Saturday, June 28, 2014

उत्तर प्रदेश… उत्तम प्रदेश

दिलदार लोकांचा शानदार प्रदेश

लोकसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उत्तर प्रदेशला जाण्याचे निश्चित केले होते. संस्थेनं पाठविलं तर संस्थेकडून अन्यथा स्वतःहून जायचं. मुळात उत्तर प्रदेश आणि बिहारचे निकाल यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी खूपच निर्णायक होते, हे एक कारण नि दुसरे म्हणजे उत्तर प्रदेश नेमका कसा आहे, हे जाणून घेण्याची खूप उत्सुकता होती. त्यानुसार उत्तर प्रदेशच्या दिशेनं निघालो.


‘उत्तर प्रदेश आणि बिहारचे कामगार इथं महाराष्ट्रात येऊन सगळी वाट लावत आहेत’, ‘एक बिहारी सौ बिमारी’, ‘इथे येऊन राजकीय ताकद दाखविण्याचा प्रयत्न केलात, तर याद राखा,’ ‘छटपूजा नव्हे हटपूजा,’ अशा अनेकांची अनेक वक्तव्य डोक्यात होती. शिवाय तिथल्या गुंडाराजच्या बातम्या पेपरात आणि टीव्हीवर सातत्यानं झळकत असतातच. त्यामुळं अशा गोष्टींमधून उत्तर प्रदेशची अत्यंत वाईट प्रतिमा मनात तयार झाली होती. त्या पार्श्वभूमीवर तो प्रदेश कसा आहे, हे जाणून घेण्याची खूप इच्छा होती.


अखेर पुणे-लखनऊ एक्स्प्रेसनं निघालो. कानपूरचे अॅडव्होकेट राजशेखर माझे सहप्रवासी होते. त्यांनी बोलता बोलता सहज एक सल्ला दिला, की लखनऊच्या स्टेशनवर उतरल्यानंतर मोबाइल वगैरे जरा सांभाळून ठेवा. एखाद्याला तुमचा स्मार्टफोन आवडला तर तुम्ही तुमचा मोबाइल गमावून बसाल वगैरे वगैरे. बापरे, परिस्थिती इतकी गंभीर असेल, तर बारा-पंधरा दिवस आपली वाटच लागेल, असा विचार करून स्टेशनवर पाऊल ठेवलं.

पुण्याहून लखनऊला आलेला अभिषेक नावाचा एक मुलगा माझ्या मदतीला धावून आला. विप्रो की कुठल्याशा आयटी कंपनीत तो एका आठवड्यापूर्वीच जॉइन झाला होता. शिफ्टिंगसाठी तो लखनऊला आला होता. मला जायचं होतं, त्याच परिसरात त्यालाही जायचं होतं. मग त्याच्या बरोबरच नव्यानं वसविण्यात आलेल्या गोमतीनगर परिसरात पोहोचलो. पोहोचायला संध्याकाळ झाली होती. त्यामुळं आराम करून दुसऱ्या दिवशीपासून फिरणं सुरू करायचं असं ठरविलं होतं. लखनऊ शहर, रायबरेली, अमेठी, बाराबंकी, मोहनलालगंज, सुलतानपूर, फैझाबाद, अयोध्या, आझमगढ आणि वाराणसी असं बरंच फिरलो. अगदी सहजपणे भेटणार असतील तर राजकारण्यांची भेट घेतली. गावातील लोकांना अधिक भेटलो, त्याच्यांशी बोललो. त्याच गाठीभेटी अधिक उपयुक्त ठरतात, असा माझा अनुभव आहे.

रायबरेलीला जाताना हिंदीचे निवृत्त शिक्षक जयद्रथ चौधरी भेटले. ते देखील रायबरेलीला जात होते. ‘रायबरेली आणि परिसराला निसर्गाचे वरदान आहे. इथं खूप पाऊस पडतो. त्यामुळं इथं प्रामुख्यानं भाताची शेती होते. पिकं चांगली येत असल्यानं शेतकरी सधन आहे. रायबरेली आणि परिसरात प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या सुविधा चांगल्या आहे. बहुतांश मुली किमान दहावीपर्यंत शिकतात. मुली अभ्यासात हुशार आहेत…’ अशा विविध विषयांवर ते माहिती देत होते.

नरेंद्र मोदींची लाट आणि गांधी परिवार अशा राजकीय विषयांवरही ते दिलखुलासपणे बोलत होते. मोदींची लाट इथंही जाणवते आहे. मात्र, सोनिया गांधी यांनाच मी मत देणार. आम्ही नेहमी त्यांनाच देतो. त्यांचे आणि इथल्या नागरिकांचे भावनिक नाते आहे वगैरे वगैरे. गप्पा मारता मारता कधी रायबरेलीला पोहोचलो ते कळलंच नाही. एसटीतून उतरल्यानंतर ते म्हणाले, ‘चलिए…’. मी म्हटलं, ‘कहा?’ तेव्हा म्हणाले, ‘हमारे घर. भोजन का समय हो गया है. खाना खिलाए बगैर में आपको जाने नही दूँगा. आप हमारे गांव में पहली बार आए है. आप हमारे मेहमान है.’ मला धक्काच बसला. मग त्यांना समजावून सांगितलं, की मला फिरायचं आहे. लोकांशी बोलायचं आहे. प्रियांका गांधी यांच्या रॅलीमध्ये जायचं आहे. जेवण्यात खूप वेळ जाईल. 


मग संध्याकाळी तरी जेवायला जरूर या, अशी गळ ते घालू लागले. मला त्यांचा आग्रह मोडवत नव्हता. पण मला खरंच जमणार नव्हतं. मग ते म्हणाले, ‘ठीक है. चलिए लस्सी ही पी लेते है.’ शेवटी मस्त मलईदार लस्सी पिऊन आम्ही एकमेकांचा निरोप घेतला. मला सांगा, एसटीत भेटलेल्या एखाद्या माणसाला आपण तरी कधी इतका आग्रह करतो का? किमान मी तर आतापर्यंत कधी केलेला नाही. महाराष्ट्रातून एक जण आपल्या प्रदेशात काहीतरी कामासाठी आलाय. आपण त्याची खातिरदारी केली पाहिजे, ही जयद्रथ चौधरी यांची भावनाच माझ्यासाठी पुरेशी होती.

उत्तर प्रदेशच्या ग्रामीण भागात फिरताना जाणवलेल्या दोन गोष्टी म्हणजे इथले लोक खूप गरीब असले, तरीही मनानं खूप श्रीमंत आहेत. म्हणजे राजकारण्यांनी ग्रामीण भागातील लोकांना मुद्दामून गरीब, अशिक्षित नि अविकसित ठेवलं आहे. ही मंडळी छोट्या छोट्या गोष्टींसाठी आपल्याकडेच येतील. मग आपण दरवेळी उपकार केल्याच्या थाटात एखादा तुकडा टाकून त्यांना खूष करू, अशी अत्यंत नीच भावना इथल्या सत्ताधारी राजकारण्यांची आहे… हे मत माझं नाही. हे मत आहे अमेठीत भेटलेल्या राजन पासीचं. माजी आमदार रामलखन पासी यांचा हा पुतण्या. ड्रायव्हर म्हणून काम करतो. 


काही गावात गुंडामार्फत धमक्या द्यायच्या. ‘आम्हाला मतं दिली नाहीत, तर तुमचे हातपाय तोडू.’ कुठं रस्ता, वीज किंवा शाळा सुरू करू, अशी लालूच दाखवायची. कुठं आणखी काही आश्वासनं देऊन वेळ मारून न्यायची, असं करून ही मंडळी वर्षानुवर्ष सत्तेवर आहेत. विकास नावालाही नाही. ही झाली काँग्रेसवाल्यांची रणनिती. दुसरीकडे समाजवादी पार्टीचे नेते-कार्यकर्ते सत्तेवर आल्यानंतर गुंडागर्दी करण्यात आणि रुबाब गाजविण्यात मग्न असतात. तर मायावती यांना आंबेडकर पार्क, शाहू पार्क, कांशीराम पार्क आणि स्वतःचे पुतळे यांच्यावर काही शेकडो कोटी रुपये खर्च करण्यातून लोकांकडे पहायला वेळच मिळत नाही.

लोकांना शिक्षण, आरोग्याच्या सुविधा, चांगले रस्ते, २४ तास वीज आणि मुबलक पाणी हवंय. मात्र, त्यांच्या या मागण्या बधीर राजकारणी मनावर घ्यायलाही तयार नाहीत. भाजपची ही परिस्थिती काही वेगळी नाही. भाजपचे आधीचे नेते एकमेकांच्या तंगड्या ओढण्यातच मग्न होते. त्यांनाही लोकांकडे लक्ष द्यायला सवड नव्हती. मात्र, नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वामुळे भाजपला तिथं संजीवनी मिळाली. मोदी यांनी गुजरातमध्ये खूप काही विकासकामे केली आहेत. तिथं २४ तास वीज असते. चांगला रोजगार आहे. गुंडागर्दी नाही. उत्तर प्रदेशातील आहोत, म्हणून हिडीसफिडीस नाही. अशा अनेक कथा नि अनुभव गुजरातेत काम करणाऱ्या कामगारांनी उत्तर प्रदेशातील त्यांच्या गावात ऐकविल्या होत्या. त्यामुळेच मोदी या माणसाला एकदा संधी देऊन तर बघू. गुजरातचा विकास केला म्हणतात. पाहू या, उत्तर प्रदेशचा कसा विकास करतो. या आणि केवळ या एकाच आशेवर उत्तर प्रदेशातील पिचलेल्या आणि गांजलेल्या मतदारांनी मोदींच्या पारड्यात भरभरून मते टाकली. ‘नरेंद्र मोदी से बहुत उम्मीद है…’ हे वाक्य जवळपास प्रत्येक ठिकाणी कानावर पडत होतं. आता बोला.

रिक्षावाल्यावरून आठवलं. उत्तर प्रदेशात सायकल रिक्षा सगळीकडेच आहेत. तिथं रिक्षा म्हणजे सायकर रिक्षाच. आपण जिला रिक्षा म्हणतो, तिला तिथं ऑटो म्हणतात. साधारण एका चौकासाठी पाच ते दहा रुपये इतके पैसे ही मंडळी घेतात. रिक्षा चालविणारे बरेच जण शेतमजूर आहेत. शेतीची कामं नसतील, तेव्हा घर चालविण्यासाठी ही मंडळी रिक्षा चालवितात. लखनऊमध्ये दोन-तीन जणांशी सहज बोलल्यानंतर ही माहिती कळली.


माणुसकी पिळवटून टाकणाऱ्या अशा रिक्षामध्ये बसणं मला फारसं इष्ट वाटत नाही. त्यामुळं लखनऊ आणि इतर गावांमध्ये मी सायकल रिक्षांमध्ये बसणं टाळलं. मात्र, वाराणसीमध्ये असताना मला जिथं जायचं होतं तिथपर्यंत या सायकल रिक्षाच जातात. त्यामुळं नाईलाजानं मला त्यात बसणं भागच होतं. सायकल सुरू झाली आणि आमचंही बोलणंही. अजूनही तो संवाद माझ्या कानात घुमतोय. तो संवाद आठवला, की आजही अंगावर शहारे येतात.

तो रिक्षावाला आधी वाराणसीत साड्यांवर नक्षीकाम आणि कलाकुसर करणारा कलाकार होता. मात्र, कम्प्युटरवर वेगवेगळी डिझाइन्स तयार करण्यात येऊ लागल्यानंतर अशा कलाकारांचं महत्त्व कमी झालं. खूप फिरून, इकडे तिकडे हात मारून पाहिले. मात्र, शेवटी कुठंच काही मिळेना. शेवटी एके दिवशी सगळे कुटुंबीय उपाशी राहिले. शेवटी ठरविलं, जगण्यासाठी सायकल रिक्षा चालविण्यावाचून पर्याय नाही. तेव्हापासून रिक्षा चालवितोय… भोलू सांगत होता.

‘किती मुलं आहेत तुम्हाला. शिकतात ना ते सगळे,’ मी.

‘सहा मुलं आहेत. तीन मुलं आणि तीन मुली. एकीचं या जानेवारी महिन्यात लग्न झालं. बाकीचे सगळे शिकत आहेत. मला माझ्या परीनं जेवढं शिकविता येईल तेवढं शिकवतोय त्यांना साहेब,’ इ भोलू.

सकाळी सात वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत ४५ डिग्री सेल्सियसमध्ये मरमर करून सायकल चालविल्यानंतर त्याला कसेबसे साडेचारशे रुपये मिळणार. त्यापैकी चाळीस रुपये भाड्याचे. म्हणजे अवघ्या चारशे रुपयांत हा माणूस आठ जणांच्या संसाराचा गाडा कसा ओढत असेल, या विचारानंच मला गलबलून गेलं. 


जानेवारीत त्याच्या मुलीचं लग्न झालं होतं. त्यासाठी त्यानं तब्बल पाच-सहा लाख रुपये खर्च केला होता. साग्रसंगीत लग्न लावून द्यायचं. बारा ते पंधरा तोळे सोने. जावयाला डिस्कव्हर गाडी. शिवाय घरात रंगीत टीव्ही, फ्रीज, फर्निचर इ. इ. हे सगळं ऐकून मला वेड लागायची वेळ आली होती.

‘अरे, बाबा इतका खर्च कशाला करायचा. साधं लग्न लावून द्यायचं ना…’ माझं वाक्य संपतं ना संपत तोच भोलू म्हणाला, ‘साहेब, माझ्या मुलीला रिकाम्या हातानं पाठविलं असतं तर सासरकडच्यांनी तिला एक दिवस पण ठेवून घेतलं नसतं. परत पाठवून दिलं असतं. साधं लग्न लावून द्यायचं म्हणायला बरंय. पण समोरच्यांना ते नाही चालत. वाईट आहे, पण उत्तर प्रदेशात हीच प्रथा आहे. मी एकटा काही करू शकत नाही. चार लोकं करतात, तेच मला करावं लागतं.’ देवा… आता तो दिवसाला चारशे रुपये कमविणारा भोलू सहा लाखांचं कर्ज फेडणार कसं आणि उर्वरित दोन मुलींचं लग्न लावणार कसं, ही कल्पनाच मला अस्वस्थ करून टाकत होती.

‘साहेब, ऊन-पाऊस कशाचीच पर्वा न करता सायकल चालवावी लागते. अंगात ताप असेल तरी एखादी गोळी-औषध घेऊन सायकल चालवावीच लागते. नाहीतर रात्री घरी चूल पेटत नाही. जेवायचं काय हा प्रश्न पडतो…’

‘बहोत ही मेहनत का काम है ये. सायकल चलाना आसान काम नही है साहब. ये सायकल खून चुसती है खून.’ भोलूचं हे वाक्य इतकं खतरनाक होतं, की आजही त्याचा तो आवाज आणि ते वाक्य मधूनच कानात घुमतं.

‘भगवान सबका भला कर, लेकिन शुरूवात मुझसे कर,’ असं गमतीगमतीत आपण म्हणतो. मात्र, नरेंद्र मोदी सरकारमुळे जर खरेच ‘अच्छे दिन येणार असतील, तर त्याची सुरूवात भोलू नि उत्तर प्रदेशातील अशा लाखो गरीब, बेरोजगार, अशिक्षित लोकांपासून व्हावी,’ असे माझे साकडे आहे. रेल्वेच्या भाड्यात १४ टक्के वाढ केली म्हणून गळा काढणाऱ्यांकडे नंतरही लक्ष देता येईल. मात्र, जो खरोखरच वर्षानुवर्षे पिचलेला आहे, त्याला प्राधान्य द्यायला हवे. किमान इतका दिलदारपणा तरी आपण नक्कीच दाखवू शकतो.


लखनऊत समाजवादी पार्टीच्या कार्यालयात राजेंद्र चौधरी भेटले. समाजवादी पार्टीचे प्रमुख प्रवक्ते. जितके समाजवादी विचारांचे कट्टर तितकेच मुलायमसिंह यांचे भक्त. म्हणजे त्यांचा फोटा काढतानाही त्यात मुलायमसिंह यांचे पोस्टर यावं, अशी त्यांची इच्छा होती. ‘नेताजी के पोस्टर के साथ हमारी तस्वीर आएगी तो बेहतर रहेगा.’ खादीचा कुर्ता पायजमा. खुरटी दाढी आणि प्रसन्न, हसतमुख मुद्रा. आणीबाणीच्या काळात आमदार असलेल्या चौधरी यांना भेटायला एक कार्यकर्ता आला होता. त्याच्या तोंडात मावा की तंबाखू काही तरी होतं. हसतहसत चौधरी त्याला म्हणाले, ‘तुम्ही कसे कार्यकर्ते आहात. इतक्या वर्षात मी साधी सुपारीही खाल्लेली नाही. पानसुपारी तर सोडाच, मी पेप्सी नि कोकाकोलाही प्यायलेला नाही…’ 

समाजवादी विचारांच्या शिकवणीनंतर आमच्या गप्पा सुरू झाल्या. उत्तर प्रदेशात रोजगार निर्मिती का केली जात नाही. इथल्या लोकांना कामासाठी बाहेर पडण्याची वेळ का येते, हा माझा प्रश्न त्यांना कदाचित अपेक्षितच असावा. ‘हे बघा, चांदोरकर. इथली बरीचशी जमीन सुपीक आहे. तिथं शेती होते. त्यामुळं सुपीक जमिनीवर शेती बंद करून कारखाने लावणं योग्य नाही, असं आमचं मत आहे. शिवाय आमची लोकसंख्याच इतकी आहे, की तुम्ही कितीही कारखाने आणि उद्योगधंदे सुरू केलेत, तरी लोक पोटापाण्यासाठी बाहेर जाणारच. आमचे लोक कष्ट करणारे आहेत. मेहनती आहेत. शांतपणे राहणारे आहेत. मग तुम्हाला काय अडचण आहे. तुम्ही उत्तर प्रदेशकडे मजूर किंवा कामगार पुरविणारा प्रदेश म्हणून पाहिले, तर तुम्हाला हा प्रश्न पडणार नाही.’ त्यांच्या उत्तरानं माझं पूर्ण नाही, तरी काहीसं समाधान झालं होतं.


मग त्यांनी चांदोरकर या नावाचा नेमका अर्थ काय. तेंडुलकर, मंगेशकर, गावस्कर अशा नावांची कहाणी काय याची विचारणा केली. राहण्याची काय व्यवस्था आहे की करायची आहे, वगैरे विचारपूस केली. उत्तर प्रदेशचे कामगार कुठेही गेले तरी जास्त दमबाजी करणार नाहीत. बिहारचे मजूर मात्र, दादागिरी नि गुंडागर्दी यात थोडे अग्रेसर असतात. तुलनेनं आमच्या कामगारांमध्ये ती वृत्ती कमी आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्यांच्या या वाक्याचा प्रत्यय मला वाराणसीत आला. तिथं सायकल रिक्षा चालविणारे आणि अनेक मजूर-कामगार हे बंगाल नि बिहारमधील होते. मात्र, बिहारी लोकांनी तिथंही दमबाजी करण्यास प्रारंभ केला. मग स्थानिकांनी त्यांना पिटाळून लावलं, हे समजताच मला चौधरींची आवर्जून आठवण झाली.

उत्तर प्रदेशात आलेला आणखी एक अनुभव म्हणजे मी महाराष्ट्रातून आलो आहे, हे माहिती असूनही एकानं देखील शिवसेना किंवा मनसेबद्दल तक्रार केली नाही. त्यांच्याबद्दल वाईट शब्द वापरले नाहीत. किंवा टीका केली नाही. त्यांच्या मनात या संघटनांबद्दल राग असता तर बोलताना या ना त्या पद्धतीने व्यक्त झालाच असता. मात्र, पंधरा दिवसांच्या काळात तो कधीच मला जाणवला नाही. ना मी महाराष्ट्रातील आहे, म्हणून मला वाईट वागणूक मिळाली.

लखनऊला जात असताना चौधरी कुटुंबीय माझे सहप्रवासी होते. ते देखील कानपूरचेच. ते पुण्यात पर्सिस्टंटमध्ये कामाला होते. त्यांची पत्नी सहजपणे बोलता बोलता म्हणाली, ‘आमच्या इमारतीमध्ये कानपूरचेच एक जण आहेत. त्यांनी मला सुरुवातीलाच सांगितलं होतं, की तुम्ही उत्तर प्रदेशचे आहात, असं अजिबात सांगू नका. दिल्लीचे आहात, असं काहीतरी सांगून टाका. महाराष्ट्रात उत्तर प्रदेशच्या लोकांबद्दल खूप घृणा आहे. त्यांच्याकडे वेगळ्या नजरेनं पाहिलं जातं.’ सॉफ्टवेअर कंपनीत काही लाख रुपयांचे पॅकेज घेणाऱ्या कुटुंबाला त्यांची मूळ ओळख लपवावी, असं वाटत असेल तर त्यांच्या मनात महाराष्ट्राचे काय चित्र निर्माण झाले असेल याचा विचारच न केलेला बरा.

वास्तविक पाहता, अशी परिस्थिती नाही. सर्वांना अगदी सहजपणे सामावून घेणारा आणि कोणत्याही प्रांतात अगदी सहजपणे मिळून मिसळून राहणारा समाज ही मराठी माणसाची ओळख आहे. मात्र, तरीही काही दळभद्री ‘राज’कारण्यांमुळे महाराष्ट्राचे वेगळे आणि चुकीचे चित्र उत्तरेत निर्माण झाले आहे. गुजरातमध्ये दौऱ्याची नौटंकी करणाऱ्यांनी एकदा उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जाऊन परिस्थिती पाहिली पाहिजे. तिथली गरिबी जवळून पहावी. त्यांच्याशी बोलावं. त्यांच्या भावना समजून घ्याव्यात. म्हणजे कितीही संख्येनं ते आले तरी त्यांच्यावर हात उचलण्याची इच्छा होणार नाही. 




उत्तर प्रदेशात इंग्रजी भाषेच्या शिक्षणाची फार चांगली परिस्थिती नाही. मुलायमसिंह सरकार तर इंग्रजीच्या विरोधातच आहे. अनेक तरूणांची संगणकाशी तोंडओळखही नाही. त्यामुळं अनेक ठिकाणी विविध परीक्षांचे ऑनलाईन फॉर्म भरून मिळतील, असे फलक लावलेले दिसतात. एक तर इंग्रजीची बोंब आणि दुसरे म्हणजे कम्प्युटर शिक्षणाचा अभाव. व्यावसायिक शिक्षणासाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक. त्या नाहीत, म्हटल्यावर फक्त पारंपरिक पदव्यांचाच पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध राहतो. फक्त एमए, एमकॉम आणि एमएस्सी झाल्यानंतर नोकऱ्या अगदीच मर्यादित. शाळेत किंवा कॉलेजात शिक्षक. नाहीतर सरकारी नोकरीत शिपायापासून ते क्लार्कपर्यंत काहीही. एक तर शेती नाहीतर सरकारी नोकरी. म्हणूनच ही मंडळी रेल्वे, पोस्ट, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या परीक्षा अधिक संख्येनं देतात. कारण पर्याय अगदीच मर्यादित. त्यामुळं महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात कुठंही सरकारी नोकरीची परीक्षा असेल तर ही मंडळी आवर्जून उपस्थिती लावतात. त्याचे कारण हे आहे. सुरुवातीपासून सर्वांना इंग्रजी आणि कम्प्युटर शिक्षण सक्तीचे केले तर तिथली परिस्थितीही नक्कीच बदलेल, असं मला वाटतं. त्या मंडळींना बदडून काढून समस्या अजिबात सुटणार नाही.

उत्तर प्रदेश जवळून पाहण्याची माझी इच्छा पूर्ण झाली होती. वैयक्तिक माझा अनुभव खूप चांगला होता. उत्तर प्रदेशात गरिबी असली तरीही इथली माणसं मनानं खूप श्रीमंत आहेत, हे मी पुन्हा एकदा आवर्जून सांगतो. ती माणसं दिलदार आहेत. आदरातिथ्य करण्यात खूप पुढं आहेत. मोकळीढाकळी आहेत. मला तर उत्तर प्रदेश एकदम उत्तम प्रदेश वाटला. फक्त एकच इच्छा आहे, की मनानं श्रीमंत असलेली ही माणसं पैशानं, मानानं, शिक्षणानं, विकासानं आणि सोयी-सुविधांनी श्रीमंत व्हावीत. नरेंद्र मोदी ही परिस्थिती निर्माण करतील, अशी आशा आहे. पाहूया काय होतं ते…