Friday, December 21, 2012

कशी साधली मोदींनी हॅट्‍ट्रिक?

विकास कामांना राजकीय धूर्तपणाची साथ

गुजरात ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ; तसेच भारतीय जनता पक्ष यांची प्रयोगशाळा आहे, या राष्ट्रीय स्तरावर व्यक्त होणाऱ्या मतावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. गुजरातमध्ये सलग सहाव्यांदा, स्वबळावर पाचव्यांदा आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली लागोपाठ तिसऱ्यांदा सत्ता काबीज करून भाजपने मक्तेदारी सिद्ध केली आहे. सलग २२ वर्षे सत्तेत असल्यामुळे आलेली ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’, दोन्ही टप्प्यातील विक्रमी मतदान आणि खुद्द संघ परिवारातील अनेक संघटनांनी उघड उघड पुकारलेले बंड... अशा गोष्टी विरोधात असूनही मोदी यांनी जवळपास गेल्या वेळेइतक्याच जागा अधिक जिंकून सर्व विरोधकांना पुन्हा एकदा गप्प केले आहे. 

गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी सरकारने केलेल्या विकासकामांचे विजयामध्ये महत्त्वपूर्ण योगदान आहेच. त्याच बरोबर येणाऱ्या संकटांना ओळखून वेळीच त्याविरोधात मोदी यांनी आखलेल्या रणनीतीनेही भाजपच्या विजयामध्ये मोलाची कामगिरी निभावली आहे. काय होती ती रणनीती हे पाहू या... 


१) केशुभाई पटेल यांच्या गुजरात परिवर्तन पार्टीच्या स्थापनेमुळे सौराष्ट्रात भाजपची धूळधाण होईल. कारण पटेल समाज हा केशुभाईंच्या पाठिशी आहे वगैरे...

- मुळात सर्व पटेल समाज हा केशुभाईंच्या पाठीशी आहे, हा एक गैरसमज होता. मात्र, मोदी यांनी कोणतीही ‘रिस्क’ घेतली नाही. त्यांनी तब्बल ५५ पटेल उमेदवारांना तिकिटे दिली. त्यापैकी ४० जण निवडून आले; तसेच त्यांनी ९८ आमदारांना पुन्हा तिकिटे दिली. सर्वच्या सर्व मंत्र्यांना पुन्हा रिंगणात उतरविले. कारण या मंडळींना तिकिटे नाकारली असती, तर ते थेट केशुभाईंच्या गोटात दाखल झाले असते, अशी भीती होती.
लेवा पटेल समाजाची १४ टक्के मते एकवटली. तशीच त्यांच्या विरोधातील कडवा पटेल, राजपूत, क्षत्रिय आणि इतर मागासवर्गीयांची मतेही एकवटली. ही मते भाजपकडे वळविण्यात मोदी यशस्वी झाले. त्यामुळे केशुभाईंनी वेगळी चूल मांडूनही भाजपला सौराष्ट्रात विशेष धक्का जाणवला नाही. तर दक्षिण गुजरातमध्ये भाजपची कामगिरी वधारली. केशुभाई आमच्यासोबत नसले तरी पटेल समाजात मानाचे स्थान असलेल्या नरहरी अमीन यांचा भाजपला पाठिंबा आहे, हे समाजमनावर ठसविण्यात मोदी यशस्वी झाले. 

२) सलग चारवेळा सत्तेत असल्यामुळे भाजप आणि उमेदवारांविरुद्ध मोठ्या प्रमाणावर ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’ होती. 

- नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळातील दिलीप संघानी, प्रफुल्ल पटेल आणि जयनारायण व्यास तसेच प्रदेशाध्यक्ष आर. सी. फलदू यांना पराभवाचा धक्का बसल्याने ही ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’ प्रकर्षाने दिसून आली. मात्र, मोदी यांनी काही मंत्र्यांचे मतदारसंघ बदलले. काहींना दुसऱ्याच विभागातून लढविले. म्हणजे आनंदीबेन पटेल यांना पाटणऐवजी अहमदाबादमधील घाटलोडियातून उतरविले आणि निवडून आणले. अत्यंत निकटवर्तीय असलेल्या सौरभ पटेल यांना सौराष्ट्रातील बोटादऐवजी बडोद्यातील अकोटामधून रिंगणात उतरविले. तेथून ते जिंकले. अनेक प्रस्थापित मंत्री आणि उमेदवारांना मतदारसंघ बदलण्यास भाग पाडले. जाहीर सभांमध्ये नरेंद्र मोदी यांचा आग्रह भाजपला आणि कमळाला मत द्या, असाच आग्रह असायचा. बहुतांश ठिकाणी ते उमेदवाराचे नाव घेणेही टाळत. जेणेकरून उमेदवाराकडे पाहून मत न देता माझ्याकडे पाहून मत द्या, असे सांगून त्यांना ‘अॅन्टीइन्कम्बन्सी’ची धार कमी करायची होती. 


३) संघ परिवारातील अनेक संघटना, वरिष्ठ पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते मोदी यांच्याविरोधात कार्यरत होते. गुजरात परिवर्तन पक्षाच्या स्थापनेमागेही यापैकीच काही जणांचा हात असल्याची चर्चा होती. 

- नरेंद्र मोदी यांचा स्वतःचा करिष्मा असला आणि त्यांच्या तोडीचा सर्वमान्य नेता आज तरी गुजरातमध्ये नसला तरी केशुभाई यांना कमी लेखण्यास मोदी तयार नव्हते. त्यामुळेच त्यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी सरसंघचालक मोहन भागवत यांची नागपूरला संघ मुख्यालयात जाऊन भेट घेतली. संघाचे काही वरिष्ठ अधिकारी, स्वयंसेवक आणि प्रचारकही केशुभाईंसाठी काम करीत होते. त्यांना संघाकडून योग्य तो संदेश जाण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केल्याचे समजते. त्यानंतर संबंधितांना निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते.
विश्व हिंदू परिषदेच्या काही नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध कमी व्हावा, यासाठी ते परिषदेचे ज्येष्ठ नेते अशोक सिंघल यांच्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले. ‘मोदी यांना विहिंपचा विरोध नाही. तसा दावा कोणी करीत असेल तर त्यात तथ्य नाही. ते एका व्यक्तीचे मत असू शकेल,’ असे जाहीरपणे मत सिंघल यांनी तेथे मांडले. त्यामुळे परिवारातील विरोधाचे हत्यार त्यांनी मोठ्या चतुराईने बोथट केले. 

४) शहरांमध्ये भाजप होताच. तुलनेने ग्रामीण भागात परिस्थिती दोलायमान होती. त्या ठिकाणहून पाठबळ मिळणे आवश्यक होते. 

- निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी मोदी यांनी संपूर्ण गुजरातमध्ये ‘गरीब कल्याण मेलो’ घेतले. गावातील महिला, अपंग, अल्पसंख्याक, झोपडपट्टीवासी आणि आर्थिकदृष्ट्या मागास लोकांकडून त्यांनी अर्ज भरून घेतले. त्यामध्ये उद्योगासाठी, व्यवसायासाठी सरकारकडून काय अपेक्षित आहे, याची माहिती होती. विविध योजनांच्या नावाने त्यांनी लोकांना अपेक्षित असलेल्या वस्तूंचे वाटप केले. पैशामुळे शिक्षण थांबले असलेल्या गरीब विद्यार्थांना मदत केली. सरदार पटेल, इंदिरा आवास, आंबेडकर आणि दीनदयाळ आवास योजनेअंतर्गत घरे आणि प्लॉट्सचे वाटपही झाले. प्रत्येक मतदारसंघात जवळपास दहा हजार आणि एका जिल्ह्यात ४० ते ५० हजार लोकांना या योजनेचा फायदा झाला. काही हजार कोटी रुपये या योजनेवर खर्च करण्यात आले. या योजनेत फायदा झालेले भाजपचे मतदार नव्हते किंवा सहानुभूतीदारही नव्हते. मात्र, कार्यक्रमानंतर त्यापैकी काही जणांशी नव्याने नाते जोडण्यात भाजपला यश आले. या योजनेचा मोदींच्या विजयात अत्यंत महत्त्वाचा वाटा आहे. 

(सौजन्यः महाराष्ट्र टाइम्स, पुणे)

Friday, December 14, 2012

गावात सीएनजी रिक्षा नि क्राँकीटचे रस्ते

अमन शांतीचा मुस्लिमांनाही विश्वास

गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी येऊन एव्हाना चार दिवस होऊन गेले होते. सुरतमध्ये लिंबायत हा शहरी आणि ग्रामीण असे दोन्ही भाग असलेला मतदारसंघ सोडला तर ग्रामीण भागामध्ये फारसं जाणं झालं नव्हतं. त्यामुळं आम्ही व़डोदरापासून साधारण तीस किलोमीटरवरील डभोईला जायचं ठरविलं. म्हणजे ग्रामीण भागात काय माहोल आहे ते कळेल आणि मोदींच्या विकासाची गंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचली आहे का, हे ही समजेल.

सो सकाळी सकाळी डभोईच्या दिशेनं निघालो. डभोई हा गुजरातचे माजी मुख्यमंत्री चिमणभाई पटेल यांचे चिरंजीव सिद्धार्थभाई पटेल यांचा मतदारसंघ. चिमणभाई यांच्या पत्नी उर्मिलाबेन यांचे हे मूळ गाव. त्यामुळे सिद्धार्थभाई येथून निवडणूक लढवितात. २००२ चा म्हणजे गोध्रा दंगलीनंतरच्या निवडणुकीचा अपवादवगळता प्रत्येक वेळी डभोईने सिद्धार्थभाईंना साथ दिली आहे. यंदाच्या वेळेस भाजपने बाळकृष्णभाई पटेल यांना उमेदवारी दिली आहे. पंचवीस वर्षांपासून ते भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.


गंमत म्हणजे वडोदरा ग्रामीणमधील भाजपला अनुकूल अशा ७० मतदारयाद्या डभोईमध्ये जोडण्यात आल्या आहेत. म्हणजे जवळपास सात हजार मतदान नव्याने समाविष्ट करण्यात आले आहे. शिवाय दिलीप पटेल या काँग्रेस नेत्याने बंडाचा झेंडा फडकाविल्यामुळेही सिद्धार्थ पटेल यांची डोकेदुखी वाढली आहे. दरवेळी स्वतःच्या  मतदारसंघाची जबाबदारी कार्यकर्ते आणि निकटवर्तीयांच्या जीवावर टाकून सिद्धार्थ पटेल हे वाघोडिया, पादरा, सावली आणि छोटा उदयपूर अशा वडोदरा जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये फिरायचे आणि प्रचार करायचे. मात्र, यंदा भाजपने त्यांच्याच मतदारसंघामध्ये टाईट करून टाकले आहे. तेव्हा सिद्धार्थभाई यांना बाहेर पडण्याची संधीच पक्षाने दिलेली नाही.

डभोई हे साधारण एक लाख किंवा सव्वा लाख लोकसंख्या असलेले गाव. अगदी जुने गाव. शहराच्या चार दिशांना चार मोडकळीस आलेले किल्ले आहेत. डभोईच्या राजाने ते किल्ले बांधले होते, असे म्हणतात. डभोईची नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. गावात काँक्रीटचे रस्ते आहेत. पाणी आणि विजेचा प्रॉब्लेम नाही. गावामध्ये फक्त सीएनजी रिक्षा आहे. फक्त सीएनजी रिक्षा असून उपयोग नाही. रिक्षात सीएनजी भरण्यासाठी पंपही गावाजवळच एक किलोमीटरवर आहे. त्यामुळे पाच-सहा तास लाईनमध्ये थांबण्याची वेळ रिक्षा चालकांवर येत नाही.

२००२ च्या दंगलीत हे गावही दंगलीत होरपळले होते. तेव्हाच सिद्धार्थ पटेलही पराभवामध्ये होरपळून निघाले होते. मात्र, आता अमन आणि शांती आहे, असं मुस्लिम नागरिकही मान्य करतात. गावामध्ये साधारण तीस हजारच्या आसपास मुस्लिमांची संख्या आहे. बाजारपेठेतून फिरताना अनेक ठिकाणी मुस्लिमांची दुकानं ठळकपणे दिसून येतात. गल्ल्यावर बसलेल्या व्यक्तीचा पेहराव पाहून आणि त्यांच्या दुकानात लावलेल्या तसबिरींवरून. पण ब-याच दुकानांमध्ये मोदी यांच्या विकास कामांची प्रसिद्धी करणारे कॅलेंडरही लावलेले दिसते. आता यामागे उत्स्फूर्तता किती आणि सक्ती किती हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला नाही.

गावामध्येही मोदी यांच्याच नावाचा जप चाललेला दिसतो. काँग्रेसकडे नेता नाही आणि मोदी यांनी कामे केली आहेत, असे लोकांचे म्हणणे असते. वीज, पाणी आणि रस्ते यापुरताच गावकरी विकासाकडे पाहत असल्याचे जाणवते. बाकी किती उद्योग आले किंवा रोजगार किती मिळाला, यात त्यांना विशेष रस नसतो. डभोईमध्ये तसा कोणताही मोठा उद्योग नाही किंवा रोजगाराच्या संधी नाहीत. पण त्याबद्दल लोक नाराजी व्यक्त करताना दिसत नाहीत.  

डभोईत भरपूर फेरफटका मारल्यानंतर मग तिथून पन्नासएक किलोमीटर अंतरावर असलेल्या सावली येथे नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेसाठी गेलो. गुजरातेत येऊन कव्हर केलेली ही त्यांची तिसरी सभा. पहिली सभा २००२ मध्ये मणिनगर येथे. दुसरी २००७ मध्ये बापूनगर येथे आणि तिसरी सावली येथे. पूर्वीच्या दोन्ही सभा शहरातील होत्या. पण ही गावाकडची पहिलीच. त्यामुळे मलाही खूप उत्सुकता होती.
सभेसाठी मोदी येण्यापूर्वीचे वातावरण आणि नंतरचे वातावरण यात जमीन अस्मानाचे अंतर असते. पूर्वी मैदानही भरलेले नसते. पण मोदी यांचे हेलिकॉप्टर हवेत घिरट्या घालू लागल्यानंतर लोकांची संख्या आणि उत्सुकता दोन्ही वाढली. मोदी व्यासपीठावर येताच हारतु-यांचा कार्यक्रम होतो. मग कोणतेही सोपस्कार पार न पाडता मोदी थेट माईकचा ताबा घेतात आणि उपस्थित जनतेचाही. 


उपस्थितांशी संवाद साधत ते सभेवर पूर्णपणे कब्जा मिळवितात. सोनिया मॅडम, राहुलबाबा अशी ठेवणीतील विशेषणे वापरून लोकांच्या टाळ्या मिळवितात. राज्यात तुम्हाला विकासकामे दिसतात की नाही किंवा आपल्या गुजरातचा ताबा तुम्हाला अनोळखी नि अज्ञात लोकांच्या हातात द्यायचा आहे का... असे प्रश्न विचारून त्यांची उत्तरे लोकांकडूनच काढून घेतात. गुजरातचा चौकीदार असून तुमच्या सुरक्षिततेसाठी मी गांधीनगर येथे बसतो आहे, असे वाक्य फेकतात. सध्या निवडणुकीत भावनिक मुद्दा नसल्यामुळे मग सर क्रीकचा मुद्दा काढून काँग्रेस आणि पंतप्रधानांना लक्ष्य करतात. सर क्रीक पाकिस्तानच्या घशात घालण्याचा काँग्रेसचा डाव आहे. तसे झाले तर पाकिस्तान थेट गुजरातच्या घरात येईल, असे सांगून लोकांच्या मनात भीतीचे पिल्लू सोडून देतात.

सभेच्या शेवटी कमळाच्या चित्रावर शिक्का मारायला सांगतात. कमळाला मत म्हणजे फक्त उमेदवाराला मत नाही, तर गुजरातच्या विकासाला मत वगैरे सांगतात. मात्र, भाजपच्या उमेदवाराचे नाव घेत नाहीत. फक्त भाजपला आणि कमळाला मत देण्याचे आवाहन करतात. नरेंद्र मोदींच्या स्वभावातील मै अगदी थोड्या स्वरूपात का होईना पण इथंही दिसून येतो.

Wednesday, December 12, 2012

तीन मुस्लिमांची कहाणी


खुबसुरत सूरतमधील भन्नाट अनुभव

गुजरातमध्ये मुस्लिम नागरिकांची म्हणजेच मुस्लिम मतदारांचीही संख्या लक्षणीय आहे. अगदी गुजरातच्या दिशेने जाणा-या गाड्यांमध्ये बसल्यापासून हा अनुभव येऊ लागतो. बुरखा घातलेल्या महिला किंवा पांढरी जाळीची टोपी घातलेले पुरुष किंवा टिपिकल बोहरी मंडळींची संख्या वाढलेली सहजपणे लक्षात येते. अगदी द्वारकेपर्यंत मुस्लिम मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मग सुरतही त्याला कसा अपवाद असणार. सुरतमध्ये दोन दिवस फिरलो. त्यावेळचे हे काही अनुभव...



पहिला अनुभव एका चहावाल्याचा. सुरत टेक्सटाईल मार्केटमध्येच एका ठिकाणी चहा खूप चांगला मिळतो, असं समजलं. म्हणून मग तिथं चहा प्यायला गेलो. चहावाला मुस्लिम होता. ते आधी मा्हिती असतं तरी गेलोच असतो. चाळीशी-पंचेचाळिशी पार केलेला. डोक्यावर नेहमीची टोपी, पांढ-या रंगाची दाढी आणि नेहमीचा पेहराव. चहा एकदम फक्कड बनविला होता. खरोखरच मस्त.   

काय यंदा काय माहोल आहे, असं अगदी नेहमीचं वाक्य फेकल्यानंतर तो सुरू झाला. साहब, इस बार रंग बदलेगा... हे एकच मोजकं वाक्य बोलून स्वतःच्या चातुर्याचं दर्शन त्यानं घडविलं. मग आम्हीही सुरु झालो. म्हटलं भाई, क्यो बदलेगा रंग... तेव्हा त्याचं उत्तर खूप भारी होतं. म्हटला, अब बहुत हो गया. (वाजपेयी यांच्यापेक्षा छोटा पॉझ) महंगाई कितनी बढ गई है... अब बस हो गया. (मला वाटलं, की मोदींची राजवट खूप झाली असं त्याला म्हणायचं आहे. त्यासाठीच तो बस हो गया असं म्हणत असावा. खरंतर त्याला तेच म्हणायचं होतं. पण त्यानं ते चतुराईनं टाळलं.) त्याच्या मनात मोदींबद्दल कदाचित राग असावा, पण त्यानं तो व्यक्त करणं कौशल्यानं टाळलं. अगदी हसतहसत.

नंतर एक कडवट मोदी विरोधक पाहिला तो भाजपच्या एका रॅलीत. भाजपच्या लिंबायत मतदारसंघातील मराठी उमेदवार संगीता पाटील यांच्या रॅलीत आम्हीही सहभागी झालो होतो. माहोल अनुभवण्यासाठी. हा मतदारसंघ सुरत स्टेशनपासून चार-पाच किलोमीचटवर. या मतदारसंघात झोपडपट्ट्यांची संख्या जाणवण्याइतपत आहे. यामध्ये फिरत असताना मुस्लिम नागरिकांची वस्ती असलेल्या मोहल्ल्यातून भाजपची रॅली जात होती. रॅली पुढे पुढे सरकत होती आणि वस्ती अधिकाधिक दाट होत होती.

एका ठिकाणी एका गल्लीतून एक एम ८० वाला समोर येऊन थांबला. बेकरी वगैरेचा व्यवसाय असावा. एम ८० वर दोन पिशव्या लटकविल्या होत्या. त्यावरून मी अंदाज बांधला. भाजपच्या कार्यकर्त्यांनी भगवे टी-शर्ट घातले होते आणि उपरणी परिधान केली होती. आम्हीच फक्त भगव्या रंगाशिवाय होतो. आम्ही त्यांच्यापैकीच एक आहोत, असं समजून आमच्याकडे पाहून अत्यंत त्वेषानं तो म्हणाला, मोदीने कुछ बॉटल बिटल भेजा है क्या... एकच वाक्य बोलला पण काय बोलला. एकच बोला लेकिन क्या बोला... मोदींबद्दलचा राग, द्वेष, चीड, संताप, खुन्नस त्याच्या शब्दात आणि प्रश्न विचारण्याच्या शैलीत अगदी स्पष्टपणे दिसत होती. त्याकडे दुर्लक्ष करून पुढे निघालो. पण त्याचे डोळे अजूनही माझ्या डोळ्यासमोर आहेत.

नंतर रॅली फक्त मुस्लिमांच्या वस्तीतून फिरत होती. तेव्हा भाजपच्या घोषणांना त्या वस्तीतील छोटी छोटी शेंबडी पोरं जोरदार प्रत्युत्तर देत होती. कमल जिताओ... या घोषणेला पंजा जिताओ... किंवा वच्चा रे वच्चा कमल वच्चा (आलं रे आलं कमळ आलं) या घोषणेला वच्चा रे वच्चा पंजा वच्चा अशी प्रत्युत्तर मिळत होती. पंजाचे झेंडे फडकाविणं किंवा पंजाच्या नावानं घोषणा देणं, हे काम होतं शेंबडी पोरं करत होती. शाळेत किंवा मदरशात जसं शिक्षण मिळतं तसंच मोदी किंवा भाजपविरोधाचं अथवा काँग्रेस प्रेमाचं शिक्षण या मुलांना घरात किंवा परिसरात मिळत असावं.   

तिसरी व्यक्ती भेटली नरेंद्र मोदी समर्थक. भाजपचे नवसारीचे खासदार सी. आर. पाटील (हे देखील मराठीच आहेत.) यांच्या संपर्क कार्यालयात दक्षिण गुजरातसाठी मिडीया सेल स्थापन केला आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रवक्ते माधव भंडारी हे त्याचे प्रमुख आहेत. मराठीमध्ये अत्यंत प्रभावीपणे बोलणारे भंडारी हे गुजरातीतूनही तितकाच अस्खलित आणि सहज संवाद साधू शकतात, हे तिथं कळलं.

तर त्याच कार्यालयात दक्षिण गुजरात विद्यापीठात मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझम करणारी सेरा शेख ही विद्यार्थिनी भेटली. ती या मिडीया सेलमध्ये भंडारी यांची असिस्टंट म्हणून काम करीत होती. मकरंद जोशी नावाचा मराठी युवकही तिथं असिस्टंट म्हणून कार्यरत होता. ही सेरा शेख दिसायला एकदम मॉडर्न. टकाटक. जीन्सची पॅन्ट आणि हिरव्या रंगाचा लूज टॉप. मनातील स्टिरिओटाईप प्रतिमांमुळंहिचं नाव शेख असेल असं मनातही आलं नसतं.

तिचं नाव सेरा शेख असल्याचं समजल्यानंतर माझी उत्सुकता चाळविली. मग नंतर थोड्या वेळानं तिला विचारलं, तुला किंवा तुझ्या घरातील व्यक्तींना मोदींबद्दल काय वाटतं किंवा मुस्लिम समाजाचे ते विरोधक आहेत, असं वाटत का... त्यावर तिचं उत्तर मार्मिक होतं. मोदी यांना विकासाचे ध्येय आहे. मुस्लिमविरोधक म्हणून त्यांचे चित्र रंगविले जात असले तरी मला किंवा आमच्या नातेवाईकांमध्ये कोणालाच तसे वाटत नाही. जी मंडळी कमी शिकलेली आहेत किंवा जे विचार न करता बोलतात त्यांना कदाचित ते मुस्लिमविरोधक वाटत असतील. पण आम्हाला त्यांचे काहीच वावडे नाही. तिला आणि तिच्या घरच्यांना मोदींचा राग नाही, हे आम्हालाही माहिती होतंच. अन्यथा ती भाजपच्या कार्यालयात मिडीया असिस्टंट म्हणून रुजू झालीच नसती.

सुरतमध्ये आलेले हे तीनही अनुभव खूपच बोलके होते आणि लक्षात राहण्यासारखे. नरेंद्र मोदींनी कितीही सदभावना यात्रा आणि दौरे केले तरी हा द्वेष आणि संताप कमी होईल का, याबद्दल अजिबात साशंकता नाही. ती कमी होणारच नाही.

Tuesday, December 11, 2012

भाई, ये केशुभाई किधर है...

सुरतमध्ये 'परिवर्तन'ची हवा नाही
२००२, २००७, २०१२... सलग तिस-यांदा गुजरातच्या विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये सोमवारी सकाळीच दाखल झालो. वातावरण खूप तापलं असेल किंवा प्रचार शिगेला पोहोचला असेल, अशाच समजुतीनं सुरतमध्ये पोहोचलो. पण वातावरण काहीच तापलेलं नव्हतं. कुठेही पदयात्रा दिसत नव्हत्या, घरोघरी संपर्क साधण्यासाठी कार्यकर्त्यांची लगबग दिसत नव्हती. पक्षांच्या झेंड्यांची संख्या चांगलीच रोडावली होती, प्रमुख पक्षांची कार्यालयांमध्येही चहलपहल नव्हती. प्रचाराचा शेवटून दुसरा दिवस असला तरीही त्याचं प्रतिबिंब शहरात कुठेही उमटलेलं दिसत नव्हतं.





मला सर्वाधिक उत्सुकता होती, ती केशुभाई पटेल यांच्या पक्षाला किती जनसमर्थन आहे, हे जाणून घेण्याची. यंदाच्या निवडणुकीत तर गुजरात परिवर्तन पार्टीसारखा काँग्रेसला मोठ्या आशा असलेला पक्षही उतरला आहे. सुरत आणि दक्षिण गुजरातमध्येही अनेक भागात पटेल समाजाचे वर्चस्व आहे. सुरतमध्ये तर पटेल समाज मोठ्या संख्येने आहे. हिरे व्यापारी आणि टेक्सटाईल मार्केटमध्ये काम करणारे अनेक कामगार हे सौराष्ट्र भागातील आहेत. त्यामुळेच केशुभाई यांना इथे चांगला पाठिंबा मिळत असेल, अशी समजूत होती. केशुभाई यांचे दिवंगत सहकारी आणि सुरतचे माजी खासदार कांशीराम राणा हे सुरतचेच. त्यामुळे नाही म्हणायला सुरतमध्ये केशुभाईंच्या पक्षाचा विशेष जोर असेल, अशी माझी धारण होती. मात्र, परिस्थिती निराळीच निघाली. प्रचाराचे फक्त दोनच दिवस बाकी असताना, गुजरात परिवर्तन पार्टीचे ना कुठे बोर्ड दिसत होते ना कुठं प्रचाराच्या रिक्षा फिरताना दिसत होत्या. नना कुठल्या मोठ्या नेत्याची जाहीर सभा किंवा प्रचार फेरी लावण्यात आली होती.

जीपीपीचे (गुजरात परिवर्तन पार्टी... गुपप हा शॉर्ट फॉर्म वाचायला कसा तरी वाटतो) दक्षिण सुरत प्रभारी, सुरतचे माजी महापौर आणि महानगरपालिका फायनान्स बोर्डाचे माजी अध्यक्ष फकीरभाई चौहान यांच्याकडे गेलो. हे केशुभाईंचे कट्टर समर्थक आणि संघ-जनसंघाचे जुने कार्यकर्ते. साधारण ६५ किंवा ७० वर्षांची वामनमूर्ती. घरात गेल्यानंतर भिंतीवर जनसंघाचे संस्थापक शामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे दोन मोठे फोटो लावलेले दिसले. समोरच सोफ्यावर फकीरभाई आरामात बसलेले. सुरत जिल्ह्यातील कोणत्या तरी गावाहून आलेल्या पक्ष कार्यकर्त्याशी संवाद साधत होते. निवडणुकीच्या धामधुमीत फक्त एकच कार्यकर्ता पाहून धक्काच बसला. किमान पाच-पंचवीस कार्यकर्ते तरी त्यांच्या आजूबाजूला असतील आणि रणनिती ठरविली जात असेल, असे चित्र माझ्या डोळ्यासमोर होते. पण तसे काहीच दिसले नाही.



आम्ही गेलो आणि त्या कार्यकर्त्याची जागा आम्ही घेतली. फकीरभाई संवाद साधताना नरेंद्र मोदी आणि त्यांच्या कार्यशैलीवर सडकून टीका केली. अर्थातच, सौम्य प्रकृतीचे असल्याने सौम्य शब्दांतच. नरेंद्र मोदींच्या राज्यात कार्यकर्ते, भाजपचे नेते आणि भाजपचे चाहते यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळते. मी म्हणतो, तीच पूर्वदिशा, माझे म्हणणे ऐका किंवा माझ्याबरोबर येऊ नका, अशी त्यांची वृत्ती आहे. एकतर तुम्ही माझे चाहते व्हा नाहीतर मी तुमचा शत्रू होतो, अशीच मोदींची कार्यशैली आहे आणि तीच पक्षाला घातक आहे. त्यामुळेच केशुभाई आणि आम्ही त्यांच्यापासून दूर झालो, असे सांगून फकीरभाईंनी भडास काढली. सौम्य शब्दांत.

केशुभाईंच्या वयाचा मुद्दा भाजपकडून उपस्थित कसा करण्यात आला नाही. कारण मोदी एकदम तरुण तुर्क आणि केशुभाई वयस्कर. हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला नाही का, असे आम्ही विचारले. तेव्हा त्यांनी सांगितले, की सुरुवातीला हा मुद्दा भाजपने प्रचारात आणला होता. केशुभाईंचे वय देवाचे नामस्मरण करण्याचे आहे, निवडणुकीत उतरण्याचे नाही, असा त्या प्रचाराचा सूर होता. मात्र, नंतर केशुभाईंची लोकप्रियता खूप असल्याने त्या प्रचाराला कोणीच धूप न घातल्याने भाजपला तो मुद्दा थांबवावा लागला, असे फकीरभाई यांनी सांगितले. मात्र, कदाचित हाच मुद्दा केशुभाई यांच्याविरोधात जाईल, हे सांगायला नकोच.

नरेश पटेल हे पटेल समाजाचे फार मोठे नेते. राजकीय पक्षाच्या कोणत्याही नेत्याच्या जाहीर  द्र मोदी आणि त्यांचे संबंध फार मधुर नाहीत, अशी परिस्थिती. मध्यंतरी नवज्योतसिंग सिद्धूने गुजरातेत येऊन टोलेबाजी केली. क्रिकेट कॉमेंट्री आणि जाहीर सभेतील भाषण एकाच शैलीत करता येत नाही, हे त्याला कोण सांगणार. बोलता बोलता, तो केशुभाई हे देशद्रोही आहेत, म्हणाला. त्यावर जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. त्यावेळी केशुभाई हे देशद्रोही नाहीत, अशी जाहीर  प्रतिक्रिया नरेश पटेल यांनी दिली होती. पटेल समाजाचे १०० टक्के मतदान व्हायला पाहिजे, म्हणून  ते प्रयत्नशील आहेत. फक्त कोणासाठी मतदान करायचे, हे जाहीरपणे सांगायला ते तयार नाहीत.

अशा सर्व परिस्थितीत सुरत किंवा दक्षिण गुजरातमध्ये गुजरात परिवर्तन पार्टीचा म्हणावा, तितका जोर जाणवला नाही. कदाचित तो सौराष्ट्रापुरताच मर्यादित असू शकतो. त्यामुळेच केशुभाईंच्या पक्षाने सुरत किंवा दक्षिण गुजरातमधील ३६ जागांसाठी विशेष रणनिती अवलंबिली नसावी. त्याचमुळे दक्षिण गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेस यांच्यातच सामना असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. आमच्याशिवाय कोणाचेही सरकार स्थापन होऊ शकणार नाही, असा दावा जीपीपीचे नेते करीत असले तरीही त्या दाव्यावर माझा तरी विश्वास बसला नाही. कारण प्रत्यक्ष परिस्थिती काही वेगळेच सांगत होती.

Friday, November 23, 2012

बाळासाहेब… देशातील महाराष्ट्राची ओळख



 
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी गुवाहाटी इथंगेलो होतो. २००७ मध्ये. त्यावेळी स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय असलेले पोलॉक महंत नावाचे एक गृहस्थ भेटले होते. वय साधारण चाळीस असेल. ते तिथल्या ट्रान्सपोर्ट कमिटीचे अध्यक्ष होते. मी महाराष्ट्रातून आलो आहे म्हटल्यावर त्यांनी विचारलेला पहिलाच प्रश्न मला बुचकळ्यात टाकणारा होता. ‘अरे, आपके बालासाहब कैसे है…’ मला प्रश्न पडला, की याला लेकाला बाळासाहेबांची एकदम आठवण येण्याचे कारण काय. तेव्हा त्यानं सांगितलेला किस्सा एकदम अफलातून होता.
महंत हे तिसरी चौथीत असताना आई-वडिलांबरोबर मुंबईला गेले होते. त्यावेळी दादरजवळ गर्दीमध्ये ते हरविले. लहान असल्यामुळे त्यांना तसे काहीच कळत नव्हते आणि घरचे सोबत नाही, म्हटल्यावर त्यांना रडू कोसळले. तेव्हा ही गोष्टी शिवसैनिकांनी पाहिली. त्यांनी महंत यांना एका शिवसैनिकाच्या घरी नेले. तिथे त्यांची विचारपूस केली. का रडत आहे किंवा कुठून आले वगैरे. नंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये महंत हे त्यांच्या आई-वडिलांच्या जवळ होते.
‘ही गोष्ट माझ्या आयुष्यभर लक्षात राहणारी आहे. त्यामुळेच माझे आणि शिवसेनेचे जुने ऋणानुंबध आहे. त्यामुळेच मी विचारले, बाळासाहेब कसे आहेत?’ असे महंत यांनी सांगितल्यानंतर थोडासा धक्काच बसला.

दुसरा अनुभव आला पुदुच्चेरीमध्ये. तमिळनाडूमध्ये विधानसभा निवडणूक कव्हर करायला गेलो होतो, तेव्हा पुदुच्चेरीलाही गेलो होतो. तिथे रस्त्यावरून फिरत असताना एल गणपती नावाचे एक अॅडव्होकेट भेटले. साधारण पन्नाशीकडे झुकलेले. बाळासाहेबांचे डायहार्ड फॅन. कट्टर हिंदुत्त्ववादी आणि काँग्रेसला ठणकावून सांगणारे नेते म्हणून गणपती यांना बाळासाहेब आवडायचे. बाळासाहेबांनी आवाज दिला, की पाकिस्तानमध्येही त्याची दखल घेतली जाते इतकी त्यांची दहशत आहे, वगैरे भरभरून बोलत होते. जे पटत नाही, त्याविरोधात आवाज देण्याचा बाळासाहेबांचा गुण गणपती यांना विशेष भावत होता.
पुदुच्चेरीचे तेव्हाचे माजी आणि सध्याचे मुख्यमंत्री एन. रंगास्वामी यांना काँग्रेसच्या नेत्यांनी कसा त्रास दिला किंवा सोनिया गांधी यांनीही कट्टर कार्यकर्त्याकडे कसे दुर्लक्ष केले, यावर गणपती भरभरून बोलत होते. काँग्रेसमध्ये सगळे असेच लोक आहेत. त्यांना वठणीवर आणणारा एखादा नेता आम्हालाही हवा आहे. कदाचित बाळासाहेबच हे काम करू शकतील. म्हणूनच शिवसेनेची शाखा पुदुच्चेरीमध्ये उघडायला हवी, अशी गणपती यांची मागणी होती.
 
यासह इतर विषयांवरही गप्पा झाल्या आणि मग मी त्यांचा निरोप घेतला. अर्थात, बाळासाहेबांच्या राज्यातून आलेल्या माणसाला भेटलो आणि त्याच्याशी भेटलो याचेच कदाचित त्यांना समाधान होते. आशिष चांदोरकर भेटल्याचे कमी. 


 
महाराष्ट्रात अनेक नेते आहेत. अगदी आंडू, पांडू आणि झंडू नेत्यांपासून ते राष्ट्रीत नेते म्हणून मिरविणा-यापर्यंत अनेक नेत्यांची रांगच आहे. मात्र, महाराष्ट्राबाहेर त्यापैकी एकाही नेत्याची ओळख महाराष्ट्राचा नेता म्हणून नाही. कोणतेही पद किंवा सत्ता न उपभोगलेल्या बाळासाहेबांना हे भाग्य कसे लाभले, हाच विचार माझ्या मनात अनेक वर्षांपासून होता. बाळासाहेब गेल्यानंतर तोच विचार अधिक प्रकर्षानं जाणवायला लागला. मुंबईत बाळासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी गेल्यानंतर चाहत्यांचा उसळलेला अतिमहाप्रचंड जनसागर पाहिला आणि तेव्हापासून तोच विचार मनात घोळतोय.

राजकारणात असलेल्या एखाद्या माणसावर इतकं निस्सीम आणि निस्वार्थी प्रेम करणारे इतके चाहते असू शकतात, ही गोष्टच आश्चर्यकारक वाटते. म्हणजे दक्षिणेत एन. टी. रामाराव किंवा एम. जी. रामचंद्रन या कलाकारांना जी लोकप्रियता लाभली, त्यापेक्षा कैक पटीने अधिक लोकप्रिय बाळासाहेब आहेत, याचं यथार्थ दर्शन रविवारी घडलं. महासागर लोटला म्हणजे काय, याचा अर्थ माझ्या आणि नंतरच्या मंडळींना त्यादिवशीच ख-या अर्थाने कळला.

विदर्भातल्या कुठल्याशा खेड्यातील शेतक-यापासून ते मुंबईतल्या पश्चिम उपनगरातल्या एखाद्या गर्भश्रीमंत धनाढ्यापर्यंत, अमिताभ बच्चन-अनिल अंबानी यांच्यापासून ते एखाद्या तळागाळातल्या सामान्य माणसापर्यंत आणि गांधी टोपीवाल्या म्हाता-या माणसापासून ते थ्री फोर्थ घातलेल्या तरुण ललनांपर्यंत सर्वांचीच या जनसागरात उपस्थिती होती. त्यापैकी बाळासाहेबांचे थेट उपकार असलेले राजकारणी, त्यांच्या सान्निध्यात आलेले विविध क्षेत्रातील महनीय आणि सामान्य शिवसैनिक सोडले तर बाकीचे लोक कोण होते… बाळासाहेबांवर मनापासून प्रेम करणारे निस्वार्थी चाहते होते. आपलं जवळचं कोणीतरी गेलं आहे आणि त्याचं अंत्यदर्शन घेतल्याशिवाय चैन पडणार नाही, अशाच भावनेने मुंबईत महासागर लोटला होता.

तुमच्या आमच्या भाषेत बोलणारे बाळासाहेब होते. आपल्या अन्याय-अत्याचाराविरूद्ध असलेली चीड, एखाद्या घटनेबद्दलचा रोष ते आपल्या शब्दांतच व्यक्त करायचे. भडव्यांनोपासून ते यडझव्यापर्यंत बोलीभाषेतील अनेक शिव्या ते अगदी सहजपणे भाषणांमधून देत. पण त्यातून त्यांचा राग व्यक्त होत असे. उगाच भाषणांत रंगत आणायची म्हणून किंवा स्टाईल जपायची म्हणून त्या नसायच्या. उद्धव ठाकरे यांनी महाबळेश्वर येथे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. तेव्हा झालेल्या भाषणात त्यांनी तेव्हाचे मुख्य निवडणूक आयुक्त जेम्स मायकेल लिंगडोह यांचा ‘कोण रे तो डोहात लिंग बुडवून बसलेला…’ असा उल्लेख पोट धरून हसायला लावणारा होता. बाळासाहेब असेच बिनधास्त होते, बेधडक होते आणि जसे होते तसेच होते. आतून एक आणि भाषणात एक अशी भानगड नव्हती. लोकांसमोर होते. म्हणूनच ते लोकप्रिय झाले. 


व्यंगचित्रकार म्हणून ते महान होते, उत्तम पत्रकार होते, राजकारणात राहून पदाचा मोह त्यांना झाला नाही, कर्तृत्व, नेतृत्व आणि वर्क्तृत्व यामध्ये अजोड होते आणि बरेच काही होते. पण त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटायचा तो त्यांच्या मोकळेढाकळेपणामुळे. इतका मोठा नेता असूनही आपल्यासारखेच बोलतो, वागतो यामुळे. बोललेला शब्द फिरवित नाही म्हणून. संघ परिवाराने जबाबदारी टाळल्यानंतरही ‘बाबरी मशीद शिवसैनिकांनी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे,’ असे अगदी बिनधास्तपणे जाहीर करतो म्हणून. हिंदुत्त्ववादी म्हणून मिरवणा-यांनी पाठ फिरविल्यानंतरही ‘साध्वी प्रज्ञासिंहला सर्व कायदेशीर मदत करण्यासाठी शिवसेना तयार आहे,’ असे सांगणा-या संघटनेचे प्रमुख होते म्हणून. पाकड्यांना खेळू देणार नाही म्हणजे नाही, हा शब्द शेवटपर्यंत पाळला म्हणून. मुंबईत शिवतीर्थावर जो अथांग जनसागर उसळला तो यामुळेच. एखादा राजकारणी आपल्याला सोडून गेला म्हणून लोक आनंद व्यक्त करतात. पण इथे लाखोंच्या डोळ्यात अश्रू होते. हीच बाळासाहेबांची श्रीमंती होती. पुण्याई होती. 

बाळासाहेब गेले, हे मानायला मन तयार नाही. अजूनही असं वाटतं, की कधीतरी लुंगीपुचाट चिदंबरम यांना बाळासाहेब ‘सामना’तून दम भरतील. ‘शिवसेनाप्रमुखांच्या इशा-यामुळे पाकिस्तानची हातभर फाटली’ असं शीर्षक पुन्हा एकदा ‘सामना’मध्ये वाचायला मिळेल. छोट्या-मोठ्या कलाकारापासून ते राजकारण्यांपर्यंत कोणतरी आज मातोश्रीवर जाऊन बाळासाहेबांची भेट घेतली, असा फोटो पहायला मिळेल. शिवसेनाप्रमुखांची आज अमक्या अमक्या वाहिनीवर मुलाखत, अशी जाहिरात पहायला मिळेल. साहेबांची संजय राऊत साहेबांनी घेतलेली मॅरेथॉन मुलाखत तीन-चार महिन्यांनी वाचायला मिळेल. ‘सामना’तून साहेबांच्या शुभेच्छा किंवा एखादं निवेदन वाचायला मिळेल. पण… आता यापैकी काहीच घडणार नाही.

Thursday, October 04, 2012

जातीय तेढ नसलेला इतिहास

गृहखात्यानेच लिहावा…


 महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे पोलिसांच्या लेखणीतून फेरलेखन होणे आवश्यक आहे. म्हणजे पोलिसांच्या बोटचेप्या भूमिकेमुळे तरी तसाच संदेश लोकांपर्यंत पोहोचतो आहे. शिवाजी महाराजांनी ज्या नरराक्षसाचा कोथळा काढला, त्याचे पोस्टर्स किंवा प्रतिमा लावण्यात येऊ नयेत, पुण्याच्या लाल महालात महाराजांनी ज्या सरदाराची बोटे छाटली, त्याचा उल्लेख गणपतीच्या देखाव्यातून वगळण्यात यावा, शिवरायांची भव्य प्रतिमेला गणेशोत्सव मिवरणुकीत आणण्यात येऊ नये, अन्यथा दंगल भडकेल, असले भन्नाट जावईशोध राजमान्य राजश्री आर. आर. पाटील यांच्या गृहखात्याने लावले आहेत. 

अशा परिस्थितीत, कदाचित भविष्यात जातीय तेढ वाढू नये, म्हणून महाराजांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहिण्याचे काम आर. आर. आबांना पार पाडावे लागेल. भाषणांच्या पुस्तकाप्रमाणेच आबांनी एखादे सुविचारांचे पुस्तक लिहावे, असा सल्ला अजितदादा पवार यांनी दिलाच आहे. त्यालाच जोडून आमची विनंती आहे, की आबांनी शिवरायांचा धर्मनिरपेक्ष इतिहास लिहावा, म्हणजे उगाच महाराष्ट्रात धार्मिक तेढ बिढ निर्माण होणा्र नाही आणि पोलिसांच्या डोक्यालाही ताप राहणार नाही. तेव्हा आबा तुम्ही हे कार्य तातडीने हाती घ्याच…

आबांनी किंवा त्यांच्या पोलिसी खात्याने हा इतिहास लिहावयास घेतला, तर तो काहीसा असा असेल…

प्रसंग पहिला… 


छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कोण करतो, असा सवाल विजापूरच्या एका राजाच्या दरबारात उपस्थित केला गेला. तेव्हा अ नावाच्या एका सरदाराने महाराजांना जेरबंद करण्याचा विडा उचलला. शिवाजी महाराजांना जेरबंद करण्यासाठी ‘अ’ हा सरदार महाराष्ट्रावर चाल करून आला. लाखो सैनिक, घोडदळ, पायदळ, तोफा आणि बऱ्याच महिन्यांची रसद घेऊन मदमस्त ‘अ’ चालून आला. महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे मंदिर त्याने फोडले. मंदिराप्रमाणेच मूर्तीचीही विटंबना केली. एकावेळी आख्खा बोकड संपविणाऱ्या या नरराक्षसाने महाराष्ट्रातील अनेक मठमंदिरांवर हल्ला चढविला. 

चिडून शिवाजी महाराज आपल्यावर चाल करून येतील आणि भल्यामोठ्या सैन्याच्या जोरावर आपण त्यांचा अगदी सहजपणे पराभव करू, अशा धुंदीत हा ‘अ’ राहिला. मात्र, शिवराय हे पण काही कच्च्या गुरूचे शिष्य नव्हते. त्यांनी ‘अ’ला जावळीच्या खोऱ्यात ओढून आणले. शिवरायांची भेट घेण्यासाठी ‘अ’ प्रतापगडच्या पायथ्याशी पोहोचला. तिथे शामियान्यात ‘अ’ने महाराजांना गळाभेटीसाठी बोलाविले. शिवरायांची मान बगलेत दाबून ‘अ’ने महाराजांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. शिवरायांनी पोलादी अंगरखा म्हणजेच संरक्षक कवच घातले होते. त्यामुळे या हल्ल्यातून महाराज बचावले. ‘अ’चा वार फुका गेला. महाराजांनी वाघनखे काढली आणि ‘अ’च्या पोटात खुपसून थेट त्याचा कोथळाच काढला. महाराजांनी इतक्या त्वेषाने प्रतिहल्ला चढविला, की ‘या xx’ असे म्हणज धिप्पाड ‘अ’ क्षणार्धात जमिनीवर कोसळला.

प्रसंग दुसरा…


औरंगाबादहून नगरमार्गे बारामती, अशी मजल दरमजल करीत ‘शा’ पुण्यात दाखल झाला. डोंगरी किल्ल्यांमध्ये महाराजांची मक्तेदारी मोडून काढणे, आपल्याला जमणार नाही, हे ‘शा’ने ओळखले होते. त्यामुळे त्याने मैदानातच महाराजांशी दोन हात करण्याचे ठरविले आणि पुण्याच्या लाल महालात ‘शा’ने आपला डेरा टाकला. त्याने बंदोबस्त वाढविला. पुण्याच्या आतमध्ये प्रवेश करणे जिकीरीचे बनले होते. ‘शा’च्या सैन्याशी समोरासमोर युद्ध करणे शक्य नाही, हे महाराजांनी ताडले होते. त्यांनी अत्यंत धाडसी योजना आखली. लाल महालाचा कोपरा न कोपरा शिवरायांना माहिती होता. त्यामुळे लाल महालावर हल्ला करून थेट ‘शा’चाच मुडदा पाडायचा, असा महाराजांचा गनिमी कावा होता. त्यानुसार एका संध्याकाळी लग्नाच्या वरातीत खुद्द महाराज आणि त्यांचे काही निवडक सरदार सहभागी झाले. सर्वांनी इतके बेमालूम वेषांतर केले होते, की कोणाला या काव्याचा थांगपत्ताही लागला नाही. 

लाल महालापाशी येताच शिवराय आणि सर्व मावळे एका ठिकाणी जमा झाले. तेथे महाराजांनी सरदारांना आणि मावळांना महत्त्वाच्या सूचना दिल्या. महाराजांना लाल महालाची खडा न खडा माहिती होता. महाराजांनी खिडकीतून स्वयंपाकघरात प्रवेश केला. तेथून महाराज ‘शा’च्या शयनकक्षात घुसले. महाराज आणि त्यांचे सरदार लाल महालात घुसले आहेत, हे कळताच ‘शा’ची चांगलीच तंतरली. त्याच्या अंगात कापरं भरलं. तो घामाघूम झाला. आपला जीव कसा वाचवायचा, याचा विचार तो करू लागला. खिडकीतून पळून जायचा प्रयत्न करणाऱ्या ‘शा’वर महाराजांची तलवार चालली. ‘शा’च्या उजव्या हातांची बोटे तुटली आणि तिथून ‘शा’ थेट जनानखान्यात पळाला. महाराज तिथे पोहोचले. जनानखान्यात बुरख्यामध्ये असलेल्या ‘शा’ला महाराजांनी ओळखलेच आणि पुणे सोडून जाण्याच्या अटीवर त्याला जीवदान दिले. ‘शा’ पाय लावून पळत सुटला आणि थेट औरंगजेबाच्या दरबारात पोहोचला. एव्हाना महाराज आणि त्यांचे सरदार सिंहगडच्या दिशेने पसार झाले.

प्रसंग तिसरा…
‘मु’ सम्राट ‘औ’चा सरदार असलेला मिर्झाराजे जयसिंह आणि ‘दि’ हे स्वराज्यावर चालून आले. ‘मु’  सैन्य आणि शिवरायांचे मावळे यांच्यात घनघोर युद्ध झाले. ‘मु’च्या सैन्याने पुरंदरच्या किल्ल्यावर हल्ला चढविला. मुरारबाजी देशपांडे यांनी ‘मु’च्या सैन्याला पळता भुई थोडी करून ठेवली होती. मात्र, ‘मु’च्या सैन्याची संख्या आणि ताकद प्रचंड असल्यामुळे पुरंदरची बाहेरची तटबंदी भेदली गेली. तरीही लढवय्या मुरारबाजींनी हार मानली नाही. मुरारबाजी यांचे शौर्य आणि पराक्रम पाहून ‘दि’ चकितच झाला आणि त्यांच्याकडे पाहतच बसला. ‘दि’ने मुरारबाजी यांच्यासमोर तहाचा प्रस्ताव ठेवला आणि ‘मु’लांच्या सैन्यात मोठे सरदार पद देऊ केले. मात्र, महाराजांशी आणि पर्यायाने स्वराज्याशी प्रतारणा करणे मुरारबाजींना बाप जन्मात शक्य नव्हते. त्यामुळे त्यांनी या प्रस्तावावर विचार करण्यासाठीही वेळ दवडला नाही आणि युद्ध सुरूच ठेवले. 

मात्र, एका भाल्याने मुरारबाजी यांचा वेध घेतलाच. मात्र, शिर धडापासून वेगळे झाल्यानंतरही मुरारबाजी यांची तलवार काही मिनिटे तशीच सपासप फिरत होती, असे इतिहासकार सांगतात. इतका त्वेष आणि जोश त्यांच्यामध्ये होता. पुरंदरच्या या लढाईत मुरारबाजींनी प्राणांची बाजी लावली. महाराजांना पराभव स्वीकारावा लागला. स्वराज्यातील २३ किल्ले ‘मु’ना द्यावे लागले आणि युवराज संभाजीराजे यांच्यासह ‘औ’च्या भेटीसाठी आग्र्याला जाण्याची मिर्झाराजे जयसिंह यांची अट मान्य करावी लागली.

प्रसंग चौथा… 


मान्य केलेल्या अटीनुसार छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. त्याठिकाणी ‘औ’चा मोठा दरबार भरला होता. वास्तविक पाहता, शिवराय हे मराठ्यांच्या साम्राज्याचे राजे. त्यामुळे त्यांचा मान पहिल्या रांगेत असायला हवा होता. मात्र, पराभूत आणि पळपुट्या सरदारांच्या मागील रांगेत शिवरायांना स्थान देऊन ‘औ’ने महाराजांचा पाणउतारा केलाच. स्वाभिमानी शिवरायांना हा अपमान सहन होणे शक्यच नव्हते. ‘आमचा अपमान करण्यासाठीच ‘औ’ने आम्हाला येथे येण्याचे निमंत्रण दिले आहे का,’ असा थेट सवाल करीत महाराज तेथून त्यांच्या कक्षाकडे रवाना झाले. 

‘औ’ने महाराजांच्या छावणीला लष्कराचा गराडा घातला. शिवराय नजरकैदेत अडकले. आता येथून बाहेर कसे पडायचे, याच्याच विवंचनेत महाराज होते. अखेरीस महाराजांना शक्कल सुचली. छत्रपती शिवाजी महाराजांनी आजारी पडण्याचे नाटक केले. महाराजांची तब्येत सुधारावी, म्हणून साधूसंत, फकीर, मौलवी मंडळींना सुकामेवा, मिठाई तसेच फळफळावळीचे पेटारे पाठविण्यात यावे, असा प्रस्ताव पुढे आला. ‘औ’नेही त्याला मान्यता दिली. काही दिवस असेच जाऊ दिल्यानंतर महाराजांनी एका दिवशी स्वतः पेटाऱ्यातून ‘औ’च्या हातावर तुरी देण्याचे निश्चित केले. योजनेनुसार एका पेटाऱ्यात स्वतः शिवराय आणि दुसऱ्या पेटाऱ्यात युवराज संभाजीराजे बसले आणि पाहता पाहता ‘औ’च्या नजरबंदीतून पसार झाले. महाराजांना नजरकैदेत ठेवून तिथेच त्यांचा खात्मा करण्याचे ‘औ’चे मनसुबे महाराजांनी उधळून लावले आणि शिवराय सुखरुप स्वराज्यामध्ये पोहोचले.

(महाराजांवर चालून आलेल्या काही सरदारांची नावे ही खऱ्याखुऱ्या इतिहासातील म्लेंच्छ नावांशी साधर्म्य राखणारी वाटल्यास तो निव्वळ योगायोग समजावा आणि उगाच डोक्यात राग घालून घेऊन धार्मिक तेढ पसरवू नये.)

छत्रपती शिवरायांचा इतिहास लवकरात लवकर म्लेंच्छमुक्त केला पाहिजे. जेणेकरून त्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही. अर्थात, या खानावळीचा सध्याच्या मंडळींना पुळका का यावा… त्यांच्याविरोधात घोषणा दिल्या किंवा वास्तव सांगितले तर चालू स्थितीत कोणाच्या पोटात शूळ का उठावा… मिरवणुकांमध्ये अशा पोस्टर्स आणि छायाचित्रांचे प्रदर्शन जर होत असेल तर काहींच्या छातीत जळजळ होऊन गरळ का बाहेर पडावी… हे कोणालाही न उलगडलेले कोडे आहे. अफझलखान, शाहिस्तेखान, दिलेरखान, औरंगजेब, सिद्दी जौहर आणि मुघल, आदिलशाही, निजामशाही यांच्यातील तमाम सरदार हे पोटात कळ येणाऱ्यांचे बापजादे होते किंवा जावई होते, अशा थाटात महाराजांच्या जीवावर उठलेल्या खानावळीचे समर्थन करण्याची अहमहिका मंडळींमध्ये सुरू आहे.

वेळीच हे थांबावे, अशी आवश्यकताही कोणाला वाटत नाही. उलट धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या नावाखाली शिवरायांच्या कार्यकर्त्यांनाच चेपण्याचे प्रयत्न सुरू असतात. आता शिवरायांवर आक्रमण करणारी मंडळी मुसलमान होती, हा काही महाराजांचा दोष नाही ना. शिवाय ते कोणत्याही जाती-धर्माचे असले तरीही तुम्ही शिवरायांच्या बाजूने आहात, की अफझलखानाच्या बाजूने, हे विचारण्याची हिंमत कोणाच्यातही नाही. कारवाईचा ढोस मात्र, शिवरायांच्या मावळ्यांनाच. शिवरायांच्या महाराष्ट्रात हे कितपत योग्य आहे. 

काही वर्षांपूर्वी डोंबविली येथील एका मंडळाने अफझलखानाचा कोथळा काढणारे शिवाजी महाराज असा देखावा मिरवणुकीसाठी केला होता. अर्थातच, धार्मिक तेढ निर्माण होईल, या कारणाखाली पोलिसांनी त्याला आक्षेप घेतला. त्याविरोधात हे कार्यकर्ते न्यायालयात गेले. तेथे न्यायालयाने स्पष्टपणे निकाल दिला आहे. ‘छत्रपती शिवरायांनी अफझलखानाचा कोथळा काढला, हे ऐतिहासिक सत्य मुस्लिमांना स्वीकारावेच लागेल…’

तेव्हा लवकरात लवकर महाराजांचा इतिहास म्लेंच्छमुक्त करून टाकावा, म्हणजे धार्मिक तेढ निर्माण होणार नाही आणि दंगलीही भडकणार नाहीत. बघा पटतंय का...