीवासियांनी मोदींना भरभरून प्रेम आणि पाठिंबा दिला आहे. त्यामुळेच वाराणसीला पंतप्रधान निवडून देण्याची संधी प्रथमच उपलब्ध झाली आहे, अशाच धर्तीवर प्रचार भाजपकडून सुरू आहे आणि नागरिकांनीही ते मनोमन स्वीकारले आहे.


वाराणसी दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी नरेंद्र मोदी यांचा रोड शो होता. बेनियाबाग परिसरात त्यांना सभेसाठी परवानगी नाकारल्यानंतर त्यांनी रोड शो करण्याचे ठरविले. त्या रोड शोला नागरिकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेता नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचे किती प्रेम आहे ते दिसून येते. प्रचंड गर्दीमुळे मोदी यांच्या वाहनांचा ताफा पुढे सरकण्यास उशीर होत होता... साधारण तीन ते चार तास विलंबाने त्यांचा रोड शो सुरू होता. तरीही तरुणांपासून ते ७५ ते ८० वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक उत्साही नागरिक नरेंद्र मोदी कसे आहेत, ते प्रत्यक्ष पाहण्यासाठी थांबले होते. गुजरातचा विकास करणारा मोदी हा माणूस नेमका कोण आहे, हे पाहण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाडोत्री कार्यकर्ते नव्हे तर उत्स्फूर्तपणे सहभागी झालेले नागरिक पाहिल्यानंतर मोदी यांचा विजय निर्विवाद असल्याची खात्रीच पटली.



Tuesday, May 06, 2014

रामलला 'हम आएंगे'

मंदिर भव्य बनाऐंगे...

उत्तर प्रदेशात यायचं. लखनऊ, रायबरेली, अमेठी, वाराणसी आणि इतर ठिकाणी जायचं. पण अयोध्येला जायचं नाही, हे माझ्या मनाला कधीच पटणार नव्हतं. त्यामुळं व्हाया सुलतानपूर अयोध्येला निघालो. रात्री अयोध्येला पोहोचायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून आवरायचं. रामललाचं दर्शन घ्यायचं आणि मग पुढच्या प्रवासाला निघायचं असं डोक्यात होतं. सुलतानपूरहून बसमध्ये बसलो आणि माझ्या डोळ्यासमोर रामजन्मभूमी आंदोलनाचा सगळा पटच डोळ्यासमोरून जात होता. 



१९९० आणि १९९२ या दोन्ही वर्षी जेव्हा कारसेवा झाली, तेव्हा मी अनुक्रमे सहावी आणि आठवीमध्ये होतो. तेव्लहा हान असलो आणि आता बावीस-चोवीस वर्ष उलटली असली तरीही सगळं काही, अगदी कालपरवा घडल्यासारखं डोळ्यासमोर आहे. पहिल्या वेळेस चुलत भाऊ शैलेश आणि नंतर चुलत बहिण अर्चना कारसेवेत सहभागी झाले होते. शिवाय आमच्या परिसरातील अनिल बर्वे, विक्रम सुर्वे, प्रकाश जोशी, धनंजय वाघ, विनायक राहुरकर, धनंजय घाटेसह इतरही अनेक मित्र कारसेवेला गेले होते. त्यामुळे त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या कहाण्या, किस्से आणि आठवणी ऐकल्या होत्या. 

अयोध्या, श्रीराम जन्मभूमी आंदोलन आणि तेव्हाचा सगळा काळ डोळ्यासमोरून तरळत होता. पुणे स्टेशनवर अयोध्येकडे जाणाऱ्या कारसेवकांची गर्दी आणि खचाखच भरलेल्या रेल्वे दिसत होत्या. आताइतका माध्यमांचा धुमाकूळ नसल्यामुळे कुठून तरी उडत बातम्या येत असत. खरं तर बातम्या नाहीच. अफवाच त्या. मनोहर जोशी शिवसैनिकासह विमानाने कारसेवेला जाणार, कारसेवक पॅराशूटनं अयोध्येतील विवादित जागेजवळ उतरले वगैरे वगैरे बातम्या कूठून कुठून कानावर यायच्या. कुणीकुणी त्या बातम्या ऐकून फटाकेही फोडायचं आणि पेढेही वाटायचं. पण बऱ्याचशा बातम्यांमध्ये तथ्य नसायचे हे नंतर समजायचं. 



चौकाचौकांतील संदेश फलकांवर चिटकविलेल्या सामना आणि नवाकाळच्या बातम्या नि अग्रलेख वाचायला प्रचंड गर्दी होत असे. लोक उत्सुकतेने ते वाचत आणि त्यावर चर्चा व्हायची. नातूबागेच्या मैदानावर प्रमोद महाजन यांनी मोठी सभा घेऊन संघ स्वयंसेवकांच्या तिसऱ्या प्रकाराची व्याख्या केली होती. म्हणजे पहिला नियमित स्वयंसेवक, दुसरा नैमित्तिक कार्यक्रमांना येणारा स्वयंसेवक आणि तिसरा म्हणजे काय राडा करायचा आहे का,  तर येतो, असं विचारणारा स्वयंसेवक. रामजन्मभूमी आंदोलनात तिसऱ्या गटातील स्वयंसेवकांचा पुढाकार आहे, असं सांगून मिळविलेल्या टाळ्या... ते सगळं डोळ्यासमोर तरळत होतं. 

सौगंध राम की खाते है, मंदिर वही बनाएेँगे..., तलवार निकली है म्यान से, मंदिर बनेगा शान से..., रामलला हम आएंगे, मंदिर वही बनाऐंगे, मंदिर भव्य बनाऐंगे... जो न हमारे राम का, वो न हमारे काम का... सगळ्या घोेषणा पुन्हा एकदा कानात घुमत होत्या. सहा डिसेंबर १९९२ रोजी बाबराच्या नावानं तयार झालेली वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर देशभरात झालेला जल्लोष, रस्त्यारस्त्यावर वाटण्यात आलेली साखर आणि पेढे, रामजन्मभूमी आंदोलनाचा बदल घेण्यासाठी धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत पेटविलेली दंगल आणि बाळासाहेब ठाकरे नि शिवसेनेनं त्याला दिलेलं चोख प्रत्युत्तर, नंतर कायमचा धडा शिकेलेले धर्मांध मुसलमान, अयोध्या तो एक झाँकी है, काशी मथुरा अभी बाकी है... ही वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर घुमलेली घोषणा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर विनाकारण घातलेली बंदी आणि नंतर तोंडावर आपटलेलं सरकार, हिंदुत्ववाद्यांचे तेव्हा हिरो बनलेले कल्याणसिंह हे सारं काही सुलतानपूरहून अयोध्येला जाताना मला आठवत होतं. 



फैझाबादहून अयोध्येत पोहोचलो. दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर उठून शुचिर्भूत होऊन दर्शनासाठी निघालो. सगळीकडे मंगलमय वातावरण होतं. कुठं घरासमोर, दुकानांसमोर सडे घातले जात होते. रामचरितमानस, हनुमान चालिसा आणि राम-हनुमानाच्या भजनांचे स्वर कानावर येत होते. कुठे कचोरी (खस्ता), जिलेबी आणि सामोशाचे घाणे पडत होते. त्याचा गंध दरवळत होता. मंदिर मार्गावर जाताना दुकानदार मंडळी पेढे, प्रसाद, हार, फुलं घेण्यासाठी मागे लागत होती. तसे ते सगळीकडेच लागतात. त्या सर्वांना टाळून हनुमान गढीपर्यंत पोहोचलो.



चाळीस-पन्नास पायऱ्या चढून हनुमान गढीवर पोहोचलो. हनुमानाचे वंशज असलेल्या माकडांची वर्दळ मंदिरात सर्वत्र आहे. तुमच्या हातात प्रसाद असेल तर मग ते तुमच्या हातातून प्रसाद हिसकावतातच. तुम्ही दिला नाही, तर प्रसंगी चावतातही. हनुमान गढी इथं जाऊन 'राम लक्ष्मण जानकी, जय बोलो हनुमान की...' केलं. रामाचं दर्शन घेण्याआधी रामभक्त हनुमानाचं दर्शन घ्यावच लागणार. हनुमानाची दोन रुपं आहेत, एक वीर मारूती. जो पराक्रमी आहे, आक्रमक आहे. दुसरा आहे दास मारूती. महापराक्रमी परमप्रतापी वीर मारूती प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरणाचा दास म्हणून दास मारूतीचं रुप आपल्याला फक्त रामाच्या मंदिरातच दिसतं. इतर ठिकाणी असलेला गदाधारी हनुमान रामांच्या चरणी हात जोडून असतो. 

हनुमान गढीनंतर, जनक भवन, कनक भवन, दशरथ गद्दी वगैरे पाहिलं. दशरथ गद्दी इथं सहा फुटी हनुमानाची मूर्ती ठेवण्यात आली आहे. दशरथ गद्दी इथं जाताना गाइडनं एक गल्ली दाखविलं. १९९० मध्ये झालेल्या कारसेवेच्या वेळी दोन कारसेवक इथंच हुतात्मा झाले होते, असं त्यानं एका गल्लीत शिरताना मला सांगितलं आणि अंगावर अक्षरशः काटा आला. कोलकात्याचे रामकुमार कोठारी आणि शरदकुमार कोठारी या बंधूंचं राममंदिरासाठीचं बलिदन कोण विसरू शकेल. परिंदा भी पर मा नही सकेगा... या मुसलमानांचे मसीहा मुलायमसिंह यादव यांचं म्हणणं खोटं करून दाखविणाऱ्या कोठारी बंधूंनी लाठी-गोली खाऐंगे, मंदिर वही बनाऐंगे... असं म्हणत राममंदिरासाठी प्राणांची बाजी लावली. ऐहिक सुखासाठी कशाचीच तमा न बाळगणाऱ्यांच्या या जगात कोठारी बंधूंनी एका ध्येयासाठी, विचारासाठी प्राणांचे बलिदान केले. गाइडनं अयोध्येची माहिती देताना बोलता बोलता सांगितलं, की अयोध्येमध्ये एकूण साडेसात हजार छोटी-मोठी मंदिरं आहेत. इतकी मंदिरं आहेत. राम, सीता, हनुमान, शंकर भगवान, माँ दुर्गा आणि अशा अनेक देवदेवतांची मंदिरं आहेत. माझ्यामते त्या साडेसात हजार मंदिरांमध्ये आणखी दोन मंदिर कम स्मारकं हवीत. एक म्हणजे रामकुमार कोठारी यांचं आणि दुसरं शरदकुमार कोेठारी यांचं.



रामललाचं दर्शन घेण्यापूर्वी रामाचा दास हनुमान याचं दर्शन घेतलं. तसंच रामासाठी प्राणापर्ण करणाऱ्या त्यांच्या दोन सर्वश्रेष्ठ भक्तांचंही दर्शन घडलं. तिथून मग राममंदिराच्या दिशेनं निघालो. संपूर्ण अयोध्येत आणि विशेषतः मंदिराच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मुख्य प्रवेशद्वारापासून आत मंदिरासमोर जाईपर्यंत चारवेळा आपली काटोकोर तपासणी केली जाते. घड्याळ, मोबाईल, पेन ड्राईव्ह, सीम कार्ड, चिप वैगेर काहीही बरोबर नेऊ दिलं जात नाही. इतंकच सोडा कंगवा आणि टूथपिक सुद्धा त्यांनी काढून ठेवायला सांगितल्या. 



मंदिर मार्गावर प्रवेश केल्यानंतर सगळा मार्ग बंदिस्त आहे. तीनही बाजूंनी लोखंडी जाळीनं मार्ग बंदिस्त आहे. आपण फक्त चालत रहायचं. त्याचा सर्वाधिक फायदा म्हणजे परिसरातील माकडांपासून आपला बचाव होतो. अनेक वळणं वळणं पार करून एका चढावर पोहोचल्यानंतर मंदिर दिसू लागतं. मंदिरावर डौलानं फडकणारा भगवा झेंडा दिसू लागतो. चढ चढल्यानंतर साधारण वीस-पंचवीस पावलं चालल्यानंतर बरोब्बर मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर उभे राहतो. मंदिर आणि आपल्यामध्ये पन्नास पावलांचं अंतर असतं. इथूनच आपल्याला रामललाचं दर्शन घ्यावं लागतं. पण प्रकाशव्यवस्था उत्तम असल्यामुळं दर्शन खूप मस्त होतं. तंबूसारख्या आकारच्या मंदिरात रामलला विराजमान झाले आहेत. मोठ्या थाटात आणि दिमाखात विराजमान बसले आहेत. त्यांच्यासमोर नतमस्त झाल्यानंतर मग साधारण एक-दीड किलोमीटरची पायपीट करून पुन्हा लॉकर रूमपाशी पोहोचलो. 

मुळात कोणत्याही गावामध्ये गेल्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेण्याची फारशी उत्सुकता मला नसते. मात्र, अयोध्येचं राममंदिर त्याला अपवाद आहे. दलित समाजाच्या पुनरुत्थानात नाशिकच्या काळाराम मंदिराच्या आंदोलनाचं जे महत्त्व आहे, तेच हिंदू समाज संघटनाच्या इतिहासात राममंदिराच्या आंदोलनाचं महत्त्व आहे. त्यामुळं हे मंदिर इतर सर्व मंदिरापेक्षा वेगळं आहे. शिवाय काशी-मथुरेत मंदिराच्या बाजूला मशीद आहे. मंदिर पाडून मशीद बांधलेली नाही. इथं राममंदिर पाडून त्यावर मशीद बांधण्यात आली होती. मशीद कसली वादग्रस्त वास्तूच होती ती. ना तिथं मुस्लिम कधी नमाज पढले ना तिथं कधी धार्मिक प्रथापरंपरा जपल्या गेल्या. त्यामुळं अयोध्येचं आंदोलन हा एक धडा होता. शांतपणे शेजारी रहाल तर कदाचित आपण सुखाने नांदू शकू. पण जर आक्रमण करून आमच्या छाताडावर तुमची संस्कृती नि तुमच्या परंपरा लादण्याचा प्रयत्न केलात, तर बाबरी मशिदीसारखे उद्ध्वस्त व्हाल. रामजन्मभूमी आंदोलनाचा खरं तर हाच धडा सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे. 



रामललाचं छान दर्शन झाल्यानंतर मग नाश्त्याकडे वळलो. आधी पोटोबा आणि मग विठोबा ही म्हण अयोध्येसाठी लागू नव्हती. पुरीभाजी, कचौरी (खस्ता) आणि चहा घेतल्यानंतर मग अयोध्येतील लोकांशी थोडं बोललो. त्यांना काय वाटतं, काय नाही, हे जाणून घेतलं. अयोध्येतून 'लल्लूसिंह को इस बार नाही जिताया, तो भगवान राम भी हमें माफ नही करेंगे...' अयोध्येतील एका चहावाल्याची बोलकी प्रतिक्रिया. 'भैय्या मोदीजी का पीएम बनना तो तय है. इसबार नही तो कभी नही...' आणखी एक बोलकी प्रतिक्रिया. चहावाले, पानवाले, पुरीभाजीचे ठेले लावणारे, रस्त्यारस्त्यावरून भगवी वस्त्र घालून हिंडणारे साधू-साध्वी सगळ्यांच्याच तोंडी मोदीनामाचा जप. मंदिर बनेगा क्या... मंदिर बनना चाहिए क्या... या प्रश्नांना थेट उत्तर. 'मंदिर तो बनेगा. मंदिर बनने से कौन रोक सकता है. सब तय्यारी हो चुकी है. पत्थर काम भी पुरा हो  रहा है. अब सिर्फ मंजुरी मिलना बाकी है. एक दिन में मंदिर का काम शुरू हो जाएगा...' 



अयोध्यावासियांची प्रभू रामचंद्रांवर जेवढी श्रद्धा आहे, तेवढीच मंदिर बनणार आणि मोदीच ते बनविणार यावरही आहे. शौचालय व्हायलाच पाहिजे. पण देवालयही पाहिजे. विकास पाहिजे पण हेदेखील व्हायलाच पाहिजे, पण मूळ मुद्दे आणि विचार यांना तिलांजली देऊन नाही, यावरही आक्षेप असण्याचे कारण नाही. शिवाय आता बाबरी मशीद नामक वादग्रस्त वास्तू त्या ठिकाणी नाही. तिथं पुन्हा बाबरी मशीद बांधण्याची ताकद कोणत्याही पक्षाच्या सरकारमध्ये नाही आणि मुख्य म्हणजे आता तिथं असलेलं रामललाचं मंदिर हटविण्याची हिंमत असलेला 'माई का लाल' जन्माला आलेला नाही आणि भविष्यात कधीही जन्माला यायची शक्यताही नाही.

भरपूर लोकांशी बोलल्यानंतर मग श्री अयोध्येतून निघालो. अयोध्यावासियांच्या शब्दात सांगायचे तर अयोध्याजी मधून निघालो. मनातल्या मनात जोरात घोषणा दिली, 'रामलला हम आएंगे, मंदिर भव्य बनाऐंगे.' यामधील 'हम आएंगे' या शब्दाचा अर्थ काय आहे, हे सूज्ञ वाचकांना सांगण्याची काहीच गरज नाही. 

तेव्हा अयोध्येतून लखनऊसाठी निघालो. लखनऊला जाऊन मग पुढं वाराणसीसाठी निघायचं होतं. नरेंद्र मोदींप्रमाणेच 'मुझे भी माँ गंगा बुला रही है...'

बोलो सियावर रामचंद्र की जय... पवनसूत हनुमान की जय.